Saturday, March 31, 2018

का आणि कसं?

माझी एक फार जुनी इच्छा आहे. गमतीशीर वाटेल. पण आहे. रस्त्यात किरकोळ अपघात बरेचदा घडतात. एखादी गाडी दुसरीला ठोकते. कधी वेगामुळे, कधी 'ब्लाइंड टर्न'वर दोन वाहनांची टक्कर होते. आमच्या घरासमोर एक छोटा चौक आहे. तिथे असं बरेचदा घडतं. गंभीर स्वरूपाचं कधी काही घडलेलं नाही. पण किरकोळ धक्का आणि परिणामी शाब्दिक बुक्की असा एक कार्यक्रम होतो. या कायक्रमात दोघेहीजण 'मी कसा बरोबर होतो' हे प्रामुख्याने सांगत एक प्रेमळ संवाद सुरू करतात. पुलंची 'म्हैस' आठवायची झाली तर 'बा'चा'बा'ची सुरू होते! तर माझी इच्छा ही की कधीतरी आपल्याला असं दृश्य बघायला मिळेल ज्यात ज्यांचा अपघात झाला आहे ते दोघे शांतपणे 'हा अपघात नक्की का आणि कसा घडला'याची चर्चा करतील, एका निष्कर्षावर येतील आणि तोडगा काढून आपल्या वाटेने निघून जातील. आजही लोक तोडगा काढतातच, पण ती प्रक्रिया काही सुखावह नसते. 

'प्रश्न विचारण्याने आपण असा काय तीर मारणार आहोत?'असा प्रश्न प्रश्न विचारायच्या वृत्तीवर केला जाऊ शकतो असं मागच्या लेखाच्या शेवटी आपण म्हटलं होतं. त्याचं एक उत्तर म्हणून वर दिलेल्या उदाहरणाकडे आपल्याला बघता येईल. अपघात तर झाला आहे, कुणाची तरी किंवा दोघांचीही चूक तर आहेच, नुकसान तर झालंच आहे - तर आता 'हे का झालं?' हा प्रश्नच विचारला नाही तर घटनेचा उलगडा कसा होणार? पण प्रश्न न विचारल्याने 'मी बरोबर होतो. चूक त्याची आहे' या गृहीतकानेच वाद सुरू होतो. किंबहुना 'माझं बरोबरच आहे' हे गृहीत धरून जे काही बोललं जातं ती चर्चा किंवा विश्लेषण नसून 'वाद' असतो. (विचारधारांचे 'वाद' होण्याच्या मुळाशी हाच धागा असतो हे लक्षात येईल.) त्यामुळे 'अपघात कसा झाला?' हा प्रश्न विचारणं अत्यावश्यक आहे. 'मी बरोबरच होतो' हे विधान करणं अनावश्यक आहे. कारण मग विश्लेषण होऊच शकत नाही, उत्तर मिळू शकत नाही. 

'प्रश्न विचारणं' या गोष्टीचं महत्त्व अतिव्यापक आहे. मी ज्या पेनाने हा लेख लिहिला आणि नंतर ज्या कीबोर्डवर मी तो टाईप केला ते पेन, कीबोर्ड, कंप्यूटर या वस्तू निर्माण कशा झाल्या हे मला माहीत नाही. म्हणजे या वस्तू कारखान्यात तयार होतात एवढंच मला माहीत आहे. मला निर्मिती प्रक्रिया माहीत नाही. माझ्या मनात विविध विचार येतात, विकारही येतात, मी माझ्या परीने विश्लेषण करतो - हे कसं होतं, मी ते का करतो याचं निश्चित उत्तर माझ्याकडे नाही. थोडक्यात माझ्या आसपास मी पाहिलं तर मला शेकडो प्रश्नांची मालिका दिसते आणि आपण अज्ञानी आहोत ही माझी जाणीव तीव्र होत जाते. पण या प्रश्नमालिकेमुळे आणि आपण अज्ञानी आहोत या जाणिवेमुळे मी एकाच वेळी अस्वस्थ होतो आणि शांतही होतो. 

