Tuesday, November 5, 2019

गांधीविचार : अध्याय २०१९

गांधींच्या बाबतीत सजगपणे, जाणतेपणानं विचार करायला मी कधी सुरुवात केली हे मला सांगता यायचं नाही. गांधी, नेहरु, जेपी आणि विनोबा हे सगळेजण लहानपणापासून पुस्तकं, चर्चा आणि प्रभाव या स्वरुपात घरामध्ये वास्तव्य करत होते. माझ्या वडिलांची ‘सर्वोदयी’ विचारदृष्टी जगण्याची मूल्यात्मक बाजू सतत स्पष्टपणे दाखवत होती.  व्यावहारिक पातळीवर जगण्याचे अनेक संघर्ष होतेच आणि त्यावेळी ‘या मूल्यांचं नक्की काय करायचं ?’ हा प्रश्‍न पडला नाही असंही नाही, पण या सर्व मंडळींनी जे भरणपोषण केलं त्याचे परिणाम पुढे अनेकदा प्रत्ययास आले.

गांधी हे एक विचारात पाडणारं, कधी कधी गोंधळात पाडणारं रसायन आहे यात शंकाच नाही. गांधींविषयी नव्याने काही लिहायची गरज आहे का असं एकीकडे वाटत असताना दुसर्‍या बाजूने गांधीविचारांच आकलन करुन घ्यायची उत्सुकता असणारी नवीन पिढीही तयार होताना दिसते. गांधी हा समकालीन सामाजिक, राजकीय विचारातला एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि गांधीविचार हा मानवी परस्पर संबंध, मानवी आकांक्षा, मानवनिर्मित अनेक व्यवस्था यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये कमी-अधिक प्रमाणात योगदान देत असतो. हे वारंवार दिसून येतं. आपण गेल्या दोन शतकांकडे नजर टाकली तर ‘व्यवस्था-विचार’ म्हणून उदयास आलेल्या मार्क्सवादानंतर गांधीविचार हा आणखी एक ‘व्यवस्था-विचार’ होता असं स्पष्टपणे दिसतं. भारतीय सामाजिक अभिसरणाची सुरुवात, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, र.धों.कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतरही अनेक अभ्यासक विचारवंत-कार्यकर्त्यांच्या योगदानातून होते. भारतीय समाज प्रवाहाला वळण देण्यात या सगळ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींच्या बाबतीत जो अधिकचा फरक पडला तो त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या रचनात्मक कार्याच्या दिशेमुळे. खरं पाहता निव्वळ वैचारिक, आधुनिकता केंद्री, क्रांतदर्शी दृष्टीने तुलना केली तर आंबेडकरांचं जातिबद्ध भारतीय समाजाचं आकलन आणि या समाजाच्या रचनेमध्ये मुळातून काही बदल करण्यासाठीची वैचारिक दिशा ही गांधींपेक्षा अधिक’ मूलगामी आहे असं म्हणता येईल. र.धों.कर्व्यांचे स्त्री-पुरुष संबंधाबाबतचे, संतती नियमनाबाबतचे विचार पाहता या विशिष्ट मुद्यावर ते गांधींपेक्षा अधिक पुढे होते असंही दिसू शकेल. त्यमुळे प्रागतिकतेच्या विविध निकषांवर गांधी मागे पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असं असताना गांधी विचार ‘शिळा’ होत नाही, समाजिक संबंधांमध्ये,राजकीय ’ जाणिवेच्या व आनुषंगिक भूमिकेच्या बाबतीत तो सतत अस्तित्व टिकवून ठेवतो याचं कारण काय असावं?

