Saturday, April 14, 2018

'आँखों देखी' ची दृष्टी

इंग्लिश भाषेत 'अनलर्निंग' हा एक चांगला शब्द आहे. इंग्लिशमधील 'डिझर्व्ह' ला जसा चपखल मराठी शब्द सापडत नाही तसंच  'अनलर्निंग' बाबतही म्हणता येईल. आपण आजवर जे पाहिलं, अनुभवलं त्यातून आणि औपचारिक शिक्षणातून जे शिकलो ते थोडं बाजूला ठेवून नव्या दृष्टीने, नव्या बाजूने काही शिकणं म्हणजे 'अनलर्निंग'. गेल्या २-३ लेखांमध्ये आपण प्रश्न विचारण्याबद्दल बोलतो आहोत. 'अनलर्निंग' ही प्रश्न विचारण्याला समांतर अशी एक प्रक्रिया आहे. हाच धागा धरून मला या लेखात एका चित्रपटाबाबत काही सांगायचं आहे. 

'सिनेमा' हा एकूणातच माझ्या प्रेमाचा विषय आहे. 'गोष्ट सांगण्याचं' अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कथा, सादरीकरण, अभिनय, संगीत अशा विविध अंगांनी आपल्याला अनेक चित्रपट आवडतात. पण काही चित्रपट असे असतात की ते पुसता येणार नाही असा ठसा उमटवतात. हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेतील अनेक चित्रपटांनी माझ्या बाबतीत हे केलं. लेखनविश्वात जसे कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांसोबतच वैचारिक लेखन हाही एक प्रकार असतो तसाच 'वैचारिक चित्रपट' असा एक प्रकार मला करावासा वाटतो. २०१३ साली रजत कपूर या दिग्दर्शकाचा 'आँखो देखी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट लिहिलाही त्यानेच होता. तुमच्यापैकी काहींनी तो पाहिला असेल. हा चित्रपट काही फारसा चालला नाही. (चांगल्या, काहीतरी वेगळं देणाऱ्या चित्रपटाचं जे होतं तेच याचंही झालं.) रजत कपूरचे 'मिक्स्ड डबल्स', 'मिथ्या' हे चित्रपट अतिशय प्रभावी होते. 'वैचारिक' दृष्ट्या प्रेक्षकाला हलवण्याची क्षमता असलेले जे मोजके दिग्दर्शक आहेत, त्यातला हा एक दिग्दर्शक. त्यामुळे त्याचा हाही चित्रपट वेगळा असणार याची खात्री होती. पण चित्रपट पाहिल्यावर मात्र मी रजत कपूरला दंडवतच घातला. 

दिल्लीच्या एका गजबजलेल्या भागात राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब. अगदी सरळसोट. कुठल्याही इतर चार कुटुंबांसारखं. आपला कथानायक म्हणजे या कुटुंबाचा प्रमुख - पन्नाशीच्या पुढचा एक गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा, धाकटा भाऊ, त्याची बायको आणि मुलगा असं एकत्र कुटुंब. एके दिवशी कुणीतरी वार्ता आणतं की घरातल्या मुलीचं अमुक एका मुलाबरोबर 'प्रकरण' सुरु आहे आणि तो मुलगा काही चांगला नाही. झालं! हे ऐकून आपला कथानायक, त्याचा भाऊ, मेव्हणा, आसपासची दोन टाळकी असे सगळे मिळून त्या मुलाचा समाचार घ्यायला म्हणून निघतात. मात्र त्या मुलाला प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा तो थोड्याश्या दटावणीनंतर रडू लागतो तेव्हा कथानायकाच्या लक्षात येतं की हा तर अगदीच सरळ-साधा मुलगा आहे. आपलंच चुकलं. घरी आल्यावर तो विचारात पडतो. त्याच्या लक्षात येतं की आपण फार चटकन विश्वास ठेवतो कुणावरही. आपल्या डोक्यात लहानपणापासून गोष्टी घुसवल्या जातात, आपल्या आजूबाजूचं जग ओरडून आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं आणि आपण ते निमूटपणे होऊ देतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो घरात जाहीर करतो की आजपासून मी कुठल्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीला पारखून घेईन, प्रश्न विचारेन, स्वतः अनुभव घेईन आणि मगच माझा निर्णय घेईन. नव्या निश्चयाच्या उमेदीने तो घराबाहेर पडतो. पुढे काय होतं हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. पण तरी तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचचा प्रसंग सांगायचा मोह टाळता येत नाही. बाहेर पडल्या पडल्या त्याला त्याच्या गल्लीतले परिचयाचे पुजारी भेटतात. त्याला प्रसाद देतात. हातातला प्रसाद निरखून बघत तो एक क्षण थबकतो, मग प्रसाद खातो आणि म्हणतो 'हा कलाकंद होता. गोड होता. चांगला होता.' त्यावर पुजारी परत 'हा प्रसाद आहे' असं सांगतात. तरी तो  'हा कलाकंद होता. गोड होता', एवढंच म्हणत त्यांना निरोप देतो.

