माणूस नावाचा ‘प्राणी’ नक्की कसा आहे, त्याच्या वर्तनाचा, विचारांचा अर्थ कसा लावायचा हे कायमच बुचकळ्यात टाकणारे प्रश्न राहिलेले आहेत. आपण मनुष्य म्हणून विकसित झाल्यानंतर, संस्कृतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आपण सर्व माणसांकडून एका विशिष्ट, समान वर्तनाची अपेक्षा करतो. आणि जेव्हा ती अपेक्षा पूर्ण होत नाही तेव्हा आपण अस्वस्थ होतो. समाजाचा गाडा सुरळीत सुरू राहावा या दृष्टीने आणि आपण ज्या मानवी मूल्यांना स्वीकारलं आहे त्यांची जपणूक करण्याच्या दृष्टीने ही अपेक्षा रास्त आहे. पण सामाजिक स्थैर्याच्या, संस्कृतीकरणाच्या ओघात मनुष्याने ‘प्रेडिक्टेबल’ असण्याची आपल्याला सवय होते. आपण वर्तनातील सातत्य गृहीत धरू लागतो. आणि मग जेव्हा माणसाचं विचित्र, गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन समोर येतं तेव्हा आपल्याला धक्का बसतो.
माणसाच्या विचित्र वर्तनाची आपली अगदीच तयारी नसते असं नाही. माणसांना एकमेकांचा राग येणं, त्यांच्यात भांडणं-मारामाऱ्या होणं, त्यांच्यातले संबंध बिघडणं हे आपण समजून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला ते मान्य होईलच असं नाही; पण माणसं अशी वागू शकतात हे आपल्याला तत्त्वतः मान्य असतं. आपल्याला स्वतःलाही अनेकदा कुणाचा तरी अतिशय राग आलेला असतो, एखादा माणूस डोळ्यासमोर नको असं वाटत असतं, त्याच्याबद्दल क्वचित काही हिंसक विचारही मनात चमकून गेलेला असतो. पण आपल्याला ज्याचा मोठा धक्का बसतो, दहशत बसते ती गोष्ट म्हणजे हत्या. एखाद्या चालत्या-फिरत्या, जिवंत माणसाला कुणीतरी मारून टाकू शकतं हे वास्तव स्वीकारणं आपल्यासाठी विशेष अवघड असतं. आपल्या आजूबाजूला अलीकडील काळात जे सातत्याने घडतं आहे ते असंच धक्कादायक, चक्रावून टाकणारं आहे. यात स्त्रियांवरील, अल्पवयीन मुलींवरील - अगदी बालिकांवरील अत्याचारांच्या घटना तर आहेतच; पण किरकोळ कारणामुळे खून झाल्याच्या घटनाही आहेत. मुंबई लोकलमध्ये क्षुल्लक कारणामुळे वादावादी होऊन बावीस वर्षांच्या मयंक लोहारची झालेली हत्या, लोहगडावरून खाली ढकलून दिल्याने सव्वीस वर्षांच्या केतन अग्रवालचा झालेला मृत्यू, ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाला कॅब ड्रायव्हरने केलेली मारहाण या काही ताज्या घटना. महाराष्ट्रात या घटनांची चर्चा सुरू असताना एक घटना बंगलोरमध्येही घडली आहे. सोमसुंदर (वय ५२) आणि मुथुलक्ष्मी (वय ४८) हे दांपत्य आणि सुप्रिया ही त्यांची १९ वर्षांची मुलगी या तिघांची हत्या या दांपत्याच्या दुसऱ्या मुलीने (श्वेता, वय २४) तिच्या लिव्ह-इन पार्टनरच्या (केनेथ) मदतीने केल्याचा आरोप आहे. श्वेताला अटक झाली आहे. पुण्यातील येरवडा भागात राहणाऱ्या एका मनुष्याने ‘जेवणात मिर्चीचा खर्डा न दिल्याने पत्नीवर वार करून तिला जखमी केलं’ अशी बातमी ऑक्टोबर २०२४ मध्ये आली होती. त्याच सुमारास नऱ्हे भागात एका रात्री मद्यालयात जेवण करण्यासाठी गेलेल्या तरूणाने मित्राच्या ताटात हात घातल्याने वाद झाला आणि त्या तरूणाला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला अशीही बातमी होती. हडपसर भागात शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या व्यक्तीची ‘मोबाइल हॉटस्पॉट’ न दिल्यामुळे कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. (सप्टेंबर २०२४).
