Saturday, April 28, 2018

मागे, मध्यात आणि पुढे

माझ्या काही आवडीच्या इंग्लिश मालिकांपैकी एक म्हणजे मॉडर्न फॅमिली. एका वयस्कर अमेरिकन व्यावसायिक गृहस्थ,त्याच्याहून तरुण असलेली त्याची मूळची कोलंबियन बायको, तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा - असं एक कुटुंब. या गृहस्थाला त्याच्या पहिल्या घटस्फोटित बायकोपासून दोन मुलं आहेत. त्यातली मुलगी, तिचा नवरा, त्यांची तीन मुलं असं दुसरं कुटुंब. तिसरं कुटुंब या गृहस्थाच्या मुलाचं आहे. हा मुलगा गे आहे. तो, त्याचा साथीदार (शब्द अधिक योग्य वाटतो! 'नवरा' आणि 'बायको' म्हटल्यावर ज्या स्वाभाविक पण तरी कधीकधी नकोशा वाटणाऱ्या छटा जाणवतात त्या एकदम पुसून निघतात. अर्थात मालिकेत हे दोघेही लग्न करतातच.) आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी असं तिसरं कुटुंब. ही तीन कुटुंबं आणि या मंडळींचे परस्परसंबंध, त्यांच्यातलं प्रेम आणि मारामाऱ्या, इतर उपकथानकं अशी एकूण मनोरंजक मालिका आहे. यातल्या गे जोडप्याच्या चित्रणाबाबत मी थोडा विशेष उत्सुक होतो कारण हे चित्रण प्रथमच बघायला मिळत होतं. अमेरिकेतील किंवा अन्य ठिकाणच्या गे लोकांचं या चित्रणाबाबत काय म्हणणं आहे याचा शोध अद्याप तरी मी घेतलेला नाही, पण मला हे चित्रण आवडलं. 

मालिकेतील एका भागात या दोन्ही पुरूषांच्या चुंबनाचा एक प्रसंग आहे. जेव्हा तो सीन सुरू होत होता तेव्हा मी मला स्वतःला मुद्दाम आतमध्ये निरखत होतो. दोन पुरूषांचं चुंबन दृश्य तोवर मी पाहिलं नव्हतं. (एके काळी हिंदी चित्रपटांतून समलिंगी संबंधांची फक्त टवाळीच केली जायची. नंतर त्याकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं. 'दोस्ताना' या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचं एक चुंबनदृश्य होतं. ते स्पष्टपणे चित्रित केलं गेलं नव्हतं. अलीकडे हिंदी चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याबद्दल 'बॉम्बे टॉकीज' हा चार स्वतंत्र लघुकथांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कथेत दोन पुरुषांचं चुंबन दृश्य स्पष्टपणे चित्रित केलं गेलं होतं.) त्या दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तेव्हा माझ्या मनात नक्की काय काय उमटलं याची मी नोंद ठेवली होती. मला ते दृश्य सहजपणे बघता आलं असलं तरी स्री-पुरूषाचं चुंबन पाहतानाची सहजता त्यात होती असं मी खात्रीशीरपणे सांगू शकत नव्हतो. यातला एक भाग असा की त्यात मला चुकीचं काहीच वाटत नव्हतं हे पूर्णपणे खरं, पण मला त्याची 'सवय' नव्हती. त्यामुळे अगदी एक क्षण मला जो 'वेगळेपणा' जाणवला तो त्या सवयीच्या अभावी जाणवला होता. पण तो अगदी एक क्षणच होता. त्यातून बाहेर येऊन मी पुढे बघू लागलो. 