'मला एवढं समजलं' या बिंदूपाशी निग्रहाने थांबायचा त्याचा प्रयत्न त्याला मुक्ततेचा अनुभव देतो. पन्नाशीच्या पुढचा हा गृहस्थ  'अनलर्निंग' चा मार्ग स्वीकारतो आणि त्याचा हा सगळा प्रवास प्रेक्षकांसाठी देखील डोळे उघडणारा ठरतो. एका प्रसंगात तर मी त्याला बसल्या जागेवरून टाळीच दिली. 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते यातलं मला फक्त 'ती खाली पडते' एवढंच समजलं, ती का खाली पडते हे मला माहीत नाही' असं याने म्हटल्यावर एकजण 'ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते' असं अपेक्षित उत्तर देतो. त्यावर हा 'तुझ्याकडे बघून तुला गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय हे कळतं आहे असं वाटत नाही' असं म्हणतो. आता यावर मी खरंच विचार केला, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता, गुरुत्व बल ९.८ मीटर्स / सेकंदाचा वर्ग इतकं असतं हे आपणही शिकलोय. पण हे सगळं 'मला' नक्की कितपत कळतंय ? 'गुरुत्वाकर्षण' म्हणजे काय हे मी विस्तृतपणे, सप्रमाण दाखवून देऊ शकतो का? तर नाही. 

'आँखों देखी'च्या नायकाची 'एन्क्वायरी'ची जी पद्धत आहे ती आपल्याला बरंच काही देऊन जाते. या चित्रपटाने माझ्यावर फार परिणाम केला. माहिती, ज्ञान आणि पुढे 'माझी मनोभूमिका' या साखळी प्रक्रियेमध्ये आपण शांत, निगर्वी, 'विद्यार्थी' भूमिकेमध्ये असायला हवं हे समजणं मला 'आतमध्ये' शांत करून गेलं. बरं, चित्रपटात त्याचा दृष्टीकोन सतत, संपूर्णपणे संशयवादी असाही नाही. काही बाबतीत स्वतःला अनुभव नसला, माहीत नसलं तरी दुसऱ्याला झालेलं ज्ञानही मी स्वीकारलं पाहिजे याला त्याची तयारी आहे. पण मी आधी लिहिलं तसं हे सगळं प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे. 

या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य हे की तो अगदी साध्या माणसातल्या वैचारिक परिवर्तनाची गोष्ट सांगतो. आणि त्यात कसलाही अभिनिवेश नाही. चित्रपटाला कथानायकाच्या मुलीच्या लग्नाची पार्श्वभूमी आहे, कथानायक आणि त्याच्या भावामधल्या संघर्षाची डूब आहे, मध्यमवर्गीय जगण्याचे अनेक संदर्भ आहेत. चित्रपट बघताना ही गोष्ट आपल्या शेजारच्या घरात घडते आहे असं वाटत राहतं. कथानायकाच्या वैचारिक उलाघालीच्या पार्श्वभूमीवर इतर सगळी माणसं, त्याच्या स्वतःच्या मानवी मर्यादा हे सगळं आपलं वाटतं. मागच्या लेखात मी म्हटलं होतं तसं संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. 'आँखों देखी' चा नायक नेमकं हेच करतो.     
आकलनासाठी आवश्यक अशा 'एन्क्वायरी'च्या पहिल्या पायरीवर या नायकासारखा पुरेसा काळ न घालवल्यानं पुढच्या पायऱ्यांवर अडचणी येतात. कारण सुरूवातच चुकलेली असते. विशेष म्हणजे 'मला एवढं माहीत आहे, पुढचं माहीत नाही' ही भूमिका, ही जाणीव परंपरा असो की नवता - दोन्ही ठिकाणी लागू होते. म्हणजे असं की परंपरेचं पालन करताना 'हे परंपरेचं पालन आहे' इथेच थांबून परंपरा पालनाच्या पुष्ट्यर्थ तोकडे दावे केले गेले नाहीत तरी पुष्कळ होईल. आणि नवतेच्या बाबतीत 'हा प्रयोग आहे. याच्या परिणामांसाठी तयार राहूया' असा मोकळेपणा असेल तर ते हितकारक ठरेल.          

आज टीव्हीच्या आणि समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे अनावश्यक माहितीची, अर्धवट ज्ञानाची आणि असत्याची भीतीदायक घुसळण होते आहे. त्यातून माणसांची मनंही अस्थिर होत आहेत, आपल्यापर्यंत आलेले माहितीचे तुकडे कसलीही शहानिशा न करता खरे मानले जातायत. अशा वेळी 'आँखों देखी'च्या दृष्टीचं महत्त्व पटल्यावाचून राहत नाही. आज आपल्याकडे जी सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती दिसते आहे त्यात तर ही दृष्टी औषधाचं काम करू शकेल!

No comments:

Post a Comment