tag:blogger.com,1999:blog-3109109577960110952024-03-05T19:01:40.802-08:00mind without measureUtpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.comBlogger67125tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-77114563788859056342023-03-26T22:09:00.011-07:002023-03-26T23:15:44.013-07:00अवधूत नावाचा इसम <p style="text-align: justify;">अवधूत डोंगरे हा एक 'इसम' आहे. म्हणजे तो लेखक आहे. त्याच्या चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याने अनेक इंग्लिश पुस्तकांचे उत्तम मराठी अनुवाद केलेले आहेत. '<a href="https://ekregh.blogspot.com" target="_blank">रेघ</a>' नावाचा मराठीतील एक अतिशय दर्जेदार, उच्च संदर्भमूल्य असणारा ब्लॉग तो चालवतो. या ब्लॉगवरील लेख वाचणं हा एक दीर्घ संवादात्मक, अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. डिजिटल व्यासपीठावरील कोलाहलात रेघेने आपलं एक वेगळं, शांत-संयमी स्थान निर्माण केलं आहे. पण हे सगळं असलं तरी अवधूत हा एक 'इसम' आहे. कुठेही भेटेल, सापडेल. बोलेल, प्रश्न विचारेल आणि आपल्याला विचारात टाकून आल्या वाटेने निघून जाईल असा इसम. 'इसम' हा 'इझमां'च्या पलीकडे जाईल असा शब्द आहे. 'इसम' फक्त असतो आणि त्याला पुष्कळ बोलायचं असतं. त्याला त्याचं आख्यान लावायचं असतं. आपल्या 'कॉमन मॅन' स्थानावरून. आणि तो ते लावत असतो. ऐकणारं कुणी आहे की नाही याची फिकीर न करता. </p><div style="text-align: justify;">'इसम' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर असं जे काही उभं राहतं ते मी अवधूतला दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रथम भेटल्यापासून माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आलं आहे. त्यावेळी तो पुण्यात एका मासिकाच्या संपादकीय विभागात काम करत होता. अगदी अबोल, अंतर्मुख मनुष्य. काही लोकांना भेटलं की 'हा माणूस वेगळा आहे' असं जे आपल्याला जाणवत राहतं ते मला त्याच्याबाबतीत नेहमी जाणवत आलं आहे. अंतर्मुख म्हणजे इतका की याने कधी कुणाला गडगडाटी हसून टाळी दिली नसणार याची खात्रीच पटावी. त्याच्याहून दहा वर्षांनी मोठा असलो तरी भंकस करायची जन्मजात सवय असल्याने त्याच्यासमोर मी जरा सावरूनच असायचो/असतो. अर्थात भंकस हा अनेकपैकी एक पैलू असल्याने तो अडसर कधीच होत नाही. (शिवाय हेही सांगायला हरकत नाही की विनोद प्रिय असला तरी तत्वज्ञान तितकंच, किंबहुना थोडं जास्तच प्रिय असल्याने अवधूतसारखा समानधर्मी भेटला की माझ्यातला 'इसम'ही जागा होतो आणि आपलं आख्यान सुरु करतो.)</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अवधूतशी असलेल्या 'लाँग डिस्टंस' मैत्रीने मला पुष्कळ काही दिलं आहे. मुख्य म्हणजे माझ्यातल्या आळशी, बेशिस्त माणसाला जाग आणायला मदत केली आहे. खरं सांगायचं तर कधीकधी थोडा न्यूनगंडही निर्माण केला आहे. कारण सर्वांना समान उपलब्ध असणाऱ्या 'काळ' नामक परिमाणात त्याने जे काम केलं आहे ते अचंबित करणारं आहे. आपल्याकडेही अवधूतकडे आहे तितकाच वेळ असतो; पण आपण तो पुरेपूर वापरण्यात कमी पडतो याची जाणीव झाली की शरमल्यासारखं होतं. पुस्तकांच्या दुकानात गेलं की अवधूतने अनुवाद केलेलं एखादं नवीन पुस्तक दिसतं आणि माझी स्वतःबद्दलची हताशा वाढते. माझ्यापाशी नेमका आकडा नाही; पण त्याने आजवर पंचवीस-एक तरी पुस्तकांचे अनुवाद केले असतील. आणि अनुवादक म्हणून अवधूतचं नाव असेल तर तो अनुवाद उत्तम असणार याची खात्री पटते असा त्याचा अनुवादाच्या क्षेत्रातला दरारा आहे. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div><div style="text-align: justify;">पुण्यात असताना होणाऱ्या गाठीभेटी त्याने पुणं सोडल्यावर फारच क्वचित होऊ लागल्या. अर्थात पुण्यात असतानाही वरचेवर भेटत असे असं नाही. त्याने स्वतःला वाचन-लेखन-अनुवाद याला वाहूनच घेतल्यासारखं होतं. मुळात लेखन-वाचन ही काही त्याच्या केवळ 'आवडीची गोष्ट' नाही. त्याच्यासाठी ते संवादाचं माध्यम आहे. चिंतनाचा विषय आहे. कमालीच्या गंभीरपणे करण्याची चीज आहे. मी संपादक म्हणून काम केलेलं असल्याने अवधूतसारखा लेखक संपादकासाठी किती मोलाचा असतो हे मी सांगू शकेन. लिहिण्याविषयीचं प्रेम, आस्था हा एक भाग झाला. पण मांडणीत वजन असणं, व्याकरणाच्या व इतर चुका नसणं, परिच्छेद नेमकेपणाने पाडलेले असणं, लेखनाला ओघ असणं हेही लेखनातील महत्त्वाचे भाग आहेत. सध्या आता जवळजवळ सगळेचजण लेख टाइप करून पाठवतात. वर्ड फाइल कशी तयार केली आहे याचाही संपादक म्हणून माझ्यावर प्रभाव पडत असतो. एकेकाळी कागदावर समास पाडून, सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर वाचताना संपादकांना जसा आनंद होत असेल तसा मला व्यवस्थित फॉर्मेट केलेली वर्ड फाइल बघून होतो. अवधूत त्याबाबतीत चुकूनही निराश करत नाही. त्याच्याकडून काहीही आलं की ते डोळे झाकून प्रिंटिंगला पाठवावं इतकं अचूक असतं. त्याच्याशी माझा संवाद हा प्रामुख्याने इमेलवर होतो. तुम्हांला जे म्हणायचं आहे ते नीट, व्यवस्थित फोड करून, संदिग्धतेला अजिबात जागा न ठेवता, सर्वंकष विचार करून आणि भाषेचा प्रभावी वापर करून लिहिता येणं ही वास्तविक फार अवघड गोष्ट नसायला हवी. पण ती दुर्मीळ झाली आहे खरी. अवधूतशी होणारा इमेल संवाद मला हा दुर्मीळ आनंद देतो. तो सोशल मीडियावर नाही. रेघेचं फेसबुक पेज आहे. त्याकरता तो फेसबुक वापरतो. पण व्यक्तिशः नाही. तिथे नसण्याबद्दलही त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी सविस्तर लिहिलं होतं आणि अलीकडच्या एका भेटीत सविस्तर बोललाही होता. तू चुकूनही सोशल मीडियावर येऊ नकोस असं मी त्याला सांगितलंच. समाजमाध्यमं ही उपयुक्त माध्यमं असली तरी त्यांची एक दुसरी, दुखरी बाजूही आहे. त्याच्या खोलात जाण्याचं इथे प्रयोजन नाही, पण आपली 'परस्पर संवादाची भाषिक कुवत' या माध्यमांनी कमी केली आहे की काय अशी शंका येते. शिवाय 'डिस्ट्रॅक्शन' हा एक मोठा धोका आहेच. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अवधूतच्या 'इसम' असण्यात त्याच्या व्यक्तित्वाचा वैशिष्ट्यांबरोबरच त्याच्या 'अपीअरन्स'चाही भाग आहे. इन न केलेला, चौकटीचा किंवा रेघांचा फुल शर्ट, दुमडलेल्या बाह्या, साधी ट्राउझर, चप्पल हा त्याचा पोशाख मी अनेक वर्षं पाहतो आहे. चेहरा अतिशय इंटेन्स. एकूणात एकदम साधासुधा. आणि हा साधेपणा 'ऑरगॅनिक' आहे. 'अंगावर येणारा साधेपणा' नव्हे. तो सहसा साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गजबजाटात फारसा दिसत नाही. त्याला ते अगदीच वर्ज्य नसावं; पण त्याची मूळ प्रकृती शांतपणे आपलं काम करत राहण्याची आहे. लेखक असणं, लेखन करणं याबद्दल त्याची निश्चित मतं आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यावर त्याने एक फार प्रभावी, चिकित्सक लेख लिहिला आहे. मूळ <a href="https://ekregh.blogspot.com/2020/10/blog-post.html" target="_blank">लेख </a>जरूर वाचा. पण त्यातला हा एक उल्लेख पहा - </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><i> 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहायला तीस-बत्तीस वर्षं लागली, असं वेळोवेळी कुठे ना कुठे ऐकू येतं. अगदी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एक निवेदिकाही दुसऱ्या एका लेखकाची मुलाखत घेताना हे बोलून गेली. तीस वर्षं हा जगण्याचा कालावधी विविध अपरिहार्य, अटळ कामांसाठी वापरावा लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे कादंबरी लिहायला उशीर झाला, किंवा ती गडबडीत लिहिणं योग्य वाटलं नाही, इतर कामं प्राधान्यक्रमात वरती होती, अशी कारणं नोंदवली जात नाहीत. कधीतरी इतर कोणत्या मुलाखतीत ती ओझरती येतात- कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्राध्यापकीय कामं, इत्यादी. हे गैर नाही. पण जणू काही तीस वर्षं एका कादंबरीचा ध्यास लेखकाला आणि वाचकांनाही होता, अशी मांडणी केली जाते. मग याची मिथकं तयार होतात. कादंबरी लिहिणं हे कष्टाचंच काम असतं, त्यासाठी कोणी प्रवास केला, वाचन केलं, तर ते त्या-त्या विषयसूत्रानुसार करावंच लागतं. पण ते नुसतं करून पुरत नाही. त्यासाठी एक मिथक तयार करावं लागतं- मोठ्ठा कालावधी, मोठ्ठं वाचन, इत्यादी. मग ते खरोखर महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जातं. लेखकाचं स्वाभाविक काम म्हणून ते उरत नाही. </i></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><i></i>स्वतः लेखक असलेला अवधूत लेखनाविषयी जेव्हा असं तटस्थपणे बोलतो तेव्हा बरं वाटतं. अवधूतच्या इतरही लेखांमधून तो शांतपणे, निरीक्षकाच्या भूमिकेतून त्याला जे दिसलं, जे 'पॉईंट आउट' करावंसं वाटलं ते करताना दिसतो. ह्रषीकेश पाळंदेसारखे काही अपवाद वगळता त्याचे समकालीन लेखक समाजमाध्यमांचा, एका अर्थी गर्दीचा भाग होऊन आपलं स्थान पक्कं करण्याच्या प्रयत्नात दिसतात. आज ते अपरिहार्य आहे असं म्हणता येईल; पण दोन्हीकडचे लेखक पाहणाऱ्या माझ्यासारख्या वाचकाला त्यांच्या 'लेखकीय वजना'त थोडा फरक जाणवतो हेही नोंदवायला हरकत नाही. लेखन हे करिअर असण्यात काहीच गैर नाही. शिवाय आज काळ असा आहे की तुम्ही अगदी थिअरॉटिकल फिजिसिस्ट असलात तरी तुमचं नाव होण्यासाठी तुम्हांला (सोशल मीडियावर) नाच करून दाखवता येणं आवश्यक ठरतं! लोकमानस असं काही बदलतं आहे की तुम्हांला दोन मिनिटात किंवा दोन परिच्छेदात 'व्यापक' बोलता येणं गरजेचं झालं आहे. पण हे करायला लागत असल्याने तुमच्या खोलात उतरण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होतो असं माझं निरीक्षण आहे. अवधूतसारखा लेखक तिथे वरचढ ठरतो. त्याच्यासाठीदेखील लेखन हे एका अर्थी करिअर आहेच. पण त्याच्यात 'लेखक होण्याचा' अट्टाहास दिसत नाही कारण तो लेखक आहेच. त्याला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. (इथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. पण एक ढोबळ निरीक्षण नोंदवण्याचा उद्देश जरूर आहे.)</div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">माध्यमांच्या कोलाहलात काही सखोल वाचनाची, 'पर्स्पेक्टिव्ह'ची गरज 'रेघ' भागवतं. माझ्यासाठी अवधूतशी होणारा संवाद हाच परिणाम साधतो. झालंय असं की आजचं वास्तव विखंडित आहे तसंच माणसंही विखंडित आहेत. दीर्घ संवाद तर फारसा कुणालाच नको असतो. आपली मतं, धारणा पुन्हा पुन्हा तपासायचीही फारशी गरज कुणाला वाटत नाही. वास्तविक कुठलंही घटित त्याच्या आगेमागे शेकडो संदर्भ घेऊन येत असतं. घटिताविषयी भरपूर चर्चा होताना दिसते; पण या संदर्भांविषयी फारशी चर्चा होत नाही. आणि चर्चेला जी वळणं फुटत जातात तो तर वेगळाच विषय! वर जो करिअरचा मुद्दा आला त्याला जोडलेला एक मुद्दा असा की लेखन हा निव्वळ आवडीचा प्रांत असून चालत नाही. त्यासाठी तार्किक क्षमतेची, सुसंगतीची (coherence - the quality of forming a unified whole) गरज असते. अगदी समकालीन घटनांवरील टिप्पणी हा विषय घेतला तरी तिथेही याची गरज असते. पण जर करिअर साधायचं असेल तर मग हे मुद्दे मागे पडतात. कारण 'लेखक होणं' हे अधिक वरचढ ठरतं. त्यातून 'सोशल डिस्कोर्स'चं नुकसान होतं. लेखक जेव्हा कथा लिहितो, कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्यावर सोशल डिस्कोर्सचं ओझं देण्याचं काहीच कारण नाही. त्या लेखनाची समीक्षा हा वेगळा विषय. पण जेव्हा काही भाष्य करणारं लेखन होत असतं तेव्हा मात्र 'सोशल डिस्कोर्स'चा मुद्दा लागू होतो. या पार्श्वभूमीवर अवधूतसारखा लेखक आणि भाष्यकार महत्त्वाचा ठरतो. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">भाषांतर करत असताना मूळ पुस्तकातील मांडणीविषयी प्रश्न पडून त्यावर भाषांतरकाराला काही म्हणावंसं वाटू शकतं. ते म्हणणं छापील स्वरूपात आल्याची उदाहरणं फारशी दिसत नाहीत. अवधूतची दोन मोठी टिपणं त्यादृष्टीने महत्त्वाची ठरतात. पहिलं म्हणजे 'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' (सुगावा प्रकाशन) आणि दुसरं 'एका शब्दाचा पेच - मराठी भाषांतरकाराचं टिपण' (साधना प्रकाशन). </div><div style="text-align: justify;"> </div><div style="text-align: justify;">पहिल्या टिपणाची ओळख (मलपृष्ठावरील मजकूर) - </div><div style="text-align: justify;"><br /></div><div><div style="text-align: justify;"><i>डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती 'नवयान पब्लिशिंग'नं मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी एक दीर्घ प्रस्तावना 'द डॉक्टर अँड द सेंट' या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं. रॉय यांच्या मांडणीसंदर्भात मराठी भाषांतरकाराचे काही तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांची त्यानं केलेली नोंद स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध करण्याचं ठरलं, ती ही पुस्तिका.</i></div><i><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><i>'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' हा मजकूर रॉय यांच्या पुस्तकाशी समांतरपणे लिहिला गेला, हे खरं. पण स्वतंत्रपणे वाचताना हा निबंध सध्याच्या काळातल्या अभिव्यक्तीविषयीचा एक अगदी लहानसा घटना-अभ्यास वा व्यक्ति-अभ्यास (केस-स्टडी) म्हणूनही वाचता येईल, असं वाटतं.</i></div></i></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">दुसऱ्या टिपणाची ओळख (पुस्तिकेचं मनोगत) -<br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><i>अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात. काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे. इथे भाषांतराचा आशय टिळक-चरित्र हा असल्यामुळे वरील गुंतागुंतीची उकल करताना टिळकांच्या जीवनातील काही घटना-घडामोडींचा संदर्भही त्यात सविस्तर आलाच आहे. शेवटी त्यांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींचे वर्णन किंवा विवरण करण्यासाठीच मूळ लेखकांनी शब्द वापरले आहेत. त्यामुळे मराठी भाषांतरकाराने टिळक-चरित्राच्या निमित्ताने इतरही संदर्भ सोबतीला घेत, त्याच्यासमोर आलेले पेच किंवा त्याला जाणवलेल्या काही शक्यता नोंदवायचा प्रयत्न या टिपणातून केला आहे.<br /></i></div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">ही दोन्ही टिपणं (पुस्तिका) आवर्जून वाचावी अशी आहेत. अवधूतमधला भाषांतरकार आपलं काम करत असताना त्याच्यातला भाष्यकार किती विचक्षणपणे त्या व्यवहाराकडे बघतो हे लक्षात येतं. 'एका शब्दाचा पेच'मध्ये त्याने टिळकांच्या व्यक्तिमत्वावर संदर्भसंपृक्त प्रकाशझोत टाकला आहे. टिळकांच्या संदर्भात वापरलेल्या 'कन्झर्व्हेटिव्ह' या शब्दापाशी रेंगाळत पुढे त्याने एक मोठाच पट मांडला आहे. 'एकेक पदर उलगडणं' म्हणजे काय त्याचा प्रत्यय हे टिपण वाचताना येतो. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">व्यक्तीचित्रात त्या व्यक्तीबाबत लिहावं असं अपेक्षित असतं. पण अवधूतमधली व्यक्ती आणि त्याच्यातला भाष्यकार वेगळा काढणं मला कठीण वाटतं. व्यक्तिगत संदर्भात मला त्याच्याबद्दल फार माहितीही नाही. एकदा बोलता बोलता त्याने एकदम 'अरे मी लग्न केलं' असं हळू आवाजात सांगितलं होतं. त्यावर मी त्याचं अभिनंदन केलं. पुढे त्याला मुलगा झाल्याचं एका मित्राकडून कळलं. त्याच्याशी बोलताना व्यक्तिगत, कौटुंबिक बोलणं होत नाही. पण तो ज्या आस्थेने साहित्यावर, सामाजिकतेवर बोलतो ते त्याचं 'व्यक्तिगत'च असतं. तो साहित्यिक-सांस्कृतिक कोलाहलापासून फक्त भौतिकदृष्ट्याच लांब आहे. रेघेवरचं त्याचं लेखन वाचलं की तो या कोलाहलात आपलं म्हणणं ठामपणे मांडतो आहे हे लक्षात येतं. रेघेवरील त्याच्या निवडक लेखांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. या 'इसमा'चं आख्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला त्याची मदत होईल. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><span style="text-align: left;"><span style="color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;">कुठलंही व्यक्तीचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्रण असूच शकत नाही. पण तरी काही व्यक्तींबाबत काहीतरी लिहावं असं वाटतं खरं. अवधूतबाबत मला तसं वाटत होतं. काही लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. </span></span>वाचकांना कदाचित हे त्याचं व्यक्तीचित्र वाटणार नाही. पण लेखक-भाष्यकार म्हणून तो मला कसा दिसतो याची कल्पना येईल. आपल्या 'वाटण्या'ला, आपल्या आतल्या गुंतागुंतीला बोलून मांडताना कधीकधी फार अवघड होतं. आमच्या मागच्या भेटीत अवधूतचं तसं होतंय असं मला जाणवलं. लेखक असण्यापेक्षा त्याचं 'इसम' असणं मला भावतं ते त्यामुळेच. त्याबाबतीत तो मला माझा सहप्रवासी वाटतो. कारण आसपास पाहिलं तर उत्तरं तयार असलेले, त्वरित निर्णय देणारे बरेचजण मला दिसतात; पण प्रश्नांपाशी रेंगाळणारे फारसे कुणी दिसत नाहीत. </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;">अवधूत लेखक आहे, त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळून आता काही वर्षं झाली. इथून पुढेही त्याला पुरस्कार मिळतील. पण त्याचा लेखकराव होऊ नये असं म्हणण्याचीही मला गरज वाटत नाही. कारण तसं होणार नाही याची मला खात्री आहे. इतपत तर मी त्याच्यातल्या इसमाला नक्कीच ओळखतो! </div><div style="text-align: justify;"><br /></div><div style="text-align: justify;"><br /></div><div></div></div>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-26005033272038508082020-12-29T23:18:00.000-08:002020-12-29T23:18:13.348-08:00स्त्रीप्रश्न आणि विवाह : काही नोंदी <p style="text-align: justify;">माणसाने विकसित करत आणलेल्या समाजव्यवस्थेचा, मूल्यव्यवस्थेचा, प्रशासकीय व्यवस्थांचा घटक असते ती स्त्री, स्त्री-पुरुष संबंध, स्त्रियांवर झालेले आणि आजही होणारे अमानुष अत्याचार, स्त्रीवादी विचार एक निर्णायक महत्त्वाचा विचार म्हणून पुढे येणं या सगळ्याचा एक इतिहास आहे, वर्तमान आहे. या परस्परांत गुंतलेल्या विषयांवर सातत्याने चर्चा सुरू असते, पुरुषांची मानसिकता कशी बदलावी हा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो. बरेचदा चर्चेला 'स्त्री विरुद्ध पुरुष' असंही स्वरुप प्राप्त होताना दिसतं. स्त्री आणि पुरुष या दोन ‘आदिम जाती' आहेत आणि त्यांच्या परस्परसंबंधामुळे आपल्या सामाजिक व्यवस्था प्रभावित होत आल्या आहेत. स्त्रीचं स्थान एकूण व्यवस्थेत दुय्यम होतं, आजही आहे, स्त्रीकडे पाहण्याची बहुतांश समाजाची दृष्टी आजही निकोप नाही हे वास्तव आहे. एकीकडे समाजातील काही स्तरांमध्ये स्त्रीचं स्थान बळकट होत असतान, ती सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक बंधनांशी झगडत अत्यंत महत्वाची, कौतुकास्पद कामगिरी बजावत असतानाही स्त्रीकडे पाहण्याची सर्वसाधारण दृष्टी दूषित आहे ही समाज म्हणून आपल्यासाठी शरमेची गोष्ट आहे. </p><p style="text-align: justify;">स्त्रीच्या बाबतीत समाजाची, प्रामुख्याने पुरुषांची दृष्टी विशिष्टच का असते, पुरुष स्त्रीला एका मर्यादेपर्यंतच ‘सहन' का करु शकतो, पुरुषाचं वैचारिक, भावनिक, लैंगिक विश्व कशा प्रकारचं आहे या व संबंधित प्रश्नांचा अभ्यास आपल्याला जैविक (लैंगिक आणि मानसशास्त्रीय) आणि समाजशास्त्रीय शोधाकडे घेऊन जातो. स्त्री ही पितृसत्ताक व्यवस्थेची बळी आहे तसाच पुरुषही आहे. माणूस 'स्थिर' झाल्यापासून, माणसाने संचय सुरु केल्यापासून, खासगी मालमत्ता उदयाला आल्यापासून घडत झालेले (घडवले गेलेले) अनेक व्यवस्थात्मक बदल आणि त्याला अनुसरून घडत गेलेलं माणसाचं मानस हा एक रोचक अभ्यासविषय आहे. स्त्रीच्या बाबतीची पुरुषाची विशिष्ट दृष्टी घडली ती कधीपासून? खासगी मालमत्तेपाठोपाठ मालमत्तेचा वारसदार हवा म्हणून स्त्रीला 'बीजक्षेत्र न्याया'ने फक्त 'क्षेत्रा'चा दर्जा देऊन हे क्षेत्र ताब्यात ठेवण्याची प्रथा सुरु झाली तेव्हापासून. ही विवाहसंस्थेची सुरुवात होती. स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व, पुरुषाचं स्वतंत्र अस्तित्व आणि या दोघांचं एकत्र अस्तित्व यांचं एक न्याय्य, परस्परपूरक, संपूर्ण शोषणरहित नसलं तरी शोषणरहित होण्याचा प्रयत्न करणारं स्वरुप, त्यानुसार येणारं भावनिक व लैंगिक इच्छांचं नियमन हे इतिहासात एखाद्या टप्प्यावर (विशेषतः मातृसत्ताक पद्धती प्रचलित असणाऱ्या काळात) प्रत्यक्षात अस्तित्वात होतं की मालकी हक्काची भावना दृढमूल होण्याच्या आधीदेखील स्त्री-पुरुष संबंध हे प्रेम, लैंगिक आकर्षण आणि त्या अनुषंगाने येणारा 'पॉवर प्ले' अशा स्वरूपातच अस्तित्वात होते असाही एक प्रश्न या संदर्भाने मनात येतो. ‘वर्चस्व', ‘सत्ताकांक्षा' या गुणांची (?) जनुकं स्थिरावल्यानंतर मानवी संबंधांचं स्वरूप बदललं. समूहजीवनाच्या आरंभापासून माणसासोबत असलेल्या या वृत्तींचे प्रतिध्वनी आजच्या समाजीवनातही नष्ट होत नाहीत. निसर्गाचा भाग असलेला माणूस निसर्गापासून अंतर राखून स्वत:चं वेगळं विश्व निर्माण करण्यात यशस्वी झाला, पण त्याने जे काही केलं ते करताना तो ‘निसर्गाचा भाग'च होता. निसर्गापासून पूर्णपणे तुटलेला, स्वयंभू असा एक वेगळाच माणूस भविष्यात निर्माण होऊ शकेलही कदाचित, पण आजचा माणूस हा निसर्गाचा भाग आणि माणसाने निर्माण केलेल्या विविध व्यवस्थांचा भाग या कात्रीत अडकलेला दिसतो. हे अडकलेपण पुरुष आणि स्त्री दोघांच्या वाट्याला आलेलं असलं तरी स्त्रीच्या वाट्याला अन्यायकारकरित्या खूप जास्त प्रमाणात आलं. त्यातून स्त्री ही ‘स्त्री' म्हणून घडत गेली - नव्हे घडवली गेली. स्त्रीवादी चळवळीने ही बाब सातत्याने अधोरेखित केली आणि त्यातून सर्वत्र एक जाणीवजागृती होऊ लागली. आज स्त्री बदलते आहे, तिच्या पारंपारिक साच्यातून बाहेर पडते आहे, अनेक गृहितकांना प्रश्न विचारते आहे. दुसऱ्या बाजूने पाहता तिच्यावरील अत्याचारही कायम आहेत. बदलणाऱ्या स्त्रीविषयी - ती नोकरदार, व्यावसायिक, कलाकार, अभ्यासक, कार्यकर्ता म्हणून आज कशी दिसते, कुटुंबामध्ये आईची, पत्नीची भूमिका निभावताना कशी दिसते यावर आपण आपल्या निरीक्षणांनुसार, अनुभवांनुसार, आपल्या आकलनाच्या मर्यादेत काहीएक भाष्य करु शकतोच. स्त्रीच्या समाजातील स्थानाबाबत विविध सामाजिक गटांसंदर्भात वेगवेगळी निरीक्षणं नोंदवता येतील. त्यामुळे ‘आजची स्त्री' ही एकच एक मोठी श्रेणी (कॅटेगरी) म्हणून पकडीत येणं शक्य नाही. ते सामान्यीकरण होईल. सामाजिक संदर्भात एखादी टिप्पणी करताना इतर वेळीदेखील सामान्यीकरणाची शक्यता बरीच असते आणि त्याचं भान राखणं आवश्यक ठरतं. सामान्यीकरणामुळे 'सत्य' बाजूला पडायचा धोका असतो. </p><p style="text-align: justify;">त्यामुळे सामान्यीकरणाचा होणार अडसर टाळून, स्त्रीच्या संदर्भात 'स्त्रीचं बदलतं रूप' या बहुचर्चित विषयाला थोडं बाजूला ठेवून तिच्या सामाजिक अस्तित्वाच्या संदर्भात काही मूलभूत बोलता येईल का असा विचार करुया.</p><p style="text-align: justify;"><b>प्रश्न व्यक्तीचा...आणि व्यवस्थेचाही!</b></p><p style="text-align: justify;">हा विचार करताना आपल्या असं लक्षात येईल की वर ज्यांचा उल्लेख केला त्या मानवनिर्मित व्यवस्था माणसाचं स्थान निश्चित करण्यात महत्त्वाच्या ठरतात. त्याच वेळी काहीजण स्वतःच्या सामर्थ्यानिशी व्यवस्थेला धडकाही देत असतात. व्यवस्था माणसाच्या अस्तित्वाला आकार देतात, माणसाची मानसिकता आणि वर्तनही ठरवतात. माणसाला समजून घेण्यासाठी तो ज्या पर्यावरणाचा, ज्या व्यवस्थेचा भाग असतो त्याच्या पोटात शिरणं आवश्यक ठरतं. व्यवस्था आवश्यक असते हे खरं, पण व्यवस्थेच्या रेट्यापुढे व्यवस्थेतील कमतरता दुर्लक्षित राहून लावलेल्या व्यवस्था जणू काही नैसर्गिकच आहे अशी धारणा बळकट होऊ लागते. व्यवस्था समाजाची नैतिक दृष्टी ठरवतात; पण त्यांच्या अंगी लवचीकताही असते. स्त्रियांनी शिकूदेखील नये असं म्हणणाऱ्या व्यवस्थेपासून स्त्रियांनी नोकरी करुन घरात पैसे आणले तरी चालेल अशा व्यवस्थेपर्यंत आपण जातो. मात्र व्यवस्था काय स्वीकारते, काय नाकारते, कशावर नियंत्रण ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते हे बघणं उद्बोधक ठरतं. समाजाचं एकक असणारं कुटुंब आणि कुटुंबाचा पाया असणारी विवाहसंस्था या व्यवस्थांमध्ये जे जे लहान-मोठे बदल झाले त्यात उद्योगक्षेत्रातील, समाजाच्या आर्थिक रचनेतील बदलांचा मोठा वाटा आहे. आपल्याला असं दिसेल की आपली पारंपरिक भूमिका सोडून नोकरी-व्यवसाय करण्याच्या स्त्रीच्या नव्या भूमिकेचं स्वागत होतं, मात्र हीच स्त्री लग्नाबाबत, सासरी राहण्याबाबत, मूल होऊ देण्याबाबत काही वेगळं बोलली तर त्याचं ‘स्वागत' होतं का? भविष्याचं माहीत नाही, पण आज मात्र लग्न, मातृत्व या गोष्टी स्त्रीसाठी ‘लक्ष्मणरेषे'सारख्या आहेत. स्त्रीचं अस्तित्व 'स्वतंत्र' होत असलं तरी या स्वातंत्र्याला सीमाही आहेत. </p><p style="text-align: justify;">असं होतं कारण कुठलीही व्यवस्था म्हणजेच त्या व्यवस्थेचे वाहक ती व्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. एका मर्यादेपर्यंतची तडजोड त्यांना मान्य असते, पण त्या मर्यादेनंतर - जेव्हा त्यांचं नियंत्रण सुटण्याची शक्यता दिसू लागते - तेव्हा त्यांचा धीर सुटू लागतो. कुटुंबव्यवस्था ही प्रामुख्याने ‘सांस्कृतिक व्यवस्था' असल्याने या व्यवस्थेबाबत समाज अधिकच दक्ष असतो. पाश्चात्य कुटुंबपद्धती मोडकळीस आल्याने तिथे मुलांचे प्रश्न गंभीर झाले आहेत, लोकांची मन:शांती हरवली आहे असं मी लहानपणी वारंवार ऐकत असे. आजही हे ऐकू येतंच. त्यात तथ्य आहे की नाही हे त्याबाबतचे अभ्यास पाहिल्यावर आपल्याला कळू शकेल. मात्र हे सांगत असताना आपल्याकडची कुटुंबपद्धतीला एक गौरवशाली परंपरा आहे आणि आपण ती जपती पाहिजे असंही सांगण्यात यायचं. मी जसजसा विचार करू लागलो तसंतसं मला लक्षात येऊ लागलं की कुटुंब असो वा अन्य कुठलीही व्यवस्था असो - ती काहीएक कार्य करत असते हे उघडच आहे, त्यामुळे तिचं श्रेय तिला द्यायलाच हवं. मात्र त्या व्यवस्थेचं मूल्यमापनच होऊ नये असं का? आपल्या कुटुंबव्यवस्थेचं मूल्यमापन केलं तर आपल्याला काय दिसतं? ही व्यवस्था कुणामुळे टिकून राहते? व्यवस्था टिकण्यासाठी कुणा एकावरच जास्त भार पडतो का? कुणा एकाचंच शोषण होतं का? तसं होत असेल तर व्यवस्थेत काय सुधारणा करता येईल? किंवा व्यवस्थेला काही पर्याय उभा राहू शकतो का? या व्यवस्थेमुळे कुणाचे, कुठले प्रश्न सुटतात? कुणाचे, कुठले प्रश्न सुटत नाहीत? व्यवस्था म्हणजे कुणी एक व्यक्ती नाही, व्यक्तींनी मिळून लावलेले नियम, संकेत म्हणजे सामाजिक व्यवस्था. मग व्यक्तीमंध्ये काय बदल झाले तर व्यवस्था अधिक निर्दोष होईल? हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते विचारले जायला हवेत. </p><p style="text-align: justify;">दुसरं असं की कुटुंबासारखी सामाजिक व्यवस्था अखेरीस आर्थिक-राजकीय व्यवस्थेमुळे प्रभावित होत असते. (कुटुंबव्यवस्था ही 'सामाजिक' असली तरी मुळात ‘आर्थिक’ व्यवस्थाही असू शकते. कुटुंबाची निर्मिती सामाजिकबरोबरच आर्थिक कारणांनीही होते.) आपण व्यवस्थांच्या उगमापाठी गेलो तर असं दिसतं की प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी ‘निसर्ग' ही व्यवस्था तयारच होती. (आज माणसाने पर्यावरणावर केलेले आघात लक्षात घेऊनही ही व्यवस्था अजूनही माणसाला सामावून घेऊ शकेल इतपत तयार आहेच.) त्या व्यवस्थेअंतर्गतच पुरुष आणि स्त्री दोघांचं वर्तन, व्यवहार आकारला येत होतं. त्यामुळे त्यांच्यातील संबंध ही ‘प्राथमिक व्यवस्था' होती. समूहजीवनाला सुरुवात झाल्यानंतर समूहाच्या व्यवस्था या प्राथमिक व्यवस्थेवर प्रभाव टाकू लागल्या आणि पुढे समूहजीवन गुंतागुंतीचं होत गेलं समूहाच्या व्यवस्थाही गुंतागुंतीच्या होत जाऊन त्या प्राथमिक स्थानी आल्या. त्यामुळे आर्थिक-राजकीय-कायदेविषयक रचना काय आहे याचा परिणाम कुटुंब म्हणजे अखेरीस स्त्री-पुरुष संबंधांवर पडतोच. </p><p style="text-align: justify;"><b>स्त्री बदलली, पण विवाहसंस्थेचं काय?</b></p><p style="text-align: justify;">स्त्रीचं होणारं शोषण हा जर ‘व्यवस्थेचा भाग' असेल तर त्या व्यवस्थेत सुधारणा व्हायला हवी किंवा त्या व्यवस्थेला पर्याय उभे राहायला हवेत. स्त्री कशी आणि किती बदलते आहे हे बघत असताना व्यवस्था किती आणि कशी बदलते आहे हे बघितलं जायला हवं. कारण आहे त्या व्यवस्थेत, त्या व्यवस्थेला वळण देत स्त्रीने लक्षणीय मजल मारली असेल तर या व्यवस्थेत आणखी काही मूलभूत बदल झाले तर ती आणखी मोठी मजल मारू शकेल असं म्हणायला जागा आहे. इथे आपण जाणीवपूर्वक स्त्रीच्या बदलत्या रूपापेक्षा व्यवस्थेच्या रूपाबाबत बोलतो आहोत. कारण त्याबाबत फारसं बोललं जात नाही. विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांची शक्यतोवर चिकित्सा न करण्याकडे आपला कल असतो. 'चिकित्सा करणं म्हणजे नाकारणं' असा एक गैरसमजही आपल्याकडे रूढ आहे. वस्तुतः चिकित्सा सर्वच व्यवस्थांची, विचारांची व्हायला हवी. चिकित्सा कशी केली गेली आहे याचीही चिकित्सा व्हायला हवी! चिकित्सा, समीक्षा, मूल्यमापन यांना अकारण एक नकारात्मक छटा आली आहे, पण ती अगदीच अस्थानी आहे. जेव्हा दृश्य स्वरुपात आपल्याला काही चांगले बदल दिसतात, तेव्हा ते माणसाकडून व्यवस्थेत झालेले छोट्या-मोठ्या प्रमाणातले बदल असतात हे आपण लक्षात घेऊ या. आज स्त्री बदलते आहे असं आपण म्हणतो किंवा आज पुरुषांमध्येही काही प्रमाणात बदल होतोय असं आपण म्हणतो तेव्हा ते स्त्री-पुरुष नक्की काय करत असतात? तर त्यांच्या विचारांची जी 'व्यवस्था' बनली आहे त्यात बदल करण्याचा प्रयत्न करत असतात. कुटुंब, नातेसंबंध, नीतीविचार, सामाजिक संकेत आणि नियम हे सगळं ‘मनात तयार झालेल्या व्यवस्थांची' रुपं आहेत. त्या अर्थी सगळ्यात कळीची व्यवस्था म्हणजे आपली ‘मानसिक व्यवस्था' आहे. </p><p style="text-align: justify;">या पार्श्वभूमीवर विचार करता स्त्रीने लग्न करावं का? लग्न केलं तर तिने नवऱ्याकडे रहायला जावं असा अलिखित नियम असायलाच हवा का? त्या त्या केसनुसार तिने त्याच्याकडे किंवा त्याने तिच्याकडे राहायला जायचं ठरवल्यास ते अधिक चांगलं नाही का? विवाहसंस्थेचं स्वरूप चिरेबंदी असल्याने कुठल्या कुठल्या ठिकाणी काय काय बदल करता येतील? विवाहाव्यतिरिक्त सहजीवनाचे कोणते मार्ग असू शकतात? विवाहानंतर स्त्रीचं किंवा पुरुषाचं अन्य कुणाशी नातं निर्माण होऊ लागलं तर त्याची व्यवस्था कशी असावी? लैंगिक संबंधांची व्यवस्था कशी असावी? मुलांची व्यवस्था कशी असावी? विवाहसंस्थेचं स्वरूप जास्तीत जास्त लवचीक करत नेल्याने, विवाहसंस्थेला चिकटलेलं पावित्र्य काढून घेऊन या व्यवस्थेकडे 'माणसासाठी असलेली व्यवस्था' अशा दृष्टीने पाहिलं तर अंतिमतः ते स्त्री-पुरुष दोघांसाठी हितकारक होईल का? हे व असे अनेक इतर प्रश्न स्त्री-पुरुष संदर्भाने समोर येतात आणि त्यांचा विचार केला जायला हवा. हे प्रश्न स्त्री-पुरुष दोघांनीही विचारायला हवेतच; पण विवाहसंस्थेच्या सध्याच्या स्वरुपात स्त्रीला फार गृहीत धरलं जात असल्याने तिने या व्यवस्थेला प्रश्न विचारणं आणि काही गोष्टींना खंबीरपणे नकार देणं आवश्यक आहे. प्रेमभावना, सगळ्यांचं मन राखणं, विवाहसंस्थेचं सांस्कृतिक ओझं या गोष्टींमुळे अनेकदा काही मूलभूत प्रश्नांना बगल दिली जाते. हे होणं स्वाभाविक आहे, समजण्यासारखं आहे. पण हे मुद्दे विचारात घेऊन, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत मूलभूत प्रश्नांना सामोरं जाणंही गरजेचं आहे. विवाहसंस्थेच्या प्रचलित स्वरुपात प्रवेश केल्यानंतर हे करणं सहजसाध्य राहत नाही कारण तोवर तुम्ही त्या व्यवस्थेचे भाग बनलेला असता आणि व्यवस्थेची बंधनं तुम्ही स्वीकारलेली असतात. त्यामुळे या प्रश्नांचा धांडोळा घेत राहून, हे प्रश्न कुटुंबापुढे, आप्तमंडळींसमोर मांडून त्यांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यावर मग निर्णय घेतला तर विवाहसंस्थेमधील सुधारणा आणि या व्यवस्थेला पर्याय उभे राहणं हे दोन्ही होऊ शकेल. यातून स्त्री-पुरुष संबंधांचा, कुटुंबव्यवस्थेचा नवीन अध्याय सुरु होऊ शकेल आणि मुख्य म्हणजे स्त्रीसमोरील अवकाश अधिक विस्तारू शकेल. विवाहसंस्थेवर पूर्णपणे अवलंबून न राहण्याचं धोरण स्वीकारल्याने अधिकाधिक स्त्रियांना त्यांच्यातील सामर्थ्य, कलागुण शोधण्याचा, कुणीतरी आपला ‘स्वीकार' करायला हवा या दडपणातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. (हे पुरुषांनाही लागू होतंच.) आपण नीट पाहिलं तर असं दिसेल की विवाहसंस्था ही स्त्री-पुरुष संबंधाचे विविध पैलू आणि या संबंधांच्या विविध शक्यता लक्षात घेता, मुळात माणसाच्या घडणीचे विविध पैलू लक्षात घेता फारच सरधोपट आणि काहीशी उत्कंठाविरहीत अशी व्यवस्था आहे. लेखात मागे म्हटल्याप्रमाणे प्रत्येक व्यवस्थेचं श्रेय असतं तसंच ते याही व्यवस्थेचं आहेच, विशेषतः एका भल्यामोठ्या संख्येच्या समूहाचं नियोजन करण्याच्या दृष्टीने विवाहसंस्थेची प्रस्तुतता आहेच, पण म्हणून ती ‘मूलगामी व्यवस्था' होऊ शकते का हा प्रश्न आहे. माणसासाठीची व्यवस्था मूलगामी होण्यासाठी मुळात ती 'माणसाचा विचार' करणारी असावी लागते. तिच्यात परिवर्तनाची क्षमता असावी लागते. तसं असेल तरच ती माणसाच्या अनेकविध प्रेरणांना न्याय देऊ शकते. 'कामचलाऊ', 'कार्यक्षम' आणि 'परिणामकारक' यात फरक आहे. एखादी व्यवस्था यापैकी कशात बसते हे तपासत राहायला हवं.</p><p style="text-align: justify;"><b>गरज प्रागतिक आणि कल्पक </b><span style="text-align: left;"><b>दृष्टीची </b></span></p><p style="text-align: justify;">प्रत्येक समाजात व्यवस्थेच्या शोषणाचे बळी ठरणारे जे समूह असतात त्यांच्यातही त्या समूहातील स्त्री ही अंतिम शोषित असते असं आपल्याला दिसून येतं. भारतीय संदर्भात दलित स्त्री हा असा एक अंतिम शोषित घटक आहे. या शोषणाचे धागे आपल्या मानसिकतेत गुंतलेले आहेत आणि त्याही आधी ते व्यवस्थेत गुंतलेले आहेत. जातिव्यवस्थेतून होणारं शोषण, शिक्षण-आरोग्य-रोजगार या क्षेत्रांमधील प्रश्न, शहरकेंद्री विकास धोरणांमधून येणारे प्रश्न, भांडवली बाजारपेठेच्या पोषणातून निर्माण होणारी विषमता असे विविध प्रश्न हे व्यवस्थात्मक प्रश्न असतात. (आणि वर म्हटलं तसं शेवटी ते 'मानसिक व्यवस्थे'चे प्रश्न असतात.) स्त्री-पुरूष संबंध, विवाहसंस्था यांच्यावर या प्रश्नांचा - त्यांना जन्म देणाऱ्या व्यापक व्यवस्थेचा - प्रभाव पडतोच. पण प्रभाव जसा 'वरून खाली' पडतो तसाच तो 'खालून वर'ही पडत असतो. कुटुंब, विवाहसंस्था हे व्यवस्थेचे घटक शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, उद्योग यांच्यावर कमी-अधिक प्रमाणात परिणाम करतातच. ही दुहेरी देवाणघेवाण आहे. म्हणून आज स्त्री ‘ज्या प्रकारची' स्त्री आहे, पुरुष ‘ज्या प्रकारचा' पुरुष आहे आणि स्त्रीप्रश्न ‘ज्या प्रकारचे' स्त्रीप्रश्न आहेत त्यांची मुळं विवाहसंस्थेच्या प्रचलित स्वरुपातही गुंतलेली आहेत. 'विवाह हे स्त्रियांच्या उपजीविकेचं साधन आहे' असं बर्ट्रांड रसेलने म्हटल्याला आज पुष्कळ वर्षं झाली. रसेलच्या काळाच्या संदर्भाने हे विधान जितकं लागू होतं तितकं आज लागू होणार नाही, पण हे विधान आज संपूर्णपणे मोडीत निघेल असंही नाही. (विवाहाच्या अंतर्गत राहून स्त्री जे कष्ट करते त्यांच्या मूल्याचं काय हा प्रश्न स्त्री चळवळीने उपस्थित केला आहे. त्यावर सविस्तर चर्चाही झाली आहे. विवाहसंस्थेचं मूल्यमापन करताना हा प्रश्न विचारात घ्यावाच लागेल.) विवाहसंस्थेतील सुधारणा, पर्यायी व्यवस्थेची उभारणी यातून ‘स्त्री आणि विवाह' असं जे एक समीकरण तयार झालं आहे ते बदलायला मदत होईल. नात्यामध्ये असणं, कौटुंबिक सौख्य अनुभवणं, प्रेमाची अनुभूती घेणं या माणसाच्या आंतरिक प्रेरणा आहेत. स्त्री-पुरुष नातं, मुलं, कुटुंब ही विस्तारित नाती यातून हे साध्य होतं, माणसाला सुरक्षितता, शांतता, भावनिक आधार मिळतो. पण यातूनच या व्यवस्थेवरील मानसिक अवलंबित्वही वाढत जातं. याचं संतुलन कसं राखायचं हा विचार होणं आवश्यक आहे. माणसाच्या मानसिक, भावनिक गरजांवर केवळ आणि केवळ याच व्यवस्थेच्या चौकटीत राहून विचार केला तर ते माणसाच्या बौद्धिक क्षमतेला मर्यादा घातल्यासारखं होईल. माणसाच्या मानसिक-लैंगिक गरजांशी संबंधित मुद्दे हे 'माणसा'चे - 'स्त्री'चे, 'पुरुषा'चे, 'विषमलैंगिक वगळता इतर लिंगभाव असणाऱ्यां'चे मुद्दे आहेत. हे 'विवाहसंस्थे'चे मुद्दे नाहीत. त्यामुळे यावर प्रागतिक विचार व्हायला हवा. </p><p style="text-align: justify;"><b>बदल आणि ‘मूलगामी बदल’</b></p><p style="text-align: justify;">स्त्रीच्या शोषणाबाबत आणि बदलत्या स्त्रीबाबत विचार करताना स्त्रीवर लक्ष केंद्रित करुन तिच्या जगण्याच्या, कर्तृत्वाच्या विविध पैलूंवर बोललं जाणं स्वाभाविक आहे. त्यातून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळते. पारंपरिक पुरुषी वृत्तीसमोर आरसा धरला जातो. समाजाच्या दृष्टीमध्ये बदल होण्याची शक्यता वाढते. मात्र हे होत असताना दुसऱ्या बाजूने स्त्रीवर या सगळ्याचं अतिरिक्त ओझं पडतंय का हेही तपासायला हवं. झालं असं आहे की स्त्रीकेंद्री चर्चा सातत्याने होत स्त्री सतत 'स्पॉटलाइट'मध्ये असल्यासारखी झाली आहे. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्याचं दडपण तिच्यावर येतंय का हे पाहिलं जायला हवं. स्त्रीची ‘स्त्री' ही ओळख वारंवार वर यायला कारणीभूत अशा अनेक गोष्टी आहेतच, पण तिची 'विविध लक्षणांनी, विविध गुणदोषांनी युक्त अशी माणूस' ही ओळखही वर यायला हवी आहे.</p><p style="text-align: justify;">एखाद्या प्रश्नावर उत्तर सापडत नसेल तर त्या प्रश्नाला भिडण्याची आपली पद्धत तपासावी लागते. स्त्रीचे प्रश्न आजच्या व्यवस्थेत संपत नसतील तर या व्यवस्थेचा पुनर्विचार व्हावा. आणि तो स्वप्नरंजनात्मक, आदर्शवादी दृष्टीने होऊ नये. वैज्ञानिक पद्धतीने व्हावा. त्यासाठी विवाहसंस्था, कुटुंबसंस्था यांचं वैज्ञानिक मूल्यमापन व्हायला हवं. ते न करता, मुळांवर परिणाम करतील असे उपाय न शोधता ‘मूलगामी बदल' होतील अशी आशा करता येणार नाही. बदल होतच राहतील. स्त्रीच्या भूमिका बदलतील, तिच्या कर्तृत्वाचा अवकाशही विस्तारेल, परंतु मूल्यव्यवस्थेत किती बदल झाला? वैचारिकदृष्ट्या काय बदल झाले? स्त्री-पुरुष संबंधांबाबतीत प्रगल्भ विचार करता येऊ लागला का? त्यातून व्यवस्थेत मुळातून बदल होण्यासाठी समाज किती प्रमाणात तयार झाला या प्रश्नांची उत्तरं म्हणजे महत्त्वाचे 'इंडिकेटर्स' ठरतील. </p><p style="text-align: justify;">‘स्त्री' हा एक संदर्भ बिंदू असणारा हा एकूण विषय एकरेषीय आणि बायनरी स्वरुपात चर्चा करावी असा अर्थातच नाही. तसा कुठलाच विषय असत नाही. त्यामुळे या विषयावर विविध अंगांनी विचार व्हावा लागेल. हे करत असतांना आपली विचारपद्धती केवळ काही ढोबळ निरीक्षणांनाच ग्राह्य मानणारी नसावी. आपली विचारपद्धती मुळाकडे जाणारी असावी. आपण जर स्त्रीबाबत, स्त्रीप्रश्नांबाबत विचार करत असू तर 'विवाहसंस्था' हे अनेकपैकी एक मूळ आहे आणि तिथे काम करण्याची गरज आहे हे लक्षात घ्यावं लागेल. </p><p style="text-align: justify;">(शब्दोत्सव, दिवाळी २०२०) </p>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-46512019046085657962020-12-23T02:06:00.002-08:002020-12-23T03:17:56.766-08:00मैं और मेरी कॉपी <p style="text-align: justify;">'तुम्ही काय करता?' हा सांस्कृतिकदृष्ट्या व्यावहारिक आणि व्यावहारिकदृष्ट्या सांस्कृतिक असा एक लोडेड आणि धारदार प्रश्न आहे. बऱ्याचदा या प्रश्नाच्या उत्तरानुसार पुढल्या संभाषणातलं राजकारण निश्चित होत असतं. माणूस एखादी गोष्ट का करतो याचा शोध घेता घेता गौतम बुद्धापासून सिग्मंड फ्रॉइडपर्यंत अनेकांना निर्वाण प्राप्त झालं. माणूस एखादं काम किंवा बरीचशी कामे पैसे मिळवण्याकरता करतो असं एक सरळ-साधं आधुनिक उत्तर अनेकांना सुचू शकेल आणि अनेकांना सुचल्यामुळे आधुनिक रीतीनुसार त्याला बरोबरही म्हणता येईल, पण पैसे मिळवणं हा झाला एक भाग. माणूस एखादी गोष्ट का करतो हा एक मौलिक, तात्त्विक, मूलभूत आणि मनोरंजक प्रश्नही आहे आणि 'तुम्ही काय करता?' याचं उत्तर दिल्यावर ते समोरच्याला न कळणं हा हताश करणारा प्रकार आहे. मात्र हताशेला मनोरंजनाकडे वळवणं हा हताशेवर मात करण्याचा अक्सीर इलाज आहे. हा इलाज वेळीच सापडल्याने मला बरीच मदत झाली आहे. (विशेषतः फेसबुकवर चर्चा करताना. फेसबुकवर जे होतं त्याला मी माझ्या अंगभूत भिडस्तपणाला जागून 'चर्चा' असं म्हणतोय. बाकी 'जन्नत की हकीकत' सगळ्यांना माहीतच आहे. संदर्भ ज्यांना कळला नसेल त्यांनी 'जन्नत की हकीकत गालिब' असा एक गूगल सर्च करावा.) </p><p style="text-align: justify;">'मी कॉपीरायटर आहे' या उत्तरानंतरही प्रश्नार्थक चेहरा बघण्याचं माझ्या भाळीच लिहिलं गेलं आहे हे मला अनेक प्रश्नार्थक चेहरे बघितल्यावर नीटपणे पटलं. आता इथे एक गंमत आहे. 