Friday, December 30, 2016

२०१६ : काही विस्कळीत नोंदी

'हजारों ख्वाहिशें ऐसी' या सुधीर मिश्रा दिग्दर्शित चित्रपटात अगदी सुरुवातीलाच एक स्वगत आहे. नक्षलवादी चळवळीतला एक कार्यकर्ता (जो या चित्रपटातल्या तीन प्रमुख व्यक्तिरेखांपैकी एक आहे) स्वतःच्या प्रेयसीशी पत्रातून बोलतो आहे. मोर्चा आणि आंदोलनाच्या दृश्यांच्या पार्श्वभूमीवर त्याचा आवाज आपण ऐकतो. तो स्वतःला आणि एकूणच त्याच्या कॉलेज-वर्तुळातल्या मित्रांना उद्देशून म्हणतो, ‘चळवळीत भाग घेतलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कथा ऐकून मी स्तब्ध झालो. स्वतःबद्दल विचार करायला लागलो. आपण स्वतःला काय समजतो? थोडी रॅडिकल जारगन, थोडं राजकारण, थोडं रॉक अँड रोल - पण मुख्यत्वे शॉक व्हॅल्यू!’ चित्रपट पाहताना मी त्याच्या या मनोगतापाशी अडखळलो होतो. ‘हे वर्ष आपल्यासाठी कसं होतं?’ याचा विचार आज वर्षाखेरीस करताना हे मनोगत आठवून पुन्हा अडखळायला होतं आहे.

चार्ल्स डिकन्सच्या ‘अ टेल ऑफ टू सिटीज’ या गाजलेल्या कादंबरीतलं पहिलं विधान प्रसिद्ध आहे. ‘इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द एज ऑफ विस्डम, इट वॉज द एज ऑफ फूलिशनेस...’ अशी त्या विधानाची सुरुवात आहे. मला हेच विधान ‘अ टेल ऑफ वन नेशन’ म्हणून भारताविषयी म्हणावं असं वाटतं. गेलं एकच वर्ष नव्हे, तर गेली दोन-तीन वर्षं हा देश सतत ढवळून निघतो आहे. केंद्रातलं सत्तांतर हा एक मुद्दा झाला, पण समाजमाध्यमांच्या ‘स्फोटा’मुळे, टीव्हीच्या अतिरेकामुळे, एकाच वेळी अभिव्यक्तीच्या होणाऱ्या स्वागतार्ह आणि भयावह लोकशाहीकरणामुळे आपण बहुधा कधी नव्हे अशा चालत्या-बोलत्या-गात्या-नाचत्या-हलत्या-वाहत्या समाजात राहतोय, तसंच कधी कुठल्या धारेबरोबर पुढे जातोय हे आपलं आपल्यालाच कळत नाहीये, असं काहीसं वाटतं.

‘मी कोण आहे? मी स्वतःला काय समजतो? आजच्या माध्यमबहुल काळात ‘शॉक व्हॅल्यू’ हे माझ्याही कृतीचं मुख्य अंग होऊ पाहतंय का?’ या प्रश्नांना सामोरं जाण्याचा प्रयत्न मी सध्या करतो आहे; गेल्या वर्षात करत होतो. अनेकांना अनेक टप्प्यांवर अस्तित्वविषयक प्रश्न पडत असतात. या प्रश्नांनी ज्यांचं विचारविश्व व्यापलं होतं, असे तत्त्वज्ञ, अभ्यासक, त्यांनी निर्माण केलेले विचारप्रवाह माणसाच्या आत्मचिंतनाची साक्ष देतात. माझं आत्मचिंतन (आणि आत्मपरीक्षण) मला काय सांगतं? मला हा प्रश्न फार महत्त्वाचा वाटायला लागला आहे.

आपण सगळे या पृथ्वी नामक ग्रहावरच्या निसर्गाचा, पृथ्वीवरच्या एका देशाचा, तिच्यावरच्या एका गावाचा-शहराचा, समूहाचा, कुटुंबाचा, सरमिसळ असलेल्या एका जाड्या-भरड्या, ‘फंक्शनल-डिसफंक्शनल’ (समृद्ध अडगळ!) संस्कृतीचा, एका राज्यव्यवस्थेचा, न्यायव्यवस्थेचा, जात-वर्ग-विचारव्यवस्थेचा, लिंगसापेक्ष घडणीचा, लिंगनिरपेक्ष वैचारिकतेचा, लवचीक नैतिकतेचा आणि आणखीही कशाकशाचा भाग असतो. यांमधल्या बऱ्याचशा व्यवस्थांचे आपण उपभोक्ते असतो. अर्थव्यवस्थेच्या महाकाय चक्रातला एक सांधा म्हणून ही अर्थव्यवस्था ‘चालवत’ही असतो (भांडवली अर्थव्यवस्थेचा भाग असलेला माणूस ती व्यवस्था ‘चालवल्याशिवाय’ जगूच शकत नाही). एकमेकांना अशा प्रकारे छेद देणाऱ्या वर्तुळांचा मी जेव्हा भाग असतो, तेव्हा माझी ‘भूमिका’ काय असावी? आणि एवढंच नव्हे, तर कुठल्या व्यवस्था-घटकाबाबत माझी काय भूमिका असायला हवी?

हे प्रश्न थोडे थकवणारे आहेत.

पण सृष्टी आणि समाजाचं तात्त्विक आकलन करून घ्यायच्या ओढीमध्ये आपल्याला व्यवस्था-घटकांबाबतच्या भूमिकेतून सुटता येत नाही. का सुटता येत नाही? किंवा का सुटू नये? याचं मला दिसणारं कारण म्हणजे, या अफाट विश्वात आपण माणूस म्हणून आपल्या वैचारिक आणि शारीरिक क्षमतेसह उभ्या असण्यामागे माणसाची महाकथा आहे, आणि आपण प्रत्येक जण या महाकथेत आपल्या नकळत योगदान देत असतो. त्यामुळे नैतिक दृष्टिकोनातून नव्हे, तर अगदी व्यवहारवादी दृष्टिकोनातूनदेखील आपली एक भूमिका असणं आवश्यक असतं.

आता पुढचा प्रश्न. भूमिका असणं पुरेसं आहे का? बिस्मार्कचं एक प्रसिद्ध वचन आहे – ‘एखादा मनुष्य जेव्हा एखादी गोष्ट तत्त्वतः मान्य करतो, तेव्हा ती अमलात आणण्यात त्याला काडीचाही रस नसतो.’ मी भूमिकेबाबत या ‘विचार-कृती’ द्वैताचा विचार करतो आहे. मी समतावादी असणं किंवा मी व्यक्तिस्वातंत्र्य मानणं एवढं पुरेसं आहे का? मी तत्त्वतः समतेचं तत्त्व मान्य केलं आहे, पण स्वतःच्या मर्यादेमुळे समतेच्या चळवळीत भाग घेऊ शकत नाही, हेही ठीक आहे; पण माझ्या ‘समता मान्य करण्याने’ मला समता म्हणजे काय हे समजतं का?

‘तत्त्वविचार’ बऱ्याचदा आपल्याला गप्प बसवतो. कारण तत्त्वविचार आपल्या समोरचे मार्ग ‘ब्लॉक’ करू शकतो. तत्त्वज्ञ कृती करायला धजावत नाही, कारण त्याला एकाच वेळी अनेक ‘परिणामस्वरूप शक्यता’ दिसत असतात. सरत्या वर्षातला माझा अनुभव, माझ्या विचारांच्या दिशांनी घेतलेली वळणं आणि कृतीच्या पातळीवर मला जाणवणारं अपुरेपण असं काय काय या परिणामस्वरूप शक्यतांशी जोडलेलं आहे.

गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये मी फेसबुकवर काय काय लिहीत होतो; या वर्षीही लिहिलं. दीर्घ स्वरूपाचे लेखही लिहिले. आता थांबलो आहे. ३ सप्टेंबर २०१५ रोजी मी एक लेख लिहिला होता. घरी उदारमतवादी विचारांच्या सान्निध्यात वाढल्याने आणि बाहेर हिंदू पर्यावरणात वाढल्याने कट्टर हिंदुत्ववादाविषयी मनात असलेला राग, त्या तुलनेत मुस्लीम धर्माविषयीचं माझं तोकडं आकलन आणि त्यामुळे मुस्लीम धर्माची न केलेली चिकित्सा (यात एक भाग हिंदू समाज आपला वाटणं आणि जाणत्या वयात मुस्लीम समाजाशी मर्यादित संपर्क आल्याने मुस्लीम समाज काहीसा परका वाटणं हाही भाग आहे), पुरोगामी विचारविश्वातून इस्लामिक मूलतत्त्ववादाविषयी म्हणाव्या इतक्या ठळकपणे न उमटणाऱ्या प्रतिक्रिया अशा काही गोष्टींचा धांडोळा घ्यायचा मी प्रयत्न केला होता. त्यावरच्या चर्चेतून मला काही नवीन धागे मिळाले. पुढे मी काही हिंदुत्ववादी मंडळींशी प्रत्यक्षही बोललो. २०१६ मध्ये या विषयावर माझा बराच विचार झाला. ‘धर्मश्रद्धा’ हा विषय मला कायम चिकित्सेचा वाटत असला आणि संघटित धर्माशिवाय लोक एकत्र येऊ शकतात, त्यासाठी माणसांच्या मनात अस्तित्वविषयक आणि व्यवस्थाविषयक जिज्ञासा जागी असायला हवी असं मला वाटत असलं, तरी धर्मश्रद्धेने लोकांना प्रभावित केल्यामुळे त्याबाबत विचार तर करावाच लागतो. मला असं जाणवलं की, उजव्या विचारसरणीत परिवर्तनाच्या काही खुणा दिसत असल्या, तरी गेल्या काही वर्षांमध्ये उजव्या विचाराला मिळालेलं वाढतं पाठबळ आणि धर्मकेंद्री विचारपद्धतीमुळे आधुनिकेतचं (विचारातली आधुनिकता) आव्हान पेलण्यातील अडचणी, यामुळे हा परिवर्तनाचा प्रवास ऊर्ध्वगामी होण्यापेक्षा अधोगामीच होईल की काय अशी भीती वाटते. यातली मला दिसलेली एक महत्त्वाची बाब म्हणजे उजव्या विचारधारेचे धुरीण या विचारसरणीतल्या कच्च्या दुव्यांवर लक्ष देऊन ते बळकट करण्याऐवजी अजूनही परंपरा-श्रेष्ठत्वाला उजाळा देताना दिसतात. कार्यात्मक पातळीवर ते नव्याचा स्वीकार करतात, त्याचा प्रसारही करतात, पण धार्मिकतेमुळे मूळ वैचारिक बैठक काहीशी आक्रसलेलीच राहते. उजवा विचार स्वबळावर स्वतःची कक्षा वाढवू शकेल, का याबद्दल मला शंका वाटते. कारण हा विचार आज तरी धर्म, राष्ट्र अशा चौकटीमध्ये बंदिस्त आहे. ‘संथ गतीने परिवर्तनाकडे’ असं जरी त्याचं वर्णन केलं जात असलं (‘न्यू राईट’ हा शब्दप्रयोगही अलीकडे ऐकला), तरी त्याच्या अंगभूत क्षमतेविषयी मला प्रश्न आहेत. २०१६ मध्ये तरी त्या दूर झाल्या नाहीत.