एखाद्या नवीन गोष्टीचा स्वीकार/अस्वीकार करणं याला दोन-तीन बाजू आहेत. एक म्हणजे ती गोष्ट अयोग्य वाटून अजिबातच स्वीकारता न येणं. दुसरी म्हणजे ती गोष्ट तत्त्वतः मान्य असणं, पण स्वीकारायला जड जाणं आणि तिसरी म्हणजे ती थोड्याच प्रयत्नांनी किंवा अगदी सहजदेखील स्वीकारून पुढे जाणं. आपण स्वीकृत केलेल्या गोष्टींचा नकळत आपल्या मनात एक 'साचा' तयार होतो आणि हा साचाच फक्त योग्य आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्याबाहेरचं काही दिसलं की आपल्याला ते योग्य वाटत नाही किंवा स्वीकारता येत नाही. 

पण यात एक मेख आहे. आणि त्यावर नीट विचार केला पाहिजे. या सदरातील अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे 'क्ष' नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे 'य' नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे पाहायला नको. हे पुन्हा एकदा इथे नोंदवू. यात म्हणायचं असं आहे की एकाची परंपरा दुसऱ्याची नवता असू शकते. हे उलटही असू शकतं. आता या पार्श्वभूमीवर अमुक इतक्या अंतरावर पोचलेला मनुष्य आधुनिक आणि त्याच्या मागे असलेला मनुष्य पारंपरिक असं म्हणता येईल का? वर दिलेलं उदाहरण घेऊ. दोन पुरूषांचं चुंबन बघणं एखाद्याला फारसं जड गेलं नाही. हेच दुसऱ्या एखाद्याला फारच अवघड गेलं. तिसरा एक असा आहे की त्याला चुंबन दृश्य दाखवणंच गैर वाटतं. चौथा एक असा आहे की ज्याला समलिंगी संबंधच मान्य नाहीत. आता या सगळ्यांमध्ये आधुनिक कोण आणि पारंपरिक कोण असं विचारलं तर पहिला मनुष्य आधुनिक आहे असं आपण म्हणू. पण त्याला दोन पुरूषांचं नातं मान्य आहे. तीन पुरूषांचे परस्पर प्रेमसंबंध आहेत हे त्याला मान्य होत नाही. मग तो आधुनिक होतो का?

मला जाणवलेलं एक सत्य असं आहे की आपण सगळे वेगवेगळा पायऱ्यांवर उभे असतो. आणि त्यावरून आपल्यात संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी ज्या पायरीवर उभा आहे तिथून मला समोरचं सुंदर दृश्य दिसतंय. ते इतरांना दिसत नाही म्हणून मी त्रागा करून घेतो. पण माझ्या हे लक्षात येत नाही की मी जिथे उभा आहे तिथे यायला इतरांना अजून वेळ लागणार आहे. माझ्यापुढे निघून गेलेल्या काहींना माझ्याबद्दल हेच वाटत असेल. इथे आपण तात्त्विक संघर्षापाशी येतो. आधुनिकता म्हणजे नक्की काय आणि परंपरा म्हणजे नक्की काय हे प्रश्न आपल्याला पडतात. 

'एव्हरी वॉर इन द वर्ल्ड इज द वॉर ऑफ डेफिनेशन्स' असं म्हटलं जातं. आधुनिकता आणि परंपरेच्या बाबतीत हे वॉर सुरू असतं याचंही कारण हेच आहे. पण मग हा तिढा सुटणार कसा? मला याचं उत्तर असं दिसतं की विशिष्ट क्षणी, विशिष्ट ठिकाणी जे बल प्रभावी असेल ते जिंकेल. एखाद्या समाजात विशिष्ट कालखंडात विशिष्ट धारणा का प्रभावी असतात याची कारणं संमिश्र आहेत. त्या बदलतात कशा याचंही उत्तर संमिश्र आहे. वैचारिक प्रबोधन, तांत्रिक प्रगती, त्या त्या समाजाची विशिष्ट 'वीण' आणि त्यातून घडलेली विशिष्ट मानसिकता असे विविध घटक त्याला कारणीभूत असतात. 