'मी आयटीमध्ये काम करतो/करते' हे ऐकल्यावर वास्तविक समोरच्या माणसाला हा/ही नक्की काय करतो/करते हे अजिबात लक्षात आलेलं नसतं. पण 'आयटी' म्हटल्यावर हिंजेवाडी, ट्रॅफिक, खराडी, बाणेर, बंगलोर, हैद्राबाद,बिल गेट्स, गूगल, लॅपटॉप आणि कॉफीचा मग घेऊन बसलेली माणसं, चकाचक ऑफिसेस, महाकाय इमारती, देखणे कॅफेटेरिया, जोरदार पगार अशा वेगवेगळ्या चित्रांचं कोलाज झटकन डोळ्यासमोरून निघून जातं आणि मेंदूतल्या आकलनाच्या कप्प्यात एकदम एक फ्लॅश चमकतो आणि तो माणूस "हो का? वा! वा! आयटी म्हणजे काय प्रश्नच नाही..." असा एक शेरा ठेवून देतो. वास्तविक आयटीमध्ये काम करणारा तो किंवा ती एखाद्या आयटीच, पण डबघाईला आलेल्या कंपनीत नुसताच कीबोर्ड बडवायचं काम (पक्षी : डाटा एंट्री) करत असण्याची शक्यता असते. पण 'आयटी' माहात्म्य मोठं असल्याने कुठल्याही मोठ्या गोष्टीखाली अनेक छोट्या गोष्टी सहज लपून जातात तेच इथेही होतं. (उपमा सुचतायत, पण मोह आवरतो. राजकीय आहेत.) दुकानदार, डॉक्टर, वकील, शिक्षक, कॅशिअर, केमिस्ट, सुतार, रंगारी, समुपदेशक आणि इतर अनेक नोकरदार-व्यावसायिक यांच्याबाबत लोकांचा गोंधळ होत नाही. कारण कधी ना कधी तरी या सगळ्यांच्या हाताखालून लोक गेलेले असतात. खरं तर कॉपीरायटरच्याही हाताखालून लोक गेलेले असतात, पण ते त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. अशा वेळी मी माझी नेहमीची युक्ती वापरतो. 'ठंडा मतलब कोका-कोला', 'सर्फ की खरीदारी में ही समझदारी है', 'घराला घरपण देणारी माणसं', 'दाग अच्छे है' या ओळी ऐकवतो. ('घराला घरपण देणारी माणसं' ही ओळ शक्यतो पुण्यातल्या माणसालाच ऐकवतो.) या ओळी ऐकल्या की समोरच्या माणसाच्या मेंदूत 'आयटी' हे शब्द ऐकल्यानंतर चमकणारा फ्लॅश चमकतो. अर्थात कॉपीरायटिंग म्हणजे फक्त स्लोगन्स लिहिणं नव्हे, पण कॉपीरायटिंगची तोंडओळख होण्यासाठी ते पुरेसं असतं. </p><p style="text-align: justify;">ज्याची पायरी चढायची वेळ येऊ नये असं सगळ्यांना वाटतं ती जागा म्हणजे कोर्ट. अर्थात हे पारंपरिक झालं. यात डेंटिस्टची खुर्ची, सरकारी हॉस्पिटल, लांब पल्ल्याची एसटी बस, पुणे ते कानपूर ट्रेनचा जनरल डबा अशा नवीन पायऱ्यांची भर घालता येईल. पण ते असो. एक ठिकाण असं आहे की जिथल्या पायऱ्या चढाव्याशा वाटण्या - न वाटण्याचा प्रश्नच फारसा येत नाही कारण ते ठिकाण 'आहे' याची जनसामान्यांना फारशी कल्पनाच नसते. हे ठिकाण म्हणजे जाहिरात एजन्सी. 'शब्दकोशातले सगळे शब्द इथे सुंदर होऊन मिळतात' अशी नीलकंठ प्रकाशनाची टॅगलाइन आहे (स्थापना १९६३. पुण्यात टिळक रोडवर टिळक स्मारक मंदिर ते महाराष्ट्र मंडळ या पट्ट्यात गेलात तर दिसेल. विजय तेंडुलकरांच्या बऱ्याच नाटकांबरोबर 'गिधाडे', 'घाशीराम कोतवाल', 'बेबी', 'सखाराम बाइंडर' या नाटकांच्या मुद्रित आवृत्त्याही नीलकंठ प्रकाशनाने काढल्या आहेत. म्हणजे इथे शब्द नुसतेच सुंदर नाही तर भयंकर सुंदर होऊन मिळतात!) पण जाहिरात एजन्सीत काहीही म्हणजे काहीही सुंदर करून मिळतं. (राजकीय पक्षसुद्धा. तपशीलात जायचा मोह पुन्हा एकदा आवरतो.) विक्रीसाठी बाजारात येणाऱ्या सर्व उत्पादनांचं ब्यूटी पार्लर म्हणजे जाहिरात एजन्सी. ऑडीपासून ओडोमासपर्यंत आणि वुडलँड शूजपासून वुडवर्ड्स ग्राइप वॉटरपर्यंत कुणालाच न चुकलेली जागा म्हणजे जाहिरात एजन्सी! (वुडवर्ड्स ग्राइप वॉटर हे शब्द वाचल्यावर जर 'काय झालं? बाळ रडत होतं...' हा संवाद तुमच्या मनात उमटला असेल तर ती 'जाहिरात विजया'ची साक्ष आहे.)</p><p style="text-align: justify;">शब्द आणि चित्र यांना व्यावसायिकदृष्ट्या फंक्शनल स्वरूप प्राप्त होतं ती जागा म्हणजे जाहिरात एजन्सी. कलेसाठी कला की जीवनासाठी कला हा वादच नष्ट होऊन 'व्यवसायासाठी कला' या निर्विवाद उद्दिष्टाने चालू राहते ती जागा म्हणजे जाहिरात एजन्सी. व्हिज्युअल डिझायनर आणि कॉपीरायटर हे दोघे इथले प्रमुख कामगार. किचन सांभाळणारे. आणि चित्र व शब्द वापरून केलेली जाहिरात पेश करण्याआधी त्यांचं मुख्य कौशल्य म्हणजे आयडियाज सुचवणं. 'आयडिएशन' हा जाहिरात क्षेत्राचा आत्मा. पुढे मग आयडियाज थंडपणे नाकारण्याचं आणि चित्र व शब्दांमध्ये आपल्याला हवा तो बदल करवून घेण्याचं काम क्लायंट करतच असतो. आपल्या हातून काही लिहून झालं आणि ते आपलं आपल्याला आवडलं असलं, 'जाहिरात'दृष्ट्या ते चांगलं झालेलं असलं तरी जणू ते आपण लिहिलंच नाही अशा अलिप्तपणे त्याच्याकडे बघण्याची किमया साधली की तुम्ही कॉपीरायटर झालातच म्हणून समजा. कालिदास, शेक्सपियर, डिकन्स आणि दोस्तोव्हस्की थोर लेखक खरेच (त्यांचं कुणी किती वाचलं आहे हा मुद्दा सध्या बाजूला ठेवू), पण एक आणि दोन बीएचके फ्लॅट्स (सॉरी... 'होम्स', 'फ्लॅट्स' नाही. अलीकडे कॉपी न लिहिल्याचा परिणाम!) असणाऱ्या पन्नास बिल्डर्सच्या शंभर इमारतींचं त्या केवळ शहरातल्या वेगवेगळ्या जागांवर आहेत या एका फरकाच्या आधारे रसभरित वर्णन करू शकणारा लेखक म्हणजे कॉपीरायटरच. कलेची साधना कुठल्याच कलाकाराला चुकलेली नाही, समीक्षा आणि रिजेक्शनही कुणालाच चुकलं नाही, पण 'ग्राहकांचा संतोष' याच प्रेरणेतून सुरू होणारा कलाप्रवास म्हणजे व्हिज्युअल डिझाइन आणि कॉपी.</p><p style="text-align: justify;">एक काळ, म्हणजे प्रचंडच जुना काळ, असा होता की हिशेब सोपे होते. समोरच्याचं पटलं नाही, आवडलं नाही की त्याला सरळ खतम करता यायचं. मग हळूहळू गट पडले, गटांमध्ये लढाया आणि युद्धं सुरू झाली. मात्र एकीकडे नीतीशास्त्र विकसित झाल्याने पुढे या शास्त्राला युद्धभूमीवरही जागा करून द्यावी लागली आणि युद्धाला नियम आले. विसाव्या शतकात दोन महायुद्ध झाल्यावर लोकांच्या असं लक्षात आलं की युद्ध करणं ही काही परवडणारी गोष्ट नाही. मग असं झालं की आदिम काळापासून चालत आलेल्या संघर्षाच्या गुणसूत्रांनी सूट-बूट, टाय, ब्रीफकेस असा जामानिमा केला. भाषा मदतीला आली. समोरच्याला सरळ खतम न करता त्याला विक्रीच्या तंत्राने आणि शब्दांनी नामोहरम करता येऊ लागलं. जगावर राज्यच करायचं असेल तर बंदुका आणि तोफांपेक्षा बर्गर, पिझ्झा आणि कोका कोलाची लोकांना सवय लावणं बेष्ट आहे हा साक्षात्कार झाला. युद्ध हा एक मोठा बिझनेस होता. आता बिझनेसचंच युद्ध झालं. खुल्या मैदानातल्या लढाईचं विसाव्या आणि एकविसाव्या शतकातलं एक रूप म्हणजे बिझनेस स्ट्रॅटेजी आणि बिझनेस मीटिंग्ज. टेबलावर समोरासमोर बसून होणाऱ्या बिझनेस मीटिंग्ज लढाईपेक्षा कमी नसतात. आता कोण किती बलवान हा आदिम नियम इथेही लागू होतोच. जाहिरात क्षेत्राबाबत बोलायचं झालं तर कॅडबरी, कोका कोला, सॅमसंग, सोनी, हिंदुस्थान युनिलिव्हर अशा बलाढ्य कंपन्या आणि त्यांची जाहिरात करणाऱ्या बलाढ्य जाहिरात एजन्सीज यांच्यातल्या संबंधांचं 'गतिशास्त्र' (किंवा सोप्या भाषेत डायनॅमिक्स ) वेगळं आणि पुण्यासारख्या मिड साइज मार्केटमधल्या एखाद्या छोट्या एजन्सीचं तिच्या क्लायंट्सबरोबरच्या संबंधांचं गतिशास्त्र वेगळं. एजन्सी आणि क्लायंट यांच्यातल्या एका छोट्याशा मीटिंगमध्ये डोकावून पाहिलं तर हे लक्षात येईल आणि कॉपीरायटर या प्राण्याची अधिक ओळख होऊ शकेल - </p><p style="text-align: justify;">चकचकीत ऑफिसची चकचकीत कॉन्फरन्स रूम. आलिशान म्हणावी अशी. भाषा, साहित्य, क्रिएटिव्ह रायटिंग वगैरेंच्या नादाला लागलो नसतो तर समोर दिसतेय त्यातली थोडी तरी चकाकी आयुष्यात आली असती हा दर वेळी मनात येणारा विचार याही वेळी कॉपीरायटरच्या मनात येतो. तो, व्हिज्युअल आर्टिस्ट आणि एजन्सीचा मालक - म्हणजे या दोघांचा बॉस क्लायंटची वाट बघत बसलेत. थोड्या वेळाने (म्हणजे उशीराने) डोळे दिपतील असे पांढरेशुभ्र कपडे, हातात तब्येतीने लांब आणि रुंद असा मोबाइल, बोटात अंगठ्या आणि चेहऱ्यावर 'मी विजेता होणारच' असा ओसंडणारा भाव घेऊन क्लायंट उर्फ जानेमाने बिल्डर येतात. नमस्कार-चमत्कार झडतात आणि गाडी प्रेझेंटेशनवर येते. </p><p style="text-align: justify;">"तुमचे डिझाइन्स पाहिले मी. चांगलेत. चांगलेत. (च 'चप्पल'मधला). पन काये ना, थोडा जास्त इंपॅक्ट यायला पायजे अजून. ('अजून'चा 'ज'सुद्धा 'जीवन'मधला). आपल्या टारगेट ऑडियन्सला इतकं हाय इंग्लिस झेपनार नाय."</p><p style="text-align: justify;">"राइट सर. म्हणूनच तर आम्ही सजेस्ट करत होतो की आपलं संपूर्ण कॅम्पेन मराठीत असलं पाहिजे." एजन्सीचा मालक. म्हणजे बॉस. खिंडीत उतरून लढाईच्या तयारीत. </p><p style="text-align: justify;">“हां, ते बराबर हाय. पन काय होते ना, मिडल आणि लोअर मिडल क्लासमधल्या लोकांना पन शेवटी वाटते ना की आपल्याशी पन कोनीतरी इंग्लिसमधी बोलायला पायजे. आपन पन अशा स्कीममदी राहायला जाऊ जिकडे सगळं एकदम हाय-फाय असेल. त्याला मार्केटिंगमदी काय म्हणतात?" क्लायंट - बॉसचा बॉस - डोकं खाजवू लागतो. </p><p style="text-align: justify;">"अॅस्पिरेशनल व्हॅल्यू." कॉपीरायटर तोंड उघडतो. </p><p style="text-align: justify;">"हां, करेक्ट! तर ते दिसायला पायजे आपल्या डिझाइन्समधून. आपल्या प्रोजेक्टमधून आपन जे देतोय ते बेस्ट इन क्लास आहे, पन ते इथेपन दिसायला पायजे. आमचं काय थिंकिंग झालंय तुम्हांला सांगतो. मराठी ऑडियन्सला मराठीमधून कम्युनिकेट करायचं असा ट्रेंड हाय, पन आपल्याला तो ब्रेक करायचाय. आणि आपन मराठी टच देनार ना! फोटो सगळे एकदम टिपिकल मराठी वापरायचे. लेडीज लोगला हिरवी साडी, जेंट्सला कुर्ता. घरासमोर रंगोलीपन दाखवू शकतो. अजून वाटलं तर तोरन वगैरे. पन ते बोलतील इंग्लिस. आणि डिझाइन एकदम कॉस्मोपॉलिटन. अॅस्पिरेशन हाय लेव्हलचं म्हनलं की मराठीपन थोडं लो लेव्हलला जानारच, काय?"</p><p style="text-align: justify;">या वाक्यानंतर सभागृहात मिनिटभर शांतता पसरते. </p><p style="text-align: justify;">"म्हंजे मराठीपन असंच नाय, एनी रीजनल आयडेंटिटी..." बॉसच्या बॉसला बहुधा आपल्या व्यावहारिक बोलण्यातली सांस्कृतिक गफलत लक्षात येते किंवा अचानक त्याला राज ठाकरे आणि मंडळी आठवतात.</p><p style="text-align: justify;">"दॅट्स ओके. तसं करता येईल आपल्याला. पण इंग्लिश कॉपी ओके आहे की. इन फॅक्ट आम्ही टेस्टपण केली काही लोकांना दाखवून." बॉस. </p><p style="text-align: justify;">"काय सांगता? मला डाउट आहे तरी. आता फॉर एक्झाम्पल ही लाइन बघा - 'लाइफ हिअर इज एव्हरीथिंग बट....मंडेन" बॉसचा बॉस. </p><p style="text-align: justify;">"राइट. मंडेन म्हणजे बोअरिंग, नेहमीचं." बॉस. </p><p style="text-align: justify;">"ते बराबर. पन शब्द हेवी नाय वाटत? किंवा ही लाइन बघा. गिव्ह अ चान्स टू युवर अनरिअलाइज्ड पोटेंशियल इन द ट्रूली इन्स्पायरिंग मीलियू. म्हंजे काय ते मलाच समजलं नाय." बॉसचा बॉस.</p><p style="text-align: justify;">इथे वास्तविक कॉपीरायटरला आनंद झालाय. कारण हेडलाइन सोडून क्लायंटने बॉडी कॉपी वाचण्याचे कष्ट घेतले आहेत ही बाब त्याला सुखावणारी आहे. या आनंदात तो एकदा सोडून अनेकदा कॉपी रीराइट करू शकतो. साधारणपणे हेडलाइन आणि टायटल्सवरून नजर फिरवली की बहुतेकांचं काम होतं. बॉडी कॉपी नीट वाचण्यात कुणाला फारसा रस नसतो. वाचन अलीकडे कमी झालंय म्हणतात त्यात कॉपीही आलीच की. अर्थात या आनंदातही तो किल्ला लढवायचं ठरवतो आणि पुन्हा एकदा तोंड उघडतो. </p><p style="text-align: justify;">"लेट मी एक्सप्लेन सर. अनरिअलाइज्ड पोटेंशियल म्हणजे आजवर ज्यांना संधी मिळाली नाही अशा तुमच्या क्षमता. इन्स्पायरिंग मीलिया म्हणजे प्रेरणादायक वातावरण. मला वाटतं एक-दोन शब्द किंवा लाइन्स समजल्या नाहीत तरी ठीक आहे. आपण ऑडियन्सला थोडा विचार करायला लावावा. अर्थ शोधायला लावावा. इट गिव्ह्ज अ फीलिंग दॅट आय हॅव अर्न्ड माय प्लेस."</p><p style="text-align: justify;">"असं म्हनता?" कॉपीरायटरच्या शेवटच्या वाक्याविषयी बॉसच्या बॉसला वास्तविक शंका आहे थोडी, कारण त्याला ते नीटसं कळलेलं नाही. पण पुन्हा हे यांच्यासमोर सांगायला नको असा तो विचार करतो. कॉपीरायटरनेही ते वाक्य हुशारीनेच पेरलेलं असतं. इंग्लिश कॉपीरायटिंगच्या एकूण अनुभवातून संपत्ती आणि अधिकाराला शह द्यायची ताकद अधिक संपत्ती आणि अधिक अधिकार यांच्याखेरीज फक्त इंग्लिशमध्ये आहे हे त्याला कळून चुकलेलं असतं.</p><p style="text-align: justify;">"बरं मी विचार करतो परत. आपन परत भेटू या वीकमदी." </p><p style="text-align: justify;">विचार करूनही आपल्याला डिझाइन आणि कॉपी बदलायला लागेल असा अंदाज बांधूनच मंडळी निघतात. पण निदान आत्ता तरी मीटिंग जिकल्याची जाणीव प्रबळ असते. </p><p style="text-align: justify;">क्लायंटकडून ब्रीफ येणं, त्यावर ब्रेनस्टॉर्मिंग होणं आणि क्रिएटिव्ह्ज तयार होणं ही म्हटलं तर सृजनाचा आनंद देणारी प्रोसेस. पण प्रोसेस क्रिएटिव्ह असल्यानेच घोळही होतात. कारण सगळेच जण क्रिएटिव्ह होऊ लागतात. बिल्डरला बिल्डिंग कशी बांधायची हे ज्ञान जाहिरात एजन्सी देत नाही, पण बिल्डर मात्र जाहिरात कशी कराल हे ज्ञान एजन्सीला देत राहतो. अर्थात क्लायंट 'समजू लागला' की एजन्सीचं काम थोडं सोपं होतं. 'यांना काय दिलेलं आवडेल?' या प्रश्नाचं उत्तर मिळू लागलं की फारशा क्रिएटिव्ह तडजोडी करायची वेळ येत नाही. कारण ती तडजोड करूनच डिझाइन पाठवलेलं असतं. काही वेळा क्लायंटच्या मागण्या मनःशांतीची कसोटी बघणाऱ्या असतात. म्हणजे 'तो बॅकग्राउंडचा पांढरा कलर थोडा अजून पांढरा करता का?' किंवा 'हेडलाइनमधले अमुक दोन शब्द काढून त्याच अर्थाची हेडलाइन पाठवता का?' इ. इ. मात्र 'इसमें मजा नहीं आ रहा' या समीक्षेचं स्थान सगळ्यात वरचं आहे. भालचंद्र नेमाडेंना 'हिंदू वाचली. मजा नाही आली.' अशी प्रतिक्रिया कळवल्यावर त्यांचं कसं होईल? (कॉपीरायटर आणि नेमाडे अशी तुलना पाहून अनेकांच्या भुवया आणि मिशा उंचावतील. पण मुद्दा फक्त फीडबॅकचा आहे. त्यामुळे शांतता राखावी.) 'इसमें मजा नहीं आ रहा' म्हटलं की पुढचं बोलणंच खुंटतं. अर्थात कॉपीरायटर जसजसा सीझन्ड होत जातो तसतशी त्याला क्लायंटविषयी करूणाही वाटायला लागते. कारण क्लायंट बिचारा व्यवसायाच्या गरजेपायी चित्र आणि शब्दांच्या वाट्याला जात असतो. आणि शब्द व चित्र समोर आले की अत्यंत रूक्ष आणि गद्य माणसालाही समीक्षेचा पाझर फोडतात. एकदा एका क्लायंट मीटिंगमध्ये प्रॉडक्ट फिल्मबद्दल चर्चा चालू असताना अशाच एका गद्य क्लायंटने धक्का दिला होता. बराच वेळ थंडपणे चर्चा करणारा हा क्लायंट मधेच एकदम उसळून म्हणाला, "तुम्ही शोले पाहिलाय का शोले?" आता 'शोले' न पाहिलेला माणूस भारतात तरी सापडणं अवघड. मी 'हो' म्हटल्यावर हा म्हणतो, "गब्बर सिंग ठाकूरच्या फॅमिलीला संपवतो तो सीन आठवा. ठाकूरची सून धावत येतेय आणि गोळीचा आवाज येतो आणि मग एकदम फ्रीझ फ्रेम! काय शॉट होता तो. आपण असा एक शॉट वापरायचा आपल्या फिल्ममध्ये." सिमेंट आणि काँक्रीटशी झटापट करता करता यांचं कॅमेरा हातात घ्यायचं स्वप्न अपूर्ण राहिलं असावं असा विचार माझ्या मनाला चाटून गेला. सांगायचा मुद्दा असा की हे क्षेत्रच असं आहे की ते एरवी गप्प असणाऱ्यांनासुद्धा वाचा फोडतं. माणसाला बहुधा 'मजा येत नव्हती' म्हणून त्याने चित्र आणि (जास्तीचे) शब्द शोधले. मग त्यातून जे निर्माण झालं त्यावरही तो 'मजा येतेय' आणि 'मजा येत नाहीये' या भाषेत बोलायला शिकला!</p><p style="text-align: justify;">कॉपीरायटर हा इसम या सगळ्याशी झगडत झगडत रोज इमाने इतबारे शब्द दळायला घेतो. परिणाम काहीही असो, पण एखाद्या प्रॉडक्टसाठी काहीतरी आयडिया सुचवायचीय, समोर आलेल्या जाहिरातीच्या डिझाइनला एखादी कॅप्शन द्यायचीय या विचारानेच त्याचे हात सळसळू लागतात त्याला तो तरी काय करणार? चित्रकार असो की लेखक - कोऱ्या कागदावर आपलं अस्तित्व उमटवणारी माणसं. दोघांची माध्यमं वेगळी पण प्रेरणा एकच. काहीतरी सांगण्याची. कॉपीरायटरही काहीतरी सांगतोच, पण ते दुसऱ्याकरता असतं इतकंच. क्रिएटिव्ह ऊर्जा तीच. प्रोसेस तीच. किंचित जास्तच आव्हानात्मक. आपली स्वतःची कविता लिहिणं आणि आखून दिलेल्या चौकटीत एखादं गाणं लिहिणं यात फरक आहे. कवीमाणूस थोरच; पण साहिर लुधियानवी, कैफी आझमीपासून गुलजार, अमिताभ भट्टाचार्यपर्यंतचे गीतलेखक जो अनुभव देतात त्याचं सौंदर्य काय वर्णावं? (हे सगळेच आणि बहुतेक गीतलेखक आधी कवी असतात हे कवितेची थोरवी अधोरेखित करतं!) उत्तम कॉपी आणि व्हिज्युअल डिझाइन हेदेखील असाच कलानुभव देतात. पण त्यांच्या 'शॉर्ट लाइफ'मुळे आणि जाहिरातींचा मारा खूप असल्यामुळे लोकांच्या ते लक्षात राहात नाही. आस्वादाची नजर असेल तर मात्र चांगल्या जाहिरातीचा आनंद घेता येतोच. </p><p style="text-align: justify;">कॉपीचं, जाहिरातीचं आख्यान अद्भुतरम्य आहे. इथे क्रिटिव्हिटी चांगलीच घासली आणि वाकवली जाते. सृजनात्मक समाधान आणि वैताग यांचं पॅशनेट मिश्रण असलेलं हे क्षेत्र. रेडिओ जिंगल्सचे शब्द नीट ऐकले, मुद्रित जाहिरातींमधला मजकूर नीट वाचला, दृकश्राव्य जाहिरातींचा 'फ्लो' लक्षात घेतला तर त्यातली क्रिएटिव्ह मौज कळू शकते. थोड्या शब्दात, थोड्या वेळात लक्ष वेधून घेणे या उद्देशाने सुरू होणारा हा प्रवास आहे. वृत्तपत्र आणि मासिकातील जाहिराती, होर्डिंग्ज, वेबवरील जाहिराती, जिंगल्स, टेलिव्हिजनवरील जाहिराती अशी अनेक रूपं आणि प्रत्येक रूपाची आपली अशी वैशिष्ट्यंही. अनेक जाहिराती आपल्याला आवडतात, अनेक आवडत नाहीत. पण न आवडलेली जाहिरातदेखील 'ज्याची जाहिरात वाईट आहे असं प्रॉडक्ट' तुमच्या मेमरीत स्टोअर करण्याचं काम करत असतेच. जाहिरात आणि जाहिरातींचे परिणाम हा एक समाजशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहेच, पण जाहिरात निर्मिती हा मुळात कलात्मक अभ्यासाचा विषय आहे. </p><p style="text-align: justify;">कॉपीचा मूळ गुणधर्म अल्पाक्षरत्व. तर अल्पाक्षरांचाच मार्ग धरून काही वर्षांपूर्वी लिहिलेलं काही समोर ठेवतो आणि थांबतो. </p><p style="text-align: justify;"><b><i>टू द कॉपीरायटर्स </i></b></p><p style="text-align: justify;">अनाघ्रात! कसला तुकडा शब्द आहे रे हा...!</p><p style="text-align: justify;">व्हाय डझ इट हॅव टू बी अ फ्रेंच नेम फॉर अ फकिंग प्रॉपर्टी इन खराडी?</p><p style="text-align: justify;">यमुनाजळी खेळू कोणी लिहंलय रे?</p><p style="text-align: justify;">आज वो फिरंग नहीं आई क्या?</p><p style="text-align: justify;">शाळा कुठली रे तुझी? भीती मधला 'भी' ऱ्हस्व?</p><p style="text-align: justify;">कॅन यू गेट धिस डन? जस्ट टू लाइन्स फॉर दिवाली? </p><p style="text-align: justify;">मदर्स डे को मराठी में क्या बोलते है रे?</p><p style="text-align: justify;">क्लायंट को बोल ठंड रख.</p><p style="text-align: justify;">गिव्ह मी दॅट वन लाइन डिअर. नाऊ!</p><p style="text-align: justify;">अबे पोएट्री नहीं कॉपी चाहिये.</p><p style="text-align: justify;">क्लायंट को बोल साले तू शेक्सपिअर की औलाद है क्या?</p><p style="text-align: justify;">पेशवे, जरा आजच्या मराठीत लिहा की. क्लायंट कार डीलर आहे हो.</p><p style="text-align: justify;">प्लीज आस्क द क्लायंट नॉट टू हॅव सेक्स विथ द कॉपी. </p><p style="text-align: justify;">इसमें यार मजा नहीं आ रहा. </p><p style="text-align: justify;">मुंशी प्रेमचंद कौन था रे? अँड व्हॉट डझ मुंशी मीन?</p><p style="text-align: justify;">घुमा ना इसको. एकही तो पॅरा है!</p><p style="text-align: justify;">निबंध नको रे. मुंबईचा क्लायंट आहे.</p><p style="text-align: justify;">तुझे क्या लगा? तू लिंटास में है?</p><p style="text-align: justify;">उधर मत देख चूतिये...शी हॅज लेफ्ट. सॅलरी लेने आई है.</p><p style="text-align: justify;">व्हॉट मेड यू यूझ अ जिराफ इन द डिझाईन? </p><p style="text-align: justify;">- तूने ही तो दिया है कॅप्शन : स्टँडिंग टॉल इन चेंजिंग टाइम्स.</p><p style="text-align: justify;">सातव्यांदा रीराईट करतोय. काय घंटा लिहिणार?</p><p style="text-align: justify;">क्लायंट नीड्स थ्री ऑप्शन्स इन अॅन अवर.</p><p style="text-align: justify;">- उसको बोल कॉपीरायटर लिखते लिखते मर गया. </p><p style="text-align: justify;">अबे तेरी शादी कराने को नहीं लेके जा रहे, क्लायंट मीटिंग है...</p><p style="text-align: justify;">साले ब्रीफ तो ढंग से लाया कर....क्यूं ब्रँड की मार रहा है?</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">चल चाय पीते है... </p><p style="text-align: justify;">चल चाय पीते है...</p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">उठा....पेशवे.... </p><p style="text-align: justify;"><br /></p><p style="text-align: justify;">(मिळून साऱ्याजणी, दिवाळी २०२०) </p><div style="text-align: justify;"><br /></div>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-68029644188034879372020-10-29T01:27:00.009-07:002020-10-29T08:12:01.033-07:00बुद्धी, विवेक आणि वास्तव – ३ <p style="text-align: justify;">मागील दोन लेखांमध्ये बुद्धिप्रामाण्य, नास्तिक्य, विवेक, वास्तवाचं आव्हान या संदर्भाने आपण काही बोललो. या लेखात आपण विवेकवादाची मूळ मांडणी, विवेक-अविवेक हा निर्णय करण्याच्या कसोट्या याबाबत बोलूया. तत्पूर्वी एक नोंद - </p><p style="text-align: justify;">माणसाविषयी बोलताना सहसा ‘तो’ हे पुल्लिंगी संबोधन वापरलं जातं. वास्तविक ‘माणूस’ म्हणजे स्त्री, पुरुष यांच्यासह आज अस्तित्वात असलेले अनेक इतर लिंगभेद आणि लिंगभावदेखील. सवयीचा, सोयीचा भाग म्हणून ‘तो’ वापरलं जातं. पण संबोधने लिंगसापेक्ष असल्याने ती वाचल्यावर मनात विशिष्ट लिंगाच्या मनुष्याची आकृती तयार होतेच. वस्तूंच्या बाबतीतही हे होतं. ‘पुस्तक’ म्हटलं की लिंगनिरपेक्ष प्रतिमा डोळ्यापुढे येते. पण ‘ग्रंथ’ म्हटलं की पुरुषविशिष्ट आणि ‘पुस्तिका’ म्हटलं की स्त्रीविशिष्ट प्रतिमा डोळ्यापुढे येतात. अशी इतरही उदाहरणं देता येतील. ‘मानव’, ‘माणूस’ या संज्ञानांही ‘तो’ म्हटलं गेल्याने माणूस म्हणून ‘पुरुष’च डोळ्यासमोर येतो. ‘तिथे सगळ्या बायकाच होत्या, माणूस कुणीच नव्हता’ अशा प्रकारची, ‘माणूस’ म्हणजे ‘पुरुष’ आणि ‘बाई’ म्हणजे ‘बाई’ अशी वर्गवारी सहजपणे गृहीत धरणारी वाक्यं मी काही संभाषणांमध्ये ऐकली आहेत. त्या त्या वेळी मी दुरूस्ती केली, पण एकूणात हा गोंधळ बराच मोठा आहे. माणसाच्या बाबतीत ‘तो’ प्रामुख्याने वापरलं जायचं मला दिसतं ते कारण असं की आदिम काळापासून विविध सामाजिक-राजकीय तत्वज्ञानं आणि संबंधित व्यवस्था निर्माण होण्यामागे, ईश्वर-धर्म-सत्ता या संकल्पनांना आकार आणण्यामागे, अस्तित्वाच्या हिंसक लढाईत वर्चस्व प्रस्थापित करण्यामागे मुख्यत्वे पुरुषप्रभाव कार्यरत होता. जगातील सर्व तत्वज्ञाने प्रामुख्याने पुरुषांची निर्मिती आहे. स्त्रीला जग कसं दिसतं, तिचं चिंतन काय आहे हे अलीकडे, गेल्या काही शतकांपासून ठळकपणे पुढे येऊ लागलं आहे. मानवी इतिहासात एके काळी मातृप्रधान व्यवस्था होती असं अनेक अभ्यासांतून दिसलं आहे, परंतु ती टिकलेली नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे पुरुषप्रभावाचा जो परिणाम इतरत्र आहे तोच भाषिक रचनेबाबतही आहे आणि माणूस प्रामुख्याने ‘तो’ आहे. आता मुद्दा जर सोयीचाच आहे तर माणसाला ‘ती’ हे संबोधनही वापरता येईलच. खरं तर तो किंवा ती ही दोन्ही संबोधने आलटून-पालटून वापरायलाही हरकत नाही. अर्थात जैविक फरकांच्या अनुषंगाने स्त्री आणि पुरुष या दोन प्रमुख श्रेणी असल्या तरी एकूणात लिंगभाव ही एक प्रवाही संकल्पना आहे हे आज पुढे येत आहे. लिंगाधिष्ठीत अडथळे तोडले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लिंगसापेक्ष शब्दांची मर्यादा अधिकच जाणवते. ‘ती माणूस’ हा शब्दप्रयोग करायला मला आवडेल. इथून पुढे या लेखात हे संबोधन वापरूया. ‘ती व्यक्ती’ असा शब्द वापरता येईलच, पण ‘माणूस’ या संदर्भात ‘ती’ हे संबोधन वापरण्याचा एक प्रयोग या लेखात करून पाहू.</p><p style="text-align: justify;">व्यक्त होण्यासाठी शब्द बरेचदा पुरेसे नसतात ही अनुभूती आपल्याला येत असते. शब्द, शब्दांचे प्रचलित अर्थ, केवळ शब्दांमधूनच प्रतीत होणारी/समजून घेऊ शकली जाणारी माणसाची मनोभूमिका, त्याचे मनोव्यापार यातून माणसाबद्दलच्या समग्र आकलनात थोडी त्रुटी राहतेच. हा त्रुटीचा मुद्दा संकल्पनांच्या बाबतीतही लागू होती. प्रतिगामी, पुरोगामी, बुद्धीवादी, श्रद्धाळू, अंधश्रद्ध, विवेकी, अविवेकी, वैज्ञानिक, अवैज्ञानिक हे शब्द काही विचार/कृतींचं मूल्यमापन करून त्यांना परिभाषित करतात. परिभाषित करणं व्यावहारिकदृष्ट्या आवश्यक कारण परिभाषित केल्याशिवाय विशिष्ट लक्षणांना एक ‘नाव’ मिळू शकत नाही. त्यामुळे आधुनिकतेच्या संदर्भात समर्थनीय/असमर्थनीय ठरतील असे विचार/कृती अधोरेखित होऊ शकत नाहीत. पण परिभाषित करणं म्हणजे एका अर्थी ‘मर्यादा घालणं’ही असतं. परिभाषित केल्याने ‘लेबलिंग’ होत असतं. कप्पे तयार होत असतात. अशा वर्गवारीतून, वर्गवारीचा हेतू संकल्पनांमध्ये भेद करण्याचा असला तरी प्रत्यक्षात माणसांमध्ये, समाजामध्ये विभाजन होऊ शकतं; किंबहुना होतंच. त्यातून मग माणसांचं ध्रुवीकरण होऊन माणसं ‘परस्पर अनन्य’ (म्युच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह) ठरतात/ठरवली जातात. उदा. श्रद्धाळू वि. विज्ञानवादी, परंपरावादी वि. बुद्धिवादी इ. प्रत्यक्षात माणूस एक ‘मिश्रण’ असू शकते/असते हे लक्षात घेणं आणि माणसांना कप्प्यात बंद न करणं सर्वच दृष्टीने हितकारक आहे. </p><p style="text-align: justify;">सृष्टीशी संलग्न अशा विविध लहान-मोठ्या गुंतागुंतीच्या विषयांचा अभ्यास, ‘जे आहे ते तसं का आहे?’ या प्रश्नाचा शोध घ्यायची पद्धत याअर्थी ‘विज्ञान’ ही संकल्पना मात्र व्यापक, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक ठरते. जेव्हा आपण माणसाला ‘वैज्ञानिक’दृष्ट्या समजून घ्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ‘श्रद्धा’ हा माणसाचा एक गुणधर्म म्हणून विज्ञानाचा अभ्यासविषय ठरतो. श्रद्धा ‘माणसाच्या विज्ञानाचा’ विषय ठरते. विज्ञान सृष्टीच्या जड आणि चेतन दोन्ही बाजूंचा करतं. या अभ्यासात, विशेषतः चेतन सृष्टीच्या अभ्यासात, ‘विज्ञान’ या ‘विचारपद्धती’ची ‘विवेक’ ही एक संवेदनाधिष्ठित बाजू आहे. ती विश्लेषणाची, भेद करण्याची शक्ती आहे. माणसाच्या अबोध इच्छा, अनेक प्रेरणा, या इच्छांचं आणि प्रेरणांचं कारण ठरणारं माणसाचं जैविक व सामाजिक वास्तव लक्षात घेऊन, माणसाला ‘ती आहे तशी’ समजून घेत, पुढे जाऊन ‘नवीन माणूस’ घडवण्याची आकांक्षा बाळगणारी ‘विवेक’ ही एक विचारपद्धती आहे. दुसरीकडे श्रद्धा, परंपरा, बुद्धी, निष्ठा या व इतर प्रभावांखाली असणार्या माणसासाठीही ‘विवेक’ ही कार्यक्षम विचारपद्धती आहे. </p><p style="text-align: justify;">विवेकवादाच्या मूळ मांडणीसंदर्भात पुन्हा एकदा मे. पुं. रेगे यांची मदत घेऊ. सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोपियन तत्त्वज्ञानाचा इतिहास हा प्रामुख्याने विवेकवाद आणि अनुभववाद यांच्यातील विवादाचा इतिहास आहे असं नमूद करत रेगे ‘विवेकवाद’ या शब्दाच्या आजच्या अर्थांकनाकडे वळतात. – </p><blockquote style="border: none; margin: 0px 0px 0px 40px; padding: 0px; text-align: left;"><p style="text-align: justify;"><i>विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची, किंवा असत्य व/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. आपले विश्वास, म्हणजे <span style="white-space: pre;"> </span>आपण स्वीकारलेली विधाने, सत्य कशावरून ठरतात आणि असत्य कशावरून ठरतात ह्याचा निकष विवेकवादापासून लागतो. विवेकवादी असणे म्हणजे ह्या पद्धतीला अनुसरून जी विधाने सत्य ठरतील तेवढीच सत्य म्हणून स्वीकारणे, जी सत्य ठरणार नाहीत ती सत्य म्हणून न स्वीकारणे; ही पद्धती म्हणजे वैज्ञानिक पद्धती होय. वैज्ञानिक पद्धती अनुभवावर आधारलेली असते ह्यात शंका नाही. पण अनुभवाला गोचर असणार्या पदार्थांचे आणि घटनांचे जे गुणधर्म आपल्या साक्षात प्रत्ययाला आले असतील तेवढ्याचे वर्णन करण्यावर वैज्ञानिक पद्धती समाधानी नसते. म्हणजे ‘हे पाणी त्या पाण्याहून अधिक गरम आहे’, ‘सूर्य उगवताना लाल दिसतो’, ‘ह्या झाडांची पाने डिसेंबर महिन्यात गळून पडली’, हयासारख्या आपल्या अनुभवांच्या आधारे ज्यांची सत्यता सिद्ध झाली आहे अशी विधाने नमूद करून वैज्ञानिक पद्धती थांबत नाही. ‘अणू’, ‘मूलभूत कण’, ‘विद्युतचुंबकीय क्षेत्र’, इत्यादी इंद्रियातीत – ज्यांचा आपल्याला साक्षात अनुभवातून<span style="white-space: pre;"> </span>प्रत्यय येत नाही अशा – पदार्थांचे आणि शक्तींचे अस्तित्वही विज्ञानात मानले जाते, <span style="white-space: pre;"> </span>आणि त्यांचे अस्तित्व व गुणधर्म वैज्ञानिक पद्धतीला अनुसरून प्रस्थापित झाले आहेत <span style="white-space: pre;"> </span>म्हणून मानले जाते. </i></p><p style="text-align: justify;"><i>(‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’ या पुस्तकातील ‘विवेकवाद’ या प्रकरणातून)</i></p></blockquote><p style="text-align: justify;">वैज्ञानिक पद्धती अनुभवांच्या, दृश्य-अदृश्य घटितांच्या कार्यकारणभावात शिरते आणि त्याचा उलगडा करण्यासाठी गृहीतक (हायपॉथिसिस) रचून, त्यात इंद्रियातीत अशा कल्पित पदार्थांच्या आणि शक्तींच्या अस्तित्वाची कल्पना करायला पूर्ण वाव ठेवून, त्यांच्या कार्यामुळे काही परिणाम घडून आले हे निरीक्षणाने आढळून आलं तर ती कल्पित रचना ग्राह्य धरते. अन्यथा हे गृहीतक त्याज्य ठरतं. वैज्ञानिक पद्धतीच्या स्वरूपाविषयी आणि तिच्या अनन्य वैशिष्ट्यांविषयी रेगे यांनी वरील प्रकरणात फार विस्तृत आणि नेमकं विवेचन केलं आहे. ते मुळातून जरूर वाचावं. आपल्या विषयाच्या संदर्भाने या प्रकरणाच्या शेवटी त्यांनी काही कळीचे प्रश्न विचारले आहेत. रेगे लिहितात, </p><p style="text-align: justify;">विवेकवादाचे एक परिमाण किंवा अंग म्हणजे विश्वात खरोखर काय आहे ह्याचा निर्णय <span style="white-space: pre;"> </span>करण्याची विवेकवादाने पुरस्कारलेली रीत. विवेकवादाचे दुसरे अंग नैतिक आहे. माणसाने कसे जगावे हेही विवेकवाद सांगतो. या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे ह्याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे <span style="white-space: pre;"> </span>ह्याचे नियमन करणार्या तत्त्वाला जन्म देऊ शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणित मूल्ये असे काही असू शकते का? </p><p style="text-align: justify;">हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. विवेकवादी चळवळीचा रोख या प्रश्नांकडे होता आणि आहे. मात्र मागील भागात उल्लेख केल्याप्रमाणे वास्तवाचं आव्हान प्रबळ ठरल्यानंतर मूल्यसंकल्पनांचीही कसोटी लागते. प्रागतिक विचारातून सामाजिक वास्तव सुधारेल हे एका बाजूला खरं आहे, पण सामाजिक वास्तव – जे पूर्णपणे न्यायावर, समतेवर आधारलेलं नसतं, ज्यात दुःख, शोषण यांचा मोठ्या प्रमाणात अंतर्भाव असतो – प्रागतिक विचाराला जमीन उपलब्ध करून देण्यात कमी पडतं. वास्तवातील झगडे वरचढ ठरून प्रागतिक विचार अव्यवहार्य वाटायची शक्यता बळावते. आजारी पडल्यावर अंगारे-धुपारे न करता डॉक्टरांचं औषध घ्यावं हे बरोबर, पण विशिष्ट डॉक्टरचा किंवा विशिष्ट आरोग्यविषयक सुविधेचा अनुभव कसा आहे, ती डॉक्टर/सुविधा परवडण्याजोगी आहे का हा विचार केला जाऊ शकण्याची शक्यता आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे जर एखादीने ‘आईला बरं वाटेल म्हणून बरेच उपचार केले. गुण आला नाही. शेवटी देवीसमोर बोकडाचा बळी दिला.’ असं म्हटलं तर त्यावरील आपला प्रतिवाद काय असेल? ‘आजवरच्या अनुभवावरून असं दिसतं की जर औषधांनी गुण आला नाही तर तो इतर कशानेही येत नाही. विशेषतः ज्यात स्वतः रोगी सहभागी नाही अशा उपायांनी तर नाहीच नाही!’ असं उत्तर आपण देऊ शकतो, ते पटवून द्यायचा प्रयत्नही करू शकतो. परंतु ती मनुष्य ‘बोकडाचा बळी देणे’ या कृतीकडे जर ‘उपाय’ म्हणून बघत असेल (तिला ‘अनुभव’ घ्यायचाच असेल) आणि जर कदाचित तिच्याकडे तिच्या समुदायातील कुणाकुणाच्या पूर्वानुभवाचा साठा असेल तर ती ती कृती करेल. कदाचित त्याविषयी साशंक असूनही करेल. या उदाहरणात आणखी एक उपमुद्दा आणून पाहू. औषधनिर्मितीदरम्यान (क्लिनिकल ट्रायल्स) प्राण्यांवर प्रयोग केले जातात आणि त्यात प्राणी दगावतात. आता यात हेतू संशोधनाचा आहे आणि प्राण्यांचा वापर जरी केला जात असला तरी त्यामागे काही विवेक आहे, ते अकारण केलं जात नाही, ‘मारणं’ हा हेतू नाही असा खुलासा करता येईल. परंतु ‘निष्पाप प्राण्याचा मृत्यू’ हा जर अंतिम निर्णायक मुद्दा असेल तर तो उरतोच. मग ‘ज्या मृत्यूतून काही निष्पन्न व्हायची शक्यता असते ते मृत्यू स्वीकारार्ह आणि ज्यातून काहीच निष्पन्न होऊ शकत नाही ते मृत्यू स्वीकारार्ह नाहीत’ अशी वर्गवारी करावी का? अशी वर्गवारी करणं हा वैज्ञानिक नीतीचा एक भाग मानावा का? ‘साध्य’ आणि ‘साधन’ या अनुषंगाने पाहता आधुनिकतेच्या इतरही काही आयामांबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. </p><p style="text-align: justify;">या पार्श्वभूमीवर विवेकापुढे आव्हान उभं राहतं. हे आव्हान विचार-कृतींच्या निर्णयनाचं आव्हान आहे. माणसाला सतत निर्णय घ्यावे लागतात. रोजच्या जगण्यातल्या लहान-सहान निर्णयांपासून राज्यव्यवस्थेच्या, न्यायव्यवस्थेच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत ही एक मोठी मालिका आहे. ही प्रक्रिया प्रत्यक्षातील आव्हानांशी जोडलेला असल्याने मूल्यसंकल्पनांशी तिचा संघर्ष होत राहतो. या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक माणूस तिच्या तिच्या क्षमतेनुसार शोधते आणि विविध विचारदृष्टींच्या परिप्रेक्ष्यात त्या उत्तराचं मूल्यमापन केलं जातं. परीक्षेत चांगले गुण मिळावेत म्हणून एखादा विद्यार्थी मंदिरात डोकं टेकतो, एखादं जोडपं ‘मूल होऊ दे’ म्हणून देवापुढे नवस बोलतं, कुणी व्रत ठेवतात, ईप्सित साध्य व्हावं म्हणून कुणी उपास धरतं, कुणी फार काही न करता बसल्या जागी हात जोडतं. याच मालिकेतील एक उदाहरण असं असू शकेल की जिथे कुणाला हताश, निराश वाटलं आणि हात जोडावेसे वाटले तरी ते आपण स्वीकारलेल्या निरीश्वरवादाच्या विरोधी होईल म्हणून ते केलं जाणार नाही. एखादं उदाहरण असं असेल की जिथे एखादीला काहीही झालं तरी हात जोडावेत किंवा देवा-धर्मासंबंधीचं एखादा कर्मकांड करावं असं अजिबात वाटणार नाही. इथे एक लक्षात घेऊ की ‘विवेक’ हा निकष केवळ देव-धर्म, श्रद्धा, भक्ती या संदर्भातच लागू होतो असं नाही. आपले परस्परसंबंध, त्यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये माणसांच्या वृत्तींमुळे येणारे अडथळे, समाजजीवनातील अनेक प्रश्न या सगळ्यातही ‘विवेक’ आपली भूमिका बजावत असतो. व्यक्तिगत पातळीवर विचार करता नीती-अनीतीबाबतचे माझे विचार काय आहेत, ते तसे का आहेत, माझ्या राजकीय विचारांची बैठक काय आहे, फेसबुकवरचा माझ्या वावर कसा आहे, पर्यावरणाबाबत मी कितपत सजग आहे, माझे ‘कंझंप्शन पॅटर्न्स’ कसे आहेत, याही बाबतीत ‘विवेका’चे निकष लावता येऊ शकतात.</p><p style="text-align: justify;">मग हे निकष काय आहेत? तर ते उदाहरणागणिक वेगवेगळे आहेत, ‘परिस्थितीसापेक्ष तारतम्या’वर आधारित आहेत, पण एक प्रमुख निकष ‘वृत्ती कशी घडते आहे?’ हे तपासण्याचा आहे. या संदर्भात काही नेमके मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू. विवेकवादाच्या विशुद्ध रूपातील मांडणीपासून थोडं पुढे येत आपण वास्तवाच्या संदर्भात विवेकाचं स्वरूप काय असावं हा विचार करू. – </p><p style="text-align: justify;"></p><ul><li style="text-align: justify;">‘मिश्र आणि सूक्ष्म विचार’ करता येण्याची क्षमता हे विवेकाचं एक लक्षण आहे. ‘ईश्वर आहे’ असं म्हणणारा आस्तिक आणि ‘ईश्वर नाही’ असं म्हणणारा नास्तिक यात नास्तिक केवळ नास्तिक आहे म्हणून प्रागतिक, पुरोगामी ठरतो का? आस्तिक केवळ आस्तिक आहे म्हणून प्रतिगामी ठरतो का? तर नाही. अशा मूल्यमापनासाठी इतर बर्याच निकषांचा विचार करावा लागतो. हा विचार करता येणं, तशी वृत्ती घडणं हाच मुळात ‘विवेक’ आहे.</li><li style="text-align: justify;">ज्या विचार/कृतींबाबात विवेकी/अविवेकी या स्वरूपात निर्णय करता येत नाही तिथे निर्णय देण्याचा अट्टाहास टाळून त्या विचार/कृती अधिक वैचारिक स्पष्टतेसाठी/आकलनातील वाढीसाठी खुल्या ठेवणं ही विवेकी कृती आहे. </li><li style="text-align: justify;">श्रद्धेबाबत आपण एक लक्षात घेऊ की ‘श्रद्धा’ – अशी एक मनोभूमिका, मनोवस्था जिथे प्रश्न करणं शक्यच नसतं, जी मूल्यमापनाच्या पलीकडे आहे – ही मुळातलीच एक अडचण आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा भेद करण्याची व्यावहारिक पातळीवर आवश्यकता भासते हे खरं, पण मुळात या दोन्हीमध्ये फरक नाही. एखाद्या देवावर, विचारधारेवर, बाबावर, पोथीवर, ऐतिहासिक व्यक्तीवर श्रद्धा असणं आणि एखाद्या गोष्टीचा प्रभाव असणं, त्या गोष्टीविषयी कृतज्ञ असणं, त्या गोष्टीची परिणामकारकता जाणवणं यात फरक आहे. मुख्य मुद्दा चिकत्सेची दारं बंद करण्याचा आहेच. ‘श्रद्धा’, ‘निष्ठा’, ‘भक्ती’ यात प्रेमभावनेचाही आविष्कार होत असतो. हा संपूर्ण प्रदेश एका अबोध जाणिवेने झाकोळून गेलेला आहे. हे होणं अडचणीचं आहेच, परंतु मानवी वृत्तीची घडण लक्षात घेता ते मान्य केलं तरी ‘श्रद्धेचा विवेक’ काय असू शकेल? तर स्वतःला विचारलेले काही प्रश्न असू शकतील. उदा. - आपल्या श्रद्धेविषयी आपल्याला कुणी प्रश्न विचारले तर आपल्याला राग येतो की आपण शांतपणे चर्चा करू शकतो? आपल्या श्रद्धेसंदर्भात कुणी विनोद केला तर आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो का? विनोद आवडला नाही तरी विनोद करण्याला आपला आक्षेप नाही असं आपल्याला वाटतं का? आपण एखाद्या विषयावर चटकन मत देतो की तो विषय समोर आला की त्या विषयाबाबत आपण अभ्यास केला पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपण चिकित्सक विचार करू शकतो का? प्रत्येक विषयाला विविध बाजू असतात आणि विविध बाजूंनी विचार करता यायला हवा हे आपल्याला मान्य आहे का? आपल्या श्रद्धेचा आपल्याला मनःशांतीसाठी उपयोग होत असला तरी त्याचा दूरगामी परिणाम आपल्या चिकित्सक विचारपद्धतीवर (क्रिटिकल थिंकिंग) होतो आहे का? आपल्याला कोणकोणत्या ज्ञानशाखा माहिती आहेत? त्यातील काहींमध्ये आपल्याला रस वाटतो का? आपण नवीन काही शिकायला उत्सुक असतो का? श्रद्धा हे आपलं ‘औषध’ न राहता आपलं ‘मुख्य अन्न’ होतंय का? आपल्या वाचनात विज्ञानविषयक वाचनाचा अंतर्भाव असतो का? </li></ul><p style="text-align: justify;">मूल्यात्मक निर्णय देताना अधिकाधिक सूक्ष्म विचार करणं (वर म्हटल्याप्रमाणे निर्णय न द्यायचीही तयारी असणं), पुनर्मूल्यांकनाला तयार असणं आणि त्याचबरोबर वैचारिक/सामाजिक/राजकीय लढ्यात एक निश्चित भूमिका घेऊन उभंही राहणं अशी बहुस्तरीय वाटचाल विवेकाला सुरू ठेवावी लागते. </p><p style="text-align: justify;"><b>समारोप </b></p><p style="text-align: justify;">संकल्पनात्मक मांडणी, त्यातील वैविध्य आणि झगडे एका बाजूला सुरू राहतात आणि वास्तवात समाज त्याच्या एका आकलनाने, गतीने, सक्तीने त्याची वाट चालत असतो. याची सांधेजोड कशी करावी, आपल्या जगण्याचा पाया काय असावा, कोणत्या वैचारिक बैठकीवर आपल्या व्यवस्था उभ्या असाव्यात हे काही ‘मूळ प्रश्न’ आहेत. शिवाय माणूस, त्याचे मनोव्यापार, त्याचं समूहजीवन, त्यातील संघर्ष ही निरंतर प्रक्रिया असल्याने तो निरंतर अभ्यासाचा विषय आहे. प्रागतिक विचारदृष्टीने प्रेरित होणं गरजेचं आहेच, परंतु ‘हे तरी’ किंवा ‘ते तरी’ हा आधीच झालेला निर्णय, विचारदृष्टींना ‘कप्पेबंद’ करणं, हे संकल्पना आणि वास्तव - दोन्हीतले बारकावे समजून घेण्याच्या आड येऊ शकतं. विविध विचारदृष्टींमधील कालसुसंगत, समता-न्याय-स्वातंत्र्य या मूल्यांना पोषक असणाऱ्या नेमक्या विचारांच्या समावेशाने, माणूस समूहात राहत असताना निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांच्या तयारीने सुसज्ज अशी वैचारिक बैठक आपल्यासाठी योग्य ठरते. (समता-न्याय-स्वातंत्र्य यांच्या अर्थाविषयी आणि उपयोजनाविषयी वेगळी चर्चा होऊ शकेल. या मूल्यांचं सारभूत स्वरूप म्हणून 'शांततामय सहअस्तित्व' हा शब्द वापरता येईल.) यातून मग आपण विशिष्ट विचारदृष्टीने प्रेरित झालेलो असलो तरी त्या विचारदृष्टीने भारून जाण्याचा टप्पा ओलांडून विविध विचारदृष्टींच्या मूल्यमापनात, त्यांच्या परिणामांच्या अभ्यासात आपल्याला रस वाटू लागतो. विशिष्ट विचारदृष्टीच्या उपयोजनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांकडे, कलहांकडे आपलं लक्ष जाऊ लागतं आणि त्यातून आपण ‘वर्केबल मॉडेल’ तयार करण्याचा प्रयत्न करू लागतो. </p><p style="text-align: justify;">विवेकवादापुढचं आजचं आव्हान मोठं आहे. भारतासारख्या देशात, जिथे अद्याप वैज्ञानिक प्रवृत्ती (सायंटिफिक टेंपरामेंट) पुरेशा प्रमाणात घडलेलीच नाही, धर्म आणि ईश्वर या संकल्पना कातडीला चिकटून बसल्या आहेत तिथे तर हे आव्हान फारच मोठं आहे. विवेकाविषयी, विवेकी निर्णयप्रक्रियेविषयी सातत्याने बोलत राहणं, प्राप्त परिस्थितीत काय करता येईल याचा विचार एकत्र येऊन करत राहणं, कृतीकार्यक्रम आखणं याला पर्याय नाही. </p><p style="text-align: justify;">या एकूण चर्चेच्या संदर्भाने डॉ. नरेंद्र दाभोळकरांची आठवण होणं अपरिहार्य आहे. साध्या-सोप्या भाषेत लोकांशी जोडून घेत आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोचवण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. मुख्य म्हणजे त्यांनी उभं केलेलं संघटनात्मक काम खूप व्यापक आहे. त्यांची आणि कॉम्रेड पानसरे, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांची हत्या विवेकवादी चळवळीला मोठा धक्का होता. त्याचबरोबर या हत्यांनी, आजच्या सर्वव्यापी उन्मादाने आणि समाजातील एका मोठ्या वर्गाच्या सामाजिक परिवर्तनाबाबतच्या अनास्थेने, विवेकवादी चळवळीची पुढील रूपरेषा काय असावी हा विचार करायलाही भाग पाडलं आहे. ही आपल्यावरची मोठीच जबाबदारी आहे. </p><i>('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. - <a href="https://www.sudharak.in/2020/10/3870/">https://www.sudharak.in/2020/10/3870/</a>)</i>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-91916506209638215632020-10-29T01:05:00.003-07:002020-10-29T08:12:19.132-07:00बुद्धी, विवेक आणि वास्तव – २<p style="text-align: justify;">‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ ही या विशेषांकाची मध्यवर्ती कल्पना आहे. ‘बुद्धिप्रामाण्य’ या संज्ञेविषयी पहिल्या लेखात मे. पुं. रेगे यांच्या मांडणीच्या संदर्भाने आपण चर्चा केली. ‘बुद्धिप्रामाण्य’ या शब्दाऐवजी ‘विवेक’ हा शब्द मला अधिक योग्य वाटतो हे मी तिथे मांडलं आहे.