इथे एक-दोन मुद्दे लक्षात घ्यावेत असं वाटतं. एक म्हणजे बऱ्याच प्रकरणांमध्ये सत्याचा उलगडा होण्याची प्रक्रिया दीर्घ काळ सुरू असते. त्यामुळे आपल्यासमोर जे येतं आहे ते बारकाईने वाचावं/पाहावं. पण निष्कर्ष काढण्याची घाई करू नये. दुसरं म्हणजे काही घटनांची चर्चा जास्त होते तर काहींची होत नाही, काही बातम्या आपल्यापर्यंत पोचतही नाहीत हे लक्षात घ्यावं. ‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो’तर्फे (एनसीआरबी) ‘क्राइम इन इंडिया’ हा अहवाल दरवर्षी प्रसिद्ध केला जातो. १९५३ ते २०२४ चे अहवाल त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या अहवालातील ‘मर्डर’ विभागात देशभरात कोणकोणत्या कारणांमुळे किती हत्या झाल्या याची यादी दिलेली असते. २०२४ चा अहवाल पाहिला तर यात व्यक्तिगत वैर, हुंडाबळी, जातीय-धार्मिक तेढ, ऑनर किलिंग, दरोड्याच्या वेळी झालेल्या हत्या, प्रेमसंबंधातून तसेच विवाहबाह्य संबंधांतून झालेल्या हत्या, टोळीयुद्ध, मालमत्तेचे वाद, कौटुंबिक वाद अशी बरीच कारण दिसतात. यातलं एक कारण ‘किरकोळ वाद’ हेही आहे. २०२४ ची महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर किरकोळ वादातून ३५४ हत्या झालेल्या आहेत. तमिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे (४३१). महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. १९५३ पासून गुन्हेगारीचा आलेख कसा राहिला आहे याबाबतचे अभ्यासही उपलब्ध आहेत. १९५३ साली नोंदणी झालेल्या हत्यांची संख्या १०,००० होती. १९९१ साली ती ३९,००० होती. नव्वदच्या दशकापासून मात्र हा आकडा कमी झालेला दिसतो. २०२३ मध्ये २७,०५६ हत्या तर २०२४ मध्ये २६,३८३ हत्या नोंदल्या गेल्या आहेत. (हे फक्त नोंदणी झालेले गुन्हे आहेत, नोंदणी न झालेले गुन्हे असतातच. आणि कुठलीही आकडेवारी ही अखेरीस एखाद्या विषयाची साधारण निदर्शक असते. प्रत्यक्षात त्यात कमी-जास्त असण्याची शक्यता असते हे लक्षात असलेलं बरं).