यातला तिसरा घटक मला विशेष प्रभावशाली वाटतो. 'मेंढा-लेखा' या गावाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गडचिरोली जिल्ह्यातील या लहानशा गावाने आपल्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा २००९ साली मान्य करून घेतला. असं करणारं हे देशातील पहिलं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या ग्रामसभेत सर्वसहमतीने निर्णय घेतले जातात. ('गोष्ट मेंढा लेखाची' या मिलिंद बोकील लिखित पुस्तकात या गावाची प्रेरणादायक कथा वाचता येईल). तिथे गेलो असताना तिथले ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल मला म्हणाले की सर्वसहमतीचं तत्त्व, सामूहिक वनहक्क या गोष्टी इथे यशस्वी झाल्या कारण मुळात या गावातील लोकांमध्ये एक वेगळेपण आहे. त्यांचं हे म्हणणं माझ्या लक्षात राहिलं होतं. ही मानसिकता कशी घडवायची हाच एक प्रश्न असतो. 

परंपरा आणि आधुनिकतेसंदर्भात चर्चा करताना त्यातील तात्त्विक स्पष्टतेचा मुद्दा लक्षात घेऊन आपण पुढे गेलो तर आपला मार्ग सुकर होतो. पण माणसाच्या मुक्ततेची नवी दिशा दाखवणाऱ्या विशिष्ट आधुनिकेतचा आग्रह धरणं हेही अपरिहार्य असतं. मानवी नातेसंबंध या आधुनिकेतच्या कक्षेत येतात. आपण सहसा नातेसंबंधांबाबत प्रयोग करायला कचरतो. ते केले पाहिजेत. विज्ञान जसं प्रयोगाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसंच कौटुंबिक-सामाजिक रचनासुद्धा नातेसंबंधातील प्रयोगाशिवाय सुदृढ राहू शकत नाही. यापुढील काही लेखांमध्ये नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत आपण चर्चा करू.   

Saturday, April 14, 2018

'आँखों देखी' ची दृष्टी

इंग्लिश भाषेत 'अनलर्निंग' हा एक चांगला शब्द आहे. इंग्लिशमधील 'डिझर्व्ह' ला जसा चपखल मराठी शब्द सापडत नाही तसंच  'अनलर्निंग' बाबतही म्हणता येईल. आपण आजवर जे पाहिलं, अनुभवलं त्यातून आणि औपचारिक शिक्षणातून जे शिकलो ते थोडं बाजूला ठेवून नव्या दृष्टीने, नव्या बाजूने काही शिकणं म्हणजे 'अनलर्निंग'. गेल्या २-३ लेखांमध्ये आपण प्रश्न विचारण्याबद्दल बोलतो आहोत. 'अनलर्निंग' ही प्रश्न विचारण्याला समांतर अशी एक प्रक्रिया आहे. हाच धागा धरून मला या लेखात एका चित्रपटाबाबत काही सांगायचं आहे. 

'सिनेमा' हा एकूणातच माझ्या प्रेमाचा विषय आहे. 'गोष्ट सांगण्याचं' अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कथा, सादरीकरण, अभिनय, संगीत अशा विविध अंगांनी आपल्याला अनेक चित्रपट आवडतात. पण काही चित्रपट असे असतात की ते पुसता येणार नाही असा ठसा उमटवतात. हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेतील अनेक चित्रपटांनी माझ्या बाबतीत हे केलं. लेखनविश्वात जसे कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांसोबतच वैचारिक लेखन हाही एक प्रकार असतो तसाच 'वैचारिक चित्रपट' असा एक प्रकार मला करावासा वाटतो. २०१३ साली रजत कपूर या दिग्दर्शकाचा 'आँखो देखी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट लिहिलाही त्यानेच होता. तुमच्यापैकी काहींनी तो पाहिला असेल. हा चित्रपट काही फारसा चालला नाही. (चांगल्या, काहीतरी वेगळं देणाऱ्या चित्रपटाचं जे होतं तेच याचंही झालं.) रजत कपूरचे 'मिक्स्ड डबल्स', 'मिथ्या' हे चित्रपट अतिशय प्रभावी होते. 'वैचारिक' दृष्ट्या प्रेक्षकाला हलवण्याची क्षमता असलेले जे मोजके दिग्दर्शक आहेत, त्यातला हा एक दिग्दर्शक. त्यामुळे त्याचा हाही चित्रपट वेगळा असणार याची खात्री होती. पण चित्रपट पाहिल्यावर मात्र मी रजत कपूरला दंडवतच घातला. 