</p><p style="text-align: justify;">समस्त सृष्टीमध्ये मानव, मानवेतर असंख्य सजीव आणि अर्थातच निर्जीव जग यांचा समावेश होतो. ‘बुद्धिप्रामाण्यवाद हा समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ या विधानाचा अर्थ ‘माणसाने बुद्धिप्रामाण्य स्वीकारणं समस्त सृष्टीसाठी हितकारक आहे’ असा अभिप्रेत आहे. (मानवासह मानवेतर सजीवांनीही बुद्धिप्रामाण्य स्वीकारावं असा एक दुसरा मजेशीर अर्थ या विधानातून निघू शकण्याची शक्यता आहे; पण तो अर्थ अर्थातच गैरलागू आहे.) ‘सृष्टीसाठी हितकारक काय आहे?’ असा जेव्हा आपण – म्हणजे माणसं – विचार करतो तेव्हा आपण एक रोचक प्रश्न विचारत असतो. ‘हित’, ‘हितकारक’ म्हणजे नक्की काय, हिताची व्याख्या व्यक्तिनिरपेक्ष आहे की विविध परिस्थितींमध्ये, विविध विचारदृष्टींनुसार ती विविध प्रकारे परिभाषित होते अशा तात्त्विक मुद्द्यांपासूनच या प्रश्नाचा वेध सुरू होऊ शकतो. शिवाय पहिल्या लेखातील ‘बुद्धिप्रामाण्य की विवेक’ हा संदर्भही इथे लागू होईल. माणसाने निसर्गात हस्तक्षेप करत स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केलं, त्यात निसर्गाचा ऱ्हास झाला आणि आज तर पर्यावरणीय संकटाने भीषण रूप धारण केलं आहे. माणसाने निसर्गातील हस्तक्षेपाची सुरुवात त्याच्या बुद्धीच्या बळावरच केली. पुढे त्याची गरज/हाव वाढल्यावर जे दुष्परिणाम झाले त्यावरही त्याने आपल्या बुद्धीच्या बळावर उपाय शोधले. माणसाचा हा बुद्धिप्रामाण्यवाद त्याच्या स्वतःसाठी हितकारक ठरला असेल, पण सृष्टीसाठी तो हितकारक ठरला की अहितकारक? सृष्टीपासून हळूहळू वेगळं होत तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःची प्रतिसृष्टी निर्माण करणार्या माणसाला ‘सृष्टी’विषयी काही बोलण्याचा मुळात अधिकार आहे का? की मग बुद्धिप्रामाण्यवादाचे चांगला आणि वाईट असे दोन प्रकार आहेत? असे काही प्रश्न इथे उपस्थित होतात.</p><p style="text-align: justify;">हे प्रश्न बाजूला ठेवले आणि वरील विधान ‘विवेकवाद हा समस्त मानवजातीसाठी हितकारक आहे’ असं बदललं तर ते पटण्यासारखं आहे. पण प्रत्यक्षात विवेकवाद किंवा एकूणच आधुनिक विचारपद्धती, मूल्यसंकल्पना व्यापक प्रमाणात प्रभावी ठरत नाही असं दिसतं. आज तर संकुचित राष्ट्रवाद, धार्मिकता यांचा प्रभाव वाढलेला दिसतो. याची कारणं तात्कालिक राजकीय विचारसरणी, माणसाला सतत प्रभावित करत राहणारं सांस्कृतिक राजकारण, अत्यंत विषम अशी सामजिक रचना, त्यातून जन्मणारी आणि आधुनिक विचारपद्धती आपल्या कक्षेत घेऊ शकणार नाही अशी माणसाची असहायता आणि माणसाच्या काही मूलभूत तर काही दृढ झालेल्या/केल्या गेलेल्या प्रेरणांमध्येही सापडू शकतात. </p><p style="text-align: justify;">आपला वैचारिक प्रवास काही मूल्यसंकल्पनांची निश्चिती करतो आणि त्यांना मार्गदर्शक मानून पुढे जाण्यात आपलं सर्वांचं हित आहे असं आपण मानतो. आदिम काळातील हिंसक, वर्चस्ववादी प्रेरणा मागे सारत आपण अधिक सहिष्णू, समावेशक झालो हे खरं असलं तरी वर्चस्व प्रस्थापित करण्याचे इतर अनेक, विशेषतः बाजारकेंद्री, मार्ग आपण शोधलेच. थेट शारीरिक हिंसेपेक्षा ‘अप्रत्यक्ष सामाजिक हिंसा’ होऊ लागली. गुलामीची प्रथा गेली तरी मानसिक गुलामगिरी राहिलीच. (जातिव्यवस्था सर्वात चिवट! सर्व काही पचवून विजयी मुद्रेने उभी आहे.) पण मूल्यसंकल्पना म्हणून काही तत्त्वांना, उदा. न्याय, सत्य, अहिंसा इ., आपण आज सामूहिक मान्यता दिली आहे. आता या संकल्पना सररास, सोयीनुसार वाकवल्या जातात हे आपण बघतोच. परंतु वर्चस्वासाठी, राजकीय-आर्थिक फायद्यासाठी या संकल्पनांना वाकवण्याबरोबरच आर्थिक-राजकीयदृष्ट्या बलवान नसणारेही स्थलकालसापेक्षतेने, दैनंदिन व्यवहारात, धोरणात्मक निर्णय म्हणूनही या संकल्पनांना वाकवत असतात. माणसाचं प्रत्यक्ष जगणं आणि संकल्पनात्मक जगणं यात कायमच तफावत राहते. संकल्पनांचं स्वतःत ‘परिपूर्ण’ असणं आणि वास्तवाचंदेखील स्वतःत ‘परिपूर्ण आणि अटळ’ असणं या झगड्यात माणूस जगत राहतो. वास्तवाला वेगळं वळण देण्यासाठी मूल्यसंकल्पनांना त्यांच्या ‘परिपूर्णतेपासून’, त्यांच्या विशुद्ध स्वरूपापासून किंचितही ढळू न देता वास्तवाचा मुकाबला करणं यासाठी असामान्य मनःशक्ती लागते आणि ती सर्वांच्या ठायी प्रकट होणं शक्य नसतं. त्यामुळे विशिष्ट संकल्पना ‘हितकारक’ आहेत असं म्हणताना ‘माणसाचं वास्तव’ विसरून चालत नाही. </p><p style="text-align: justify;">बुद्धिप्रामाण्य/विवेक, अनीश्वरवाद यांचा विचार माणसाच्या सामाजिक आणि आंतरिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवरच करावा लागेल. हजारो वर्षांच्या प्रवासानंतर, एकोणिसाव्या शतकापासून सुरू झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासानंतर, मोठ्या वैचारिक घुसळणीनंतरदेखील ‘ईश्वर’ ही संकल्पना प्रभावहीन होत नाही कारण माणसाने ईश्वर कल्पनेला त्याच्या नैतिक, सांस्कृतिक जगण्याचा भाग केलं आहे आणि सृष्टीच्या उत्पत्तीचं अन्य स्पष्टीकरण जनमानसात स्थान मिळवू शकलेलं नाही. अर्थात ईश्वरी रूपाच्या कल्पनेत फरक असू शकेल. काही आस्तिकांच्या मनात ईश्वरी अस्तित्वाचा अर्थ ‘एक देहधारी ईश्वर’ असा नसून ‘सृष्टी निर्माण करणार्या शक्ती’ असाही असू शकेल. कदाचित काहीजण ईश्वरी अस्तित्व मान्य करून मूर्तिपूजा नाकारत असतील. मागील लेखात म्हटल्याप्रमाणे हा एक स्पेक्ट्रम आहे आणि त्याच्या एका अंतिम टोकाला संपूर्ण जडवादी स्पष्टीकरण आहे. हे जडवादी स्पष्टीकरण स्वीकारणं बहुसंख्य माणसांना कठीण का जातं? एक मुख्य कारण म्हणजे बहुतांश समाज धर्म आणि ईश्वरभक्ती या ‘डिफॉल्ट सेटिंग’मध्येच वाढतो. त्याने धर्म आणि ईश्वरविरहित जग पाहिलेलंच नाही. दुसरं म्हणजे माणसाच्या वृत्ती ईश्वर आणि धर्म कल्पनांमुळे बदलत गेल्या आहेत. माणूस त्याच्या आंतरिक भाव-भावना, इच्छा, विचार आणि विकार यांना ईश्वराचा ‘शोध’ लागण्याआधी देत असलेला प्रतिसाद आणि ईश्वराचा शोध लागल्यानंतर देत असलेला प्रतिसाद यात फरक असणार आहे. या संदर्भात आपल्याला काही प्रश्न विचारता येतील. माणसात जेव्हा जाणीव ‘निर्माण’ झाली तेव्हा तिच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या? ‘कुणीतरी आहे ज्याने मला निर्माण केलं’ हा विचार तिच्यामध्ये अंतर्भूतच होता की तो एका कुठल्यातरी टप्प्यावर आला? जाणिवेत ‘दुःख’ कधी आलं? माणसाने एका टप्प्यावर ईश्वर शोधला असेल तर त्याने जोवर ईश्वर शोधला नव्हता तोवर तो आपल्या विविध भाव-भावनांचा सामना कसा करत असेल? मुळात ईश्वराचा शोध लागल्यानंतरच माणसाच्या मनात तोवर नसलेल्या काही भाव-भावनांनी जन्म घेतला का? इतर अनेक बाबतीत जसं एकदा ‘शोध लागल्यावर’ मागे फिरणं शक्य होत नाही तसं ईश्वराबाबत (माणूस त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या दुःखाची कारणं जड सृष्टीबाहेर शोधू लागल्यावर) घडलं का? हे सगळे प्रश्न मानवप्राण्याच्या एका अचंबित करणार्या भल्यामोठ्या वाटचालीवर पसरलेले आहेत. कदाचित यांपैकी काहींची उत्तरं शोधली गेली असतील, काहींचा शोध सुरू असेल. हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण असं की माणसाची जाणीव एका गुंतागुंतीच्या प्रवासातून निर्माण झाली आहे हे लक्षात यावं. आपण ‘बायनरी’ भूमिका घेऊच शकतो, पण जाणीव सदासर्वदा ‘बायनरी’त काम करत नाही. तिचं स्वरूप प्रवाही आहे. त्यातून सृष्टीचा पसारा इतके अनंत प्रश्न निर्माण करतो की जडवादी स्पष्टीकरण मान्य करणं बहुतेकांना अवघड वाटतं.</p><p style="text-align: justify;">या चर्चेतला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईश्वरी संकल्पना ही एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हीच आपली गती आहे हे मनुष्य मान्य करतो कारण हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं (किमान असा दावा तरी केला जातो. एक मात्र खरं की ‘शांत होण्याची’, बाह्य व आंतरिक खळबळीचा/स्ट्रेसचा परिणाम म्हणून व त्यावर उपाय म्हणून काही मार्गांचा अवलंब करण्याची गरज नास्तिकांनादेखील भासते. हा एक कळीचा मुद्दा आहे. प्रश्न ईश्वराचा नाही, मनाचा आहे!). आधुनिक विज्ञानाने आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली, अनेक रहस्यं उलगडली. खरं तर ‘विज्ञान’ हा काही ‘नवीन शोध’ नव्हेच. अस्तित्वाच्या वाटचालीत माणसाबरोबर विज्ञान होतंच. मात्र गेल्या दोन-तीन शतकांमध्ये वैज्ञानिक विचारपद्धतीला चांगला आकार आला. आधी गूढतेच्या कक्षेत असणारे अनेक मुद्दे विज्ञानाने स्पष्टीकरणाच्या कक्षेत आणले. याची दुसरी बाजू अशी की हे होण्याआधी हजारो वर्षं आणि विज्ञानाचा प्रभाव वाढल्यावरदेखील माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र यांनी झाली आहे. ‘गोष्टीचं’, ‘नाट्यमयतेचं’ माणसाला असणारं आकर्षण हा एक संशोधनाचाच विषय आहे. (माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या आदिम प्रवासात तर उपयोग झालाच, पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या ‘सेपियन्स’मधील विवेचन वाचण्यासारखं आहे.) ईश्वराची कल्पना, तिची रूपं, या कल्पनेभोवती उभ्या राहिलेल्या कथा माणसाच्या मनाला भुलवतात. माणसाच्या विविध कलात्मक आविष्कारांमध्ये ईश्वराच्या कल्पनेचं प्रतिबिंब सातत्याने पडलेलं दिसतं. अनेकदा तर ईश्वरभक्ती हीच कलात्मक निर्मितीची प्रेरणादेखील ठरते. माणसाच्या चिंतनात स्थान मिळवण्यापेक्षाही ईश्वराने माणसाच्या रंजनात स्थान मिळवल्याने त्याला सहजासहजी निवृत्त करता येत नाही. (बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ‘हू वेअर द शूद्राज?’ या ग्रंथातील ‘द रिडल ऑफ द शूद्राज’ या पहिल्या प्रकरणात ऋग्वेदातील पुरुषसूक्ताचा सविस्तर परामर्श घेतला आहे. पुरुषसूक्त म्हणजे विश्वोत्पत्तीसंबंधीचा एक सिद्धांत आहे. याबाबत आंबेडकरांनी एक टिप्पणी केली आहे – Cosmogonies have never been more than matters of academic interest and have served no other purpose than to satisfy the curiosity of the student and to help to amuse children. विश्वोत्पत्तीबाबतचे जगातील प्राचीन ग्रंथांमधील/धर्मग्रंथातील सिद्धांत ‘अम्यूझमेंट’ – ‘रंजन’ या श्रेणीत नक्कीच मोडतील. पण ‘बिग बँग थिअरी’सारखा संशोधनावर आधारित वैज्ञानिक सिद्धांत या श्रेणीत जाऊ शकणार नाही. आंबडेकरांनाही तसं अभिप्रेत नसावं. मुद्दा असा की कार्यकारणभावाऐवजी ‘रंजन’ हे केवळ मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही उपयोगी ठरतं. समाजव्यवस्था लावण्याच्या संदर्भात, ईश्वरविषयक, नीतीविषयक कल्पना दृढ करण्याच्या संदर्भात प्रौढांकडेदेखील बालक म्हणूनच पाहिलं जातं.)</p><p style="text-align: justify;">अनीश्वरवादासमोरील आव्हान मोठं का आहे हे या काही मुद्द्यांवरून लक्षात यावं. वास्तविक ईश्वरविषयक कल्पना, श्रद्धा, धर्मश्रद्धा यांचं विपर्यस्त स्वरूप आपल्याला आजूबाजूला दिसत असतं. माणसाच्या मनोविकासात त्याचा अडथळा होतो आहे, चिकित्सक वृत्तीची, विवेकाची पिछेहाट होते आहे हेही आपण पाहतो. या पार्श्वभूमीवर आणि तात्त्विक कारणामुळेही ईश्वर, धर्म या संकल्पनांवर प्रश्न उपस्थित करणं, त्या नाकारणं स्वाभाविक आहे. मात्र नकाराच्या पुढे जाऊन ‘जे काहींना दिसतं आहे ते इतर बहुसंख्यांना का दिसत नाही?’ ‘ईश्वर, धर्म यांचं माणसाच्या मनोव्यापारातील ‘फंक्शन’ काय आहे?’ ‘धार्मिक आणि ईश्वरी ‘डाएट’वरच जर माणसं वाढत असतील तर एक वेगळं डाएट चांगलं आहे हे पटवून देण्यासाठी काय करावं लागेल?’ हे प्रश्न विचारणंही गरजेचं आहे. या संदर्भात एक मुद्दा मांडावासा वाटतो. ‘राजकारण’ हा शब्द ऐकला की आपल्या मनात एकदम नकारात्मक भावना उत्पन्न होते. स्वार्थ, सत्तास्पर्धा, त्याकरता विधिनिषेधशून्य मार्गांचा वापर हे सत्तेच्या राजकारणाचं स्वरूप डोळ्यासमोर येत असल्याने असं होतं. पण ‘राजकारण’ ही एक व्यापक संज्ञा आहे आणि ‘सत्ता व्यवहार’ या दृष्टीने पाहता आपल्या घरात, नातेसंबंधांतदेखील राजकारण असतं हे आपल्याला मान्य होईल. आपण – मानव समूह म्हणून – राजकरणापासून मुक्त असू शकत नाही. ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. या संकल्पनांचा पुरेपूर वापर करून समाजमानस पुरेसं कमकुवत केलं गेलं आहे. चिकित्सेचा अवकाश कमी कमी होत गेला आहे. असं असताना जडवादाचं ‘व्यापक राजकारण’ कसं असावं हा विचार केल्याखेरीज निव्वळ नकाराने काही साध्य होईल असं दिसत नाही. ज्यांना ‘काही अधिक समजलं आहे’ त्यांनी हे अधिकचं ज्ञान समूहात सार्वत्रिक करण्याचे कल्पक मार्ग शोधल्याशिवाय ते ज्ञान, ती विचारदृष्टी विशिष्ट लोकांपुरतीच सीमित राहते.</p><p style="text-align: justify;">‘जडवाद’ या आपल्या छोट्या पुस्तकाच्या प्रास्ताविकात लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी म्हटलं आहे – </p><blockquote style="border: none; margin: 0px 0px 0px 40px; padding: 0px;"><p style="text-align: justify;"><i>अनीश्वरवादाला ‘जडवादा’वाचून मुळीच महत्त्व नाही. एकाच वादाच्या जडवाद व अनीश्वरवाद या दोन बाजू आहेत. जडवाद ही विधायक (पॉझिटिव्ह) बाजू असून अनीश्वरवाद ही अभावात्मक (निगेटिव्ह) बाजू आहे. जडवादाची विधायक विचारसरणी बरोबर व निश्चित लक्षात घेतली म्हणजे त्यातून अनीश्वरवाद आपोआप सिद्ध होतो. जडवादाची किंवा विज्ञानाची बौद्धिक भूमिका ज्याच्या नीट लक्षात येईल, त्याच्या बुद्धीत ईश्वराला भूमी मिळूच शकत नाही. मिळाल्यास ती एक बाकीच्या व्यवस्थित विचारसरणीशी विसंगत असलेली व परंपरागत श्रद्धेने राखून ठेवलेली कल्पना होय, असेच म्हणावे लागेल.</i></p></blockquote><p style="text-align: justify;">वरील उद्धृतामधील ‘विधायक बाजू’ आणि ‘अभावात्मक बाजू’ या संज्ञा लक्षात घेण्यासारख्या आहेत. ‘ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हा दावा असणार्यांनी आपला दावा सिद्ध करावा असं म्हटलं की त्यावर विविध प्रकारे उत्तरं येतात. ‘हवा दिसत नाही, पण ती असतेच. त्यासाठीही तुम्ही पुरावा मागणार का’ वगैरे ठरलेले प्रतिप्रश्न येतात. यातून वितंडवाद सुरू होतो. जडवादाची सविस्तर मांडणी – विधायक बाजू – बाजूला पडते. इथे आपल्या असं लक्षात येईल की ‘धारणांशी सामना’ म्हणजे ‘मनुष्याशी सामना’ असतो आणि मनुष्य हे सलग, एकरेषीय असं घटित नाही. विविध धारणांचा, त्यांच्या रचनेचा विचार करताना, त्यांना भिडताना ‘धोरणात्मक दृष्टी’ (राजकीय दृष्टी) महत्त्वाची ठरते. या दृष्टीने पाहता ईश्वराच्या रोमांचकारक कल्पनेला आव्हान देताना जडवादी मांडणी पहिल्या टप्प्यावर तरी रंजक-रोमांचक, कथात्म पद्धतीने प्रस्तुत करता येईल का, सृष्टीच्या उत्पत्तीमागील रहस्य उलगडणे याबरोबरच माणसाच्या अशांत, अस्थिर अंतर्मनाला आधार देण्यासाठी काय करता येईल यावर मंथन होणं आवश्यक आहे.</p><p style="text-align: justify;">अखेरीस या संदर्भाने काही मुद्दे मांडावेसे वाटतात.</p><p></p><ul style="text-align: left;"><li style="text-align: justify;">‘प्रबोधन’ हा शब्द न वापरता प्रबोधन करता येईल का हा शोध घ्यायची आज गरज आहे. ‘आपल्याला कुणीतरी शिकवायला आलं आहे’ ही भावना बहुसंख्यकांना निरुत्साही करणारी असते. विशेषतः माणसाच्या मुळातल्या अस्थिर मनोवृत्तींवर आज माहितीच्या स्फोटाने, समाजमाध्यमांनी, धार्मिक-राष्ट्रवादी उन्मादाने जे परिणाम केले आहेत त्याचे बरेच आयाम आहेत. अस्थिरतेत भर घालण्याबरोबरच स्वतःविषयीचा अस्थानी आत्मविश्वास वाढणे, स्वप्रतिमेत आणि समोर आलेल्या आयत्या माहितीत गुंग होणे हाही एक आयाम आहे. या पार्श्वभूमीवर आपण ज्या भाषेत संवाद साधू पाहतो ती समोरच्याला आपल्यापासून दूर लोटते आहे का हे पाहणं आवश्यक ठरतं. ‘नवा माणूस निर्माण करणं’ या उद्दिष्टाआधीचं उद्दिष्ट ‘माणूस जोडणं’ हे असायला हवं. </li><li style="text-align: justify;">देव-धर्म-श्रद्धा याबाबतची बहुसंख्य समाजाची संवेदनशीलता लक्षात घेता ‘नकारा’ची दृष्टी न ठेवता ‘धर्माचा विवेक’, ‘श्रद्धेचा विवेक’ अशासारख्या शीर्षकांनी आपली मांडणी करता येऊ शकेल. (‘विवेक’ केंद्रस्थानी ठेवून ही मालिका पुढे राजकीय विवेक, भौतिक विकासाचा विवेक अशी पुढे जाऊ शकते.)</li><li style="text-align: justify;">वैज्ञानिक विचार, परिवर्तनाचा विचार हे ‘काहीतरी वेगळं आहे’ म्हणून मुख्य धारेतील सांस्कृतिक विश्वापासून दूर राहिलेलं आहे. त्यांना लोकांच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग बनवण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक विषयांवर आधारलेली, चिकित्सेचा विचार झिरपवणारी काही छोटी ‘मोड्यूल्स’ तयार करून ती विविध सांस्कृतिक माध्यमांतून प्रसारित करता येतील का यावर विचार होऊ शकतो.</li><li style="text-align: justify;">सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत सांगीतिक कार्यक्रम, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, गप्पांचे कार्यक्रम, एकपात्री प्रयोग, स्टँड-अप कॉमेडी या आणि इतर फॉर्मेट्सचा वापर उत्क्रांती, मानसशास्त्र, मेंदूविज्ञान, इहवाद यांची ओळख करून देण्यासाठी कसा होऊ शकेल हा विचार करता येईल. उदा. आपल्या विचार-विकारांच्या मुळाशी मेंदूत स्रवणारे हॉर्मोन्स असतात. या हॉर्मोन्सना व्यक्तिरूप देऊन एखादी एकांकिका बसवता येऊ शकेल का? ‘माणूस दोन पायावर चालू लागला’ किंवा ‘माणूस बोलू लागला’ याची गोष्ट नाट्यरूपात सादर होऊ शकेल का? इ. </li><li style="text-align: justify;">प्रागतिक विचारांना धरून उभ्या राहिलेल्या मूल्यसंकल्पना त्यांच्या मूळ स्वरूपाच्या पातळीवर परिस्थितीनिरपेक्ष, ‘वास्तव’निरपेक्ष असल्या तरी सामाजिक वास्तवाच्या संदर्भात जेव्हा त्या उभ्या राहतात तेव्हा वास्तवाच्या शक्तींपुढे त्या निष्प्रभ ठरू शकतात. समाजाचा एकूण जीवनविकास कमालीचा असमान असताना मूल्यसंकल्पनांचा विकास समान व्हावा ही अपेक्षा गैरलागू ठरते; खरं तर असंवेदनशीलही ठरते. आर्थिक असुरक्षिततेचा सामना करणारे असंघटित क्षेत्रातील असंख्य कामगार, जातीय शोषणाचा आजही बळी ठरणारे हजारो दलित, जिवाचीदेखील सुरक्षितता मिळत नाही अश्या परिस्थितीत काम करणारे भारतातील सफाई कामगार या आणि अशा अनेक समाजघटकांच्या संदर्भात विवेक, नास्तिक्य किंवा इतर संकल्पना कोणत्या स्वरूपात उभ्या राहतील? या मोठ्या वर्गाच्या दृष्टीने ‘विवेकी विचार’ म्हणजे काय असेल? प्रबोधनाची चळवळ समाजातील या मोठ्या वर्गासंदर्भात ‘विवेक’ या संकल्पनेचा विचार कशी करते? हे प्रश्न टाळता येणारे नाहीत.</li><li style="text-align: justify;">समाजाचं होत आलेलं ‘वर्गीकरण’ लक्षात घेता आपली विचारदृष्टी/मांडणी विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट प्रश्नांना कवेत घेऊ शकते का? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. त्या दृष्टीने पाहता विवेकवादी चळवळीबरोबरच सामाजिक न्यायाचे, मानवी प्रतिष्ठेसाठीचे लढेही अग्रक्रमावर येतात आणि विवेकवादी चळवळीचा त्यांच्याशी समन्वय साधला जातो आहे का, धोरणात्मक देवाण-घेवाण होते आहे का, हे तपासत राहणं आवश्यक ठरतं.</li></ul><div style="text-align: justify;"><i>('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. - <a href="https://www.sudharak.in/2020/10/3812/">https://www.sudharak.in/2020/10/3812/</a>)</i></div><p></p><div></div>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-17282317099103736552020-10-29T00:54:00.005-07:002020-10-29T08:12:38.766-07:00बुद्धी, विवेक आणि वास्तव - १ <p style="text-align: justify;"><span lang="MR" style="text-align: justify;"><span style="text-align: left;"><span style="font-family: inherit;">आपण 'कुणापासून' तरी निर्माण झालो, आपण आहोत त्याअर्थी आपल्याला आपल्याला आई-वडील आहेत हे सरळ आहे हे गृहीत धरणं जीव उत्पत्तीच्या सध्याच्या प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर योग्यच आहे. बहुतांश सजीव जन्माला यायला आई-वडील लागतात त्याचप्रमाणे माणूस आणि इतर सजीव पृथ्वीवर यायलादेखील कुणीतरी लागत असणार - अन्यथा आपण कुठून आलो याचं उत्तरच सापडत नाही - हा विचार 'या सृष्टीचा निर्माता कुणीतरी असणार' या दृढ झालेल्या धारणेमागे होता/आहे. आपले आई-वडील कोण हे निश्चित करता येतं, त्यांना समोर दाखवता येतं. (अर्थात आई-वडील ही निश्चिती, विशेषतः 'वडील' ही निश्चिती, एका टप्प्यावर करता येऊ लागली). सृष्टी निर्मात्याबाबत हे शक्य नाही. परंतु ती धारणा अत्यंत बळकट झाली असल्याने 'निर्माता दिसला नाही तरी आहे' याबाबत बहुसंख्यांच्या मनात संदेह नसतो. याशिवाय सृष्टी निर्मात्याबरोबर त्याचे 'पदाधिकारी'देखील आहेत. पुराणकथांमधून आपण हे वाचलेलं असतं. उदा. भारतीय परंपरेतील पर्जन्याचा देव वरूण, ग्रीक पुराणातील प्रेमाची देवता अॅफ्रोडाइट आणि असे अनेक. माणसाचा मूळ ईश्वर विचार आणि त्याचा होत गेलेला विकास हा एक दीर्घ आणि गुंतागुंतीचा प्रवास आहे. त्याला समांतर असा निरीश्वरवादाचादेखील प्रवास आहे. खरं म्हणजे ईश्वर देहरूपात अस्तित्वात आहे या एका टोकापासून ईश्वर कुठल्याच रूपात अस्तित्वात नाही या दुसऱ्या टोकापर्यंतचा एक स्पेक्ट्रम आहे असं आपल्या लक्षात येईल. या पूर्ण स्पेक्ट्रमभर ईश्वरी अस्तित्वाविषयीचे विविध दृष्टीकोन, श्रद्धा, विश्वास विसावलेले आहेत. भारतीय दर्शन परंपरेत 'आस्तिक' म्हणजे वेदप्रामाण्य मानणारी दर्शने आणि 'नास्तिक' म्हणजे वेदप्रामाण्य न मानणारी दर्शने अशी विभागणी आहे. या अर्थाने चार्वाक, जैन व बौद्ध ही तीन दर्शने नास्तिक ठरतात आणि न्याय, वैशेषिक, सांख्य, योग्, पूर्वमीमांसा (मीमांसा) आणि उत्तरमीमांसा (वेदांत) ही आस्तिक ठरतात. आस्तिकांपैकी सांख्य आणि पूर्वमीमांसा ईश्वराचं अस्तित्व नाकारतात. पण ते वेदप्रामाण्य मानत असल्याने आस्तिक ठरतात. आस्तिक याचा आजचा रूढ अर्थ - सृष्टीचा निर्माता कुणीएक आहे आणि तो ईश्वर आहे - लक्षात घेता चार्वाक, जैन, बौद्ध, सांख्य आणि पूर्वमीमांसा ही दर्शने पूर्णपणे नास्तिक ठरतात. याशिवाय प्राचीन वैदिक वाङ्मयातदेखील इहलोकवादी विचारांचं अस्तित्व जाणवतं असं स. रा. गाडगीळांसारख्या अभ्यासकांनी नमूद केलं आहे. युरोपातील 'रिनेसाँ' (पंधरावे व सोळावे शतक) आणि 'एज ऑफ रीझन' (सतरावे व अठरावे शतक) या कालखंडात नास्तिकतेची बीजं दिसतात. आस्तिक-नास्तिक मत, ईश्वर सृष्टीनिर्माता आहे (क्रिएशनिझम) - सजीव उत्क्रांत होत गेले आहेत (इव्होल्यूशन) याबद्दल सातत्याने चर्चा होत असते. जडवाद वि. चैतन्यवाद म्हणून ओळखला जाणारा हा संघर्ष शतकानुशतकं जगभर चालूच आहे. त्यावर लिखित स्वरूपात पुष्कळ साहित्य उपलब्ध आहे. त्याचं परिशीलन आपल्याला अनेकविध बारकाव्यांची ओळख करून देऊ शकेल. </span></span></span></p><p style="text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR" style="text-align: justify;">ईश्वरी अस्तित्वावर प्रश्न उपस्थित
करणारा आणि जीवसृष्टीच्या</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">निर्मितीची
प्रक्रिया संशोधनाद्वारे मांडणारा डार्विनचा सिद्धांत ईश्वराविषयीच्या चर्चेला
ऐतिहासिक वळण देणारा ठरला. तोही पुढे विकसित होत गेला आहेच. उत्क्रांती ही </span><span style="text-align: justify;">'</span><span lang="MR" style="text-align: justify;">वस्तुस्थिती</span><span style="text-align: justify;">' </span><span lang="MR" style="text-align: justify;">आहे की </span><span style="text-align: justify;">'</span><span lang="MR" style="text-align: justify;">सिद्धांत</span><span style="text-align: justify;">' </span><span lang="MR" style="text-align: justify;">आहे यावरही</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">चर्चा सुरू असते.
परंतु उत्क्रांतीची दिशा माणसाला गवसलेली</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">एक क्रांतीकारक दिशा आहे यात संशयच नाही. आपल्या</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">अस्तित्वाभोवती
साचलेल्या</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">गूढतेला
छेद देणारी</span><span style="text-align: justify;">, </span><span lang="MR" style="text-align: justify;">जीवशास्त्रीय</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">संशोधनात मौलिक भर
घालणारी</span><span style="text-align: justify;">, </span><span lang="MR" style="text-align: justify;">या
संशोधनाला</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">गती
देणारी</span><span style="text-align: justify;">, </span><span lang="MR" style="text-align: justify;">वेगळी
दिशा देणारी आणि माणसाला आश्वस्त करणारी ही दिशा आहे. (</span><span style="text-align: justify;">'</span><span lang="MR" style="text-align: justify;">आजचा सुधारक</span><span style="text-align: justify;">'</span><span lang="MR" style="text-align: justify;">ने</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">ऑगस्ट २००९ मध्ये काढलेला</span><span style="text-align: justify;"> '</span><span lang="MR" style="text-align: justify;">डार्विन विशेषांक</span><span style="text-align: justify;">' </span><span lang="MR" style="text-align: justify;">आणि पुढे त्याला </span><span style="text-align: justify;">'</span><span lang="MR" style="text-align: justify;">डार्विन आणि
जीवसृष्टीचे</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">रहस्य</span><span style="text-align: justify;">' </span><span lang="MR" style="text-align: justify;">हे मनोविकास
प्रकाशनाने दिलेलं</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">पुस्तकरूप
मराठीतील एक मौलिक दस्तावेज आहे.) उत्क्रांतीचा</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">समावेश औपचारिक शिक्षणात करण्यात आला असला तरी अजून आपल्या
सांस्कृतिक जीवनावर</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">त्याचा
काहीही प्रभाव नसल्याने</span><span style="text-align: justify;">, </span><span lang="MR" style="text-align: justify;">आपल्या
विचारविश्वात</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">उत्क्रांतीची
बैठक अद्याप तयार न झाल्याने सामूहिक</span><span style="text-align: justify;"> </span><span lang="MR" style="text-align: justify;">जाणिवेत उत्क्रांतीचं स्थान अद्याप पक्कं झालेलं नाही. ते होणं
गरजेचं आहे - उत्क्रांती हा दुर्लाघ्य श्रद्धेचा विषय न होता!</span><span lang="MR" style="text-align: justify;"> </span><span style="text-align: justify;"> </span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">या प्रास्ताविकानंतर आपण या विशेषांकाचा
आणि प्रस्तुत लेखाचा विषय असलेल्या </span>'<span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य</span>'
<span lang="MR">या संकल्पनेकडे</span> <span lang="MR">वळू. </span>'<span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवाद</span>' <span lang="MR">या संकल्पनेविषयी</span> <span lang="MR">मे. पुं. रेगे</span> <span lang="MR">यांनी अत्यंत उद्बोधक
विवेचन केलं आहे. त्यांच्या एका अवतरणानेच चर्चेचा
प्रारंभ करू. अवतरण बरंच मोठं आहे</span>,<span lang="MR"> पण महत्त्वाचं असल्याने जसंच्या तसं देत आहे. -</span> </span></p><blockquote style="border: none; margin: 0px 0px 0px 40px; padding: 0px;"><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><i><span style="font-family: inherit;"><a name="_Hlk50468037"><span lang="MR">बुद्धि</span></a><span lang="MR">प्रामाण्यवादाचे
जे एक स्पष्टीकरण अनेकदा देण्यात येते ते असे की</span>, '<span lang="MR">आपल्या बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून पटते</span>, <span lang="MR">ते आणि तेच सत्य
किंवा योग्य म्हणून स्वीकारावे</span>; <span lang="MR">आपल्या बुद्धीला जे
सत्य किंवा योग्य म्हणून पटलेले नसते त्याचा जरी कुणीही
आदेश किंवा उपदेश केलेला असला</span>,
<span lang="MR">एखाद्या धर्मग्रंथात किंवा एखाद्या
प्रेषिताने ते सत्य आहे किंवा योग्य
आहे असे जरी घोषित केलेले असले</span>,
<span lang="MR">तरी त्याचा स्वीकार करू नये</span>, <span lang="MR">अशा
रीतीने वागणे म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी असणे.</span>'</span></i></p></blockquote><blockquote style="border: none; margin: 0px 0px 0px 40px; padding: 0px; text-align: left;"><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><i><span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवादाच्या
या व्याख्येत असे अभिप्रेत आहे की</span></i><i>,
</i><i><span lang="MR">बुद्धी अशी एक विशिष्ट</span></i><i>, </i><i><span lang="MR">ओळखता
येण्याजोगी मनःशक्ती आहे आणि तिला कित्येक गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत असे दिसून येते. ज्या गोष्टी तिला सत्य
किंवा योग्य म्हणून दिसून येतात किंवा आलेल्या
असतात</span></i><i>, </i><i><span lang="MR">तेवढ्याच
सत्य किंवा योग्य म्हणून जो स्वीकारतो तो बु द्धिप्रामाण्यवादी
असतो. बुद्धिप्रामाण्यवादाच्या या मांडणीवर दोन आक्षेप घेता येतील. बुद्धी अशी एक विशिष्ट शक्ती आहे आणि ती
काहीतरी करते किंवा तिच्या द्वारा</span></i><i>,
</i><i><span lang="MR">तिच्या माध्यमातून काहीतरी घडते असे मानायला आधार नाही. माणसे वस्तू
उचलतात त्या सामान्यपणे आपल्या हातांचा
उपयोग करून उचलतात. पण अपवादभूत प्रसंगी आपल्या पायांचा
किंवा कोपरांचा उपयोग करूनही माणसे वस्तू उचलू शकतात. तेव्हा </span></i><i>'</i><i><span lang="MR">ही वस्तू कुणी उचलली असेल</span></i><i>?' </i><i><span lang="MR">या प्रश्नाचा
सामान्यपणे अभिप्रेत असलेला अर्थ </span></i><i>'</i><i><span lang="MR">ही वस्तू कुणाच्या हातांनी
येथून उचलली गेली असेल</span></i><i>?' </i><i><span lang="MR">असा असतो. गुप्त पोलीस या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी त्या वस्तूवर बोटांचे ठसे
न्याहाळीत बसतात हे सर्वाना माहीत आहेच. अर्थात
चाणाक्ष गुप्त पोलीस ती वस्तू पायांनी किंवा कोपरांनी उचलता येण्याजोगी असली</span></i><i>, </i><i><span lang="MR">तर
त्या प्रकारेही ती उचलली गेली असण्याची शक्यता ध्यानात बाळगतो.</span></i></span></p><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><i style="font-family: inherit;"><span lang="MR">आता</span></i><i style="font-family: inherit;">, </i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">याच न्यायाने
आपल्याला असे म्हणावे लागेल की</span></i><i style="font-family: inherit;">,
</i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">वस्तू ज्याप्रमाणे माणसे <span style="mso-tab-count: 1;"> </span>उचलतात त्याप्रमाणे गोष्टी सत्य किंवा योग्य आहेत
हे माणसांना पटते. आणि माणसे <span style="mso-tab-count: 1;"> </span>वस्तू उचलतात</span></i><i style="font-family: inherit;">, </i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">ती
ज्याप्रमाणे सामान्यपणे आपल्या हातांचा उपयोग करून उचलतात</span></i><i style="font-family: inherit;">, </i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">त्याप्रमाणे ज्या
गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून माणसांना पटलेल्या असतात</span></i><i style="font-family: inherit;">, </i><i><span lang="MR"><span style="font-family: inherit;">त्या
</span><span style="font-family: inherit;"> </span><span style="font-family: inherit;">सामान्यपणे (किंवा अनेकदा किंवा कित्येकदा) </span></span></i><i>आपल्या </i><i><span lang="MR"><span style="font-family: inherit;">बुद्धीचा त्यांनी वापर केल्यामुळे </span><span style="font-family: inherit;"> </span><span style="font-family: inherit;">सत्य
किंवा योग्य म्हणून त्यांना दिसलेल्या असतात. पण अपवादभूत प्रसंगी (किंवा कित्येकदा किंवा अन्य प्रसंगी) दुसऱ्या एखाद्या
मनःशक्तीचा वापर केल्याने त्यांना त्या सत्य
किंवा योग्य म्हणून दिसलेल्या असतात. आता बुद्धिप्रामाण्यवादी तो</span></span></i><i style="font-family: inherit;">, </i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">की
जो बुद्धीला दिसलेल्या गोष्टीच सत्य
किंवा योग्य म्हणून स्वीकारतो</span></i><i style="font-family: inherit;">, </i><i style="font-family: inherit;"><span lang="MR">अन्य
शक्तींचा वापर केल्याने दिसलेल्या
गोष्टी सत्य किंवा योग्य म्हणून स्वीकारत नाही.</span></i></p><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><i><span lang="MR">आता</span></i><i>, </i><i><span lang="MR">ही वस्तू ह्या
माणसाने उचलली असेल तर ती त्याने कशी उचलली</span></i><i>,
</i><i><span lang="MR">आपल्या हातांचा उपयोग करून</span></i><i>,
</i><i><span lang="MR">की कोपरांचा की पायांचा</span></i><i>? </i><i><span lang="MR">ह्या प्रश्नाचा
निर्णय करता येतो. पण ह्या माणसाला ही
गोष्ट सत्य म्हणून दिसून आली किंवा जाणवली</span></i><i>,
</i><i><span lang="MR">ती त्याने बुद्धीचा वापर केल्यामुळे जाणवली की अन्य कोणत्यातरी
शक्तीचा वापर केल्याने जाणवली</span></i><i>,
</i><i><span lang="MR">ह्या <span style="mso-tab-count: 1;"> </span>प्रश्नाचा
निर्णय करण्याचा मार्ग कोणता</span></i><i>?
</i><i><span lang="MR">आपण आपले व इतरांचे हात ओळखू शकतो आणि एखाद्या प्रसंगी ते वापरले जात आहेत की
नाहीत हे निरीक्षणाने ठरवू शकतो. आता
ह्या प्रकारे बुद्धी अशी आपली एक विशिष्ट शक्ती आपण ओळखू शकत नाही आणि एखाद्या प्रसंगी ह्या शक्तीचा वापर करण्यात
येत आहे की नाही हे निरीक्षणाने ठरवू शकत
नाही. तेव्हा</span></i><i>, '</i><i><span lang="MR">आपल्या
बुद्धीला जे सत्य म्हणून दिसते</span></i><i>,
</i><i><span lang="MR">तेवढेच स्वीकारणे योग्य असते</span></i><i>' </i><i><span lang="MR">असे घोषवाक्य
उच्चारणे सोयीचे असले</span></i><i>, </i><i><span lang="MR">तरी त्याला अनुसरून वर्तन करायचे <span style="mso-tab-count: 1;"> </span>झाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करावा लागेल.</span></i></span></p><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><i><span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवादाच्या
वरील मांडणीवर घेता येण्याजोगा दुसरा आक्षेप असा</span></i><i>; </i><i><span lang="MR">बुद्धीला जे सत्य किंवा योग्य म्हणून आकलन झाले असेल तेवढेच
स्वीकारा ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत असेल
की </span></i><i>'</i><i><span lang="MR">बुद्धीशिवाय
इतरही मनःशक्ती आहेत</span></i><i>, </i><i><span lang="MR">पण त्यांच्यातील कुणाला जे सत्य
किंवा योग्य म्हणून दिसून आले असेल ते स्वीकारणे योग्य नाही</span></i><i>; </i><i><span lang="MR">फक्त बुद्धीलाच जे आकलन झालेले असते तेवढेच स्वीकारणे योग्य
होय.</span></i><i>' </i><i><span lang="MR">मग
बुद्धीच्या बाबतीत आपण असा पक्षपात का
करतो हा प्रश्न उपस्थित होईल आणि </span></i><i>'</i><i><span lang="MR">हा पक्षपात करणे योग्य आहे</span></i><i>, </i><i> </i><i><span lang="MR">किंबहुना
हा पक्षपातच नाही</span></i><i>, </i><i><span lang="MR">कारण
फक्त बुद्धीलाच वास्तव सत्य काय आहे ह्याचे आकलन
होऊ शकते</span></i><i>, </i><i><span lang="MR">इतर
शक्तींना होऊ शकत नाही</span></i><i>', </i><i><span lang="MR">असे त्याचे उत्तर असेल</span></i><i>,
</i><i><span lang="MR">तर हे आपल्याला
कसे समजले हा पुढील प्रश्न आपल्यापुढे उभा राहील. आणि हे आपल्या बुद्धीला समजते असे त्याचे उत्तर देऊन भागणार
नाही</span></i><i>; </i><i><span lang="MR">कारण
ते वर्तुळात्मक ठरेल. इतर शक्तींच्या
बाजूनेही असाच दावा करता येईल. बुद्धिप्रामाण्यवाद हा अनेक पंथांमधील एक पंथ ठरेल. बुद्धिप्रामाण्यवादाप्रमाणे
कल्पनाप्रामाण्यवाद</span></i><i>, </i><i><span lang="MR">प्रतिभाप्रामाण्यवाद</span></i><i>, </i><i><span lang="MR">भावनाप्रामाण्यवाद
असे अनेक पंथ असू शकतील आणि ह्या पंथांमधून निवड कशी करावी ह्याला काही तात्त्विक अधिष्ठान असणार नाही.
ती पूर्णपणे निरंकुश अशी निवड होईल.</span></i></span></p><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><i><span lang="MR">किंवा
आपली भूमिका अशी असेल : </span></i><i>'</i><i><span lang="MR">बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन होते</span></i><i>, </i><i><span lang="MR">तेच केवळ <span style="mso-tab-count: 1;"> </span>स्वीकारा</span></i><i>'
</i><i><span lang="MR">ह्या म्हणण्यात असे अभिप्रेत नाही की</span></i><i>, </i><i><span lang="MR">बुद्धीशिवाय इतरही
ज्ञानशक्ती किंवा मनःशक्ती आहेत</span></i><i>, </i><i><span lang="MR">त्याही सत्य म्हणून
कशाचे तरी ग्रहण करतात. तो सत्याभास असतो. खरेखुरे
सत्य केवळ बुद्धीच ग्रहण करू शकते. बुद्धी हीच केवळ ज्ञानशक्ती आहे आणि केवळ तीच सत्य ग्रहण करू शकते. पण अशी जर आपली
भूमिका असेल तर जे </span></i><i>'</i><i><span lang="MR">बुद्धीला पटले आहे तेच केवळ स्वीकारा</span></i><i>' </i><i><span lang="MR">ह्या म्हणण्यात
स्वारस्य तरी काय</span></i><i>? </i><i><span lang="MR">आपण
फक्त तोंडाने खाऊ शकतो</span></i><i>, </i><i><span lang="MR">इतर कशाने खाऊ शकत
नाही. म्हणून</span></i><i>, '</i><i><span lang="MR">तुम्ही
रोज एक सफरचंद खा</span></i><i>' </i><i><span lang="MR">असा
<span style="mso-tab-count: 1;"> </span>सल्ला डॉक्टर देईल</span></i><i>; </i><i><span lang="MR">पण </span></i><i>'</i><i><span lang="MR">तुम्ही रोज एक सफरचंद
तोंडाने खा</span></i><i>' </i><i><span lang="MR">असा
सल्ला तो काही देणार नाही. तोंडाने
खाण्याशिवाय दुसरा पर्यायच माणसाला नाही. तसेच </span></i><i>'</i><i><span lang="MR">तुम्हाला जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून
स्वीकारा</span></i><i>' </i><i><span lang="MR">असे
म्हणता येईल</span></i><i>; </i><i><span lang="MR">पण तुमच्या बुद्धीला जे सत्य म्हणून आकलन
झाले आहे तेवढेच सत्य म्हणून स्वीकारा असे <span style="mso-tab-count: 1;"> </span>म्हणण्याचे
कारण नाही. पण </span></i><i>'</i><i><span lang="MR">तुम्हाला
जे सत्य म्हणून आकलन झाले आहे तेवढेच सत्य म्हणून
स्वीकारा</span></i><i>' </i><i><span lang="MR">असे
कुणाला सांगण्याचे प्रयोजन तरी काय</span></i><i>?
