Saturday, June 23, 2018

व्यक्तिस्वातंत्र्याचा विवेक

नातेसंबंधांतील प्रगल्भतेसंदर्भात पाश्चिमात्त्य-पौर्वात्त्य मानसिकता याबाबत बोल्ट आपण 'व्यक्तिस्वांतत्र्य' या संकल्पनेपाशी आलो होतो. मुळात मानसिकतेबाबत एखादं विधान करताना ते विधान एका 'ट्रेंड'कडे निर्देश करतं, विश्लेषण करताना 'सामान्यीकरण' केलं गेलं तरी या सामान्यीकरणातून दिसणारा समाजाचा चेहरा हा त्या समाजाचा एकच एक चेहरा असतो असं नाही हेही आपण बोललो. आपण हे लक्षात घेऊया की भौतिक विज्ञानात पदार्थांचं वर्तन नियमबद्ध असल्याने त्याविषयी निश्चित स्वरूपाचं बोलता येणं शक्य असतं, पण मानवी वर्तनाबाबत ते शक्य नसतं. मात्र इथे एक मेख आहे. मानवी वर्तनाचा संबंध मानवी विचारप्रक्रियेशी, मानवी जाणिवेशी आहे. ही विचारप्रक्रिया, जाणीव हे सगळं काहीसं गूढ वाटलं तरी हे सगळं म्हणजे मानवी मेंदूतील भौतिक घडामोडींचा परिपाक आहे. हे लक्षात आलं की आपण 'जाणिवेचं विज्ञान' समजून घ्यायच्या जवळ जातो. माणसाच्या मनाशी संबंधित गोष्टींचा पाया मुळात भौतिक आहे हे ज्ञान आपल्याला मानवी वर्तनाच्या खुलाशाकडे, उत्तरांकडे नेणारं आहे.

या संदर्भात 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' या मे. पुं. रेगे यांच्या पुस्तकातील एक उतारा उद्धृत करण्याचा मोह मला टाळता येत नाही. या पुस्तकाचा उल्लेख मागे एकदा या लेखमालेत केल्याचं काही वाचकांना आठवत असेल. 'विवेकवाद' या प्रकरणात रेगे लिहितात - 

जे जे विश्वात घडते आहे त्याची यादी करायची झाली तर तिच्यात मानसिक घटनांचा अंतर्भाव करावा लागेल हे उघड आहे. एखाद्या हरणाच्या शरीराला जर दर्भांकुर टोचला तर ती भौतिक घटना असते आणि त्या हरणाला जी वेदना होते ते मानसिक घटना असते. आपण केवळ भौतिक घटना घेतल्या तर त्या कोणत्या नियमांना अनुसरून घडतात, हे जसे वैज्ञानिक पद्धती शोधून काढू शकते त्याप्रमाणे भौतिक घटना आणि मानसिक घटना यांच्या साहचर्याने नियमही ती शोधून काढू शकते. स्विच दाबला की विजेचा दिवा का लागतो ह्या, बहुसंख्य भारतीय विवेकवाद्यांना माहीत नसलेल्या गोष्टीचा उलगडा वैज्ञानिक पद्धती करू शकते. त्याप्रमाणे गुप्तधनाचा शोध लागावा म्हणून एखादा माणूस नरबळी का देतो याचे स्पष्टीकरणही ती करू शकते.    

माणूस, त्याचे अनुभव, विचार आणि कृत्ये हाही विश्वाचा भाग आहे आणि वैज्ञानिक पद्धतीने विश्वाच्या इतर घटकांचे स्वरूप आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध यांचे जसे स्पष्टीकरण करता येते तसेच मानवी घटनांचेही करता येते आणि ते केले पाहिजे, माणसाचे विज्ञान रचले पाहिजे, भौतिक विज्ञानाइतकेच दृढपणे आणि पद्धतशीरपणे रचले पाहिजे, हा प्रबोधनकालीन विवेकवादाचा संकल्प आणि आकांक्षा होती. माणसाची प्रकृती गुंतागुंतीची असल्यामुळे विज्ञानाच्या ह्या भागाचा आशय आणि अंतर्गत रचना, उदाहरणार्थ, वनस्पतीशास्त्राचा आशय व रचना यांच्यापेक्षा अधिक गुंतागुंतीची असेल व माणसाचे विज्ञान रचणे अधिक कठीण ठरेल हे ह्या विवेकवाद्यांना मान्य होते. पण हे विज्ञान रचणे तत्त्वतः शक्य आहे ह्याविषयी त्यांना शंका नव्हती.   
भौतिक, रासायनिक, जैविक, मानसिक प्रक्रियांचे विज्ञान जसे रचले पाहिजे तसे माणसांच्या अनुभवांचे आणि कृत्यांचे विज्ञानही रचले पाहिजे. ही विज्ञाने, किंवा एका सर्वंकष विज्ञानाचे हे वेगवेगळे भाग, अर्थात माणसांनी रचायचे आहेत आणि ते माणसासाठी रचायचे आहेत. म्हणजे माणसाचे सुख किंवा कल्याण साधण्यासाठी रचायचे आहेत. माणसाचे सुख कशात असते? विवेकाला अनुसरून जगण्यात माणसाचे सुख असते. पण विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे?

