Saturday, May 26, 2018

शक्यतांचा विचार आणि स्वीकार

गेल्या नऊ लेखांमधून 'परंपरा आणि नवता' हे मध्यवर्ती सूत्र धरून आपण काही विषयांवर प्रामुख्याने संकल्पनात्मक चर्चा केली आहे. मला असं वाटतं की जेव्हा कुणी वैचारिक स्वरूपाचं काही लेखन करतं तेव्हा त्या लेखनाचा एक मुख्य उद्देश लिहिणाऱ्याने स्वतःचं आकलन वाढवणं हा असायला हवा. वैचारिक लेखन हे मुख्यत्वे संकल्पनांचा, विचारकलहांचा, व्यवस्थात्मक उत्तरांचा धांडोळा घेणारं असतं. त्यात एक प्रभाव हा 'पर्स्पेक्टिव्ह'चाही असतो. विशिष्ट दृष्टीकोन तिथे प्रभावी असू शकतो. त्यामुळे आपण 'अंतिम सत्य' मांडतोय असा लेखकाचा आग्रह नसावा. मानवनिर्मित जग अचंभित करणारं आहे. मौजेचं आहे. कारुण्याचं आहे. दुःखाचं आहे. विवादांचं आहे. या जगाचं आपलं आकलन, आपल्या 'नव्या जगाच्या कल्पना' मांडायची स्पेस लेखकाला मिळायला हवीच, फक्त वर म्हटलं तसं लेखकाचा एक हेतू स्वःताची समज वाढवणं हाही असायला हवा. 

लेखमाला लिहिण्याच्या प्रोसेसमधून हा उद्देश पूर्ण होतो आहे याचं मला समाधान आहे. कधीकधी असाही विचार मनात येतो की आपण उंटावरून शेळ्या हाकतोय का? पण वाचक जेव्हा प्रतिक्रिया देतात, 'वाचून काहीतरी नवीन मिळालं'असं कळवतात तेव्हा बरं वाटतं. अर्थात वाचकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांबरोबरच इतरांच्या न दिल्या गेलेल्या नकारात्मक प्रतिक्रियाही असू शकतात याची जाणीव मनात जागी असते. परंपरा आणि नवतायाबाबत भारतीय संदर्भात चर्चा अधिक टोकदार होते याचं कारण भारतीय समाजव्यवस्थेच्या रचनेत आहे. ही रचना एकसंध नाही आणि त्याच्या परिणामी, या रचनेचं उत्पादन असलेला भारतीय माणूसही शतखंड आहे. भारत एकाच वेळी सोळाव्या आणि एकविसाव्या शतकात वावरत असतो असं म्हटलं जातं ते खरंच आहे. अमर्त्य सेन यांचं 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' नावाचं पुस्तक आहे. हे पुस्तक मी वाचलेलं नाही, पण हे शीर्षक मला 'भारतीयत्वा'च्या एका लक्षणाचं अचूक वर्णन करणारं वाटतं. हे आर्ग्युमेंटचं जनुक इथल्या सर्व प्रकारच्या वैविध्यामुळे विकसित झालं आहे आणि एका अर्थी ते उपकारक आहे, पण दुसऱ्या बाजूने नवतेला अटकाव करणारंही आहे. भारतीय उदारमतवादावर आज, विशेषतः राजकीय परिप्रेक्ष्यातून, बरीच टीका होते आहे. (याचा यथायोग्य शोध स्वतंत्रपणे घेता येईल. या लेखमालेत पुढे तो घ्यावा असं माझ्या मनात आहे.) परंतु आपण साधारण निरीक्षण केलं तर असं दिसेल की प्रबोधनाचा, बदलाचा विचार रुजायला भारतीय मातीत थोडा वेळच लागतो. इथली गुंतागुंत 'युनिक' स्वरूपाची आहे. त्यामुळेच परंपरा आणि आधुनिकता या संकल्पनांना भारतीय संदर्भात, विविध परिप्रेक्ष्यात काय अर्थ प्राप्त होतो हे तपासावं लागतं. 