</i><i><span lang="MR">जे आपल्याला सत्य म्हणून <span style="mso-tab-count: 1;"> </span>आकलन झालेले नसते</span></i><i>; </i><i><span lang="MR">दिसलेले</span></i><i>, </i><i><span lang="MR">जाणवलेले नसते</span></i><i>; </i><i><span lang="MR">त्याचा सत्य म्हणून
कुणी स्वीकार करीत असतो काय</span></i><i>? </i><i><span lang="MR">हा अनावश्यक सल्ला तर
नव्हे</span></i><i>?<o:p></o:p></i></span></p></blockquote>
<blockquote style="border: none; margin: 0px 0px 0px 40px; padding: 0px;"><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><i>- </i><i><span lang="MR">मे. पुं. रेगे
(विवेकवाद</span></i><i>, </i><i><span lang="MR">विज्ञान
आणि श्रद्धा या पुस्तकातील </span></i><i>'</i><i><span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवाद</span></i><i>'
</i><i><span lang="MR">या प्रकरणातून)</span></i></span></p></blockquote><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;">'<span lang="MR">बुद्धी</span>'
<span lang="MR">या </span>'<span lang="MR">मनःशक्ती</span>' <span lang="MR">विषयीचं रेगे यांचं विवेचन रोचक आहे. बुद्धी आणि भावना असं
द्वैत असून माणूस जेव्हा बुद्धीच्या आधारे निर्णय घेतो तेव्हा ते योग्य ठरतात कारण
त्यात दूरदृष्टी असते आणि भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेतो तेव्हा ते चुकतात कारण
त्यात क्षणिक सुखाचा विचार असतो असं आपण म्हणतो. परंतु </span>'<span lang="MR">जाणीव</span>' <span lang="MR">हे मूळ आहे</span>, <span lang="MR">बुद्धी ही जाणिवेने
ग्रहण केलेली</span>, <span lang="MR">जाणिवेबरोबर
विकसित होणारी</span> <span lang="MR">गोष्ट
आहे आणि त्यातून माणसाला निर्णयशक्ती मिळते. रेग्यांनी </span></span>म्हटल्या<span style="font-family: inherit;"><span lang="MR">प्रमाणे कल्पना</span>, <span lang="MR">प्रतिभा</span>, <span lang="MR">भावना अशा इतर
शक्तीही असल्या तरी त्या मूळ बुद्धीच्या शाखा आहेत किंवा खरं तर बुद्धीमध्येच
त्यांचा अंतर्भाव होतो असं प्रस्तुत लेखकाचं मत आहे. त्यामुळे एखादा मनुष्य
त्याच्या बुद्धीमुळेच श्रद्धाळूही असतो किंवा अश्रद्धही असतो. परंतु प्रत्येकजण बुद्धीशी
प्रामाण्य राखूनच वागतो</span>, <span lang="MR">निर्णय
घेतो असं म्हटलं तर कृतीची योग्यायोग्यताच निकालात निघते. त्यामुळे </span>'<span lang="MR">बुद्धी वापरणे</span>' <span lang="MR">हा मुद्दा नसून </span>'<span lang="MR">बुद्धीची कक्षा
विस्तारणे</span>' <span lang="MR">हा
मुद्दा पुढे येतो.</span><span lang="MR"> </span><o:p></o:p></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">रेगे या लेखात पुढे
बुद्धिप्रामाण्यवादाची व्याख्या करतात. बुद्धिप्रामाण्यवादी असणे म्हणजे काय</span>? <span lang="MR">तर पुरेशा
पुराव्याअभावी कोणतेही विधान सत्य म्हणून न स्वीकारणे किंवा असत्य म्हणून न
नाकारणे. पण मग पुराव्याअभावी एखादे विधान अनिर्णित मानावे इतकेच जर
बुद्धिप्रामाण्यवादाचे सार असेल तर तर बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार करण्याचे कारण
काय</span>? <span lang="MR">असा
प्रश्न ते विचारतात. कारण सत्य</span>, <span lang="MR">असत्य किंवा अनिर्णित अशा तीन साध्या-सरळ शक्यता असताना माणूस
बुद्धिप्रामाण्यविरोधी वागेलच कसा</span>?
<span lang="MR">पण असे होत नाही. माणसाच्या भावना</span>, <span lang="MR">त्याच्या अंतर्मनातील
अबोध इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती माणूस स्वीकारतो. रेगे
लिहितात</span>, <i>'</i><i><span lang="MR">या
प्रेरणांचे समाधान कल्पनेच्या विश्वातच होऊ शकते. स्वप्ने आणि दिवास्वप्ने ह्या
स्वरुपातच ह्या प्रेरणा सफल होऊ शकतात. पण ही स्वप्ने आणि पुराव्याच्या आधारे सत्य
ठरणाऱ्या तार्किक समजुती माणूस अलग ठेवू शकत नाही. ह्या तर्कसिद्ध समजुतीचे विषय
असलेल्या वस्तुस्थिती आणि ही स्वप्ने ह्यांचे बेमालूम मिश्रण असलेल्या जगात माणूस
जगत असतो.</span></i><i>' <o:p></o:p></i></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">तर्क</span>, कल्पना, <span lang="MR">प्रतिभा</span>,
<span lang="MR">भावना यांच्याप्रमाणेच अंतर्मनातील अबोध
इच्छा आणि प्रेरणा व त्यातून उद्भवणाऱ्या समजुती या सर्व मूळ बुद्धीच्या शाखा आहेत
(किंवा बुद्धीच्या आतच हे सगळं काही आहे) हे मान्य असेल तर मग बुद्धीला पटेल
त्यानुसारच वागा असं म्हणण्याला फारसा अर्थ उरत नाही. परंतु</span> <span lang="MR">बुद्धीअंतर्गत जे जे
येतं त्या सगळ्यांच्या मागण्या लक्षात घेऊन अंतिम निर्णय घ्यायचं बुद्धीचं
सामर्थ्य म्हणजे विवेक. या गुणाचा विकास व्हावा आणि या गुणाच्या आधारेच निर्णय
घ्यावेत असं मात्र निश्चित म्हणता येईल. पण इथेही </span>'<span lang="MR">मी माझ्या आजारी आईला बरं वाटावं
म्हणून बरेच उपचार केले</span>,<span lang="MR"> पण गुण येईना. शेवटी देवीसमोर
बोकडाचा बळी द्यायचं ठरवलं. माझ्या दृष्टीने हा विवेकी निर्णय होता</span>' <span lang="MR">असं कुणी म्हटलं तर</span>? <span lang="MR">तर त्यासाठी विवेक
म्हणजे काय यावर आपल्याला अधिक बोलावं लागेल. मे. पुं. रेगे यांनी वरील पुस्तकात
विवेकवादाविषयी</span>, <span lang="MR">विज्ञाननिष्ठा</span>, <span lang="MR">श्रद्धा याविषयी
विस्तृत मांडणी केली आहे. प्रस्तुत</span> <span lang="MR">चर्चाविषयाच्या संदर्भाने हे पुस्तक अवश्य वाचावं.</span> </span></p><p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">रेग्यांच्या मांडणीतला एक मुख्य धागा
माणसाच्या मनाशी</span>, <span lang="MR">त्याच्या
गुंतागुंतीच्या स्वरूपाशी</span> <span lang="MR">निगडीत
आहे. वरील पुस्तकातील </span>'<span lang="MR">मी
आस्तिक का आहे</span>?' <span lang="MR">या
प्रकरणातील त्यांचं एक म्हणणं लक्षवेधी आहे. </span>'<span lang="MR">सृष्टीची रचना सहेतुकपणे केली गेली आहे यावरील आक्षेप मला
माहीत असूनही मी माझी बालपणातील श्रद्धा सोडून का दिली नाही</span>? <span lang="MR">मी </span>'<span lang="MR">आस्तिक</span>' <span lang="MR">का राहिलो</span>? <span lang="MR">याचं थोडक्यात उत्तर
असं की ही माझी स्वाभाविक श्रद्धा आहे. माणूस म्हणून असणारी ही स्वाभाविक श्रद्धा
आहे. तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती</span> <span lang="MR">सोडून द्यावी लागेल असं काही घडलेलं नाही.</span>' <span lang="MR">आपण जेव्हा </span>'<span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवादी
नास्तिक्या</span>'<span lang="MR">चा
विचार करतो तेव्हा आपल्याला माणसाच्या या </span>'<span lang="MR">स्वाभाविक श्रद्धा</span>'
<span lang="MR">विचारात घ्याव्या लागतात. या श्रद्धा</span>, <span lang="MR">त्या निर्माण
होण्यामागचं कौटुंबिक आणि मानसिक पर्यावरण</span>,
<span lang="MR">आधीच्या अवतरणात</span> <span lang="MR">रेग्यांनी उल्लेख
केलेलं </span>'<span lang="MR">वस्तुस्थिती
आणि स्वप्ने यांचं मिश्रण</span>', <span lang="MR">माणसाच्या
मनाचं </span>'<span lang="MR">अनेकदिश</span>' <span lang="MR">असणं</span>, '<span lang="MR">विसंगतीसह</span>' <span lang="MR">विचार करण्याची मनाची
वृत्ती असणं हे सगळं आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाचं सामाजिक स्थान लक्षात घ्यावं
लागतं.</span> </span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">इथवरच्या मांडणीतून मला</span> '<span lang="MR">बुद्धिप्रामाण्यवाद</span>' <span lang="MR">ऐवजी </span>'<span lang="MR">विवेकवाद</span>' <span lang="MR">हा शब्द अधिक योग्य
वाटतो हे वाचकांच्या लक्षात आलं असेल.</span> <span lang="MR">मी आस्तिक नाही</span>,
<span lang="MR">पण तांत्रिकदृष्ट्या</span> <span lang="MR">पाहता</span> <span lang="MR">नास्तिकही नाही. काही
असलोच तर - म्हणजे माझ्या मनात या विषयासंदर्भाने</span> <span lang="MR">जी</span> <span lang="MR">आंदोलनं
सुरू असतात त्यांना काही नाव द्यायचं झालंच तर - मी</span> <span lang="MR">अज्ञेयवादी आहे. मला एक मूलभूत प्रश्न असा पडतो की आपल्याला</span> <span lang="MR">सत्याकडे</span> <span lang="MR">जाण्यासाठी
संकल्पनांची खरंच गरज आहे का</span>? <span lang="MR">सत्य काय आहे हे जर</span> <span lang="MR">मला समजून घ्यायचं असेल तर मी आस्तिक अथवा नास्तिक</span> <span lang="MR">असण्याची गरज काय आहे</span>? '<span lang="MR">मला काय वाटतं</span>' <span lang="MR">हे सृष्टीच्या अफाट
पसाऱ्यापुढे प्रस्तुत कसं ठरू शकेल</span>? <span lang="MR">परंतु या तात्त्विक</span> <span lang="MR">पार्श्वभूमीवरही एक गोष्ट नक्की की मी समाजाचा भाग आहे आणि
माझ्या विचारशक्तीनुसार सामूहिक हितासाठी काय आवश्यक आहे याचा मी</span><span lang="MR"> </span><span lang="MR">विचार केलाच पाहिजे.
त्यासाठी माझी एक निश्चित भूमिका असली पाहिजे.</span> <span lang="MR">आणि त्यासाठी</span> '<span lang="MR">आज समाज कोणत्या</span> <span lang="MR">वास्तवात जगतो आहे</span>'
<span lang="MR">याचं मला आकलन असलं पाहिजे.</span> </span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;"><span lang="MR">सर्व संकल्पनांच्या आणि त्यांच्यातील
संघर्षांच्या</span>, <span lang="MR">त्यांच्या
आंतरसंबंधांच्या पार्श्वभूमीवर</span> <span lang="MR">विचार करताना मला असं जाणवतं की </span>'<span lang="MR">हितकारक</span>' <span lang="MR">काही असेल तर तो</span> '<span lang="MR">विवेक</span>' <span lang="MR">आहे कारण ती प्रवाही
संकल्पना आहे. स्वतःला कप्प्यात बंद करून घेणारी नाही. अर्थात</span> <span lang="MR">वर म्हटल्याप्रमाणे विवेकाविषयीदेखील
अधिक बोलावं लागेल. लेखाच्या पुढील भागांमध्ये त्याविषयी आणि </span>'<span lang="MR">सामाजिकदृष्ट्या
हितकारक</span>' <span lang="MR">काय
आहे याविषयी</span> <span lang="MR">बोलूया.</span> </span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in; text-align: justify;"><span style="font-family: inherit;">('आजचा सुधारक'च्या 'बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य' या विशेषांकात (ऑक्टोबर २०२२०) प्रकाशित. लिंक - <a href="https://www.sudharak.in/2020/10/3809/">https://www.sudharak.in/2020/10/3809/</a>)</span></p>Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-29336588214544181912020-05-01T03:54:00.000-07:002020-05-01T03:54:33.532-07:00पत्रकारिता व प्रसारमाध्यमे : संधिकालातील निराशा आणि आशा <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
१८३२ साली बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेल्या 'दर्पण' या वृत्तपत्रापासून एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वाध यावर विखुरलेल्या गेलेल्या वृत्तपत्र-नियतकालिकांपर्यंत (कृष्णराव भालेकरांचं 'दीनबंधु' साप्ताहिक आणि इतर अनेक सत्यशोधकीय नियतकालिकं, शि. म. परांजपे यांचा 'काळ', विष्णुशास्त्री चिपळूणकरांची 'निबंधमाला', गोपाळ गणेश लोकहितवादींच्या प्रेरणेने सुरू झालेलं 'ज्ञानप्रकाश', र. धों. कर्वे यांचं 'समाजस्वास्थ्य', डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'मूकनायक' आणि इतर अनेक) आणि तिथून पुढे स्वातंत्र्योत्तर काळात सुरू झालेला प्र. के. अत्रे यांचा 'मराठा' (१९५६), जवाहरलाल दर्डा यांचं 'लोकमत' (१९७१), एक्सप्रेस समूहाचं 'लोकसत्ता' (१९४८), टाइम्स समूहाचा 'महाराष्ट्र टाइम्स' (१९६२) यांच्यासह इतर वृत्तपत्रे, अनेक साहित्यिक-सामाजिक नियतकालिकांपर्यंत मुद्रित माध्यमाने मराठी मानस घडवण्यात आपला हातभार लावला आहे. मुद्रित आणि त्यामागोमाग आलेल्या दृकश्राव्य स्वरूपातील प्रसारमाध्यमांचं काम काहीसं अदृश्य हातासारखं असतं. मोजता येईल अशा स्वरूपात त्यांचे परिणाम मांडणं शक्य नसलं तरी विविध विषयांची ओळख, ज्ञानप्रसार, विविध प्रश्नांबाबतची जागृती, सांस्कृतिक समृद्धी या अंगांनी त्यांचं कार्य लक्षणीय ठरतं. अर्थात यातही सांस्कृतिक आणि राजकीय अधिसत्ता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेही काही प्रसारमाध्यमं कार्यरत असतात हे विसरता येत नाही. आज २०२० च्या संदर्भाने बोलायचं झालं तर हा हात आता अदृश्य राहिला नसून ठसठशीतपणे दिसतोय आणि त्याने काय घडवलं आणि काय बिघडवलं याचा जमाखर्च मांडायला घेतला तर बिघडण्याच्या खात्यातच जास्त रक्कम असण्याचा संभव आहे असं कुणी म्हटलं तर ते चटकन निकालात काढता येणार नाही अशी परिस्थिती आहे. किंबहुना आज 'पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं' यावर भाष्य करण्यासाठी एखाद्या जाणकाराची गरज आहे का असाही प्रश्न कुणी विचारू शकेल!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'बातमी', 'माहिती' आणि 'ज्ञान' यावर विशिष्ट लोकांची मक्तेदारी उरलेली नसण्याच्या आजच्या काळात आपल्यासमोरचं चित्र नक्की कसं आहे? तर ते विस्फोटासारखं आहे. विस्फोट झाल्यावर अनेक गोष्टी इतस्ततः पसरतात आणि तुम्ही त्या ओळखण्याचा, तुकडे जुळवण्याचा प्रयत्न करता तसं काहीसं झालेलं आहे. पत्रकारितेचं अस्थिर स्वरूप. माध्यमांची धोक्यात आलेली विश्वासार्हता (आणि दुसरीकडे वाढता प्रभावदेखील), व्यावसायिक गरज, माध्यमांभोवतीचा भांडवली आणि राजकीय विळखा हे सगळे एकमेकांत गुंतलेले विषय आहेतच, पण याच्या मुळाशी असणारी आणि सतत जाणवणारी एक गोष्ट म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, फुले-आगरकर-आंबेडकर यांची पत्रकारितेची व्याख्या व उद्दिष्टं आणि आजच्या पत्रकारितेची व्याख्या व उद्दिष्टं यातच जर फरक पडला असेल तर आजच्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं? विशिष्ट कालखंडात विशिष्ट मूल्यं समाजात कशी उदयाला येतात, कशी स्थिरावतात, जुन्यांना बाजूला सारून ती स्वतःसाठी जागा कशी करतात याचा शोध निर्वात पोकळीत घेता येत नाही. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा भांडवलशाही 'संघटित' होण्याचा काळ आहे. भारताच्या संदर्भात याचे परिणाम आर्थिक उदारीकरणानंतर अधिक ठळकपणे दिसू लागले. १९९१ नंतर भारतात सर्वच क्षेत्रांमध्ये जे बदल झाले त्याला भारतीय प्रसारमाध्यमेही अपवाद नव्हती. जागतिकीकरणाची अपरिहार्यता आणि जागतिकीकरणाचे दुष्परिणाम या दोन्ही बाजूंनी आजवर पुष्कळ मांडणी झाली आहे. जागतिकीकरण तुम्हांला मान्य असो वा नसो, ते आता आलेलं आहे आणि ते असण्याच्या चौकटीतच तुम्हांला पुढचा विचार करावा लागणार आहे असंही एका टप्प्यावर म्हटलं जाऊ लागलं. (मात्र आज कोरोनाचं संकट गडद झाल्यावर कोरोनाच्या नंतरचं जग कसं असेल यावर विचार करताना जागतिकीकरणाचं 'होम कमिंग' सुरू होऊन पुन्हा एकदा देशांच्या अर्थव्यवस्था बंदिस्त होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.) स्थानिक पातळीवर पुरेशा विकसित न झालेल्या उद्योगांना परकीय भांडवलाच्या आगमनाने धक्का बसला, झपाट्याने वाढलेल्या स्पर्धेच्या पर्यावरणात अनेकजण बाजूला फेकले गेले, औद्योगिक-आर्थिकसह सांस्कृतिक विश्वावरही जागतिकीकरणाने आक्रमण केलं हे सत्य नाकारता येत नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
१९९२ मध्ये झी समूहाने टीव्ही मनोरंजन क्षेत्रात प्रवेश केला. त्याआधी १९८८ मध्ये एनडीटीव्हीने दूरदर्शनसाठी 'कंटेंट प्रोव्हायडर' म्हणून काम सुरू केलं होतं. पुढे बऱ्याच कालावधीनंतर, २००३ मध्ये एनडीटीव्हीचं स्वतंत्र चॅनल सुरू झालं. या काळात बातम्या आणि मनोरंजन क्षेत्रात झी, स्टार, एबीपी, इ टीव्ही, टाइम्स, इंडिया टुडे या व इतर समूहांनी आपलं बस्तान बसवल्याचे आपण साक्षीदार आहोत. अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस पहिल्यांदा फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणात झाला आणि पुढे फेसबुक, ट्विटर, यू-ट्यूब, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम या समाजमाध्यमांनी पारंपरिक प्रसारमाध्यमांना घाम फोडत स्वतःचं स्थान जनमानसात पक्कं केलं. आज 'पत्रकारिता आणि प्रसारमाध्यमं' या शीर्षकाखाली हे सगळेजण एकत्रितपणे आपापला प्रभाव गाजवत उभे आहेत. या सगळ्यांकडून माहिती आणि बातम्यांचा मारा जोरकसपणे होतो आहे. माहिती, देवाणघेवाण यांचा महापूर, व्हर्चुअल जगात व्यक्तींच्या वास्तव परस्परसंबंधांची वाढती गुंतागुंत आणि त्याने प्रभावित होणारं जनमानस हा मानसशात्रीय-समाजशास्त्रीय संशोधनाचा विषय कधीच बनला आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या विषयाच्या विविध पैलूंबाबत लिहावं असं बरंच आहे. 'एबीपी माझा'चे वार्ताहर राहुल कुलकर्णी यांच्या अलीकडील अटकेसंर्दभात जी चर्चा झाली त्याबाबत दोन मुद्दे नोंदवावेसे वाटतात. एक म्हणजे या पूर्ण प्रकरणात 'आमच्याकडून अनवधनाने चूक झाली' हे कबूल करण्याचं धैर्य एबीपी माझाने दाखवलं नाही. दुसरं म्हणजे भारतात अस्तित्वात असलेला १८६७ च्या 'प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स अॅक्ट' हा कायदा आणि १९५५ चा 'वर्किंग जर्नलिस्ट अॅक्ट' हा कायदा या दोन्हीमध्ये माध्यमांचा उल्लेख 'वृत्तपत्र' असा असल्याने टीव्ही पत्रकार 'पत्रकारा'च्या व्याख्येत बसतात का इथपासून घोळ आहे. टीव्ही चॅनल्सवरील आरडाओरडा, आक्षेपार्ह पद्धतीने केलं जाणारं वार्तांकन, धार्मिक विद्वेषाला उघडपणे खतपाणी घातलं जाणं, सामाजिकदृष्ट्या अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चेलाच न येणं, पत्रकारितेला (रोज) विविध प्रकारे फासला जाणारा काळिमा याबरोबरच दुसऱ्या बाजूने टीव्ही पत्रकारितेबाबतची नेमकी कायदेशीर तरतूद याही संदर्भात टीव्ही पत्रकारितेवर नियंत्रण ठेवणारी कुठलीही यंत्रणा अस्तित्वातच नाही असं दिसतं आणि ते सद्यस्थितीत धोकादायक आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
वर उल्लेख केलेल्या पहिल्या मुद्याबाबत अधिक विस्ताराने बोलणं आवश्यक वाटतं. राहुल कुलकर्णी यांच्या अटकेबाबत निषेध नोंदवला जात असतानाच 'एबीपी माझा'ने दिलेल्या अनेक चुकीच्या बातम्याही सामाजमाध्यमांवरुन प्रकाशात आणल्या जात होत्या. (इंटरनेटमुळे तुमची सगळी कुंडली झटक्यात मांडता येते!) त्याबाबत एबीपी माझा मौन बाळगून होतं. हे उदाहरण इतरही अनेक वाहिन्यांना लागू होईल. बहुतेक वाहिन्यांनी पत्रकारितेच्या समाजाप्रती असणाऱ्या जबाबदारीतून स्वतःला मुक्त करून घेतलं आहे. पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना हरताळ फासला जात असताना त्याबाबाबत दिलगिरी व्यक्त करणं तर सोडाच, पण आपण काहीतरी श्रेष्ठ काम करतो आहोत अशाच अविर्भावात बहुतेक मंडळी वावरताना दिसतात. आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे. आपण कुठल्या मूल्यव्यवस्थेचे वाहक बनतो आहोत याकडे पूर्ण दुर्लक्ष करून, आपली 'जवाबदेही' पूर्णपणे नाकारून आज टीव्ही पत्रकारिता सुरू आहे. रवीशकुमारसारखा एखादा अतिसन्माननीय अपवाद जेव्हा हताशपणे आपल्या चॅनलवरून 'कृपया टीव्ही बघणं बंद करा' असं सांगतो तेव्हा त्यातच सगळं येतं. आर्थिक गणितं आहेत, टीआरपीची चढाओढ आहे, स्पर्धा आहे - कबूल आहे, पण आपण ज्या कामाशी बांधील आहोत त्या कामाचे समाजावर दूरगामी परिणाम होतात हे माहीत असूनही जर आपण ते काम नीट करत नसू तर आपण त्यात सुधारणा का करू नये किंवा ते जमत नसेल तर ते काम थांबवू का नये हे प्रश्न कुणालाही पडत नाहीत ही आजची 'प्रसारमाध्यम शोकांतिका' आहे. प्रसारमाध्यमांच्या डिजिटल अवताराकडे पाहिलं की व्यावसायिकतेचा विळखा किती आवळला जातो आहे हे लक्षात येतं. मराठी किंवा इतर भाषांमधील दैनिकांच्या आणि वृत्तवाहिन्यांच्या वेबसाइट्स, इंटरनेटवर सुरू झालेले मराठी व इतर न्यूज पोर्टल्स, त्यांचे यूट्यूब चॅनल्स पाहिले तर अधिकाधिक हिट्स मिळवण्यासाठी भडक शीर्षकाच्या लिंक्स देणं, शून्य किंवा ऋण बातमीमूल्य असलेल्या घटना/माहिती चमचमीत चित्रासह समोर ठेवणं हे सर्रास केलं जाताना दिसतं. कधीकधी तर हे न्यूज पोर्टल आहे की 'सॉफ्ट पॉर्न'साइट आहे अशी शंका येते. (याला अपवाद अर्थातच आहेत.) सर्व प्रश्नांना 'व्यावसायिक अपरिहार्यता' हे उत्तर दिलं जातं, पण त्याची योग्यायोग्यता ठरवण्याचं काही साधन हाताशी नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'द वायर'चे संस्थापक सिद्धार्थ वरदराजन यांनी २०१९ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातील 'रॉयटर्स इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी इन जर्नालिझम'मध्ये 'रॉयटर्स मेमोरियल लेक्चर' दिलं होतं. त्यात त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की माध्यम क्षेत्रातील बड्या उद्योगांचा महसूल आज डिजिटल माध्यमांच्या आक्रमणामुळे धोक्यात आला आहे. प्रिंट आणि टेलिव्हिजन - दोन्ही प्रकारातील प्रसामाध्यमांचे जाहिरातदार इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात वळू लागले आहेत, अनेक छोट्या प्रादेशिक वृत्तपत्रांना तर शासकीय जाहिरातींशिवाय तग धरणं अशक्यच झालं आहे. यातून माध्यमसमूहांची व्यावसायिक अपरिहार्यता दिसते हे खरं आहे. शिवाय इंटरनेटचं व्यासपीठ वापरून सुरू झालेल्या 'स्टार्ट अप' कंपन्यांची व्यावसायिक अपरिहार्यता अधिक असणार हे उघडच आहे. या सगळ्यात बळी जातोय तो पत्रकारितेचा. पत्रकारिता ही निखळ पत्रकारिता न राहता 'व्यवसायाला पूरक अशी कृती होते आहे. 'मार्केटिंग, हार्ड सेलिंग, सॉफ्ट सेलिंग' ही 'विपणनास्त्रे' पत्रकारितेच्या वरचढ ठरतायत. परंतु याचीच दुसरी बाजूही आहे आणि ती सांगणं आवश्यक आहे कारण काही अपवादांमुळे डिजिटल पत्रकारिता जिवंतही राहिली आहे. मराठीपुरतं बोलायचं झालं तर द वायर मराठी, अक्षरनामा, कोलाज, बीबीसी मराठी, इंडी जर्नल, कर्तव्य साधना, मॅक्स महाराष्ट्र अशी काही नावं घेता येतील. हिंदी आणि इंग्लिशमध्ये बरीच नावं आहेत - द वायर, स्क्रोल, न्यूजलाँड्री, न्यूजक्लिक, कोब्रापोस्ट, द सिटीझन, आल्टन्यूजसारखी फेक न्यूजचा पर्दाफाश करणारी महत्त्वाची वेबसाइट, यूट्यूबवरील एचडब्ल्यू न्यूज नेटवर्क, सोच, द लल्लनटॉप, विनोद दुआ, अभिसार शर्मा, पुण्यप्रसून वाजपेयी, ध्रुव राठी, कुणाल कामरा, फैजान मुस्तफा अशासारख्यांचे स्वतंत्र चॅनल्स - हे आणि इतरही अनेक व्यक्ती/संस्था स्वतंत्र पत्रकारितेचा झेंडा खांद्यावर घेऊन आपली वाट चालत आहेत. ही संख्याही नोंद घेण्यासारखी असल्याने तुम्ही जर खऱ्या पत्रकारितेशी बांधील असाल तर तुम्हांला तुमचा मार्ग मिळू शकतो हे दिसून येतं. परंतु याचं भविष्य काय असेल हे सांगता येणं अवघड आहे. सिद्धार्थ वरदराजन यांनी वरील व्याख्यानात सांगितलं की पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या वायरचं वार्षिक बजेट सुमारे सात कोटी आहे आणि वायरवर केले गेलेले अब्रुनुकसानीचे दावे साडेअकरा हजार कोटींच्या घरात आहेत. गौतम अडाणी, अनिल अंबानी, सुभाष चंद्रा (झी), श्री श्री रविशंकर, राजीव चंद्रशेखर (रिपब्लिक), जय अमित शहा ही दावे करणारी काही नावं. एनडीटीव्ही, द सिटीझन, कॅराव्हान मॅगझिन यांच्यावरही दावे करण्यात आले आहेत. मात्र वरदराजन यांचं असं म्हणणं आहे की हे दावे गंभीरपणे केले असण्यापेक्षा डावपेचात्मक भाग म्हणून केले आहेत. स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांना कोर्टकचेरीत अडकवून ठेवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आज मुख्य धारेतील पत्ररकारितेचा संपूर्ण भर भावनिकतेवर आहे. शिक्षण, आरोग्य, जनचळवळी, न्यायव्यवस्था-निवडणूक-प्रशासन यात अपेक्षित असणाऱ्या सुधारणा हे विषय केंद्रस्थानी नाहीत. लोकांना हे नकोच आहे ही माध्यमांची भूमिका आणि तुम्ही दाखवलं नाहीत तर लोक बघणार तरी कसे ही त्याला विरोध करणारी भूमिका (जी प्रस्तुत लेखकाचीही भूमिका आहे) यामध्ये पत्रकारिता हेलकावे खात आहे. 'आंदोलन' सारखं जमिनीवरील घडामोडींचं वृत्तांकन करणारं मासिक वास्तविक घरोघरी जायला हवं, पण तसं होताना दिसत नाही. मुख्य धारेतील माध्यमं आणि 'मुख्य धारेतील' समाज दोघंही एकमेकांना प्रभावित करत आहेत. राजकीय सत्ता, सांस्कृतिक सत्ता, माध्यम सत्ता याच्या पलीकडे आहे ती 'लोकशक्ती'. ही 'लोकशक्ती' आज क्षीण झालेली आहे, स्वतःचं सामर्थ्य विसरून बसलेली आहे. मराठी वाचक जो एके काळी 'नवभारत', 'समाज प्रबोधन पत्रिका', 'आजचा सुधारक', विविध वृत्तपत्रं आणि मासिकांमधून होणाऱ्या अभ्यासकांच्या चर्चा आणि वाद-विवाद, अभ्यासकांची दीर्घ मांडणी - हे सगळं वाचून स्वतःला समृद्ध करत होता तो आज 'क्विक फिक्स' वर अवलंबून राहतो आहे. टीव्ही आणि समाजमाध्यमांच्या आहारी जाऊन 'वैचारिक दहशतवादी' होतो आहे. हे मराठीच नव्हे तर सर्वच वाचकांचं झालेलं आहे. व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजेसवर विश्वास ठेवला जाणं, तिथे तासनतास वेळ घालवणं, टीव्हीवरील चर्चा मनोरंजन म्हणूनही बघणं आणि एखादं दोनशे पानी अभ्यासपूर्ण पुस्तक वाचायला दोन महिने लागणं (जर पुस्तक हातात घेतलं तर) हा 'सामाजिक' बरोबरच मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या कक्षेतील विषय आहे. 'ज्ञान' आणि 'सुलभीकरण' हा झगडा पुरातन असला तरी आज सुलभीकरणाचं पारडं खूप जड झाल्याचं स्पष्टपणे दिसतं आहे. महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवी वर्षात - २०३५ पर्यंत आपल्याला मराठी प्रसारमाध्यमं आणि मराठी मानस या दोहोंनाही जर अधिक उन्नत झालेलं बघायचं असेल तर 'मराठी लोकशक्ती' विधायकतेकडे कशी नेता येईल, त्यासाठी जवळची आणि लांबची उद्दिष्टं काय असतील, ती पूर्ण करण्याकरता काय करावं लागेल याचं धोरण महाराष्ट्रातील परिवर्तनवादी संघटनांनी, विविध सामाजिक-राजकीय प्रभाव गटांनी, विविध विचारधारांनी आपसांतील मतभेद विसरून, एकत्र येऊन ठरवणं आवश्यक आहे. आजचा प्रश्न हा मूल्यव्यवस्थेच्या पुनःप्रस्थापनेचा प्रश्न आहे. सुलभीकरण', वैचारिक एकारलेपण आणि त्यातून जन्मणारं राजकीय एकारलेपण एका बाजूला आणि ज्ञानाधिष्ठित विचारपद्धती व ज्ञानाधिष्ठित राजकीय भूमिका दुसऱ्या बाजूला यात दुसरी बाजू सक्षम करण्याचा प्रश्न आहे. स्वतंत्र पत्रकारितेवरील दबाव भविष्यात वाढतच जाईल अशी चिन्हं आहेत. हे खोटं ठरवण्याची ताकद महाराष्ट्र उभी करू शकतो का हे महाराष्ट्रापुढील एक प्रमुख आव्हान असणार आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
- आंदोलन, मे २०२० (इ-विशेषांक)</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-77644064410415727372020-04-06T22:06:00.000-07:002020-05-01T03:33:10.696-07:00मोदीपर्व आणि 'आर्ट ऑफ केपेबल' <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
५ एप्रिलच्या रात्री झालेल्या दीपप्रज्वलनाच्या कार्यक्रमानंतर त्याचे पडसाद उमटलेच. 'फेसबुक वृत्तांकना'त लोकांनी फटाके उडवल्याचं वाचनात आलं. एक-दोन पोस्ट्समध्ये सोसायटीनेच दिवे घालवले, दिवे चालू असणाऱ्या घरांमधील लोकांना इतरांनी दिवे बंद करायला सांगितले असेही उल्लेख होते. एका भाजपसमर्थक मित्राने असं लिहिलं होतं की 'याला मूर्खपणा म्हणा हवं तर, पण हेच मूर्ख नरेंद्र मोदींना पुढच्या निवडणुकीत निवडून देतील'. हे विधान गंमतीत केलं गेलं होतं, पण या विधानावरून असं म्हणता येऊ शकेल की दीपप्रज्वलन हा कळत-नकळतपणे राजकीय कार्यक्रम झाला असं त्याला सुचवायचं होतं. अर्थात मोदींच्या प्रतीकात्मक कार्यक्रमांबाबत अशा स्वरूपाचं मत भाजप विरोधकांनीही व्यक्त केल्याचं दिसतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असं राजकारण होण्याला या मित्राचा फारसा आक्षेप आहे असं दिसलं नाही. गेल्या वर्षी बालाकोट हल्ल्यानंतर नरेंद्र मोदींनी एका निवडणूक सभेत शहीद जवानांच्या नावाने मतं मागितल्यानंतर एका मैत्रिणीने त्याचं समर्थन केल्याने मी हतबुद्ध झालो होतो ते आठवलं. ('सोच' या यू ट्यूब चॅनलने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाच्या अनुषंगाने एक फार चांगला विश्लेषणात्मक व्हिडीओ केला आहे. तो जरूर पाहावा. लिंक - https://www.youtube.com/watch?v=MFyHXLBsoac&t=3s)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या संदर्भाने शंतनू पांडे यांनी त्यांचा एक जुना अनुभव शेअर केला आहे तो नोंदवावासा वाटतो. नवरात्रीच्या दिवसात ते एकदा अहमदाबादला असताना सरदार प्रकल्पाचा निकाल गुजरातच्या बाजूने लागल्यावर लोकांनी रस्त्यावर फटाके उडवले, मेधा पाटकरांना शिवीगाळ केली, त्यांचे पुतळे जाळले असं त्यांनी नोंदवलं आहे. वातावरणात उन्माद होता. लोक उत्स्फूर्तपणे गरबाही खेळले. साधारण पहाटे तीनपर्यंत हे चाललं. पोलीस आले नाहीत. नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मेधा पाटकरांचे पुतळे जाळण्यात शासनाचा सहभाग अर्थातच नव्हता, पण आपल्या विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी तशी जमीन तयार करून द्यायचं काम नरेंद्र मोदी ज्या विचारधारेतून घडले ती विचारधारा आपल्या प्रचार यंत्रणेद्वारे करतच असते. एकूणच सामाजिक परिस्थितीतील न्यूआन्सेस - बारकावे - पुढे न आणता लोकांच्या मनातील स्वतःचं स्थान बळकट करण्यात नरेंद्र मोदींना सातत्याने जे यश आलं आहे त्याचा बराचसा वाटा या विचारधारेचा आहे. उलटीकडे असं होतं की न्यूआन्सेस लक्षात आणून देणाऱ्यांना विरोध होतो कारण ते एकूणातच 'नकारात्मक बोलणारे', कधी विकासाचे तर कधी संस्कृतीचे विरोधक असतात. मेधा पाटकरांना शिवीगाळ करणाऱ्यांना तसं करण्यात चूक वाटत नाही कारण नर्मदा बचाओ आंदोलन आपल्या विरोधात आहे याची त्यांना खात्री असते. आंदोलनाचा इतिहास त्यांना माहीत नसतो. 'पर्यायी विकासाचं मॉडेल', त्यासंबंधीची चर्चा त्यांच्यापर्यंत पोचलेली नसते. पोचली तरी त्यावरून त्यांच्या आकलनात काही बदल होईल अशीही शक्यता नसते. कारण ते एका व्यवस्थेने घडवलेले, त्या व्यवस्थेत स्वतःच्या जगण्याला आकार देण्यासाठी धडपडणारे सर्वसामान्य नागरिक असतात. 'हे पर्यावरणवादी लोक बघा स्वतः विमानातूनसुद्धा हिंडतील आणि धरणाला मात्र विरोध करतील' अशी बायनरी मांडणी त्यांना आकर्षित करते. बायनरी मांडणीत सर्व बारकावे नष्ट करून 'हा आपला शत्रू आहे' हे ठसवायची ताकद असते. हे अत्यंत घातक आहे आणि संघ/भाजप हे सातत्याने करत आले आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आज हे बरेचदा म्हटलं जातं की सगळी चर्चा मोदीभक्ती आणि मोदीद्वेष या बायनरीमध्ये अडकली आहे. त्याचा अनेक सुजाण लोकांना त्रासही होतो. या विधानाचे लेयर्स उलगडले जायला हवेत असं मला वाटतं. एक म्हणजे ज्यांना असं वाटतं त्यांनी नरेंद्र मोदींची मांडणीही बघावी. उदा. नरेंद्र मोदी नेहरूंबाबत घेतात ती भूमिका पूर्णपणे बायनरी असते. त्यांची इतिहास, भारतीय स्वातंत्र्यलढा, फाळणी याबाबतची भूमिकाही पूर्णपणे बायनरी असते. यावर प्रतिक्रिया उमटल्या की त्यांना मात्र 'मोदीद्वेष' या कोटीत बसवलं जाताना दिसतं. म्हणजे मूळ मांडणी बायनरी आहे हे लक्षात न घेता प्रतिक्रिया मात्र बायनरी ठरतात! मला असं दिसतं की 'नरेंद्र मोदी' या सामाजिक-राजकीय घटिताचा पुरेसा अभ्यास नसल्याने हे होत असावं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याचा दुसरा लेयर असा की मोदींच्या राजकारणाची चिकित्सा करताना 'चिकित्सा' आणि 'द्वेष' यातला फरक विरळ होत गेला आहे हेही खरं आहे. हा तसा 'स्लिपरी रोड' आहे; पण काही बाबतीत हे अगदीच स्पष्ट दिसतं. मला तपशील नीट आठवत नाही, पण एक नक्की आठवतं की मागे एकदा नरेंद्र मोदी हिंदीत बोलले त्यावरून काहीतरी गदारोळ झाला होता. आता हे मूर्खपणाचं होतं. उलट इंग्लिशपेक्षा भारतीय भाषेतून बोलणं चांगलंच आहे. कुठली भाषा वापरली हा टीकेचा मुद्दा कसा काय होऊ शकतो? मोदींना विरोध करताना अशा प्रकारे ताळतंत्र सुटण्याचे प्रकार झालेले आहेत. आता यावर कुणी असं म्हणेल की मोदींनी ताळतंत्र सोडलेलं चालतं (उदा. त्यांचा डिस्लेक्सियाबाबतचा रिमार्क, इतरही बरीच उदाहरणं देता येतील), मग विरोध करणाऱ्यांनी सोडलं तर बिघडलं कुठे? हा प्रश्न ठीक आहे; पण याचा संबंध 'पॉवर'शी आहे हे लक्षात घ्यायला हवं. तुमच्याकडे जेव्हा पॉवर असते तेव्हा तुमच्या बाबतीतले मापदंड समाजाकडूनच बदलले जातात. मोदींच्या चुका पाठीशी घालायला जर बहुसंख्य लोक तयार असतील; किंबहुना त्या चुका आहेत असंच जर त्यांना वाटत नसेल तर ही जाणीव या बहुसंख्य लोकांना होईपर्यंत हे चित्र बदलणार नाही. आणि मोदींवर टीका करून ही जाणीव होतेय, हे चित्र बदलतंय असं फारसं दिसत नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
होतं असं की संघ-भाजप, हिंदुत्ववाद, नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली तर अनेक तटस्थ लोकांना ते नकोसं वाटू लागतंआणि काही समर्थक अर्थातच चिडतात. 'चिडणं' हा एक मानसिक-भावनिक प्रतिसाद आहे आणि तो समजून घ्यायला पाहिजे. आपल्या धारणांवर टीका झाली की चिडणं हे ह्यूमन/इरॅशनल लेव्हलला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला नाही. चिडणं ही 'इंस्टिंक्टिव्ह प्रतिक्रिया' आहे. इथे धारणा चुकीच्या की बरोबर हा मुद्दा महत्त्वाचा नाही; 'त्या आहेत' हा मुद्दा महत्त्वाचा आहे. माणूस ही अतिशय 'व्हल्नरेबल' प्रजाती आहे. ती जितकी हुशार आहे तितकीच सेन्सिटिव्ह आहे. माणूस रॅशनल असल्याचा क्लेम करतो, पण तो अनेक बाबतीत पूर्णपणे इरॅशनल असतो. हे जसं मोदीसमर्थकांना लागू होतं तसं इतरही नेत्यांच्या समर्थकांना होतं. आता होतं असं की सातत्याने मोदींवर टीका झाली की समर्थक म्हणतात, आता तर काय व्हायचं ते होऊ दे. आपला सपोर्ट मोदींनाच! आणि ते दुप्पट उत्साहाने कामाला लागतात. हे असं होतं कारण वर म्हटल्याप्रमाणे हे 'ह्यूमन/इरॅशनल लेव्हल'ला वर्क होतं. वैचारिक लेव्हलला काही गोष्टी पटल्या तरी ह्यूमन/इरॅशनल लेव्हलचे निर्णय वेगळे असतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मुळात नरेंद्र मोदींचं राजकारणच ह्यूमन लेव्हलवरचं आहे. त्याचा मुकाबला वैचारिक लेव्हलवरून कसा करणार?हिंदुत्व, विकास, राष्ट्रवाद, माध्यमांचा प्रभावी वापर, एकनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज, गोष्टींचं सुलभीकरण ही सर्व भाजपच्या/मोदींच्या राजकारणाची अंगं आहेत. त्यामुळे प्रश्न हा की आपल्या राजकारणाचं अंग काय असावं? टीका हे ते अंग असेल तर ते काम करत नाही हे दिसलं आहे. मग आपला पुढचा पर्याय काय आहे? 'पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ पॉसिबल' असं जे म्हटलं जातं त्यात मोठा अर्थ दडलेला आहे. 'लोक वेडे झालेत', 'मोदींनी त्यांना हिप्नोटाइज केलंय' असं म्हणून प्रश्न सुटत नाही. तुम्ही त्यातून फक्त वेगळेच पडत जाता. 'वेगळं पडणं' स्वाभाविक आहे पण ते सोल्यूशन आहे का हा प्रश्न आहे. शिवाय त्यातून तुम्हांला हताशा येऊ शकते. त्यामुळे 'तुम्ही काय करणार' हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपण राजकीय व्हायची गरज आहे असं मला वाटतं. राजकीय होणं याचा अर्थ पक्षीय राजकारणात पडणं असाच फक्त नसतो. पक्षीय राजकारण हा एक प्रकार झाला. राजकीय होणं याचा अर्थ आपलं धोरण नीट ठरवणं आणि अंमलात आणणं. बेस्ट पॉसिबल क्रमांक एक, बेस्ट पॉसिबल क्रमांक दोन असा क्रम लावून घेणं. आजवर जे झालं ते झालं, पण आता सततची टीका टाळून, प्रतिक्रिया देत न बसताही आपण लोकांना विचार करायला उद्युक्त करू शकू का यावर विचार होण्याची गरज आहे. सरकारला प्रश्न विचारणं, असं करणं चुकीचं नाही हे लोकांना पटवून देण्याबरोबरच आम्ही अमुक अमुक बाबतीत सरकारच्याबरोबर आहोत हा संदेशही जाणं महत्त्वाचं आहे. प्रतीकात्मक कर्मकांडाबाबत मतभेद असले तर तिथे त्याक्षणी गप्प राहून नेमकेपणानं त्यातील खुपणाऱ्या बाजूंवर बोलणं आवश्यक आहे. (माझ्यासारख्यांनी विनोदाची उबळ टाळणं गरजेचं आहे!) लोक प्रभावाखाली असू शकतात, चुकीचंच वागू शकतात, पण लोक मुळातून वाईटच असतात असं आपण मानून चाललो तर अवघड आहे. अशाने मग तुमचं मोटिव्हेशनच संपून जातं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यात अर्थातच विविध मुद्दे गुंतलेले आहेत. त्यावर बोलण्यासाठी व निश्चित काही ठरवण्यासाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या, डावे-समाजवादी-गांधीवादी-आंबेडकरवादी-स्त्रीवादी अशा सर्वच कार्यकर्त्या-विचारवंतांनी एकत्र येणं फार आवश्यक आहे. पॉलिटिक्स हे जसं 'आर्ट ऑफ पॉसिबल' आहे तसंच ते 'आर्ट ऑफ केपेबल'ही आहे. एकत्र येणं ही आपल्या केपेबलिटीची पहिली कसोटी ठरावी! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
- ६ एप्रिल २०२०, फेसबुक पोस्ट </div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-16169455509346182962020-03-09T05:53:00.000-07:002020-05-08T06:53:01.505-07:00जात आहे, जात नाही <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
'सावरकर हे गांधीजींच्या खुनाला जबाबदार नाहीत हे एकवार मान्य केले तरी ते हा खून थांबवू शकले असते की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच' असं एका तरूण पत्रकाराने विचारल्याचं सुरेश द्वादशीवार यांनी त्यांच्या 'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' या पुस्तकातील एका प्रकरणात लिहिलं आहे. जातीव्यवस्थेबाबत विचार करताना याला समांतर असा एक प्रश्न माझ्या मनात बरेचदा येतो. 'ब्राह्मण जातीव्यवस्था निर्माण करण्याला जबाबदार आहेत की नाही हा प्रश्न क्षणभर बाजूला ठेवला तरी ती वाढू द्यायला आणि कायम ठेवायला ते जबाबदार आहेत का' हा तो प्रश्न. तथाकथित उच्च वर्णात सर्वोच्च स्थानी असलेल्या ब्राह्मणांकडे शेकडो वर्षं समाजाचं बौद्धिक-मानसिक धुरीणत्व होतं. त्यांच्या डोळ्यादेखत जातीव्यवस्थेने भयानक रूप धारण केलं तरी त्यांनी त्यावर फारशी संघटित हालचाल केल्याचं दिसत नाही. ब्राह्मण सुधारक, विचारवंत होऊन गेले; पण जातीअंतासाठी मोठी चळवळ उभारली गेल्याचं दिसत नाही. यावरून जातीव्यवस्थेच्या उच्चाटनाबाबत या धुरीण वर्गाला आस्था नव्हती हे स्पष्ट दिसतं. (ही व्यवस्था त्यांनीच निर्माण केलेली असल्याने त्यांना ती नष्ट करण्यात रस नव्हता हे सरळ आहे असा एक तर्क बांधता येईल). या मुद्द्याशी जोडलेली काही मते व निरीक्षणे पाहू.</div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
बाबासाहेब आंबेडकरांनी ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठातील मानववंशशास्त्र परिषदेत 'कास्ट्स इन इंडिया : देअर मेकॅनिझम, जेनेसिस अँड डिव्हेलपमेंट' हा शोधनिबंध सादर केला होता. या शोधनिबंधात त्यांनी जातीव्यवस्थेच्या उगमाबाबत आणि स्वरूपाबाबत त्यांची मतं मांडली आहेत. सेनार्ट, नेसफील्ड, रिस्ले आणि श्री. व्यं. केतकर या अभ्यासकांनी केलेल्या जातीच्या व्याख्या उद्धृत करून केतकरांची व्याख्या सर्वात अचूक असल्याचं ते लिहितात. केतकरांची व्याख्या अशी - जात म्हणजे दोन प्रमुख गुणधर्म असलेला समूह. १) समूहातील सदस्यांना झालेल्या मुलांनाच फक्त जातीचं सदस्यत्व मिळतं आणि अशा प्रकारे जन्मलेले सर्वजण सदस्य म्हणून सामावून घेतले जातात. २) समूहाबाहेर लग्न न करण्याच्या अनुल्लंघनीय सामाजिक कायद्याने सर्व सदस्य बांधलेले असतात. आंबेडकरांच्या मते एंडोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी नसणे) हे जातीचं मुख्य लक्षण आहे. भारतामध्ये एंडोगॅमी नव्हती, एक्सोगॅमी (समूहाबाहेर लग्नाला परवानगी असणे) होती आणि एंडोगॅमी थोपली जाण्यातूनच जाती निर्माण झाल्या असं आंबेडकर म्हणतात. जातीचा उगम म्हणजे 'एंडोगॅमीच्या मेकॅनिझम'चा उगम असं त्यांचं मत आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जात हा एक बंदिस्त 'वर्ग' आहे आणि स्वतःभोवती असा बंदिस्तपणा घालून घेण्याची लक्षणे सर्वप्रथम ब्राह्मणांमध्ये आढळतात. हिंदू समाजात प्रारंभी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार 'वर्ग' होते आणि या वर्गांमध्ये स्थलांतरही शक्य होते. पुढे ब्राह्मण वर्ग इतरांपासून वेगळा होत गेला आणि त्यांनी स्वतःला 'जाती'मध्ये बंदिस्त केलं. हाच मार्ग पुढे ब्राह्मणेतर वर्गांनी अनुसरला आणि त्यामुळे जातीसंस्थेचं जनकत्व ब्राह्मणांकडे जातं असं आंबेडकर लिहितात. इथे दोन प्रश्न असे की ब्राह्मणेतर वर्गामध्ये जातीव्यवस्था कुण्या एकाच्या कायद्यान्वये प्रस्थापित झाली की भारतीय समाजाशी संबद्ध अशा एखाद्या सामाजिक विकसनाच्या नियमानुसार ती प्रस्थापित झाली? मनूने जातीव्यवस्था कायद्याने प्रस्थापित केली हे आंबडेकर नाकारतात. जात मनूच्याही आधी होती, मनूने तिला तात्त्विक अधिष्ठान दिलं असं आंबेडकर लिहितात. मग हे ब्राह्मणांनी केलं का? याचंही उत्तर आंबेडकरांनी नकारार्थी दिलं आहे. संपूर्ण समाज आपण निर्मिलेल्या एका नमुन्यात बसवणं ब्राह्मणांसारख्या सामर्थ्यवान वर्गालाही शक्य नव्हतं असं त्यांचं मत आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मात्र या निबंधात मला एक छोटी विसंगती आढळते. खालील परिच्छेद पहा - </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
If the prevalence of these customs in the non-Brahmin Castes is derivative, as can be shown</div>
<div style="text-align: justify;">
very easily, then it needs no argument to prove what class is the father of the institution of caste. Why the Brahmin class should have enclosed itself into a caste is a different question, which may be left as an employment for another occasion. But the strict observance of these customs and the social superiority arrogated by the priestly class in all ancient civilizations</div>
<div style="text-align: justify;">
are sufficient to prove that they were the originators of this “unnatural institution” founded and maintained through these unnatural means.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यानंतरचा एक परिच्छेद असा आहे - </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
The spread and growth of the Caste system is too gigantic a task to be achieved by the power or cunning of an individual or of a class. Similar in argument is the theory that the Brahmins</div>
<div style="text-align: justify;">
created the Caste. After what I have said regarding Manu, I need hardly say anything more, except to point out that it is incorrect in thought and malicious in intent. The Brahmins may have been guilty of many things, and I dare say they were, but the imposing of the caste system on the non Brahmin population was beyond their mettle. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ब्राह्मण हे 'त्यांच्या' जातीचे निर्माते आहेत, पण पुढे जातींचा जो मोठ्या प्रमाणात विस्तार झाला त्याला ते जबाबदार नाहीत असं आंबेडकरांना म्हणायचं आहे. परंतु दुसऱ्या परिच्छेदात 'ब्राह्मणांनी जात क्रिएट केली नाही' असं म्हटलं गेल्याने पहिल्या परिच्छेदातील विधानाशी ते विसंगत होत आहे. कदाचित इथला 'क्रिएट' हा शब्द 'स्प्रेड' या अर्थी वापरला असावा. हा शोधनिबंध मला दोन ठिकाणी सापडला. दोन्ही ठिकाणी असेच उल्लेख आहेत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_castes.html http://drambedkarwritings.gov.in/upload/uploadfiles/files/Volume_01.pdf </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ब्राह्मणांचं अनुसरण करून इतरांनी एंडोगॅमी स्वीकारून आपआपल्या जाती निर्माण केल्या (काहींनी दारं लावून घेतली तर काहींना आपल्यासाठी दारं बंद झाल्याचं लक्षात आलं) असं आंबेडकरांचं प्रतिपादन आहे. प्रस्तुत शोधनिबंध आंबेडकरांनी वयाच्या २५ व्या वर्षी लिहिला आहे. पुढील काळात त्यांनी जे विपुल लेखन केलं त्यात काही वेगळी मांडणी आढळते का हे स्वतंत्रपणे पाहता येईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विख्यात समाजशास्त्रज्ञ जी. एस. घुर्ये यांनी आपल्या 'कास्ट अँड रेस इन इंडिया' या पुस्तकात जातींच्या निर्मितीविषयी जे लिहिलं आहे ते आंबेडकरांच्या मांडणीशी जुळणारं आहे. भारतातील जातीव्यवस्था इंडो-आर्यन संस्कृतीतील ब्राह्मणांचं देणं आहे असा त्यांचा निष्कर्ष आहे. जातींचा प्रसार होण्यामागची कारणं देताना घुर्ये लिहितात - </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
