Wednesday, February 19, 2025

इतिहासाचं ओझं आणि वर्तमानाची फाळणी

इतिहासातील घडामोडींकडे आपण जेव्हा आज बघतो आणि आपल्याला त्या अन्याय्य वाटतात तेव्हा त्याबद्दल आपल्या मनात संताप खदखदत राहणं हे समजण्यासारखं आहे. इतिहासातील विध्वंस-अन्याय-शोषणाचं उत्तर जेव्हा शे-दोनशे वर्षांनी एखादं विध्वंसक कृत्य करून दिलं जातं तेव्हा त्याचं समर्थनही केलं जातं. बाबरी मशीद पाडणं बरोबर होतं असं मागे केव्हातरी बोलताना आरएसएसमधला एक मित्र म्हणाला होता. त्याबाबत तो अर्थातच पूर्णपणे ठाम होता - सगळेच हिंदुत्ववादी असतात तसा. आता याची एक 'फ्लिप साइड' अशी आहे की ज्या समूहातर्फे हे उत्तर दिलं जातं त्या समूहालाही जर त्या समूहाने केलेल्या इतिहासातील गैरकृत्यांबद्दल कुणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला ते स्वीकारणं भाग पडतं. उदा. बाबरी मशीद पाडण्याचं जसं समर्थन होऊ शकतं तसं जर समजा मूळच्या बौद्धांनी (नवबौद्ध नव्हेत) पूर्वी जिथे बौद्ध लेणी होती असं एखादं मंदिर पाडलं आणि ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याचा आमचा मार्ग म्हणून त्याचं समर्थन केलं तर सवर्ण हिंदूंना ते मान्य करावं लागेल. आजच्या दलितांचा संदर्भ घेतला तर ज्या मंदिराच्या बांधकामात महारांचा बळी गेला आहे असं एखादं मंदिर पाडलं तर ते समर्थनीय होईल. किंवा आमच्यावरील ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याची आमची प्रतीकात्मक कृती म्हणून एखादं मंदिर पाडलं असंही आर्ग्युमेंट होऊ शकेल. ही उदाहरणं म्हणून सांगितली आहेत. या आर्ग्युमेंट्सच्या योग्यायोग्यतेबाबत वेगळं बोलता येईलच. (पराकोटीचा अन्याय सहन करूनही दलितांकडून कधी विध्वंसक कृत्य झालेलं नाही हे इथे नोंदवावंच लागेल).  

आता या उदाहरणाला आणखी फाटे फुटतीलच. हिंदुत्ववादी म्हणतील की दलितांवर अन्याय झाला हे बरोबरच आहे; पण मुस्लिमांनी जशी हिंदूंची कत्तल केली तशी दलितांची कत्तल झालेली नाही. ('हिंदूंची कत्तल' याला केवळ धार्मिक आयाम नसून साम्राज्यविस्ताराचा आयाम आहे. शिवाय हिंदू राजेही आपसात लढले होतेच. पण सध्या तो मुद्दा बाजूला ठेवू).  त्यावर दलितांची एकगठ्ठा कत्तल झाली नसली तरी दलितांवरील सुट्या सुट्या हिंसेचा हिशेब काढला तर तो सामूहिक कत्तलीएवढाच होईल असं प्रत्युत्तर देता येईल. हिंदुत्ववादी म्हणतील की सवर्ण-दलित संघर्ष हा हिंदूंचा अंतर्गत मामला आहे; पण मुस्लिम हे समस्त हिंदूंचे शत्रू होते. त्यावर असं उत्तर देता येईल की अंतर्गत मामला हे सवर्णांना सोयीचं आर्ग्युमेंट आहे. आम्ही मुळात हिंदू धर्माचे शोषित आहोत. आम्हांला ज्या धर्मात मानाचं स्थानच नाही त्या धर्माच्या धुरीणांनी मुस्लिमांना टारगेट करायचं असेल तेव्हा 'अंतर्गत मामला' म्हणायचं आणि इतर वेळी वर्णश्रेष्ठत्व मिरवायचं हा दुटप्पीपणा आहे. आम्हांला मुळात हिंदू धर्माबद्दल काडीचंही प्रेम नाही. उलट इस्लाम स्वीकारल्यानंतर आमच्यातील अनेकांची स्थिती सुधारल्याचे दाखले देता येतील. (काही वर्षांपूर्वी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी हा वादाचा मुद्दा झाला होता. बाबरीप्रमाणेच हे उदाहरण घेतलं तर याकूब मेमनचं समर्थन आणि नथुराम गोडसेचं समर्थन असे दोन मुद्दे घेता येतील आणि दोन्हीकडून वर केली आहेत त्या धर्तीची आर्ग्युमेंट्स करता येतील).

वरील चर्चा ही मुद्द्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केली आहे. एखाद्या वादाकडे, वादग्रस्त घटनेकडे बघताना काय प्रकारची आर्ग्युमेंट्स येऊ शकतात याची झलक दाखवण्यासाठी. आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद ही अनेक बाजूंनी लढवता येण्याजोगी आणि समर्थन करता येण्याजोगी बाब असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनाला घट्ट धरून आर्ग्युमेंट्स करतो तेव्हा त्याचा प्रतिवाद होऊ शकतो आणि तोही तितकाच कन्व्हिन्सिंग असू शकतो हे लक्षात घेणं आवश्यक असतं. अर्थात आपल्याला वैचारिक पातळीवर पुढे जायचं असेल तर. अन्यथा आपलं आर्ग्युमेंट लटकं पडतंय याची स्पष्ट जाणीव झालेली असतानाही ते पुढे रेटत राहिल्याची अनेक उदाहरणं पदोपदी दिसतातच.

इतिहासातील घडामोडी, अन्याय आणि आपलं आजचं वर्तमान यात आपल्याकडे इतिहास बरेचदा जिंकतो याचं एक कारण आपण प्रत्यक्षात आपला पायाखालच्या, आजच्या जमिनीवर उभे असलो तरी मनातून आपण 'इतिहासाच्या जमिनी'वर उभे आहोत हे आहे. एका अर्थी आपण इतिहासाचे गुलाम आहोत. कुठल्याही कट्टर धार्मिक विचारसरणीला तर इतिहासाला रजा देणं कधीच परवडत नाही. कारण तसं केलं तर त्यांच्या तथाकथित 'वैचारिक पाया'खालची जमीनच हिसकावली जाते! त्यामुळे पंधराव्या-सोळाव्या शतकात जे झालं त्याच्या आधारे आज एकविसाव्या शतकात आपण काही विचार-कृती करायला नको हा विचार त्यांना पटू शकत नाही. त्यांचं मानसच इतिहासाच्या मोल्डमध्ये घडवलं गेलेलं असतं. अशा मानसिकेतला कसं सामोरं जायचं हा एक मोठाच प्रश्न असतो. (इतिहास हा मुद्दा महत्त्वाचा मानायचाच असेल तर 'हिंदू-मुस्लिम संबंध : तेव्हा आणि आता' तसंच 'सवर्ण-दलित संबंध : तेव्हा आणि आता' असे दोन विषय उभे राहू शकतात).

यानंतर आता याच विषयाशी जोडलेली पण थोडी वेगळी चर्चा करू. काही हिंदी चित्रपटांच्या संदर्भाने आहे. एका सांस्कृतिक अवकाशात हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल काही आश्वासक चित्रण होत होतं हे सामाजिक चर्चाविश्वासाठी मार्गदर्शक ठरू शकेल.    