अस्वस्थ वाटतं कारण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते. पण त्याचबरोबर शांत वाटतं कारण 'आपल्याला जाणीव झाली आहे' याची जाणीव होते आणि आपला रस्ता योग्य आहे, या रस्त्याने गेलो तरच आपल्याला थोडं काही कळू शकेल हेही जाणवतं. जगात 'कारणांचा पसारा' इतका आहे की तो आवरणं जवळजवळ अशक्य आहे. पण जर माझ्या मनात प्रश्न असतील तर माझ्या कुठल्याही कृतीची प्रस्तुतता, योग्यायोग्यता ठरवायला मला मदत होते. दुसरं म्हणजे एखाद्या जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. 'आध्यात्मिक' या शब्दाला आज फार वेगवेगळे अर्थ आणि संदर्भ येऊन चिकटले आहेत. मी या शब्दाकडे 'एखादी प्रखर अनुभूती', 'मी आणि सृष्टी यांच्यातील एकत्व जाणवण्याचा क्षण', 'ज्ञानजाणीव' अशा अर्थांनी बघतो. उत्तर सापडण्याचा आनंद हा अशाच स्वरूपाचा असतो. जगातील अनेक संशोधकांना, शास्त्रज्ञांना याचा अनुभव असतो. आर्किमिडीज 'युरेका' असं ओरडत अंघोळ अर्धवट सोडून बाहेर आला ही गोष्ट आपण वाचलेली असते. पण त्या क्षणाचा आनंद फक्त आर्किमिडीजलाच माहीत असतो. हा आनंद महत्त्वाचा आहे कारण असा आनंद जेव्हा जेव्हा कुणाला झाला आहे तेव्हा माणसाने इतिहासात एक पाऊल पुढे टाकलं आहे. आर्किमिडीज किंवा इतर मोठ्या संशोधकांइतकी बौद्धिक चिकाटी आपल्याकडे नसेल, पण तरीही आपल्या ज्ञानाच्या मर्यादित परिघातदेखील हा आनंद आपल्याला मिळवता येऊ शकतो. म्हणून प्रश्न विचारण्याचं महत्त्व आहे. 

स्री-पुरूष संबंध, या दोघांची जीवशास्त्रीय आणि सामाजिक घडण, त्यांच्या लैंगिक संबंधांचं विश्व हा माझ्या आस्थेचा विषय आहे. पौगंडावस्थेपासून आत्तापर्यंत पुरूष म्हणून आणि माणूस म्हणून मी वेगवेगळ्या अनुभवांतून, जाणिवांतून गेलो. पुरूषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीवर अन्याय होतो, तिचं शोषण होतं. हे थांबलं पाहिजे. त्यासाठी पुरूषांनी पुढे यायला पाहिजे हे तर कधीच उमगलं होतं. पण 'पुरूष विशिष्ट प्रकारे वागतो ते का?' हा विचार सुरू झाला, पुरूषाच्या (आणि स्त्रीच्याही) लैंगिक मनोविश्वाचा मानवी उत्क्रान्तीच्या आधारे थोडा अभ्यास केला तेव्हा काही गोष्टी नव्याने समजल्या. 'पुरूष बलात्कार करतो' या विधानानंतर अर्थातच 'हे वाईट आहे, भयंकर आहे. पुरूषांमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे' ही विधाने येतात. पण 'पुरूष बलात्कार का करतो?' हा प्रश्न विचारला की संशोधनाची सुरूवात होते. 'संवेदना' आणि 'संशोधन' या दोन्ही परस्परपूरक गोष्टी आहेत. केवळ संवेदना असेल तर उत्तर सापडणार नाही. केवळ संशोधन असेल तर संशोधनाचा उचित उपयोग कसा करायचा, संशोधन 'राबवायचं' कसं हे कळणार नाही. संवेदनेतून कार्यकारणभाव कळत नाही. तो संशोधनातूनच कळू शकतो. 'पुरूष असा का वागतो?' हा प्रश्न आणि पुढचा अभ्यास हा माझ्यासाठी 'युरेका' क्षण होता. हेच लग्नसंस्थेबाबतही झालं. 'नवरा' हा प्रॉब्लेम नाही आहे आणि 'बायको' हाही प्रॉब्लेम नाही आहे - प्रॉब्लेम 'लग्न' हा आहे याची जाणीव झाली तेव्हा लग्नसंस्थेमध्ये लवचीकता कशी आणता येईल असा विचार सुरू झाला. स्त्री-पुरूष संबंधांचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) पाहताना प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचारला तरच आपण उत्तरांकडे जाऊ, अन्यथा संवेदनेमध्ये अडकून राहू हे जाणवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. 