मला याचं कारण हे दिसतं की गांधीविचार हा ‘आतून बाहेर’ असा प्रवास करणारा विचार आहे. गांधींची एकादश व्रते आणि त्यांच्या मांडणीतला नैतिकतेचा, साधनशुचितेचा आग्रह, त्यांचं एकूण तत्त्वज्ञान माणसाला एका उन्नत पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणारं आहे. त्यात मग अर्थातच अवघड आदर्श आहेत. आपण ज्याला सहजपणे ‘अव्यवहार्य’ म्हणू अशा गोष्टी आहेत. रसहीन-एकसुरी वाटेल अशी जीवनशैली आहे. व्यवस्था-विचार करायचा तर मानव-विचारापासून सुरुवात करायला हवी हे मार्क्सही म्हणतो; पण आधुनिकता, सहज प्रेरणांना न्याय, उद्यमशीलता, सृजनशीलता या व इतर पैलूंना कवेत घ्यायचं स्वातंत्र्य असणार्‍या माणसाची ‘नैतिक बैठक’ काय असावी हा गांधीविचाराचा गाभा आहे. या नैतिक भूमिकेविषयी मत-मतांतरं असू शकतात. कारण गांधीविचार हा प्रामुख्याने 'माणूस कसा असतो?' यापेक्षा 'माणसाने कसं असायला हवं?' याचा विचार करतो. त्यामुळे तो रूढार्थाने 'व्यवहार्य' होत नाही आणि मतभेद उत्पन्न होतात. शिवाय गांधीविचारांचं सुलभीकरण, अपप्रचार, चुकीचे अर्थ लावणं यामुळेही गांधींबद्दल भरपूर गैरसमज होतात.  

माणसाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्याच्या आदिम काळातील जगण्याच्या लढाईपासून ते आजच्या अत्याधुनिक जगण्यापर्यंत त्याने ‘विचारधारा’ जन्माला घातल्या आहेत. दुसर्‍या बाजूला त्याचं आजचं दैनंदिन जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की ‘विचारधारा’ बरहुकूम वागत येईलच असं नाही. माणसाला क्षणोक्षणी कसले ना कसले निर्णय घ्यावे लागतात. तिथे विचारधारेबरोबरच, किंबहुना त्याहूनही थोड्या जास्त प्रमाणात, त्याच्या मूलभूत प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. गांधींचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मूलभूत प्रेरणांच्या - 'ह्यूमन इंस्टिंक्ट’च्या जागी ‘इन्हेस्टिगेशन’ला आणून बसवायचा प्रयत्न केला. समग्र गांधीविचाराची व्यापकता, त्याविषयीची मत-मतांतरे, त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यावर पुष्कळ चर्चा होत असते. होत राहीलही. तो एक अभ्यास विषय आहेच. पण समकालीन संदर्भात गांधींची प्रस्तुतता यावर ‘मला’ - म्हणजे नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या आणि पुढे आर्थिक उदारीकरण, इंटरनेट, मोबाईल, गूगल अन् फेसबुक, यू ट्यूब आणि नेटफिक्स, जनलोकपाल आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन आणि देशभरात सुरु असलेली इतर जनआंदोलनं, टीव्हीची मनोरंजन आणि पत्रकारिता या दोन्ही अंगांनी झालेली संपूर्ण अवनती, उजव्या आणि डाव्या विचारातला तीव्र झालेला संघर्ष, बहुसंख्याकवादाला चढलेली धार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, 'सत्योत्तर' काळाचे प्रश्न या आणि आनुषंगिक उलथापालथीचा साक्षीदार असलेल्या एका भारतीयाला - काय वाटतं हे अधिक आत्मीयतेने सांगावसं वाटतं.