'आमिर' नावाचा एक फार प्रभावी चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. (दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता). खिळवून ठेवणारी कथा, अमित त्रिवेदीचं अफलातून संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, अवाक करणारा शेवट! मुंबई एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या एका इस्लामिक दहशतवादी गटाचा सूत्रधार (गजराज राव) एका तरुण डॉक्टरला (राजीव खंडेलवाल) त्याच्याकरवी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वेठीला धरतो. त्याच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवलं जातं. हा डॉक्टरही मुस्लिम आहे. चित्रपट अवश्य बघावा असा आहे.  

चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या एका सहकाऱ्याशी त्याबाबत चर्चा झाली होती. दहशतवादी गटाचा सूत्रधार त्या तरुण डॉक्टरला मुंबईत डोंगरीमध्ये बरंच फिरवतो. तिथले काही व्यावसायिक (हॉटेलचालक, दुकानदार, एसटीडी बूथचालक इ.) कटात सामील असतात. त्यातल्या प्रत्येकाकडून या तरुणाला पुढच्या सूचना मिळत जातात असं चित्रण होतं. यावर बोलताना माझा सहकारी म्हणाला की चित्रपटात सर्वसामान्य मुस्लिम माणूस दहशतवादी कटात सामील आहे असं दाखवलं आहे ते काही बरोबर नाही. त्यावर माझं असं म्हणणं होतं की डोंगरीसारख्या भागात बहुसंख्य मुस्लिम व्यावसायिक असणं स्वाभाविकच आहे आणि दुसरं म्हणजे एखाद्या दहशतवादी कृत्यामागे मोठं प्लॅनिंग असणार हेही सरळ आहे. त्यात सामील होणारे आपणहून सामील झाले की दबावाखाली सामील झाले हाही एक प्रश्न आहेच. पण मुस्लिम समुदायातील लोक त्यात सामील आहेत या चित्रणात मला काही गैर वाटलं नाही. मुख्य म्हणजे सारासार विचार करणारा तो विवेकी मुस्लिम डॉक्टर हा कथानायक आहे हे महत्त्वाचं आहे.

मुळात माझ्या सहकाऱ्याने हा मुद्दा मांडेपर्यंत माझ्या डोक्यात तसं काही आलंच नव्हतं. पण नंतर त्याच्या म्हणण्यावर विचार करूनही मला ते फारसं पटेना. या गोष्टीला आता बरीच वर्षं झाली. दोन हजारच्या दशकापर्यंत आमिर, रंग दे बसंती, वेन्सडे आणि इतरही काही थेट सामाजिक-राजकीय भाष्य करणारे चित्रपट निर्माण होत होते. 'संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचार' हा मुद्दा घेतलेल्या 'रंग दे बसंती'ला तर अनेक पारितोषिके मिळाली. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (आज हे अशक्यप्राय वाटतं!) या चित्रपटात एक हिंदुत्ववादी एका मुस्लिमाशी हळूहळू मैत्री करतो हेही प्रभावीपणे दाखवलं गेलं होतं. ज्या नसीरुद्दीन शहाला हिंदुत्ववादी आज सतत टारगेट करतात त्याने 'वेन्सडे'मध्ये इस्लामिक दहशतवादामुळे पेटून उठलेल्या सामान्य माणसाची भूमिका केली होती. इस्लामिक दहशतवादाबद्दल बोलताना वेन्सडे, सरफरोशसारख्या सिनेमात भारतीय मुस्लिम पोलीस अधिकारी (भूमिकेत अनुक्रमे जिमी शेरगिल, मुकेश ऋषी) दाखवले गेले होते. दहशतवादी मुस्लिम असले तरी त्याला विरोध करणारे मुस्लिमही आहेत, ते भारताच्या पोलीस खात्यात आहेत हे दाखवलं जात होतं. खरं तर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये मुस्लिम व्यक्तिरेखांना आवर्जून स्थान दिलं जात होतं असं दिसतं. (आज मात्र स्थिती पालटली आहे. मुस्लिमांचं दानवीकरण हा बऱ्याच चित्रपटांचा अजेंडा आहे). मुस्लिमांना भारतात आपलं समजलं जात नाही या पार्श्वभूमीवर त्यांना सामावून घ्यायच्या दृष्टीने हे होत होतं. तसा स्पष्ट उल्लेखही व्हायचा. दुसरीकडे 'क्रांतिवीर'सारख्या चित्रपटात वस्तीतला एक मुस्लिम मनुष्य जेव्हा बहकून हिंदूंविरुद्ध भडकाऊ बोलू लागतो तेव्हा नाना पाटेकर त्याच्या कानफटात मारून (आणि अर्थातच पल्लेदार डायलॉग ऐकवून) भानावर आणतो. 'सरफरोश'मधला मुकेश ऋषी आणि आमिर खानचा संवादही अनेकांना आठवत असेल. २०१९ मध्ये, म्हणजे अगदी अलीकडे आलेल्या 'बाटला हाउस'मध्ये जॉन अब्राहमने साकारलेला पोलीस अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणतो की इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आलो आहोत. यात मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रश्न कुठे येतो?

ही उदाहरणं द्यायचं कारण असं की चित्रपट निर्माण करणारे आणि ते बघणारे दोघांचीही दृष्टी तुलनेने अधिक स्वच्छ होती असं वाटतं. आणि बहुतांश समाजमानस प्रत्यक्षातही असंच होतं असं वाटतं. किमान आज जो एकारलेपणा आला आहे तो नव्हता. मुस्लिमांचा अजिबात द्वेष नाही, मुस्लिमांची भारतात होणारी कुचंबणा समजते आहे, त्याबाबत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे हे एकीकडे असतानाच मुस्लिमांबद्दल 'ब्लॅंकेट' स्वरूपातील अनाठायी सहानुभूतीही नाही - विशेषतः इस्लामिक दहशतवादाचा स्पष्ट निषेध आहे - अशी बहुस्तरीय आणि म्हणूनच सुस्पष्ट भूमिका आपण घेतोय का हे तपासून पाहावं लागेल. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांमधून, प्रसंगांमधून हे पाहायला मिळतं; पण वास्तवात मात्र दोन टोकं तयार होतात. एका गटाने मुस्लिमांना 'संपूर्ण झिडकारायचं' आणि एका गटाने त्यांना 'संपूर्ण स्वीकारायचं' असं काही होतंय का असं वाटतं. 

सवर्ण-दलित-मुस्लिम हे कोन आणि धर्मनिरपेक्ष व हिंदुत्ववादी हे दोन प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत. या सगळ्याला इतिहासाचं विशिष्ट पद्धतीने करून दिलं जाणारं आकलन, अनुभव व जडणघडण, मुख्य म्हणजे राजकारण आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यातून निर्माण होणारी मानसिकता, विचारव्यूह, एकारलेपणा यांचे आयाम आहेत. यातले धागे सुटे करून त्यांच्याविषयी बोलत राहणं आवश्यक आहे असं वाटतं. आजच्या भारतात बहुसंख्याकवाद ज्या प्रमाणात आणि ज्या तीव्रतेने पसरला आहे आणि 'धार्मिक ओळख' विवेकाला ज्या प्रकारे गिळंकृत करू पाहते आहे त्या पार्श्वभूमीवर हे करणं फारच आवश्यक आहे. हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी दोन्ही गटातील समंजस व्यक्तींना एकत्र येऊन काही करता येईल का याचाही विचार होऊ शकतो. निदान चर्चेच्या काही फेऱ्यांनंतर आपल्यात काही प्रमाणात 'अखंडता' निर्माण होऊ शकते की आधीपासून झालेली 'फाळणी'च अटळ आहे हे तरी लक्षात येईल!