माणसाच्या अस्तित्वाला काहीही प्रयोजन नाही; जगात दगड-धोंडे आहेत, तसाच माणूसही आहे, असं मानवी उत्क्रांतीचा अभ्यास सांगतो; पण तरीही माणसाबद्दलचे अनेकानेक प्रश्न अनुत्तरितही आहेत, विशेषतः मानवी जाणिवेविषयीचे. असं असलं तरी अस्तित्वाचा शोध घ्यायची उत्क्रान्तीची दिशा मला योग्य वाटते. ‘जाणीव’ हेदेखील कायमचं गूढ आहे, असं समजायचं कारण नाही. आपल्याला असं दिसेल की, पूर्वी जे प्रश्न तत्त्वज्ञानाचे होते, ते काळाच्या प्रवाहात विज्ञानाच्या कक्षेत आले आणि विज्ञानाने त्याला उत्तर दिलं. धर्म आणि देव यांसारख्या संकल्पनांचा आपल्यावरचा प्रभाव कमीकमी होत गेला आहे, हे लक्षात घ्यावं लागेल. या संकल्पनांची प्रासंगिकता होतीच, अजूनही ती संपलेली नाही, पण सोळाव्या शतकातला श्रद्धावान आणि आजचा श्रद्धावान यांच्यात आपल्याला सहज फरक दिसेल. त्या वेळच्या श्रद्धावानापेक्षा आजचा श्रद्धावान जास्त तार्किक विचार करणारा आहे. सोळाव्या शतकातली पूजाअर्चा आणि आजची पूजाअर्चा यांच्यात फरक आहे. पूजाअर्चा ही प्रतीकात्मक आहे. त्यामुळे ती टाळता येऊ शकते, कमी-जास्त करता येऊ शकते, त्यात शॉर्टकट्स घेता येऊ शकतात हे आजचा श्रद्धावान मानतो आणि तसं करतोदेखील. आपण जर माणसाचा ऐतिहासिक प्रवास पाहिला, तर तो अज्ञानातून ज्ञानाकडे, धर्माकडून विज्ञानाकडे, गूढाकडून स्पष्टीकरणाकडे असाच आहे; धर्माचं स्थान कमीकमीच होत गेलं आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिकतेचा आग्रह धरणाऱ्या आणि धार्मिकतेला जवळजवळ 'इंडिस्पेन्सिबल' मानणाऱ्या उजव्या विचाराला समजून घेणं मला अवघड जातं.

आणखी एक मुद्दा. धार्मिकता आणि माणसाचा आत्मशोध यांच्यात मी फरक करतो. मोठ्याच्या मोठ्या समूहाला घालून दिलेली एक चौकट, माणसांनी ‘रुळावर’ राहावं म्हणून केलेले नियम या आधारे धर्माचं स्पष्टीकरण दिलं जातं. ते अगदीच चुकीचं नाही. माझी अडचण धर्माच्या प्रवासाबद्दल आहे. मागे एकदा मी पाचगणीजवळ एका अगदी लहानशा गावात गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती. काही बायका सार्वजनिक नळावर धुणी-भांडी करत होत्या. गावात एक मंदिर होतं. गाई-गुरं परत येत होती. त्या क्षणी माझ्या मनात विचार चमकला, ‘इथल्या जीवनाच्या संदर्भात मी माझ्याच देवा-धर्माविषयीच्या दृष्टीकोनाकडे कसं पाहतो? इथल्या माणसाच्या जीवनदृष्टीशी मला जोडून घ्यायचं असेल, तर मला इथे राहावं लागेल. तो जे काम करतो, ते करावं लागेल. इथल्या मंदिरात जावं लागेल. इथल्या पर्यावरणात देव आणि धर्म याला जे ‘डायमेंन्शन’ मिळतं, ते मला इथे राहिलो तरच मिळेल.’ असं असलं, तरी अशाच छोट्या खेड्यात काही शतकांपूर्वी जी कर्मकांडं केली जात होती, त्यांतली बरीचशी आज नाहीशी झालेली दिसतील; आधुनिकतेच्या खुणा दिसतील. मग भौतिक आधुनिकता आत्मसात केली गेली, तशीच वैचारिक आधुनिकता आत्मसात करणं अशक्य आहे, असं मानायचं कारण नाही. धार्मिकतेचं स्तोम कमी करून आत्मशोध सुरू ठेवणं शक्य आहे. त्यामुळे आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थानातील भेद लक्षात घेऊनही प्रत्येकाचा प्रवास 'संघटित धर्मपालना'पासून 'संघटित धर्मचिकित्से'पर्यंत होऊ शकतो ही शक्यता अगदीच उडवून लावावी अशी नाही.

उजव्या विचारातल्या अपुरेपणाच्या पार्श्वभूमीवर पुरोगामी विचारविश्वावर आज जी टीका-टिप्पणी होते आहे, ती पूर्णपणे मोडीत न काढता त्यावर सुधारकी दृष्टीने (जी पुरोगामी विचारांचीच ठेव आहे) विचार करणंही गरजेचं आहे. संक्रमण काळातही आपण फक्त ‘रॅडिकल जारगन’ वापरतो आहोत का, शॉक व्हॅल्यूपुरतंच लिहीत-बोलत आहोत का हा विचार जरूर व्हावा. आज सार्वजनिक चर्चाविश्वात जे वातावरण दिसतं आहे, ते आश्वासक नाही. याचं एक मुख्य कारण म्हणजे, ‘पुरोगामित्व’ हीच मुळात काहीतरी संशयास्पद गोष्ट आहे, ती आपल्या समाजात ‘फिट’ होऊ शकणार नाही अशी समजूत पसरते आहे. ती धोकादायक आहे. दि.के.बेडेकर ‘मानव सान्त आहे’ असं म्हणतात. मानवी बुद्धी, मानवी मन, मानवी कर्तृत्व, मानवी समज या सगळ्याला मर्यादा असते. तिला त्यांनी ‘मानवी सांतत्व’ म्हटलं आहे; पण म्हणून मर्यादेची कक्षाच न विस्तारणं त्यांना मान्य नाही (धर्मश्रद्धा : एक पुनर्विचार - दि. के. बेडेकर, प्राज्ञपाठशाळामंडळ, वाई). पुरोगामी विचार हा भक्कम विचार असेल, त्यात माणसाविषयी आस्था असेल तर या विचाराच्या पुरस्कर्त्यांनी गडबडून न जाता स्वतःच्या मार्गाची पुनर्रचना, नव्या मार्गाची आखणी यांवर भर दिला पाहिजे. दुसरं एक म्हणजे, आज विविध माध्यमांमधून ‘पुरोगामी-प्रतिगामी’, ‘उजवे-डावे’ असे शब्दप्रयोग सरसकट वापरून ध्रुवीकरण केलं जात असल्याने अनेक सूक्ष्म भेद (nuances) लक्षातच घेतले जात नाहीत; आणि हा गुंता सोडवायची मोठी जबाबदारी आजच्या अभ्यासक-विचारवंतांवर आहे. अनेक कळीच्या प्रश्नांवर देशभर कार्यरत असणारे पुरोगामी कार्यकर्ते माध्यमचर्चांमध्ये दुर्लक्षित राहतात आणि ‘पुरोगामी लोक’ म्हणून सरसकट टीकाटिप्पणी सुरू राहते. लोकशाही व्यवस्थेतल्या सुधारणेच्या जागा, निवडणूक प्रक्रियेतल्या सुधारणेच्या जागा, विकेंद्रीकरण, नैसर्गिक साधन-संपत्तीवरचा अधिकार अशा मूलभूत मुद्द्यांवर फारशा प्रभावीपणे चर्चा होत नाहीत. देव, धर्म असलं कुठलंही अधिष्ठान नसताना लोकांनी शासनव्यवस्थेच्या मूल्यमापनाच्या पद्धती विकसित करणं, स्वतःच्या प्रश्नांकरता, प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांकरता एकत्र येणं मला महत्त्वाचं वाटतं. समूहाने एकत्र येऊन समूहापुढचे प्रश्न सोडवणं; स्वशासनासारख्या दीर्घ पल्ल्याच्या, अवघड, पण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणं हे समूहाच्या उन्नतीचं लक्षण आहे; आणि समूहाच्या चर्चेत ‘स्वशासनच’ नाही, तर इतर अनेक मुद्दे येऊ शकतात. यात स्त्री-पुरुष-संबंध येतील; नैतिकता म्हणजे काय, समता म्हणजे काय, सामाजिक न्याय म्हणजे काय हे मुद्दे येतील; व्यक्तिस्वातंत्र्य आणि समूहजीवनातली अपरिहार्यता यांची सांगड कशी घालायची हा मुद्दा येईल... अनेक मुद्दे येतील. एकमेकांवरच्या आरोप-प्रत्यारोपांपेक्षा अशी चर्चा, वैचारिक घुसळण (मतभेदांसह) आज हवी आहे.