The lack of rigid unitary control of the state, the unwillingness of the rulers to enforce a uniform standard of law and custom, their readiness to recognize the varying customs of different groups as valid, and their usual practice of allowing things somehow to adjust themselves helped the fissiparous tendency of groups and fostered the spirit of solidarity and community feeling in every group. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
जातीविषयीचं हे अगदी प्राथमिक विवेचन आहे. काही हजार जातींची निर्मिती, त्यांच्यातील उतरंड, एकमेकांशी असलेलं नातं आणि ब्राह्मणी वर्चस्व हा अर्थातच सविस्तर अभ्यासाचा विषय आहे. दुसरा लक्षात घेण्याजोगा मुद्दा असा की आपण जेव्हा ब्राह्मणी वर्चस्व म्हणतो तेव्हा त्यात ब्राह्मण ही जात स्पष्टपणे अधोरेखित होत असते. परंतु क्षत्रिय, वैश्य या वर्गांचंही जातीत रूपांतर झालं आणि त्यांनीही बहुजनांचं दमन केलेलं असलं तरी तशा अर्थाचा शब्द रूढ झालेला नाही. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर मराठा वर्चस्व हा शब्दप्रयोग नक्कीच करता येईल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ही पूर्वपीठिका मांडण्याचं कारण सध्याचा जातीय तणाव हेच आहे. हिंदू-मुस्लिम धार्मिक तणाव, कट्टर डावे, डावे-उदारमतवादी आणि कट्टर उजवे, उजवे-उदारमतवादी हा एक तणाव व हिंदूंमधील जातीय तणाव (ज्यात प्रामुख्याने ब्राह्मण-ब्राह्मणेतर तणाव दिसतो) हे तीन प्रकारचे तणाव प्रखर झालेले असताना प्रत्येक तणावाकडे त्यातील बारकावे समजून घेत पाहणं आणि त्यावर चिंतन करणं गरजेचं झालं आहे. भारताची सामाजिक वीण समंजस आणि सहिष्णू आहेही आणि नाहीही, आज ती 'नाही'कडे झुकल्याचं दिसतं. आपल्याला 'आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन्स' हवे आहेत, 'कोअर्सिव्ह इंडियन्स' नको आहेत. त्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकानं उपायांचा शोध घेणं आवश्यक आहे. ब्राह्मणीकरण, ब्राह्मणांचं सांस्कृतिक वर्चस्व हा विषय नव्याने चर्चेत आला असला तरी तो आहे जुनाच. मला याबाबत असं प्रामाणिकपणे वाटतं की जोवर ब्राह्मण मोठ्या संख्येने आपणहून पुढे येऊन गतकाळातील दलित-बहुजनांवरील अन्यायाबाबत आणि आजच्या विस्कटलेल्या परिस्थितीबाबत बोलणार नाहीत, क्षमा मागणार नाहीत, जोवर ते स्वतःहून चार पावलं पुढे येऊन संवाद सुरू करणार नाहीत आणि हे करत असताना स्वतःला दलितांवर न थोपवता त्यांच्या मनातील राग, खळबळ समजून घेणार नाहीत तोवर हा तणाव संपणारा नाही. (हाच मुद्दा इतर उच्चवर्णीयांनाही लागू आहे.) दुसऱ्या बाजूने दलित-बहुजन आपल्या विचारविश्वातून 'ब्राह्मण' हा शब्द, ही संकल्पना वगळून 'स्वतःतील सामर्थ्याची स्वतंत्र, स्वयंभू ओळख, स्वतःकरताचा स्वतंत्र रोड-मॅप आणि त्याकरता लागणाऱ्या संसाधनांची जुळवाजुळव' या गोष्टींना अधिक स्पेस देत नाहीत तोवर त्यांचं मानस मुक्त होऊ शकणार नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एक गोष्ट सरळ आहे. 'जात' हे ज्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, वास्तव आहे, रचनेचा अनेकपैकी एक आधार आहे, तिथे 'जातीय दृष्टीने' गोष्टी पाहिल्या जाणार नाहीत, आकळून घेतल्या जाणार नाहीत हे म्हणणं आणि म्हटलं तर मान्य होणं अवघड आहे. 'प्रजनन' हा सजीवांचा एक मुख्य गुणधर्म आहे. त्याच्याशी जोडलेला मुद्दा नर-मादी संबंधांचा आहे - मानवसमाजाच्या संदर्भात विवाहसंस्थेचा आहे. विवाहसंस्थाच जिथे जातीने ड्राइव्ह केली जाते (केवळ माणूस नाही तर आपल्या जातीचा माणूस जन्माला घातला जातो) तिथे जगण्याच्या इतर अंगाकडेही कधी जाणिवेच्या तर कधी नेणिवेच्या पातळीवर जातीय दृष्टिकोनातून पाहिलं जाणार यात आश्चर्य नाही. मुद्दा हा की शांततामय मानवी सहअस्तित्वाच्या, स्वांतत्र्य आणि समतेच्या मूल्यांच्या संदर्भात ही गोष्ट म्हणजे आपला 'वीकनेस' आहे हे कळलं की त्यावर करायचं काय? भिंत नको आहे म्हणताना ती पाडताही येत नाही असं लक्षात आलं की करायचं काय?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हा विषय अर्थातच नाजूक आहे. दलित-बहुजनांसाठी व्यवस्थात्मक आव्हान मोठं आहे. त्यामुळे या एकूणच परिस्थितीवर गंभीरपणे विचार करणाऱ्यासाठी समजून घ्यावेत असे अनेक बारकावे आहेत. कुठलाही तणाव आहे त्याच स्थितीतही राहू शकतो, तो डिस्ट्रक्टिव्ह होऊ शकतो किंवा तो कमी होऊन त्यातून काही कंस्ट्रक्टिव्हही घडू शकतं. निवड अर्थातच आपल्याला करावी लागते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
- फेसबुक पोस्ट</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-42984109146342402792020-02-07T09:31:00.000-08:002020-05-01T00:40:33.111-07:00तुकड्या-तुकड्यातला पुरूष<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
'लिंगाधारित वर्गीकरण' हा मानव समूहामधील वर्गीकरणाचा एक पूर्णतः जैविक पाया असलेला प्रकार आहे. आर्थिक-सामाजिक-राजकीय वर्गीकरणाचा तिथे संबंध पोचत नाही. एखादी स्त्री किंवा एखादा पुरूष हिंदू, मुस्लिम, पारंपरिक, आधुनिक, लोकशाहीवादी, हुकूमशाहीवादी काहीही असले तरी 'स्त्री' आणि 'पुरूष'च राहतात. 'जेंडर' - लिंगभाव - ही आज एका जागी घट्ट उभी असलेली संकल्पना म्हणून अस्तित्वात नाही. ती एक प्रवाही संकल्पना म्हणून पुढे येते आहे आणि लिंगविशिष्ट आग्रह, भिन्नलिंगी संबंधांनाच सामाजिक मान्यता या सगळ्याला आव्हान देते आहे. लिंगभाव प्रवाही होण्याच्या काळात 'स्त्री' आणि 'पुरूष' ही ठळक विभागणी मला खरं तर काहीशी अपुरी वाटू लागली आहे. पण स्त्री व पुरूष या 'पुरातन जैविकते'चं संख्यात्मक प्राबल्य लक्षात घेता या प्रमुख विभागणीभोवती एक मोठं सामाजिक चर्चाविश्व फिरत राहिलं आहे. यातील दुसरा मुद्दा - किंवा विभागणीचा दुसरा निकष - पुनुरुत्पादनाचा आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या उत्क्रांतीमध्ये लैंगिक पुनुरुत्पादन हा कळीचा घटक ठरला आहे. जीवसृष्टीच्या एका आदिम अवस्थेत अलैंगिक पुनुरुत्पादन अस्तित्वात होतं. काही सजीवांमध्ये लैंगिक पुनुरुत्पादन कसं विकसित झालं हा एक मोठाच अभ्यासविषय आहे. परंतु लैंगिक पुनुरुत्पादन सुरू झाल्यानंतर स्त्री आणि पुरूष या संकल्पना अस्तित्वात आल्या असं म्हणता येईल. त्यांच्या अस्तित्वावर पुढे समाजव्यवस्थेने अनेक आवरणं अर्थातच चढवली. पण आपण जर आदिम स्वरूपाकडे गेलो तर ते लैंगिक पुनुरुत्पादनाशी जोडलेलं आहे असं दिसेल. स्त्री ही अशी आहे, पुरूष हा असा आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यातला एक धागा त्यांच्या उत्क्रांतीशी जोडलेला असतोच. तो धागा कमी-अधिक प्रमाणात कच्चा-पक्का असू शकतो. पण तो नसतोच असं म्हणणं धाडसाचं आहे. 'शेवटी तो पुरूषच', 'शेवटी त्याने आपला रंग दाखवलाच' असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपण त्याच्या 'पुरूष असण्याच्या' काही मूलभूत गुणधर्मांकडे निर्देश करत असतो. असे काही गुणधर्म जे सामाजिकतेच्या आवरणाखालून डोकं वर काढत असतात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'मला पुरूष कसा दिसतो?' किंवा 'मला आकळलेला पुरूष' या प्रश्नांवर विचार करताना मला सिमॉन द बोवा या प्रख्यात असित्ववादी, स्त्रीवादी विचारवंताच्या प्रसिद्ध विधानाची आठवण होते. (विचारवंत या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप माहीत नाही. बहुधा नसावं. स्त्री-पुरूष विभागणी केवळ जैविक-सामाजिक नाही तर शाब्दिकही आहे! खरं तर भाषेच्या रचनेतून आणि वापरातून ही विभागणी अधिक घट्ट व्हायला मदत झाली आहे असं म्हणायला वाव आहे. सांस्कृतिक विकासाची बरीच अंगं असतात. हे त्यातलंच एक. असो.) 'स्त्री ही जन्मत नाही. स्त्री घडवली जाते.' असं ते विधान आहे. हे विधान इतरही संदर्भात खरं ठरेल. चोर किंवा खुनी जन्मतःच चोर किंवा खुनी असतो की तो तसा 'घडतो' असा विचार केला तर बहुतांश उदाहरणात तो 'घडतो' असं आपल्याला दिसेल. इथे व्यक्तीला दोषमुक्त करण्याचा उद्देश नसून व्यक्तीतील दोष हे पूर्णपणे त्याचे आहेत की ते विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून निर्माण झाले आहेत हे तपासण्याचा उद्देश आहे. पुरूषांबाबतही हे विधान करता येईल असं मला वाटतं. आज जो 'पुरूष' दिसतो आहे तो मुळातूनच तसा आहे की त्याच्यावर अनेक सामाजिक आवरणं चढली आहेत? याचं उत्तर संमिश्र आहे. पण सामाजिक आवरणं का चढवली गेली आहेत हा मात्र नेमका आणि गंभीर प्रश्न आहे. आणि तिथे हे मान्य करायला हवं की मानवी अस्तित्वाच्या लढ्यापासून आजवर आपण जे जे प्रमुख व्यवस्थात्मक, संकल्पनात्मक टप्पे अनुभवले त्यात पुरूषाचा वाटा मोठा आहे. माणसाच्या राजकीय, सांस्कृतिक इतिहासाकडे नजर टाकली तर तो पुरूषाने प्रभावित केलेला आहे; किंबहुना पुरूषाने डिझाइन केला आहे असं आपल्याला दिसेल. मानवी समाजव्यवस्था स्त्रीप्रधान होती व नंतर ती पुरूषप्रधानतेकडे गेली असं अनेक संशोधक सांगतात. हा स्वतंत्र अभ्यासविषय आहे, परंतु गेल्या काही शतकांचा ज्ञात इतिहास प्रामुख्याने पुरूषांच्या वर्चस्वाची आणि हे वर्चस्व अबाधित राहावं म्हणून झालेल्या संघर्षाची कथा सांगतो. शेतीचा शोध लागल्यावर अतिरिक्त उत्पादन तयार होऊ लागलं आणि तिथून खासगी मालमत्ता, श्रमविभागणी, समाज वर्गांमध्ये विभागला जाणं या गोष्टी घट्ट होऊ लागल्या. या भल्यामोठ्या प्रवासात पुरूषाची मुख्य भूमिका जनक, संरक्षक, पुरवठादार, नियोजक, संघटक, नियंत्रक अशी राहिली आहे. (यातली 'नियंत्रक' ही भूमिका महत्त्वाची आहे. इतर भूमिकांमध्ये स्त्रीदेखील होती, पण परिणामकारक, कळीच्या बाबींवरील नियंत्रण तिच्याकडे नव्हतं.) धर्म, राज्यसंस्था, राष्ट्र या संकल्पना व त्यानुसारच्या व्यवस्थांचं जनकत्वही पुरूषाकडे जातं. आज समाजजीवनाचे विविध आयाम पुरूष प्रभावित राहिले आहेत याचं कारण या ऐतिहासिक वाटचालीत आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पण मग गुणात्मकदृष्ट्या पाहिलं तर पूर्वीचा - म्हणजे खूप मागे न जाता शंभर-दोनशे वर्षांपूर्वीचा - पुरुष आणि आजचा पुरूष यात काहीच फरक पडला नाही का? तर पडला. तो सकारात्मकही आहे. सामाजिक प्रबोधनाबरोबरच बदलत्या कुटुंबव्यवस्थेमुळे, आर्थिक आघाडीवरील अपरिहार्यतेमुळे घरकामात सहभाग, समताधिष्ठित मूल्यांची जाणीव, एकूण मानसिकेतेमधील बदल याबाबत पुरूषांमध्ये बदल झालेला दिसतो. मात्र त्याच्या 'डिफॉल्ट सेटिंग'मध्ये नक्की किती फरक पडला आहे हे तपासावं लागेल. यासाठी पुरूषाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला हरकत नाहीच, न्यायाची निकड म्हणून त्याला दोषी ठरवायलाही हरकत नाही, परंतु 'व्यापक विश्लेषण; करताना 'स्पेसिफिक’ (विशिष्ट) विश्लेषण चुकत नाही ना; किंवा ते राहूनच जात नाही ना हेही तपासणं आवश्यक आहे. आपल्याला जे जे सामाजिक प्रश्न दिसतात, ज्या गोष्टी टोचतात त्यातील काही गोष्टी आजार नसून 'आजाराची लक्षणं' असतात. मूळ आजार वेगळा असतो आणि त्याला त्याचा एक इतिहास-भूगोल असतो. अल्बर्ट आइन्स्टाइनचं एक प्रसिद्ध विधान आहे - 'प्रश्न ज्या पातळीवर निर्माण झाला आहे त्याच पातळीवर उभं राहून तो सोडवता येत नाही. त्यासाठी ती पातळी सोडून वरच्या पातळीवर जावं लागतं.' त्यामुळे समाजात, विशेषतः पुरूषांमध्ये, आहे त्याच आर्थिक-राजकीय व्यवस्थेत राहून अधिक टिकाऊ स्वरूपाचे मूल्यात्मक बदल होतील असं मानणं थोडं भाबडेपणाचं होईल. ते अजिबात शक्य नाही असं नाही, पण त्याला एक मर्यादा नक्की आहे. दैनंदिन जगण्यातील अनेक अपरिहार्यतांमध्ये अडकलेला माणूस त्यातून बाहेर पडून शांतपणे सम्यक विचार जोवर करू शकत नाही तोवर मूल्यात्मक बदल संथगतीनेच होतील. आज माणसाच्या जगण्याचा प्रमुख आयाम आर्थिक आहे. माणसाच्या विचारविश्वाचं पहिलं नियमन आर्थिक चौकट करते. त्यामुळे आर्थिक क्षमता हीच जर अस्तित्वाची मुख्य कसोटी असेल तर इतर गोष्टींकडे लक्ष जाण्याइतपत अवकाशच मिळू शकणार नाही. हेच लग्नासारख्या सामाजिक चौकटीबाबतही म्हणता येईल. स्त्री-पुरूष संबंधांचं समाजमान्य प्रकटीकरण फक्त विवाहातूनच होणार असेल तर ती चौकट दोघांनाही जाचक ठरेल. या चौकटीशिवायचं स्त्री-पुरूष नातं हे अधिक स्वतंत्र, सहज आणि सक्षम असेल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'मला आकळलेला पुरूष' याच्या पोटात 'कुठल्या चौकटीतला पुरूष' हे अध्याहृत आहे. माझ्या घरासमोर रस्त्याचं खोदकाम करणारा कंत्राटी मजूर, ड्रेनेज सफाई करणारा आणि ती सफाई दारू प्यायल्याशिवाय करता येत नाही म्हणून दारूची सवय लागलेला कामगार, अनेक वर्षं कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर वर चढत गेलेला माझा जवळचा मित्र, साहित्यक्षेत्रात नाव कमावलेला लेखक मित्र, स्त्री चळवळीशी जोडलेला कार्यकर्ता मित्र, मी आजवर जिथे जिथे नोकरी केली तिथले माझे बॉसेस, माझ्या घरात ज्याने फर्निचरचं काम केलं तो बिहारमधून महाराष्ट्रात आलेला सुतार, अनेक वर्षं सामाजिक-राजकीय क्षेत्रात राहून सत्तेच्या जवळ गेलेला माझ्या परिसरातला राजकारणी, माझ्या घरी फूड डिलिव्हरी किंवा कुरियर डिलिव्हरीसाठी येणारे वीस ते पन्नास अशा वयोगटातील पुरूष, गेली अनेक वर्षं नियमित येणारा पोस्टमन हे सगळे पुरूष मला वेगवेगळी कथा सांगतायत. (माझ्या घरी धुणं-भांडी करणाऱ्या मावशीदेखील मला एक कथा सांगतात. स्वतंत्रपणे मला हे सगळेजण कळतात, त्यांच्या अडचणी, त्यांच्यातील फरक आणि साम्यस्थळे कळतात. पण मला सर्वाधिक अस्वस्थ करते ती ज्या व्यवस्थेने हे एकत्र बांधले गेले आहेत (आणि जी बहुतांशी पुरूषांनीच लावली आहे) ती व्यवस्था. मला असं दिसतं की ही व्यवस्था स्त्री आणि पुरूष घडवते आहे आणि या व्यवस्थेच्या चौकटीचं प्रतिबिंब त्यांच्या वर्तनावर, व्यक्तिमत्वावर पडतं आहे. आज पुरूष हा एक 'स्त्री प्रश्न' असला तरी पुरूषाचेही प्रश्न आहेतच. मुद्दा 'वेटेज'चा आहे आणि त्यावरूनच प्रश्नाचं गांभीर्य ठरत असतं हे बरोबर. मुद्दा असा की सामाजिक इतिहास आणि वर्तमान असंख्य 'गिव्ह अँड टेक'च्या परिणामांमधून आकारास येत असतं. म्हणूनच ते समजून घ्यायचं तर सरसकटीकरण टाळून 'स्पेसिफिक'वर बोलावं लागेल. लक्षणांवर मर्यादित चर्चा करून आजारावर अधिक चर्चा करावी लागेल. आज मला आकळलेला पुरूष हा इतिहास-वर्तमानाचं ओझं घेऊन जगणारा, तुकड्या तुकड्यातला पुरूष आहे. त्याला एकसंध करायचं तर आपल्याला एकत्रितपणे पुरूषविशिष्ट वृत्तीसह आजच्या व्यवस्थेवरही काम करावं लागेल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(लोकसत्ता 'चतुरंग', ७ फेब्रुवारी २०२०)</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-63491391487948329132020-01-01T04:58:00.000-08:002020-05-05T05:02:27.216-07:00विनोद हाजिर हो<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
"आयुष्यात काही गोष्टींची संगती लावायची नसते. मुळात आयुष्याची तरी संगती लावावी का हाच एक घनगंभीर प्रश्न आहे. पण सध्या तो विचारार्थ घ्यायला नको. 'काही गोष्टी' या सदरात येणाऱ्या गोष्टींच्या विविध कॅटॅगरीज आहेत. त्यातल्या काही आपल्याला झेपत नाहीत, काही त्रासदायक ठरतात, काही अर्थहीन वाटतात, काही घरातल्या तर काही बाहेरच्या माणसांबरोबर होणाऱ्या आदानप्रदानातून समोर येतात, काही फेसबुकच्या वॉलवर येऊन छळ मांडतात तर काही समोर न आल्यामुळेच वैताग आणतात....त्यामुळे त्यावर आपण किती एनर्जी खर्च करायची हे आपण नीट विचार करून ठरवावं...." मी मन्याला समजावून सांगत होतो की त्याला आणखी डिस्टर्ब करत होतो हे माझं मलाच नीट कळेना. म्हणून मग थांबलो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मन्या तसा शांत होता. त्याने 'कितना हुआ?' असं विचारत चहाचे पैसे दिले आणि एक सिगरेट विकत घेऊन "चल , मार्गस्थ होऊ" असं मला म्हणत चालू लागला. 'मार्गस्थ' हा शब्द वापरल्याने हा आता ठीक झाला आहे असं माझ्या मनाने घेतलं. पण पाच एक मिनिटं झाली तरी तो काही बोलेना. म्हणून मग शेवटी मीच म्हटलं, "मला असं वाटतं मन्या की एका कॉमेंटमुळे तू खरंच इतकं अस्वस्थ व्हायचं कारण नाही."</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हो. इन प्रिंसिपल मलाही पटतंय ते. पण प्रिंसिपल्सना 'काही गोष्टी' कळत नाहीत ना!" मन्याच्या विधानात विनोद होता, पण सुरात उद्वेग होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
फेसबुकच्या वॉलवरील कॉमेंट्सचा 'जिव्हार' या ठिकाणाशी जवळचा संबंध आहे हे जाणकारांना माहीत असेल. मन्याच्या बाबतीतही तेच घडलं होतं. शिवाय काय बोललं गेलं आहे यापेक्षा कोण बोललं आहे हे वरचेवर वरचढ ठरत आलंय. एक तर फेसबुकच्या प्रांगणात खेळापेक्षा खरचटणं जास्त. त्यातून मन्याच्या पोस्टवर कमेंट करणारी स्मिता होती. त्यातून कमेंट पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्यावर होती.स्मिताला पुलंचं अॅव्हर्जन नसलं तरी मन्याइतकं पुलंवर प्रेमही नव्हतं. साहित्य हा दोघांना एकत्र आणणारा फॅक्टर असला तरी तोच अधेमधे दोघांना काही काळ दूरही नेत असे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'पुलंचा विनोद निर्विष होता यावर पुनर्विचार करायला हरकत नाही. विशेषतः पुरूषांनी. अर्थात त्यांना प्रेमात पडल्यावर विचार-पुनर्विचार या गोष्टी जमत असतील तर...' अशी स्मिताची कमेंट होती. मन्याने लिहिलेल्या पुलंवरील एका क्रिटिकल तरी कौतुककेंद्री पोस्टवर. त्यामुळे मन्याचा फ्यूज उडला होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मला हे मान्यच आहे की गिव्हन युवर फीलिंग्ज अबाउट हर, तिच्याशी बोलणं तुला अवघड वाटत असेल. पण बोलल्याशिवाय पर्यायही नाही..." मी म्हटलं. सिगरेट संपूनही मन्याकडून एकही शब्द न आल्याने बोलणं भाग होतं. "आणि अर्थात फेसबुकवर नाही. प्रत्यक्ष. किमान फोनवर तरी." मी पुढे म्हटलं. निर्णायक सुरात.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मन्या आणि स्मिताबद्दल - म्हणजे ते दोघे एकत्र असण्याबद्दल - मला एक सुप्त, संथ आकर्षण होतं. आणि बहुधा असूयाही! दोघे तसे वेगळे होते, पण प्रेमही घनदाट होतं. स्मिताबद्दल थोडं अधिकचं आकर्षण होतं. कारण तिची सेन्सिबिलिटी जास्त टोकदार होती. मन्या क्रिएटिव्ह होता, पण 'व्हिजन' वाइज अंमळ 'अधूरा' वाटे मला कधीकधी. अर्थात आद्य मित्र म्हणून मन्याचं स्थान वरचं होतंच. असो. गोंधळ वाढतोय असं वाटतंय. असोच.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यानंतरचा सीन लवकरच घडला. म्हणजे तो माझ्याकडून घडवून आणला गेला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ. वीक डे. शहर फुटल्यासारखा ट्रॅफिक. त्यातलेच काहीजण उडप्याकडे. आमच्याबरोबर. मी आणि मन्या चहाच्या जोडीने आजूबाजूचा कलकलाट रिचवत स्मिताची वाट बघत होतो. ती ऑफिसमधून थेट येणार होती. आमच्यानंतर दहा एक मिनिटात आलीच. शिरस्त्राण, स्कार्फ इत्यादी आयुधं काढून सेटल झाली आणि म्हणाली, "सो, हिअर आय अॅम!"</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"विचित्र नाही ना वाटलं? मी असं बोलावलं म्हणून?" मी.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"नो. इट वॉज लिटल ड्रॅमॅटिक, बट दॅट्स फाइन..." स्मिता. हसून.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ओके. गुड..." मी मन्याकडे पाहिलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"कळलं मला. हे माझ्या कॉमेंटबद्दल आहे, राइट?" स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हो..." मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्मिता एक क्षण थोडी गंभीर झाली. मग म्हणाली, "फर्स्ट ऑफ ऑल, आय अॅम सॉरी. मला मान्य आहे की असं जनरलायझेशन करायला नको होतं मी. इट वॉज टोटली अननेसेसरी. रियली सॉरी..."</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"कूल. पण पुलंच्या विनोदाबाबत काय?" मन्याने विचारलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"काय?" स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"पुलंचा विनोद निर्विष नव्हता असं तुला खरंच वाटतं?" मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"वेल, पुनर्विचार करू नये इतका तो साधा-सरळ-हार्मलेस आहे?" स्मिताने विचारलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"कम ऑन! तो मुळात विनोद आहे!" 'विनोद' शब्दावर भर देत एक्साइट होत्साता मन्या उद्गारला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"आपण चहा सांगू आधी. तू घेणार ना? की आणखी काही?" मी स्मिताला विचारलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"चहा..." स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मी खुणेनं ऑर्डर दिली आणि मन्या पुन्हा सुरू झाला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मला एक कळत नाही विनोद म्हणजे काय एखादा प्रबंध आहे का की ज्याची उलट-सुलट, तौलनिक वगैरे समीक्षा व्हावी?"</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"प्रबंध किंवा विचारधारा - आयडियॉलॉजी. " मी म्हटलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"राइट. विनोद म्हणजे विचारधारा का?" मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हे ऐकल्यावर स्मिताने तळहात मुडपून हनुवटीखाली ठेवला. सामना रंगणार होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"विचारधारा ही गोष्ट काय फक्त मोठमोठ्या ग्रंथांमधून आणि व्याख्यानांमधूनच फक्त व्यक्त होते का?" स्मिताने विचारलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"पण 'विचारधारा' म्हणजे एक पवित्र खांब आहे आणि त्या खांबाला धरून राहण्यातच आयुष्याची इतिकर्तव्यता आहे असा आग्रह का? विचारधारा आणि विचारधारेचे आविष्कार यात फरक पडू शकतो. त्यातून विसंगती आणि मानून विनोद निर्माण होऊ शकतो." मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हो, पण मूळ विचारधारेला धक्का लागून चुकीचा मेसेज गेला तर काय? पुलंनी स्त्रियांवर विनोद केले, पण त्याचा धक्का स्त्रीवादाला, मुख्य म्हणजे स्त्री चळवळीला लागलाच..." स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"माझा 'वादां'वर आक्षेप आहे तो यासाठीच. सगळे 'वाद' जर अंतिमतः आपल्याला कुणीतरी धक्का लावेल या भीतीखालीच जगत असतील तर मला त्यांच्या क्षमतेविषयी - खरं तर रिलेव्हन्सविषयीसुद्धा - शंका येते." मन्याच्या या स्ट्रोकनंतर टेबलावर थोडी शांतता पसरली. स्मिताही गप्प होती. अचूक वेळ साधून चहा आला आणि शांततेला एक वळण मिळालं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मला असं वाटतं - रादर मला असं दिसतं - की शेवटी सब्जेक्टिव्हिटीच सगळ्यावर भारी पडते. आपला कल, आपली विचारधारेशी बांधिलकी याहीपेक्षा आपल्याला काय वाटतंय, आपली जाणीव विशिष्ट क्षणी, विशिष्ट परिस्थितीत काय सांगतेय आणि काय करायला लावतेय हेच निर्णायक ठरतं. आणि मला वाटतं यात काही चुकीचं नाही." मी एका दमात हे बोललो याचं मलाच आश्चर्य वाटलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हं, हे पटतंय मला. पण विनोद जेव्हा जेंडर, कास्ट, सेक्शुअल ओरिएंटेशन, लुक्स, अपिअरन्स या मोल्डमधून बाहेर येतो तेव्हा तो निखळ विनोद उरतो का हाही एक प्रश्न आहेच." मन्या म्हणाला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ग्लॅड यू सेड धिस." स्मिता सुखावली होती.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हो. आय मीन, समीक्षा दृष्टीने जसं विचारधारांकडे बघायला हवं, तसं विनोदाकडेही बघायला हवं. त्यावर आक्षेप घ्यायचं कारण नाही. पण समीक्षादृष्टी कलासमीक्षेची असावी. विचारधारेने प्रभावित झालेली नसावी." मन्या म्हणाला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हे अवघड आहे. हा एक वेगळा डिबेट तयार होईल. कारण समीक्षा दृष्टी ही अखेरीस एका माणसाची दृष्टी असते. विनोद जसा एका माणसाच्या दृष्टीतून येतो तसंच. त्यामुळे त्या माणसाची घडण - वैचारिक, भावनिक - तिथे आपला प्रभाव दाखवतेच. विचारधारेचा प्रभाव पडणार नाही असं होणार नाही. एखाद्या 'इझम'चा नसला तरी त्या माणसाच्या व्यक्तिगत विचारधारेचा प्रभाव असणारच." स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ओके. म्हणजे मग असं म्हणावं लागेल की सर्व समीक्षा ही सापेक्ष असते कारण ती कुठल्या ना कुठल्या प्रभावातूनच आलेली असते. 'निखळ' समीक्षा असू शकत नाही." मन्याने निष्कर्ष काढला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"याच न्यायाने विनोदही 'निखळ' असू शकत नाही." मी जोड दिली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ही 'निखळ' नावाची भानगड अस्तित्वात तरी आहे का? बहुधा गप्प बसणंच फक्त 'निखळ' असावं." मन्याच्या या रिमार्कवर हसू येणं अपरिहार्य होतं. स्मितालाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
""दॅट्स अ बिग वन, अॅक्च्युअली. हा एक फिलॉसॉफिकल मुद्दा आहे. पण त्याचा फार कीस न पाडता, 'निखळ' असं काही नसलं तरी ठीक आहे, बायस असतोच कारण आपण सगळे वेगवेगळ्या सोशल-मेंटल-मॉरल-इकॉनॉमिकल सेगमेंटमधले असल्याने आपल्या जाणिवा वेगवेगळया घडतात हे मान्य करून पुढे जायला हरकत नाही. या न्यायाने मग खरं तर काहीच मनावर घेऊ नये. पण विनोदाचा किंवा कुठल्याही अभिव्यक्तीचा सेन्सेटिव्ह विषयांवर, सोशली महत्त्वाच्या विषयांवर परिणाम होतो हे नाकारताही येत नाही ना..." स्मिता कंटिन्यूड.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मान्य आहे. म्हणजे आज जवाहरलाल नेहरूंवर खुलेपणानं - निखळपणानं म्हणू..." - इथे मी डोळे मिचकावले - "एखादा विनोद करणं योग्य होणार नाही. याची कारणं आपल्याला माहीत आहेत."</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"करेक्ट! माझाही हाच मुद्दा आहे. स्त्री चळवळ जेव्हा मूळ धरत होती तेव्हा पुलंनी स्त्रियांवर विनोद करणं योग्य होतं का?" स्मिताने विचारलं. प्रश्न भेदक होता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ओके. असं केल्याने चुकीचा परिणाम होतो - झाला - असं मान्य करू. बट देन इझ इट क्राइम? लेखकाचं स्वातंत्र्य - ज्यात विनोद करण्याचं स्वातंत्र्यही आहे - आणि लेखकाची स्वतःची वैचारिक-राजकीय भूमिका यात आपण फरक करणार की नाही? पुलंनी स्त्रियांवर काही विनोद केले हे खरं, पण ते स्त्री स्वातंत्र्याचे विरोधक होते का? त्यांना स्त्री चळवळ निरर्थक वाटत होती का? त्यांनी नेहमीच विसंगतीवर बोट ठेवलं. त्याला स्त्री चळवळ अपवाद नव्हती इतकंच. आणि आता स्त्री चळवळीमध्ये काहीच विसंगती नव्हती असं प्लीज म्हणू नकोस. वैचारिक बैठकीमध्ये विसंगती नसेल, पण माणसांमध्ये विसंगती असणारच..." मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"हं. पण तरी मला असं वाटतं की इट वॉज हार्मफुल फॉर द मूव्हमेंट." स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मला असं वाटत नाही." मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ओके. सो लेट्स अग्री टू डिसअग्री." स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"राइट. असाही विचार कर की आजच्या मूल्यधारणांनी इतिहास जोखणं योग्य आहे का? गे असण्यावरून विनोद व्हायला सुरूवात झाली होती तेव्हा ते अॅप्रिशिएट होत होते. नंतर जाणीव बदलली. डेव्हलप झाली. आता तसे गे जोक्स अॅप्रिशिएट होत नाहीत. तसंच स्त्रियांवरील विनोदाचंही आहे असं मला वाटतं. "अतिविशाल महिला मंडळ' वगैरे आज आवडणार नाहीच. आय थिंक वी शुड लीव्ह सर्टन थिंग्ज टू टाइम अँड नॉट टू आयडियॉलॉजी. आजच्या व्हॅल्यू स्टॅंडर्डने पाहिलं तर इतिहासात अनेकजण व्हिलन ठरतील." मन्या.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्मिता यावर हसली आणि म्हणाली, "मला असा प्रश्न पडतो की व्हाय डू वी नीड हीरोज? जस्ट बिकॉज यू आर अ डाय हार्ड फॅन ऑफ पुलं, त्यांचं मूल्यमापनच करायचं नाही हे का? व्हाय देअर इज धिस अर्ज टू हॅव हीरोज?" स्मिताने कॅल्क्युलेटेड शांतपणे विचारलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"दॅट्स अ व्हॅलिड क्वेश्चन. पण हीरोज तुलाही हवेच आहेत ना? व्हर्जिनिया वूल्फ, सिमॉन द बोवा, गौरी देशपांडे?" मन्याचा प्रश्न.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आता मात्र टेबलावर शांतता पसरली दोनेक मिनिटं. स्मिताला मी ऑब्झर्व करत होतो. देन शी मेड अ गुड पॉईंट.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"ओके. पण तुला खरंच असं वाटतं की यच्चयावत सगळ्या लेखकांना एका मापात तोलता येईल?" स्मिता.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मन्याने इथे 'पटतंय' या अर्थी मान डोलवत स्मिताला दुजोरा दिला. आणि तो पुढे जे म्हणाला त्याला स्मितालाही दुजोरा द्यावा लागला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"मान्य. सगळयाच लेखकांना एका मापात तोलता येत नाही हे खरं. पण तसंच सगळ्या विनोदांनाही एका मापात तोलता येत नाही. विनोद रिजेक्ट करता येतोच, पण त्या लेखकाला फक्त त्या विशिष्ट विनोदाच्या संदर्भात तोलणं बरोबर नाही."</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
"फेअरइनफ. हे मी मान्य करते!" असं म्हणत स्मिताने समेटासाठी करावा तसा हात पुढे केला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एका कॉमेंटमुळे उद्भवलेल्या समरप्रसंगातून आम्ही बाहेर आलो होतो. त्यामुळे साहजिकच उडुप्याकडूनही बाहेर आलो आणि आपापल्या गाड्या काढायला लागलो. स्मिताची गाडी थोडी लांब होती. ती त्या दिशेने गेली आणि आम्ही आमच्या गाड्यांकडे वळलो. तिने हाक मारल्यासारखी वाटली म्हणून पाहिलं तर ती लांबून खुणेने रस्त्याच्या पलीकडचं एक होर्डिंग दाखवत होती. जिमची जाहिरात होती. एक उदास चेहऱ्याची स्थूल मुलगी. 'लूज द वेट, गेन अ बॉयफ्रेंड' अशी हेडलाइन. बाकी तपशील. होर्डिंग पाहिल्यावर आम्ही गाड्या काढून स्मिताजवळ गेलो. मन्या हसत तिला म्हणाला, "पुन्हा आत जायचं का चर्चा करायला?" "नको, नको. मला वाटतं मला निकाल माहितीय. अँड आय होप, तुलाही!" स्मिताही हसून उत्तरली आणि गाडी स्टार्ट करून निघाली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला स्मिता आवडते ते उगीच नाही!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
- पुन्हा स्त्री उवाच, अंक चौथा </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<a href="https://punhastriuvach.blogspot.com/2019/12/blog-post_40.html">https://punhastriuvach.blogspot.com/2019/12/blog-post_40.html</a></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-28672756223310799722019-12-17T00:12:00.000-08:002020-05-10T00:13:41.721-07:00पुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आपलीच असं नव्हे तर जगभरातली आजवरची साधारण समाजव्यवस्था, या व्यवस्थेेने घडवलेलं समाजमानस आणि त्यातून उभे राहिलेले स्त्रियांचे प्रश्न यावर चर्चा होणं, त्यावर काम होणं, सामाजिक सुधारणा होणं, कायद्यात सुधारणा होणं ही प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी मुळापाशी अजून बरंच काम व्हायची गरज आहे याची साक्ष पटवणारे प्रसंग वरचेवर घडत असतात. बलात्कार व हिंसेच्या अमानुष घटनांनी देश हदरून जात असतानाच मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून ज्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे त्यातीलच एका, काहीशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे. ‘छपाक’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडुकोण आपल्याला अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरूणीच्या भूमिकेत भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल या मुलीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालवर झालेला अॅसिड हल्ला आणि तिचा पुढचा लढा आपल्याला दिसेलच, पण या विषयासंदर्भातील प्रमुख प्रश्न अर्थातच 'हे का होतं?' आणि 'हे कसं थांबवायचं?' हे आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सामाजिक गुन्ह्यांमागची कारणं शोधत आपण त्यांच्या मुळाशी जाऊ लागलो की आपल्याला आपल्याच समाजव्यवस्थेतील अनेक कमकुवत धागे दिसू लागतात. त्यामुळे प्रभावित झालेल्या माणसांतील विविधांगी गुणदोष दिसू लागतात. गुन्हेगार हा 'कारण' आहे की 'परिणाम' आहे हाही प्रश्न आपल्याला पडू लागतो. स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते पाहता आपण समाज म्हणून अजूनही स्त्रीच्या मानसिक,शारीरिक उर्मींना पूरक असा पुरूष घडवू शकलेलो नाही हे सिद्ध होतच आहे. अर्थात हे एक ढोबळ विधान आहे. पुरूषांमध्ये बदल झाले आहेत, होत आहेत. आज त्याबाबतचं चित्र आशादायक आहे. मात्र त्याचवेळी विविध स्तरातील पुरूषांसोबत विविध पातळ्यांवर , विविध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे हेही आधोरेखित होतं आहे. स्त्री- पुरुष संबधाचा विचार करताना प्रेम, मैत्री, आकर्षण, लैंगिक इच्छा या भावभावनांचा अनेकविध छटा आणि त्यांचा या संबंधावरील परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की समाजाची घडी ज्याप्रकारे लागत गेली आहे आणि त्यातून ज्याप्रकारे विविध प्रकारच्या विषमतेला मूक मान्यता मिळत गेली आहे. त्यातून स्त्री-पुरूष संबंधावर मोठा परिणाम झाला आहे. स्त्री-पुरूष संबंध हे इतर मानवी संबंधांसारखेच 'द्वंद्वात्मक' आहेत आणि त्याला स्त्री पुरुषांमधल्या आदिम आकर्षणाची जोड आहे. दोन मित्रांमध्ये भांडण झालं की त्यांच्यात वादावादी होईल, कदाचित मारामारीही होईल. इतर वेगवेगळ्या नात्यांबाबत भांडण, मतभेद वेगवेगळी रूप धारणं करतील. स्त्री-पुरूष नात्यातही, म्हणजे रोमँटिक नात्यातही हे लागू होतं. मात्र रोमॅंटिक स्वरूपाच्या नात्यात किंवा त्या नात्याला सुरूवातदेखील व्हायच्या अगोदर स्वत:ला किंवा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याइतपत टोकाचा विचार माणसाकडून का केला जातो हे समजून घेणं, त्यावर बोललं जाणं आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यात माणूस म्हणजे प्रामुख्याने पुरूष अपेक्षित आहे, कारण एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला त्रास देणं, प्रेम नाकारलं गेल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला करणं इथंपासून ते स्वत:चा देवदास करून घेऊन आपलं आयुष्य निराशेच्या गर्तेत लोटून देणं इथवरच्या सर्व प्रकारात पुरूषच अग्रेसर आहेत. यातून 'सामान्यत: पुरूष स्त्रीपेक्षा प्रेमाच्या बाबतील असमंजस व कमकुवत आहे' या विधानाला पुष्टी मिळते. आपल्याला नेमक्या याच मानसिकतेमागील कारणं शोधता यायला हवी आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्त्री-पुरुष संबंधामध्ये प्रेम, आकर्षण ही भावना बऱ्याच गुंतागुंतीची आहे. या भावनांच्या मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय अंगान केलेल्या तपशीलवार विश्लेषणात जाणं आवश्यक आहेच कारण त्याशिवाय त्यांच संपूर्ण आकलन होणं शक्य नाही. (खरं तर आपण आपल्या प्रत्येकच भावनेचा अभ्यास करायला हवा कारण आपल्या भावनाच आपल्याकडून बरंच काही करून घेत असतात). इथे आपण एक अगदी छोटा प्रयत्न करून बघूया. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्त्री-पुरूषांबाबत लैंगिक आकर्षण हा एक आदिम 'फोर्स' आहे. निसर्गाला स्त्री-पुरूष जवळ यायला हवे आहेत कारण त्यातून पुनरूत्पादन होणार आहे. या आकर्षणाच्या वर, मानवी संस्कृतीच्या प्रवाहात जो एक सुंदर स्तर निर्माण झाला आहे तो प्रेमाचा आणि त्याच्या विविध छटांचा आहे. मला असं दिसतं की आज आपल्यासमोरचं आव्हान हे आहे की प्रेम, आकर्षण या संकल्पनांना त्यांच्या कमालीच्या ठोकळेबाज, एकांगी रूपातून बाहेर काढणं आणि त्यांचा अधिक प्रगल्भ, समावेशक अर्थ मुलामुलींच्या मनामध्ये रूजवणं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रेम ही भावना निर्माण कशी होते? आपल्याला अमुक मुलींविषयी जे वाटतं ते प्रेम आहे म्हणजे काय आहे? तिला जर आपल्याविषयी काही वाटतं नसेल तर आपण तिथून मागे का फिरू शकत नाही? एका मुलीने आपल्याला नाही म्हटंले म्हणून आपण तिच्यावर अॅसिड फेकण्याइतके हिंसक का होतो? आपल्या आत असं काय आहे जे आपल्याला इतकं हिंसक बनवतं? हे व असे अनेक प्रश्न पुरूषांनी स्वत:ला विचारणं आणि समाजाने - प्रामुख्याने पालक, शिक्षक, मित्र आणि हितचिंतक यांनी - पुरूषांना त्याबाबत तपासत राहणं फार आवश्यक आहे. स्त्री-पुरूष संबधांना मिळालेलं हिंसेचे हे भयानक परिमाण आपल्याला सामूहिक प्रयत्नानेच नाहीसं करता येईल. मला असं दिसतं की त्यासाठी मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे सतत लक्ष देत राहणं गरजेचं आहे. माणसामध्ये हिंसेची बीज आहेतच. ती पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात आहेत कारण आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या लढाईच्या खूप पहिल्या टप्प्यापासून राज्यव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या अलीकडील टप्प्यापर्यंत पुरूषातील आक्रमकता व वर्चस्ववादी वृत्ती यांनी कळीची भूमिका बजावली आहे. पुरूषामधील हिंसेला जैविक आणि समाजरचनेतून मिळालेला सामाजिक असे दोन्ही आधार आहेत. या दोन्हींना ओळखून त्याविषयी पुरूषांना जागं करत राहणं आणि हिंचेची धार कमी करत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आजवर हे अनेकदा बोललं गेलं आहे की मुलांना विशेष वागणूक देऊन वाढवणं हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी घातक ठरत आलं आहे. त्यामुळे पहिला धडा म्हणून तो आपण लक्षात ठेवायला हवाच. सर्वसाधारणपणे पाहता असं दिसतं की पुरूषामध्ये लैंगिक इच्छा ही स्त्रीपेक्षा जास्त प्रमाणात आपला अंमल गाजवत असते. स्त्री ही 'प्राप्त करण्याची गोष्ट' आहे हे पुरूषाच्या मनोवृत्तीत त्याच्याही नकळत आकार घेत असतं. यात जसा जैविक ऊर्मींचा हात आहे तसाच सामाजिक घडणीचाही हात आहे. त्यामुळे पुरूषाला पारंपरिक पौरूषाच्या कल्पनांपासून जाणीवपूर्वक दूर नेणं हा त्याच्यातील जैविक उर्मीला वळण देण्याच्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक विषमता आणि त्यातून स्त्री पुरूष संबंधांवर होणारे परिणाम हा एक विस्तृत आणि वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर व्यक्तिशः कुणाला काय आणि किती करता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्याला आपल्या नियंत्रणाच्या कक्षेत तरी संवेदनशील, सजग आणि पुरूष असण्याच्या अहंकाराच्या ओझ्यापासून मुक्त असलेला 'माणूस' घडवता येईल का हा विचार आपण सर्वांनी करावा. आपण मुलाला केवळ तो मुलगा आहे म्हणून स्वयंपाकघरातील कामातून सूट देतो का हे तपासण्यापासून त्याचं लैंगिक व मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे चाचपून बघण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होऊ शकतो. अशा गोष्टी ओळखून आपण त्यावर काम सुरू केलं तर ते आपल्या मुलींना आपणच निर्माण केलेल्या या समाजात सुरक्षित वाटण्याच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल ठरेल! </div>
<br />
- दिव्य मराठी 'मधुरिमा' (१७ डिसेंबर २०१९)<br />
<div>
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-68855330927441800462019-12-08T08:44:00.000-08:002020-05-03T08:47:52.528-07:00वास्तवाचा दाह, वास्तवाचं आकलन<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
'बलात्कार' या विषयावर काही लिहायचं, बोलायचं बाकी आहे का हा एक आणि तसं केल्याने काही फरक पडणार आहे का हा दुसरा, असे दोन प्रश्न मनात येतात. ते काहीशा हतबलतेने आलेले प्रश्न आहेत. आपल्या - होमो सेपियन्सच्या - जगण्यात आपण इथवर आलो, नेत्रदीपक प्रगती केली हे अचंबित करत असताना त्या जाणिवेच्या तळातून 'आपण इथवर येऊन चूक केली का?' असा एक विरुद्ध, अस्तित्ववादी प्रश्न डोकं वर काढतो. हा प्रश्न पडायला कारण ठरेल अशा घटना आजूबाजूला घडत असतात. आपणच निर्माण केलेल्या वास्तवाच्या दुखऱ्या बाजू आपल्या 'सिव्हिलाइज्ड' जगण्यावर धडका देत असतात. भौतिक अर्थाने आपलं जगणं पुष्कळ सुखकर झालं आहे हे खरं आहे. आपण तुलनेने पुष्कळ सुरक्षित जीवन जगतो आहोत आणि जीवन सुरक्षित झाल्यावर सुरू झालेल्या सांस्कृतिक प्रवाहाला आपण जगण्याचा भाग बनवलं आहे. परंतु कला-संस्कृतीबरोबर राजकारण-शिक्षण-धर्म-तत्त्वज्ञान-नीती या आणि अशा इतर वर्तुळांमधून आपलं जगणं फिरत असताना खाडकन मुस्कटात मारल्यासारखी एखादी घटना घडते आणि आपण क्षणभर सुन्न होतो. यातला आणखी एक सूक्ष्म भाग असा की शास्त्रीयदृष्ट्या एक - म्हणजे होमो सेपियन - आणि सामाजिकदृष्ट्या शेकडो तुकड्यात विभागलल्या गेलेल्या आपल्यामधील कोण, कधी, कशाने सुन्न होतं हाही एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो मनुष्य या एका प्रजातीचं शतभंग स्वरूप आपल्यासमोर ठेवतो. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हैदराबाद येथील प्रियांका रेड्डी या व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या सव्वीस वर्षांच्या तरूणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्काऱ्यांनी तिचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकला. त्याच दिवशी रांचीमध्ये विधी शाखेच्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि तमिळनाडूतील कांचीपुरम येथे रोजा नावाच्या एका वीस वर्षाच्या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या या घटनांमधील सातत्य नवीन नाही. गेल्या काही वर्षातली अनेक घटनांची यादी आपल्यासमोर आहे. खैरलांजी, दिल्ली, कोपर्डी, कठुआ, उन्नाव ही काही ठळक नावं. अशा घटनांनंतर संतापाची लाट उसळणं, त्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे समजण्याजोगं आहे. असं होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर लोकांकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन होत राहणं हे आश्वासक आहे. मात्र त्याचवेळी या सगळ्या भीषण वास्तवाच्या पोटात नक्की काय आहे आणि जे आहे ते का आहे, त्याचं काय करायचं या प्रश्नाला आपण सामोरं गेलं पाहिजे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बलात्कारासारख्या घटनेचे आरंभ बिंदू वेगवेगळे असू शकतात. अनियंत्रित किंवा विकृत लैंगिक इच्छा, लैंगिक उपासमार, पुरूषसत्ताक व्यवस्थेत घडलेल्या मानसिकतेतून निपजलेला स्त्रीबद्दलचा दूषित दृष्टीकोन, गुन्हेगारी पर्यावरणात वाढल्याने घडलेली आणि ज्याला समाज 'गुन्हा' म्हणतो त्याला गुन्हा न मानण्याची मानसिकता, कधी सेंद्रीयपणे तर कधी सामाजिक पर्यावरणामुळे घडलेली हिंसक वृत्ती अशा विविध सुट्या कारणांपैकी काहींच्या / सर्वांच्या एकत्रीकरणामुळे घडलेलं पुरूषाचं मानस बलात्काराच्या मुळाशी आहे. इथे आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. 'सामान्यीकरण' हा सत्यशोधनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या ज्ञानाचा शत्रू आहे. 'स्त्री अशी असते', 'पुरूष असा असतो' अशी विधानं किंवा या गृहीतकांवर आधारलेलं चित्रण ललित लेखनात करायला हरकत नाही, पण सामाजिक संशोधनात ते होऊ नये. दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की स्त्रीविशिष्ट आणि पुरूषविशिष्ट असे काही गुणधर्म आहेत. ते जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रभावांमुळे तयार होत असतात. एखाद्या विशिष्ट घटनेचं विश्लेषण करताना त्यामागे हे गुण कार्यरत होते का हे तपासण्याची काळजी मात्र घ्यायला हवी. बलात्काराच्या गुन्ह्यांमागे जे पुरूषी मानस आहे ते तसं का घडत गेलं आहे याचा विचार केल्याशिवाय त्यावर उपाय करणं शक्य होणार नाही आणि परिणामी बलात्कार थांबणारही नाहीत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपण जेव्हा 'का?' हा प्रश्न सतत विचारतो तेव्हा आपण मुळापाशी जाऊ लागतो. बलात्काराचे गुन्हे थांबत नाहीत हे वास्तव या प्रश्नाच्या मुळापाशी आवश्यकतेइतकं काम झालेलं नाही या दुसऱ्या वास्तवाची साक्ष देतं. एकीकडे मूल्याधारित विचार रूजवण्यासाठी प्रबोधनाच्या अंगाने काम होत राहणं आणि दुसरीकडे व्यवस्थेच्या पातळीवर कायदा, सुरक्षेचे विविध उपाय या अंगाने काम होत राहणं आवश्यक आहे. (प्रबोधनाची चळवळ आणि प्रशासन दोन्हीकडून दोन्ही अंगाने कामं होऊ शकतातच). परंतु समाजाच्या विषम रचनेचं काय? पराकोटीची आर्थिक विषमता असताना, त्या विषमतेमुळे लोकांचं जगणं, त्यांचे विचार प्रभावित होत असताना मूल्यविचारांबाबत सगळेजण एकाच पातळीवर यावेत ही अपेक्षा फोलच ठरणार. जगण्याकरताच जर लढाई करायला लागत असेल तर मूल्यांचं महत्त्व कमीच होत जातं. याचा अर्थ मूल्यविचार महत्त्वाचा नाही असं अजिबातच नाही, पण त्याच्या प्रसाराला मर्यादा आहेत, तो विचार उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडणार याची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. मूल्यविचार आणि वास्तवाचं स्वरूप यांच्यातला झगडा कमी व्हायचा असेल तर मूल्यविचारांचा निव्वळ पुरस्कार करून चालणार नाही. त्याकरता वास्तवाच्या डोहात उतरावं लागेल. बलात्काराच्या बऱ्याचशा घटनांमधील गुन्हेगारांची सामाजिक -शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर हे लक्षात येईल. समाजाच्या या 'अंडरबेली'पर्यंत आपण - बुद्धिवंत आणि विचारी लोक - पोचलेलो नाही. याला अपवाद अर्थातच असतील. शिवाय यात व्यावहारिक अडचणी असू शकतील. इतरही कारणं असतील. पण जिथे काम होणं गरजेचं आहे तिथे ते होत नसेल तर आहे त्या चित्रात फारसा बदल होणार नाही. एका बाजूला लेख लिहिले जातील, चर्चा होतील, मतं व्यक्त केली जातील आणि काही दिवसांनी पुन्हा बलात्काराची बातमी येईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हा निराशावाद नाही. पण यात थोडी हताशा जरूर आहे. आपण समग्रपणे गोष्टी समजून घ्यायला समाज म्हणून कमी पडतोय या जाणिवेची रूखरूख आहे. यादसंर्भात 'लैंगिकता आणि पुरूषाची प्रकृती' या एका गोष्टीबाबत आपण आपलं आकलन जर वाढवलं तर या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी मिळेल आणि आपला विचार योग्य दिशेने जाईल असं वाटतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
