Thursday, October 20, 2016

‘मिळून सार्‍याजणी’तले दिवस

मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात मी पहिल्यांदा गेलो तो दिवस कोणता होता, विद्याताईंना प्रथम कधी भेटलो हे खरं तर आठवत नाही. पण मिळून सार्‍याजणीशी मी जोडला गेलो त्याला गीतालीताईंशी झालेली ओळख आणि त्यांच्या घरी होणार्‍या पुरुष उवाचगटाच्या बैठका कारण ठरल्या. मागे वळून बघण्याइतकं माझं वय झालेलं नसलं तरी मागे काहीतरी आहे याची जाणीव व्हावी अशा टप्प्यावर मी आहे. दुसरं म्हणजे मिळून सार्‍याजणीहा माझ्यासाठी प्रेमाचा विषय आहे. मी चांगलाच भटक्या वृत्तीचा होतो (आणि आहे), त्यामुळे कॉलेज सोडल्यापासून अनेक नोकर्‍याही सोडल्या. पंधरा-वीस वर्षांच्या काळात आठ-दहा नोकर्‍या करणारा मनुष्य कुठल्याही कंपनीच्या दृष्टीने फारशा गंभीरपणे घेण्यासारखा विषय असू शकत नाही. पण मीदेखील नोकरीला मर्यादित गंभीरपणेच घेतल्याने उभयपक्षी सामंजस्य होतं. मात्र मिळून सार्‍याजणीत्याला अपवाद ठरलं.  आणि त्याचं खरं कारण हेच की तिथे मी फक्त नोकरी केली नाही!

काही माणसांनी एकत्र येऊन काही काम करणं ही मौजेची गोष्ट असते. मग ती अगदी पाच-दहा माणसांची छोटी कंपनी असो की टाटा-इन्फोसिससारख्या अजस्त्र कंपन्या असोत. एकटा माणूससुद्धा जिथे स्वत:शी आतल्या आत भांडत असतो तिथे दुसरा आला किंवा पन्नासावा आला तर काय होत असेल याची कल्पना करता येईल. माझ्यासारख्या मुळातल्या स्वप्नाळू मनुष्याला कामातल्या औपचारिक भागापेक्षा कामाचा गाभा जास्त आकर्षित करतो. म्हणजे महिन्याचा अंक पोस्टाने रवाना करण्यात अनेक तांत्रिक गोष्टी गुंतलेल्या असतात आणि त्या आवश्यकही आहेत, महत्त्वाच्या आहेत. पण मुख्य प्रश्‍न, आस्थेचे प्रश्‍न हे की आपण हे मासिक का काढतोय? आपला जीव यात गुंतला आहे ना? आपण जे बोलतोय, लिहितोय ते योग्य आहे ना?आपल्याला स्वत:चं परीक्षण करायला हवंय का? कुठल्याही संस्थेच्या - मग ती मिळून सार्‍याजणीअसो किंवा एखादी बँक असो, आयटी कंपनी असो की चहाचं दुकान असो, हे गाभ्याचे प्रश्‍न सर्वात महत्त्वाचे असतात आणि 'मिळून सार्‍याजणी'त मला या गाभ्याच्या प्रश्‍नांना भिडता आलं, चर्चा करता आली म्हणून मी तिथे फार रमलो. एवढंच नाही, तर आज तिथे नसतानाही '‘हे आपलं मासिकआहे ही जाणीव जागी आहे. विद्याताई किंवा गीतालीताई माझ्या इतर कंपन्यांमधल्या बॉससारख्या असत्या तर कदाचित मी वर्षभरातच बाहेर पडलो असतो. (अर्थात त्या बॉसनव्हत्या असंही नाही. पण बॉसकडे स्वत:ला आवडतं किंवा नावडतं करून घ्यायचं कौशल्य असतं. त्यांनी स्वत:ला आवडतंकरून घेतलं हे त्यांच यश आहे!)