गुन्ह्यांची माहिती उपलब्ध असणं हा विश्लेषणाकरता उपयुक्त असा एक महत्त्वाचा भाग. पण समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि सर्वसामान्य नागिरकांच्याही आस्थेचा प्रश्न अर्थातच हा की हे का होतं? माणूस असं का वागतो? एमिल दुरखिम या प्रख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञाने ‘सामाजिक स्वास्थ्य’ मोजण्यासाठी त्या समाजात किती आत्महत्या होतात हा आकडा ‘सोशल बॅरोमीटर’सारखा वापरला होता. त्याच धर्तीवर ‘खून’ ही घटनादेखील सामाजिक स्वास्थ्याच्या मोजमापासाठी वापरता येऊ शकते असं काही समाजशास्त्रज्ञ म्हणतात. रॉबर्ट मेर्टोन या अमेरिकन समाजशास्त्रज्ञाने म्हटलं आहे की एखाद्या समाजाने आपल्या लोकांपुढे ठेवलेली उद्दिष्टे (उदा. पैसा, प्रतिष्ठा इ.) आणि ही उद्दिष्टं साध्य करण्याचे ‘वैध’ मार्ग यांच्यात जेव्हा विसंवाद तयार होतो तेव्हा खून आणि इतर गुन्ह्यांमध्ये वाढ होते. हा कार्यकारणभाव महत्त्वाचा आहे कारण यातून माणूस हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याकडे वाटचाल कशी करू शकतो याचा एक खुलासा होतो. काही माणसांची वृत्तीच हिंसक असते, त्यांना राग अनावर होतो कारण तो त्यांच्या मेंदूतलाच एक दोष आहे असंही म्हणता येईल. पण एखाद्या मनुष्याची विशिष्ट वृत्ती जशी आहे तशी ती असण्याची संपूर्ण जबाबदारी त्याची एकट्याची आहे की त्यात त्या मनुष्याच्या विशिष्ट पर्यावरणाचा, विविध व्यवस्थांचा, त्या व्यवस्थांच्या ऐतिहासिक वाटचालीचाही वाटा आहे हा प्रश्नही इथे महत्त्वाचा ठरतो. बहुतांश हत्या या मानसिक स्थैर्य गमावल्याने, विवेकाचा विसर पडल्याने, मनात उसळून आलेल्या विकारांच्या अंमलाखाली होतात त्यामुळे व्यवस्थेवर जबाबदारी टाकून माणसाला मोकळं होता येणार नाही असा प्रतिवाद इथे होऊ शकेल. इथे ‘बायनरी’ स्वरूपाच्या वादात न अडकता समग्रतेने विचार करणं, सामान्यीकरण न करता त्या त्या प्रकरणानुसार निष्कर्ष काढणं योग्य होईल. १९७२ साली अमेरिकेच्या ‘फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) ‘बिहेवियरल सायन्स युनिट’ (वर्तनशास्त्र विभाग) स्थापन केलं होतं. सत्तरच्या दशकात लैंगिक अत्याचार आणि हत्या यांचं अमेरिकेतील वाढतं प्रमाण लक्षात घेऊन अमानुष स्वरूपाचे हिंसक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा अभ्यास करण्यासाठी हा विभाग स्थापन झाला होता. (या विभागाने हाताळलेल्या केसेसवर आधारित ‘माइंडहंटर’ ही वेब सीरिज पाहण्यासारखी आहे). आज हा विभाग ‘बिहेवियरल रीसर्च अँड इंस्ट्रक्शन युनिट’ या नावाने कार्यरत आहे. भारतात असा विशेष विभाग स्थापन झालेला नसला तरी संस्थात्मक पातळीवरून गुन्हेगारांचं मानसशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न होत असतो. खून, बलात्कार यासारख्या घटनांमुळे उद्रेक निर्माण होणं स्वाभाविक आहे; पण गुन्हेगारांचं मानसशास्त्र समजून घेण्याची निकड त्याहून जास्त आहे. कारण त्याशिवाय आपण उत्तरांकडे जाऊ शकणार नाही. आणि लोकांनाही हे कळावं यासाठी हा मुद्दा सार्वजनिक चर्चविश्वात येणं गरजेचं आहे.
याखेरीज फ्रेडरिक एंगल्सने काही हत्यांना ‘सामाजिक हत्या’ म्हटलं आहे. समाजात जेव्हा व्यवस्थात्मक पातळीवरच काही समूहांना वंचित ठेवलं जातं, त्यांचं जीवनमान कधीच सुधारत नाही, त्यांना आरोग्य समस्या किंवा अन्य आपत्तींचा सामना करावा लागतो आणि त्यातून जे मृत्यू होतात त्या समाजाने केलेल्या हत्या असतात असं एंगल्स म्हणतो. हत्येची प्रचलित व्याख्या विस्तारणारं हे एक महत्त्वाचं निरीक्षण आहे.