इंग्लिशमध्ये 'मेल इरेक्शन हॅज नो कॉन्शन्स' असा एक वाक्प्रयोग आहे. इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट ही की कॉन्शन्स नसणं हे योग्य आहे असं इथे म्हणायचं नाही. 'कॉन्शन्स नसतो' ही वस्तुस्थिती फक्त सांगायची आहे. पुरूषांची लैंगिक इच्छा चाळवली जाण्याचे अनेक प्रकार विविध माध्यमांमधून उपलब्ध असले तरी पुरूषाच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे याचा फारसा अभ्यास होताना दिसत नाही. (स्त्रीच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे यावरही अभ्यास होत नाही. पुरूषाचा उल्लेख करण्याचं साधं कारण हे की त्याची लैंगिक इच्छा धोकादायक वळणं घेते हे अनेक वेळा दिसलं आहे.) इरेक्शन असलेला, येऊ घातलेला पुरूष त्याच्या 'नॉर्मल' रूपाहून वेगळं रूप धारण करू शकतो. पुरूषाची लैंगिक इच्छा ही 'इंसर्टिव्ह' स्वरूपाची असते तर स्त्रीची 'रिसेप्टिव्ह' स्वरूपाची असते. पुरूषाला 'आतलं बाहेर' टाकायचं असतं आणि स्त्रीला 'बाहेरचं आत' घ्यायचं असतं. स्त्रीदेखील लैंगिकदृष्ट्या अतृप्त असूच शकते. पण त्यामुळे ती हिंसक होताना दिसत नाही. पुरूषाबाबत हा 'फोर्स' फार मोठ्या प्रमाणावर काम करतो आणि प्रसंगी त्याच्या विवेकालाही खाऊन टाकतो याच्या मुळाशी लैंगिक संबंधांमधून प्रजोत्पादन होतं हे कारण आहे. तो 'फोर्स' इतक्या ताकदीचा आहे कारण आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती केलेली असली तरी आपण प्रजोत्पादन अजूनही लैंगिक संबंधांतूनच करतो आहोत. त्याला अनुसरून स्त्रीचं व पुरूषाचं जे मानस घडलं आहे, जी वृत्ती घडली आहे त्यात अद्याप मोठा बदल झालेला नाही. स्त्रीमध्ये तिचं बीज मासिक पाळीद्वारे बाहेर पडतं तर पुरूषामध्ये ते वीर्यस्खलनाद्वारे बाहेर पडतं. पुरूषबीजाचा संयोग स्रीबीजाशी होणार नसला तरी त्याला शरीराबाहेर पडावंच लागतं. सुरूवातीला पाहिलं त्याप्रमाणे पुरूषाच्या मनात बलात्काराच्या आरंभ बिंदूंचं जे मिश्रण कार्यरत असतं त्यात हा एक जैविक भाग कार्यरत असतो. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पण म्हणजे मग जैविक प्रेरणा म्हणून पुरूषांना कायम सूट द्यायची का? अजिबात नाही. पण ही जैविक प्रेरणा आहे याची जाणीव त्यांना आणि स्त्रियांना करून द्यायची. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की लैंगिक इच्छेबाबत, त्यातून येणाऱ्या अवघडलेपणाबाबत नुसतं तोंडाने बोललं तरी तो ताण हलका व्हायला मदत होते. ती इच्छा 'डायव्हर्ट' करण्याचे मार्ग शोधता येतात. लोकसत्ता 'चतुरंग'मधील २०१८ सालच्या माझ्या सदरातील एका लेखात मी पुरूषांसाठी 'सेक्स ऑडिट' करावं असं सुचवलं होतं. त्यावर खरोखर विचार व्हावा. बलात्काराचा विचार करताना 'एक अत्यंत आदिम, सहज क्रिया - ज्यात खरं तर अगदी सौम्य स्वरूपाची हिंसाही अंतर्भूत असू शकते - ती इतक्या टोकाच्या हिंसकतेकडे जाते आहे याचा अर्थ पुरूषांच्या मनात आणि आपल्या सामाजिक रचनेत काहीतरी मोठी गडबड होतेय का' हा विचार आपण केला तर आपल्याला काही उत्तरं मिळू शकतील. इथे आपल्याला पुरूषाची लैंगिकता, पुरूषसत्ताक व्यवस्थेने घडवलेली त्याची वर्चस्ववादी वृत्ती, त्यातून स्त्रीकडे 'माणूस' म्हणून न पाहता निव्वळ 'माझ्या इच्छापूर्तीचं साधन' म्हणून पाहण्याची लागलेली सवय, परिस्थितीजन्य कारणं या सगळ्याचा सुटा सुटा आणि एकत्रित दोन्ही प्रकारे विचार करायला हवा. बलात्कारांच्या अनेक केसेस समोर घेऊन त्यामागील नेमक्या कारणांचा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करायला हवा. समाजातील पुरूषांच्या कोणत्या 'सेगमेंट'वर काम करण्याची जास्त गरज आहे हे शोधायला हवं. पुरूषांच्या वर्तनाचे तपशील, त्यातील वीक पॉईंट्स समजून घ्यायला हवेत. पुरूषांनी त्यांच्या लैंगिक मनोविश्वाला पोर्नोग्राफी, अचकट-विचकट विनोद, स्त्रीचं वस्तूकरण यात बंदिस्त न करता हे मनोविश्व सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग व्हायला हवं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बलात्काराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सार्वजनिक चर्चाविश्वात 'स्त्री विरुद्ध पुरूष' असं एक चित्र उभं राहिल्यासारखं दिसतं. अर्थात हे चित्र केवळ याच संदर्भात उभं राहतं असंही नाही. स्त्रीवादी सिद्धांतनातून पुरूषसत्ताक व्यवस्थेची जी चिकित्सा झाली आहे आणि पुरूषांसमोर जो आरसा धरला गेला आहे त्यातून दिसणारं आपलं रूप मान्य न करण्याच्या पुरूषांच्या अहंकार प्रेरित वर्तनातूनही हा संघर्ष उभा राहतो आहे. दुसऱ्या बाजूने पाहता स्त्रीवादी सिद्धांतनाचं उपयोजन स्त्री-पुरूष संबंधातील प्रत्येक आयामाला लावण्याच्या आग्रहातूनही हे होत आहे. खरं तर वैचारिक संघर्षातून सामाजिक आकलन अधिक नेमकं होत जाणं अपेक्षित आहे, पण तसं न होता शत्रुभावी विचार प्रबळ होताना दिसतो आणि ते धोक्याचं आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विविध सामाजिक समस्या आपल्यासमोर आपल्या 'प्रगत मेंदू'ला आव्हान देत उभ्या असतात. आपला देश एकाच वेळी अनेक शतकांमध्ये जगत असल्याने इथल्या सामाजिक प्रश्नांचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेताना एकांगी विचार करण्याचं टाळणं, संख्याशास्त्रीय माहितीचा आधार घेणं, सरसकटीकरण न करता 'स्पेसिफ़िसिटी' लक्षात घेणं आणि कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी 'फिल्ड'वर उतरणं याला पर्याय नाही. बलात्काराबाबत बोलायचं झालं तर भारतीय पुरूष हा भारतीय स्त्रीचा ऐतिहासिक गुन्हेगार आहे यात शंकाच नाही. परंतु त्याला गुन्हेगार राहू न देण्यासाठी आजच्या भारतीय स्त्रीने 'पुरूष प्रबोधना'च्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवायला हवा. ही तिला केलेली विनंती आहे. तिच्या सहभागाशिवाय 'पुरूषांचं सक्षमीकरणा'ला प्रबोधनाच्या चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख स्थान मिळणार नाही! </div>
<div style="text-align: justify;">
<br />
- लोकसत्ता 'लोकरंग' (८ डिसेंबर २०१९)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-6152795886258982342019-11-10T21:14:00.000-08:002020-05-04T02:20:04.285-07:00उदारमतवादाचा प्रवास आणि हिंदुत्ववादाचा थांबा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
वसंत पळशीकर यांचा 'गोध्रा'या शीर्षकाचा एक लेख 'नवभारत'च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या 'गोध्रा' या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये [प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या 'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत. </div>
<div style="text-align: justify;">
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWD5rvsC895U35DJAhog0Mruj8At9b18VAaCN8Be-KQyt4TG1QsPzysjEfkQH0rG7E9sLVXQWdmRJNWd245qsVSmj0k0L13e3lIO2n7Ne8qMzdlVzrHPi1WQ_2zXvIRCwgoHsRFjBA5aZi/s1600/ce4eb15b61b7476e9d56019b955f617e.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="368" data-original-width="230" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhWD5rvsC895U35DJAhog0Mruj8At9b18VAaCN8Be-KQyt4TG1QsPzysjEfkQH0rG7E9sLVXQWdmRJNWd245qsVSmj0k0L13e3lIO2n7Ne8qMzdlVzrHPi1WQ_2zXvIRCwgoHsRFjBA5aZi/s320/ce4eb15b61b7476e9d56019b955f617e.jpg" width="200" /></a></div>
'गोध्रा' या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की 'विशुद्ध धर्मा'चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की 'विशुद्ध धर्म' हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते. </div>
<div style="text-align: justify;">
<br />
आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.<br />
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गेल्या काही वर्षातील मॉब लिंचिंगच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले, कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कठुआ घटनेनंतर मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, 'मल्टीपोलर' रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक आणि समाजमाध्यमांवर अतिशय सक्रीयपणे भाजपचा अजेंडा पुढे नेणाऱ्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर 'व्हॉट्सअॅप चर्चा' झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण 'शांततामय सहअस्तित्व' कसं टिकवायचं ? </div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे 'होलिस्टिक' विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले तर मला 'फक्त त्या गोष्टींचं स्वागत' करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं. मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष 'सुधारला', माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही 'सुधारण्याची स्पेस' नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. त्यांची फेसबुक व ट्विटरवरील अभिव्यक्ती कधीकधी टोकाची विद्वेषी असते. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे 'पुरोगामी' शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही 'वॉटर टाइट कंपार्टमेंट्स' नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं 'विशुद्ध धर्मपालन' करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (स्लॅश जाणीवपूर्वक वापरला आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.) ती 'भारतीयत्वा'कडे, 'आधुनिकते'कडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की 'हिंदू' म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त 'हिंदू' असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे 'हिंदू' आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. 'हिंदू आयडेंटिटी' हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य 'हिंदू मानस' अजूनही 'हिंदू असण्या'प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते. </div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज 'सॉफ्ट' आहे ती उद्या 'हार्ड' होतेच कारण या मानसिकतेचा पायाच मुळात 'रॅशनल' नाही आहे. धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या 'रेफरन्स'नेच झाली पाहिजे यात 'लॉजिकल फॅलसी' आहे - म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? 'जर-तर' च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. 'साइनफेल्ड' ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. 'फ्रेंड्स'च्या आधीची. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. 'गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत' असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही!) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो 'निखळ विनोद' आहे की 'राजकीय स्टेटमेंट' आहे हे मला समजलं असतं. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले - नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम संघर्ष याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आणि सोयीस्कर आकलन करून दिलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता 'हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल' असा विचार तरी किमान करून पाहावा. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात - </div>
<br />
<ul style="text-align: left;">
<li style="text-align: justify;">एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची 'ग्रॅव्हिटी' लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं - जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.) </li>
<li style="text-align: justify;">दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता 'माणूस दुखावला गेला' म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. </li>
<li style="text-align: justify;">तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!</li>
</ul>
<br />
<div style="text-align: justify;">
यासंदर्भात मला आणखी एक असं वाटतं की कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून 'डावा हिंदू' ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे 'मूलभूत परिवर्तनाचं आव्हान' घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. 'मी तुमच्यातला नाही' असं सांगण्यापेक्षा 'मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे' असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माझा एक मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा दृष्टीकोन मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचारदेखील लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग 'डावा हिंदू' ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं 'व्हल्नरेबल' मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
- 'सृजन' दिवाळी अंक, २०१९ </div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-13946267241554669222019-11-05T06:11:00.000-08:002020-05-01T03:32:22.223-07:00गांधीविचार : अध्याय २०१९ <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
गांधींच्या बाबतीत सजगपणे, जाणतेपणानं विचार करायला मी कधी सुरुवात केली हे मला सांगता यायचं नाही. गांधी, नेहरु, जेपी आणि विनोबा हे सगळेजण लहानपणापासून पुस्तकं, चर्चा आणि प्रभाव या स्वरुपात घरामध्ये वास्तव्य करत होते. माझ्या वडिलांची ‘सर्वोदयी’ विचारदृष्टी जगण्याची मूल्यात्मक बाजू सतत स्पष्टपणे दाखवत होती. व्यावहारिक पातळीवर जगण्याचे अनेक संघर्ष होतेच आणि त्यावेळी ‘या मूल्यांचं नक्की काय करायचं ?’ हा प्रश्न पडला नाही असंही नाही, पण या सर्व मंडळींनी जे भरणपोषण केलं त्याचे परिणाम पुढे अनेकदा प्रत्ययास आले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<span style="text-align: justify;">गांधी हे एक विचारात पाडणारं, कधी कधी गोंधळात पाडणारं रसायन आहे यात शंकाच नाही. गांधींविषयी नव्याने काही लिहायची गरज आहे का असं एकीकडे वाटत असताना दुसर्या बाजूने गांधीविचारांच आकलन करुन घ्यायची उत्सुकता असणारी नवीन पिढीही तयार होताना दिसते. गांधी हा समकालीन सामाजिक, राजकीय विचारातला एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि गांधीविचार हा मानवी परस्पर संबंध, मानवी आकांक्षा, मानवनिर्मित अनेक व्यवस्था यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये कमी-अधिक प्रमाणात योगदान देत असतो. हे वारंवार दिसून येतं. आपण गेल्या दोन शतकांकडे नजर टाकली तर ‘व्यवस्था-विचार’ म्हणून उदयास आलेल्या मार्क्सवादानंतर गांधीविचार हा आणखी एक ‘व्यवस्था-विचार’ होता असं स्पष्टपणे दिसतं. भारतीय सामाजिक अभिसरणाची सुरुवात, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, र.धों.कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतरही अनेक अभ्यासक विचारवंत-कार्यकर्त्यांच्या योगदानातून होते. भारतीय समाज प्रवाहाला वळण देण्यात या सगळ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींच्या बाबतीत जो अधिकचा फरक पडला तो त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या रचनात्मक कार्याच्या दिशेमुळे. खरं पाहता निव्वळ वैचारिक, आधुनिकता केंद्री, क्रांतदर्शी दृष्टीने तुलना केली तर आंबेडकरांचं जातिबद्ध भारतीय समाजाचं आकलन आणि या समाजाच्या रचनेमध्ये मुळातून काही बदल करण्यासाठीची वैचारिक दिशा ही गांधींपेक्षा अधिक’ मूलगामी आहे असं म्हणता येईल. र.धों.कर्व्यांचे स्त्री-पुरुष संबंधाबाबतचे, संतती नियमनाबाबतचे विचार पाहता या विशिष्ट मुद्यावर ते गांधींपेक्षा अधिक पुढे होते असंही दिसू शकेल. त्यमुळे प्रागतिकतेच्या विविध निकषांवर गांधी मागे पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असं असताना गांधी विचार ‘शिळा’ होत नाही, समाजिक संबंधांमध्ये,राजकीय ’ जाणिवेच्या व आनुषंगिक भूमिकेच्या बाबतीत तो सतत अस्तित्व टिकवून ठेवतो याचं कारण काय असावं?</span><br />
<div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला याचं कारण हे दिसतं की गांधीविचार हा ‘आतून बाहेर’ असा प्रवास करणारा विचार आहे. गांधींची एकादश व्रते आणि त्यांच्या मांडणीतला नैतिकतेचा, साधनशुचितेचा आग्रह, त्यांचं एकूण तत्त्वज्ञान माणसाला एका उन्नत पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणारं आहे. त्यात मग अर्थातच अवघड आदर्श आहेत. आपण ज्याला सहजपणे ‘अव्यवहार्य’ म्हणू अशा गोष्टी आहेत. रसहीन-एकसुरी वाटेल अशी जीवनशैली आहे. व्यवस्था-विचार करायचा तर मानव-विचारापासून सुरुवात करायला हवी हे मार्क्सही म्हणतो; पण आधुनिकता, सहज प्रेरणांना न्याय, उद्यमशीलता, सृजनशीलता या व इतर पैलूंना कवेत घ्यायचं स्वातंत्र्य असणार्या माणसाची ‘नैतिक बैठक’ काय असावी हा गांधीविचाराचा गाभा आहे. या नैतिक भूमिकेविषयी मत-मतांतरं असू शकतात. कारण गांधीविचार हा प्रामुख्याने 'माणूस कसा असतो?' यापेक्षा 'माणसाने कसं असायला हवं?' याचा विचार करतो. त्यामुळे तो रूढार्थाने 'व्यवहार्य' होत नाही आणि मतभेद उत्पन्न होतात. शिवाय गांधीविचारांचं सुलभीकरण, अपप्रचार, चुकीचे अर्थ लावणं यामुळेही गांधींबद्दल भरपूर गैरसमज होतात. </div>
</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माणसाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्याच्या आदिम काळातील जगण्याच्या लढाईपासून ते आजच्या अत्याधुनिक जगण्यापर्यंत त्याने ‘विचारधारा’ जन्माला घातल्या आहेत. दुसर्या बाजूला त्याचं आजचं दैनंदिन जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की ‘विचारधारा’ बरहुकूम वागत येईलच असं नाही. माणसाला क्षणोक्षणी कसले ना कसले निर्णय घ्यावे लागतात. तिथे विचारधारेबरोबरच, किंबहुना त्याहूनही थोड्या जास्त प्रमाणात, त्याच्या मूलभूत प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. गांधींचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मूलभूत प्रेरणांच्या - 'ह्यूमन इंस्टिंक्ट’च्या जागी ‘इन्हेस्टिगेशन’ला आणून बसवायचा प्रयत्न केला. समग्र गांधीविचाराची व्यापकता, त्याविषयीची मत-मतांतरे, त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यावर पुष्कळ चर्चा होत असते. होत राहीलही. तो एक अभ्यास विषय आहेच. पण समकालीन संदर्भात गांधींची प्रस्तुतता यावर ‘मला’ - म्हणजे नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या आणि पुढे आर्थिक उदारीकरण, इंटरनेट, मोबाईल, गूगल अन् फेसबुक, यू ट्यूब आणि नेटफिक्स, जनलोकपाल आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन आणि देशभरात सुरु असलेली इतर जनआंदोलनं, टीव्हीची मनोरंजन आणि पत्रकारिता या दोन्ही अंगांनी झालेली संपूर्ण अवनती, उजव्या आणि डाव्या विचारातला तीव्र झालेला संघर्ष, बहुसंख्याकवादाला चढलेली धार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, 'सत्योत्तर' काळाचे प्रश्न या आणि आनुषंगिक उलथापालथीचा साक्षीदार असलेल्या एका भारतीयाला - काय वाटतं हे अधिक आत्मीयतेने सांगावसं वाटतं.</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
फेसबुक हे राजकीय - सामाजिक विचारांचं रणांगण बनलं आहे हे या माध्यमाशी परिचित असलेल्या बहुतेकांना माहीत आहे. याच मैदानात मीही माझं म्हणणं अनेक वर्ष मांडत आलो आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका लिहू लागलो. वर उल्लेख केलेल्या ‘अस्वस्थ वर्तमाना’त जगणारा एक तरुण आणि गांधीजी यांच्यात ‘आज’ घडणारा संवाद असं या मालिकेचं स्वरुप आहे. यातले गांधीजी हे ‘महात्मा गांधी’ असले तरी ‘मी’च्या मित्राच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संवाद मित्रांमधल्या संवादासारखा आहे. मला हे लिहावसं वाटलं, गांधीजींना ‘बोलवावसं’ वाटलं याच्यातच गांधीविचार आज मार्गदर्शक ठरु शकतो हा विश्वास दिसून येतो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
इथे एक गोष्ट स्पष्ट करुन घेऊ. ‘गांधीविचार’ म्हटलं की त्यात अनेकविध गोष्टी येऊ शकतात. मला गांधीविचारातला वर उल्लेख केलेला ‘इन्व्हेस्टिगेशन’चा भाग आकर्षित करतो. त्याचा मी संवादमालिकेमध्ये उपयोग केलेला आहे. आता एक गोष्ट खरी की माझा व्यक्तिगत वैचारिक कल (जो गांधीवाद - नेहरूवाद - मार्क्सवाद - स्त्रीवाद - उदारमतवाद यांच्या एका मिश्रणातून तयार झाला आहे) या संवादांमध्ये अधूनमधून प्रतिबिंबित होतो. पण माझा प्रयत्न ‘इन्व्हेस्टिगेशन’चा, विचार तपासून बघण्याचा असतो. स्वतःला तपासून बघणं, स्वतःमध्ये सुधारणेच्या जागा कुठे आहेत त्या शोधणं हा २०१९ मधल्या ‘मला’ आणि १९४० मधल्या गांधींना जोडणारा दुवा ठरतो.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मी मागे लेख/चर्चांमधून अनेक वेळा उल्लेख केलेला मुद्दा इथे पुन्हा लिहितो, कारण तो आवश्यक आहे असं मला वाटतं. वैचारिक कल, व्यक्तिगत घडण, व्यक्तिगत अनुभव हे सगळं एका बाजूला ठेवलं तरी दुसर्या बाजूला एक मानवीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा विचार आहे आणि त्याचा आपल्याला आज विसर पडलाय की काय अशी शंका येते. हा विचार खरं तर अजिबात गुंतागुंतीचा नाही. साधा सरळ आहे. तो अगदी आपल्या आईबाबांनी घरी शिकवलेला असेल इतका साधा आहे. ‘माझं चुकू शकतं’ हा तो विचार. मला असं दिसतं की कमालीचं राजकीय ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात ‘आपलं काहीतरी चुकत असेल’ एवढी शक्यता जरी आपण आपल्या मनाशी बोललो तरी ती एक मोठी सुरुवात ठरेल!</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपल्याला आज असं वाटत नाही कारण आपलं टोकाचं ‘पक्षीय राजकीयीकरण’ झालं आहे. राजकीय भूमिका असण्याबद्दल आक्षेप नाहीच, पण ‘राजकीय हिंसकता’ असण्याबद्दल नक्की आक्षेप आहे. कारण त्याचं पर्यवसन समाजस्वास्थ बिघडण्यात, परस्पर सौहार्द बिघडण्यात होतं. आपण आज या ‘राजकीय हिंसकते’च्या प्रभावाखाली आलो आहोत. माणसातली आदिम ‘टोळी जाणीव’ तीव्र होत आहे आणि आधुनिक उपकरणांनी, तंत्रज्ञानाच्या चमत्कारांनी वेढलेले आपण मनातून मात्र आदिम जाणिवांचे गुलाम होत आहोत. आपण वैचारिकदृष्ट्या इतके ‘स्थितीशील’ कसे झालो ? हिंसक राजकारणाने आपल्यातला स्वतंत्रपणे विचार करु शकणारा, कुठल्याही संघटनेचं - पक्षाचं - नेत्याचं जोखड नाकारणारा लोकशाहीवादी सजग नागरिक कसा काय संपवला? यावर एक प्रतिवाद असा आहे की, मुळातच आपण स्वतंत्र विचार वगैरे करणारे, समता-स्वातंत्र्य-वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे नव्हतोच. आपण परंपराप्रिय आहोत. आपल्याला अधिकारांची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड मनातूनच आवडते. आज फक्त ते कमकुवत आवरण गळून पडलंय आणि आपल्यातला मूळ ‘विघटित भारतीय’, ‘एकारलेला भारतीय’ समोर आला आहे. आज जर आपण सार्वजनिक चर्चाविश्वाकडे नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. आपली 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' कमालीची कमी झाली आहे / आहे. 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून मेंदूमध्ये बदल होण्याची क्षमता. या क्षमतेमुळे न्यूरॉन्स नवीन परिस्थतीला, एखाद्या बदलाला, नव्या माहितीला प्रतिसाद देऊ शकतात. आपल्या मेंदूचा हा एक भौतिक गुणधर्म आहे आहे. अॅडल्ट ब्रेनपेक्षा डेव्हलपिंग ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असते. साध्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असणं म्हणजे सवयीच्या नसलेल्या परिस्थितीला, विचाराला लवकर 'अॅडजस्ट' होणं. त्या विचाराप्रती लगेच आक्रमक न होता तो तपासायचा प्रयत्न करणं. एक उदाहरण घेऊ. दोन माणसांना प्रत्येकी एक केळं दिलं. ते दिसायला केळ्यासारखंच आहे, पण चव कारल्यासारखी आहे. दोघांनाही खाल्ल्यावर विचित्र वाटेल, आवडणार नाही. कारण 'केळं खायचं आहे' या विचारातच 'विशिष्ट चवीचं फळ खायचं आहे' हा विचार अनुस्यूत असतो. त्यामुळे दोघेही भांबावतील. परंतु कारल्याच्या चवीचं केळं असू शकतं या वस्तुस्थितीचा स्वीकार जो मनुष्य तुलनेने सहजगत्या, लवकर करेल त्याची न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त आहे असं म्हणता येईल. आता ही परीक्षा अनेक गोष्टींबाबत घेता येऊ शकते. आजच्या 'वैचारिकदृष्ट्या विस्कटलेल्या' काळात आपण अस्मिता, राजकीय पक्ष, विचारसरणी, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओझी वागवत जगतो आहोत. अशा वेळी आपण जेव्हा विरोधी मताविषयी सहिष्णु असलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याचा 'भौतिक अर्थ' न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवणं हा असतो. माणसं एकच बाजू का घेतात, समोर दिसत असूनदेखील सत्य का नाकारतात किंवा सत्याकडे काणाडोळा का करतात याचं उत्तर न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलेलं आहे. ती त्याला एकतर्फी, एका बाजूला झुकण्याचा गुण बहाल करते. </div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भारतीय मनोवृत्तीच्या संदर्भात हे विश्लेषण बऱ्याच अंशी खरं आहे असं मला वाटतं. पण यावर करायचं काय ? तर हा सगळा गुंता सोडवायला गांधीमार्गाचा उपयोग होतोय का पहायचं. मी माझ्यापुरता एक प्रयत्न या संवादमालिकेतून (आणि फेसबुकवरील इतरही लेखनातून) केला आणि मला हे खरचं दिसून आलं की आपली समाजिक - राजकीय भूमिका कुठलीही असली तरी आपण अंतःकरणातून, प्रामाणिकपणे स्व-चिकित्सेला तयार असलो, वैचारिक विरोध कायम ठेवला तरी ‘माणूस’ म्हणून एकमेकांशी जोडून घ्यायच्या जागा आपण सुरक्षित राखल्या तर सहअस्तित्व शांततामय होऊ शकतं. फेसबुकवर हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींशी माझी बरेचदा चर्चा झाली आहे. मी माझ्या लिखाणातून कट्टर हिंदुत्ववादाबाबतची नाराजी उघडपणे मांडली आहे. त्याचबरोबर उदारमतवाद्यांच्या दृष्टीकोनातील खटकणाऱ्या गोष्टींबाबतही मी लिहिलं आहे. या चर्चांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की 'माणूस' म्हणून आपण विरोधी विचाराच्या माणसाच्या मनात प्रेमभाव निर्माण करू शकलो तर संवाद सुकर होऊ शकतो. (याबाबत तपशीलात लिहिता येईल, पण त्याबाबत स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणं इष्ट होईल. कारण त्यात हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद यांच्या वैचारिक भूमिकेतील फरक, मूल्यात्मक फरक, अभिव्यक्तीची पद्धत अशा विविध मुद्द्यांवर बोलावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की एखाद्या विचारधारेला एखाद्या नावाने संबोधणं ही खरं तर एक व्यावहारिक तडजोड असते. त्यातून त्या विचारधारेचा साधारण कल लक्षात येतो इतकंच. प्रत्यक्षात दोन भिन्न विचारधारांमध्ये काही साम्यस्थळंही असू शकतात.) आपण एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा विकसित (आपल्या विकासाच्या कल्पनेनुसार!) असला तरी तो अंतिमतः मनुष्य‘प्राण्या’चा मेंदू आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपले सर्व ‘इन्स्टिक्ट्स' एकविसाव्या शतकातही नीट शाबूत आहेत. प्रत्यक्ष हिंसा कमी झाली असली तरी मेंदूतली ‘हिंसकतेची केंद्रं’ बंद पडलेली नाहीत. (इथे मला असंही म्हणावसं वाटतं की त्यामुळे गडबडून जायचं कारण नाही. आपण सगळे ‘उत्क्रांतीची उत्पादनं’ आहोत. ‘भीती’ या आदिम भावनेपासून असूया, दुःख, एकटेपण, निराशा, आनंद अशा भावनांच्या कोलाहलापर्यंत आपल्या मनात भावनांचा जो भलामोठा पैस (आणि पेच!) तयार झाला आहे त्यामागचा उत्क्रांतीजन्य हेतू ‘टिकून राहणे’ हा आहे. एका टोळीत सामील होऊन राहणं, एक बाजू घेणं, राजकीयीकरण होणं हादेखील याच प्रक्रियेचा भाग आहे. पण आपलं वैशिष्ट्य हे की आपल्याला हे सगळं समजू शकतं. माणूस हा ‘जाणिवेची जाणीव’ असणारा प्राणी आहे आणि ते त्याचं बलस्थान आहे.) त्यामुळे गांधी जे सांगतात ते सहजपणे जमणारं नाही. </div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गांधींचा माणसाला उन्नत करण्याचा जो प्रयत्न होता त्याचं बीज ‘जाणिवेची जाणीव’ करुन देण्यात आहे. मानवसमूह जर नैतिकदृष्ट्या समर्थ झाला, सामूहिक निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता जर विकसित झाली तर ‘हे राजकारण’ आणि ‘हे जीवन’ असं द्वैत नष्ट होईल का? गांधींनी आणि त्यांच्या नंतर विनोबांनी विकेंद्रित राज्यव्यवस्थेबाबत जो विचार केला आहे तो भारतासारख्या देशासाठी पथदर्शक आहे. तो यशस्वी न होण्यामागची मुख्य अडचण सामूहिक इच्छाशक्ती आणि कृतीसामर्थ्याचा अभाव ही आहे. त्याच्या जोडीला बदलत्या काळाची आव्हानेदेखील आहेत. पण स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असण्याच्या मूलभूत विचाराचं महत्त्व त्यामुळे उणावत नाही.</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गांधी आज ‘रिलेव्हंट’ आहेत का हा प्रश्न, हा विषय आता खरं तर जुनाच झालाय जरा. हा प्रश्न सारखा सारखा विचारावासा वाटतो, गांधी सारखा ‘आडवा येतो’ याचं कारणच हे आहे की, गांधी अगदी मूलभूत, अगदी आवश्यक आणि खरं तर अगदी सोपं असं काही सांगत होते. सर्वांना जर शांततेने एकत्र राहायचं असेल तर काय करायला लागेल याचा मंत्र त्यांनी दिला होता. गांधींची आठवण होत राहते कारण आपल्याला अद्याप शांततेनं एकत्र राहणं जमलेलं नाही हे आहे! शांततामय सहअस्तित्वाचा गांधीविचार जेव्हा जगण्याचा भाग होईल तेव्हा तो वेगळा असा काही उरणार नाही. त्याची 'आठवण काढावी' लागणार नाही. मला कधीकधी असं वाटतं की गांधींना रिटायर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधीविचार आत्मसात करणं! गांधींना खोटा नमस्कार करणाऱ्यांनी, गांधी ज्यांना सतत सलतात त्यांनी, २०१९ साली गांधींच्या प्रतिकृतीला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं!</div>
</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(तरूण भारत, दीपोत्सव २०१९)</div>
</div>
</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-51333902811220150612019-02-26T22:51:00.000-08:002020-05-07T22:52:28.569-07:00प्रतीकात्मतेचे पाझर <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री बाळासाहेब भारदे यांनी भारतीय राजकारणाविषयी केलेलं एक विधान प्रसिद्ध आहे, 'काँग्रेस म्हणजे खुर्च्या, समाजवादी म्हणजे चर्चा, कम्युनिस्ट म्हणजे मोर्चा आणि संघ म्हणजे पूजाअर्चा'. यात जनसंघ किंवा भाजपचं नाव नसून संघाचं नाव आहे याची एक वेगळी नोंद घ्यायला हवी. त्यांचं हे निरीक्षण मार्मिक असलं तरी आजच्या संदर्भात पाहता 'भाजप म्हणजे खुर्च्या' असा बदल करणं अवाजवी ठरणार नाही. विविध पक्षांचं राजकारण कुठल्या अंगाने पुढे सरकतं, त्यातलं चूक बरोबर काय, राजकीय अपरिहार्यता आणि नैतिक पेच यांच्यातील संघर्षाचं काय याविषयी आपण विचार करू लागलो तर एक मोठाच 'डिस्कोर्स' उभा राहतो. राजकीय अभ्यासक त्याची मांडणी करतच असतात. परंतु गेल्या काही वर्षात उजव्या विचारसरणीचा वाढलेला प्रभाव, केंद्रातील भाजप सरकारवर आणि विशेषतः नरेंद्र मोदींवर होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळत असलेला जनाधार या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या विविध पैलूंवर सातत्याने चर्चा होते. याच मालिकेतला एक ताजा मुद्दा आहे, नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्यातल्या पाच सफाई कर्मचाऱ्यांची केलेली पाद्यपूजा. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार नरेंद्र मोदींनी पाच कामगारांचे पाय धुतले आणि त्यांना 'कर्मयोगी' असं संबोधलं. त्यानंतर ते म्हणाले, 'सफाई कामगार हे खरे सेवक आणि तपस्वी आहेत'.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यानंतर समाजमाध्यमांवर आणि इतरत्र अपेक्षेप्रमाणे चर्चा सुरू झालीच. त्यात अर्थातच टीका आणि समर्थन दोन्ही सूर होते. मला व्यक्तिशः हे कृत्य देशातील हजारो सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची क्रूर खिल्ली उडवणारं वाटलं. निषेधार्ह वाटलं. सफाई कामगारांची, हाताने मैला वाहणाऱ्यांची अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. गटारातील विषारी वायूमुळे देशात गेल्या वर्षी शंभरच्या वर सफाई कामगारांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही कामगारांचे पाय धुऊन पंतप्रधान काय सुचवू पाहतात? परंपराप्रिय आणि भावनाप्रधान अशा बहुसंख्य भारतीय जनतेला भारावून टाकण्याचा हा प्रयत्न नक्की कुठल्या चौकटीत टाकायचा असा प्रश्न पडतो. तो राजकारणाच्या चौकटीत घालणं भाजप समर्थकांना मान्य होणार नाही. त्याला खरोखरीचा उमाळा, खरोखरीच सद्गदित होऊन केलेलं कृत्य म्हणावं तर अशा प्रतीकात्मक कृतीपेक्षा बरंच काही करण्याचं सामर्थ्य तुमच्या पदाने तुम्हाला दिलेलं असताना एखाद्या सर्वसामान्य, दुर्बल, श्रद्धाळू माणसासारखं मन उचंबळून आणून केवळ एका भावनिक कृतीत समाधान का मानून घ्यायचं?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या प्रश्नातच एक मेख आहे. उजव्या विचारांचा एकूण आवाका आणि या विचाराने प्रेरित कार्यपद्धती पाहिली तर असं दिसेल की इथे प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे. ते करताना आपण हे लक्षात ठेवूया की आपल्या चर्चेत उजव्या विचाराचा धार्मिक-सांस्कृतिक पैलू अभिप्रेत आहे. सरसकट डावं आणि उजवं अशी विभागणी करणं ढोबळ वर्गीकरणासाठी उपयोगी ठरत असलं तरी त्यात बरेच तपशील निसटून जातात. वर्गीकरण किंवा व्याख्या करणं हे बरेचदा आकलनाला मर्यादा घालणारं ठरतं हे आपण लक्षात ठेवूया. उजव्या विचारसरणीने कायमच लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रतीकांचा, कर्मकांडांचा, भावनिक आव्हानांचा वापर केलाय. अर्थात यातून आपल्याला दिसतंच की काही लोक एकत्र येऊन इतर काहींच्या विरुद्ध उभे राहतात. पण विचार म्हणून तो एकत्रीकरणाचाच प्रयत्न असतो, असं त्यांचं प्रतिपादन असतं. गेल्या वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींची कलशयात्रा सगळ्या राज्यांमध्ये काढण्यात आली होती. अगदी २०१४ पर्यंत मागे गेलो तर संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवण्याचा प्रसंगही आपल्याला आठवेल. संघाच्या विविध कार्यक्रमांपैकी शस्त्रपूजा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. नवीन लोकांशी जोडून घेण्याकरता संघ स्वयंसेवक त्यांना राख्या बांधतात. प्रतीकात्मक मूल्य असलेले असे बरेच कार्यक्रम सांगता येतील. अशा प्रतीकात्मक गोष्टी संघटना बांधणीकरता, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता, उत्साह निर्माण करण्याकरता आवश्यक आहेत म्हणून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. उजव्या विचारसरणीतील ही प्रतीकात्मता खरं तर भारतीय परंपरेतूनच आलेली आहे आणि त्यामुळे ती स्वीकारणं लोकांनाही जड जात नाही.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
इथवर सगळं ठीक असलं तरी गडबड अशी होते की या प्रतीकात्मतेलाच असाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागतं. प्रतीकात्मक कृत्य केलं की झालं, पुढे जाऊन मूळ, अवघड प्रश्नाला भिडलो नाही तरी चालेल अशी एक विपरीत मानसिकता तयार होऊ लागते. उजव्या विचारसरणीचे बरेच कार्यकर्ते, समर्थक अशा मानसिकतेचे बळी असलेले दिसतात. हे कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही. तर आज आपण ज्या ध्रुवीकरणात जगतो आहोत ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाही, हे सांगण्यासाठी आहे. खरं तर कुठल्याही संघटनेत, राजकीय पक्षात असणारे लोक विविध स्वभाववैशिष्टयांनी युक्त असतातच. डाव्या पुरोगामी चळवळीत देखील वैचारिक खुलेपणा नसणारे लोक असतात. याचं एक साधं कारण हे आहे की आपल्या 'विचारसरणीवर आधारित' ओळखीआधीची आपली ओळख 'माणूस' ही आहे आणि माणूस हा अनेक भल्याबुऱ्या गुणधर्मांचं गाठोडं आहे. परंतु असं असलं तरी विचारकलहाच्या पलीकडे जाऊन, आपल्या विचारसरणीशी तीव्र निष्ठा बाळगणारे 'कडवे' कार्यकर्ते तयार करण्यात संख्यात्मक दृष्ट्या उजव्या विचारसरणीला तुलनेने चांगलं यश मिळालेलं आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या यशाचा एक आधार 'सहज, सोपं आव्हान' हा आहे. आता सहज-सोपं म्हणजे काय हे थोडं समजावून घेऊ. सामाजिक आणि राजकीय आघाडीवर संघ, भाजपने केलेलं काम अगदी सोपं होतं, असा याचा अर्थ नाही. परंतु हे यश मिळवण्याकरता जो आधार घेतला गेला आणि घेतला जातो, तो सोपा होता. माणसांना विशिष्ट दिशेने कार्यप्रवण करण्यासाठी धर्म, संस्कृती, राष्ट्र हे अमूर्त आणि एका अर्थी 'रेडिमेड' आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा माणूस कार्यप्रवण होतो, कष्टाने कार्यही करतो. पण सामाजिक, वर्गीय, जातीय रचनांची गुंतागुंत समजून घेऊन मुळातून काही बदल घडवण्याची मानसिकता वाढीला लागत नाही. यातून कार्य उभं राहतंच, पण मानसिकता मात्र ठराविक साच्यातलीच राहते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नरेंद्र मोदींनी केलेली पाद्यपूजा अशा मानसिकतेकडे निर्देश करते. यात व्यक्तिविशिष्ट गुणधर्माचाही भाग आहेच. ज्याला साध्या भाषेत नाटकीपणा म्हटलं जातं, तो नरेंद्र मोदींच्या स्वभावाचा एक भाग आहे. निवडणूकपूर्व काळातील प्रचार भाषणांपासून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमधूनही तो दिसतो. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी केलेल्या प्रतीकात्मक कृतीला धार चढतेच. आपल्या भाषणांमधून 'देशाचा पंतप्रधान' बोलतो आहे असं जाणवून देण्याऐवजी 'पक्षाचा प्रचारक' बोलतो आहे असंच वरचेवर जाणवतं. त्यातून प्रतिक्रियावादी, आक्रमक, भावनिक राजकारणाला त्यांनी अग्रस्थान दिल्याने त्यांच्या स्वतःच्याही उक्ती आणि कृतीचे पडसाद उमटणं स्वाभाविक झालंय. नरेंद्र मोदींनी स्वतःच 'नरेंद्र मोदी' हा नायक आणि खलनायक दोन्ही निर्माण केलेत!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रतीकात्मक कृत्यांना भावनिक महत्त्व देऊन त्यांची गरज प्रस्थापित करणं, हा उजव्या विचारसरणीत खोलवर रूजलेला विचार आहे. त्याचे आविष्कार बेगडी वाटले तरी विचारसरणीसाठी त्यांचं धोरणात्मक महत्त्व फार आहे. आज उजव्या विचारसरणीचे लोक देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हे ठरवताना दिसतात. यातून विश्लेषणाची स्पेस नष्ट होत जाते आणि सुलभीकरणाची स्पेस वाढत जाते. खेद अशा गोष्टीचा होतो की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात काय काय चांगले बदल झाले हे मोदींचे समर्थक आपल्या फेसबुक पोस्ट्समधून सांगतात, पण प्रत्यक्ष पंतप्रधान एखाद्या शांत, गंभीर, पंतप्रधानपदाचा आब राखणाऱ्या भाषणातून ते का सांगत नाहीत असा प्रश्न पडतो! नरेंद्र मोदींनी जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही असं नाहीच. पण प्रतीकात्मतेचा अतिरिक्त सोस बाळगल्याने आपण स्वतःदेखील एक 'नकारात्मक प्रतीक' होतो आणि आपल्या कार्यापेक्षा आपली विचारसरणी पृष्ठभागावर येत राहते, हे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतलं तर बरं होईल.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(कोलाज.इन या संकेस्थळावर प्रकाशित)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<a href="http://www.kolaj.in/published_article.php?v=Why-did-Modi-wash-feet-of-sanitation-workers-at-Kumbh-TF0091234">http://www.kolaj.in/published_article.php?v=Why-did-Modi-wash-feet-of-sanitation-workers-at-Kumbh-TF0091234</a></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-78321631424243370642018-12-22T08:33:00.000-08:002020-05-03T08:34:51.295-07:00स्वप्न आहे सोबतीला...<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
एखाद्या प्रसन्न रात्री मित्रांबरोबर गप्पा रंगत आलेल्या असाव्यात, काही मौलिक प्रश्न पुढे येत जावेत, त्यातून डोक्यातील चक्रं आपल्या सोयीच्या वाटेऐवजी थोड्या अवघड वाटांवरून धावू लागावीत आणि एकूणात चर्चेला रोमांचक स्वरूप येत असताना सकाळी उठून कामावर जायचंय म्हणून सभा बरखास्त करण्याची वेळ यावी... अशा वेळी जी मनःस्थिती होते तशी माझी आत्ताची मनःस्थिती आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गेल्या नोव्हेंबरमध्ये ‘चतुरंग’कडून लेखमालिका लिहिण्याविषयी प्रस्ताव आला तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया नकाराची होती. आपल्याला स्तंभलेखन जमणार नाही असं मला ठामपणे वाटत होतं. शिवाय स्तंभलेखन म्हणजे 'कमिटमेंट'! त्यामुळे मी लेखमाला न लिहिणंच कसं योग्य होईल हे मी त्यांना पटवून द्यायचा सर्वतोपरीने प्रयत्न केला. पण त्यांचा आग्रह कायम होता. आज लेखमालेचा समारोप करताना मी त्यांचे आभार मानतो कारण गेल्या वर्षभर मी जे काही थोडंफार लिहू शकलो, विविध वाचकांशी जोडून घेऊ शकलो, त्यांच्या प्रश्न-प्रतिक्रिया-प्रशंसेमुळे विचारमग्न आणि उत्साही राहू शकलो त्याचं श्रेय त्यांना जातं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