Monday, February 17, 2025

चार शब्द

१) संवेदना 

'अमेरिकन फिक्शन' हा २०२३ सालचा चित्रपट 'मॉँक' नावाच्या एका आफ्रो-अमेरिकन लेखकाभोवती फिरतो. अमेरिकन कृष्णवर्णीय लेखकांचं साहित्य हे बहुतांशी त्यांच्या जगण्याविषयी, वांशिक भेदभावामुळे त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्यायाविषयी असतं; पण त्यापलीकडे जाऊन सांगावं असं इतरही बरंच कृष्णवर्णनीय लेखकांकडे असू शकतं, ते त्यांनी सांगावं, आपल्या लेखकीय प्रतिभेला न्याय देत उत्तम कथनात्म साहित्याची निर्मिती करावी अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे लेखकांनी त्यांच्या दुःखाच्या कहाण्या सांगत बसणं हे त्याला पटत नाही. याबाबत त्याचा एका लोकप्रिय कृष्णवर्णीय लेखिकेशी झालेला संवादही ऐकण्यासारखा आहे. त्याचा एक मुख्य आक्षेप हाही असतो की प्रकाशकांना कृष्णवर्णीयांचं दुःख जगवत ठेवण्यात व्यावसायिक इंटरेस्ट आहे. कारण ते विकलं जातं. कृष्णवर्णीय लेखकाने तेवढंच करावं अशी त्यांची अपेक्षा असते. 

वांशिक भेदभाव आहे आणि त्याचे चटके कृष्णवर्णीयांना बसले आहेत, आजही बसत आहेत हे तो नाकारत नाही. चित्रपटात त्याला स्वतःला आलेला एक अनुभवही दाखवला आहे. तरीही त्याला लेखक म्हणून स्वतःचं अस्तित्व केवळ आपल्या कृष्णवर्णीय असण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. हा चित्रपट मला अतिशय रोचक वाटला. आपल्याकडेही दलित साहित्याबद्दल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्यातील मांडणीबाबत स्वतंत्रपणे बोलता येईल. पण मला ते इथे करायचं नाही. हा चित्रपट आठवला त्याचं कारण वेगळं आहे. 

अन्याय-उपेक्षा, त्याबद्दल संवेदनशील असणं-नसणं, 'व्हिक्टिमायझेशन'मध्ये 'रमणं' आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपटातली मध्यवर्ती चर्चा आहे. ती बघत असताना आपल्याला संवेदनशील असण्याबाबत काही प्रश्न पडत जातात. संवेदनशील मनाला काही गोष्टी अगदी स्पष्टपणे स्पर्श करतात, त्यातून त्या मनात अस्वस्थता-दुःख निर्माण होतं हे बरोबर. मात्र संवेदनशीलता आणि संवेदनशीलतेच्या पलीकडे जाणारी वस्तुनिष्ठता या दोन्हीच्या टोकाला जाणं शक्य असलं तरी ज्याला कदाचित विवेकी/सम्यक/रॅशनल विश्लेषण म्हणता येईल असा अवकाश या दोन्हीच्यामध्ये आहे असं दिसतं. मी आसपासचं दारिद्र्य बघतो आणि त्यामुळे दुःखी होतो ही एक चांगली सुरुवात आहे, ते मनुष्यत्वाचं चांगलं लक्षण आहे. यातला तात्त्विक भाग असा की माझी संवेदनशीलता मी लादावी की नाही? याबाबत थोडं अधिक बोलूया. 

२) सम्यकता 

पुण्यातील बुधवार पेठेत 'सहेली' या संस्थेमार्फत वेश्यागृहांना भेट देताना एक विशेष अनुभव आला होता. एका वेश्यागृहाच्या मालकिणीशी - जिला घरवाली म्हणतात - बोलताना 'सहेली'ची कार्यकर्ती म्हणाली की आम्ही अमुक दिवशी मेडिकल चेक-अप ठेवला होता. तुम्हांला कळवलं होतं. पण तुम्ही कुणीच आला नाहीत. का नाही आलात? त्यावर ती घरवाली काहीशा फटकळपणे उत्तरली - 'तुम्ही इकडे यायचं की. आम्ही कशाला तिकडे येऊ?'  तिच्या उत्तरात 'गरज तुम्हाला आहे - आम्हांला नाही' असं अभिप्रेत होतं. 

आता तिच्या या उत्तराला अनेक कंगोरे आहेत. ते अगदी बरोबर उत्तर आहे असं म्हणता येत नाही. पण त्यातला 'गर्भित संदेश' मला विचार करण्यासारखा वाटला. आणखी एक अनुभव सांगतो. 

माध्यमिक शाळेत असतानाचा प्रसंग. मी गिरणीतून पीठ घेऊन घरी येत होतो. काहीतरी झालं आणि हातातला डबा खाली पडला. पीठ रस्त्यावर पडलं. आता नीट आठवत नाही; पण बहुधा मी वरवरचं थोडं पीठ घेतलं आणि बाकी तिथेच टाकून दिलं आणि घरी आलो. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडलो आणि त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर एक मनुष्य ते पडलेलं पीठ गोळा करत होता. ते दृश्य पुढे अनेक वर्ष लक्षात राहिलं. आजही त्याची अंधुक इमेज डोळ्यापुढे आहे. 

पीठ गोळा करणारा तो मनुष्य स्वतःच्या मूर्खपणाने गरीब झाला होता असं एक अर्थशास्त्रीय विश्लेषण कुणी करू शकेल. तसा तो झाला होता का याची माहिती माझ्याकडे नाही. आणि जरी तो तसा गरीब झाला असेल तरी त्याच्या मूर्खपणाची शिक्षा अशी असावी का हा असा प्रश्न उरतोच. भारतात अनेक लोक ड्रेनेजमध्ये उतरल्याने मेले आहेत. हे सगळे लोक त्यांच्या मूर्खपणामुळे गरीब राहिले (आणि मेले) असंही आर्ग्युमेंट करता येईल. सिग्नलला, स्टेशनवर लोक भीक मागत असतात. हे सगळे लोक कामचुकार आहेत, यांना काम करायला नको, हे मुद्दाम मुलांना भीक मागायला लावतात इ. युक्तिवाद ऐकत मी मोठा झालो. या युक्तिवादात कदाचित काही प्रमाणात तथ्य असेलही; पण हे युक्तिवाद करणाऱ्यांनी किती भिकाऱ्यांवर रीसर्च करून हा निष्कर्ष काढला आहे हे कधी कळलं नाही. समजा भारतात लाखभर भिकारी असतील (आकडा केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे) तर त्यातील किती आपल्या मूर्खपणामुळे भिकेला लागले आणि कितीजण भिकेला लावले गेले याची काही आकडेवारी यांनी गोळा केली आहे का हे कळायला मार्ग नव्हता.   