प्रख्यात इतिहास संशोधक इ. एच. कार यांचं इतिहासाच्या अभ्यासाबाबतचं एक अवतरण आहे. 'व्हॉट इज हिस्टरी?' या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात की इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे तर घटनेमागच्या कारणांचा अभ्यास. खरा इतिहासकार आणि अधिक व्यापकपणे - खरा विचारवंत, म्हणजे 'का?' हा प्रश्न सतत विचारणारा मनुष्य. त्यांचं हे म्हणणं इतिहासच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील संशोधनाबाबतचं सार्वकालिक सत्य सांगतं.               

संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. तसा तो विचारला तर आपल्याला नव्या वाटा सापडतात. आपल्यापैकी प्रत्येकाची काही बलस्थाने आहेत, काही मर्यादा आहेत. व्यक्तिशः आपण जगात किती सकारात्मक बदल घडवू शकतो हे सांगता येणार नाही. पण प्रश्न विचारायची, विविध बाजूंनी विश्लेषण करण्याची वृत्ती जरी आपण अंगिकारली तरी याचा एकत्रित परिणाम म्हणूनसुद्धा अनेक गोष्टी सुकर होतील. 

Saturday, March 17, 2018

प्रश्न प्रश्न विचारण्याचा आहे

'तत्त्वज्ञान म्हणजे काय?' हा प्रश्न म्हणजे तत्त्वज्ञान स्वतः प्रत्येक गोष्टीबाबत जो प्रश्न विचारतं त्याच प्रकारचा  प्रश्न आहे. त्याची विविध अंगांनी उत्तरेही दिली गेली आहेत. मला स्वतःला तत्त्वज्ञान म्हणजे संकल्पनांची चर्चा, संकल्पनांचे विश्लेषण आहे असं वाटतं. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते या विश्वाचा घटक असलेल्या माणसाच्या मनापर्यंतचे अनेक विषय तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येतात. गेल्या काही शतकांतील वैज्ञानिक संशोधनाने तत्त्वज्ञानाच्या कक्षेतील काही प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आणले. माणसाला दुःख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो, पण दुःख नामक जाणीव जेव्हा होते तेव्हा मानवी मेंदूत नक्की काय घडतं, कोणती रसायने स्रवतात हे विज्ञान शोधू शकतं. दुःखाप्रमाणेच इतर भाव-भावनांनाही हे लागू होईल. मानवी जाणिवेचा संपूर्ण खुलासा, जाणिवेचं संपूर्ण आकलन अजून झालेलं नसलं तरी जाणीव ही गूढ अशी बाब नसून ती मुळात भौतिक गोष्ट आहे, रासायनिक क्रियांचा जाणीव हा परिणाम आहे इथपर्यंत विज्ञान आलं आहे. विज्ञान सततच्या प्रयत्नांतून अनेक गुंते सोडवू शकतं. त्यामुळे आपल्या सर्व समस्यांवरचा मार्ग विज्ञानच दाखवू शकेल याविषयी शंका नसली तरी तत्त्वज्ञान संकल्पनात्मक, मूल्यात्मक झगड्यात कळीची भूमिका बजावत असल्याने आपण तत्त्वज्ञानाला टाळू शकत नाही. तत्त्वज्ञान हा शब्द आणि हा विषय रूक्ष किंवा अवघड वाटला तरी प्रत्येक व्यक्ती जगताना तिचं तिचं म्हणून एक तत्त्वज्ञान घेऊनच जगत असते. व्यक्ती जे लहान-मोठे निर्णय घेते त्याला तिच्या तत्त्वज्ञानाचाच आधार असतो. 