विवेकाला अनुसरून जगणे म्हणजे कसे जगणे हा कळीचा प्रश्न आहे. रेगे पुढे लिहितात की माणसाने विवेकाला अनुसरून जगणे योग्य असते या विवेकवादी सिद्धांताचा अर्थ काहीही असो, हा सिद्धांत हे विवेकवादाचे एक वेगळे परिमाण आहे. माणसाने कसे जगावे हे विवेकवाद सांगतो. त्याचबरोबर विश्वात खरोखर काय आहे याचा निर्णय करण्याची विवेकवादी रीत तो सांगतो. विवेकवादाच्या या दोन अंगांमध्ये काय परस्परसंबंध असू शकेल? अस्तित्वाचे स्वरूप काय आहे याचा शोध घेणारी वैज्ञानिक पद्धती माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वाला जन्म देऊ शकते का? वैज्ञानिक नीती, विज्ञानप्रणित मूल्ये असे काही असू शकते का?

रेग्यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. या लेखमालेत आपण श्रद्धा-अंधश्रद्धा, कार्यकारणभाव शोधण्याची मानसिकता, मानवी नातेसंबंधांचं नवीन प्रारूप अशा विषयांना स्पर्श केला आहे. त्यावर पुढेही बोलणार आहोत. या सगळ्याचा आटापिटा कशासाठी? तर आपल्या जगण्यातील काही बाजूंना घासून-पुसून बघणं, काही बदल करणं आवश्यक वाटतं म्हणून. रेगे म्हणतात तसं 'माणसाने कसे जगावे याचे नियमन करणाऱ्या तत्त्वा'ला यातून जन्म मिळेल का? 'वैज्ञानिक नीती आणि मूल्ये' सांगता येतील का?
हे प्रश्न नेमके आहेत आणि म्हणूनच अवघडही आहेत. व्यक्तीच्या इच्छा आणि समूहजीवनाची बंधनं या दोन्हीची प्रस्तुतता मान्य करत एक 'आदर्श समाज' आणि एक 'आदर्श जगणं' निर्माण करण्याचा किंवा किमान तशी कल्पना करण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी सातत्याने केला आहे. यातील मुख्य आव्हान व्यक्ती आणि समाज यांच्यातील ताण कमी करणे हेच आहे. परंतु विवेकवादाच्या संदर्भात 'वैज्ञानिक नीती' म्हणजे काय?' यावर तपशीलात जाऊन मांडणी करणं आवश्यक आहे असं वाटतं.  

'व्यक्तिस्वातंत्र्य' हे माणसाच्या विज्ञानाच्या संदर्भाने एक वैज्ञानिक मूल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. या मूल्याचा उच्चार करताना आणि त्याचा आग्रह धरत असतानाच त्याची नीट उकल करणंही आवश्यक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हे आधुनिक काळातील मूल्य आहे. अगदी शुद्ध रूपात त्याचं स्वरूप 'व्यक्तीला तिच्या इच्छेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य' असंच असणार आहे. म्हणजे आपण जर सूक्ष्म विचार केला तर एखाद्याला घराबाहेरही नग्नावस्थेत राहावंसं वाटलं तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेनुसार त्याला तसं राहता आलं पाहिजे. हेच पुढे नेऊन असंही म्हणता येईल की योग्य वाटलं म्हणून एखाद्याला मारून टाकण्याचं स्वातंत्र्यही व्यक्तीला असलं पाहिजे. पण आपण अशा व्यक्तिस्वांत्र्याला मान्यता देणार नाही. पहिल्या उदाहरणात चुकीचं असं खरं तर काही नाही, परंतु समाज उभा राहताना काही धारणा घेऊन उभा राहतो. त्या धारणांशी खटका उडाला की समाजात अस्वस्थता पसरते. त्यामुळे इथे धारणांचा संघर्ष होतो आहे. दुसऱ्या उदाहरणात मात्र मी सोडून इतरांच्या जगण्याच्या स्वातंत्र्यावरच घाला घातला जातो आहे. ही गंभीर बाब आहे.