एकदा लोहगड ट्रेकला गेलो होतो. मळवलीला चहा-वडापावसाठी थांबलो होतो. तिथे एक बाई आली. घुटमळत उभी होती. चहावाल्याने विचारलं 'काय पाहिजे?' ती नीट शब्दात 'भीक' असं म्हणाली. बाजूलाच उभ्या असलेल्या मला फार अपराधी वाटलं. 'तार्किक' विचार केला तर मला अपराधी वाटायची काय गरज असं कुणी म्हणेल. पण काहीजणांना भीक मागून जगावं लागतं आणि मला तसं जगावं लागत नाही यात माझा काही म्हणजे काहीच दोष नाही यावर मला लगेच निर्णय देता येत नाही खरा. म्हणजे मी दोषी नसेनही; पण ते सिद्ध कसं करायचं मला कळत नाही. 

या अनुभवांमुळे जाणवलेली अस्वस्थता नमूद केल्यानंतर आता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करू. 

रस्त्यावर पडलेलं पीठ उचलणारा मनुष्य दुःखात आहे हे माझं गृहीतक होतं का? आता त्याची त्याच्या जगण्याबद्दल काही तक्रार नाही असं असेल तर मग माझ्या वाटण्याला किंवा काही संस्था संघटनांनी त्याच्या प्रश्नांवर काम करण्याला काही अर्थ उरतो का? तात्त्विक मुद्दा म्हणून हा कदाचित मान्य होण्यासारखा असला तरी पुन्हा हाही ॲबसोल्यूट पातळीवरचा विचार झाला. (अंबानीवर कशाला जळता? तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल या विचारासारखाच). माणसाचं जगणं कस असावं यावरच जर आपलं - ह्यूमॅनिटीचं - एकमत नसेल तर मग पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तो मजूर आजही कदाचित खोल दुःखात बुडालेला नसेल. पण त्याला जर पुरेसं पीठ विकत घेता आलं, दोन वेळा चांगलं आणि पोषक अन्न मिळालं, राहण्यासाठी त्याला पुरेशी जागा मिळाली तर तो आज आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त आनंदी होईल. 

३) सहकार्य 

पुढचा प्रश्न असा की 'असं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का?' असं विचारलं तर कुठल्याही 'इझम'चे पाठीराखे किंवा सामाजिक-आर्थिक विषयांचा फार अभ्यास नसणारे पण सारासार विवेक जागा असणारे कुणी 'नाही' म्हणणार नाहीत. फक्त हे कसं साध्य होईल यावर मतभेद होतील. संपत्ती काही मूठभरांकडे एकवटलेली असताना तो मजूर एक किमान आवश्यक 'क्वालिटी ऑफ लाईफ' असलेलं जगणं कसं जगू शकेल असा प्रश्न काहीजणांना पडेल तर काहीजण हा 'मागणी-पुरवठ्याचा' प्रश्न आहे - मजूर जर संख्येने प्रचंड असतील तर ‘लेबर कॉस्ट’ कमीच राहणार आहे. जर त्यांची संख्या कमी झाली तर त्यांचं उत्पन्न वाढेल असा युक्तिवाद करतील. 

संपत्ती मूठभरांच्या हातात एकवटलेली आहे या विधानाचीही थोडी फोड करावी लागेल असं मला वाटतं. संपत्ती मोठ्या प्रमाणात वर एकवटलेली आहे हे बरोबरच आहे. अंबानी-अदानीसारख्यांकडे पाहिलं की ते कळतंच. पण तिथून पुढे गेलं की जे इतर मोठे-मध्यम उद्योगपती-भांडवलदार दिसतील त्यांच्याही हातात ती आहे असं म्हणता येईल. पुढे जात आयटी, बँकिंग आणि इतर क्षेत्रात काम करणारे नोकरदार-व्यावसायिक पाहिले तर त्यांच्याकडेही काही संपत्ती एकवटली आहे असं म्हणता येतं. अंबानी-अदानीकडे एका व्यक्तीच्या हातात, आणि तिथून खाली आलं की एकेका इंडस्ट्रीच्या (म्हणजे तिथे काम करणाऱ्या अनेकांच्या) हातात संपत्ती एकवटली आहे असं दिसेल. मुळात संपत्ती जर कायदेशीर मार्गाने कमावली असेल तर कुणाकडे किती संपत्ती असावी यावर काही निर्बंध नाही. पण कायदेशीर मार्गांना डावलून, उद्योगपतींना फेवरेबेल धोरणं राबवून संपत्ती काहीजणांकडेच वळवली जाते यावर आक्षेप आहे आणि तो योग्य आहे.

'क्वालिटी ऑफ लाइफ'चा प्रश्न लोकसंख्येशी निगडीत आहे की लोकसंख्येला पूरक धोरणं न राबवता उद्योगांना पूरक धोरणं राबवण्याशी निगडीत आहे, बाजारात निकोप स्पर्धा हवी असं म्हणत प्रत्यक्षात त्या स्पर्धेत भाग घेणं शक्यच होणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याशी आहे, 'ठेविले अनंते' म्हणत उद्यमी मानसिकताच नसण्याशी आहे की आणखी संबंधित घटकांशी आहे यावर बोलताना कुठल्या एकाच बाजूला जबाबदार धरता येईल असं मला वाटत नाही. पण भांडवली व्यवस्थेनं उत्तम जम बसवला असताना लोकप्रिय 'ट्रिकल डाउन' सिद्धांतानुसार बघितलं तर तळातल्या वर्गात फार लक्षणीय फरक पडला आहे असं दिसत नाही. असंघटित क्षेत्रातील कामगार (असंघटित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असणं) हा त्यासंदर्भातला एक मोठा प्रश्न असावा. 

या संदर्भात एका निबंधाचा उल्लेख करावासा वाटतो. प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांचा 'पॉव्हर्टी इन इंडिया' हा निबंध 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात १९७१ च्या सुरुवातीला प्रकाशित झाला होता. पुढे दांडेकरांनी या निबंधाचा मराठी संक्षेप केला तो 'माणूस' च्या ३१ मार्च १९७१ च्या अंकात प्रकाशित झाला. पुढे पन्नास वर्षांनी 'माणूस'च्या त्या अंकाचं पुनर्प्रकाशन मनोविकास प्रकाशनाने केलं. दिवंगत लेखक-अभ्यासक नंदा खरे यांनी या पुस्तकाचं संकलन केलं होतं. 'भारतातील गरिबी' या शीर्षकाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या अखेरीस नंदा खरे यांनी 'भविष्य दरिद्री असायला नको!' असा एक लेख लिहिला आहे. त्यात 'लोकसंख्या आणि दबाव' असा एक विभाग आहे. त्यातील सुरुवातीचा उतारा असा - 

१९७९ मध्ये सुमारे ५४.१ कोटी भारतीय होते. आज २०२१ साली जनगणना व्हायला हवी होती, पण ती कोव्हिडमुळे टाळली गेली आहे. तशीही काटेकोर अंकबद्ध माहिती सरकारांना महत्त्वाची वाटत नाही आहे. पण २००१ (१०१.९ कोटी), २०११ (११८.६ कोटी) हे आकडे पाहता आजची लोकसंख्या १३७ कोटींजवळ असावी. म्हणजे आज 'भारतातील गरिबी' काळाच्या (१९७१) अडीचपट भारतीय आहेत! त्यांना सांभाळणं उपलब्ध सोई-सुविधांवर, नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव आणतं आहे.

