Saturday, October 27, 2018

पॉलीॲमरी : तिघांची आनंदी गोष्ट

४ नोव्हेंबर २०१७ च्या चतुरंग पुरवणीत 'पॉलीॲमरी' या विषयावर मी एक लेख लिहिला होता. एकाहून अधिक व्यक्तींशी असणारे गंभीर प्रेमसंबंध आणि सर्व संबंधित व्यक्तींना त्याबाबतची स्पष्टता हा पॉलीॲमरीचा गाभा आहे. त्या लेखात संकल्पनात्मक मांडणी झाली होती. या लेखात 'अंमलबजावणी' विषयी विचार करू.  

बहुविध प्रेमसंबंध स्वीकारण्यासाठी प्रगल्भ मानसिकतेची आवश्यकता असते ते आपण आधीच्या लेखात पाहिलं आहे. आता असं गृहीत धरू की अशा नात्यांमध्ये काही व्यक्ती आहेत. तर त्यांनी हे पुढे कसं न्यायचं? इथे दोन शक्यता आहेत. जर सर्व संबंधित व्यक्ती एकमेकांचे नातेसंबंध स्वीकारत असतील तर प्रश्नच नाही. पण जर काहींना असे संबंध मान्य नसतील तर ते अडचणीचं होतं. आणि मग जे पॉलीॲमरस आहेत त्यांनी इतरजण तयार होईपर्यंत वाट पाहणं इष्ट ठरतं. आज आपण समाज म्हणून या संकल्पनेसाठी तयार नाही आहोत. त्यामुळे जे तयार आहेत त्यांना अस्तित्वात असलेले नातेसंबंध टिकवून नव्या नातेसंबंधात जायचं असेल तर त्यांच्याकडे वाट पाहण्याशिवाय अन्य पर्याय नसतो. अन्यथा एक नातं थांबवून दुसऱ्या नात्यात जायचा निर्णय घेता येतोच, पण मग ते मोनोगॅमस होतं. 

या व्यवस्थेचा स्वीकार करण्यातली प्रमुख अडचण प्रेमातील पझेसिव्हनेस ही आहे. आणि तो कसा घालवायचा याकरता कुठलंही रेडिमेड उत्तर नाही. सतत बोलत राहून, एकत्र राहण्याचे प्रयोग करत राहून हा बदल होऊ शकतो. यात परिस्थितीच्या आवश्यकतेनुसार भावनिक व लैंगिक दोन्ही प्रयोग करता येतील. त्यावर प्रत्येकाने आपापल्या मानसिक तयारीनुसार विचार करावा व कृती करावी. आपल्या मानसिकतेत पझेसिव्हनेसची भावना खूप खोलवर रुजल्याने ती सहजासहजी बाजूला काढणं अवघड आहे. पझेसिव्हनेस (मालकी हक्क) आणि जेलसी (मत्सर) या दोन्ही भावना एकमेकींना समांतर चालत असतात. आहार, निद्रा, भय, मैथुन या आदिम जाणिवांचा विस्तार होऊनच राग, द्वेष, मत्सर, प्रेम या भावना निर्माण झाल्या आहेत. आपल्या मेंदूत जे जे काही निर्माण होतं त्याचा धागा आपल्या उत्क्रांतीच्या वाटचालीशी जोडलेला आहे. त्यात पुन्हा स्त्री आणि पुरूष असा फरकही आहे. त्यामुळे आपल्या भावनांमुळे विचलित न होता 'हे मला वाटत नाही तर माझ्या मेंदूतल्या न्यूरॉन्सना वाटतंय' असा विचार केला तर आपण आपल्या भावनांना चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. हाच धागा पकडून मालकी हक्क आणि मत्सर या भावनांवरही काम करता येऊ शकेल. दुसरं म्हणजे आपलं प्रेमाचं माणूस आधी 'स्वतंत्र माणूस' आहे हे मनात रूजवायचा प्रयत्न केल्यानेही मदत होईल.   