२०१६ मधल्या राजकीय-सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या घटनांबाबत भाष्य होतच राहील. ते व्हावंच. माझ्यासाठी हे वर्ष माझा आंतरिक प्रवास अधिक वेगाने सुरू होण्याचं वर्ष होतं. ‘ज्ञान अमर्याद आहे, जाणीव प्रवाही आहे आणि त्यामुळे आपण कायमच प्रवासात असणार आहोत’ हे या वर्षातलं माझं मुख्य शिक्षण होतं!

(अक्षरनामा, ३० डिसेंबर २०१६) 

Thursday, October 20, 2016

‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस

मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण मिळून सार्‍याजणीशी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या पुरुष उवाचगटाच्या बैठका कारण ठरल्या. मागे वळून बघण्याइतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे मिळून सार्‍याजणीहा माझ्यासाठी प्रेमाचा विषय आहे. मी चांगलाच भटक्या वृत्तीचा होतो (आणि आहे), त्यामुळे कॉलेज सोडल्यापासून अनेक नोकर्‍याही सोडल्या. पंधरा-वीस वर्षांच्या काळात आठ-दहा नोकर्‍या करणारा मनुष्य कुठल्याही कंपनीच्या दृष्टीने फारशा गंभीरपणे घेण्यासारखा विषय असू शकत नाही. पण मीदेखील नोकरीला मर्यादित गंभीरपणेच घेतल्याने उभयपक्षी सामंजस्य होतं. मात्र मिळून सार्‍याजणीत्याला अपवाद ठरलं.  आणि त्याचं खरं कारण हेच की तिथे मी फक्त नोकरी केली नाही!

काही माणसांनी एकत्र येऊन काही काम करणं ही मौजेची गोष्ट असते. मग ती अगदी पाच-दहा माणसांची छोटी कंपनी असो की टाटा-इन्फोसिससारख्या अजस्त्र कंपन्या असोत. एकटा माणूससुद्धा जिथे स्वत:शी आतल्या आत भांडत असतो तिथे दुसरा आला किंवा पन्नासावा आला तर काय होत असेल याची कल्पना करता येईल. माझ्यासारख्या मुळातल्या स्वप्नाळू मनुष्याला कामातल्या औपचारिक भागापेक्षा कामाचा गाभा जास्त आकर्षित करतो. म्हणजे महिन्याचा अंक पोस्टाने रवाना करण्यात अनेक तांत्रिक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि त्या आवश्यकही आहेत, महत्त्वाच्या आहेत. पण मुख्य प्रश्‍न, आस्थेचे प्रश्‍न हे की आपण हे मासिक का काढतोय? आपला जीव यात गुंतला आहे ना? आपण जे बोलतोय, लिहितोय ते योग्य आहे ना?आपल्याला स्वत:चं परीक्षण करायला हवंय का? कुठल्याही संस्थेच्या - मग ती मिळून सार्‍याजणीअसो किंवा एखादी बँक असो, आयटी कंपनी असो की चहाचं दुकान असो, हे गाभ्याचे प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे असतात आणि 'मिळून सार्‍याजणी'त मला या गाभ्याच्या प्रश्‍नांना भिडता आलं, चर्चा करता आली म्हणून मी तिथे फार रमलो. एवढंच नाही, तर आज तिथे नसतानाही '‘हे आपलं मासिकआहे ही जाणीव जागी आहे. विद्याताई किंवा गीतालीताई माझ्या इतर कंपन्यांमधल्या बॉससारख्या असत्या तर कदाचित मी वर्षभरातच बाहेर पडलो असतो. (अर्थात त्या बॉसनव्हत्या असंही नाही. पण बॉसकडे स्वत:ला आवडतं किंवा नावडतं करून घ्यायचं कौशल्य असतं. त्यांनी स्वत:ला आवडतंकरून घेतलं हे त्यांच यश आहे!)

अभ्यास, करियर, सिनेमा, नाटक, सामाजिक प्रश्नसेक्स, प्रेम, आकर्षण अशा बर्‍याच गोष्टींचा एकत्र गुंता जेव्हा मेंदू काबीज करून बसलेला असतो त्या वयात मी पुरुष उवाचच्या संपर्कात आलो. तिथल्या चर्चांमधून मला मानसिक पातळीवर बरंच मोकळं होता आलं. स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता हे माझे आस्थाविषय होते आणि त्यावर बोलण्यासाठी मला एक व्यासपीठ मिळालं. आपल्यासारखेच प्रश्‍न पडणारे काहीजण आहेत आणि ते उत्तरांचा शोध घ्यायचा गांभीर्याने प्रयत्न करतायत ही माझ्यासाठी एक आनंददायक गोष्ट होती. शिवाय तिथे केवळ स्त्री-पुरुष संबंधच नव्हे, तर इतर अनेक सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा होत असत आणि त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. रा.प. नेने, राम बापट अशा मजबूत लोकांना मी प्रथम ऐकलं ते पुरुष उवाचच्या अभ्यासवर्गात. या गटाच्या बैठकांमध्ये ओघानेच मिळून सार्‍याजणीचाही विषय निघे. विद्याताईदेखील अभ्यासवर्गांना येत असत. मी त्यावेळी जाहिरात क्षेत्रात काम करत होतो. मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात याच दिवसात प्रथम गेलो. साधार २००३-०४ च्या सुमारास. त्या वेळेला थोडंसं लिहायलाही लागलो होतो. पण लेखन प्रक्रिया, संपादन, मासिकांची कार्यपद्धती याबाबत अगदीच अनभिज्ञ होतो. मला वाटतं मिळून सार्‍याजणीत गेलो तो मी लिहिलेल्या लेखासंदर्भातच. कधी छापून येईल?’ हा लेखकाचा आवडता प्रश्‍न विचारायला. (आपण लिहिलेलं लगेच छापून येत नाही हा शोधही तेव्हाच लागला.) पुढे मग संपर्क वाढला. संपादकीय विभागात थोडं साहाय्य करु लागलो. आणि मला एकदम जाणवलं की धिस इज व्हेअर आय बिलाँग! लेख, संपादन, संस्करण, चर्चा, विषयांची निवड, अंकाचं स्वरूप यात आपण रमतोयआपल्याला हे जमतंय आणि यात आपण काहीतरी चांगला काम करू शकू असं आपल्याला वाटतंय ही जाणीव तीव्र झाली. मग हळूहळू काम करत गेलो. संपादकीय विभाग तर माझं आवडीचं ठिकाण होतंच, पण व्यवस्थापक सुहासिनी जोशी यांनी काम सोडायचं ठरवल्यावर मी व्यवस्थापक म्हणूनही काम केलं. हातून काही चांगलं लिहिलं गेल्याच्या आनंदाइतकाच जमाखर्चाचा ताळमेळ बसल्यावर होणारा आनंदही लक्षणीय असतो हे व्यवस्थापक म्हणून काम करताना लक्षात आलं. मुख्य म्हणजे मासिक चालवायच्या व्यावहारिक बाजूंची ओळख झाली.  

मी काम करू लागलो तेव्हा गीतालीताई संपादक म्हणून काम पाहू लागल्या होत्या. विद्याताईंचा सहभागही होताच, पण थोड्या प्रमाणात. विद्याताईंच्या मुख्य संपादकीय कारकीर्दीत मी काम केलं नाही, पण तरीही आम्ही एकत्र काम केलंच. मासिकाशी संबंधित असलो तरी पूर्ण वेळ फक्त मासिकासाठी काम केलं ते तीन-चार वर्षं. २०११ सालच्या दिवाळी अंकात वेश्याव्यवसायावर चर्चा करणारा विशेष विभाग होता. त्याचं संपादन मी केलं होतं. स्वतंत्रपणे संपादनाची जबाबदारी मी पहिल्यांदा उचलली ती या विभागाच्या वेळी. पुढे २०१४ च्या दिवाळी अंकापर्यंत काम केलं आणि मग थांबलो. 

या काळात काळाबरोबर माझ्यातही बदल झाले. दृष्टीकोन विस्तारला. कितीतरी लोकांशी परिचय झाला. पुष्पा भावे, छाया दातार, मंगला सामंत, वंदना भागवत, विद्युत भागवत, मिलिंद बोकील, प्रतिमा परदेशी, मंगला गोडबोले, मनीषा गुप्ते, मीना सेषू, रजिया पटेल, लता प्र. म., शुभदा देशमुख, सतीश गोगूलवार आणि इतरही अनेक. हा प्रामुख्याने वैचारिक विश्वातला संचार होता. शिवाय एकाला टक्कर देणारं दुसरं विश्वही मला इथे पाहायला मिळालं. समाजविचारातील बारकाबेफरक लक्षात आले. सामाजिक क्षेत्रात काम करतानाची आव्हाने समजली. विशीतला कम्युनिस्ट चाळिशीत भांडवलशहा होतो असं म्हणतात. विशीतला मी - जो फेमिनिस्ट/कम्युनिस्ट होतो तो आज चाळिसाव्या वर्षी फेमिनिस्ट/कम्युनिस्ट आहे का?