लेखाच्या सुरुवातीलाच तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावासा वाटला याला कारणही तसंच आहे. मी एक चांगला संशयात्मा आहे. त्यामुळे 'आपल्याला आत्ता जे वाटतंय ते बरोबर आहे का?' हा प्रश्न माझ्या मनात वरचेवर येत असतो. आपण काहीएक मत-निरीक्षण-विचार मांडतो. यात समता व स्वांतत्र्यासारख्या मूलभूत मूल्यांना उचलून धरणारे जे विचार आहेत त्यांच्याबाबत मला शंका नसते, पण इतर बाबतीत मनामध्ये संघर्ष होत असतो. खरं तर समता व स्वांतत्र्य या संकल्पनांबाबतही प्रत्यक्षातील मानवी जगण्याच्या संदर्भात, या संकल्पनांच्या नेमक्या अर्थाच्या संदर्भात चर्चा होऊ शकते. पण या मूल्यांचे जे साधारण स्वरूप आहे त्याबाबत मूलभूत तात्त्विक मतभेद नाहीत हे खरं. इतर बऱ्याच बाबतीत (म्हणजे सामाजिक विश्लेषणासंदर्भात) होतं असं की सामाजिक, आर्थिक, राजकीय बले इतकी जोरदार असतात की आपण नक्की कुठल्या स्थानावरून बोलायचं असा प्रश्न पडतो. 

गेल्या दोन लेखांमध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत लिहिल्यानंतर असं जाणवलं की या विशिष्ट विषयाचा संबंध माणसाच्या मानसिक घडणीशी, त्याच्या सामाजिक स्थानाशी आहे हे खरं पण या सगळ्याची नोंद घेऊन, आपल्या मनातील विचारकलहाला लक्षात घेऊन आपल्याला एका ‘किमान साधारण भूमिके’वर यावं लागतं. असं नाही केलं तर परिवर्तनाचा मार्गच आखला न जाण्याची भीती असते. 

ही ‘किमान साधारण भूमिका’ कोणती? तर 'प्रश्न विचारणं' ही ती भूमिका आहे. मला वाटतं की दिवसाच्या शेवटी आपल्याला एखाद-दोन तरी प्रश्न पडले असतील तर तो दिवस कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही! आणि ते प्रश्न फार अवघड असावेत असंही नाही. जग निर्माण कसं झालं किंवा सजीव निर्माण कसे झाले हे मोठे प्रश्न आहेत. पण रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नदेखील पडावेत. प्रश्नांची ही रेंज कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इथपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत असू शकते, असावी. सॉक्रेटिस या ग्रीक तत्वज्ञाची प्रश्न विचारून गोष्टी समजून घ्यायची पद्धत होती. 'सॉक्रेटिक डिबेट' या नावाने ती ओळखली जाते. एखाद्या विधानाची, मताची, दृष्टीकोनाची वेगवेगळ्या बाजूंनी, तर्कशास्त्राचे निकष लावूनउलटतपासणी करणे हे यातलं मुख्य सूत्र आहे. पद्धतीच्या तपशीलात जायची आवश्यकता नाही, पण यातला गाभा लक्षात घ्यायला हवा. प्रश्न विचारणे आणि त्यातून 'क्रिटिकल थिंकिंग' (विश्लेषणात्मक विचारपद्धती) विकसित करणे हा तो गाभा आहे. माणसाच्या उत्क्रान्तीच्या प्रवासात त्याने दोन प्रवृत्ती जपलेल्या आहेत. एक म्हणजे 'फाईट' आणि दुसरी म्हणजे 'फ्लाईट'. पहिली प्रवृत्ती त्याला आव्हानांशी लढायला लावते आणि दुसरी त्याला आव्हानांपासून पळून जायला लावते. आदिम संदर्भात या दोन्हीमध्ये चूक-बरोबर ठरवणं अप्रस्तुत होईल. कारण जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता या दोघातलं जमेल ते करणं भाग होतं. या प्रवृतीचे अंश माणसात आजही दिसतात. आपल्या इतरही भाव-भावना आदिम स्वरूपात आजही टिकून आहेत. परंतु या आदिम भाव-भावानांबरोबरच माणसाने प्रश्न विचारायची वृत्ती जागी ठेवली म्हणून तो पुढे येऊ शकला. आता त्याने केलेली प्रगती नेत्रदीपक असली तरी त्यातून नवीन आव्हाने उभी राहतात हा मुद्दा आहे, पण ही प्रगती साध्य करणं हे निश्चितच उल्लेखनीय आहे, गौरवास्पद आहे. या प्रगतीचे लाभार्थी पुष्कळजण आहेत. तुम्ही-मी सगळेच. मात्र गंमत ही आहे की आपण या लाभाचे धनी होण्यातच धन्यता मानतो आहोत. आपण स्वतः कदाचित तांत्रिक प्रगतीत योगदान देऊ शकणार नाही कारण त्या विषयातलं ज्ञान आपल्याकडे नाही. परंतु आपला दृष्टीकोन तरी चिकित्सक असू शकतो? ज्याला आपण 'शिक्षण' म्हणतो ते केवळ विषयांचं ज्ञान देणारं नसून 'विश्लेषक बुद्धी' विकसित करणार असावं अशी अपेक्षा तर आपण ठेवू शकतो?