एक गोष्ट लक्षात घेऊया की व्यक्तींची बलस्थाने आणि कमकुवत स्थाने ही व्यक्तींनी एकत्र येऊन लावलेल्या व्यवस्थेचीही बल स्थाने आणि कमकुवत स्थाने असतात. त्यामुळे कोणत्याही व्यवस्थेला एकच एक ठरीव साचा असत नाही. हेच बहुविध नातेसंबंधांनाही लागू होतं. त्या त्या उदाहरणातील व्यक्तींच्या स्वभावानुसार, सामर्थ्य व कमकुवतपणानुसार त्या त्या उदाहरणातील व्यवस्थेच्या स्वरूपात फरक पडू शकेल. सर्वजण एकत्र राहत असतील तर ही व्यवस्था परिणामकारक ठरते. पण काही ठिकाणी एकत्र न राहताही ती व्यवस्था चांगली चालू शकते. त्यामुळे मुळात व्यवस्था लवचीक असणं चांगलं. (स्त्री-पुरूष संबंधांबाबत इथून पुढे लवचीक व्यवस्थाच परिणामकारक ठरतील असं एकूणात दिसतं.) व्यक्ती एकत्र राहिल्या तर घर चालवण्यासाठी जे करावं लागतं त्या सर्व कामांची विभागणी तर करावी लागेलच आणि प्रत्येक नात्याचं स्वरूप आणि त्यानुसार वेळेची विभागणी हेही करावं लागेल. व्यक्ती एकत्र राहत नसतील तर दैनंदिन कामांचा मुद्दा न येता वेळेच्या विभागणीचा मुद्दा फक्त येईल.   

व्यक्तींमधले संबंध निभावणं यात जशी व्यक्तींमधील प्रगल्भताच मुख्य भूमिका पार पाडते तेच मुलांबाबतही लागू होईल. मुलांसाठी जैविक आई-वडील अर्थातच अग्रस्थानी असतील आणि इतरजण दुय्य्म स्थानी - पण घरातील / नात्यातील सदस्य म्हणून असतील. यातली एक महत्त्वाची बाजू ही की लहानपणापासूनच नातेसंबंधांच्या अशा नव्या स्वरूपाची ओळख मुलांना झाली तर त्यांची वाढही या व्यवस्थेला पूरक होईल आणि प्रेमभावनेतील मुक्तता पहिल्यापासूनच अनुभवल्याने त्याची त्यांना मोठेपणी मदत होईल. 

अशा प्रकारच्या नात्याची कल्पना आसपासच्या लोकांना, नातलगांना द्यावी की न द्यावी या प्रश्नाचे उत्तरही एकसाची नाही. ज्यांना ही गोष्ट पचनी पडणं शक्य नाही त्यांना हे सांगावं की सांगू नये हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. इथे प्रश्न नैतिकतेचा नाही. 'काही प्रामाणिक इच्छा आणि इतरांची अपुरी तयारी' असा हा संघर्ष आहे. त्यामुळे इथे काहीएक मध्यममार्ग काढावा लागेल. ही गोष्ट हळूहळू समजावूनही सांगता येईल. त्यासाठी उपलब्ध साहित्याचा आधार घेता येईल. गटचर्चा घेता येतील. आपल्या मनातील विविध भावनांबाबत आपली 'साक्षरता' (इमोशनल लिटरसी) कशी वाढेल यासाठी प्रयत्न करता येतील. माणसाचं एक सत्य असं आहे की तो प्रेमाचा भुकेला असतो. त्याला स्वतःचं एक माणूस हवं असतं. ज्यांना पॉलीॲमरी ही संकल्पना स्वीकारायला जड जाते त्यांना हा विश्वास मिळाला की ही प्रेमाची व्याप्ती वाढवणारी संकल्पना आहे, सर्वसमावेशक संकल्पना आहे, यात कुणा एकाला डावलण्याचा प्रश्नच येत नाही, तर त्यांची पावलं हळूहळू स्वीकृतीकडे पडू शकतात.  