या लेखमालेचा पहिला एक तृतीयांश टप्पा संपत असताना उजळणी म्हणून हे मांडावंसं वाटलं. विशेषतः 'पुरोगामी' या शब्दाभोवती गेल्या काही वर्षात जे नकारात्मक वर्तुळ तयार झालेलं दिसतं त्या पार्श्वभूमीवर आधुनिकतेच्या आग्रहाबरोबरच आधुनिकतेची चिकित्सा करत राहणंही गरजेचं आहे. एखादा विचार स्वतंत्रपणे आकर्षक असतो, पण त्याच्याकडे 'विथ रेफरंस टू रिअ‍ॅलिटी' पाहिलं की चित्र वेगळं दिसतं. 

हे सगळं नोंदवून आता पुढे जाऊ. 

मागील लेखात आपण नातेसंबंधांविषयी थोडं बोललो होतो. आता नात्यांच्या नव्या रचनेबाबत, प्रारूपाबाबत बोलूया. स्वतःची भावनिक साक्षरता तपासत राहणे, त्यात सुधारणा करत राहणे ही निरोगी नात्यांची पूर्वअट तर आहेच. दुसरं असं की व्यक्तिस्वातंत्र्य आणि नात्यांमध्ये अपरिहार्यपणे येणाऱ्या अपेक्षा, त्यातून निर्माण होणारी बंधनं याचा समतोल साधण्याची कला अवगत करून घेणं आवश्यक आहे. भारतीय संदर्भात एक गोष्ट अधोरेखित करायला हवी. 'व्यक्तिस्वातंत्र्य' किंवा मुळात 'स्वातंत्र्य' या संकल्पनेचा ऊहापोह करणं शक्य असलं (आणि तो व्हावा) तरी आपली व्यक्तिस्वातंत्र्याची व्याख्या बरीच अलीकडे थांबते. नात्यांमधलं 'एक्स्प्लोरेशन' - शोध - याला आपण सहसा तयार नसतो. 'टिकवणं चांगलं - बदलणं वाईट' अशी आपली साधारण समजूत आहे. याबाबत किमान 'थॉट एक्सपेरिमेंट' करावा असंही फारसं कुणाला वाटत नाही.त्यातून आहे त्या व्यवस्थेचं गौरवीकरण होऊ लागतं. ती पवित्र वगैरेसुद्धा होते. याचं एक कारण आपल्या भक्कम कुटुंबसंस्थेत आणि तीतून आकारास आलेल्या घट्ट मानसिकतेत आहे. नवं स्वीकारताना पारखून स्वीकारावं याबाबत दुमत नाही, पण नवं समोर आलं की गडबडून जाणं म्हणजे शक्यतांचा विचार केलेला नसणं. हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो 'जीवनकौशल्यां'च्या शिक्षणाशी जोडलेला आहे. 'विविध शक्यता असू शकतात' हा विचारच मनात रुजवला न जाणं तसं गंभीर आहे. इथे पुन्हा एकदा चित्रपट आठवला. रॉबिन विल्यम्स या महान अभिनेत्याची प्रमुख भूमिका असलेला 'मिसेस डाउटफायर' हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. घटस्फोटानंतर आपल्या मुलांना भेटण्यासाठी स्रीवेष धारण करून बायकोच्या घरी बेबीसिटर म्हणून डॅनियल (रॉबिन विल्यम्स) दाखल होतो. पुढे बऱ्याच गमतीजमती घडतात. शेवटी सत्य उघडकीस आल्यानंतर मुलांच्या आईच्या - मिरांडाच्या (सॅली फील्ड) हे लक्षात येतं की डॅनियल आणि मुलं एकमेकांशिवाय राहू शकणार नाहीत. मुलांची कस्टडी तिच्याकडे असते. त्यात बदल करायला ती तयार होते आणि डॅनियल त्याच्या मूळ रूपातच मुलांना भेटायला रोज येऊ लागतो. डॅनियल आणि मिरांडा घटस्फोटितच राहतात. चित्रपटाच्या शेवटी डॅनियलचा एक मोनोलॉग आहे. तो आता एक टीव्ही शो करतो आहे. एका घटस्फोटित दांपत्याच्या मुलीने लिहिलेल्या पत्राला उत्तर देताना तो म्हणतो की कुटुंबाचे विविध प्रकार असू शकतात. विविध व्यवस्थांनी कुटुंब तयार होऊ शकतं आणि या सर्व व्यवस्थांमध्ये कुटुंबातील प्रेम टिकू शकतं. मला हा मोनोलॉग फार आवडला. डॅनियल-मिरांडामध्ये आणि त्यांच्या कुटुंबामध्ये जे घडतं ते घडतंच, पण अखेरीस 'ते दोघे पुन्हा एकत्र आले आणि सुखाने संसार करू लागले'असं होत नाही. ते वेगळेच राहतात. आपण आता वेगळं राहणं श्रेयस्कर आहे हे त्यांना समजलेलं असतं. या वेगळ्या राहण्यातही मुलांची व्यवस्था नीट लागते. त्या दोघांमधला संवादही सुरू राहतो. आता हे चित्रपटातील कल्पनाचित्र आहे हे बरोबर, पण किमान कल्पनेत तरी काही नवीन घडतं आहे याचं मला समाधान वाटलं. 