शिडाच्या जहाजांच्या प्रवासाबद्दलच्या परिभाषेत एक 'वाऱ्याच्या फार जवळ जाणं', ‘सेलिंग क्लोज टू द विंड’ असा शब्दप्रयोग केला जातो. सुरक्षित प्रवासासाठी सर्वच्या सर्व उपलब्ध वारा शिडांमध्ये 'भरून' घेणं धोक्याचं ठरू शकते. शहाणी पद्धत अशी की वेग जरा कमी मिळाला तरी जहाज वाऱ्याशी थोडाफार कोन करून हाकावं. तसं न केल्यास जराशाही वाऱ्यातल्या फरकाने जहाज उलटू शकतं! माझ्या मते आपण आज भारतातच नव्हे तर जगभरात, वाऱ्याच्या नको तितक्या जवळ जाऊन काहीतरी अडाणी वेग गाठू पाहतो आहोत आणि त्याला 'विकास' म्हणतो आहोत.

माझ्या मते आज गरज विकासाची नाही, तर नैसर्गिक संसाधनांच्या शहाण्या वापरातून पूर्ण समाजाला दारिद्र्य रेषेच्या वर उचलण्याची आहे. त्यासाठी समाजाच्या पॉवरफुल, पॉवरबाज वर्गाला काही त्याग करावा लागेल. पण तो करायचं टाळल्यास जहाज वाऱ्याच्या फार जवळ जाऊन पलटी मारू शकते!

दांडेकर-रथ यांनीही आपल्या निबंधामध्ये 'बेकारीनिवारणाकरता लागणारा जादा पैसा कुठून आणावयाचा हा प्रश्न पुनःपुनः कितीदाही विचारला तरी त्याला एकच उत्तर आहे ते असे की ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्यापासून तो घेतला पाहिजे' असं म्हटलं आहे. त्यासाठी सर्वात श्रीमंत ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात फक्त १५ टक्के कपात केली आणि त्या खालोखाल श्रीमंत असलेल्या ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात ७.५ टक्के कपात केली तरी आवश्यक तो पैसा उभा राहू शकेल असं ते लिहितात. (दांडेकर-रथ यांच्या गणितानुसार हा आकडा आठशे कोटी इतका होता).    

हे पुस्तक अवश्य पाहावं. मला यातला एक 'टेक-अवे' असा दिसतो की पैसा या वस्तूकडे सर्वस्वी, पूर्णांशाने 'न्याय्य, राइटफुल रिवॉर्ड' म्हणून न पाहता 'इंस्ट्रूमेंट ऑफ सोशल बेटरमेंट' म्हणून पाहता आलं तर फरक पडू शकेल.      

४) न्याय 

'जॉली एलएलबी' चित्रपटाच्या अखेरीस वकील (अर्शद वारसी) कोर्टात जे भाषण करतो ते फार प्रभावी आणि नेमकं आहे. रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब लोकांबद्दल बोलताना तो म्हणतो 'कहाँ से आते है ये लोग? इनके पास ना रहने को घर है, ना रोजगार है, ना पैसा है...फिर क्यूँ चले आते है हमारे खूबसूरत शहरों की खूबसूरती पर बट्टा लगाने? लेकिन इन भूखे-नंगे भिकारियों के पास भी एक चीज का हक है जनाब...और वो है जस्टिस. और ये हक उन्हें देता है हमारा संविधान'.  

आपण जेव्हा आर्थिक विषमता, विकास आणि विस्थापन किंवा तत्संबंधी विषयांवर विचार करतो तेव्हा मला या 'जस्टिस'मध्ये एक उत्तर सापडतं. प्रश्न गरीब-श्रीमंत असण्यापेक्षा न्यायाचा जास्त आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नाबद्दल घमासान चर्चा सुरू होती तेव्हा ती 'कुणी जास्त पैसे कमावले आणि उधळले म्हणून काय झालं - त्यांचे पैसे आहेत त्यामुळे तो त्यांचा हक्क आहे', ‘तुम्हीही लग्नात पैसे उडवताच की’, 'पण हे पैशाचं विकृत प्रदर्शन आहे' ‘अशी वेगवेगळ्या दिशांना ताणली जात होती. समाजमाध्यमं गोष्टी ताणण्याकरताच असतात हे खरं असलं तरी असं वाटलं की अशी चर्चा ताणण्यापेक्षा ‘जे सगळं चालू आहे, किंवा आजवर होत आलं आहे ते न्यायोचित आहे का?’ यावर चर्चा झाली तर ती कदाचित जास्त फलदायी होईल. (‘सामाजिक न्याय’ हा शब्द आपल्या सार्वजनिक चर्चाविश्वात – लोकांच्या दैनंदिन चर्चेतही यावा).   

दुसरं म्हणजे जगणं अर्थकारणाशी निगडीत असलं तरी ‘माणूस असण्याचा गाभा’ अर्थशास्त्रात लपलेला नाही. त्यामुळे अर्थशास्त्रीय खुलासे ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ उत्तरं देतील कदाचित; पण त्यातून आपण ‘माणूस’ आहोत म्हणजे काय आहोत, माणूस असण्याचा अर्थ काय याचं उत्तर मिळणार नाही. जर सगळं फक्त अर्थशास्त्रापुरतं, कोरड्या हिशेबापुरतं मर्यादित असेल तर मग माणसाला कधीच कुठल्या गोष्टीचं वाईट वाटण्याचं कारण नाही. उद्या आपल्या डोळ्यासमोर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्याचं अर्थशास्त्रीय उत्तर देता येईलच! 

आरती प्रभू 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणून गेले आहेत. (बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून, देअर इज अ क्राइम हे मारियो पुझोचं विधानही याच धर्तीचं आहे). ही केवळ कवीकल्पना आहे की वास्तवात खरंच तसं होतं आहे हे तपासण्याची जबाबदारी आपली आहे. 'तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल' हे विधान 'ॲबसोल्यूट' पातळीवर खरं असेलही; पण आपण त्या पातळीवर जगतो का? तर नाही. आपण 'रिलेटिव्ह' पातळीवरच जगत असतो. त्यामुळे उत्पन्नातील विषमता ही नैसर्गिक न्यायानेच तयार होत असते असं म्हणता येत नाही.   

शाहरुख खानचं एक प्रसिद्ध विधान आहे - आधी मजबूत पैसा कमवा आणि मग फिलॉसॉफर व्हा. हे मान्य केलं तरी मजबूत पैसा कमवून झाला तरी लोक फिलॉसॉफर होताना फारसे दिसत नाहीत. चॅरिटी करतात; पण मूलभूत प्रश्न विचारताना फारसे दिसत नाहीत. बहुतेक वेळ ऑलरेडी मजबूत झालेल्या पैशाला आणखी मजबूत करताना दिसतात. पैसा कमावणं, तो खर्च करणं, लौकिक यश मिळवण्यात साफल्य वाटणं यात काही गैर नाही. बट देअर इज मोअर टू अस – ह्यूमन्स. आपण ‘माणूस’ म्हणून तरी गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपी उत्तरं देऊन मोकळं होऊ नये. मुळात योग्य प्रश्न विचारणं हेच ‘माणसा’च्या बुद्धीपुढचं एक आव्हान आहे.  