एखादा नवा विचार आणि त्याअनुषंगाने नवीन व्यवस्था हा 'पॅराडाइम' (पॅटर्न, साचा) मधला बदल असतो. माणसाच्या इतिहासात वेगवेगळ्या टप्प्यांवर हे बदल घडलेलेच आहेत. कुटुंबव्यवस्थाही त्याला अपवाद नाही. पॉलीॲमरी हाही एक बदल आह. ही व्यवस्था सार्वत्रिक होईल किंवा होणारही नाही. झाली तर भविष्यात तिला कायदेशीर मान्यताही मिळू शकेल. आजचा मुद्दा इतकाच आहे की जर काही (मोजक्या) लोकांना काही वेगळं वाटत असेल तर त्याचा शोध घ्यायची, त्याबाबत प्रयोगशील असण्याची मुभा त्यांना असावी. अडचण अशी होते की पारंपरिक व्यवस्थेतील लोकांना त्या व्यवस्थेबाहेरचं काही दिसलं की ते त्यांना चुकीचं वाटतं. त्यांना 'वेगळं' वाटणं, स्वीकारता न येणं हे मान्यच आहे, पण 'चुकीचं' वाटत असेल तर अडचण आहे. समूहकेंद्री, संस्कृतीकेंद्री, धर्मकेंद्री विचारांनी अस्मितेचा अभिमान गौरवास्पद ठरवला आहे. त्याकरता प्रसंगी हिंसेलाही मूक संमती दिली आहे. पण प्रेमासारख्या मुक्तिदायी भावनेला मात्र बंदिस्त केलं गेलं आहे. तिथे काही वेगळं करायला बंदी आहे. (इथे मला 'प्रेमाचं होऊ द्या ना जागतिकीकरण' असं म्हणणारे कवी अरूण काळे आठवले!) मला असं वाटतं की बहुविध नातेसंबंधांची चर्चा करताना प्रेमभावनेमधील मोकळिकीचा मुद्दा आज जे प्रौढ आहेत, ज्यांची काहीएक मानसिकता तयार झाली आहे त्यांच्यापेक्षा जे तरुण, टीनएजर्स आहेत, जे नव्याने गोष्टी समजून घेत आहेत त्यांच्यापर्यंत पोचवणं गरजेचं आहे. लहान मुलांना वाढवतानाही आपण आपल्याला जे अप्रिय वाटतं त्याविषयी बोलायचं टाळतो. तिथेही जर आपण बदल केला आणि विविध विषयांना नेहमीच मूल्यात्मक दर्जात किंवा मूल्यनिर्णयात न गुंतवता 'जे आहे ते' मांडायचा प्रयत्न केला तर मुलंही कप्पेबंद विचार करणार नाहीत. बदलाच्या मानसिकतेचा संबंध वयाशी असतोच असं नाही हे खरं आहे, पण जर पाटी कोरी असेल तर नवीन चित्र काढायला अधिक अवकाश मिळतो हेही खरंच!

Wednesday, October 24, 2018

मानवी तस्करी, वेश्याव्यवसाय आणि आपण  

एप्रिल २०१८ मध्ये मुंबईतील लॅमिंग्टन रोडवरील ओम निवास या इमारतीवर पोलिसांनी रात्री धाड टाकली होती. या परिसरात वेश्याव्यवसाय चालतो आणि इथे धाडसत्र सुरूच असतं. पण या धाडीदरम्यान घडलेली वाईट गोष्ट ही की पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करताना दोन वेश्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मरण पावल्या. दोरखंडाच्या साहाय्याने इमारतीच्या मागील बाजूने खाली उतरण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. त्यांची वयं ५० व ३१ अशी होती. या घटनेची बातमी मुंबई मिररमध्ये १२ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाली आहे. पोलिसांच्या धाडी ही वेश्यांच्या डोक्यावर असलेली सततची टांगती तलवार असते. यात त्यांना वरचेवर अपमानाचा, दबावाचा सामना करावा लागतो. यातून सुटण्याचा प्रयत्न करताना दोघींचा मृत्यू व्हावा हे आणखी भयंकर आहे.