२०२६ च्या संदर्भाने आपण खुनासारख्या गुन्ह्यांकडे बघतो तेव्हा या काळाचे विशिष्ट पैलूही लक्षात घ्यायला हवेत. त्यातला एक म्हणजे तरूणांचा वाढता सहभाग. ‘एनसीआरबी’च्या आकडेवारीनुसार, हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या मुलांचं प्रमाण २०१६ मध्ये ३२.५% होतं ते २०२२ मध्ये ४९.५% पर्यंत वाढलं आहे. लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांमध्येही काही आरोपी वयाने लहान आहेत. मला असं दिसतं की आपण आज ज्या परिवर्तनाचा सामना करत आहोत त्यात ‘मूल्यपरिवर्तन’ हा फार कळीचा मुद्दा झाला आहे. आणि तरूण मुलं या मूल्यपरिवर्तनामुळे प्रभावित होत आहेत. यात केवळ आधीची पिढी-आत्ताची पिढी असा नेहमीचा युक्तिवाद करण्याचा उद्देश नाही तर काळ जसजसा पुढे जातो आहे तसतसं नवीन पिढीचं मानस वेगळ्या प्रकारे, आपल्याला न कळणाऱ्या प्रकारे घडतं आहे, त्यांची मूल्यव्यवस्था सामाजिक आदर्शांचा अभाव असलेल्या वर्तमानात आकार घेते आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. वर उल्लेख केला ती ‘समाजाने समोर ठेवलेली उद्दिष्टे’ आज पूर्णपणे भौतिक समृद्धीशी जोडलेली आहेत. समाजातील धुरीण वर्ग, सत्ताधारी-राजकारणी वर्ग मूल्यात्मक बैठक असलेली भाषा बोलताना, आत्मपरीक्षण करताना, चिकित्सक विचार करताना, चिकित्सक विचारपद्धतीचे महत्त्व सांगताना, ‘विकासा’इतकीच ‘संकल्पनां’वर चर्चा करताना दिसत नाही. शिक्षण, नोकरी-व्यवसाय यात स्पर्धा होतीच. आता त्याची धार अमानुष म्हणावी अशी वाढली आहे. त्याचा ताण फार मोठा आहे. समाजमाध्यमं आणि मोबाइल यांच्यामुळे जो परिणाम होतो आहे त्याची आज सतत चर्चा होते आहे ही चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटतं की या गोष्टींनी आपल्या ‘मनाच्या मुळा’पाशी जे घाव घातले आहेत त्याचं गांभीर्य बहुधा अजून आपल्या लक्षात आलेलं नाही. जीवशास्त्रात ‘म्युटेशन’ (सजीवांच्या डीएनए सीक्वेन्समध्ये होणारा बदल) अशी संज्ञा आहे. सतत कोसळणाऱ्य डिजिटल प्रपाताने आपल्या जाणिवांचं, मानसिक क्षमतांचं जवळजवळ म्युटेशन केलं आहे. तरूण असोत की प्रौढ, ‘अस्थिरता’ हा आपल्या मनाचा एक नवीन गुणधर्म झाला आहे. समोरासमोर बसून न बोलता डिजिटली बोलण्यातून मनाचे आणि समजुतीचे गुंते वाढून ते नात्यांमध्येही प्रतिबिंबित होत आहेत. जगण्याचं साधारण रूपांतर ‘कोलाहला’त झालं आहे. वास्तविक ‘वैचारिक कोलाहल’ (‘विचार कलह’ या अर्थी) ही मला अगदी जीवनावश्यक गोष्ट वाटते. पण विचार-कलह आपल्याला अंतर्मुख करणारा, आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा, जगण्याकडे तात्त्विक अंगाने, परानुभूतीच्या अंगाने बघायला शिकवणारा असतो. आजचा कोलाहल हा विचार-कलह नाही. तो अस्थिरतेकडे नेणारा, ताण आणणारा, संयम सोडायला लावणारा, राग निर्माण करणारा कोलाहल आहे.