हा प्रश्‍न गहन आहे! आणि खरं तर वेगवेगळ्या शाखांमधून विस्तारत जाणार्‍या उत्तराचा आहे. आज विचार करताना हे जाणवतं की आपण एखादा दृष्टीकोन स्वीकारतो त्याला जगात एक नाव किंवा प्रचलित भाषेत 'लेबल' तयार असतं. आपणही ते लावून घेतो. कारण आपण त्या दृष्टीकोनाचे आग्रही असतो. त्यात फार काही गैर आहे असंही नाही. पण माणूस आणि जीवन हे जर व्यामिश्र आहे तर विचारधारा एका लेबलाच्या मर्यादेत सामावू शकते का? किंवा मी एका विचाराचा आग्रह धरला की मी त्या विचाराचा 'वादी' होतो का?     

एक गोष्ट स्पष्ट आहे की स्त्रीवाद, डावा विचार, विद्रोही विचार ही एक भूमिका असली आणि भूमिका, विचारधारा नैसर्गिक सत्यसांगत नसल्या तरी त्या भूमिका घेणं, विचारधारा स्वीकारणं आवश्यक असतं याबाबतही माझ्या मनात संदेह नाही. कारण नैसर्गिक सत्य जे आहे ते आहेच, पण माणूस म्हणून, समाज म्हणून आपण निसर्गाशी सुरू असलेल्या संघर्षाची धार कमी करायचा प्रयत्न करत असतो. निसर्गात स्त्री आहे, स्त्रीवाद नाही. निसर्गात विविधता आहे, समता नाही. निसर्ग एकात्म असेल, पण ती योजनाबद्ध एकात्मता नाही. मुळात निसर्ग फक्त असतो’. तो चांगलाकिंवा वाईटनसतो. ही वस्तुस्थिती आहे. पण माणसाने निसर्गात हस्तक्षेप केला आहे, करतो आहे हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या हस्तक्षेपाबरोबरच मूल्य जाणिवेचे प्रश्‍नही उभे राहणारच आणि आपण त्याला सामोरं गेलंच पाहिजे. 

स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र इच्छा-आकांक्षा-राग-लोभ-विचार-विकार आहेत आणि त्या सगळ्यासह तिला माणूसम्हणून जगण्याचा हक्क आहे हा विचार आपण सगळेच आज मान्य करतो आहोत आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या स्त्रीजीवनात पडतानाही दिसतं आहे.. पण या बदलाची गती मंद आहे आणि अलीकडे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ अर्थातच चिंताजनक आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना माझा माणूसम्हणून असलेला दृष्टिकोन आणि पुरुषम्हणूनचा लिंगसापेक्ष दृष्टिकोन यातील संघर्षही मला अनुभवता आला. स्त्रियांनी आणि पुरुषांनी परस्परांशी संवाद साधणेहे मासिकाचं उद्दिष्ट आहे आणि स्त्रीप्रश्‍न हाताळत असताना पुरुषांचं प्रबोधन करणं, प्रसंगी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे ही जाण विद्याताई आणि गीतालीताई दोघींमध्ये आहे. स्त्रीप्रश्‍नाबाबत विचार करताना मी पुरुषाची लैंगिक जडणघडण (जी नैसर्गिक उर्मी आणि सामाजिक संस्कार या दोन्हीच्या मिश्रणातून तयार होते) या विषयावर बराच विचार करतो. या विषयावर मी थोडंफार लिहिलंही आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना मी या मुद्यावर स्त्रीवादी न्वहे तर जीवशास्त्रीय दृष्टीने काही मांडायचा प्रयत्न केला आणि मला ती मोकळीक मिळाली हे आवर्जून नोंदवतो. 

मिळून सार्‍याजणीहे स्त्री चळवळीचं मुखपत्र नसलं तरी अनेक एकट्या-दुकट्या जणींचं ते मुखपत्र आहे. विद्याताईंच्या पिढीच्या मानाने माझ्या पिढीत सिनिसिझमथोडा जास्त आहे. ह्याने काय होणार? हे कशाला करायचं?’ असा विचार आम्ही जरा जास्त करतो. आणि मग काही न करणंच बरं आहे या निष्कर्षाला येतो! पण सार्‍याजणीला येणाऱ्या पत्रांनी मला सिनिसिझम झटकायला बरीच मदत केली. एखाद्या छोट्या गावातल्या बाईने लिहिलेला तिचा अनुभव, तिच्या विचारात झालेला बदल वाचताना मला अगदी आध्यात्मिक पातळीवरचं जोडलेपण जाणवलेलं आहे. आपण मिळून सार्‍याजणीसारख्या मासिकात काम करतोय हे महत्त्वाचं आहे, आपण हे करायला हवं, यात आपल्या क्षमतांची सार्थकता आहे असं मला वाटलेलं आहे. दोन वर्षापूर्वी मी काम थांबवलं त्याचं एक कारण कामातलं साचलेपण हे होतं हे खरं आहे, पण तो माझा  व्यक्तिगत निर्णय होता. मिळून सार्‍याजणीसारखं मासिक चालू असणं, त्याची आवश्यकता याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 

मराठीतली बरीचशी नियतकालिकं आणि मिळून सार्‍याजणी यातला एक प्रमुख फरक असा की हे सर्वसमावेशक मासिक आहे. म्हणजे मुक्त शब्दचे किंवा अनुभवचे संपादकीय निकष जितके कठोर असतील तितके ते मिळून सार्‍याजणीचे नसतील. पण सर्वसमावेशक असूनसुद्धा या मासिकाने सर्वसामान्यांची अभिव्यक्ती आणि वैचारिक मांडणी यात चांगला समतोल साधला आहे. संपादकीय विभागात मतभिन्नता होतेच (आणि ती झाली तरच मजाही असते), तशी ती इथेही व्हायची. आणि मग क्वचित प्रसंगी मौजेच्या भागवतपंथाची पुस्तके वाचत मोठे झालेले माझे जीन्स उफाळून यायचे.  त्यावर मग ‘पण आपल्याला सहभागासाठी या लेखाला स्थान द्यायला हवं असं गीतालीताई म्हणाल्या की मी शांत व्हायचो. साहित्य, साहित्याचा दर्जा, वाङ्मयीन मूल्यांची कुस्ती हे एकीकडे रोचक असतं तर एकीकडे थोडं दमवणारंही असतं. 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक साहित्य आणि सामाजिक चळवळ अशा दोन्ही आघाड्या सांभाळणारं मासिक असल्याने (आणि विद्रोहाकडे झुकणारं असलं तरी मासिकाचं कार्यालय कर्वे रोड, प्रभात रोडला लागून असल्याने) ते एकांगी झालेलं नाही. भारतात काँग्रेसचं जे स्थान आहे ते बहुधा मराठी मासिकांमध्ये ‘मिळून सार्‍याजणीचं आहे!

मिळून सार्‍याजणीहे अर्थातच मुख्यत्वे स्त्रियांचं जग आहे. संपादकीय विभागात बर्‍यापैकी काम केलेला मी एकटाच पुरुष. मला याबाबत थोडं सांगायचं आहे. काय होतं की आपण सगळे माणूसआहोत हे तर झालंचपण आपल्यातल्या या पहिल्या ओळखीनंतरची दुसरी ओळख म्हणजे आपल्यातला लिंगभाव. त्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म रुपात, समोरची व्यक्ती स्त्री असेल तर मी त्या व्यक्तीची नोंद स्त्रीम्हणून घेतोच. त्याने माझ्या वर्तनात काही प्रचंड फरक वगैरे पडत नाही, पण ही नोंद घेतली जाते खरी. हेच उलटीकडूनही होत असेल. मिळून सार्‍याजणीया मासिकाकडे मी ओढला गेलो याचं मुख्य कारण हे चर्चा करणारं मासिक आहे. मुळात मी पत्रकारितेतला नव्हतोच. पत्रकारितेत करिअर करणं हे माझं ध्येयही नव्हतं. मला भरपूर चर्चा करायची होती. ही चर्चा करता येईल म्हणून मी मिळून सार्‍याजणीत दाखल झालो आणि इथे मला असं लक्षात आलं की हे ‘स्त्रियांचं मासिककिंवा स्त्रियांनी चालवलेलं मासिकअसलं तरी माझी ती सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरची नोंद बहुधा मागे पडतेय. कारण इथे मी ज्या स्त्रियांच्या संपर्कात आलो त्या विचार करणार्‍या स्त्रिया होत्या. स्त्रियांसाठीच्या म्हणून मासिकामध्ये मिळून सार्‍याजणीउठून दिसतं आणि माझ्यासारख्याला ते आकर्षित करतं कारण एका अर्थी हे स्त्रियांचं मासिक असलं तरी ते पारंपरिक स्त्रीत्वापासून मुक्त झालेलं आहे. 

पण याचबरोबर दुसरीही एक बाजू मांडतो. ही बाजू वरच्या मांडणीला छेद देणारी आहे. स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य, स्त्री प्रश्‍न, स्त्री जाणीव असं म्हटल्याने स्त्री ही स्त्रीचं राहणार आहे असं काहीसं अधोरेखित होतं का? सांगता येत नाही. कदाचित ही विशिष्ट ओळख पूर्ण पुसली जाईल तो काळाचा टप्पा अजून बराच लांब आहे. तो कधी येईल, येईल का हे माहीत नाही. पण इतिहास-वर्तमानाच्या ओझ्यामुळे आज तरी स्त्रीला स्त्रीम्हणून स्वतंत्र ओळख ठेवावी लागतेय. माझ्या विचारांच्या प्रवासात एक टप्पा असा आला की जिथे मला या सततच्या द्वैताचं काहीसं ओझं वाटू लागलं. आपण आता लिंगसापेक्षतेच्या सीमा ओलांडून एका शांत प्रदेशात आलोय (निदान आपल्याला आत्ता तरी असं वाटतंय), मग आता आपण इथेच थांबावं असं वाटू लागलं. याचा अर्थ स्त्रीवाद अप्रासंगिक झालेला नाही. पण आपल्या अंगभूत गुणांमुळे किंवा दुर्गुणांमुळे आपण या कक्षेत फार काळ राहू शकणार नाही असं मला वाटू लागलं. 