वेश्या आणि वेश्याव्यवसाय हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. समाजातील काही व्यावसायिक अतिशय हलाखीचं जिणं जगतात आणि समाज म्हणून आपल्यासाठी ते लाजिरवाणं आहे. गटार सफाई करणारे कामगार, वेश्या ही याची काही उदाहरणं आहेत. कोणत्याही व्यवसायामागचं प्रमुख कारण आर्थिक गरज हे असतं. वेश्याव्यवसायाचंही तसंच आहे. मात्र या संदर्भाने वेश्या ढोबळमानाने दोन गटात विभागल्या गेल्या आहेत. बळजबरीने व्यवसायात आणल्या गेलेल्या आणि आणि स्वेच्छेने व्यवसाय करणाऱ्या. आजचा भारतीय कायदा एकट्या स्रीने स्वेच्छेने वेश्याव्यवसाय केला तर तो गुन्हा समजत नाही. पण एकाहून अधिक स्रियांनी एकत्र व्यवसाय करणे, घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी व्यवसाय करणे गुन्हा आहे. व्यवसायासाठी 'सॉलीसिटिंग' करणं हा गुन्हा आहे. वेश्येने कमावलेल्या पैशावर उदरनिर्वाह करणं हाही गुन्हा आहे.

पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत 'सहेली' ही 'सेक्स वर्कर्स कलेक्टिव्ह' गेली वीस वर्षे विविध प्रश्नांवर काम करते आहे. वेश्यांचं आरोग्य, त्यांचं समुपदेशन, नागरिक म्हणून त्यांचे हक्क त्यांना मिळवून देणे यावर आणि वेश्याव्यवसायाबाबत समाजाचा दृष्टीकोन बदलावा यासाठी 'सहेली' काम करते आहे. भारत सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयातर्फे The Trafficking of Persons (Prevention, Protection and Rehabilitation) Bill, 2017 नुकतंच संसदेत सादर झालं आणि मंजूरही झालं. या बिलासंदर्भात नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्स वर्कर्स (एनएनएसडब्ल्यू) या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने तपशीलात एक टिपण तयार केलं होतं. त्यात प्रामुख्याने बिलातील तरतुदींवर तपशीलात प्रतिक्रिया दिली गेली आहे. याखेरीज 'सहेली'साठी मी एक टिपण तयार केलं होतं. ते इथे देत आहे. वेश्याव्यवसायाशी संबंधित 'फोर्स्ड रेस्क्यू' (सक्तीची मुक्ती) या एका मुख्य मुद्द्यावर वाचकांना प्राथमिक माहिती मिळावी हा यामागचा उद्देश आहे. मुद्दा थोडक्यात पोचावा यासाठी काही भाग गाळला आहे. -

वेश्याव्यवसायाचे वास्तव लक्षात न घेता प्रस्थापित नैतिकतेच्या चौकटीतूनच या व्यवसायाकडे नेहमी पाहिले जाते आणि ते अडचणीचे आहे. वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघितले जात नाही. या व्यवसायात स्रिया स्वेच्छेने व बळजबरीने दोन्ही प्रकारे येतात. परंतु कायद्याचा दृष्टीकोन आजवर 'या स्रियांची आज इच्छा काय आहे हे लक्षात न घेता त्यांना या व्यवसायातून 'मुक्त' करणे, त्यांचे पुनर्वसन करणे - मुळात वेश्याव्यवसायाचे उच्चाटन करणे असाच राहिलेला आहे. वेश्याव्यवसाय म्हणजे ट्रॅफिकिंग असे साधारण समीकरण तयार केले गेले आहे. पण ते वस्तुस्थितीला धरून नाही. या व्यवसायात काही स्रिया स्वेच्छेने येतात हे लक्षात घेतले जात नाही. त्यामुळे शासनाच्या दृष्टिकोनात मोठी गफलत आहे. प्रस्तुत बिलदेखील याच दृष्टीकोनातून तयार केले गेले आहे आणि त्यामुळेच त्यावर सविस्तर टिप्पणी करणे आवश्यक आहे.