अभ्यास, करियर, सिनेमा, नाटक, सामाजिक प्रश्नसेक्स, प्रेम, आकर्षण अशा बर्‍याच गोष्टींचा एकत्र गुंता जेव्हा मेंदू काबीज करून बसलेला असतो त्या वयात मी पुरुष उवाचच्या संपर्कात आलो. तिथल्या चर्चांमधून मला मानसिक पातळीवर बरंच मोकळं होता आलं. स्त्री-पुरुष संबंध, लैंगिकता हे माझे आस्थाविषय होते आणि त्यावर बोलण्यासाठी मला एक व्यासपीठ मिळालं. आपल्यासारखेच प्रश्‍न पडणारे काहीजण आहेत आणि ते उत्तरांचा शोध घ्यायचा गांभीर्याने प्रयत्न करतायत ही माझ्यासाठी एक आनंददायक गोष्ट होती. शिवाय तिथे केवळ स्त्री-पुरुष संबंधच नव्हे, तर इतर अनेक सामाजिक प्रश्‍नांवर चर्चा होत असत आणि त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. रा.प. नेने, राम बापट अशा मजबूत लोकांना मी प्रथम ऐकलं ते पुरुष उवाचच्या अभ्यासवर्गात. या गटाच्या बैठकांमध्ये ओघानेच मिळून सार्‍याजणीचाही विषय निघे. विद्याताईदेखील अभ्यासवर्गांना येत असत. मी त्यावेळी जाहिरात क्षेत्रात काम करत होतो. मिळून सार्‍याजणीच्या कार्यालयात याच दिवसात प्रथम गेलो. साधार २००३-०४ च्या सुमारास. त्या वेळेला थोडंसं लिहायलाही लागलो होतो. पण लेखन प्रक्रिया, संपादन, मासिकांची कार्यपद्धती याबाबत अगदीच अनभिज्ञ होतो. मला वाटतं मिळून सार्‍याजणीत गेलो तो मी लिहिलेल्या लेखासंदर्भातच. कधी छापून येईल?’ हा लेखकाचा आवडता प्रश्‍न विचारायला. (आपण लिहिलेलं लगेच छापून येत नाही हा शोधही तेव्हाच लागला.) पुढे मग संपर्क वाढला. संपादकीय विभागात थोडं साहाय्य करु लागलो. आणि मला एकदम जाणवलं की धिस इज व्हेअर आय बिलाँग! लेख, संपादन, संस्करण, चर्चा, विषयांची निवड, अंकाचं स्वरूप यात आपण रमतोयआपल्याला हे जमतंय आणि यात आपण काहीतरी चांगला काम करू शकू असं आपल्याला वाटतंय ही जाणीव तीव्र झाली. मग हळूहळू काम करत गेलो. संपादकीय विभाग तर माझं आवडीचं ठिकाण होतंच, पण व्यवस्थापक सुहासिनी जोशी यांनी काम सोडायचं ठरवल्यावर मी व्यवस्थापक म्हणूनही काम केलं. हातून काही चांगलं लिहिलं गेल्याच्या आनंदाइतकाच जमाखर्चाचा ताळमेळ बसल्यावर होणारा आनंदही लक्षणीय असतो हे व्यवस्थापक म्हणून काम करताना लक्षात आलं. मुख्य म्हणजे मासिक चालवायच्या व्यावहारिक बाजूंची ओळख झाली.  

मी काम करू लागलो तेव्हा गीतालीताई संपादक म्हणून काम पाहू लागल्या होत्या. विद्याताईंचा सहभागही होताच, पण थोड्या प्रमाणात. विद्याताईंच्या मुख्य संपादकीय कारकीर्दीत मी काम केलं नाही, पण तरीही आम्ही एकत्र काम केलंच. मासिकाशी संबंधित असलो तरी पूर्ण वेळ फक्त मासिकासाठी काम केलं ते तीन-चार वर्षं. २०११ सालच्या दिवाळी अंकात वेश्याव्यवसायावर चर्चा करणारा विशेष विभाग होता. त्याचं संपादन मी केलं होतं. स्वतंत्रपणे संपादनाची जबाबदारी मी पहिल्यांदा उचलली ती या विभागाच्या वेळी. पुढे २०१४ च्या दिवाळी अंकापर्यंत काम केलं आणि मग थांबलो. 