आणि अशा वेळी तर मला एका निष्ठेने, पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करणार्‍या विद्याताईंसारख्यांचं अधिकच कौतुक वाटतं. वंदना भागवत एकदा बोलताना म्हणाल्या होत्या की परिवर्तनाचा विचार करणारे आपण संस्थात्मक उभारणीकडे फार दुर्लक्ष करतो. तिथे मिळून सार्‍याजणी, नारी समता मंच अशा संस्थांचं महत्त्व कळू लागतं. आज स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्री प्रश्‍न काय आहेत? यातले गुंते काय आहेत? असे प्रश्‍न पडणार्‍या कुणालाही मी या मासिकाकडे पाठवू शकतो. (कुणास ठाऊक, कदाचित मीदेखील काही दिवसांनी पुन्हा इथेच येईन!)

मिळून सार्‍याजणीचं कार्यालय हे माझ्यासाठी कार्यालय नसून हक्काचं, गप्पा मारायचं ठिकाण आहे. संपादकीय विभागात कधीही गेलो तरी मला अ‍ॅट होमवाटतं. गीतालीताई, विद्याताई दोघींनीही मला, माझ्या बडबडीला सहन केलं आहे. त्यांच्याविषयी कधीतरी स्वतंत्रपणेच लिहायला हवं. मिळून सार्‍याजणीतल्या मानसी घाणेकर यांचा उल्लेख न करता मला पुढे जाणं शक्यच नाही. वयाने थोड्या मोठ्या, पण विचाराने माझ्या जातकुळीच्या मानसीताई म्हणजे मिळून साऱ्याजणीच्या इतिहासातलं एक  प्रकरण आहे. मी कधी व्यक्तीचित्रं रेखाटण्याचा प्रयत्न केला तर त्यात मानसी घाणेकर नक्की असतील! 

सहानुभूतीया शब्दाबाबत पुलंनी एके ठिकाणी चांगलं लिहिलं आहे. ते लिहितात, सहानुभूती या शब्दात कारुण्याचे, दयेचे चार थेंब कुणी आणून टाकले आहेत कुणास ठाऊक? वास्तविक ती सह-अनुभूती आहे. जे तुला जाणवतंय, वाटतंय ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणं, तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करणं असा त्याचा अर्थ आहे. तुझ्या मनाजवळ यायचा प्रयत्न करणं म्हणजे सहानुभूती. ही सह-अनुभूती मला मिळून सार्‍याजणीनं दिली. स्त्रियांचं हे विश्‍व बघताना मी उदास झालो आहे, हताश झालो आहे, विचारात पडलो आहे, गोंधळातही पडलो आहे. पण या उलथापालथीनंच मला पुष्कळ काही दिलं आहे. मी वर म्हटलं तसा आज मी शांत झालो असेन कदाचित, स्थिर झालो असेन, पण ती दृष्टी येण्याकरताचा माझा व्यायाम इथे घडला आहे. जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात मला वैचारिकता फार महत्त्वाची वाटते. पण वैचारिकतेची पूर्वअट संवेदना, सहानुभूती ही असते. ही संवेदना मी सार्‍याजणीत अनुभवली. त्यामुळे माझ्या अंतरातल्या माझ्याच विविध ओळखींपैकी 'साऱ्याजणीच्या टीममधला एक सदस्यही एक ओळख मला समाधान देणारी आहे. या लेखाला 'मिळून साऱ्याजणीतले दिवस' असं शीर्षक जरी मी दिलेलं असलं तरी ते शीर्षक मी प्रत्यक्ष 'साऱ्याजणी'त काम न करण्यापुरतंच मर्यादित आहे. बाकी मी आज जगात वावरणारा 'साऱ्याजणी'तलाच एकजण आहे!               

मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)  
x

Friday, June 10, 2016

पुरुषत्वाचा लैंगिक मसुदा - अर्ध्या वाटेवरचे विचार

अरुण साधू यांच्या 'मुंबई दिनांक'ने एके काळी मला झपाटलं होतं. ही मुंबईची आणि मुंबईतल्या माणसांची गोष्ट आहे. प्रत्येक पात्राच्या अवतीभवती घडणाऱ्या घडामोडींमधून मुंबई 'घडते' आणि कादंबरी पुढे सरकते. यात अय्यर नावाचा पत्रकार आहे, डी-कास्टा हा कामगार पुढारी आहे, मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे आहेत, काही आम आदमी - दयानंद पानिटकर, किशोर वझे हे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक दुय्यम व्यक्तिरेखा आहेत. कादंबरीने जे झपाटलं, त्यात एक कोन त्यातील काही थेट लैंगिक संदर्भाचा होता. मी ही कादंबरी वाचली, तेव्हा वीस-बावीस वर्षांचा होतो. काही मुली किंवा स्क्रीनवरील काही ललनांविषयी विशेष ममत्व वाटण्याचा हा काळ होता. जयवंत दळवींची 'चक्र', 'ऋणानुबंध' या कादंबऱ्यांमधून लैंगिक विश्वाने दार किलकिलं केलं होतं. शिवाय आशू रावजी आणि दिनू कानडे या नावाचं एक लेखकद्वय होतं. त्यांच्या पुस्तकात संभोगाची रसभरित वर्णने असत. 'हैदोस'सारखी 'आउट अँड आउट' पोर्नोग्राफिक पुस्तकंही वाचली जायची. ब्लू फिल्म्स पाहायलाही सुरुवात झालेली होती. त्यामुळे लैंगिकता कधी अस्पष्टपणे, तर कधी स्पष्टपणे समोर येतच होती. पण 'मुंबई दिनांक'चा या संदर्भातला उल्लेख मी मुद्दाम करतोय, कारण या कादंबरीनं उत्तम साहित्यकृतीचं दर्शन तर घडवलंच, पण लैंगिकतेचे काही नवे आयाम दाखवले. लैंगिकतेची एक नवी दृष्टी दिली. कामेच्छा ही आजूबाजूला सर्वत्र, सर्व लोकांच्या मनात वावरत असते; अय्यरसारखा एखादा त्याबाबत बेधडकपणे वागतो आणि हे काम उरकून पुढच्या कामाला लागतो; याचा अर्थ ही गोष्ट अगदी सहजपणेही होऊ शकते - हे या कादंबरीतून दिसलं. मुख्य म्हणजे त्यातील काही विधानांनी, मांडणीने - आणि अय्यरचा जो स्वसंवाद सुरू असतो, त्याने - माझ्यावर परिणाम केला. सॅली (अय्यरशी गहिरं नातं असलेली वेश्या) गेल्यानंतर अय्यरचा स्वतःशी झालेला संवादही विशेष होता. कादंबरीत पुढे अय्यर आणि मकामुरा नामे एक जपानी चित्रकार यांच्या भेटीचा प्रसंग आहे. भेटीदरम्यान हा चित्रकार संभोगाची चित्रं काढतो हे अय्यरला कळतं. त्यांच्या संवादातलं मकामुराचं म्हणणं माझ्या लक्ष्यात राहिलं. "धिस इज द मोस्ट चॅलेंजिंग सब्जेक्ट. टिंगल करण्यासारखा हा विषय नाही. आयुष्याचं मूलतत्त्व म्हणजे हा विषय. जीवनातल्या बाकी क्षेत्रांवर यंत्रयुगानं आक्रमण केलं आहे. पण ही क्रिया अमर आहे. ही अशीच अबाधित चालू राहील." 

मी लैंगिकतेसंदर्भात जे थोडं-फार लिहिलं आहे त्यात 'प्रचंड भौतिक-तांत्रिक प्रगती करूनही अजिबात न बदललेली जैविक क्रिया' ही नोंद माझ्याकडून घेतली गेली. त्याच्या मुळाशी कधीकाळी वाचलेला हा संवाद आहे. हा संवाद वाचताना एकूणच प्रेम आणि सेक्स या एकमेकात गुंतलेल्या गोष्टी आहेत; आणि डी-कास्टा, अय्यरसारखे आपले 'हीरो'सुद्धा त्यावर मात करू शकत नाहीत याचा अर्थ प्रेमाकर्षण, लैंगिक आकर्षण हे नॉर्मलच असलं पाहिजे असं वाटायचं. 