याच चित्रपटाचा हिंदी रीमेक 'चाची ४२०' या नावाने आला होता. कमल हासनसारख्या ताकदवान अभिनेत्याने यात प्रमुख भूमिका केली होती. दिग्दर्शकही तोच होता. पण चित्रपट 'मिसेस डाउटफायर'ची उंची अजिबात गाठू शकला नव्हता. कमल हासनने स्रीवेष घेतल्यावर त्याचा घरमालक आणि सासरा त्याच्याकडे आकृष्ट होणं हे तर अतिशय टिपिकल होतं आणि आपल्या मानसिकतेचं द्योतकही होतं. चित्रपट बऱ्याच ठिकाणी बटबटीत होता. अखेरीस अपेक्षेप्रमाणे नवरा-बायको एकत्र येतात आणि सुखाने संसार करू लागतात हे होतंच. 'मिसेस डाउटफायर' आणि 'चाची ४२०' हे मानसिकतेतील फरकाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. 'बीइंग इंडियन'मध्ये काही गोष्टी अनुस्यूत असल्यासारख्या धरल्या जातात. त्याची गरज आहे का असा प्रश्न पडतो. हा जो मोल्ड तयार झाला आहे तो आपण ब्रेक का करू शकत नाही? मी मागे काही चर्चांमधून मांडलेला मुद्दा इथेही मांडतो. भारतीय तत्वज्ञान परंपरेतील विविध विचारप्रवाह पाहिले तर आपल्या लक्षात येईल की इथे मनुष्य आणि सृष्टीच्या नात्याचा खोलवर विचार झाला आहे. भारतीय इतिहासाला जातीय विभाजनाचा मोठा विवादास्पद पैलू आहे. परंपरेचा अभिमान बाळगणारे बरेचजण या पैलूकडे बहुतेकदा दुर्लक्ष करतात. परंतु हे मान्य केलं तरी भारतीय तत्त्वज्ञानात वैचारिक खाद्य पुष्कळ आहे हेही खरं. मला असं दिसतं की आपण या वैचारिक बैठकीकडे, तात्विक संघर्षाकडे दुर्लक्ष करतो आणि आपली परंपरा लग्न-कुटुंबसंस्था-जातीव्यवस्था  यांच्या भक्कमपणापुरती मर्यादित ठेवतो. (ज्या लेखामुळे र. धों. कर्व्यांवर पहिला खटला भरला गेला त्या लेखात (व्यभिचाराचा प्रश्न) त्यांनी हिंदू परंपरेतील दाखले देऊन स्री-पुरूष संबंधात आता अनैतिक ठरवल्या गेलेल्या कृत्यांना एकेकाळी मान्यता होती हे दाखवून दिलं आहे. महाभारत, कामसूत्र यांचा आधार घेत ते हे मांडतात.) मुद्दा असा की आपण जर आपल्या वैचारिक परंपरेचा आधार घेतला तर कुटुंब, नातेसंबंध याबाबत प्रयोग करणं, त्यातील नवतेला सामोरं जाणं आपल्याला जड जाणार नाही. कुटुंबसंस्था भक्कम असणं, मानवी नात्यांमध्ये ओलावा असणं आवश्यकच आहे. हे मुळातच इथे असल्याने आपल्याला बिचकून जायचं काही कारण नाही. पण दिसतं असं की आपण थोडे बिचकतो आणि ज्यांची कुटुंबसंसंस्था मोडकळीस आली आहे असा आपला दावा असतो ते पाश्चिमात्त्य मात्र प्रत्यक्षात नव्या रचनेचा स्वीकार (कल्पनेत तरी नक्कीच) करताना दिसतात.  