#let'snotconclude 

#let'skeepthinking 


Wednesday, February 12, 2025

उत्क्रांतीच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ची गरज

१२ फेब्रुवारी १८०९ हा चार्ल्स डार्विनचा जन्मदिवस. त्याच्या जन्माला आता दोनशेहून अधिक वर्षं उलटून गेली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी (१८५९ साली) त्याचा 'ऑन द ओरिजिन ऑफ द श्पीसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' अशा लांबलचक नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. 'आपण कुठून आलो' या माणसाला पडलेल्या सनातन प्रश्नाच्या शोधात माणसाला मिळालेलं उत्तर 'आपल्याला आणि या पृथ्वीवरच्या एकूणच सगळ्या पसाऱ्याला निर्माण करणारा सर्वशक्तीमान ईश्वर' असं होतं. हा ईश्वर एक किंवा अनेक होते. त्याकरता कुठल्या पुराव्याची आवश्यकता नव्हती. जे परंपरेने आपल्याला सांगितलं आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलं आहे ते चुकीचं कसं असेल हा विचार प्रबळ होता. आजही आहे. डार्विनच्या ग्रंथाने या सनातन प्रश्नाला वेगळी दिशा दिली हे खरं असलं तरी आजही एका मोठ्या मानवसमूहाची ईश्वरावरची श्रद्धा, धर्मश्रद्धा अजिबात ढळलेली नाही. 'क्रिएशनिस्ट (निर्मितीवादी) वि. इव्होल्यूशनिस्ट (उत्क्रांतीवादी)' असा संघर्ष आजही सुरूच आहे. देव आहे-नाही, श्रद्धा असावी-नसावी, असल्यास तिची अंधश्रद्धा कशी होऊ नये, श्रद्धा-अंधश्रद्धा यातली सीमारेषा कशी ओळखायची, सगळे तर्क पटूनही जर आपल्या आवडीच्या देवाच्या मूर्तीपुढे लीन व्हावंसं वाटत असेल तर त्याचा खुलासा कसा करायचा या आणि संबंधित मुद्द्यांवर हिरीरीने नित्य चर्चा होत असते. 

दोन उदाहरणं द्यायचा मोह आवरत नाही. पहिलं उदाहरण 'बिग बँग थिअरी' या अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिकेतलं. विज्ञान आणि तर्क हे जगण्याचे आधार असलेला, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक, बुद्धिमान आणि तऱ्हेवाईक, आपल्या विक्षिप्त वर्तनामुळे इतरांसाठी डोकेदुखी ठरणारा शेल्डन कूपर आणि येशू ख्रिस्तावर अतूट श्रद्धा असलेली, धार्मिक वृत्तीची त्याची आई मेरी कूपर यांच्यात वेळोवेळी झडणारे वाद हे आस्तिक-नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध यांच्यात असलेल्या दृष्टीकोनातील, विचारातील फरकांचं एक चांगलं उदाहरण आहे. एका प्रसंगात आई म्हणते, “ठीक आहे. प्रत्येकाला त्याचं मत असण्याचा अधिकार आहे”. त्यावर शेल्डन उसळून म्हणतो, “मत? उत्क्रांती हे 'मत' नाही. ती वस्तुस्थिती आहे”. त्यावर आई उत्तरते, “आणि हे तुझं मत आहे!”

दुसरं उदाहरण शेल्डनच्या आईची भारतीय आवृत्ती असलेल्या माझ्याच एका मावशीचं. 'डार्विनने उत्क्रांतीचा 'शोध' लावला हे ठीक; पण तो लावण्याची बुद्धी त्याला कुणी दिली?' असं एकदा ती मला म्हणाली होती. तिच्या या प्रश्नानंतर मी चर्चा आवरती घेतली! (तिच्या दृष्टीने हाच मुद्दा न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या शोधाला आणि इतर कुठल्याही वैज्ञानिक शोधाला लागू होईल!) 

वरील उदाहरणं प्रातिनिधिक म्हणावीत अशी आहेत. त्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर/आक्षेपांवर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने मुख्य मुद्दा 'संपूर्ण, सुसूत्र खुलाशा'चा आहे. म्हणजे असं की हे जग, आपण सजीव ही ईश्वराची निर्मिती आहे हे सुलभ स्पष्टीकरण मान्य करण्यामागे 'संशोधकीय आळस' आहे हे मान्य केलं तरी दुसऱ्या बाजूने पाहता, सर्व सजीव उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून लक्षावधी वर्षांचा प्रवास करत विशिष्ट शारीरिक-मानसिक अवस्थेत पोचले याचंही समजेल असं स्पष्टीकरण सर्वसामान्य लोकांपुढे सातत्याने आणलं गेलेलं नाही. (यातले 'समजेल असं' आणि 'सातत्य' हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत). आपण जर धर्मसंस्थेचा विचार केला तर तिने गेली हजारो वर्षं आपल्या 'सुलभ स्पष्टीकरणां'नी लोकांची मनं काबीज केली आहेत. (आजची परिस्थिती तर कमालीची गंभीर आहे. बहुसंख्य लोकांची सारासार विवेकबुद्धीदेखील धर्मश्रद्धेच्या अतिरेकी माऱ्याने पुरती पांगळी केली आहे. अशा स्थितीत 'संशोधकीय' बुद्धी' तर फार दूरची गोष्ट आहे). अर्थात धर्मसंस्थेचा क्रमशः उदय आणि क्रमशः विकास यात केवळ विश्वाची उत्पत्ती हाच एक विषय हाताळला गेलेला नाही. मानवसमूहाला नैतिक आचरणाची चौकट देण्याचं कामही धर्मसंस्थेने केलं. महत्त्वाचं म्हणजे जैविक विकासक्रमात माणसाला पडू लागलेल्या अस्तित्वविषयक प्रश्नांना हाताळण्याचं काम तिने केलं. यातून धर्मसंस्था तिच्या हजारो वर्षांच्या प्रवासात, मानवी बुद्धीच्या मर्यादांच्या बळावर ज्या भक्कमपणे उभी राहिली त्या तुलनेत दोनशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला भक्कमपणे उभं राहायला वेळ लागणार हे सरळ आहे. शिवाय उत्क्रांती हा श्रद्धेचा विषय नसून अभ्यासाचा विषय असल्याने तो अधिक व्यापक, म्हणून अधिक अवघड आणि म्हणून कमी 'रंजनमूल्य' असलेला आहे. आणि याच मुद्द्यावर विस्ताराने काही म्हणावंसं वाटतं. 

सामर्थ्य आहे ‘गोष्टी’चे...

'रंजनमूल्य' हा शब्द ज्ञानाच्या संदर्भात कदाचित थोडा विरोधाभासी वाटू शकेल; पण आपण ज्या विषयाबाबत बोलतो आहोत त्या संदर्भात आणि सर्वसामान्य लोकांना या विषयाबाबत आस्था निर्माण व्हावी या संदर्भात 'रंजन' हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. माणसाच्या प्रवासात 'गोष्ट' हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाला पडणारे अनेक प्रश्न धर्म, अध्यात्म, गूढवाद या कक्षेतून विज्ञानाच्या कक्षेत येण्याआधी हजारो वर्षं माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र आदि कलांमधून सतत सांगितल्या गेलेल्या ईश्वरी गोष्टींनी झाली आहे. याखेरीज माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या जैविक-सामाजिक प्रवासात उपयोग झालाच; पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे कशा उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या लोकप्रिय ‘सेपियन्स’मधलं विवेचन अनेकांनी वाचलेलं असेल.  