कामभावना जागी होताना सहज, निसर्गत:च जागी होते; मात्र ती शमवणं तितकंसं सोपं नाही हे लक्षात आल्यापासून या इच्छेच्या नियोजनाचं काय करता येईल, काय करायला हवं हे विचार डोक्यात घोळत असत. टीनएज आणि विशी-पंचविशीच्या काळाकडे पाहिलं, की नैतिकतेच्या कचाट्यात सापडलेली तरुण जनता दिसते. मी स्वत: स्त्रीबद्दलचं आकर्षण आणि स्त्रीवादाबद्दलचं आकर्षण या दोन्ही ट्रॅक्सवर चालत होतो. त्या काळात बरेच उलट-सुलट विचार होत होते. वेश्या या विषयाबाबत तेव्हापासून आस्था होती. त्याबरोबर होतं ते एक प्रकारचं सहसंवेदन. जोडलेपणाची आणि  असहायतेची, अपराधबोधाची जाणीव. वाढीच्या टप्प्यांवर जेव्हा 'व्यवस्था' महत्त्वाची हे उमगू लागलं तेव्हा मला वेश्या फारच जवळची वाटू लागली.  मी वेश्यांकडे गेलेलोही आहे.  तिथल्या अनुभवांचं वैविध्य बरंच आहे.  मला वेश्येबरोबर असताना शांत आणि कनेक्टेड वाटलेलं आहे. शारीरिक समाधान (आणि त्यामुळे नंतर मिळणारं मानसिक 'निचरा'-स्वास्थ्य) मिळालेलं आहे. खळबळही जाणवलेली आहे. वेश्येबद्दल मला जे वाटतं; त्याच्याशी मानसिक अस्वास्थ्य, पराभूत जाणीव हे कायमचं जोडलं गेलेलं आहे. आपण वांझोटे बुद्धिवादी आहोत ही जाणीव ज्यांनी करून दिली आहे, त्यांत वेश्या वरच्या स्थानावर आहेत. शारीरिक गरज इतकी सरळ, स्पष्ट असताना तिच्या पूर्ततेची कोणतीही व्यवस्था नसावी? आणि जी आहे, ती अशी शोषणाधारित असावी? माझं वेश्यांशी झालेलं शारीरिक आणि भावनिक शेअरिंग यावर - आणि महत्त्वाचं म्हणजे कधीकधी माणूस असण्याच्या नैतिक गोचीवरही मात करणारी 'पुरुष' असण्याची शरीरकेंद्री गोची काय असते हे जे मला या अनुभवांमधून जाणवलं, त्यावर - मी काही चर्चांमधून बोललो आहे.  त्यावर सविस्तर लिहायला हवं असं वाटतं. पण अजून तरी मी काही निर्णय घेतलेला नाही. (याबाबत एक सांगावंसं वाटतं. एखाद्या विषयावर काही मांडत असताना तुमचा दृष्टिकोन  मांडण्याइतकंच महत्त्वाचं असतं ते अनुभवकथन. कारण 'काय असायला हवं' या विचाराइतकंच 'प्रत्यक्षात काय झालं? काय होऊ शकतं? बदलाची, पर्यायाची गरज का आहे?' हे महत्त्वाचं असतं आणि ते 'आपबीती'तून स्पष्ट होऊ शकतं. आपण स्वतःच एक 'केस स्टडी' होऊ शकतो. विशेषतः परिवर्तनवादी विचारांचा ध्यास असलेल्यांसाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे कामप्रेरणेबाबत लिहितानादेखील आपल्या बाबतीत काय घडलं हे सांगणं आवश्यक आहे.) 

'मिळून साऱ्याजणी'च्या संपादक गीताली वि. मं., त्यांचा नवरा मुकुंद सा. न. आणि इतर समविचारी मित्र यांनी एकत्र येऊन 'पुरुष उवाच' या नावाचा एक गट सुरू केला होता. स्त्री-पुरुष समतेबाबत, स्त्रीवादाबाबत आस्था असलेल्या पुरुषांनी एकत्र येऊन बोलावं असा या गटाचा उद्देश. या गटाच्या बैठकींना मी जाऊ लागलो आणि मला बोलायला व्यासपीठ मिळालं. मग 'मिळून साऱ्याजणी'च्याही संपर्कात आलो. पुढे तिथे कामही केलं. या प्रवासात आणि आज तो प्रवास (तात्पुरता) थांबल्यावर माझ्या लक्ष्यात येत गेलं, की मला - एका पुरुषाला - कामजीवनाबद्दल स्त्रियांशी बोलता आल्याने बराच फायदा झाला आहे. दुसरं म्हणजे 'मिळून साऱ्याजणी'च्या संपादकीय विभागात काम केलेला मी एकटाच पुरुष होतो. माझ्याआधी एक जण तिथे होते, पण अगदीच अल्प काळाकरता. संपादकीय कामात ज्या चर्चा रंगायच्या, त्यांत माझा 'पर्स्पेक्टिव्ह' कधीकधी वेगळा असायचा. तो बहुदा मी पुरुष असल्यामुळेही असेल. पण स्त्रीवादी विचाराकडे माझा ओढा असल्याने मला फार मोठ्या विचारकलहाला कधीच सामोरं जावं लागलं नाही. कारण स्त्रीवादाची चिकित्सा होणं मला मान्यच होतं आणि आहे, पण स्त्रीप्रश्न म्हणून काहीतरी व्यापक प्रमाणात आपल्याकडे अस्तित्वात आहे याबाबत माझ्या मनात शंका नव्हती. विचारधारेचं 'रिजिडीकरण' झाल्यामुळे येणारे दोष स्त्रीवादातही आहेतच; पण स्त्रीवाद 'पर्स्पेक्टिव्ह' देतो का? तर 'देतो'  हे स्पष्ट आहे. 

एक लक्ष्यात येत होतं, की आधुनिकतेच्या आणि नैतिकतेच्या परिप्रेक्ष्यात पाहिलं, तर आपल्या कामप्रेरणेची गोची झाली आहे. कारण निसर्गतः असलेली तीव्र जैविक प्रेरणा आणि व्यवस्थेची बंधनं यांत आपण अडकलो आहोत. (यात पुन्हा व्यक्तिसापेक्ष आणि काही लिंगसापेक्ष फरकही आहेतच. उदा. कामेच्छेच्या तीव्रतेतील फरक. कामेच्छेमधील भावनिक गुंतवणुकीतील फरक - संभोगानंतर सहसा स्त्रीला काही वेळ शांतपणे बाहुपाशात पडून राहावंसं वाटतं आणि पुरुषाला मात्र सहसा 'हिला अजून किती वेळ जवळ घ्यावं लागेल' असं वाटतं. स्त्रीचं 'वस्तुकरण' पुरुषाकडून त्याला कळायच्या आत होतं. पुरुषांची 'insertive' कामेच्छा आणि स्त्रीची 'receptive' कामेच्छा यातील द्वंद्वात्मक नातं. पुरुषाला 'मोकळं होण्यासाठी' शरीरात गुंतायचं असतं, तर सहसा स्त्रीला गुंतण्यासाठी मोकळं व्हायचं असतं इत्यादी. इतरही भिन्नत्वाचे मुद्दे.) कामेच्छेमुळे पुरुषाला लिंगाच्या ताठरलेपण येतं,  त्यातून 'अवघडलेपण' येतं आणि कामेच्छा पूर्ण झाल्यावरही कालांतराने ते येत राहतं, तसं 'अवघडलेपण' स्त्रीला येत नाही हा एक फरक जाणवू लागला होता. माणूस सृष्टीचा घटक आहे, आणि म्हणून त्याला जे वाटतं, तो जे काही करतो, ते सगळंच मूलत: नैसर्गिक आहे (मग ते नैतिकदृष्ट्या चुकीचं असलं तरी) हे लक्ष्यात येऊ लागलं. बलात्काराविषयी शोध घेत असताना 'नॅचरल हिस्टरी ऑफ रेप : बायोलोजिकल बेसेस ऑफ सेक्शुअल कोअर्शन' या पुस्तकाशी परिचय झाला. लैंगिक संदर्भात पुरुष 'पुरुषासारखा' का वागतो याची उत्क्रांतीच्या अंगाने उकल करायचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे.  मॅट रिडलेसारख्या उत्क्रांतीच्या अभ्यासकाने 'द रेड क्वीन : सेक्स अँड द इव्होल्यूशन ऑफ ह्यूमन नेचर' या पुस्तकात स्त्री-पु्रुषांमधील लैंगिकतेबाबतच्या मानसिकतेतील फरकाचा ऊहापोह केला आहे. या पुस्तकातील 'Sexing the mind' या प्रकरणाच्या शेवटी टेस्टोस्टेरॉन या 'पुरुषीकरण' करणाऱ्या संप्रेरकाविषयी तो लिहितो - There are two periods when testosterone levels rise in male children: in the womb, from about six weeks after conception, and at puberty. As Anne Moir and David Jessel put it in a recent book - Brain Sex, the first pulse of hormone exposes the photographic negative; the second develops it. This is a crucial difference from the way the hormone affects the body. The body is masculinized by testosterone from the testicles at puberty, whatever its womb experience. But not the mind. The mind is immune to testosterone unless it was exposed to a sufficient concentration (relative to female hormones) in the womb. It would be easy to engineer a society with no sex difference in attitude between men and women: Inject all pregnant women with the right dose of hormones, and the result would be men and women with normal bodies but identical feminine brains: War, rape, boxing, car racing, pornography, and hamburgers and beer would soon be distant memories: A feminist paradise would have arrived. 

उत्क्रांतीचे अभ्यासक जैविक प्रेरणेच्या, मूळ 'डिझाईन'च्या आधारे पुरुषी वर्तनाचा आणि स्त्री वर्तनाचा खुलासा करतात. मंगला सामंतांसारखे अपवाद वगळता स्त्रीवादी अभ्यासकांना बरेचदा ते मान्य होत नाही, कारण वर्तनातील 'नर्चर'चा भाग त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. खरं असं आहे, की माणसाच्या कृतीचं कारण नेचर आणि नर्चर दोघांच्याही मिश्रणातून तयार होतं; पण लैंगिक संदर्भात नर्चरमुळे जर नेचर दाबलं जात असेल, तर ते उफाळून वर येतंच. प्रेम, शारीर आकर्षण या प्रेरणा संस्कृतीकरणाने कितीही दाबल्या, तरी त्या पुन्हा पुन्हा पृष्ठभागावर येतात. 'सेक्स इज द बेस्ट मेडिसिन' (इफ टेकन विथ प्रिकॉशन) हे मी माझ्या 'पुरुष असण्याच्या' अनुभवावरून सांगू शकतो. होतं काय, की सेक्सविषयी प्रचंड चर्चा करण्यात आपण वेळ वाया घालवतो. ते करून मोकळे होत नाही. ही जर एक अटळ अशी भावना आहे, तर तिचा अनुभव घेऊन, मोकळं होऊन मग इतर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष्य द्यावं हे आपल्याला कळत नाही. भूक लागलेली असताना काम नीट होत नाही हा नियम याही गरजेला लागू आहे. मी आजवर एकदाही दारू प्यायलो नाही. प्यावी असं कधी वाटलं नाही. पण मित्रांबरोबर ‘बसलो' आहे. चकणा पुष्कळ खाल्ला आहे. यात एक टप्पा असा आला, की मला मित्रांची विमानं उडण्याचा कंटाळा येऊ लागला. त्यानंतर मी विमान न उडणाऱ्या मित्रांबरोबरच बसू लागलो. पण विशी-पंचविशीच्या वयात असं लक्ष्यात यायचं, की दारूभोवती ज्या गप्पा रंगतात त्यांत बाई हा विषय असतो. दारू प्यायलेली नसतानाच्या चिंतनातही बाई हा विषय असतो. मग एवढा वेळ जर त्यात वाया चालला आहे, तर ते करून मोकळं का होत नाही असा प्रश्न मला पडायचा. स्त्रीबद्दल आकर्षण वाटणं यात गैर काय आहे? म्हणजे बाईच्या शरीराबद्दल अचकट-विचकट विनोद करणं, रस्त्यातल्या बाईकडे कामुक नजरेने पाहणं हे मान्य; पण प्रत्यक्ष सेक्स मात्र वाईट? मला दारूत बुडणं खरं तर कृत्रिम वाटतं. 'हाय कंबख्त तूने पीही नहीं' असं म्हणणाऱ्यांना मला कधीकधी 'हाय कंबख्त तूने लीही नहीं' असं म्हणावसं वाटतं. सेक्स अतिशय 'लिबरेटिंग' असतं, सुंदर असतं हे आपल्याला कळलेलंच नाही. आपण सेक्सला 'गिल्ट'मध्ये ढकलून दारू पीत बसलो आहोत! आज पस्तिशी-चाळिशीच्या घरातले मित्रदेखील विशीतल्या उत्साहाने कामुक विनोद वगैरे पाठवतात तेव्हा मौज वाटते.