फेसबुक हे राजकीय - सामाजिक विचारांचं रणांगण बनलं आहे हे या माध्यमाशी परिचित असलेल्या बहुतेकांना माहीत आहे. याच मैदानात मीही माझं म्हणणं अनेक वर्ष मांडत आलो आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका लिहू लागलो. वर उल्लेख केलेल्या ‘अस्वस्थ वर्तमाना’त जगणारा एक तरुण आणि गांधीजी यांच्यात ‘आज’ घडणारा संवाद असं या मालिकेचं स्वरुप आहे. यातले गांधीजी हे ‘महात्मा गांधी’ असले तरी ‘मी’च्या मित्राच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संवाद मित्रांमधल्या संवादासारखा आहे. मला हे लिहावसं वाटलं, गांधीजींना ‘बोलवावसं’ वाटलं याच्यातच गांधीविचार आज मार्गदर्शक ठरु शकतो हा विश्‍वास दिसून येतो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करुन घेऊ. ‘गांधीविचार’ म्हटलं की त्यात अनेकविध गोष्टी येऊ शकतात. मला गांधीविचारातला वर उल्लेख केलेला ‘इन्व्हेस्टिगेशन’चा भाग आकर्षित करतो. त्याचा मी संवादमालिकेमध्ये उपयोग केलेला आहे. आता एक गोष्ट खरी की माझा व्यक्तिगत वैचारिक कल (जो गांधीवाद - नेहरूवाद - मार्क्सवाद - स्त्रीवाद - उदारमतवाद यांच्या एका मिश्रणातून तयार झाला आहे) या संवादांमध्ये अधूनमधून प्रतिबिंबित होतो. पण माझा प्रयत्न ‘इन्व्हेस्टिगेशन’चा, विचार तपासून बघण्याचा असतो. स्वतःला तपासून बघणं, स्वतःमध्ये सुधारणेच्या जागा कुठे आहेत त्या शोधणं हा २०१९ मधल्या ‘मला’ आणि १९४० मधल्या गांधींना जोडणारा दुवा ठरतो.

मी मागे लेख/चर्चांमधून अनेक वेळा उल्लेख केलेला मुद्दा इथे पुन्हा लिहितो, कारण तो आवश्यक आहे असं मला वाटतं. वैचारिक कल, व्यक्तिगत घडण, व्यक्तिगत अनुभव हे सगळं एका बाजूला ठेवलं तरी दुसर्‍या बाजूला एक मानवीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा विचार आहे आणि त्याचा आपल्याला आज विसर पडलाय की काय अशी शंका येते. हा विचार खरं तर अजिबात गुंतागुंतीचा नाही. साधा सरळ आहे. तो अगदी आपल्या आईबाबांनी घरी शिकवलेला असेल इतका साधा आहे. ‘माझं चुकू शकतं’ हा तो विचार. मला असं दिसतं की कमालीचं राजकीय ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात ‘आपलं काहीतरी चुकत असेल’ एवढी शक्यता जरी आपण आपल्या मनाशी बोललो तरी ती एक मोठी सुरुवात ठरेल!