ईश्वर ही संकल्पना निर्माण झाल्यापासून आजवर तिने माणसाचा पिच्छा सोडला नाही. या संकल्पनेबाबत कितीही तार्किक युक्तिवाद केले तरी बहुसंख्य माणसं ही संकल्पना टाकून देऊ शकलेली नाहीत. 'व्हाय गॉड वोन्ट गो अवे - ब्रेन सायन्स अँड द बायॉलॉजी ऑफ बीलिफ' या पुस्तकात यूजीन डाक्विली आणि अँड्र्यू न्यूबर्ग यांनी ईश्वर ही संकल्पना मानवी मेंदूत 'हार्ड-वायर्ड' झाली असल्याचं काही प्रयोगांद्वारे दाखवून दिलं आहे. मानवी मेंदूत ही संकल्पना घट्ट रुजली आणि प्रचंड तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरदेखील ती टिकून राहिली याचा मेंदूविज्ञान आणि सामाजिक-आर्थिक प्रभावांच्या अभ्यासाच्या साहाय्याने आज उलगडा होऊ शकतो. पण यातला एक महत्त्वाचा घटक 'रंजन' हादेखील आहे. येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, राम-कृष्ण-शंकर-विष्णू आदि सर्व देव-देवतांच्या, प्रेषितांच्या कथांमध्ये फार मोठं रंजन आहे. ईश्वर, प्रेषित ही संकल्पना माणसाच्या चिंतनापेक्षाही रंजनात जास्त प्रमाणात ठाण मांडून बसलेली आहे. कारण ती एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. थरारकता आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हेच आपलं भागधेय आहे हे मनुष्य मान्य करतो आणि हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं. 

या पार्श्वभूमीवर निरीश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांनीच 'सजीव उत्क्रांती' हा विषय रंजकपणे, सांस्कृतिक अवकाशात प्रवेश करत कसा सांगता येईल यावर विचार करणं आवश्यक आहे. 'मानवी उत्क्रांती हा एक अवघड विषय आहे, तो आपल्याला झेपणारा नाही' अशी सर्वसामान्य लोकांची धारणा असल्याने आणि या विषयाचा अभ्यास करण्याइतपत वेळ हाताशी नसल्याने, तशी वृत्तीही घडलेली नसल्याने अशा मनोवस्थेतील लोकांना आपण कथा, नाटक, चित्रपट, संगीत, चित्र, डिजिटल माध्यमावरील काही कल्पक प्रयोग अशा काही मार्गांनी आकर्षित करून घेऊ शकू का यावर विचारमंथन होणं आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीवर आज मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मराठीतही पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण ते एका वर्गापुरतं मर्यादित आहे. आणि या विषयाबाबत लोकांच्या मनात अनास्था, भीती असं बरंच काही आहे. त्यामुळे इथे गरज आहे तो कल्पक 'योजकां'ची. एका बाजूला उत्क्रांतीविषयक पुष्कळ ज्ञान उपलब्ध आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्याशी कधीच संबंध न आलेला एक मोठा मानवसमूह आहे. ज्यांना ज्ञान आहे ते स्वतः कदाचित या ज्ञानातून कल्पकपणे, सोप्या, सुटसुटीत पद्धतीने एकेक विषय लोकांपुढे काढून ठेवू शकणार नाहीत. हे काम 'योजकां'ना करावं लागेल. 

‘इंटेलिजंट डिझाइन’चं आव्हान

उत्क्रांतीचा सिद्धांत सहजपणे पचनी न पडण्याचं एक प्रमुख कारण सजीवांच्या शरीररचनेतील कमालीची गुंतागुंत हेही आहे. एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांत होत होत आजचं अद्भुत वाटावं असं मानवी शरीर निर्माण झालं - त्यात डोळ्याच्या जागी डोळा बसला, कानाच्या जागी कान बसला, हृदय-फुफ्फुस-यकृत-मूत्रपिंड-आतडी इ. अवयव उत्क्रांत झाले, रक्त-मांस-स्नायू निर्माण झाले, मेंदू नावाचा एक थक्क करणारा अवयव उत्क्रांत झाला या सगळ्याची नीट फोड करून, तुकड्या-तुकड्यात समोर मांडून, त्यातून एका संपूर्ण शरीराची निर्मिती कशी झाली हे समजावून सांगणं आणि तेही रंजकपणे सांगणं हे विलक्षण आव्हानात्मक काम असणार आहे. पण ते झाल्याखेरीज अधिकाधिक लोकांना उत्क्रांतीच्या अभ्यासाकडे, वैज्ञानिक विचारपद्धतीकडे वळवणं अवघड ठरेल.  

ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेचच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हे मान्य करणाऱ्यांना ईश्वराने सजीव कसे निर्माण केले, सृष्टी कशी निर्माण केली याचं क्रमवार उत्तर देता येणार नाही; पण ज्याअर्थी हे सगळं दिसतं आहे त्याअर्थी हे कुणीतरी निर्माण केलं आहे हे तार्किकच आहे असा त्यांचा विश्वास असतो. 'इंटेलिजंट डिझाइन'च्या पुरस्कर्त्यांकडून मांडला जाणारा घड्याळजीचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. - एका निर्जन बेटावर जर कुणाला एक घड्याळ सापडलं तर ते तयार करणारा घड्याळजी कुठे ना कुठेतरी असणार हे सरळच आहे. त्याच न्यायाने ज्याअर्थी सृष्टी आहे त्याअर्थी सृष्टीचा निर्माता कुठे ना कुठे असलाच पाहिजे! आता या सिद्धांतातली अडचण अशी की ते विशिष्ट घड्याळ कुणी तयार केलं आहे हे माहीत नसलं तरी घड्याळ ही वस्तू कुणा मनुष्यानेच तयार केलेली आहे हे आपल्याला माहीत असतं. एखाद्या घड्याळजीला आपण भेटलेलो असतो. त्याच्याशी बोललेलो असतो. पण सृष्टीच्या निर्मितीला ते लागू होत नाही. सृष्टीच्या निर्मात्याला कुणीच भेटलेलं नाही. तिच्याशी/त्याच्याशी कुणीच बोललेलं नाही. काही सिद्धपुरुषांना, योग्यांना साक्षात्कार झाले आहेत, त्यांना देवाचं दर्शन झालं आहे असं आपण ऐकतो. पण त्या दर्शनात देवाने सृष्टीनिर्मितीची प्रक्रिया सांगितली का? डोळ्याच्या जागी डोळा कसा बसला आणि मेंदूच्या जागी मेंदू कसा बसला हे सांगितलं का? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. (आणि देव जर बोललाच तर कुठल्या भाषेत बोलेल हा आणखी एक प्रश्न!)

उत्क्रांतीच्या अभ्यासातून या प्रश्नांची सुसूत्र उत्तरं मिळावीत असा आग्रह धरला गेला तर त्यात काही वावगं नाही. (तशी उत्तरं मिळू शकतातच; पण मुख्य मुद्दा ‘कळण्या’चा आहे). ईश्वराबाबत ती/तो सर्वशक्तीमान असल्याने, तिच्या/त्याच्यापुढे आपण क्षुद्र असल्याने तिने/त्याने सृष्टीनिर्मितीचा खुलासा आपल्यापाशी करण्याचं कारणच नाही, ते आपल्या बुद्धीच्या कक्षेत येणार नाही अशी ईश्वरवाद्यांची भावना असू शकते. उत्क्रांतीच्या सिद्धांताची मात्र त्यातून सुटका नाही. आणि ईश्वरवाद्यांची अपेक्षा असली-नसली तरी एक ज्ञानशाखा म्हणून उत्क्रांतीने दिलेल्या अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं सुगम पद्धतीने लोकांसमोर मांडली जावीतच.   