मुळात 'लैंगिक प्रश्न' असं काही अस्तित्वात आहे का हा विचार केला, तर 'हो, आहे' असं उत्तर येतं. इथे पुन्हा बरेच गट पाडता येतील. ज्यांच्यासाठी हा 'प्रश्न' म्हणून अस्तित्वात नाही, ज्यांना लग्नाच्या माध्यमातून ही गरज पूर्ण होते आहे असं वाटतं अशांचा एक गट. ज्यांना लग्नपूर्व काळातही काही अडचण जाणवली नाही, अशांचा एक गट. लग्नपूर्व काळात अडचण आली आहे, अशांचा एक गट. लग्न न झाल्यामुळे अडचण येत आहे अशांचा एक गट. लग्नानंतर जोडीदार गेल्यामुळे अडचण येत आहे, अशांचा एक गट. लग्नोत्तर काळात जोडीदाराचा लैंगिक संदर्भात कंटाळा आला आहे, अशांचा एक गट इ. ज्यांना लैंगिक प्रश्न जाणवत नाही, त्यांचा यासंदर्भात विचार करायची अर्थातच आवश्यकता नाही. त्यामुळे तो विचार इतर गटांबाबतच करावा लागेल

आज आपण ज्या टप्प्यावर आहोत, तिथे आपण  काही अंशी का होईना पण कामप्रेरणेचं अस्तित्व किमान मान्य तरी केलेलं आहे. अर्थात मुक्त लैंगिकतेचा तत्वत: पुरस्कार करणारे व प्रत्यक्षातही स्वत:च्या वा जोडीदाराच्या मुक्ततेचं ओझं होऊ न देणारे किती जण आहेत याची आकडेवारी माझ्याकडे नाही. वरील मत माझ्या प्राथमिक निरीक्षणावर आधारलेलं आहे. मागे एका मैत्रिणीला गप्पांच्या ओघात मी विचारलं, ”तुझ्या नवऱ्याचा बाहेर कुणाशी संबंध आल्याचं कळलं, तर तुला काय वाटेल?” तिने चटकन उत्तर दिलं, “काहीही करा, पण मुलं जन्माला घालू नका म्हणजे झालं.” आता प्रत्यक्षात तिच्या नवऱ्याचा संबंध आला, तर ती ते सहजतेने स्वीकारेल का हा प्रश्न आहेच; पण तिची 'तात्त्विक मंजुरी' मला सूचक वाटली. पत्रकारितेत असणाऱ्या एका मैत्रिणीशी बोलताना तिने सांगितलं; की आपल्याला कल्पना नसते, पण लग्नव्यवस्थेला समांतर अशी एक भावनिक-शारीरिक संबंधांची व्यवस्था नीट रचली गेलेली असते आणि ती छुपेपणाने सुरू असते. आता अशी व्यवस्था कमी-अधिक प्रमाणात जर सुरू असेल, तर काही लोकांनी भावनिक गुंतवणुकीचा आणि कामेच्छेचा प्रश्न त्यांच्या परीने सोडवला आहे असंही मानता येईल. मला असं वाटतं की अशी समांतर व्यवस्था असणं अगदीच शक्य आहे आणि स्वाभाविकही आहे, कारण मुळात लग्न ही नैसर्गिक व्यवस्था नव्हे. (आता मी वर म्हटलं; तसं 'माणूस जे काही करतो' ते नैसर्गिक असेल, तर लग्न नैसर्गिक का नाही? ते नैसर्गिक नाही, कारण तो निसर्गातला हस्तक्षेप आहे. आपल्या इतर अनेक गोष्टींसारखाच. माणसाला उन्हाळ्यात गार हवा हवीशी वाटणं नैसर्गिक आहे. पण एसी तयार करणं हा निसर्गातला हस्तक्षेप आहे. प्रेरणा नैसर्गिक आणि प्रेरणेच्या परिणामी निसर्गातील वस्तूंमध्ये किंवा मानवी स्वभावात बदल करून केलेली व्यवस्थानिर्मिती हा हस्तक्षेप. यातील तात्त्विक खोलात अजूनही जाता येईल. कारण जर हस्तक्षेप केल्याने नवीन प्रेरणा निर्माण झाल्या आहेत, तर त्या नैसर्गिक मानायच्या का; असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सध्या फक्त हे नोंदवून पुढे जाऊ.) जर प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला एकाच भिन्नलिंगी व्यक्तीविषयी आकर्षण वाटत असतं, तर लग्न 'नैसर्गिक' झालं असतं. 'मानवी प्रेरणेला न्याय देणारी' या संदर्भाने ती नैसर्गिक व्यवस्था नाही. खरंतर बहुविध नातेसंबंध असणं नैसर्गिक आहे. खासगी मालमत्तेच्या उगमानंतर लग्नसंस्था बळकट झाली आणि खासगी मालमत्ता टिकून राहिल्याने लग्नसंस्थाही टिकून राहिली आहे. त्यामुळे आज प्रचंड संख्येच्या समुदायाला एक चौकट देण्याच्या प्रयत्नातील एक प्रयत्न म्हणूनही लग्नसंस्थेकडे पाहावं लागतं. पण कामप्रेरणेच्या बाबतीत आपण 'संस्थात्मक' सुधारणा न केल्याने लग्नसंस्था कळाहीन झाली आहे. (र. धों. कर्वे यांच्या 'कामशास्त्राचा सामाजिक विचार' या लेखातील एक परिच्छेद मननीय आहे -  ज्या समागमाने एकापासून दुसऱ्यास कोणताही रोग लागतो तो अनीतीचा समजला पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या समागमापासून समाजास अनिष्ट अशी संतती उत्पन्न होते तोही अनीतीचाच समजला पाहिजे. हे दोन्ही नियम इतरांप्रमाणेच पती-पत्नीच्या समागमालाही तितक्याच जोराने लागतात हे विशेष लक्ष्यात ठेवण्यासारखे आहे. वास्तविक पाहता गर्भधारणेचा व रोगसंसर्गाचाही प्रतिबंध हल्ली सहज करता येतो. त्यामुळे जरूर असल्यास हे दोन्ही उपाय वापरल्यास विवाहबाह्य संबधातील अनीती आता पार नाहीशी करता येईल. तेव्हा ज्यास असा संबंध ठेवणे असेल त्यांनी त्याची माहिती मिळवून तिचा उपयोग केला पाहिजे. पारंपरिक नीतीच्या कल्पना आमच्या मते याबाबतीत त्याज्य आहेत. समागमास भटांची किंवा कायद्याची परवानगी लागण्याचे काहीच कारण नाही. हल्ली विवाहित स्त्रियांवर कायद्याने समागमाची सक्ती असते. हा कायद्याचा व धर्माचा रानटीपणा आहे. या बाबतीत वेश्यांस जे स्वातंत्र्य असते, यावरून विवाहसंस्थेची किंमत होते. अनेकांशी समागमाची इच्छा स्त्रीपुरुषांस नैसर्गिक आहे व वर सांगितलेल्या दोन्ही प्रकारची खबरदारी घेतली असता त्यात कोणाचेही खरोखर नुकसान नाही. यामुळे आमचे मते ती अनीती नाही. वेश्यांनी देहविक्रय करणे किंवा पुरुषांनी त्याचा उपयोग करणे यातही आमचे मते अनीती नाही.)