त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संदर्भ कोणता, व्यक्तिस्वातंत्र्य कशासाठी हे पाहणं आवश्यक ठरतं. आता आपण आणखी एक उदाहरण घेऊ. व्यक्तिस्वातंत्र्य - म्हणजेच इच्छेचं स्वातंत्र्य - आहे म्हणून माणूस आहे त्याहून अधिक सुखी, आरामदायक जीवन जगू पाहतो. हे करत असताना तो इतरांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत नाही का? शहरांना पाणी मिळावं म्हणून शहरांपासून दूरच्या गावातले लोक विस्थापित होतात. मग शहरी लोकांच्या स्वातंत्र्याला काय म्हणणार? एखादा खेड्यातला मुलगा आहे. त्याने मुंबईत आल्यावर त्याच्या दृष्टीने तोकड्या कपड्यातील एखादी मुलगी पाहिली आणि तो लैंगिकदृष्ट्या उद्दीपित झाला तर तो त्याचा दोष की त्या मुलाच्या मनात स्री शरीराविषयीची सहजता, सकारात्मतता रूजू देण्यात अपयशी ठरलेल्या त्याच्या पर्यावरणाचा दोष? की मग आपलं स्वातंत्र्य आविष्कृत करताना त्या मुलीच्या विचारांतून काही सामाजिक धागे सुटले म्हणून त्या मुलीचा दोष? 'स्वातंत्र्यातील संघर्ष' दर्शवणारी अशी इतरही उदाहरणं देता येतील. म्हणजे मग थोडक्यात आपल्या स्वातंत्र्याच्या प्रत्येक कृतीबाबत प्रश्नचिन्ह लावता येईल का?  

विचार करताना असं लक्षात येतं की आपण सामाजिक संकल्पना समजून घेताना सर्व काही नेमकेपणाने चिमटीत पकडू शकत नाही. परंतु हेच खरं आव्हान आहे. रेग्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा आपण प्रयत्न केला तर मला जे दिसतं ते असं - जगणं कसं असावं हे सांगणारी वैज्ञानिक नीती म्हणजे जी नीती आपल्याला समग्रतेतून सूक्ष्माकडे आणि सूक्ष्मातून समग्रतेकडे असा दुहेरी प्रवास घडवू शकते, जी नीती आपल्याला भौतिक-सांस्कृतिक विकासाच्या विविध टप्प्यांवरचे प्रश्न, संघर्ष सोडवायला - किमान त्यातील ताण कमी करायला वैचारिक मदत करू शकते ती नीती होय.


Saturday, June 9, 2018

स्वतंत्र आणि समग्र

मागच्या लेखाच्या शेवटी आपण भारतीय आणि पाश्चिमात्त्य मानसिकतेतील फरकाबाबत बोलायला सुरूवात केली होती. हा विषय थोडा गंभीर आहे आणि यावर नीट बोललं गेलं पाहिजे. मुख्य म्हणजे केवळ भारतीय-पाश्चिमात्त्य तुलना इतकंच नव्हे तर एकूणात आपण कोणत्याही बाबतीत जेव्हा 'तुलनात्मक टिप्पणी' करतो तेव्हा त्याला जोडून काही गोष्टी येतात त्या लक्षात घेणं आवश्यक असतं. 