बिलातील तरतुदींनुसार गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल याची आम्हाला धास्ती वाटते आहे. विविध गावा-शहरातील वेश्यावस्त्यांवर छापे घालून व्यवसाय बंद करण्याची कारवाई शासनाकडून केली जाईल हे स्पष्ट आहे. या बिलाद्वारे जिल्हा कृती दल (डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स) स्थापन करण्यात येऊन त्यांना अमर्याद अधिकार दिले जाणार आहेत. पोलीसांकडून वेश्यांवर सातत्याने आपल्या अधिकारांचा वापर (गैरवापरदेखील) होत असतो. त्यात भर घातली गेली तर वेश्यांचे प्रश्न आणखी चिघळतील. वर उल्लेख केला आहे त्याप्रमाणे या व्यवसायाचे वास्तव समजून न घेता या स्रियांना व्यवसायातून बाहेर काढण्याचीच घाई होताना दिसते. एक उदाहरण घेऊ. पुण्यातील बुधवार पेठेत आज सुमारे तीन हजार स्रिया वेश्याव्यवसाय करत आहेत. या स्रियांचा व्यवसाय बंद केला तर त्या कुठे जातील आणि काय करतील याचा विचार शासनाने केला आहे का? वेश्यांची संख्या लक्षात घेता या स्रियांना 'मुक्त' केले तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न शासन सोडवणार आहे का? मुळातला प्रश्न हा आहे की एखाद्या स्त्रीला बळजबरीने या व्यवसायात आणले गेले असेल तर तिला इच्छेविरुद्ध आणले गेले हे उघडच आहे. अशा प्रकारे फसवून, बळजबरीने कुणालाही या व्यवसायात आणायला 'सहेली'चा विरोधच आहे. पण आज ती वेश्याव्यवसाय करते आहे आणि अर्थार्जन करते आहे. व्यवसायात येताना तिची इच्छा विचारात घेतली गेली नव्हती, तिचे शोषण झाले होते. मग त्यावेळी जर तिला कुणी मदत करू शकले नव्हते तर आज ती व्यवसायात स्थिरावल्यावर तिच्या व्यवसायाकडे नैतिकतेच्या चष्म्यातून बघत तिला व्यवसाय सोडण्यास सांगणे योग्य आहे का? व्यवसायात येताना तिच्यावर बळजबरी झाली होती तशीच आता व्यवसाय सोडतानाही करायची का? बळजबरीने व्यवसायात आणणे हे शोषण आहे तसेच बळजबरीने व्यवसायाबाहेर काढणे हेदेखील शोषणच नाही का?