लैंगिकतेला नैतिक परिमाण असावं का? लग्नबाह्य शरीरसंबंधाला सहसा 'अनैतिक' म्हटलं जातं. म्हणजे नैतिकता टिकवायची असेल, तर कामसुखातील वैविध्य, वेगळ्या अनुभवाची आस, रोमांचकता याला नकार द्यायचा का? मला व्यक्तिशः तसं वाटत नाही. पण हा मुद्दा तितका सरळही नाही, कारण तो समाजधारणेशी निगडित आहे. कामप्रेरणा शारीरिक आणि मानसिक अशा दोन पातळ्यांवर कार्यरत असते. आणि ती काही आपली एकमेव प्रेरणा नव्हे. माणसामध्ये नैतिक प्रेरणादेखील कार्यरत असते. प्रचलित नैतिक प्रेरणा विवाहपूर्व आणि विवाहबाह्य कामसुखापासून मागे ओढणारी असल्याने शारीरिक सुखाच्या पूर्ततेमागोमाग मानसिक अस्वास्थ्य आलं, तर काय? लग्न मरेपर्यंत टिकावं असं नाही; पण लग्नव्यवस्थेची हुशारी अशी आहे, की तुम्ही सहवासामुळे संवेदनाप्रधान होतच जाता. मग त्यातून बाहेर कसं पडायचं? यात मला एक-दोन मार्ग दिसतात. एक मार्ग हा - की लग्नाच्या पद्धतीमध्ये एक मूलभूत बदल करणं आणि 'ही तुमची आजन्म घालून दिलेली गाठ वगैरे नाही, तुम्हांला एकमेकांचा कंटाळा यायची शक्यता आहे, त्यामुळे जर असं झालं तर अमुक अमुक मार्ग आहेत', असं सगळं लग्न होतानाच सांगणं. अर्थात ही शक्यता धूसर दिसते. कारण भारतीय संदर्भात तरी लग्न 'कायमच्या स्थैर्या'च्या संकल्पनेवर उभं आहे आणि लग्नाबाबतची भारतीय मानसिकता 'अतिनैतिक', 'अतिसंवेदनशील' अशी आहे. परंतु तरीही नवीन दृष्टीने विचार करणाऱ्या लोकांनी लग्नाला नवीन स्वरूप द्यायचं ठरवलं, तर एक नवी सुरुवात होऊ शकते. 'ओपन मॅरेज'सारखी व्यवस्था असणं हाही एक मार्ग आहे. आव्हान असं आहे, की कामप्रेरणेला पावित्र्याच्या जोखडातून बाहेर काढता येईल का हे पाहणं आणि या प्रक्रियेत कामेच्छा ही अखेरीस जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे हेदेखील लक्ष्यात ठेवणं.  हे लक्ष्यात ठेवलं तरच भरकटलेपण येणार नाही. कुठल्याही सुखाबाबत असतो तो 'संयम आणि भाना'चा मुद्दा कामसुखालाही लागू होतो आणि तो या सुखाबाबत थोडा जास्तच महत्त्वाचा आहे.

कामेच्छा आणि तिचे विविध आविष्कार - हस्तमैथुनापासून पॉर्न साहित्य, पॉर्न फिल्म्स, वेश्यागमन,  लग्नपूर्व लैंगिक संबंध, लग्नबाह्य संबंध - यांतील प्रत्येकाची चर्चा नैतिकतेच्या प्रस्थापित चौकटीतून केली; तर त्याबाबतचं मूल्यनिर्णयन होऊ शकणार नाही. कारण मुळात आपल्याकडे तरी हे सगळं नैतिकदृष्ट्या 'वाईट' आहे. त्यामुळे या चौकटीच्या बाहेरून पाहिलं, तरच आपल्याला काहीएक मूल्यनिर्णयन करता येईल. पॉर्नचं उदाहरण घेऊ. लग्नाआधी पॉर्न पाहणं मान्य असतं, पण प्रत्यक्ष सेक्स मान्य होत नाही. लग्नानंतर नवरा-बायकोंमधील संबंध मान्य होतो, पण पॉर्न पाहणं मान्य होत नाही. इथे 'आता तुला एक खेळणं दिलंय, तर तू शेजारच्या मुलाचं खेळणं कशाला मागतोस?' हा ‘नियमनाचा' विचार आणि 'मी तुला पुरेसा/पुरेशी नाही का?' हा दुखावलेल्या मनाचा एक विचार असतो. लग्नाची आणि लग्नकेंद्री नात्याची ही एक अडचणच आहे. 'कर्तव्यभावनेतून शारीरिक समाधान' ही कल्पनाच काहीशी भयंकर आहे. ('कर्तव्यभावनेतून प्रेम'देखील न पटणारं!). एकमेकांच्या लैंगिक तृप्तीसाठी एकमेकांना 'नेमून' देणं हे फारच गमतीशीर आहे. त्यामुळे आपल्याला लैंगिक तिढा सोडवायचा असेल, तर ही गृहीतकं सोडावी लागतील, मानसिकता बदलावी लागेल, आपल्या शारीरिक गरजेविषयी स्पष्ट बोलावं लागेल. लैंगिक भुकेचं प्रमाण कमी-अधिक असू शकतं, लैंगिक तृप्तीच्या (sexual gratification) प्रत्येकाच्या वेगळ्या कल्पना असू शकतात  हे समजून घ्यावं लागेल.

लग्नानंतर पॉर्न पाहणं यात काही गैर नाही; पण हे मान्य करूनदेखील पॉर्नबाबतचं मूल्यनिर्णयन करावं लागेल. (आपण जे जे काही करतो, त्याचं मूल्यनिर्णयन होऊच शकतं. आपण आपल्या कृतीच्या मूल्यनिर्णयनाची सवय लावून घेणं चांगलंच. कारण त्यामुळेच 'उपभोक्ता' म्हणून जगत असताना आणि बऱ्याच अंशी ते अपरिहार्य आहे हे मान्य असतानासुद्धा 'माणूस' म्हणून माझी अमुक कृती योग्य/अयोग्य/आवश्यक/अनावश्यक आहे का हा विचार मनात जागता राहू शकतो.) पॉर्न पाहण्याची वारंवारता, त्याचं व्यसन लागणं, त्याचे मानसिक-शारीरिक-कौटुंबिक दुष्परिणाम या अंगाने ते करता येईल. शिवाय एका गोष्टीबाबत शंका असायचं कारण नाही. लैंगिक समाधानाचं स्थान मान्य केलं तरी ते माणूस म्हणून जगण्याचं सार्थक नाही. गरज ही गरजच असावी. तिने विवेकशक्तीवर घाव घालू नये. 'खाण्याकरता जगतो की जगण्याकरता खातो' हा प्रश्न लैंगिकतेलाही लागू आहे. तेव्हा या व इतर निकषांच्या आधारे लग्नानंतर इतर कुणाशी किंवा वेश्येशी आलेले संबंध याचंही मूल्यनिर्णयन करता येईल. (उदा. लैंगिक समाधान घेणं या गोष्टीला तात्त्विक मंजुरी दिल्याने काहीही करून, वाटेल तेव्हा ते आपल्याला मिळायलाच हवं अशी आपली वृत्ती होते आहे का? 'व्यसन' या शब्दाची व्याख्या करणं अवघड असलं, तरी ते अशक्य नाही. त्यामुळे पॉर्न किंवा कुणा व्यक्तीशी येणारे संबंध याचं आपल्याला व्यसन लागतंय का हे ठरवणं गरजेचं आहे. आपलं मनोविश्व लैंगिकतेने व्यापून गेलं आहे का? आपण आपल्या कार्यक्षेत्रात आपलं योगदान  देत आहोत ना? याची तपासणी करत राहणं आवश्यक आहे.) लग्नाच्या वेळी या मुद्द्यांवर काहीच चर्चा होत नाही. मी वर म्हटलं, तसं ती व्हावी; म्हणजे पुढचा मार्ग सुकर होईल. मात्र ती झाली नसेल आणि लग्नानंतर हे मुद्दे उभे राहिले; तर त्याबाबत दोघांनी बसून, बोलून ठरवणं हेच योग्य आहे. ते कदाचित अवघड आहे, कारण असे संवाद करायची आपल्याला सवय नाही; पण असा संवाद होणं हाच मार्ग योग्य आहे. अन्यथा लग्नव्यवस्थेचे फायदे घेत स्वतःच्या प्रेम आणि कामसंबंधी वर्तनाला एकतर्फी वळण देणं योग्य नव्हे.

मला स्वतःला पॉर्नपेक्षा लग्नपूर्व आणि लग्नोत्तर प्रत्यक्ष लैंगिक संबंध अधिक आरोग्यपूर्ण वाटतात. यातली अडचण अर्थातच ही आहे, की लैंगिक सुखाचा प्रश्न सोडवण्याची व्यवस्था 'समाजमान्य नैतिकते'अंतर्गत लावली गेलेली नाही आणि लैंगिक समाधानाकडे बघण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. त्यामुळे तिथे बदल झाल्याशिवाय पुढे काही होणार नाही. शिवाय लैंगिक इच्छेमध्ये कायम भोगलालसाच आहे असंही मला वाटत नाही. लैंगिक इच्छेला सौंदर्यानुभवाचं परिमाणदेखील आहे आणि इतर अनेक अनुभवांच्या ओढीसारखीच या अनुभवाची ओढ वाटणं नैसर्गिक आहे. Penetrative sex (भेदन संभोग) हा एक आविष्कार तर झालाच; पण शारीरिक अनुभव, स्पर्शाचा अनुभव हा दर वेळी तिथपर्यंत जाण्यासाठीच हवा असतो असं नाही.  एखादं चांगलं गाणं ऐकणं, निसर्गाच्या सान्निध्यात जावंसं वाटणं यासारखंच शारीरिक अनुभव घ्यावासा वाटणं हीदेखील एक सहज ऊर्मी होऊ शकते. 

कामजीवनाबाबत विचार करताना मला एक जाणवतं ते असं, की ही 'टू वे प्रोसेस' असल्याने ती कायमच 'फूलप्रूफ', घर्षणरहित अशी होणं अशक्य आहे. हे नातंच मुळात द्वंद्वात्मक असल्याने त्यावर सतत काम करत राहणं एवढंच आपण करू शकतो. फक्त आपल्याला यावर काम करायला हवं आहे (त्याचं नियोजन करण्यासाठी, त्यातील आनंद वाढवण्यासाठी किंवा त्याचा अतिरेक टाळण्यासाठी) हे कळणं गरजेचं आहे!

(ऐसी अक्षरे - पॉर्न विशेषांक : जून २०१६)

http://www.aisiakshare.com/node/5266