दिल्लीच्या एका गजबजलेल्या भागात राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब. अगदी सरळसोट. कुठल्याही इतर चार कुटुंबांसारखं. आपला कथानायक म्हणजे या कुटुंबाचा प्रमुख - पन्नाशीच्या पुढचा एक गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा, धाकटा भाऊ, त्याची बायको आणि मुलगा असं एकत्र कुटुंब. एके दिवशी कुणीतरी वार्ता आणतं की घरातल्या मुलीचं अमुक एका मुलाबरोबर 'प्रकरण' सुरु आहे आणि तो मुलगा काही चांगला नाही. झालं! हे ऐकून आपला कथानायक, त्याचा भाऊ, मेव्हणा, आसपासची दोन टाळकी असे सगळे मिळून त्या मुलाचा समाचार घ्यायला म्हणून निघतात. मात्र त्या मुलाला प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा तो थोड्याश्या दटावणीनंतर रडू लागतो तेव्हा कथानायकाच्या लक्षात येतं की हा तर अगदीच सरळ-साधा मुलगा आहे. आपलंच चुकलं. घरी आल्यावर तो विचारात पडतो. त्याच्या लक्षात येतं की आपण फार चटकन विश्वास ठेवतो कुणावरही. आपल्या डोक्यात लहानपणापासून गोष्टी घुसवल्या जातात, आपल्या आजूबाजूचं जग ओरडून आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं आणि आपण ते निमूटपणे होऊ देतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो घरात जाहीर करतो की आजपासून मी कुठल्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीला पारखून घेईन, प्रश्न विचारेन, स्वतः अनुभव घेईन आणि मगच माझा निर्णय घेईन. नव्या निश्चयाच्या उमेदीने तो घराबाहेर पडतो. पुढे काय होतं हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. पण तरी तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचचा प्रसंग सांगायचा मोह टाळता येत नाही. बाहेर पडल्या पडल्या त्याला त्याच्या गल्लीतले परिचयाचे पुजारी भेटतात. त्याला प्रसाद देतात. हातातला प्रसाद निरखून बघत तो एक क्षण थबकतो, मग प्रसाद खातो आणि म्हणतो 'हा कलाकंद होता. गोड होता. चांगला होता.' त्यावर पुजारी परत 'हा प्रसाद आहे' असं सांगतात. तरी तो  'हा कलाकंद होता. गोड होता', एवढंच म्हणत त्यांना निरोप देतो.

'मला एवढं समजलं' या बिंदूपाशी निग्रहाने थांबायचा त्याचा प्रयत्न त्याला मुक्ततेचा अनुभव देतो. पन्नाशीच्या पुढचा हा गृहस्थ  'अनलर्निंग' चा मार्ग स्वीकारतो आणि त्याचा हा सगळा प्रवास प्रेक्षकांसाठी देखील डोळे उघडणारा ठरतो. एका प्रसंगात तर मी त्याला बसल्या जागेवरून टाळीच दिली. 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते यातलं मला फक्त 'ती खाली पडते' एवढंच समजलं, ती का खाली पडते हे मला माहीत नाही' असं याने म्हटल्यावर एकजण 'ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते' असं अपेक्षित उत्तर देतो. त्यावर हा 'तुझ्याकडे बघून तुला गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय हे कळतं आहे असं वाटत नाही' असं म्हणतो. आता यावर मी खरंच विचार केला, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता, गुरुत्व बल ९.८ मीटर्स / सेकंदाचा वर्ग इतकं असतं हे आपणही शिकलोय. पण हे सगळं 'मला' नक्की कितपत कळतंय ? 'गुरुत्वाकर्षण' म्हणजे काय हे मी विस्तृतपणे, सप्रमाण दाखवून देऊ शकतो का? तर नाही. 