माध्यमांचा प्रसार, व्यावसायिक व इतरही कारणांमुळे वाढलेली माणसांची वाहतूक यामुळे आज जग कधी नव्हे इतकं जवळ आलं आहे. वृत्तपत्रे, रेडिओ, मग टेलिव्हिजन, चित्रपट यामुळे बसल्या जागी भिन्न संस्कृतींचं दर्शन होऊ लागलं होतंच. अलीकडे इंटरनेटमुळे त्यात मोठी भर पडली. व्यक्तींचा प्रत्यक्ष संवाद सोपा झाला. टीव्ही, चित्रपट, इंटरनेट या गोष्टी आपल्या घराच्या खिडक्या म्हणून काम करू लागल्या आणि या खिडक्यांमधून बाहेरचं जग दिसू लागलं. या जगाविषयीचे ठोकताळे बांधता येऊ लागले. जे प्रत्यक्षात परदेशी गेले, राहिले त्यांना जो 'संस्कृती संघर्ष' अनुभवायला मिळाला असेल तो खिडकीतून बाहेर बघणाऱ्यांना अनुभवायला मिळणार नाही. त्यामुळे त्यांच्या आकलनाला मर्यादा पडणारच. परंतु खिडकीतून दिसणाऱ्या जगामुळे अधिक-उण्या दोन्ही बाजूंची किमान ओळख करून घेणं शक्य झालं. अमेरिकेतील मुक्त जीवनशैलीमुळे प्रभावित होत असतानाच याच खिडक्यांवाटे ज्यांची नोम चॉम्स्कीसारख्या विचारवंताशी ओळख झाली त्यांना अमेरिकन साम्राज्यवादाचं भीषण रूपही दिसलं. अमेरिकेचं परराष्ट्र धोरण, शासनपुरस्कृत भांडवलशाही याबाबत चॉम्स्की यांनी केलेलं लेखन मोलाचं आहे. त्यामुळे माझ्यासारख्या 'खिडकीतून बाहेर बघणाऱ्या' माणसाला अमेरिकन समाजजीवनातील काही पैलूंनी आकर्षित केलं तरी हे अमेरिकेचं संपूर्ण दर्शन नव्हे हे लक्षात ठेवावं लागतं. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेऊ. आपण एखाद्या विचाराकडे जेव्हा आकर्षित होतो तेव्हा ती काहीशी 'मायक्रोस्कोपिक' दृष्टी असते. त्या विशिष्ट विचारापुरतीच ती असते. तो विचार बाळगणाऱ्या माणसाच्या, मानवसमूहाच्या एकूण जगण्याचं मूल्यमापन त्या विचारावरून करता येत नाही. तिथे 'डायकॉटॉमी' (विरोधाभास) असूच शकते. इतिहासात-वर्तमानात अनेक ठिकाणी हे आढळून येईल. हिटलर हे नाव घेतल्यावर आपल्या मनात कुठलीच सकारात्मक भावना येऊ शकत नाही. पण याच हिटलरने काही अप्रतिम चित्रं काढली आहेत. त्यामुळे हिटलर वाईट असला तरी त्याची चित्रं चांगली असू शकतात हे नाकारता येत नाही. त्याचं त्या क्षेत्रात काही सकारात्मक योगदान असेल तर त्याची नोंद घ्यावी लागते. याच न्यायाने मला अमेरिकन, युरोपियन किंवा अन्य कुठल्याही समाजातील काही विशिष्ट बाबी आवडल्या, घेण्याजोग्या वाटल्या, तर त्या बाबतीत ते योग्य असतं. तो समाज इतर बाबतीत कसा आहे हा वेगळा मुद्दा असतो. व्यक्तिशः मला पाश्चात्त्य समाजातील नातेसंबंधांविषयीची प्रगल्भता आकर्षित करते, पण त्या समाजातील उपभोक्तावाद अडचणीचा वाटतो. म्हणजे मला एकाच वेळी 'स्वतंत्रपणे' आणि 'समग्रपणे' बघता यायला लागतं. यातून एक महत्त्वाची गोष्ट साध्य होते. आपण बहुविधता लक्षात घेऊ लागतो. आपल्याला अपील होणाऱ्या गोष्टींच्या दर्शनाने आपण वाहवत जात नाही. या बहुविधतेच्या खोलात जाणंही समाजशास्त्रीय-मानसशास्त्रीय दृष्ट्या मोठं रोचक असू शकतं. अनेक विरोधाभास समोर उभे राहतात आणि त्यांची उकल करण्यातली मौज अनुभवता येते. सामाजिक अभ्यासाचा हा पैलू विशिष्ट संस्कृती, विशिष्ट मानसिकतेच्या विकासक्रमाशी जोडलेला आहे. यात मौज आहे तशीच दमणूकही आहे. कारण सामाजिक अभ्यास हा गणित किंवा पदार्थविज्ञानासारखा नियमांनी बांधलेला नसतो. 'माणूस' या एककाशी जोडल्या गेलेल्या अनेक गोष्टी असतात. इतर माणसांशी जोडल्या गेलेल्या गोष्टींशी त्यांचा संपर्क येतो आणि समाजाचं गतिशास्त्र निर्माण होऊ लागतं. त्यामुळे भारतीय असे आहेत, अमेरिकन्स असे आहेत, जपानी असे आहेत या टिप्पण्यांकडे स्थूलमानाने बघावं लागतं. हे इतरही बाबतीत लागू होईल. म्हणजे अगदी काँग्रेस हा पक्ष असा आहे, लोकसत्ता हे वर्तमानपत्र अमुक प्रकारचं आहे, डावे असे असतात, उजवे असे असतात अशी विधानं स्वतंत्र टिप्पणी करत असतात. समग्र टिप्पणी एक-दोन विधानांमधून करताच येत नाही. त्यासाठी कार्यकारणभावाच्या खोलात जावं लागतं.