माणसाने लावलेल्या सगळ्या शोधांमध्ये भाषेचा शोध ही एक विलक्षण गोष्ट आहे. एकेकाळी नसलेल्याच किंवा निःशब्द रूपात असणाऱ्या जाणिवा, विचार भाषेतून प्रकट होऊ लागल्यावर त्यांच्यातील गुंतागुंत, टक्कर, रस्सीखेच सगळंच वाढत गेलं आहे. लिहिण्यातून व्यक्त व्हायची सवय असलेल्या माझ्यासारख्याला भाषेचा मोठा आधार तर वाटतोच, पण कधीकधी भाषेचं भयही वाटतं. कारण भाषेतून जे मी सांगतो ते 'मला जे म्हणायचं आहे आणि मला जे म्हणायचं नाही' ते सगळं निर्दोषपणे सांगता येतंच असं नाही. शिवाय आणखी एक प्रश्नही सतावत असतो. तो म्हणजे विश्वाचा एवढा मोठा पसारा - तो उलगडण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते विविध विज्ञानशाखांचे अभ्यासक, माणसाच्या मनोविश्वाचा आणि सामाजिक व्यवस्थांचा अभ्यास करणारे मानव्यशास्त्राच्या शाखांचे अभ्यासक यांच्या योगदानापुढे आपण वेगळं असं काय सांगणार? </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पण इथेच एक 'ट्विस्ट' आहे. ज्ञानाची विविध क्षेत्रे आपल्याला विशिष्ट विषयाची सखोल माहिती देतात. त्या त्या क्षेत्रातील ज्ञानी मनुष्य हा समाजाचा एक 'अॅसेट' असतो. या ज्ञानक्षेत्रांच्या बरोबरीने जे व्यापक असं 'वैचारिक क्षेत्र' आहे ते विविध ज्ञानक्षेत्रांतील घडामोडींचा परस्परसंबंध, त्यांचे सकारात्मक-नकारात्मक सामाजिक परिणाम, समाजव्यवस्थेचे विविध पैलू, त्यातील सुधारणा या गोष्टींवर सतत विचार करत असतं. मानसशास्त्रातील ज्ञानी मनुष्य एखाद्याच्या मानसिक आजारावर उपचार करू शकेल, परंतु वैचारिक क्षेत्रातील मनुष्य आपल्या निरीक्षणातून आजवर लक्ष गेलं नाही अशा एखाद्या ठिकाणी या ज्ञानाची गरज आहे हे सांगू शकेल. वैचारिक क्षेत्रातील मनुष्यासाठी 'समाज' हा एक प्रमुख आस्थेचा विषय असतो. 'विशिष्ट ज्ञान' त्याला आकर्षित करतंच, पण 'ज्ञानाचं उपयोजन' त्याला अधिक आकर्षित करतं. वैचारिक क्षेत्र हे प्रामुख्याने कुतूहल, नियोजन या पायावर आधारलेलं असल्याने खरं तर आपल्यापैकी प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार या शिलेदार होऊ शकतो. आपण प्रत्येकजण समाजाचा भाग असतो आणि समाजव्यवस्थेसंदर्भात, संकल्पनांच्या संदर्भात विश्लेषक विचार करण्याची क्षमता विकसित झाली तर प्रत्येकजण काही कल्पना मांडू शकतो, उपाय सुचवू शकतो. रोजच्या जगण्याच्या पलीकडे जात वैचारिक घुसळण सुरू ठेवण्याची प्रक्रिया आपण सुरू ठेवली तर त्यातून आपलं 'मनुष्यत्व' उजळून निघत असतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ही लेखमाला लिहीत असताना मला हे अनुभवता आलं. मनातील बऱ्याच प्रश्नांना आणि उत्तरांना वाट मोकळी करून देता आली. यात अपूर्णतेची जाणीव तर नक्कीच आहे. ज्या विषयांना आपण या मालिकेत स्पर्श केला त्या सर्वच विषयांवर अधिक सविस्तर उत्तरं मिळतील अशी मांडणी करता येईल. हे विषय सामाजिक, नैतिक स्वरूपाचे असल्याने तिथे गणितासारखी उत्तरं मिळत नाहीत. असं असलं तरी अमुक एका प्रश्नावर मला हे उत्तर दिसतं हे सांगणं ही आपली जबाबदारी असतेच. 'जातीयता संपायला हवी' असं मी म्हणत असेन तर ती संपवण्याकरता मला कोणते उपाय दिसतात हे मी सांगितलं पाहिजे. ते उपाय किती परिणामकारक आहेत हा पुढचा मुद्दा, परंतु केवळ 'विशफुल थिंकिंग' करत राहणं हा व्यापक बदलासाठीचा उपाय असू शकत नाही. </div>
<div style="text-align: justify;">
ज्या विषयांवर बोलायची इच्छा होती पण ते राहून गेलं त्यात प्रतिगामी-पुरोगामी हा संकल्पनाभेद, धर्मश्रद्धा आणि आपलं मानस, धर्मश्रद्धा आणि राजकारण हे विषय आहेत. गांधीजींची आधुनिकतेविषयीची मुळापासूनची वेगळी दृष्टी आणि तिची प्रस्तुतता यावर आपण बोललो, पण तो धागा आणखी पुढे नेता येईल. मागील लेखात आपण जीवन कौशल्ये या विषयावर बोललो. त्याच्या पुढे जात, काही व्यवहारिक उदाहरणं घेत जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेवर तपशीलात बोलता येईल. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचं विकेंद्रीकरण आणि त्यातून स्वशासन हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. या विषयावर गांधीजी आणि त्यांच्यानंतर विनोबा भावे यांनी मूलभूत मांडणी केली आहे. मराठीत मिलिंद बोकील यांनी या विषयावर मौलिक लेखन केलं आहे. या सगळ्याचा आधार घेत या विषयावर थोडी चर्चा करायचं मनात होतं. आपण प्रेम आणि लैंगिकतेविषयी बोललो, परंतु या विषयाशी जोडलेला महत्त्वाचा सामाजिक मुद्दा वेश्याव्यवसाय हा आहे. लैंगिक गरज आणि लैंगिक इच्छा यांच्या पूर्ततेची व्यवस्था समाजमान्य नैतिकतेअंतर्गत होत नसल्याने वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे. लग्नव्यवस्थेला समांतर चालणारी, परंतु विस्कळीत, बहुतेकदा शोषणावर आधारलेली, कुणाही संवेदनशील मनुष्याला अस्वस्थ करणारी ही व्यवस्था आहे. यासंदर्भात 'पुरूष' म्हणूनचं लैंगिक मनोविश्व घडत असताना वेश्याव्यवसायाबद्दल विचार होत होताच, हे जग पाहिलंही होतं, परंतु पुण्यातील 'सहेली' या 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह'शी जोडला गेल्यानंतर वास्तवाच्या अधिक जवळ जाता आलं. त्यामुळे याबाबत सविस्तर लिहायचं होतं. पारंपरिक चौकटीला छेद देत काही चित्रपटांनी मुख्य प्रवाहाला वेगळं वळण दिलं त्याबद्दल थोडं बोलायचं होतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
हे सगळं इतरत्र किंवा याच व्यासपीठावर पुढे बोलता येईलच. आत्ता मात्र निरोपाचा क्षण आहे. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांशी इ-मेलद्वारे जो संवाद झाला तो मला समाधानी आणि समृद्ध करणारा ठरला आहे. अनेकांशी अनेक संदर्भात बोलणं झालं. काहीजणांनी या लेखमालिकेमुळे/विशिष्ट लेखामुळे त्यांना मदत झाल्याचं कळवलं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. माणसांशी असं जोडलं जाण्याचं मोल फार आहे. सर्व वाचक मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक आभार! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आहे ती चौकट बदलून काही नवं करण्याचा विचार करणाऱ्याला स्वप्नाळू, अव्यवहारी, कधी उपहासाने क्रांतिकारक वगैरे म्हटलं जातं. नवी दिशा कोणती, ही वाट चांगलीच असेल कशावरून हे नीटपणे न कळल्याने किंवा सांगणाऱ्यालाही नीट सांगता न आल्याने असं होतं. परंतु असं स्वप्नाळू असणं हे आवश्यक आहेच. त्याविषयी शंका नसावी. जॉन लेनन या विख्यात गायकाचं एक वचन आठवतं. तो म्हणतो - तुम्ही एकट्याने पाहिलेलं स्वप्न हे फक्त स्वप्न असतं. पण सगळ्यांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्न म्हणजे वास्तव असतं! त्यामुळे स्वप्न तर बघतच राहूयात. लेट्स ड्रीम टुगेदर! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-17959260432042178602018-12-08T08:30:00.000-08:002020-05-03T08:31:51.527-07:00व्यवस्था विचार<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
मागील दोन-चार लेखांवर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातून प्रेम आणि लैंगिकता हे 'बर्निंग' विषय आहेत हे दिसून आलं. स्त्री-पुरूषांमधील नात्याचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) हा विषय सामाजिक महत्त्वाच्या विषयांपैकी एक कळीचा विषय आहे हे तर खरंच. विशेषतः पुरूषाच्या लैंगिक वर्तनाबाबत (त्याच्या नियमनाबाबत) अधिक बोललं जायला हवं आहे. लैंगिक समाधान आपल्या जागी महत्त्वाचं आहेच, पण पुरूषासाठी त्याचा 'ट्रॅप' तयार होतो आणि त्यात त्याचं मानस अडकूनच पडतं. याबाबत काय उपाय करता येतील याची चर्चा आपण मागच्या लेखात केली होती. ती आणखी पुढे जाऊ शकतेच. पण आजच्या लेखात आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय मानवी वर्तनाच्या सगळ्याच बाजूंना कवेत घेणारा आहे. हा विषय म्हणजे जीवन कौशल्ये - लाइफ स्किल्स. सध्या प्रचलित असलेली शिक्षणपद्धती, त्यातील अधिक-उण्या बाजू हा एक फार मोठा विषय आहे. आपण बोलणार आहोत ते या औपचारिक शिक्षणाव्यतिरिक्त जे शिक्षण होत असतं, जे होणं अपेक्षित असतं त्या शिक्षणाबद्दल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मोठयांनी (म्हणजे आपण सगळे) घातलेल्या अनेक घोळांची मुळं आपल्या छोटेपणात दडलेली असतात. (इथे 'छोटेपणात'वर नकळत श्लेष साधला गेला आहे!) मुलांना त्यांच्या वाढीच्या विविध टप्प्यांवर कोणकोणत्या विषयांची कशी कशी ओळख करून द्यायची हा एक महत्त्वाचा आणि अवघड प्रश्न आहे. हे थेटपणे (कल्पकतेने, पण सत्य पोचेल अशा प्रकारे) व्हावं असं मला वाटतं. इथे 'जीवन कौशल्ये' (लाइफ स्किल्स) हा विषय समोर येतो. 'जीवन कौशल्ये' या विषयाअंतर्गत अनेक गोष्टींची तयारी होणं अपेक्षित आहे. यात कौंटुंबिक नातेसंबंध, व्यावसायिक नातेसंबंध, त्यातील ताण व त्यांचं व्यवस्थापन, प्रेम, लैंगिकता, राजकीय-सामाजिक जाण, नागरिक म्हणून आपली कर्तव्यं अशा अनेकानेक गोष्टी आणि त्यांचे विविध पदर आहेत. या सगळ्यात रॅशनॅलिटीवर आधारलेला एक दृष्टीकोन स्वीकारता येऊ शकतोच. परंतु इथे दोन मुद्दे उपस्थित होतात. एक म्हणजे माणूस रॅशनल विचार करू शकत असला तरी तो स्वभावदृष्ट्या प्रत्येक वेळी पूर्णपणे रॅशनल असेलच असं नाही. त्यामुळे रॅशनॅलिटी काम करणार का हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विरुद्ध बाजूने आव्हानात्मक आहे. तो असा की रॅशनॅलिटी यशस्वी झाली आणि काही 'अतार्किक' परंतु माणसाला माणसाशी बांधून ठेवणाऱ्या हळव्या भावभावनांना सोडचिठ्ठी दिली गेली तर काय? उदा. मला हे नेहमी वाटतं की जन्म आणि मृत्यू या दोन्ही विषयांबाबत मुलांना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर (साधारणतः पौगंडावस्थेत) खरं काय ते सांगितलं गेलं पाहिजे. आता जर जन्म-मृत्यूचं वैज्ञानिक वास्तव माहीत झालं तर आपल्या जवळच्या कुणाच्या मृत्यूनंतर जाणवणारं दुःख, उदासी, त्या माणसाच्या आठवणीने जाणवणारा एकाकीपणा, डोळ्यात येणारे अश्रू या ज्या एका अर्थी अतार्किक पण मानवीय, आपल्याला एकमेकांशी जोडून ठेवणाऱ्या, जगण्यासाठी जो भावनिक पाया लागतो तो रचणाऱ्या भावना आहेत त्या नाहीशा होतील का? प्रेम, आकर्षण, ईर्षा, अहंकार या भावनांचं ‘रॅशनल नियमन’ झालं तर त्यातली खुमारी निघून जाईल का? </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यावर विचार करताना दोन गोष्टी जाणवतात. एक म्हणजे परंपरा-आधुनिकता या संघर्षाच्या पलीकडे असणारी माणसाची घडण लक्षात घेता तर्काधिष्ठीत विचार, परंपरेला प्रश्न करणं यामुळे माणूस कोरडा होईल असं मला वाटत नाही. दुसरं म्हणजे 'रॅशनॅलिटी' आणि 'सेन्सिटिव्हिटी' या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकतात. त्यांना तसं चालायला लावणं हे नवतेपुढील एक आव्हान आहे. जगात दगड-धोंडे आहेत तसेच सजीवही आहेत, माणूस हादेखील एक सजीव प्राणीच आहे, त्याच्या अस्तित्वामागे कुठलंही प्रयोजन वगैरे नाही, जीव आणि जाणीव यांच्या असण्याची तार्किक उकल होऊ शकते हे समजून घेत असताना त्याच्या परिणामी 'सगळं जर प्रयोजनहीन (आणि म्हणून अर्थहीन) आहे तर मग नीतीमूल्ये हवीतच कशाला? जगण्याला तरी काय अर्थ आहे?' हा प्रश्न उद्वेगाने न विचारणारं स्थिर आणि विवेकी मानस घडवणं हे नवतेपुढील आव्हान आहे. (सजीव रचनांसंदर्भात एक आठवलं. 'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. 'आजचा सुधारक' या मासिकात प्रकाशित झालेल्या काही लेखांचं हे संकलन आहे. या पुस्तकातील मिलिंद वाटवे यांचा 'आत्मा हवाच का?' हा लेख जरूर वाचावा.) त्यामुळे आधुनिक जीवन कौशल्यांविषयी बोलत असताना या आव्हानाचा विचार झालेला असणं आवश्यक आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या विचारासह मला हे म्हणावंसं वाटतं की जीवन कौशल्ये विकसित करताना आपण अधिक विचारी, अधिक 'वास्तववादी' असायला हवं आहे. कदाचित अतिरंजित वाटेल पण आपण जेव्हा आपला देश अजून मागे आहे असं म्हणतो, देशापुढील प्रश्नांची मालिका संपत नाही असं म्हणतो तेव्हा राजकीय-आर्थिक कारणांबरोबरच आपली जीवन कौशल्ये विकसित झालेली नसणं हेही एक कारण त्यामागे असतं. एक नेहमीचं, साधं उदाहरण घेऊ. आपल्या देशाचं काही खरं नाही असं आपण उद्वेगाने बरेचदा म्हणतो, पण आपण राहतो त्या सोसायटीचं काम बघायलाही कुणी उत्स्फूर्तपणे पुढे येत नाही. प्रश्ना सोडवण्यापेक्षा, त्यासाठी इनोव्हेटिव्ह विचार करण्यापेक्षा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकत्र येण्यापेक्षा त्या प्रश्नांसह जगणं पुढे रेटणं बहुतेकजण पसंत करतात. 'गोष्टी सुधारण्यासाठी आपण जागचं हलणं, थोडी जोखीम पत्करणं गरजेचं आहे' हा विचारच मनात न रूजल्यामुळे हे होतं. 'आपल्याला हालचाल करायला हवी' हे शिकवलं जाणं हा जीवनकौशल्याचा भाग आहे. हे कितीतरी ठिकाणी लागू होईल. लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला पुष्कळ रस असतो, पण आपल्या गावची ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका कशी काम करते याचं आपल्याला फारसं ज्ञान नसतं. आपल्याला काय काय माहीत हवं, आपल्याकडे कोणती कौशल्ये हवीत याची यादी आपण करू शकतो खरं तर. ती केली तर आपल्याला जीवन कौशल्यांचा खरा आवाका ध्यानात येईल. याकरता एक रोचक पद्धत वापरता येईल. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ज्या अनेक बाह्य व आंतरिक क्रिया करतो त्या बघाव्यात. यात आपल्या असं लक्षात येईल की आपण इतक्या गोष्टींवर अवलंबून असताना आपल्या नियंत्रणात फार कमी गोष्टी आहेत. माणसांची संख्या वाढणं, त्यातून गुंतागुंतीच्या सामाजिक रचना तयार होणं याला सर्वस्वी आपण एकटे जबाबदार नाही हे ठीक, पण या रचनांचे फायदे आहेत तसेच काही दुःखदायक पैलूही आहेत याचं किमान भान तरी असावं. उदा. सकाळी आपण शौचाला जातो. मलमूत्र विसर्जन आणि त्याची व्यवस्था हा एक विषय तिथे आपल्याला मिळेल. आपल्या मलमूत्राची विल्हेवाट कशी लावायची हा इतर अनेक मुद्द्यांसारखाच जीवन कौशल्याशी संबंधित मुद्दा आहे. आज आपल्या जीवन कौशल्याच्या कक्षेत घरातला संडास स्वच्छ ठेवणं आणि सोसायटीचं ड्रेनेज तुंबलं तर ते साफ करून घेणं एवढंच आहे. पण 'ड्रेनेज सफाई करणाऱ्या कामगारांचं जगणं' हा एक मोठा मुद्दा आहे. त्यावर आपण प्रत्यक्ष काही केलं तर उत्तमच, पण जर करत नसू तर आपल्या समाजातील हा एक प्रश्न आहे हे आपण मुलांना सांगणार की नाही? हे एक उदाहरण झालं. आता दिवसभरातल्या इतर क्रियांची यादी पाहिली तर आपल्या कक्षेत असलेली आणि आपल्या कक्षेत नसलेली अनेक जीवन कौशल्ये सापडतील. आणि मला असं दिसतं की आपण अनेक महत्त्वाचे प्रश्न आपल्याकडे उत्तर नाही म्हणून मुलांसमोर आणण्याचं टाळतो किंवा त्यावर थातुरमातुर उत्तर देऊन वेळ निभावून नेतो. समाज गुंतागुंतीचा आणि मुलांच्या प्रश्नांना सोपी उत्तरं हे गणित काही बरोबर नाही. कुठला प्रश्न वयाच्या कुठल्या टप्प्यावर मुलांसमोर आणावा यावर विचार व्हावाच, पण एकदम विशीत गेल्यावर मुलांसमोर काही गोष्टी येऊन आदळतात आणि मग तयारीअभावी मुलं कमकुवत पडतात. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
यासंदर्भात मला दोन प्रमुख गुण विकसित व्हायला हवेत असं वाटतं. पहिला म्हणजे विश्लेषक वृत्ती - विषयाची माहिती घेऊन आपलं आकलन तयार करण्याची, विविध शक्यता विचारात घेत उपाययोजना करण्याची सवय आणि दुसरा म्हणजे धैर्य. मुलांमध्ये त्यांच्या वाढीच्या वयात हे दोन गुण निर्माण होऊ शकले तर समाजाचं चित्र बदलायला पुष्कळ मदत होईल. हे करायचं कसं? तर बोलत राहून. वास्तवाचं चित्र दाखवत राहून. व्यसनमुक्तीच्या प्रोग्रॅम्समध्ये 'स्पॉन्सर' आणि 'स्पॉन्सी' असं एक नातं असतं. रिकव्हर झालेला 'स्पॉन्सर' रिकव्हरीत असलेल्या एकाची - 'स्पॉन्सी'ची जबाबदारी घेतो. हा स्पॉन्सर म्हणजे स्पॉन्सीचा आधारस्तंभ असतो. आपलं नियंत्रण सुटतंय, आपण पुन्हा व्यसनाकडे जातोय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी स्पॉन्सीने स्पॉन्सरला फोन करून, भेटून, बोलून ते सांगायचं आणि स्पॉन्सरने त्याला शब्दांद्वारे आधार देऊन त्याला पुन्हा मार्गावर आणायचं. हे सगळं सपोर्ट ग्रुप्सअंतर्गत होत असतं. असे सपोर्ट ग्रुप असणं, तिथे मोकळेपणाने बोलता येणं हे समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो जीवन कौशल्याचाच भाग आहे. मला असं वाटतं की मुलांशी आपलं नातं साधारणपणे या धर्तीचं असायला हवं. त्याचा उपयोग व्यक्तिगत प्रश्नांसाठी होईलच आणि सामाजिक प्रश्नांची जाण विकसित करण्यासाठीही होईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
व्यवस्थापनशास्त्रात 'सिस्टिम्स थिंकिंग' असा एक दृष्टीकोन शिकवला जातो. 'आपल्याला व्यवस्था लावायची आहे' हा यातला मुख्य विचार आहे. अनंत गोष्टी घडत आहेत. त्यातील प्रत्येक गोष्टीची नीट व्यवस्था लागली तर ती गोष्ट इतर गोष्टींमध्ये अडथळा आणणार नाही. हे आपल्या जगण्यालाही लागू आहे. जगण्यातील जे मोठे - मॅक्रो लेव्हलचे - विषय आहेत (उदा. लोकशाही, भांडवलशाही, समाजवाद, आर्थिक उदारीकरण इ.) ते मायक्रो लेव्हलच्या (रोजच्या जगण्यातील प्रश्न/विषय) विषयांतूनच तयार होत असतात. म्हणून मायक्रोस्कोपिक दृष्टी ठेवून तिथले प्रश्न सोडवण्यावर भर दिला तर वरचे प्रश्न सोडवायला मदत होईल.</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-86623172265452103482018-11-24T08:27:00.000-08:002020-05-03T08:28:45.492-07:00संवादातून बदल<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
आपण जी संस्कृती निर्माण केली आहे, ज्या मान्यतांच्या आधारे आपण जगतो, आपले व्यवहार पार पाडतो त्यातला एक लक्षणीय भाग ‘निर्णय घेणे’ हा आहे. आपल्याला पदोपदी काही ना काही ठरवायला लागतं, उपलब्ध पर्यायांमधून एक पर्याय निवडावा लागतो. यातला एक कळीचा भाग ‘चूक’ आणि ‘बरोबर’ ठरवणे हा आहे. ‘चूक’ आणि ‘बरोबर’च्या मुळाशी ‘नीतीविचार’ आहे. हा ‘नीतीविचार’ पूर्णपणे सुसंगत, गणिती प्रक्रियेने चालणारा नसतो. तो सामाजिक असतो आणि या नीतीविचारावर प्रभाव टाकणारी आपल्याच मनातील वैचारिक आणि भावनिक बले असतात. त्यांच्या परिणामी आपला ‘नीतीविचार’ आकार घेतो. मागच्या लेखात आपण म्हटलं तसं सांस्कृतिक रचितं तयार होत असताना, ती अस्तित्वात असताना वास्तविक रचितंही असतात. आपण ज्याला वाईट, चूक असं म्हणतो ते समाजासाठी वाईट आणि चूक असलं तरी वास्तवात ते 'असतं' हेच पुरेसं बोलकं आहे. नीतीविचारांचा प्रयत्न समाजाची घडी बसवायचा असतो, परंतु अशा पुष्कळ जागा असतात जिथे नीतीविचार पुरा पडत नाही. त्यामुळे नैतिकता समाजासाठी असली तरी ती अखेरीस व्यक्तीनिष्ठ राहते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
म्हणूनच समाजात जे जे प्रश्न दिसतात त्यांचा विचार निव्वळ नैतिकतेच्या कसोटीवर करून चालत नाही. अमुक एक वर्तन सर्वांच्या हिताचं आहे म्हणून बरोबर आहे हे ठीक. परंतु त्याच्याही पुढे जाऊन ते नैसर्गिकरित्याच बरोबर आहे असा आग्रह धरला जाणं थोडं गडबडीचं आहे. मुळात नैसर्गिक म्हणजे काय याबाबतच आपला बरेचदा घोळ होतो. कारण वर्तनाला आपण नैतिकतेच्या फूटपट्टीने मोजायचा प्रयत्न करतो. प्रत्यक्षात जे ‘चांगलं’ आहे आणि जे ‘वाईट’ आहे ते सगळं नैसर्गिकच आहे. निसर्ग हा ‘चांगला’, ‘दयाळू’, ‘क्षमाशील’ असा काही नसतो. निसर्ग म्हणजे 'असणं'. निसर्गाला मूल्यदृष्टी नाही. असलीच तर 'अस्तित्वदृष्टी' आहे. अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाचं अविरत फिरणारं चक्र हा निसर्गाचा प्रमुख भाग आहे. त्यात आपण ज्याला ‘चांगलं’ म्हणतो असे पैलू आहेत आणि आपण ज्याला ‘वाईट’ म्हणतो असे पैलूही आहेत. ‘चांगलं’ आणि ‘वाईट’, ‘चूक’ आणि बरोबर’ हा निर्णय सतत घ्यावा लागत असल्याने माणूस निसर्गत: जसा आहे तसा व्यक्त होत नाही. माणसावर नियंत्रण असावं या हेतूच्या पूर्ततेसाठी ते योग्य असलं तरी त्यामुळे माणसाची घुसमट होणे आणि त्यातून दुर्वर्तन होणे हीदेखील एक बाजू आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
‘दुर्वर्तन’ त्रासदायक असल्यानेच तो अभ्यासाचा विषय असायला हवा. आपल्या अंतरंगात भावभावनांचा, उलटसुलट विचारांचा कल्लोळ माजलेला असतो. परंतु तो उलगडून समोर मांडण्याची पद्धत आपण विकसित केलेली नाही. आपण भाषेच्या माध्यमातून आपल्या मनातील बोचऱ्या, दुखऱ्या, गोंधळलेल्या जागांचं नेमकं वर्णन करू शकलो तर आपलं सहअस्तित्व पुष्कळच सुकर होईल. इथे काळजी घ्यायची आहे ती एकच. ‘तुझ्या मनात असं आलंच कसं?’, ‘हे काहीतरी भयंकरच आहे’ अशा प्रतिक्रिया न देता मनातलं आधी पूर्ण ऐकून घ्यायचं. कारण मनातलं भयंकर असलं तरी ते ‘असतं’. मागच्या लेखात आपण लैंगिक गुन्ह्यांवरील उपायांसंबंधी बोलू असं म्हटलं होतं. मला पुरुषांच्या संदर्भात, त्यांच्या कामेच्छेच्या संदर्भात त्यांनी त्यांची कामेच्छा स्त्रीकडे स्पष्टपणे प्रकट करावी आणि त्यामुळे बिचकून न जाता स्त्रीने ती ऐकून त्यावर आपला निर्णय द्याावा हा एक पहिला उपाय सुचवावासा वाटतो. आपण पुरुषांबाबत बोलतो आहोत म्हणून पुरुषाचा उल्लेख केला आहे. वास्तविक विविध प्रकारचं ‘सेक्शुअल ओरिएंटेशन’ असणाºया सर्वांनाच ते लागू होतं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आता हे बोलायला, लिहायला सोपं आहे, पण प्रत्यक्षात करायला अवघड आहे असा प्रतिवाद होईल. तो बरोबर आहे. कारण आपण कामेच्छेचा निषेध पुष्कळ केला आहे. कामेच्छेला समजून घेतलेलं नाही. इथे पुन्हा प्रेमाचीच आठवण होते. प्रेम म्हटलं की आपल्याला ‘लफडं’ आठवतं. आपण प्रेमाकडे निर्मळपणे पाहण्यात बरेचदा कमी पडतो. (आता पुढे बोलायचं झालं तर आपण राग, द्वेष, मत्सर, अहंकार या आणि अशा विविध भावच्छटांनाही समजून घेत नाही. ‘द्वेष करणे हे वाईट’ हे ठीक आहे, पण तरी ‘द्वेष वाटतो' त्याचं काय? आता त्यावर काम करायचं तर आधी त्याविषयी बोलायला हवं. ते ऐकून घेतलं जायला हवं. या भावभावनांची ताकद फार मोठी आहे. त्यांच्या प्रभावामुळे पडलेला लहानसा तडा जर वेळीच सांधला गेला नाही तर पुढे जाऊन आणखी विध्वंस होऊ शकतो. सध्या इथे थांबून कामेच्छेकडे परत येऊ.)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कामेच्छेवर त्वरित 'अंमल' करण्याची पुरुषाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला वळण देण्यासाठी कामेच्छेचं शब्दातून प्रकटीकरण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो. शिवाय पुरुषांना (मुलांना) त्याबाबत कुणा स्त्रीशी बोलता आलं तर अधिकच बरं होईल. पुरुषाची सामाजिक आणि जैविक गोची झाल्याने त्याचं कामविश्व एकूणातच डळमळीत, अस्थिर, गुंतागुंतीचं, त्याच्या मनोविश्वावर ‘हावी’ होणारं झालं आहे. स्त्री ही त्याच्या कामेच्छेचा विषय आहे तो जैविक अंगाने. सामाजिक अंगाने स्त्री हा मनुष्यत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विषय आहे. परंतु या दोन्ही अंगांनी या विषयाचं प्रगल्भ ज्ञान त्याला झालेलं नाही. पितृसत्ताक व्यवस्था त्याला स्त्रीच्या अंतरंगाशी एकरुप होऊन तिला समजून घेऊ देत नाही तर कामेच्छेचं नियोजन न झाल्याने ती उफाळून वर येत त्याच्या विवेकाचाही कब्जा घेते. अशा परिस्थितीत त्याचा जर स्त्रीशी संवाद होत राहिला तर बदलाची शक्यता वाढेल. माझा व्यक्तिगत अनुभवही याला पुष्टी देणारा आहे. हेटरोसेक्शुअल पुरुष म्हणून माझं कामविश्व कसं आहे, त्यातल्या अवघड जागा कोणत्या, प्रश्न कोणते हे सगळं ऐकून घेणाऱ्या मैत्रिणी जेव्हा मला भेटल्या आणि त्यांनी जेव्हा ‘तुला जे होतंय ते ठीक आहे. त्याचा ताण घेऊ नकोस. त्याविषयी आपण बोलत राहू’, असं सांगितलं तेव्हा माझा मानसिक भार हलका व्हायला मदत झाली. (मला अशा मैत्रिणी उशिरा आणि एक-दोघीच भेटल्या. आज जी मुले विशीत आहेत त्यांना अशा मैत्रिणी असतील अशी आशा करतो!)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कामेच्छा स्त्रीसमोर शब्दांतून प्रकट केल्याने त्यातील तीव्रता, अनावरता कमी व्हायला मदत होण्याबरोबरच या विशिष्ट इच्छेचं ‘सामान्यीकरण’ व्हायलाही मदत होईल. पुरुष आणि स्त्री दोघांनाही ही इच्छा सहजभावाने घेता येणं शक्य होईल. यापुढे जाऊन कामेच्छेचं नियोजन हा मुद्दा येतो. इथे जे पुरुषविशिष्ट ‘प्रॉब्लेम एरियाज’ आहेत तिथे काम करण्याची एक कल्पना मला सुचते. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, अगदी घरातदेखील होणारा स्त्रियांचा लैंगिक छळ ही एक मोठी समस्या आहे. याबाबत कायदाही केला गेला आहे आणि कायद्याातील तरतुदींमध्ये पुरुषांचं प्रशिक्षण, सुधारणा यासाठीची स्पेस उपलब्ध आहे. लैंगिक दुर्वर्तन करणारा पुरुष आढळल्यास त्याच्या मानसिकतेचं ‘ऑडिट’ करण्याची काही एक प्रक्रिया होऊ शकली तरी त्याच्यात सुधारणा व्हायची शक्यता वाढेल. स्त्रीची स्वतंत्र आणि सक्षम व्यक्ती म्हणून नोंद घेण्याची वृत्ती घडवणं आणि त्याबरोबरच त्याच्या कामविश्वाबाबत त्याला बोलतं करून त्याची ‘तपासणी’ करत राहणं अशा दोन उद्देशांनी हे ‘ऑडिट’ करता येऊ शकेल. याला पुरुष चटकन् तयार होणार नाहीत हे खरं, परंतु माणसाला बोलतं करण्यासाठी काही क्रिएटिव्ह उपाययोजना करता येतात. त्यातून हळूहळू माणसं मोकळी होतात. उदा. एखाद्याा ऑफिसमधल्या पुरुषांना ‘मला सतावणारे कामविषयक प्रश्न, ‘मला माझ्या आसपासच्या स्त्रियांबद्दल काय वाटतं’ किंवा या धर्तीवरचे प्रश्न देऊन त्यांना त्यांचं म्हणणं निनावी पद्धतीने लिहायला सांगता येईल. पुरूषांची मानसिकता बदलायला हवी आहे यात शंकाच नाही. ती कशी बदलायची हा प्रश्न आहे आणि त्यासाठी आपल्याला आपली कल्पनाशक्ती राबवावी लागेल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
लैंगिक कुतूहल जागं होणं या पहिल्या टप्प्यापासून ते विस्कळीत, वाईट प्रकारे मनात रुजणं या दरम्यानच्या विविध टप्प्यांवर पुरुषांसाठी काही कार्यक्रम आखता येतील. कोणत्याही सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयासारखाच हाही विषय सविस्तर बोलण्याचा आहे. आपला समाज फार मोठ्या प्रमाणात विभाजित आहे. त्यामुळे मुंबईतल्या एखाद्याा मोठ्या ऑफिसमध्ये काम करणारा विवाहित पुरुष आणि त्याच मुंबईत रोजंदारीवर काम करणारा एखाद्याा स्थलांतरित मजूर यांच्या कामविश्वाबाबत वेगळा विचार करावा लागेल. महत्त्वाची गोष्ट ही की स्त्रीला निर्भयपणे, कुठल्याही बाह्य ताणाशिवाय वावरता येण्यासाठी आपण पितृसत्ताक व्यवस्थेचा, पारंपरिक पुरुषी मानसिकतेचा निषेध करण्याच्या पलीकडे जाऊन या व्यवस्थेत, मानसिकतेत बदल व्हावेत यासाठी एकत्र येऊन आपण काय करू शकतो हे शोधणं. स्त्री-पुरुष संबंध आणि विशेषत: कामेच्छा हा ‘अस्थिर’ विषय आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णायक बोलण्याची घाई न करता विश्लेषणात्मक बोलण्याची मानसिकता तयार करणे हा यातला पहिला टप्पा ठरेल.</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-16366512050775852002018-11-10T08:25:00.000-08:002020-05-03T08:26:26.280-07:00पुरूषातील लैंगिकता, लैंगिकतेतील पुरूष<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
अलीकडे चित्रपटगृहात एक अत्यंत प्रभावी (आणि महत्त्वाची) जाहिरात बघण्यात आली. नाव नेमकं आठवत नाही, पण हेल्पलाइनची जाहिरात आहे. एक मध्यमवयीन गृहस्थ लिफ्टमध्ये शिरतो. त्याच्यामागे एक लहान मुलगा फुटबॉल की बास्केटबॉलशी खेळत आत शिरतो. त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव आहेत. लिफ्टचं दार बंद होतं. पुढच्या दृश्यात लिफ्टचं दार उघडतं. मुलगा बाहेर पडतो. पाठोपाठ हा गृहस्थही बाहेर पडतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तसेच आहेत. जाहिरात इथे संपते आणि स्क्रीनवर कॅप्शन झळकते - 'डू यू लाइक चिल्ड्रेन इन अ वे यू शुड नॉट?' हेल्प इज अॅव्हलेबल.' (लहान मुलं ज्या प्रकारे आवडायला नकोत त्या प्रकारे तुम्हाला आवडतात का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो.) </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
ही जाहिरात पाहून मला अतिशय बरं वाटलं. एखाद्या प्रश्नाचा केवळ निषेध करण्यापेक्षा तो प्रश्न समजून घेऊन नेमक्या जागी काम करायचा प्रयत्न करणाऱ्या उपक्रमाची ती जाहिरात होती. आता यानंतर माझ्या मनात आलं की याच धर्तीवर आणखी एक जाहिरात करता येईल. त्यात लहान मुलाच्या जागी एक स्त्री असेल. पुरूष तोच असला तरी चालेल. जाहिरात संपल्यानंतर कॅप्शन अशी असेल - स्त्रीकडे बघून तुम्हांला सतत उत्तेजित व्हायला होतं का? आम्ही तुम्हाला याबाबत मदत करू शकतो! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मला जे म्हणायचं आहे ते बहुधा तुमच्या लक्षात आलं असेल. गेल्या दोन-तीन लेखांत आपण प्रेमसंबंधांविषयी बोललो होतो. त्यानंतर लैंगिक संबंधांविषयी मला काही सांगायचं होतं आणि ही जाहिरात माझ्या मदतीला धावून आली! </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कामेच्छा हा प्रेमासारखाच एक महत्त्वाचा विषय आहे. या विषयाबाबत खुलेपणाने, विश्लेषणात्मक बोलण्याइतपत आपण आपली 'सामाजिक मनोभूमिका' तयार केलेली नाही. प्रेमाबाबत जे झालं आहे तसंच काहीसं इथेही झालं आहे. 'संस्कृती'च्या उभारणीत काही गोष्टी नाकारल्या जातात, काही स्वीकारल्या जातात हे आपण मागे एकदा म्हटलं आहे. यात होतं असं की एका बाजूला सांस्कृतिक रचितं तयार होत असली तरी दुसऱ्या बाजूला त्यांना छेद देणारी 'वास्तव रचितं'ही असतात. लैंगिकतेबाबतचं वास्तव, लैंगिक इच्छेचं प्रकटन हा एक चिंताजनक विषय झाला आहे हे आपल्याला दिसतंच आहे. बलात्कारांच्या वाढलेल्या घटना, त्यातील हिंसाचार, पुरूषांकडून कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक, लग्नव्यवस्थेअंतर्गत असणारे बलात्कार व लैंगिक असमाधानाशी जोडलेले प्रश्न असे अनेक मुद्दे आहेत. लग्नसंस्था, लैंगिक संबंध आणि नैतिकता यावर स्वतंत्रपणे बोलता येईल. या लेखात आपण प्रामुख्याने 'पुरूषी लैंगिक वर्तन' यावर चर्चा करू. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
स्पिनोझा या सतराव्या शतकातील डच तत्वज्ञाचं एक मननीय विधान आहे - 'माणसाच्या कृत्यांकडे पाहून रडण्यापेक्षा, हसण्यापेक्षा किंवा त्यांचा तिरस्कार करण्यापेक्षा ती समजून घेण्याचा मी सतत प्रयत्न करतो.' माणसाची कृत्ये समजून घेणं अशाकरता महत्त्वाचं की ते नीट झालं तरच आपण प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने जाऊ शकतो. मला लैंगिकतेच्या क्षेत्रात हा विचार लक्षणीय वाटतो. पुरूषांचं लैंगिक वर्तन अनेक प्रकारांनी विस्कळीत, वाईट आणि स्त्रीसाठी अतीव दुःखदायक असं राहिलेलं आहे. पुरूषसत्ताक व्यवस्थेमध्ये पुरूषाचा अहंकार जोपासला जातो, स्त्रीला दुय्यम स्थान मिळतं आणि तिचं शोषण होतं हे तर आहेच. या व्यवस्थेने पुरूषाचीही गोची केली आहे आणि त्याच्यातला 'माणूस' झाकोळला आहे. पण व्यवस्थाजन्य अहंकाराबरोबरच पुरूषाची कामेच्छा हादेखील एक घटक असेल तर त्यावर मात करण्यासाठी आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे. आज मासिक पाळीसारख्या विषयावर खुलेपणाने बोललं जातं आहे हे अतिशय स्वागतार्ह आहे. त्याच खुलेपणाने पुरूषाच्या 'इरेक्शन'विषयी, वीर्यस्खलनाविषयी देखील बोललं जाणं आवश्यक आहे. विशिष्ट वयात मुलींशी आणि मुलांशी त्यांच्या 'मनातील लैंगिकतेविषयी' बोललं जाणं आवश्यक आहे. आज जर पुरूषाचं लैंगिक वर्तन अडचणीचं ठरत असेल तर या विषयासंबंधीच्या विश्लेषणात्मक चर्चेला सामाजिक चर्चाविश्वात स्थान मिळायला हवं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
र. धों. कर्वे यांच्या 'समाजस्वास्थ' मासिकात स्वतःच्या कामजीवनातील अडचणींबाबत वाचक पत्र लिहीत. वीर्यस्खलन, कामोत्तेजना, शरीरसंबंध, संतती नियमन यांच्याशी संबंधित प्रश्नांबाबत एका मराठी मासिकातून १९३०-१९४० च्या दशकांत चर्चा होत असे तशी चर्चा नंतर होत होती का माहीत नाही. आज अशी चर्चा करणारं मासिक/वृत्तपत्र नाही. माध्यमांचा इतका मारा असताना लैंगिक संबंधांवर नेमकेपणाने बोलणाऱ्या चर्चा, व्हिडीओज बघायला मिळत नाहीत. इंग्लिशमध्ये आहेत, मराठीत नाहीत. २००८ पासून 'समाजस्वास्थ्य' या मासिकाचं त्याच नावाने पुनुरुज्जीवन करण्याचा प्रयत्न मनीषा सबनीस यांनी केला. त्यात लैंगिक प्रश्नांविषयी चर्चाही होत असे. पण पुढे हे मासिक तग धरू शकलं नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पुरूषाची कामेच्छा आणि स्त्रीची कामेच्छा यात फरक आहेत का? असल्यास का? कोणते? पुरूषाच्या लैंगिक इच्छेचं नेमकं स्वरूप काय आहे? त्याची लैंगिक इच्छा गुन्हेगारी वळण का घेते? लैंगिक इच्छा नियंत्रणाबाहेर जात असेल तर त्यावर उपाय काय? हे या चर्चेतील काही समर्पक प्रश्न आहेत. मुळात सजीवांमध्ये लैंगिक इच्छा असते याचं एक प्रमुख कारण लैंगिक संबंधांतून प्रजोत्पादन होतं हे आहे. आपली गुणसूत्र टिकवून ठेवणं, त्यासाठी संतती जन्माला घालणं ही सजीवांची एक मुख्य प्रेरणा आहे. भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्यातून लैंगिक इच्छा चेतवली जाणं याच्या मुळाशी प्रजोत्पादनाचा 'ड्राइव्ह' आहे. अर्थात प्रजोत्पादन करायचं नसेल तरी माणसामध्ये लैंगिक इच्छा निर्माण होते. याचं कारण लैंगिक संबंधांतून केवळ प्रजोत्पादनच होत नाही तर 'प्लेझर'देखील मिळतं आणि प्रजोत्पादन व प्लेझर या दोन गोष्टी वेगळ्या करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. त्यामुळे 'प्रजेच्या जबाबदारीचं' ओझं टाळून निव्वळ आनंद' ही बाब माणसामध्ये या क्रियेचं आकर्षण वाढवण्यास कारणीभूत ठरली आहे. याची नोंद घेऊन पुरूषांच्या संदर्भाने विचार करता लैंगिक इच्छा निर्माण होणं, ती वाढणं, नियंत्रणाबाहेर जाणं आणि परिणामी त्यांच्याकडून गुन्हा घडणं या साखळीचा जर नीट अभ्यास केला, त्याबाबत पुरूषांना बोलतं केलं गेलं तर पुरूषाचा विवेक जागवायला मदत होऊ शकेल. कामेच्छा आणि स्त्रीवर नियंत्रण ठेवण्याची, अहंकाराची पुरूषसत्ताक व्यवस्थेकडून मिळालेली 'देणगी' या दोन्हीचा प्रभाव पुरूषाच्या मानसिकेतेवर आहे. याची उकल करून ती पुरूषांसमोर मांडत राहणं गरजेचं आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पुरूषाच्या बाबतीत लैंगिक तृप्ती हे विरेचनाचं माध्यम आहे. या तृप्तीअभावी, इरेक्शनच्या परिणामी पुरुषांत अवघडलेपण येतं, त्याचं मनःस्वास्थ्य गडबडू शकतं आणि ही इच्छा त्याच्या विवेकावरदेखील मात करू शकते. लैंगिक इच्छेची ही 'उत्क्रांतीजन्य ताकद' नोंद घेण्याजोगी आहे. ज्या पुरूषाची स्त्रीबाबतची मानसिकता मध्ययुगीनच आहे त्याला त्याच्या लैंगिक इच्छेबाबत काही प्रश्नच पडणार नाही. कारण त्याच्या दृष्टीने स्त्री ही भोग्य वस्तूच आहे. पण अशी मानसिकता नसणाऱ्या पुरूषांबाबतही लैंगिक इच्छा आपला प्रभाव दाखवते का हे तपासणं आवश्यक आहे. याबाबत एक उदाहरण आठवलं. 'मी टू' चळवळीत चित्रपट दिग्दर्शक विकास बहल याच्यावर आरोप झाले. विकास बहलने 'क्वीन' हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. जो पुरूष स्त्री स्वातंत्र्याचा एक सशक्त उद्गार असलेला चित्रपट तयार करतो तो वास्तवात संपूर्णपणे वेगळा, पारंपरिक पुरूषी मानसिकतेचा असू शकतो ही एक शक्यता आहेच. पण तो तसा नसून काही परिस्थितीजन्य कारणांमुळे किंवा मनःस्थिती बिघडून, नियंत्रण सुटल्यामुळे त्याच्याकडून अपराध घडला का हेही तपासायला हवं. मुद्दा हा की केवळ आरोप-प्रत्यारोपात न अडकता, शक्यता विचारात घेत, त्यांचा शोध घेत आपण समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार की नाही? बलात्काराकडे इव्होल्यूशनरी बायॉलॉजीच्या अंगाने पाहणारं ’नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायॉलॉजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन’ हे रँडी थॉर्नहिल आणि क्रेग पाल्मर या लेखकद्वयीचं एक पुस्तक आहे. यातील एका परिच्छेदाचा माझ्या एका लेखासाठी मी अनुवाद केला होता. तो इथे देतो आहे -</div>
<div style="text-align: justify;">
</div>
<div style="text-align: justify;">
मनुष्यांमधील बलात्काराची अंतिम कारणे स्त्री-पुरूषांच्या लैंगिक उत्क्रांतीमधील फरकातच सापडतील. स्त्रीच्या लैंगिकतेचं नियमन करणाऱ्या मानसिक यंत्रणा स्त्रीमध्ये उत्क्रांत झाल्या आणि त्याला प्रतिसाद म्हणून बलात्कार ही क्रिया उत्क्रांत झाली असे पुरावे सांगतात. स्त्री तिच्यातील या मानसिक यंत्रणांमुळे आपल्या संभाव्य लैंगिक जोडीदारांमध्ये भेद करू शकली. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी स्त्रीची निवड 'कुठल्याही नराबरोबर, कुठल्याही परिस्थितीत रत होण्यास तयार' अशी झाली असती तर बलात्कार घडला नसता. दुसऱ्या बाजूला, नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत जर मानवी पुरूषाची निवड 'विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट मादीकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणे' अशी झाली असती तर बलात्कारांचं प्रमाण खूपच कमी असतं आणि 'जी स्त्री समागम करण्यास उत्सुक आहे त्याच स्त्रीशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा' अशा प्रकारे जर मानवी पुरूषाची नैसर्गिक निवड झाली असती तर बलात्काराची शक्यताच नष्ट झाली असती!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
लैंगिक इच्छा, तिचं घडणं-बिघडणं आणि त्याचं प्रतिबिंब लैंगिक वर्तनात पडणं यामागे जैविक आणि सामाजिक दोन्ही घटक जबाबदार असतात आणि त्यामुळे लैंगिक गुन्ह्यांबाबत या दोन्ही अंगांनी विचार करून उपाय शोधावे लागतील हे नोंदवून आपण थांबू आणि पुढील लेखात उपायांचा विचार करू. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-91263992095581369382018-10-27T08:24:00.000-07:002020-05-03T08:24:43.750-07:00पॉलीॲमरी : तिघांची आनंदी गोष्ट<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
४ नोव्हेंबर २०१७ च्या चतुरंग पुरवणीत 'पॉलीॲमरी' या विषयावर मी एक लेख लिहिला होता. एकाहून अधिक व्यक्तींशी असणारे गंभीर प्रेमसंबंध आणि सर्व संबंधित व्यक्तींना त्याबाबतची स्पष्टता हा पॉलीॲमरीचा गाभा आहे. त्या लेखात संकल्पनात्मक मांडणी झाली होती. या लेखात 'अंमलबजावणी' विषयी विचार करू. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बहुविध प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी प्रगल्भ मानसिकतेची आवश्यकता असते ते आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे. आता असं गृहीत धरू की अशा नात्यांमध्ये काही व्यक्ती आहेत. तर त्यांनी हे पुढे कसं न्यायचं? इथे दोन शक्यता आहेत. जर सर्व संबंधित व्यक्ती एकमेकांचे नातेसंबंध स्वीकारत असतील तर प्रश्नच नाही. पण जर काहींना असे संबंध मान्य नसतील तर ते अडचणीचं होतं. आणि मग जे पॉलीॲमरस आहेत त्यांनी इतरजण तयार होईपर्यंत वाट पाहणं इष्ट ठरतं. आज आपण समाज म्हणून या संकल्पनेसाठी तयार नाही आहोत. त्यामुळे जे तयार आहेत त्यांना अस्तित्वात असलेले नातेसंबंध टिकवून नव्या नातेसंबंधात जायचं असेल तर त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अन्यथा एक नातं थांबवून दुसऱ्या नात्यात जायचा निर्णय घेता येतोच, पण मग ते मोनोगॅमस होतं. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातली प्रमुख अडचण प्रेमातील पझेसिव्हनेस ही आहे. आणि तो कसा घालवायचा याकरता कुठलंही रेडिमेड उत्तर नाही. सतत बोलत राहून, एकत्र राहण्याचे प्रयोग करत राहून हा बदल होऊ शकतो. यात परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार भावनिक व लैंगिक दोन्ही प्रयोग करता येतील. त्यावर प्रत्येकाने आपापल्या मानसिक तयारीनुसार विचार करावा व कृती करावी. आपल्या मानसिकतेत पझेसिव्हनेसची भावना खूप खोलवर रुजल्याने ती सहजासहजी बाजूला काढणं अवघड आहे. पझेसिव्हनेस (मालकी हक्क) आणि जेलसी (मत्सर) या दोन्ही भावना एकमेकींना समांतर चालत असतात. आहार, निद्रा, भय, मैथुन या आदिम जाणिवांचा विस्तार होऊनच राग, द्वेष, मत्सर, प्रेम या भावना निर्माण झाल्या आहेत. आपल्या मेंदूत जे जे काही निर्माण होतं त्याचा धागा आपल्या उत्क्रांतीच्या वाटचालीशी जोडलेला आहे. त्यात पुन्हा स्त्री आणि पुरूष असा फरकही आहे. त्यामुळे आपल्या भावनांमुळे विचलित न होता 'हे मला वाटत नाही तर माझ्या मेंदूतल्या न्यूरॉन्सना वाटतंय' असा विचार केला तर आपण आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हाच धागा पकडून मालकी हक्क आणि मत्सर या भावनांवरही काम करता येऊ शकेल. दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस आधी 'स्वतंत्र माणूस' आहे हे मनात रूजवायचा प्रयत्न केल्यानेही मदत होईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एक गोष्ट लक्षात घेऊया की व्यक्तींची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने ही व्यक्तींनी एकत्र येऊन लावलेल्या व्यवस्थेचीही बल स्थाने आणि कमकुवत स्थाने असतात. त्यामुळे कोणत्याही व्यवस्थेला एकच एक ठरीव साचा असत नाही. हेच बहुविध नातेसंबंधांनाही लागू होतं. त्या त्या उदाहरणातील व्यक्तींच्या स्वभावानुसार, सामर्थ्य व कमकुवतपणानुसार त्या त्या उदाहरणातील व्यवस्थेच्या स्वरूपात फरक पडू शकेल. सर्वजण एकत्र राहत असतील तर ही व्यवस्था परिणामकारक ठरते. पण काही ठिकाणी एकत्र न राहताही ती व्यवस्था चांगली चालू शकते. त्यामुळे मुळात व्यवस्था लवचीक असणं चांगलं. (स्त्री-पुरूष संबंधांबाबत इथून पुढे लवचीक व्यवस्थाच परिणामकारक ठरतील असं एकूणात दिसतं.) व्यक्ती एकत्र राहिल्या तर घर चालवण्यासाठी जे करावं लागतं त्या सर्व कामांची विभागणी तर करावी लागेलच आणि प्रत्येक नात्याचं स्वरूप आणि त्यानुसार वेळेची विभागणी हेही करावं लागेल. व्यक्ती एकत्र राहत नसतील तर दैनंदिन कामांचा मुद्दा न येता वेळेच्या विभागणीचा मुद्दा फक्त येईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
व्यक्तींमधले संबंध निभावणं यात जशी व्यक्तींमधील प्रगल्भताच मुख्य भूमिका पार पाडते तेच मुलांबाबतही लागू होईल. मुलांसाठी जैविक आई-वडील अर्थातच अग्रस्थानी असतील आणि इतरजण दुय्य्म स्थानी - पण घरातील / नात्यातील सदस्य म्हणून असतील. यातली एक महत्त्वाची बाजू ही की लहानपणापासूनच नातेसंबंधांच्या अशा नव्या स्वरूपाची ओळख मुलांना झाली तर त्यांची वाढही या व्यवस्थेला पूरक होईल आणि प्रेमभावनेतील मुक्तता पहिल्यापासूनच अनुभवल्याने त्याची त्यांना मोठेपणी मदत होईल. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
अशा प्रकारच्या नात्याची कल्पना आसपासच्या लोकांना, नातलगांना द्यावी की न द्यावी या प्रश्नाचे उत्तरही एकसाची नाही. ज्यांना ही गोष्ट पचनी पडणं शक्य नाही त्यांना हे सांगावं की सांगू नये हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. इथे प्रश्न नैतिकतेचा नाही. 'काही प्रामाणिक इच्छा आणि इतरांची अपुरी तयारी' असा हा संघर्ष आहे. त्यामुळे इथे काहीएक मध्यममार्ग काढावा लागेल. ही गोष्ट हळूहळू समजावूनही सांगता येईल. त्यासाठी उपलब्ध साहित्याचा आधार घेता येईल. गटचर्चा घेता येतील. आपल्या मनातील विविध भावनांबाबत आपली 'साक्षरता' (इमोशनल लिटरसी) कशी वाढेल यासाठी प्रयत्न करता येतील. माणसाचं एक सत्य असं आहे की तो प्रेमाचा भुकेला असतो. त्याला स्वतःचं एक माणूस हवं असतं. ज्यांना पॉलीॲमरी ही संकल्पना स्वीकारायला जड जाते त्यांना हा विश्वास मिळाला की ही प्रेमाची व्याप्ती वाढवणारी संकल्पना आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे, यात कुणा एकाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही, तर त्यांची पावलं हळूहळू स्वीकृतीकडे पडू शकतात. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
एखादा नवा विचार आणि त्याअनुषंगाने नवीन व्यवस्था हा 'पॅराडाइम' (पॅटर्न, साचा) मधला बदल असतो. माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बदल घडलेलेच आहेत. कुटुंबव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. पॉलीॲमरी हाही एक बदल आह. ही व्यवस्था सार्वत्रिक होईल किंवा होणारही नाही. झाली तर भविष्यात तिला कायदेशीर मान्यताही मिळू शकेल. आजचा मुद्दा इतकाच आहे की जर काही (मोजक्या) लोकांना काही वेगळं वाटत असेल तर त्याचा शोध घ्यायची, त्याबाबत प्रयोगशील असण्याची मुभा त्यांना असावी. अडचण अशी होते की पारंपरिक व्यवस्थेतील लोकांना त्या व्यवस्थेबाहेरचं काही दिसलं की ते त्यांना चुकीचं वाटतं. त्यांना 'वेगळं' वाटणं, स्वीकारता न येणं हे मान्यच आहे, पण 'चुकीचं' वाटत असेल तर अडचण आहे. समूहकेंद्री, संस्कृतीकेंद्री, धर्मकेंद्री विचारांनी अस्मितेचा अभिमान गौरवास्पद ठरवला आहे. त्याकरता प्रसंगी हिंसेलाही मूक संमती दिली आहे. पण प्रेमासारख्या मुक्तिदायी भावनेला मात्र बंदिस्त केलं गेलं आहे. तिथे काही वेगळं करायला बंदी आहे. (इथे मला 'प्रेमाचं होऊ द्या ना जागतिकीकरण' असं म्हणणारे कवी अरूण काळे आठवले!) मला असं वाटतं की बहुविध नातेसंबंधांची चर्चा करताना प्रेमभावनेमधील मोकळिकीचा मुद्दा आज जे प्रौढ आहेत, ज्यांची काहीएक मानसिकता तयार झाली आहे त्यांच्यापेक्षा जे तरुण, टीनएजर्स आहेत, जे नव्याने गोष्टी समजून घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. लहान मुलांना वाढवतानाही आपण आपल्याला जे अप्रिय वाटतं त्याविषयी बोलायचं टाळतो. तिथेही जर आपण बदल केला आणि विविध विषयांना नेहमीच मूल्यात्मक दर्जात किंवा मूल्यनिर्णयात न गुंतवता 'जे आहे ते' मांडायचा प्रयत्न केला तर मुलंही कप्पेबंद विचार करणार नाहीत. बदलाच्या मानसिकतेचा संबंध वयाशी असतोच असं नाही हे खरं आहे, पण जर पाटी कोरी असेल तर नवीन चित्र काढायला अधिक अवकाश मिळतो हेही खरंच!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-57502628800100697602018-10-24T10:05:00.000-07:002020-05-01T03:55:10.964-07:00मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि आपण <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