या मुद्द्यापाशी थांबू आणि पुढील लेखात यावर अधिक सविस्तरपणे बोलू.

Saturday, May 12, 2018

तुझे आहे मनापाशी

माझ्या आईने लहानपणी केव्हातरी सांगितलेली एक गोष्ट आहे. महंमद पैगंबरांची. ती खरी-खोटी-दंतकथा जी काही असेल ती असेल, पण माझ्या चांगली लक्षात राहिली. पैगंबर आणि त्यांचा एक शत्रू - अशा दोघांमध्ये युद्ध चालू आहे. दोघांच्याही तलवारी भिडल्या आहेत. एका क्षणी पैगंबर आपल्या प्रतिस्पर्ध्याला चीत करतात आणि तलवारीचं टोक त्याच्या छातीवर ठेवतात. तो घाबरून देवाचा धावा करू लागतो. 'आता मला कोण वाचवणार?' असं म्हणू लागतो. तेव्हा पैगंबर तलवार बाजूला घेतात आणि त्याचा हात धरून त्याला उठवतात. मग त्याला मिठी मारून म्हणातात. 'मी आहे ना तुला वाचवायला!' 

'एकातलं अनेक असणं' कसं आवश्यक आहे याची जाणीव होत असण्याच्या टप्प्यावर आज ही कथा वेगळ्या महत्त्वाने आठवते. या सदराच्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'एकावर सगळा भार नाही. जे आहे ते दोघांचं आहे.' हे समजणं माझ्यासाठी महत्त्वाचं ठरलं. आणि विविध संदर्भात पाहू जाता केवळ दोनच नाही तर अनेक घटक एकाच वेळी अस्तित्वात असतात हेही लक्षात आलं. एक गंमतीशीर उदाहरण द्यावंसं वाटतं. 'नटसम्राट' नाटकातल्या प्रसिद्ध स्वगतात गणपतराव बेलवलकर जसं 'मी आहे हॅम्लेट, मी ऑथेल्लो, मी ज्यूलियस सीझर, मी आहे प्रतापराव आणि मी सुधाकर' असं म्हणतात तसं आपणही स्वतःला ‘मी विवेकी, मीच विकारी, मी गोंधळलेला, मी ठाम, मी तर्कशुद्ध, मी भावनिक' असं म्हणू शकतो. वरील कथेत पैगंबर 'दोन भूमिका' निभावतात आणि त्यातून एक शिक्षण होतं. आपण आपल्या अंतरातल्या विविध प्रवाहांकडे शांतपणे बघत, त्यांच्यावर नियंत्रण मिळवत, योग्य वेळी योग्य प्रवाहाला वाट देऊ शकलो तर मानवी नातेसंबंधांना विधायक वळण मिळू शकेल का?

मागच्या लेखाच्या अखेरीस 'मानवी नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत चर्चा करू' असं आपण म्हटलं होतं, पण मला वाटतं आधी 'मानवी नाती' या मूळ विषयाच्या आजूबाजूने थोडं भटकून येऊ. 