या काळात काळाबरोबर माझ्यातही बदल झाले. दृष्टीकोन विस्तारला. कितीतरी लोकांशी परिचय झाला. पुष्पा भावे, छाया दातार, मंगला सामंत, वंदना भागवत, विद्युत भागवत, मिलिंद बोकील, प्रतिमा परदेशी, मंगला गोडबोले, मनीषा गुप्ते, मीना सेषू, रजिया पटेल, लता प्र. म., शुभदा देशमुख, सतीश गोगूलवार आणि इतरही अनेक. हा प्रामुख्याने वैचारिक विश्वातला संचार होता. शिवाय एकाला टक्कर देणारं दुसरं विश्वही मला इथे पाहायला मिळालं. समाजविचारातील बारकाबेफरक लक्षात आले. सामाजिक क्षेत्रात काम करतानाची आव्हाने समजली. विशीतला कम्युनिस्ट चाळिशीत भांडवलशहा होतो असं म्हणतात. विशीतला मी - जो फेमिनिस्ट/कम्युनिस्ट होतो तो आज चाळिसाव्या वर्षी फेमिनिस्ट/कम्युनिस्ट आहे का?

हा प्रश्‍न गहन आहे! आणि खरं तर वेगवेगळ्या शाखांमधून विस्तारत जाणार्‍या उत्तराचा आहे. आज विचार करताना हे जाणवतं की आपण एखादा दृष्टीकोन स्वीकारतो त्याला जगात एक नाव किंवा प्रचलित भाषेत 'लेबल' तयार असतं. आपणही ते लावून घेतो. कारण आपण त्या दृष्टीकोनाचे आग्रही असतो. त्यात फार काही गैर आहे असंही नाही. पण माणूस आणि जीवन हे जर व्यामिश्र आहे तर विचारधारा एका लेबलाच्या मर्यादेत सामावू शकते का? किंवा मी एका विचाराचा आग्रह धरला की मी त्या विचाराचा 'वादी' होतो का?     

एक गोष्ट स्पष्ट आहे की स्त्रीवाद, डावा विचार, विद्रोही विचार ही एक भूमिका असली आणि भूमिका, विचारधारा नैसर्गिक सत्यसांगत नसल्या तरी त्या भूमिका घेणं, विचारधारा स्वीकारणं आवश्यक असतं याबाबतही माझ्या मनात संदेह नाही. कारण नैसर्गिक सत्य जे आहे ते आहेच, पण माणूस म्हणून, समाज म्हणून आपण निसर्गाशी सुरू असलेल्या संघर्षाची धार कमी करायचा प्रयत्न करत असतो. निसर्गात स्त्री आहे, स्त्रीवाद नाही. निसर्गात विविधता आहे, समता नाही. निसर्ग एकात्म असेल, पण ती योजनाबद्ध एकात्मता नाही. मुळात निसर्ग फक्त असतो’. तो चांगलाकिंवा वाईटनसतो. ही वस्तुस्थिती आहे. पण माणसाने निसर्गात हस्तक्षेप केला आहे, करतो आहे हीदेखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या हस्तक्षेपाबरोबरच मूल्य जाणिवेचे प्रश्‍नही उभे राहणारच आणि आपण त्याला सामोरं गेलंच पाहिजे. 