'आँखों देखी'च्या नायकाची 'एन्क्वायरी'ची जी पद्धत आहे ती आपल्याला बरंच काही देऊन जाते. या चित्रपटाने माझ्यावर फार परिणाम केला. माहिती, ज्ञान आणि पुढे 'माझी मनोभूमिका' या साखळी प्रक्रियेमध्ये आपण शांत, निगर्वी, 'विद्यार्थी' भूमिकेमध्ये असायला हवं हे समजणं मला 'आतमध्ये' शांत करून गेलं. बरं, चित्रपटात त्याचा दृष्टीकोन सतत, संपूर्णपणे संशयवादी असाही नाही. काही बाबतीत स्वतःला अनुभव नसला, माहीत नसलं तरी दुसऱ्याला झालेलं ज्ञानही मी स्वीकारलं पाहिजे याला त्याची तयारी आहे. पण मी आधी लिहिलं तसं हे सगळं प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे. 

या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य हे की तो अगदी साध्या माणसातल्या वैचारिक परिवर्तनाची गोष्ट सांगतो. आणि त्यात कसलाही अभिनिवेश नाही. चित्रपटाला कथानायकाच्या मुलीच्या लग्नाची पार्श्वभूमी आहे, कथानायक आणि त्याच्या भावामधल्या संघर्षाची डूब आहे, मध्यमवर्गीय जगण्याचे अनेक संदर्भ आहेत. चित्रपट बघताना ही गोष्ट आपल्या शेजारच्या घरात घडते आहे असं वाटत राहतं. कथानायकाच्या वैचारिक उलाघालीच्या पार्श्वभूमीवर इतर सगळी माणसं, त्याच्या स्वतःच्या मानवी मर्यादा हे सगळं आपलं वाटतं. मागच्या लेखात मी म्हटलं होतं तसं संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. 'आँखों देखी' चा नायक नेमकं हेच करतो.     
आकलनासाठी आवश्यक अशा 'एन्क्वायरी'च्या पहिल्या पायरीवर या नायकासारखा पुरेसा काळ न घालवल्यानं पुढच्या पायऱ्यांवर अडचणी येतात. कारण सुरूवातच चुकलेली असते. विशेष म्हणजे 'मला एवढं माहीत आहे, पुढचं माहीत नाही' ही भूमिका, ही जाणीव परंपरा असो की नवता - दोन्ही ठिकाणी लागू होते. म्हणजे असं की परंपरेचं पालन करताना 'हे परंपरेचं पालन आहे' इथेच थांबून परंपरा पालनाच्या पुष्ट्यर्थ तोकडे दावे केले गेले नाहीत तरी पुष्कळ होईल. आणि नवतेच्या बाबतीत 'हा प्रयोग आहे. याच्या परिणामांसाठी तयार राहूया' असा मोकळेपणा असेल तर ते हितकारक ठरेल.          

आज टीव्हीच्या आणि समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे अनावश्यक माहितीची, अर्धवट ज्ञानाची आणि असत्याची भीतीदायक घुसळण होते आहे. त्यातून माणसांची मनंही अस्थिर होत आहेत, आपल्यापर्यंत आलेले माहितीचे तुकडे कसलीही शहानिशा न करता खरे मानले जातायत. अशा वेळी 'आँखों देखी'च्या दृष्टीचं महत्त्व पटल्यावाचून राहत नाही. आज आपल्याकडे जी सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती दिसते आहे त्यात तर ही दृष्टी औषधाचं काम करू शकेल!