मानवी उत्क्रांती हा प्रचंड गुंतागुंतीचा, डोक्याला शीण आणणारा प्रवास असला तरी यात अनेक चित्तथरारक (आणि अर्थातच प्रदीर्घ कालावधीचे) टप्पे आहेत. उदा. माणूस दोन पायांवर उभा राहिला किंवा कंठातून येणाऱ्या ध्वनीतून माणसाने शब्द विकसित केला हे अतिशय रोमांचकारक विषय ठरू शकतात. आपल्या शरीरातील विविध अवयवांची उत्क्रांती यात तर ठायी ठायी थरारकता असू शकते. आज हा अभ्यास पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. एका अर्थी तो 'बंदिस्त' आहे. त्याचं 'माध्यमांतर' करून तो लोकांपुढे आणला गेला तर लोक त्याकडे खेचले जाऊ शकतील. यूट्यूबसारख्या लोकप्रिय डिजिटल माध्यमातून आज ते काही प्रमाणात होतं आहे; पण तरी ईश्वरी कथा जशा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग झालेल्या आहेत तसं अद्याप या विषयाचं झालेलं नाही. 

डार्विनची उलघाल

आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे, विश्वाच्या पसाऱ्याला प्रयोजन आहे, आपल्या कृतींचा हिशेब मांडणारी एक पारलौकिक शक्ती आहे हा धर्मश्रद्धेतून आलेला विचार माणसांना आधार देणारा ठरला आहे. उत्क्रांतीची दिशा जो मार्ग दाखवते त्या मार्गावर अशा आधाराला जागा नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अंगभूत असा अर्थ नाही, आपल्या असण्याला प्रयोजन नाही हे मान्य करून जीवनाचा हेतू आपला आपण शोधणं, या जीवनात आनंद निर्माण करणं, जीवनेच्छा जागी ठेवणं, निश्चित उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहणं शक्य आहे हे पटवून द्यावं लागेल. आणि यासाठी वर म्हटलं तसं कल्पक व्हावं लागेल.

‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ (संपादक - नंदा खरे, रवींद्र रु. पं.) या पुस्तकात विद्यागौरी खरे यांचा ‘संधिकाळातील घालमेल’ या शीर्षकाचा एक लेख आहे. या लेखात त्यांनी जीलियन बीअर लिखित 'डार्विन्स प्लॉट्स' या ग्रंथातील एक विधान उद्धृत केलं आहे - 'क्रांती फक्त वैज्ञानिकांच्या मनात घडून चालत नाही. तिला संपूर्ण प्रामाण्य तेव्हाच लाभते जेव्हा त्याच संस्कृतीतील इतर माणसांच्या विश्वासातही क्रांतिकारक बदल घडतात'. खरे यांनी पुढे डार्विनने २२ मे १८६० रोजी ॲसा ग्रे यांना लिहिलेलं पत्र दिलं आहे. (हे पत्र 'पँडिमोनियम' या हंफ्री जेनिंग्ज लिखित ग्रंथात आढळतं). पत्र मुळातून अवश्य वाचावं. त्यात डार्विन लिहितो - सृष्टीची निर्मिती सुरचित नियमांमधून झाली असावी आणि बारीकसारीक तपशील - चांगला अथवा वाईट - भरण्याचे काम आपण ज्याला योगायोग (चान्स) म्हणतो त्यावर सोडण्यात आले असावे असे मानण्याकडे माझा कल आहे. या कल्पनेमुळे मला जराही समाधान मिळत नाही. 

विवेकवादी वृत्तीचा अंगीकार केल्यानंतर विज्ञानाच्या पलीकडच्या मानवी जाणिवांची धार बोथट झाल्याने कलांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता नष्ट झाल्याने डार्विनला वाटणारं दुःख त्याने नोंदवून ठेवलं आहे असं विद्यागौरी खरे लिहितात. त्यांनी 'पँडिमोनियम'मधली डार्विनची नोंद उद्धृत केली आहे –

माझे मन म्हणजे तथ्यांच्या प्रचंड साठ्यातून सामान्य नियम घडवणारे एक यंत्र झाले आहे. पण ह्याच्यामुळे मेंदूच्या ज्या भागात उच्च अभिरुचींचे केंद्र आहे त्याचा क्षय का व्हावा हे मला कळत नाही. ह्या अभिरुची नष्ट होणे म्हणजे आनंदाचा नाश होणे. ह्यामुळे बुद्धीला हानी पोचण्याची शक्यता आहेच; पण आपल्या स्वभावातील भावनिक वृत्ती दुर्बल बनून नैतिक व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होण्याचा धोकाही मोठा आहे.

माणूस उत्क्रांतीच्या वाटेने आज आहे तिथवर पोचला आहे हे मान्य केलं की त्याची भावनिक हतबलता, धर्मभोळेपणा, देवभोळेपणा, माणसाचा विवेक हरवणं या गोष्टीदेखील उत्क्रांतीच्याच आधारे समजून घेता येतील. आणि असं लक्षात येईल की ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडायच्या आधीपासून इंग्लंडमध्ये या विषयाबाबत लोकांमध्ये कुतूहल जागं होत असल्याची 'पँडिमोनियम' मधली उदाहरणं विद्यागौरी खरे यांनी वर उल्लेख केलेल्या त्यांच्या लेखात दिली आहेत. निरीश्वरवाद भारतीय परंपरेतही आढळतोच. यात चार्वाक तर आहेच; पण 'अचेतन जडद्रव्यच मुळात आहे, चेतन जीव हा जडद्रव्याचाच विकार किंवा जडद्रव्याचीच कार्यरूप परिणती आहे, असे मत उपनिषदकाळापासून भारतात प्रचलित आहे', 'देहाहून निराळा, मृत्यूनंतर ज्याचे अस्तित्व राहते, असा आत्मा नाही असे जडवादी मत कठोपनिषदात सांगितले आहे' असं 'जडवाद' या मराठी विश्वकोशातील नोंदीत  म्हटलं आहे. ईश्वरी अस्तित्वावर शंका घेणं ही काही अर्वाचीन घटना नाही. डार्विनने उत्क्रांतीच्या सिद्धांतामधून ही चौकट आणखी घट्ट केली आणि या अभ्यासाला आजवर न मिळालेली चालना दिली. मात्र ही वैचारिक दिशा सर्वसामान्य लोकांच्या मनाचा ठाव घेऊ शकलेली नाही. भारतासारख्या देशात आज धार्मिकतेचा रेटा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना उत्क्रांतीपुढील आव्हान मोठं आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रतिक्रियावादी न होता, धोरणी विचार करत सांस्कृतिक अवकाशात भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. धार्मिक राजकारणाने चिकित्सेचा अवकाश कमी कमी करत नेलेला असताना जडवादाचं, निरीश्वरवादाचं ‘व्यापक, लोकाभिमुख राजकारण’ कसं असावं यावर पुरेसा विचार व्हावा. ‘सांस्कृतिक अवकाशात प्रवेश’ ही या राजकारणाची पहिली पायरी ठरू शकेल.  

(लोकसत्ता, १२ फेब्रुवारी २०२५)