स्त्री ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिला स्वतंत्र इच्छा-आकांक्षा-राग-लोभ-विचार-विकार आहेत आणि त्या सगळ्यासह तिला माणूसम्हणून जगण्याचा हक्क आहे हा विचार आपण सगळेच आज मान्य करतो आहोत आणि त्याचं प्रतिबिंब आजच्या स्त्रीजीवनात पडतानाही दिसतं आहे.. पण या बदलाची गती मंद आहे आणि अलीकडे स्त्रियांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये झालेली वाढ अर्थातच चिंताजनक आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना माझा माणूसम्हणून असलेला दृष्टिकोन आणि पुरुषम्हणूनचा लिंगसापेक्ष दृष्टिकोन यातील संघर्षही मला अनुभवता आला. स्त्रियांनी आणि पुरुषांनी परस्परांशी संवाद साधणेहे मासिकाचं उद्दिष्ट आहे आणि स्त्रीप्रश्‍न हाताळत असताना पुरुषांचं प्रबोधन करणं, प्रसंगी त्यांना समजून घेणं गरजेचं आहे ही जाण विद्याताई आणि गीतालीताई दोघींमध्ये आहे. स्त्रीप्रश्‍नाबाबत विचार करताना मी पुरुषाची लैंगिक जडणघडण (जी नैसर्गिक उर्मी आणि सामाजिक संस्कार या दोन्हीच्या मिश्रणातून तयार होते) या विषयावर बराच विचार करतो. या विषयावर मी थोडंफार लिहिलंही आहे. मिळून सार्‍याजणीमध्ये काम करत असताना मी या मुद्यावर स्त्रीवादी न्वहे तर जीवशास्त्रीय दृष्टीने काही मांडायचा प्रयत्न केला आणि मला ती मोकळीक मिळाली हे आवर्जून नोंदवतो. 

मिळून सार्‍याजणीहे स्त्री चळवळीचं मुखपत्र नसलं तरी अनेक एकट्या-दुकट्या जणींचं ते मुखपत्र आहे. विद्याताईंच्या पिढीच्या मानाने माझ्या पिढीत सिनिसिझमथोडा जास्त आहे. ह्याने काय होणार? हे कशाला करायचं?’ असा विचार आम्ही जरा जास्त करतो. आणि मग काही न करणंच बरं आहे या निष्कर्षाला येतो! पण सार्‍याजणीला येणाऱ्या पत्रांनी मला सिनिसिझम झटकायला बरीच मदत केली. एखाद्या छोट्या गावातल्या बाईने लिहिलेला तिचा अनुभव, तिच्या विचारात झालेला बदल वाचताना मला अगदी आध्यात्मिक पातळीवरचं जोडलेपण जाणवलेलं आहे. आपण मिळून सार्‍याजणीसारख्या मासिकात काम करतोय हे महत्त्वाचं आहे, आपण हे करायला हवं, यात आपल्या क्षमतांची सार्थकता आहे असं मला वाटलेलं आहे. दोन वर्षापूर्वी मी काम थांबवलं त्याचं एक कारण कामातलं साचलेपण हे होतं हे खरं आहे, पण तो माझा  व्यक्तिगत निर्णय होता. मिळून सार्‍याजणीसारखं मासिक चालू असणं, त्याची आवश्यकता याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. 

मराठीतली बरीचशी नियतकालिकं आणि मिळून सार्‍याजणी यातला एक प्रमुख फरक असा की हे सर्वसमावेशक मासिक आहे. म्हणजे मुक्त शब्दचे किंवा अनुभवचे संपादकीय निकष जितके कठोर असतील तितके ते मिळून सार्‍याजणीचे नसतील. पण सर्वसमावेशक असूनसुद्धा या मासिकाने सर्वसामान्यांची अभिव्यक्ती आणि वैचारिक मांडणी यात चांगला समतोल साधला आहे. संपादकीय विभागात मतभिन्नता होतेच (आणि ती झाली तरच मजाही असते), तशी ती इथेही व्हायची. आणि मग क्वचित प्रसंगी मौजेच्या भागवतपंथाची पुस्तके वाचत मोठे झालेले माझे जीन्स उफाळून यायचे.  त्यावर मग ‘पण आपल्याला सहभागासाठी या लेखाला स्थान द्यायला हवं असं गीतालीताई म्हणाल्या की मी शांत व्हायचो. साहित्य, साहित्याचा दर्जा, वाङ्मयीन मूल्यांची कुस्ती हे एकीकडे रोचक असतं तर एकीकडे थोडं दमवणारंही असतं. 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक साहित्य आणि सामाजिक चळवळ अशा दोन्ही आघाड्या सांभाळणारं मासिक असल्याने (आणि विद्रोहाकडे झुकणारं असलं तरी मासिकाचं कार्यालय कर्वे रोड, प्रभात रोडला लागून असल्याने) ते एकांगी झालेलं नाही. भारतात काँग्रेसचं जे स्थान आहे ते बहुधा मराठी मासिकांमध्ये ‘मिळून सार्‍याजणीचं आहे!