परंपरा आणि परंपरेनुसार वर्तन माणसाला एक 'जमीन' मिळवून देतं हे मान्यच आहे, परंतु अधिकाधिक लोकांनी जर नवीन विचार केला, परंपरेला प्रश्न विचारले तर नवीन जमीन तयार होईल. ही मशागत झाली नाही तर नवीन काही पिकणार कसं? हे लिहिताना मला एक प्रसंग आठवला. शाळेतल्या एका जुन्या मित्राकडे गेलो होतो. त्याची बायको (तीही आमची वर्गमैत्रीण) त्यांच्या लहान मुलीचं डोकं देवापुढी टेकवायचा प्रयत्न करत होती. फार गमतीदार दृश्य होतं. ती मुलगी बिचारी काही केल्या डोकं टेकवायला तयार नव्हती. (कारण तिला मुळात काही कळतच नव्हतं). आणि माझी मैत्रीण मात्र तिला मूर्तीपुढे नतमस्तक करून सोडायच्या हट्टाला पेटली होती. माझ्या मनात विचार आला की हा आग्रह कशासाठी? माणसामध्ये नम्रता असायला हवी हे योग्यच आहे, पण ती अशाच पद्धतीने येऊ शकते का? मला स्वतःला मूल नसल्याने मला काही प्रश्नांचा सामना करावा लागलेला नाही. पण जर कुणा लहानग्याने मला प्रश्न केला की 'देव असतो का?' तर मी 'माहीत नाही' म्हणेन. देव, धर्म, जन्म, मृत्यू, सामाजिक विषमता या व इतर विषयांबाबत आपण मुलांशी स्पष्टपणे बोलायला हवं. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यापासून लपवून ठेवतो आणि काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यावर लादतो. 'जर मला शिक्षा करणारी देव नामक व्यक्ती किंवा शकी नाहीच आहे तर मी चांगलं का वागू?' असा प्रश्न जर कुणी केला तर किंवा कुणाचं वर्तन अनिर्बंधतेच्या दिशेने जाताना दिसलं तर मी जे उत्तर देईन ते माणूस म्हणूनच्या माझ्या बौद्धिक उंचीचं मोजमाप करणारं असेल. माणूस म्हणून मी माझ्या स्वतःच्या आणि इतरांबरोबरच्या जगण्याचं नियमन करू शकलो, त्याला सकारात्मक वळण देऊ शकलो, तर्काचा आग्रह धरतानाच मानवी जगण्याला जो संवेदनेचा ओलावा लागतो तो टिकवून ठेवू शकलो तर माणूस म्हणूनच ते माझं श्रेय असेल. माझ्या प्रश्नांचं, माझ्या दुःखाचं, अडचणीचं उत्तर शोधायला - किमान त्यांचं नियमन करायला मला अदृश्य शक्तीवर विसंबून राहायला लागत नाही, माझ्या आसपासची माझ्यासारखी माणसंच ते काम करू शकतात हे जर शक्य झालं तर आणखी काय हवं?

प्रश्न विचारणं हे ठीक, पण प्रश्न विचारून तरी आपण असा काय तीर मारणार आहोत असा एक प्रश्न येऊ शकेल. त्यावर पुढील लेखात बोलूया.