आपल्याला आज असं वाटत नाही कारण आपलं टोकाचं ‘पक्षीय राजकीयीकरण’ झालं आहे. राजकीय भूमिका असण्याबद्दल आक्षेप नाहीच, पण ‘राजकीय हिंसकता’ असण्याबद्दल नक्की आक्षेप आहे. कारण त्याचं पर्यवसन समाजस्वास्थ बिघडण्यात, परस्पर सौहार्द बिघडण्यात होतं. आपण आज या ‘राजकीय हिंसकते’च्या प्रभावाखाली आलो आहोत. माणसातली आदिम ‘टोळी जाणीव’ तीव्र होत आहे आणि आधुनिक उपकरणांनी, तंत्रज्ञानाच्या चमत्कारांनी वेढलेले आपण मनातून मात्र आदिम जाणिवांचे गुलाम होत आहोत. आपण वैचारिकदृष्ट्या इतके ‘स्थितीशील’ कसे झालो ? हिंसक राजकारणाने आपल्यातला स्वतंत्रपणे विचार करु शकणारा, कुठल्याही संघटनेचं - पक्षाचं - नेत्याचं जोखड नाकारणारा लोकशाहीवादी सजग नागरिक कसा काय संपवला? यावर एक प्रतिवाद असा आहे की, मुळातच आपण स्वतंत्र विचार वगैरे करणारे, समता-स्वातंत्र्य-वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे नव्हतोच. आपण परंपराप्रिय आहोत. आपल्याला अधिकारांची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड मनातूनच आवडते. आज फक्त ते कमकुवत आवरण गळून पडलंय आणि आपल्यातला मूळ ‘विघटित भारतीय’, ‘एकारलेला भारतीय’ समोर आला आहे. आज जर आपण सार्वजनिक चर्चाविश्वाकडे नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. आपली 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' कमालीची कमी झाली आहे / आहे. 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून मेंदूमध्ये बदल होण्याची क्षमता. या क्षमतेमुळे न्यूरॉन्स नवीन परिस्थतीला, एखाद्या बदलाला, नव्या माहितीला प्रतिसाद देऊ शकतात. आपल्या मेंदूचा हा एक भौतिक गुणधर्म आहे आहे. अ‍ॅडल्ट ब्रेनपेक्षा डेव्हलपिंग ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असते. साध्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असणं म्हणजे सवयीच्या नसलेल्या परिस्थितीला, विचाराला लवकर 'अ‍ॅडजस्ट' होणं. त्या विचाराप्रती लगेच आक्रमक न होता तो तपासायचा प्रयत्न करणं. एक उदाहरण घेऊ. दोन माणसांना प्रत्येकी एक केळं दिलं. ते दिसायला केळ्यासारखंच आहे, पण चव कारल्यासारखी आहे. दोघांनाही खाल्ल्यावर विचित्र वाटेल, आवडणार नाही. कारण 'केळं खायचं आहे' या विचारातच 'विशिष्ट चवीचं फळ खायचं आहे' हा विचार अनुस्यूत असतो. त्यामुळे दोघेही भांबावतील. परंतु कारल्याच्या चवीचं  केळं असू शकतं या वस्तुस्थितीचा स्वीकार जो मनुष्य तुलनेने सहजगत्या, लवकर करेल त्याची न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त आहे असं म्हणता येईल. आता ही परीक्षा अनेक गोष्टींबाबत घेता येऊ शकते. आजच्या 'वैचारिकदृष्ट्या विस्कटलेल्या' काळात आपण अस्मिता, राजकीय पक्ष, विचारसरणी, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओझी वागवत जगतो आहोत. अशा वेळी आपण जेव्हा विरोधी मताविषयी सहिष्णु असलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याचा 'भौतिक अर्थ' न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवणं हा असतो. माणसं एकच बाजू का घेतात, समोर दिसत असूनदेखील सत्य का नाकारतात किंवा सत्याकडे काणाडोळा का करतात याचं उत्तर न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलेलं आहे. ती त्याला एकतर्फी, एका बाजूला झुकण्याचा गुण बहाल करते.  

भारतीय मनोवृत्तीच्या संदर्भात हे विश्लेषण बऱ्याच अंशी खरं आहे असं मला वाटतं. पण यावर करायचं काय ? तर हा सगळा गुंता सोडवायला गांधीमार्गाचा उपयोग होतोय का पहायचं. मी माझ्यापुरता एक प्रयत्न या संवादमालिकेतून (आणि फेसबुकवरील इतरही लेखनातून) केला आणि मला हे खरचं दिसून आलं की आपली समाजिक - राजकीय भूमिका कुठलीही असली तरी आपण अंतःकरणातून, प्रामाणिकपणे स्व-चिकित्सेला तयार असलो, वैचारिक विरोध कायम ठेवला तरी ‘माणूस’ म्हणून एकमेकांशी जोडून घ्यायच्या जागा आपण सुरक्षित राखल्या तर सहअस्तित्व शांततामय होऊ शकतं. फेसबुकवर हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींशी माझी बरेचदा चर्चा झाली आहे. मी माझ्या लिखाणातून कट्टर हिंदुत्ववादाबाबतची नाराजी उघडपणे मांडली आहे. त्याचबरोबर उदारमतवाद्यांच्या दृष्टीकोनातील खटकणाऱ्या गोष्टींबाबतही मी लिहिलं आहे. या चर्चांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की 'माणूस' म्हणून आपण विरोधी विचाराच्या माणसाच्या मनात प्रेमभाव निर्माण करू शकलो तर संवाद सुकर होऊ शकतो. (याबाबत तपशीलात लिहिता येईल, पण त्याबाबत स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणं इष्ट होईल. कारण त्यात हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद यांच्या वैचारिक भूमिकेतील फरक, मूल्यात्मक फरक, अभिव्यक्तीची पद्धत अशा विविध मुद्द्यांवर बोलावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की एखाद्या विचारधारेला एखाद्या नावाने संबोधणं ही खरं तर एक व्यावहारिक तडजोड असते. त्यातून त्या विचारधारेचा साधारण कल लक्षात येतो इतकंच. प्रत्यक्षात दोन भिन्न विचारधारांमध्ये काही साम्यस्थळंही असू शकतात.) आपण एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा विकसित (आपल्या विकासाच्या कल्पनेनुसार!) असला तरी तो अंतिमतः मनुष्य‘प्राण्या’चा मेंदू आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपले सर्व ‘इन्स्टिक्ट्स' एकविसाव्या शतकातही नीट शाबूत आहेत. प्रत्यक्ष हिंसा कमी झाली असली तरी मेंदूतली ‘हिंसकतेची केंद्रं’ बंद पडलेली नाहीत. (इथे मला असंही म्हणावसं वाटतं की त्यामुळे गडबडून जायचं कारण नाही. आपण सगळे ‘उत्क्रांतीची उत्पादनं’ आहोत. ‘भीती’ या आदिम भावनेपासून असूया, दुःख, एकटेपण, निराशा, आनंद अशा भावनांच्या कोलाहलापर्यंत आपल्या मनात भावनांचा जो भलामोठा पैस (आणि पेच!) तयार झाला आहे त्यामागचा उत्क्रांतीजन्य हेतू ‘टिकून राहणे’ हा आहे. एका टोळीत सामील होऊन राहणं, एक बाजू घेणं, राजकीयीकरण होणं हादेखील याच प्रक्रियेचा भाग आहे. पण आपलं वैशिष्ट्य हे की आपल्याला हे सगळं समजू शकतं. माणूस हा ‘जाणिवेची जाणीव’ असणारा प्राणी आहे आणि ते त्याचं बलस्थान आहे.) त्यामुळे गांधी जे सांगतात ते सहजपणे जमणारं नाही. 