मिळून सार्‍याजणीहे अर्थातच मुख्यत्वे स्त्रियांचं जग आहे. संपादकीय विभागात बर्‍यापैकी काम केलेला मी एकटाच पुरुष. मला याबाबत थोडं सांगायचं आहे. काय होतं की आपण सगळे माणूसआहोत हे तर झालंचपण आपल्यातल्या या पहिल्या ओळखीनंतरची दुसरी ओळख म्हणजे आपल्यातला लिंगभाव. त्यामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म रुपात, समोरची व्यक्ती स्त्री असेल तर मी त्या व्यक्तीची नोंद स्त्रीम्हणून घेतोच. त्याने माझ्या वर्तनात काही प्रचंड फरक वगैरे पडत नाही, पण ही नोंद घेतली जाते खरी. हेच उलटीकडूनही होत असेल. मिळून सार्‍याजणीया मासिकाकडे मी ओढला गेलो याचं मुख्य कारण हे चर्चा करणारं मासिक आहे. मुळात मी पत्रकारितेतला नव्हतोच. पत्रकारितेत करिअर करणं हे माझं ध्येयही नव्हतं. मला भरपूर चर्चा करायची होती. ही चर्चा करता येईल म्हणून मी मिळून सार्‍याजणीत दाखल झालो आणि इथे मला असं लक्षात आलं की हे ‘स्त्रियांचं मासिककिंवा स्त्रियांनी चालवलेलं मासिकअसलं तरी माझी ती सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरची नोंद बहुधा मागे पडतेय. कारण इथे मी ज्या स्त्रियांच्या संपर्कात आलो त्या विचार करणार्‍या स्त्रिया होत्या. स्त्रियांसाठीच्या म्हणून मासिकामध्ये मिळून सार्‍याजणीउठून दिसतं आणि माझ्यासारख्याला ते आकर्षित करतं कारण एका अर्थी हे स्त्रियांचं मासिक असलं तरी ते पारंपरिक स्त्रीत्वापासून मुक्त झालेलं आहे. 

पण याचबरोबर दुसरीही एक बाजू मांडतो. ही बाजू वरच्या मांडणीला छेद देणारी आहे. स्त्रीवाद, स्त्री लिखित साहित्य, स्त्री प्रश्‍न, स्त्री जाणीव असं म्हटल्याने स्त्री ही स्त्रीचं राहणार आहे असं काहीसं अधोरेखित होतं का? सांगता येत नाही. कदाचित ही विशिष्ट ओळख पूर्ण पुसली जाईल तो काळाचा टप्पा अजून बराच लांब आहे. तो कधी येईल, येईल का हे माहीत नाही. पण इतिहास-वर्तमानाच्या ओझ्यामुळे आज तरी स्त्रीला स्त्रीम्हणून स्वतंत्र ओळख ठेवावी लागतेय. माझ्या विचारांच्या प्रवासात एक टप्पा असा आला की जिथे मला या सततच्या द्वैताचं काहीसं ओझं वाटू लागलं. आपण आता लिंगसापेक्षतेच्या सीमा ओलांडून एका शांत प्रदेशात आलोय (निदान आपल्याला आत्ता तरी असं वाटतंय), मग आता आपण इथेच थांबावं असं वाटू लागलं. याचा अर्थ स्त्रीवाद अप्रासंगिक झालेला नाही. पण आपल्या अंगभूत गुणांमुळे किंवा दुर्गुणांमुळे आपण या कक्षेत फार काळ राहू शकणार नाही असं मला वाटू लागलं. 