आपण माणसं म्हणजे 'जैव उत्पादन' आहोत. आणि हे उत्पादन लक्षावधी वर्षांपासून 'मॉडिफाय' होत आलं आहे. यात ज्या मूलभूत, अस्तित्व टिकवण्याशी संबंधित मनोवृत्ती आहेत त्या टिकलेल्या असल्या तरी त्यातही अनाकलनीय बदल व्हायची शक्यता असते. आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याला डोक्यावर घेणारी माकडीण पाणी वर चढू लागल्यावर पिल्लाच्या डोक्यावर उभी राहते ही गोष्ट आपण वाचली आहे. पण या गोष्टीच्या उलटही घडू शकतं. विशेषतः माणसाच्या बाबतीत. माणसाने सामाजिकतेचा मोठा 'फोर्स' तयार केल्याने हे होतं. त्यामुळे 'माणूस कसा आहे?' याचं एकच एक उत्तर नाही. अठराव्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो याने 'आपण निसर्गतः कसे आहोत हे आपल्याला कधीच कळू शकणार नाही' असं म्हटलं होतं. इथे त्याचाही रोख 'निसर्गभावी आकांक्षा-उर्मींकडून समाजभावी आकांक्षा-उर्मींकडे' असणाऱ्या माणसाच्या प्रवासाकडे आहे. माणसाच्या या गतिशील, अनिश्चित रचनेमुळे मानवी नातेसंबंध 'डिफाइन' करणारा एक नेमका धागा पकडता येत नाही. मानवी नातेसंबंधांवर अंतिम असं भाष्य करता येत नाही. 

माणसाला माणूस हवा असतो तसाच तो नकोही असतो. 'हेल इज अदर पीपल' हे सार्त्रचं विधान प्रसिद्ध आहे. माणूस 'स्व' आणि 'पर' या द्वैताशी कायम झुंजत असतो. त्याच्या विचारविश्वाला अनेक पदर असल्याने त्याचे मनोव्यापार एकाच दिशेने जाणारे नसतात. माणसाचं वर्तन घडवणारं माणसाचं मन त्याला अनेक दिशांकडे खेचतं. हे असं सर्वच माणसांचं होतं आणि त्यातून 'नात्यांचं गतिशास्त्र' आकाराला येतं. तुटलेल्या/तुटत चाललेल्या नात्यापासून अगदी घट्ट बांधलेल्या नात्यापर्यंत नात्यांच्या विविध 'श्रेणी' आपण सगळेच अनुभवतो. मानवी नात्यांवर प्रभाव टाकणाऱ्या भावना नात्यासाठी विघातक किंवा विधायक असतात. यात प्रेम, द्वेष, राग, असूया अशा सगळ्याच भावना येतात. यातला 'प्रेम' हा एक 'बॅलन्सिंग फोर्स' आहे. माणसाच्या - खरं तर सर्वच सजीवांच्या मनात 'प्रेम' ही भावना कधी-कशी उत्पन्न झाली, विशेषतः माणसाच्या बाबतीत प्रेमाच्या विविध 'जातकुळी' कशा निर्माण झाल्या हा एक संशोधनाचा विषय आहे. पण माणसाला 'स्व'पासून अंशतः तरी वेगळं करून 'पर'पाशी (ध्यानीमनी नसताना इथे 'परपाश' हा श्लेष झाला आहे!) न्यायची ताकद प्रेम या भावनेत  आहे. स्री-पुरूष संदर्भात किंवा जिथे 'रोमँटिक लव्ह' कार्यरत असतं तिथे 'स्व'आणि 'पर'च्या एकमेकांतील तीव्र गुंतवणुकीमुळे समतोल बिघडतो, पण सामाजिक प्राणी म्हणून माणसाला प्रेम ही भावना तिच्या विविध रूपात (अनुकंपा, मैत्री, कृतज्ञता इ.) एकमेकांशी जोडून घ्यायला, एकमेकांना समजून घ्यायला मदत करते. 'रोमँटिक लव्ह'चं उगमस्थान शोधू गेलं तर ते मानसिक जोडलेपणापाशी सापडू शकतं तसंच शारीरिक जोडलेपणापाशीदेखील सापडू शकतं. प्रेम आणि लैंगिकता हे 'परस्परोद्भव' असू शकतात. प्रेमाच्या इतर जातकुळींचं उगमस्थान नैतिकतेपाशी आहे. नैतिक टोचणीतून त्या निर्माण होतात. अगदी रोमँटिक प्रेमदेखील त्याची तीव्रता कमी होऊ लागली तरी नैतिक टोचणीतून जिवंत राहू शकतं.     

नातेसंबंधांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रत्येकच विघातक/विधायक भावनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन विचार करणे ही 'भावनिक साक्षरतेची' पहिली पायरी आहे. भावना, जाणीव या गोष्टी 'अचल', दरवेळी नेमकेपणाने सांगता येतीलच अशा नसतात. पण तरी 'स्व'ने त्यांच्याकडे सतत लक्ष द्यायला लागतं कारण त्या 'स्व'वर मोठा परिणाम घडवत असतात. आपण प्रेमाचा विचार केला तसाच द्वेषाचा, असूयेचा, इतर भावनांचा करता येईल. तटस्थपणे हा विचार करणं, विविध भावना 'डीकोड' करता येणं आणि 'स्व' व या भावना यात फरक करून 'स्व'ला शांत, स्थिर राखायचा प्रयत्न करणं ही एक हितकारक सवय आहे. आदर्शाच्या पातळीवर आणि व्यवहाराच्या पातळीवर सर्वच बाबतीत फरक पडतो हे अगदी खरं आहे, पण सुरूवात म्हणून आपण जर असं विश्लेषण करू शकलो तर खूप मदत होईल. या विश्लेषणाची पुढची पायरी ज्या संबंधित व्यक्तीबाबत विशिष्ट भावना प्रबळ आहे त्या व्यक्तीशी त्याबाबत बोलता येणं ही आहे. 'खेळघर' या रवींद्र रूक्मिणी पंढरीनाथ यांच्या कादंबरीत 'आपल्या बहुतेक सर्व समस्यांच्या मुळाशी किडलेले नातेसंबंध' आहेत असा उल्लेख आहे. विचार करावा असं हे विधान आहे. नातेसंबंधांचं स्वरूप गुंतागुंतीचं आहे. माणसाच्या मनातील विघातक आणि विधायक भावना, त्यांची विविध रूपे, विभिन्न सामाजिक आणि आर्थिक चौकटी, परिस्थितीजन्य कारणं अशा बऱ्याच कारणांनी मानवी नातेसंबंध घडत किंवा बिघडत असतात. त्याचा एकूण समाजस्वास्थ्यावर परिणाम होत असतो म्हणून त्याविषयी मोकळेपणाने बोललं पाहिजे. 'ब्लॉकेजेस' तपासली पाहिजेत. अस्तित्वात असलेल्या नातेसंबंधांबाबत हे होऊ शकलं तर त्यातून नवीन रचना उत्क्रान्त होऊ शकेल. आपण जर नीट पाहिलं तर असं दिसेल की भावना डीकोड करणं, त्याबाबत बोलणं, नातेसंबंधांचं पुनरावलोकन करत राहणं या 'जीवनकौशल्या'चं शिक्षण आपल्याकडे दिलं जात नाही. एकूणातच 'जीवनकौशल्ये'- लाइफ स्किल्स - हा आपल्याकडे दुर्लक्षित विषय आहे. पौगंडावस्थेतील / तरूण वयातील मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले तरी आपल्याला संकट आल्यासारखं वाटतं. मग प्रेम, राग, आकर्षण, लैंगिक इच्छा आणि इतर भावनांचे आवर्त प्रत्येकाला आपल्या मनातच जिरवावे लागतात. त्याबाबत बोलायला आपल्याकडे व्यासपीठ नाही. कुटुंबसंस्थेने हे व्यासपीठ खरं तर द्यायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. भावना व्यक्त करायची योग्य भाषाही आपण नीटशी विकसित करू शकलेलो नाही. त्यामुळे आपल्याला सुरूवात तर मुळापासून करावी लागेल असं दिसतं.