एप्रिल २०१८ मध्ये मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील ओम निवास या इमारतीवर पोलिसांनी रात्री धाड टाकली होती. या परिसरात वेश्याव्यवसाय चालतो आणि इथे धाडसत्र सुरूच असतं. पण या धाडीदरम्यान घडलेली वाईट गोष्ट ही की पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दोन वेश्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मरण पावल्या. दोरखंडाच्या साहाय्याने इमारतीच्या मागील बाजूने खाली उतरण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्यांची वयं ५० व ३१ अशी होती. या घटनेची बातमी मुंबई मिररमध्ये १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाली आहे. पोलिसांच्या धाडी ही वेश्यांच्या डोक्यावर असलेली सततची टांगती तलवार असते. यात त्यांना वरचेवर अपमानाचा, दबावाचा सामना करावा लागतो. यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दोघींचा मृत्यू व्हावा हे आणखी भयंकर आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
वेश्या आणि वेश्याव्यवसाय हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समाजातील काही व्यावसायिक अतिशय हलाखीचं जिणं जगतात आणि समाज म्हणून आपल्यासाठी ते लाजिरवाणं आहे. गटार सफाई करणारे कामगार, वेश्या ही याची काही उदाहरणं आहेत. कोणत्याही व्यवसायामागचं प्रमुख कारण आर्थिक गरज हे असतं. वेश्याव्यवसायाचंही तसंच आहे. मात्र या संदर्भाने वेश्या ढोबळमानाने दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. बळजबरीने व्यवसायात आणल्या गेलेल्या आणि आणि स्वेच्छेने व्यवसाय करणाऱ्या. आजचा भारतीय कायदा एकट्या स्रीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय केला तर तो गुन्हा समजत नाही. पण एकाहून अधिक स्रियांनी एकत्र व्यवसाय करणे, घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणे गुन्हा आहे. व्यवसायासाठी 'सॉलीसिटिंग' करणं हा गुन्हा आहे. वेश्येने कमावलेल्या पैशावर उदरनिर्वाह करणं हाही गुन्हा आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत 'सहेली' ही 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह' गेली वीस वर्षे विविध प्रश्नांवर काम करते आहे. वेश्यांचं आरोग्य, त्यांचं समुपदेशन, नागरिक म्हणून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे यावर आणि वेश्याव्यवसायाबाबत समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठी 'सहेली' काम करते आहे. भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे The Trafficking of Persons (Prevention, Protection and Rehabilitation) Bill, 2017 नुकतंच संसदेत सादर झालं आणि मंजूरही झालं. या बिलासंदर्भात नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स (एनएनएसडब्ल्यू) या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तपशीलात एक टिपण तयार केलं होतं. त्यात प्रामुख्याने बिलातील तरतुदींवर तपशीलात प्रतिक्रिया दिली गेली आहे. याखेरीज 'सहेली'साठी मी एक टिपण तयार केलं होतं. ते इथे देत आहे. वेश्याव्यवसायाशी संबंधित 'फोर्स्ड रेस्क्यू' (सक्तीची मुक्ती) या एका मुख्य मुद्द्यावर वाचकांना प्राथमिक माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे. मुद्दा थोडक्यात पोचावा यासाठी काही भाग गाळला आहे. -</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
वेश्याव्यवसायाचे वास्तव लक्षात न घेता प्रस्थापित नैतिकतेच्या चौकटीतूनच या व्यवसायाकडे नेहमी पाहिले जाते आणि ते अडचणीचे आहे. वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघितले जात नाही. या व्यवसायात स्रिया स्वेच्छेने व बळजबरीने दोन्ही प्रकारे येतात. परंतु कायद्याचा दृष्टीकोन आजवर 'या स्रियांची आज इच्छा काय आहे हे लक्षात न घेता त्यांना या व्यवसायातून 'मुक्त' करणे, त्यांचे पुनर्वसन करणे - मुळात वेश्याव्यवसायाचे उच्चाटन करणे असाच राहिलेला आहे. वेश्याव्यवसाय म्हणजे ट्रॅफिकिंग असे साधारण समीकरण तयार केले गेले आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. या व्यवसायात काही स्रिया स्वेच्छेने येतात हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टिकोनात मोठी गफलत आहे. प्रस्तुत बिलदेखील याच दृष्टीकोनातून तयार केले गेले आहे आणि त्यामुळेच त्यावर सविस्तर टिप्पणी करणे आवश्यक आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बिलातील तरतुदींनुसार गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल याची आम्हाला धास्ती वाटते आहे. विविध गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल हे स्पष्ट आहे. या बिलाद्वारे जिल्हा कृती दल (डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स) स्थापन करण्यात येऊन त्यांना अमर्याद अधिकार दिले जाणार आहेत. पोलीसांकडून वेश्यांवर सातत्याने आपल्या अधिकारांचा वापर (गैरवापरदेखील) होत असतो. त्यात भर घातली गेली तर वेश्यांचे प्रश्न आणखी चिघळतील. वर उल्लेख केला आहे त्याप्रमाणे या व्यवसायाचे वास्तव समजून न घेता या स्रियांना व्यवसायातून बाहेर काढण्याचीच घाई होताना दिसते. एक उदाहरण घेऊ. पुण्यातील बुधवार पेठेत आज सुमारे तीन हजार स्रिया वेश्याव्यवसाय करत आहेत. या स्रियांचा व्यवसाय बंद केला तर त्या कुठे जातील आणि काय करतील याचा विचार शासनाने केला आहे का? वेश्यांची संख्या लक्षात घेता या स्रियांना 'मुक्त' केले तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न शासन सोडवणार आहे का? मुळातला प्रश्न हा आहे की एखाद्या स्त्रीला बळजबरीने या व्यवसायात आणले गेले असेल तर तिला इच्छेविरुद्ध आणले गेले हे उघडच आहे. अशा प्रकारे फसवून, बळजबरीने कुणालाही या व्यवसायात आणायला 'सहेली'चा विरोधच आहे. पण आज ती वेश्याव्यवसाय करते आहे आणि अर्थार्जन करते आहे. व्यवसायात येताना तिची इच्छा विचारात घेतली गेली नव्हती, तिचे शोषण झाले होते. मग त्यावेळी जर तिला कुणी मदत करू शकले नव्हते तर आज ती व्यवसायात स्थिरावल्यावर तिच्या व्यवसायाकडे नैतिकतेच्या चष्म्यातून बघत तिला व्यवसाय सोडण्यास सांगणे योग्य आहे का? व्यवसायात येताना तिच्यावर बळजबरी झाली होती तशीच आता व्यवसाय सोडतानाही करायची का? बळजबरीने व्यवसायात आणणे हे शोषण आहे तसेच बळजबरीने व्यवसायाबाहेर काढणे हेदेखील शोषणच नाही का?</div>
<div style="text-align: justify;">
<br />
आज जी वेश्यावस्ती दिसते त्यात 'ट्रॅफिकिंग' होऊन गेलेल्या' स्रिया राहत आहेत. त्यांचे प्रश्न आज वेगळे आहेत. ट्रॅफिकिंग होऊच नये यासाठी बिलात जे उपाय (Preventive measures) योजले आहेत ते अतिशय ढोबळ स्वरूपाचे आहेत. उदा. facilitating the implementation of livelihood and educational programmes for vulnerable communities किंवा developing appropriate law and order framework to ensure prevention of trafficking of persons यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचे नक्की कुठले कार्यक्रम आहेत किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य फ्रेमवर्क म्हणजे नक्की काय या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. वेश्याव्यवसायात स्वेच्छेने येणाऱ्या स्रिया आर्थिक कारणांनी येतात. ज्या स्वेच्छेने येत नाहीत त्याही आर्थिक कारणांमुळेच या व्यवसायात ढकलल्या जातात. या व्यवसायाच्या मुळाशी इतर कुठल्याही व्यवसायाच्या मुळाशी असतो तो आर्थिक उद्देशच प्रबळ आहे. ट्रॅफिकिंग थांबवायचे असेल तर ज्या स्रियांना बळजबरीने व्यवसायात आणले जाते त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आपल्याला कुणी फसवू नये यासाठी त्यांची व्यावहारिक समज वाढवणे, मुलींना समर्थ बनवणे, आसपासच्या लोकांना सजग करणे अशा अनेक आघाड्यांवर काम करणे गरजेचे आहे. त्याबाबतचा काही कृतिकार्यक्रम बिलामध्ये दिलेला नाही. एक गोष्ट खरी आहे की समाजातील आर्थिक विषमता कमी होणे, कुटुंब नियोजनासाठी सामाजिक प्रबोधन होणे या गोष्टी संथगतीने होतात. शासन याबाबतीत एका मर्यादेपर्यंतच काम करू शकते हेही मान्य. पण जर मुळापाशी काम करण्याची क्षमता मर्यादित असेल तर खोडावर घाव घालण्यात काय अर्थ आहे? वेश्यागृहांना टाळे ठोकून ट्रॅफिकिंग थांबणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शासनाच्या या बिलाबद्दल आणि वेश्याव्यवसायाबाबत शासनाचे जे एकूण धोरण आहे त्याला आक्षेप असण्याचे एक कारण हेही आहे की शासन पुनर्वसनाचा पुरस्कार करते, पण पुनर्वसन झालेल्या वेश्यांची उदाहरणे दिसत नाहीत. आज सुधारगृहांची अवस्था वाईट आहे. पुनर्वसन योजनांना प्रश्न विचारायची गरज आहे. कायमस्वरूपी, मुख्य प्रवाहात आणल्या गेलेल्या स्रियांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाचा पुनर्वसनाचा आग्रह कमकुवत पडतो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. शासनाला जर खरोखरच ट्रॅफिकिंग रोखायचे असेल तर त्यासाठी वेश्याव्यवसायातील स्रिया मदत करू शकतील. त्यातील ज्या स्रिया स्वतः त्या अनुभवातून गेल्या आहेत त्यांना ट्रॅफिकिंगबाबतचे बारकावे माहीत आहेत. 'एनएनएसडब्ल्यू'च्या सभासद संघटनांनी शासनाला याबाबत मदत केली आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की वेश्येच्या डोक्यावर पोलीस पकडून तरी नेतील किंवा जबरदस्तीने सोडवतील तरी या भीतीची टांगती तलवार आहे. तिच्या डोळ्यासमोर शासनाचं जे चित्र आहे तेच मुळात तिला घाबरवणारं आहे. अशा परिस्थितीत या स्त्रियांच्या मनात शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचा मार्गही सुकर होऊ शकतो. शासनाने हे कृपया लक्षात घ्यावे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रस्तावित बिलाच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका सारांशाने अशी आहे -</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<ul style="text-align: left;">
<li style="text-align: justify;">शासनाने मानवी तस्करी विरोधात कारवाई जरूर करावी, पण वेश्याव्यवसायाविरुद्ध कारवाई करू नये. वेश्याव्यवसायाला गुन्हा समजू नये.</li>
<li style="text-align: justify;">वेश्याव्यवसायाबाबतचे धोरण/कायदा ठरवताना या व्यवसायातील व्यक्ती, त्यांच्या संघटना, राष्ट्रीय पातळीवरील नेटवर्क यांना सहभागी करून घ्यावे. आज तसे होत नाही आहे.</li>
<li style="text-align: justify;">शासनाने हे लक्षात घ्यावे की वेश्याव्यवसाय एकटीने करण्याऐवजी एकत्रितरित्या करणं स्रियांना अधिक सुरक्षित वाटतं. शिवाय वेश्यावस्तीत या स्रिया ज्या घरात राहतात त्या घरांच्या मालकिणी-मालक, वस्तीतले दलाल हे सगळे नेहमीच शोषण करणारे नसतात असे स्रियांचे अनुभव सांगतात. वस्तीमध्ये या स्रियांसाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार झाली आहे. हे वास्तव लक्षात न घेता ट्रॅफिकिंग रोखण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायावरच कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे आहे.</li>
<li style="text-align: justify;">वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघावे. इतर व्यवसायांसारखा हा व्यवसाय आहे हे मान्य केले की मग त्यानंतर पुढच्या गोष्टी घडू शकतील.</li>
<li style="text-align: justify;">वेश्याव्यवसायाचा संबंध लैंगिक व्यवहाराशी आहे आणि लैंगिक व्यवहाराकडे समाज म्हणून आपण स्वच्छ दृष्टीने बघत नाही ही एक मुख्य अडचण आहे. त्यामुळे स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडेही आपण सकारत्मकतेने पाहू शकत नाही. शासनाच्या वेश्याव्यवसायाबाबतच्या धोरणात याच मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.</li>
<li style="text-align: justify;">एखादी स्री स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करत असेल तर ती तो स्वेच्छेने करत नाही, नाईलाजाने करते आणि म्हणून त्यात खऱ्या अर्थाने 'स्वेच्छा' नाहीच असा युक्तिवाद बरेचदा केला जातो. या युक्तिवादातील अडचण अशी आहे की स्वेच्छेचा मुद्दा केवळ वेश्याव्यवसायालाच नव्हे तर इतरही व्यवसायांना लागू होतो. अनेकजण नाईलाज म्हणून नोकरी-व्यवसाय करत असतात. पण त्या व्यवसायांबाबत हा युक्तिवाद केला जात नाही. याचे कारण पुन्हा लैंगिक व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी हेच आहे. विवाहाव्यतिरिक्त येणारे लैंगिक संबंध अनैतिक मानले जाणे यातच मुळात घोळ आहे. लैंगिक संबंध ही नाजूक गोष्ट आहे, त्यात काळजी घ्यायला हवी, मानवी संबंध व समाजव्यवस्था यादृष्टीने लैंगिक व्यवहारांचे नियमन करणे आवश्यक आहे हे मान्यच आहे, पण म्हणून लैंगिक व्यवहारच मोडीत काढणे योग्य नाही. हे लैंगिक व्यवहार पैशाच्या आधारे, व्यवसाय म्हणून, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य याची काळजी घेऊन होत असतील तर त्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही.</li>
<li style="text-align: justify;">लैंगिक गरज ही माणसाची गरज आहे. लग्नसंस्थेमार्फत या गरजेचे नियमन काही अंशी केले जात असले तरी ते पूर्णतः केले जात नाही. लग्नसंस्थेच्याबाहेर असणाऱ्या व्यक्तींची लैंगिक गरज हाही एक मुद्दा आहेच. वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे कारण विविध व्यक्तींच्या, वयाच्या विविध टप्प्यांवरील लैंगिक गरजेची व लैंगिक आकांक्षांची पूर्तता समाजातील स्री-पुरुषांच्या परस्पर सहकार्यातून होण्याची समाजमान्य व्यवस्था अस्तित्वात नाही. म्हणूनच लग्नसंस्थेला समांतर असलेली वेश्याव्यवस्था इतिहासात खूप आधीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे वेश्याव्यवसायाच्या गुन्हेगारीकरणाने प्रश्न संपणारे नाहीत. लैंगिक गरजेचे/इच्छेचे नियमन हा प्रमुख विषय आणि ती गरज/इच्छा पैशाच्या मोबदल्यात पूर्ण करण्याला मान्यता असणे/नसणे हा उपविषय असे दोन मुद्दे आहेत. त्यावर काम केलं तर कदाचित वेश्याव्यवसायाचं स्वरूप बदलायला मदत होईल.</li>
</ul>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
(या विषयासंदर्भातील विचारी प्रतिक्रियांचं स्वागत आहे.)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
२४ ऑक्टोबर २०१८, फेसबुक पोस्ट</div>
<div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-50972377995407488032018-10-13T08:18:00.000-07:002020-05-03T08:19:52.735-07:00प्रोग्रॅमिंगच्या पलीकडचं प्रेम<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
'निःशब्द' हा रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. साठ वर्षांचा एक गृहस्थ विजय (अमिताभ बच्चन) आणि त्याच्या विशीतल्या मुलीची मैत्रिण जिया (जिया खान) हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यातून मोठा गहजब उडतोआणि सगळेच नातेसंबंध ताणले जातात. विजयच्या मनात अपराधभाव दाटून येतो आणि शेवटी सगळीच नाती तुटतात. कथेचा शेवट दुःखात होतो. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपण ही कथा उदाहरणादाखल म्हणून घेऊया, पण ती उदाहरणादाखल आहे हेही लक्षात ठेवूया. या कथेतील पुरूषाच्या जागी स्त्री असू शकेल आणि ती तिच्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडू शकेल. किंवा एखाद्या उदाहरणात समवयस्क स्त्री-पुरूष लग्नबाह्य प्रेमात पडू शकतील. 'निःशब्द'मध्ये विजयच्या मनात जे होतं ते प्रातिनिधीक आहे. वास्तविक पाहता प्रेमात पडणं ही एक चांगली गोष्ट आहे. सुंदर गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की तिचं उदात्तीकरण करण्याचीही खरं तर गरज नाही. एक सहज भावना म्हणून प्रेमाकडे बघण्यात काहीच अडचण असता कामा नये. प्रेमात गुन्हेगारी स्वरूपाचं काहीच नाही. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. स्त्री-पुरूषांमधील प्रेम हे सहजतेने घेतलं जात नाही. मुळात आपण प्रेमात पडलो म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय असं प्रेमात पडणाऱ्यालाच आधी वाटतं. पहिल्यावहिल्या किंवा तारूण्यातील प्रेमात बहुधा असं वाटत नाही, पण लग्न झाल्यावर किंवा प्रौढावस्थेत कुणाविषयी प्रेम वाटलं तर अपराधभावाने मन दबून जातं. असं होतं कारण आपण प्रेमभावनेला स्वतंत्र, मोकळं ठेवलेलं नाही. स्त्री-पुरूषांमधील 'रोमँटिक लव्ह' हा सुटा विषय म्हणून रोमांचक वाटला तरी प्रत्यक्ष जगण्यात आपण प्रेमाला 'ओझं' केलं आहे किंवा ते आपल्याकडून झालं आहे. आदिम अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत येताना आपण अनेक गोष्टी स्वीकारल्या, अनेक नाकारल्या, अनेक गोष्टींना वळण दिलं. त्यामुळे आपलं मानस हे स्वतंत्रपणे, आपण एकट्याने घडवलेलं असणं शक्य नाही. आपल्या मानसिकतेमागे 'माणसाची महाकथा' उभी आहे. आपलं मन हे एका अर्थी 'प्रोग्रॅम्ड' आहे. पण माणूस आणि इतर सजीवांमध्ये एक प्रमुख फरक असा केला जातो की 'माणूस हा जाणिवेची जाणीव असणारा सजीव आहे'. त्यामुळेच तो जाणिवेला आकार देऊ शकतो. मागच्या लेखात आपण युव्हाल हरारीने मांडलेली 'कल्पित वास्तव' ही संकल्पना पाहिली होती. आपण 'कल्पित वास्तवा'वर विश्वास ठेवणारे मनुष्यप्राणी आहोत, पण 'कल्पित वास्तव' आपण निर्माण करतो याचीही आपल्याला जाणीव आहे. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
मग या आपल्या बलस्थानाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल का? विजय आणि जिया प्रेमात पडल्यावर जो गहजब उडतो तो टाळून त्या दोघांच्या जाणिवांकडे थोड्या तटस्थपणे बघणं आपल्याला शक्य आहे का? आपण जी नैतिकतेची भक्कम भिंत आपल्या आंतरिक प्रेरणांभोवती उभी केली आहे त्या भिंतीवर चढून पलीकडे पाहायचा प्रयत्न आपण करू शकतो का? गडबड अशी होते की ही भिंत आहे, हा जगाचा शेवट नाही हेच आपण लक्षात घेत नाही. भिंतीपलीकडे काहीतरी असू शकतं हा विचार करायला आपण शिकायला हवं. वरील उदाहरणात विजय त्याच्या प्रेमाबद्दल बायकोला लगेच सांगू शकत नाही. अपराधभाव त्याला ग्रासून टाकतो. तो तिला सांगतो पण कालांतराने. इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर तो आपल्या मनातलं मोकळेपणाने, दडपण न घेता बायकोला सांगू शकत नाही कारण असं काही होणं हे चुकीचं आहे अशी दोघांचीही ठाम धारणा आहे. वास्तविक लग्न झालेलं असताना अन्य कुणाविषयी प्रेम/आकर्षण वाटणं हे मुळात याचं द्योतक आहे की या मानवी उर्मींचा लग्न झालेलं असण्या/नसण्याशी संबंध नाही. लग्नव्यवस्था, त्यावर आधारलेली कुटुंबव्यवस्था जर इतकी कार्यक्षम आणि परिणामकारक असेल तर स्त्री-पुरूषांच्या मनात असे विचारच येता कामा नयेत. पण तसं होताना दिसत नाही. कारण व्यवस्था हा नियमनाचा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल व्यवस्थेचा आदर करायला हवाच, पण व्यवस्थेतून निर्मूलन होऊ शकत नाही. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विनोबा भावे यांचं 'स्वराज्यशास्त्र' नावाचं एक छोटंसं पण राजकीय विचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. यात त्यांनी 'राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' दिले आहेत. भाषाभेद, धर्मभेद, आर्थिक भेद हे मूळ भेद नव्हेत. त्यामुळे तेवढेच लक्षात घेऊन व्यवस्था कशी राखायची हा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ आहे असं ते लिहितात. समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, तर कमी-अधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो असं त्यांचं प्रतिपादन आहे. 'कृत्रिम अर्थ' आणि 'स्वाभाविक अर्थ' हा भेद आपण स्त्री-पुरूष संबंधांबाबत पाहिला तर 'नैतिकदृष्ट्या अमुक एक वर्तन योग्य असताना स्त्री-पुरूष त्याचं पालन करत नाहीत म्हणून प्रश्न निर्माण होतात' हा झाला कृत्रिम अर्थ. 'प्रेम, रोमँटिक क्षण अनुभवायची आस, शारीरिक आकर्षण, मैत्रभाव, राग-द्वेष-कंटाळा, नात्यातील साचलेपण यासारख्या इतर मानवी भावना अशा विविध पातळ्यांवर स्त्री-पुरूषांमधील आंतरसंबंध कायम कार्यरत असतात. तर त्यांची व्यवस्था कशी लावायची हा मूलभूत अर्थ आहे. (केवळ स्त्री-पुरूषच नव्हे, तर सर्वच मानवी संबंधांना हे लागू होईल). लग्न, लिव्ह इन, ओपन मॅरेज हे व्यवस्थांचे पर्याय आहेत. त्यातून स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन होईल हे खरं, पण म्हणून व्यवस्थेला पावित्र्य बहाल करणं हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं आहे. स्त्री-पुरूष संबंधांबाबत गरजेचं काय असेल तर ती सम्यक, तटस्थ दृष्टी. प्रेमामुळे, लैंगिक आकर्षणामुळे स्त्री-पुरूषात जे घडतं त्याकडे 'जगबुडी आली' या भावनेने न बघता मानवी जाणीव म्हणून बघता येण्याची क्षमता. (आणि याचं प्रशिक्षण किशोरवयात सुरू व्हायला हवं. जीवनकौशल्य या विषयावर आपण या लेखमालेत बोलणार आहोत.)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
आपल्यावरील संस्कार, प्रस्थापित नैतिकता आणि यामुळे घडलेलं आपलं मानस यातून संपूर्णपणे मुक्त होणं आपल्याला शक्य नाही. पण या सगळ्याबरोबरच प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीने आपल्याला दिलेलं दुसरं एक साधन आहे ते म्हणजे तर्क आणि विवेक. आपल्याभोवती जे घडतं त्याला आपल्यावरील 'संस्कारां'निशी सामोरं जाण्यापेक्षा 'विवेका'ने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. 'निःशब्द' चित्रपटाचं उदाहरण पाहिलं तर आपला नवरा वयाने मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर बायको आणि मुलीला धक्का बसणं हे समजण्यासारखं आहे. पण आता हे घडलं आहे तर त्याला सामोरं जायचा मार्ग आपण शोधूया हा विवेकी विचार आहे. स्त्री-पुरूषांमधील जैविक ताण प्रबळ होतात, होऊ शकतात हे स्वीकारत या संबंधांचं व्यवस्थापन करणं ही विवेकी कृती आहे. पण इथेच दृष्टीचा प्रश्न येतो. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. प्रेमात माणूस बहकतो, तो स्वतःला समर्पित करू पाहतो आणि त्यातून त्याचंच नुकसान होतं या काळजीपोटी त्याला सावधगिरीचा सल्ला देणं हे ठीक, पण म्हणून प्रेम नाकारण्याला अर्थ नाही. मला असं वाटतं की एकीकडे चित्रपट आणि कथांमधून उभं केलेलं प्रेमाचं उदात्त रूप, प्रेम हे सर्वस्व आहे अशी कल्पना आणि दुसरीकडे प्रेमाचा साधा स्वीकारही न करणारं जातीय, वर्गीय आणि सांस्कृतिक वास्तव या परस्परविरोधी शक्तींमध्ये आपण आपलं स्वतःचं, व्यक्ती म्हणूनचं, स्त्री-पुरूष म्हणूनचं 'प्रेमाचं आकलन' करून घेण्यात कमी पडतो. ते जर होऊ शकलं तर आपण प्रेमामुळे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गाष्टींमुळे हबकून जाणार नाही. विजयच्या बायको आणि मुलीने 'तुम्ही दोघे प्रेमात पडला आहात. आता हे नातं पुढे कस न्यावं असं तुम्हाला वाटतं? या नात्याची आणि इतर नात्यांची व्यवस्था कशी लावावी असं तुम्हाला वाटतं?' असे प्रश्न विचारणं अधिक गरजेचं आहे. या प्रश्नांमध्ये सहजीवनाचं नवीन प्रारूप तयार व्हायच्या शक्यता आहेत. </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'तत्त्वविचार' हा शब्द जड वाटला तरी तो महत्त्वाचा आणि दिशादर्शक आहे. प्रेम असो, राग असो, भौतिक इच्छा-आकांक्षा असोत की लैगिंक आकर्षण असो - आपण आपल्या वैचारिक सामर्थ्याच्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या बळावर या प्रत्येक उर्मीचा तात्त्विक विचार केला तरच आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं हे कळू शकेल. चूक-बरोबर ठरवण्याआधी 'स्वरूप समजून घेणं' महत्त्वाचं आहे. पुढील लेखात आपण 'प्रेमाची व्यवस्था' लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'पॉलीॲमरी' या संकल्पनेच्या 'अंलबजावणी'विषयी बोलू. या संकल्पनेवर गेल्या वर्षी एक विस्तृत लेख मी 'चतुरंग'मध्येच लिहिला होता. ज्यांनी तो लेख वाचला नसेल त्यांना https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-what-is-polyamorous-relationship-1580267/ या लिंकवर तो वाचता येईल. (हा लेख या ब्लॉगवर <a href="https://mindwithoutmeasure.blogspot.com/2018/08/blog-post_20.html" target="_blank">इथे </a>वाचता येईल.)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-24680221480199824072018-10-10T06:40:00.000-07:002020-05-01T03:29:58.256-07:00आपलं कामजीवन <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
ओट्यावर वाळत घातलेल्या भांड्यांना पाय फुटून ती निमूटपणे आपापल्या जागेवर जाऊन बसली असती तर आयुष्यात सुखाचे काही प्रहर अजून आले असते असं ज्या क्षणी वाटतं तो क्षण म्हणजे आपल्या कामजीवनाचा उत्कर्षबिंदू असतो. आपलं कामजीवन हे आपल्या जड-चेतन विश्वाइतकंच बहुरंगी, बहुढंगी आहे. रोज रात्री दाराबाहेरच्या कडीला दुधाची पिशवी अडकवण्यापासून ते दहाएक वर्षांतून एकदा घराला रंग देण्यापर्यंत कामजीवनाची अद्भुत रूपं फक्त चकितच करणारी नाहीत, तर मानवाविषयी करुणा उत्पन्न करणारी आहेत.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
भाई देशपांडे एकदा म्हणाले होते, "सुनीताला कामं दिसतात. मला दिसतच नाहीत." अशा थोर भाग्याच्या पुरुषांपैकी आपण नाही याची जाणीव होऊन, फेमिनिझमचं बाळकडू घेत राहिल्यानं माझं कामजीवन समृद्ध झालं आहे हे आरंभीच नमूद करतो. घर हे मुळात राहण्यापेक्षा काम करण्याची जागा आहे. जेरड डायमंडपासून युव्हाल नोआ हरारीपर्यंत अनेकांनी शेतीनं माणसाची प्रमुख गोची केली असं लिहिलं आहे. माझा मुद्दा त्याहूनही खोलातला आहे. शेतीनंच नव्हे तर काहीतरी करत राहण्याच्या वृत्तीनं माणसाची गोची केली आहे. मग ती शेती असो किंवा अन्य काही असो. जीव वाचला, पोट भरलं, झोपायची सोय झाली की गप राहायचं सोडून 'अजून काहीतरी करू' असं ज्याक्षणी माणसाला वाटलं तो क्षण माणसाची ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय गोची करणारा होता. सारखं काहीतरी करणं हा माणसाला मिळालेला शाप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एक काम दुसरी कामं जन्माला घालतं. शिवाय त्यानं इतरांची कामलालसा वाढते, ते वेगळंच. साहित्याचंच उदाहरण घेऊ. (इतकं निरुपद्रवी दुसरं कोण आहे!) एके काळी मोजकेच दिवाळी अंक निघत असत. ती संख्या आता शे-दोनशेच्या घरात आहे असं ऐकतो. शिवाय ऑनलाइन अंकही प्रसिद्ध होऊ लागले. एवढं होऊन सांस्कृतिक सुस्कारे कमी झाले का? तर नाही. खरं तर सांस्कृतिक उपक्रम जेवढे वाढतील तेवढी संस्कृती अधिकाधिक धोक्यात येत जाते. जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं तेव्हा वास्तविक काही अडत नव्हतं. साहित्य आलं, आणि पाठोपाठ साहित्यव्यवहारही आला. पुढे मग अर्थातच व्यवहार साहित्यावर भारी पडू लागला आणि संमेलनं, चर्चासत्रं, व्याख्यानं सुरू होऊन, जे लिहिलं आहे ते का लिहिलं आहे, किंवा जे लिहिलंच नाही ते का लिहिलं नाही, याविषयी चर्चा झडू लागल्या. आजमितीस मराठीत जितकं साहित्य निर्माण होतं त्याहूनही जास्त चर्चा निर्माण होते. (यात फेसबुक धरलेलं नाही. ते धरलं तर कहरच होईल.) मला तर असंही वाटतं की कालांतरानं चर्चक-समीक्षकच सेंटर कोर्टात उतरून एकमेकांशी मॅच खेळतील आणि लेखक चेंडू उचलून देण्यापुरते राहतील.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
काहीही न करण्यात जो आनंद आहे त्याला माणूस पारखा झाल्यानं माणसाचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोज सकाळी सहस्रांच्या संख्येनं आवराआवरी करून, बूट चढवून कामाला जाणं आणि हे अनंत सकाळी करत राहणं हे प्रगतीचं नसून अधोगतीचं लक्षण आहे. खूप काम करून तर मधमाशासुद्धा आपलं जीवन व्यतीत करतात. काम खूप वाढवून ठेवणाऱ्या प्राण्याला प्रगत कसं काय म्हणायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. कामं कमी कमी व्हायला हवीत. तर ती प्रगती. यंत्रानं कामं सोपी केली ही तर गेल्या दोन शतकातील सर्वांत मोठी थाप आहे. यंत्रानं काही केलं असेलच तर नवीन कामं निर्माण केली आहेत. माणूस चंद्रावर गेला याचं पुष्कळ कौतुक होतं. पण तो चंद्रावर गेल्यानं नक्की काय झालं याचं उत्तर हे कौतुक करणाऱ्यांपैकी कितीजण देऊ शकतील याची मला रास्त शंका आहे. एकूणच माणसाच्या काम करण्यामुळे तो रिकामपणाच्या आनंदाला कसा मुकला आणि त्याच्यातील परात्मभाव कसा वाढीस लागला ही एलिएनेशनची थिअरी समूळ विस्तारानं सांगणं आज गरजेचं झालं आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
या एलिएनेशनची सुरुवात घरापासूनच होते. रोज सकाळी एखाद्या सुखद, बेधुंद करणाऱ्या आठवणीनं (किंवा अजिबात कुठलीच आठवण वगैरे न येता) जाग न येता; पाण्याचा पंप चालू करायचा आहे या आठवणीने जाग येणं ही एक मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. आणि ही नुसती सुरुवातच असते. पुढचा संपूर्ण दिवस म्हणजे एक न संपणारी कामसाखळी असते. आणि या साखळीतील कामांचे, उपकामांचे, त्यातून उद्भवणाऱ्या वैतागांचे, उपवैतागांचे इतके नमुने आणि कंगोरे आहेत की 'कामेची केला दीन किती नर' असं म्हणावंसं वाटतं. ओट्यावरची भांडी नुसती आपापल्या जागी ठेवली की झालं असं होत नाही. ओट्यावरचं पाणी पुसून घ्यायला लागतं. स्वयंपाक झाला की अन्न मिळतं हे ठीक, पण त्याबरोबरच बर्नरखालची तबकडी स्वच्छ करणं आणि शेगडीच्या मागच्या भिंतीवरील डाग पुसणं ही कामं वाढतात. विशेषतः भरतासाठी वांगं भाजताना ती तबकडी जी काय विद्रूप होते, त्याला तोड नाही. भाजी शिजली की झालं असं नसतं. उरलेली भाजी काढून ठेवावी लागते. उन्हाळयात चुकून भाजी फ्रिजच्या बाहेर राहिली तर संपलंच. कुकर लावणं हे वास्तविक किती सोपं काम आहे? पण त्यातही भात सांडला तर पाणीमिश्रित भातातलं पाणी वेगळं करून भात वेगळा करणं हे काम वाढतं. पोळ्या करणं हा तर फारच सेक्सी प्रकार आहे. एक तर कणीक नीट असावी लागते. ती असली आणि नीट मळली गेली तरी कधीकधी - फॉर सम अननोन रीझन - फुलके फुलायचं नावच घेत नाहीत. सगळं नीट असताना एखादा फटाका का फुटत नाही, हे जसं कळत नाही तसंच इथेही आहे. शिवाय पोळ्या लाटतानाही काही पोळ्या बहुधा केवळ निषेध म्हणून व्यवस्थित लाटून घेत नाहीत. आणि पोळ्या करून झाल्या की ओट्यावर सांडलेलं पीठ पुसून घेणं हा कार्यक्रम आहेच.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सिंक हा द्रौपदीच्या अक्षयपात्रासारखाच प्रकार आहे. फक्त ते पात्रांचं अक्षयपात्र आहे. सिंक पूर्ण रिकामं आहे, त्यात अगदी एकही चमचा नाही हे दृश्य बघायला मी, साहित्यसंमेलनात व्यासपीठावर एकही राजकारणी नाही हे दृश्य बघण्याइतकाच उत्सुक असतो. सिंक हे जसं पात्रांचं अक्षयपात्र आहे तसं बरणी हे पदार्थांचं कृष्णविवर आहे. त्यातून वस्तू बघता बघता नाहीशा होतात. म्हणजे तुम्ही यादी वगैरे करता, सगळ्या गोष्टी आणता. तूरडाळ शिल्लक आहे असा तुमचा दृढविश्वास असतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीनं बरणीचा तळ गाठल्याचं लक्षात येतं. अशा वेळी स्वतःवर चरफडण्यापेक्षा दुसरं काही करता येत नाही. बरेच दिवस झाले कुळथाचं पिठलं केलं नाही, म्हणून कुळथाच्या पिठल्याचे डोहाळे लागावेत तर कुळीथ पीठ आणावं लागणार आहे असा साक्षात्कार होतो. केव्हातरी पुलावाचा वगैरे बेत ठरतो. तुम्ही भाज्या आणून दिलेल्या असतात. चिरून ठेवलेल्या असतात. तांदूळ धुऊन ठेवलेले असतात. पुढचा भाग अर्धांगिनीवर सोपवून तुम्ही नेटफ्लिक्स उघडून बसता. वीसएक मिनिटं होतात न होतात तोच 'अरे, तमालपत्र राहिलंच की' हे कानी पडतं. मग फ्रॅंक अंडरवुड, वॉल्टर व्हाइट किंवा अशाच कुणा सिद्धपुरुषांच्या लीळा पाहण्याचं अर्धवट सोडून तमालपत्र आणण्यासाठी उठावं लागतं. दुकान फार लांब असतं असं नाही, पण व्यत्यय ही संख्यात्मक संकल्पना नसून गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे व्हायचा तो त्रास होऊन गेलेला असतो.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
घेऊ घेऊ म्हणून चाललं होतं, ती रॉयल एनफिल्ड घेतल्यावर पाचशे सीसी इंजिनात उत्पन्न होणाऱ्या भरभक्कम टॉर्कइतकाच भरभक्कम आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात 'आता काय होईल ते होईल, पण एनफिल्डच्या हँडलला पिशवी अडकवायची नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा मनातल्या मनात केली होती. ती सुमारे दीड दिवस टिकली. कृष्णविवरासमोर एनफिल्ड काय चीज आहे?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बसल्या जागी अंतःचक्षूंना कामं दिसणं तर फार वाईट. म्हणजे तुम्ही विचार करत असताना मराठी साहित्याच्या सद्यस्थितीबद्दल (वाढवून ठेवलेल्या कामाचे परिणाम. दुसरं काय!); पण प्रत्यक्षात विचार घरंगळत असतो तो 'दूध गार झाल्यावर विरजण लावायचं आहे' हा. मराठी कथेला पाहिल्यासारखं टोक उरलं आहे की नाही या विषयावर काही लिहिताना 'कोथिंबीर निवडायची राहिली आहे' हा टोकदार विचार जखम करून जातो. (शेपू, कोथिंबीर आणि मेथी निवडणे ही सृजनशक्तीपाताची त्रिसूत्री आहे. आपल्याकडे 'रेनेसान्स' झालं नाही याच्या काही कारणांपैकी एक कारण इथल्या समाजाला भाज्या निवडाव्या लागत होत्या हे आहे. यावर वाद घालायला आपण तयार आहोत!) 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल' यावर तुम्ही काहीएक मौलिक, आंतरिक गुंतागुंतयुक्त विचार करत असताना स्वयंपाकघरातल्या व्हाइट बोर्डावर लिहिलेली कामांची यादी डोळ्यांसमोर नाचू लागते आणि प्रबोधनाची वाटचाल मंदावते. हे सगळं कशामुळे? तर कामामुळे. म्हणून जीवनाला आराम पडण्यासाठी जीवनातील काम काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी 'काहीही न करणे' या एकमेव आनंददायी क्रियेला सतत प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
'काहीतरी करू' यात ट्रिपला वगैरे जाणंसुद्धा सामील आहे. ट्रिप हा वास्तविक तापदायक प्रकार आहे. ज्या कुठल्या प्रेक्षणीय स्थळी तुम्ही जाता तिथे उंचावलेल्या हातांमधल्या कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं काय दिसतं? तारखा ठरवा, तिकिटं बुक करा, सामान भरा (यात काहीतरी विसरणं आणि काहीतरी उगीच घेतलं जाणं हे नेहमीचं आहे. थंडी असेल म्हणून स्वेटरने बॅगेतली जागा अडवायची आणि तिथे गेल्यावर उकाडा हजर किंवा पाऊस नसेल म्हणून घेतलेली छ्त्री बाजूला काढायची आणि पोचल्यावर स्वागताला पाऊस हजर!), भलामोठा प्रवास करा, हॉटेलात चेक-इन करा, तिथे अमुक-नाही-तमुक-नाही म्हणून मॅनेजमेंटशी भांडा, चार ठिकाणच्या गर्दीत सामील होऊन काहीतरी बघितल्याचा आपल्याला आनंद झालाय हे स्वतःच्या मनावर ठसवा - हा एवढा खटाटोप सांगितलाय कुणी? 'प्रवासाने माणसाला शहाणपण येते' वगैरे सुविचार तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. प्रवासामुळे फक्त खर्च होतो. शहाणपण ही वस्तू मुळातच तुमच्याकडे असावी लागते. त्यासाठी वणवण करायची गरज नसते. मनुष्यप्राणी हा एक कल्पनातीत वैचित्र्यानं भरलेला प्रकार आहे हे कळण्याकरता प्रवास कशाला हवा?</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
कामजीवन हे एक्स्पोनेन्शियली तापत जाणारं प्रकरण आहे. त्यामुळे वेळच्या वेळीच आवर घातला नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं. त्यासाठी आजूबाजूला सजगपणे बघत ज्या ज्या ठिकाणी कामाचं उगमस्थान दिसेल त्या त्या ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणणं आवश्यक आहे. खरेदी वगैरे तर अगदीच टाळावी. जेव्हा खरेदी मिनिमम होईल तेव्हाच इकॉनॉमी ऑप्टिमम होईल. या एकूणच प्रश्नाबाबत मुळात एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे. काहीही न करता निवांत बसलो असतानाच ती लक्षात आली. युरेका मोमेंटच म्हणा ना. (मूलभूत जाणिवा निवांतपणा असतानाच होतात. न्यूटन, आर्किमिडीज साक्ष आहेत. फक्त इतर लोकांनी त्यांनी लावलेल्या शोधापाशी थांबायला हवं होतं. गुरुत्वाकर्षण आहे हे कळलं ना? उत्तम. पुढे जाऊन आकाशात रॉकेट्स कशाला सोडायची?) मी त्याला 'द ह्यूमन ट्रूथ' असं नाव दिलं आहे. हे ट्रुथ असं - माणसं काहीएक संख्येनं एकत्र आली की करेक्ट असं काही घडण्याची शक्यताच लयाला जाते. एकत्र आली की माणसं काहीतरी घोळच घालतात. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच!) त्यामुळे काहीतरी करण्याची जळमटं लोकांच्या मनातून काढून टाकणं अगत्याचं झालं आहे. काहीही न करण्याकरता माणसं एकत्र येतील तेव्हाच मानवी इतिहास आश्वासक वळण घेईल. अन्यथा कामजीवन माणसाचं माकड करतच राहणार आहे!</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div>
(ऐसी अक्षरे, दिवाळी २०१८)</div>
<div>
<a href="https://aisiakshare.com/node/6953">https://aisiakshare.com/node/6953</a> </div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
</div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-310910957796011095.post-40656617069370621292018-10-07T06:50:00.000-07:002020-05-01T00:45:02.700-07:00कवितेत आणि कवितेबाहेर<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
दिनकर मनवर यांच्या 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. 'विचारप्रवृत्त करणारा' असं म्हणण्याचं कारण हे की या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.<br />
<br />
'टीकास्वयंवर' या पुस्तकातील 'मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप' या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात 'अगोचर' या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. 'कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते' या वाक्यात 'घट्ट' हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नैतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापारावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का हाही प्रश्न विचारता येऊ शकेल. नेमाडेंनी खानोलकरांच्या कादंबरीलेखनाची, त्यांच्या शैलीची चिकित्सा करताना या कादंबऱ्यांना थ्रिलर फँटसीचं स्वरूप आहे, त्यात दुःखाचं संवेदन नाही, अनुभूतीचं दारिद्र्य भाषेच्या अलंकरणाने आणखी हास्यास्पद होते (हे विशिष्ट निरीक्षण स्वतंत्र मुद्दा म्हणून मला महत्त्वाचं वाटलं. हा मुद्दा 'लेखक' होण्याच्या महत्त्वाकांक्षेने केल्या गेलेल्या, परंतु अलंकरणाला, शाब्दिक कसरतीला अधिक महत्त्व देत पुनुरुक्तीत अडकलेल्या इतरही लेखनाला लागू होऊ शकेल) असं म्हटलं आहे. ही निरीक्षणे समीक्षा दृष्टीला पटावीत अशीच आहेत. परंतु आक्षेप मान्य करूनही खानोलकरांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे मला आवडल्या असं कुणी म्हणू शकेल.<br />
<br />
हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण 'काय लिहिलं आहे' आणि 'काय प्रतीत होत आहे' यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला 'अभिव्यक्ती' आणि 'अभिव्यतीचा परिणाम' हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुःखद आहे असं म्हणता येईल पण ते कलाकृतीचं 'भागधेय' आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.<br />
<br />
अस्मितेचा स्त्रीशी आणि स्त्रीच्या चित्रणाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या जाती/समूहातील स्त्रियांचे प्रश्न काय आहेत याविषयी फारसे उत्सुक नसणारे लोकही त्या स्त्रियांच्या शीलरक्षणाविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी संवेदनशील असतात. हा गुंता साहित्य-कलेच्या पुढे जाऊन पुरूष म्हणूनच्या काही जैविक वृत्तींपाशी, पुरूषसत्ताक राजकारणापाशी आणि त्याने घडवलेल्या मानसिकतेपाशी जाऊन पोचतो. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं असं बरंच आहे कारण त्यात पुरूष आक्रमक म्हणून आणि हतबल म्हणूनही अडकलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा फक्त नोंदवून पुढे जाऊ. कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या 'लेखक-कवी असण्या'तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतीशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.<br />
समग्रपणे विचार करत तयार झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारी काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बरेचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे - प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणे हे आपलं - सेपियन्सचं - एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.<br />
<br />
कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की स्त्रीच्या अवयवांशी पुरूषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. 'स्तन' हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरूषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरूषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरूषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही. कपडे आणि कपड्यांशी जोडली गेलेली सभ्यता याने आपल्याला सुरक्षा, सौंदर्यदृष्टी वगैरे दिली असली तरी ते 'सुपरस्ट्रक्चर' आहे. या गोष्टींनी आपली लैंगिक-भावनिक गोचीदेखील केली आहे. शिवाय आपल्याकडे भाषा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याकडे स्पष्टपणे बोलण्याइतपत भाषाच नसते बरेचदा. उदा. एखादा मुलगा/मुलगी मला 'हॉट' वाटतो/वाटते यातल्या 'हॉट' मधला नेमका अर्थ पकडेल असा शब्द मराठीत नाही. प्रेम किंवा आकर्षणासारखी सहज भावना व्यक्त करणं हेसुद्धा जिथे शब्दांतून नीट जमत नाही तिथे लैंगिक आकर्षणाबद्दल काय बोलणार? आपण एकूणातच शरीराला खासगीत कोंडून ठेवलं आहे. (मला काही इंग्लिश मालिका आवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे शरीर, लैंगिक इच्छा याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना सहजतेने मांडण्याची, त्याविषयी बोलायची आणि विनोदाच्या मुशीतून सहज-सुंदर करण्याची हातोटी तिथे बघायला मिळते. कितीतरी एपिसोड्स आणि त्यातील उल्लेख आठवतात.) माध्यमांतून कलात्मकपणे या विषयांवर बोललं गेलं की या विषयातील ताण हलके व्हायला मदत होते. हा सहजभाव येणं महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या स्तनांबद्दल आज स्त्रीमध्ये सहजभाव नाही कारण तो पुरूषात नाही. पुरूषात नाही कारण त्याच्या कामनेचं एक केंद्र असलेले स्तन झाकलेले आहेत. ते झाकलेले आहेत कारण पुन्हा तेच - पुरूषात सहजभाव नाही. हे एक चक्र तयार झालं आहे आणि ते मोडल्याखेरीज स्त्रीविशिष्ट उल्लेखांनी बिथरून जाणं थांबणार नाही. 'स्तन' हा शब्द रोजच्या बोलण्यात सार्वत्रिक झाल्याशिवाय त्याला चिकटलेली लैंगिक संवेदनाची धार कमी होणार नाही. (स्त्रीचे स्तन हे पुरूषाच्या कामनेचं केंद्र का असतात हा पुरूषाच्या लैंगिक आणि मानसशास्त्रीय घडणीशी जोडलेला प्रश्न आहे. याविषयी गूगल सर्च केल्यास प्राथमिक माहिती मिळू शकेल.)<br />
<br />
कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. 'आदिवासी' किंवा अन्य समूहवाचक, जातीवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तरत्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. 'वस्तुस्थिती' ही चीज आदर्श, सिद्धांत, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या 'वस्तुस्थिती' आहेत. त्यामुळे सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधीत्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं. आदिवासी हा शब्द विशिष्ट समूहाकडे निर्देश करतो हे खरंच आहे. हा समूह एका संस्कृतीचं, परंपरेचं आणि ज्ञानसाठ्याचं प्रतिनिधीत्व करतो. जातीय तेढ वाढलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर जल-जंगल-जमीन याच्याशी जोडल्या गेलेल्या, पर्यायी जीवनशैली म्हणून काहीएक प्रारूप जगासमोर ठेवण्याची क्षमता असलेल्या आदिवासी समूहांचं 'असणं' महत्त्वाचं आहे. त्यांची आणि आपली नाळ मुळात एकाच ठिकाणी जोडलेली आहे. आपण वेगळे झालो आहोत हे खरं आहे, आपल्यावर त्यांनी रागवावं याची पुष्कळ कारणं आपण त्यांना दिली आहेत. त्यात भर पडायला नको असं मनापासून वाटतं.<br />
<br />
(७ ऑक्टोबर २०१८, लोकसत्ता) </div>
Utpalhttp://www.blogger.com/profile/14626429143610733600noreply@blogger.com0