आणि अशा वेळी तर मला एका निष्ठेने, पंचवीस वर्षांहून अधिक काळ काम करणार्‍या विद्याताईंसारख्यांचं अधिकच कौतुक वाटतं. वंदना भागवत एकदा बोलताना म्हणाल्या होत्या की परिवर्तनाचा विचार करणारे आपण संस्थात्मक उभारणीकडे फार दुर्लक्ष करतो. तिथे मिळून सार्‍याजणी, नारी समता मंच अशा संस्थांचं महत्त्व कळू लागतं. आज स्त्रीवाद म्हणजे काय? स्त्री प्रश्‍न काय आहेत? यातले गुंते काय आहेत? असे प्रश्‍न पडणार्‍या कुणालाही मी या मासिकाकडे पाठवू शकतो. (कुणास ठाऊक, कदाचित मीदेखील काही दिवसांनी पुन्हा इथेच येईन!)

मिळून सार्‍याजणीचं कार्यालय हे माझ्यासाठी कार्यालय नसून हक्काचं, गप्पा मारायचं ठिकाण आहे. संपादकीय विभागात कधीही गेलो तरी मला अ‍ॅट होमवाटतं. गीतालीताई, विद्याताई दोघींनीही मला, माझ्या बडबडीला सहन केलं आहे. त्यांच्याविषयी कधीतरी स्वतंत्रपणेच लिहायला हवं. मिळून सार्‍याजणीतल्या मानसी घाणेकर यांचा उल्लेख न करता मला पुढे जाणं शक्यच नाही. वयाने थोड्या मोठ्या, पण विचाराने माझ्या जातकुळीच्या मानसीताई म्हणजे मिळून साऱ्याजणीच्या इतिहासातलं एक  प्रकरण आहे. मी कधी व्यक्तीचित्रं रेखाटण्याचा प्रयत्न केला तर त्यात मानसी घाणेकर नक्की असतील! 

सहानुभूतीया शब्दाबाबत पुलंनी एके ठिकाणी चांगलं लिहिलं आहे. ते लिहितात, सहानुभूती या शब्दात कारुण्याचे, दयेचे चार थेंब कुणी आणून टाकले आहेत कुणास ठाऊक? वास्तविक ती सह-अनुभूती आहे. जे तुला जाणवतंय, वाटतंय ते मी जाणून घ्यायचा प्रयत्न करणं, तो अनुभव घ्यायचा प्रयत्न करणं असा त्याचा अर्थ आहे. तुझ्या मनाजवळ यायचा प्रयत्न करणं म्हणजे सहानुभूती. ही सह-अनुभूती मला मिळून सार्‍याजणीनं दिली. स्त्रियांचं हे विश्‍व बघताना मी उदास झालो आहे, हताश झालो आहे, विचारात पडलो आहे, गोंधळातही पडलो आहे. पण या उलथापालथीनंच मला पुष्कळ काही दिलं आहे. मी वर म्हटलं तसा आज मी शांत झालो असेन कदाचित, स्थिर झालो असेन, पण ती दृष्टी येण्याकरताचा माझा व्यायाम इथे घडला आहे. जीवनातल्या कुठल्याही क्षेत्रात मला वैचारिकता फार महत्त्वाची वाटते. पण वैचारिकतेची पूर्वअट संवेदना, सहानुभूती ही असते. ही संवेदना मी सार्‍याजणीत अनुभवली. त्यामुळे माझ्या अंतरातल्या माझ्याच विविध ओळखींपैकी 'साऱ्याजणीच्या टीममधला एक सदस्यही एक ओळख मला समाधान देणारी आहे. या लेखाला 'मिळून साऱ्याजणीतले दिवस' असं शीर्षक जरी मी दिलेलं असलं तरी ते शीर्षक मी प्रत्यक्ष 'साऱ्याजणी'त काम न करण्यापुरतंच मर्यादित आहे. बाकी मी आज जगात वावरणारा 'साऱ्याजणी'तलाच एकजण आहे!               

मिळून साऱ्याजणी (दिवाळी २०१६)  
x