गांधींचा माणसाला उन्नत करण्याचा जो प्रयत्न होता त्याचं बीज ‘जाणिवेची जाणीव’ करुन देण्यात आहे. मानवसमूह जर नैतिकदृष्ट्या समर्थ झाला, सामूहिक निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता जर विकसित झाली तर ‘हे राजकारण’ आणि ‘हे जीवन’ असं द्वैत नष्ट होईल का? गांधींनी आणि त्यांच्या नंतर विनोबांनी विकेंद्रित राज्यव्यवस्थेबाबत जो विचार केला आहे तो भारतासारख्या देशासाठी पथदर्शक आहे. तो यशस्वी न होण्यामागची मुख्य अडचण सामूहिक इच्छाशक्ती आणि कृतीसामर्थ्याचा अभाव ही आहे. त्याच्या जोडीला बदलत्या काळाची आव्हानेदेखील आहेत. पण स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असण्याच्या मूलभूत विचाराचं महत्त्व त्यामुळे उणावत नाही.

गांधी आज ‘रिलेव्हंट’ आहेत का हा प्रश्‍न, हा विषय आता खरं तर जुनाच झालाय जरा. हा प्रश्‍न सारखा सारखा विचारावासा वाटतो, गांधी सारखा ‘आडवा येतो’ याचं कारणच हे आहे की, गांधी अगदी मूलभूत, अगदी आवश्यक आणि खरं तर अगदी सोपं असं काही सांगत होते. सर्वांना जर शांततेने एकत्र राहायचं असेल तर काय करायला लागेल याचा मंत्र त्यांनी दिला होता. गांधींची आठवण होत राहते कारण आपल्याला अद्याप शांततेनं एकत्र राहणं जमलेलं नाही हे आहे!  शांततामय सहअस्तित्वाचा गांधीविचार जेव्हा जगण्याचा भाग होईल तेव्हा तो वेगळा असा काही उरणार नाही. त्याची 'आठवण काढावी' लागणार नाही. मला कधीकधी असं वाटतं की गांधींना रिटायर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधीविचार आत्मसात करणं!  गांधींना खोटा नमस्कार करणाऱ्यांनी, गांधी ज्यांना सतत सलतात त्यांनी, २०१९ साली गांधींच्या प्रतिकृतीला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं!

(तरूण भारत, दीपोत्सव २०१९)

No comments:

Post a Comment