‘अमानुषीकरण’ (डीह्यूमनायझेशन) हेदेखील आजचं एक विशेष लक्षण आहे. आणि त्यातून एखाद्या व्यक्ती वा समूहाला लक्ष्य करून केलेली हिंसा समर्थनीय ठरवली जाते. विशेषतः समाजमाध्यमांवर चालणाऱ्या धुमश्चक्रीत एकमेकांना ‘विषारी साप’ ठरवणं, देशद्रोही ठरवणं यातून आपण सगळे ‘माणूस’ आहोत ही जाणीव पुसण्याकडे आपला प्रवास सुरु आहे असं दिसतं. आपल्याच देशातील तरूणांना, मग त्यातले काही तरूण आपल्याला बिनकामाचे वाटत असले तरी, सार्वजनिकरित्या ‘झुरळ’ म्हणणं हे अशाच अमानुषीकरणाचं उदाहरण आहे. त्याचबरोबर सामर्थ्य, पौरुष याचा संबंध थेटपणे आक्रमकतेशी जोडून हिंसेला आपण मूल्यात्मक मान्यताही देऊन टाकली आहे. समाजमाध्यमांमध्ये, फोनमध्ये अडकून पडल्याने जिवंत सामाजिक अनुभव न घेता येणं, अर्थपूर्ण नाती निर्माण न होणं, संवाद थांबणं हे घडतं आहे. मला सर्वात दखलपात्र आणि त्रस्त करणारी एक गोष्ट वाटते ती म्हणजे ‘माझं चुकलं’ या जाणिवेचं हळूहळू नष्ट होणं. आपण चुकू शकतो हे कुणालाच कसं वाटत नाही याचं राहून राहून आश्चर्य वाटतं. आपण स्वतःमध्ये प्रमाणाबाहेर अडकणं (त्याला डिजिटल माध्यमांचा हातभार लागणं) आणि त्यातून आपली चूक कबूल न करण्याची नवीन मूल्यव्यवस्था (!) मनात निर्माण होणं याचा हा परिपाक आहे असं माझं याबाबतचं विश्लेषण आहे.
हिंसेला पूरक ठरेल, हिंसक वृत्तीला खतपाणी घालेल अशा वर्तमानात हिंसक स्वरूपाचे गुन्हे वाढणं यात आश्चर्य नाही. एक स्वतंत्र एकक म्हणून माणूस हिंसक होतो आहे हे दिसतं आहे. आणि या हिंसेचा भडका उडायला हातातला मोबाइलदेखील पुरेसा ठरू शकतो आहे. त्यामुळे आपण जर तांत्रिक व अन्य प्रगतीचा गौरव करणार असू तर त्याचबरोबर प्रगतीच्या किमतीबद्दल बोलणंही गरजेचं आहे.
ज्या घटना घडत आहेत त्या प्रत्येक घटनेचं स्वतंत्रपणे विश्लेषण करणं आणि मग काही निष्कर्ष काढणं हे तर आवश्यक आहेच. पण समाज म्हणून आपण ज्या मार्गाने चाललो आहोत त्यातून गुन्हेगारी मानस घडायला हातभार लागतो आहे का याचा एकत्रित विचार करणंही आवश्यक आहे. गुन्हेगारीत तरूणांचा सहभाग वाढतो आहे हे खरं; पण त्याच्याकडे ‘आयसोलेशन’मध्ये बघता येईल का हा विचार प्रौढांनी करणं आवश्यक आहे. हिंसक घटनांच्या वाढत्या वारंवारतेने अस्वस्थ होणं समजण्यासारखं आहे; पण या घटना ‘परिणामस्वरूप’ आहेत हे लक्षात घेतलं आणि व्यक्तीविशिष्ट प्रश्न विचारण्याबरोबरच व्यक्तीला घडवणाऱ्या व्यवस्था नीट कार्यरत आहेत की नाहीत हे तपासलं तर कारणांवर काम करणं शक्य होईल. अन्यथा हळहळत राहण्यापलीकडे आपण काही करू शकणार नाही!
- लोकसत्ता (लोकरंग), १२ जुलै २०२६