या पार्श्वभूमीवर हे लक्षात घेऊ की सामाजिक संदर्भात सामान्यीकरण करणाऱ्या विधानांकडे विशिष्ट निरीक्षण म्हणून पाहावं. मला पाश्चिमात्त्य समाज अधिक प्रयोगशील दिसतो आणि भारतीय समाज स्थितीशील दिसतो हे एक विशिष्ट निरीक्षण आहे. यात सामान्यीकरण आहे, पण ते काही अंशी अपरिहार्यही आहे. कारण एखाद्या समाजाची साधारण रूपरेषा विशद करण्यासाठी ते आवश्यक आहे. पाश्चिमात्त्य समाज प्रयोगशील आहे तर का आहे आणि भारतीय समाज स्थितीशील असला तर का आहे याचा शोध घ्यायला सुरूवात केली तर बरीच तथ्ये समोर येऊ शकतील. दोन्ही समाज  इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्याने त्यांच्यात हा फरक आहे असंही उत्तर असू शकेल. मुख्य म्हणजे प्रयोगशील असो वा स्थितीशील - त्या समाजाचा 'क्रॉस सेक्शन' घेतला तर आपल्याला स्थिर, शांत, विचारी किंवा  विचारातून आलेली 'अस्थिर शांतता' अनुभवणारी माणसं अधिक दिसतात की एकूणात दुःखी माणसं अधिक दिसतात हेही पाहता येईल. 

तुलनात्मक टिप्पणीविषयी आपण थोडं सविस्तर बोललो, पण ते आवश्यक आहे असं मला वाटतं. विशेषतः सध्या दीर्घ विवेचनापेक्षा थोडक्यात लिहिलेल्या मजकुराचा प्रभाव जास्त पडताना दिसतो. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप या समाजमाध्यमांद्वारे हे होताना आपण पाहतो. इथे होणाऱ्या स्वतंत्र विधानांचा आणि सामान्यीकरणाचा धोका असा की ते भडक पद्धतीने, नकारात्मक भावना ट्रिगर होतील अशा पद्धतीनेही होतं. त्यातून ध्रुवीकरणाखेरीज काही साध्य होत नाही. आपण जेव्हा आपल्या निरीक्षणाच्या आधारे एखादं सामान्यीकरण कसणारं विधान करतो तेव्हा त्याच्या पुष्ट्यर्थ काही मुद्दे मांडता येणं गरजेचं असतं. त्यामागे आपलं म्हणून काही आकलन आहे का, आपला म्हणून काही विचार झाला  आहे का हे तपासणं आवश्यक असतं. सामान्यीकरण न करता बोलायचं ठरवलं - म्हणजे समग्रपणेच बोलायचं ठरवलं तर बहुधा आपलं बोलणं अगदीच नाहीसं होईल कारण समग्रतेला कवेत घेणं सहजसाध्य नसतं. जवळजवळ अशक्यच असतं. हे समजण्यासारखं आहे. त्यामुळे आपण तेवढी सूट स्वतःला द्यावीच. पण स्वतंत्र विधानाच्या पलीकडे समग्र म्हणून काही आहे, तिथे पोचण्याचा आपला प्रयत्न तरी असला पाहिजे याची जाणीव जागी असली तर आपला वैचारिक प्रवास अधिक समृद्ध होतो. 

नातेसंबंधांच्या अधिक निरोगी रचनेबाबत मला 'खिडकीतून' जे दिसलं आहे ते आश्वस्त करणारं आहे. वर आपण बोललो आहोत तसं खिडकीतून पूर्ण सत्य नाहीच कळणार, पण जे दिसलं ते महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे हे 'मिसिंग' आहे ही जाणीव मात्र मला खोडता आली नाही. पुलंनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्त्य संस्कृतीबाबत 'त्यांची द्राक्ष संस्कृती आणि आपली रुद्राक्ष संस्कृती' असा एक विनोदी उल्लेख केला आहे. आज भारतातही द्राक्ष संस्कृती पाय रोवून उभी राहिली आहे आणि रुद्राक्ष संस्कृतीही आहेच, पण नातेसंबंधांच्या मोकळिकीबाबत, त्यातील  'साक्षरतेबाबत' बोलायचं झालं तर आपण भारतीय 'लेस प्रोग्रेसिव्ह आणि मोअर अ‍ॅग्रेसिव्ह' आहोत आणि पाश्चिमात्त्य 'मोअर प्रोग्रेसिव्ह आणि लेस अ‍ॅग्रेसिव्ह' आहेत असं दिसतं. आणि याचं मूळ व्यक्तिस्वातंत्र्याला मूल्यात्मक मान्यता देऊन त्याची स्पेस विस्तारण्यामध्ये आहे.