आज जी वेश्यावस्ती दिसते त्यात 'ट्रॅफिकिंग' होऊन गेलेल्या' स्रिया राहत आहेत. त्यांचे प्रश्न आज वेगळे आहेत. ट्रॅफिकिंग होऊच नये यासाठी बिलात जे उपाय (Preventive measures) योजले आहेत ते अतिशय ढोबळ स्वरूपाचे आहेत. उदा. facilitating the implementation of livelihood and educational programmes for vulnerable communities किंवा developing appropriate law and order framework to ensure prevention of trafficking of persons यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचे नक्की कुठले कार्यक्रम आहेत किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचे योग्य फ्रेमवर्क म्हणजे नक्की काय या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. वेश्याव्यवसायात स्वेच्छेने येणाऱ्या स्रिया आर्थिक कारणांनी येतात. ज्या स्वेच्छेने येत नाहीत त्याही आर्थिक कारणांमुळेच या व्यवसायात ढकलल्या जातात. या व्यवसायाच्या मुळाशी इतर कुठल्याही व्यवसायाच्या मुळाशी असतो तो आर्थिक उद्देशच प्रबळ आहे. ट्रॅफिकिंग थांबवायचे असेल तर ज्या स्रियांना बळजबरीने व्यवसायात आणले जाते त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आपल्याला कुणी फसवू नये यासाठी त्यांची व्यावहारिक समज वाढवणे, मुलींना समर्थ बनवणे, आसपासच्या लोकांना सजग करणे अशा अनेक आघाड्यांवर काम करणे गरजेचे आहे. त्याबाबतचा काही कृतिकार्यक्रम बिलामध्ये दिलेला नाही. एक गोष्ट खरी आहे की समाजातील आर्थिक विषमता कमी होणे, कुटुंब नियोजनासाठी सामाजिक प्रबोधन होणे या गोष्टी संथगतीने होतात. शासन याबाबतीत एका मर्यादेपर्यंतच काम करू शकते हेही मान्य. पण जर मुळापाशी काम करण्याची क्षमता मर्यादित असेल तर खोडावर घाव घालण्यात काय अर्थ आहे? वेश्यागृहांना टाळे ठोकून ट्रॅफिकिंग थांबणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

शासनाच्या या बिलाबद्दल आणि वेश्याव्यवसायाबाबत शासनाचे जे एकूण धोरण आहे त्याला आक्षेप असण्याचे एक कारण हेही आहे की शासन पुनर्वसनाचा पुरस्कार करते, पण पुनर्वसन झालेल्या वेश्यांची उदाहरणे दिसत नाहीत. आज सुधारगृहांची अवस्था वाईट आहे. पुनर्वसन योजनांना प्रश्न विचारायची गरज आहे. कायमस्वरूपी, मुख्य प्रवाहात आणल्या गेलेल्या स्रियांची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाचा पुनर्वसनाचा आग्रह कमकुवत पडतो.

याबाबत एक महत्त्वाचा मुद्दा शासनाच्या निदर्शनास आणून द्यायला हवा. शासनाला जर खरोखरच ट्रॅफिकिंग रोखायचे असेल तर त्यासाठी वेश्याव्यवसायातील स्रिया मदत करू शकतील. त्यातील ज्या स्रिया स्वतः त्या अनुभवातून गेल्या आहेत त्यांना ट्रॅफिकिंगबाबतचे बारकावे माहीत आहेत. 'एनएनएसडब्ल्यू'च्या सभासद संघटनांनी शासनाला याबाबत मदत केली आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की वेश्येच्या डोक्यावर पोलीस पकडून तरी नेतील किंवा जबरदस्तीने सोडवतील तरी या भीतीची टांगती तलवार आहे. तिच्या डोळ्यासमोर शासनाचं जे चित्र आहे तेच मुळात तिला घाबरवणारं आहे. अशा परिस्थितीत या स्त्रियांच्या मनात शासनाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करणे ही शासनाची जबाबदारी आहे. यातून ट्रॅफिकिंग रोखण्याचा मार्गही सुकर होऊ शकतो. शासनाने हे कृपया लक्षात घ्यावे.

प्रस्तावित बिलाच्या पार्श्वभूमीवर आमची भूमिका सारांशाने अशी आहे -

  • शासनाने मानवी तस्करी विरोधात कारवाई जरूर करावी, पण वेश्याव्यवसायाविरुद्ध कारवाई करू नये. वेश्याव्यवसायाला गुन्हा समजू नये.
  • वेश्याव्यवसायाबाबतचे धोरण/कायदा ठरवताना या व्यवसायातील व्यक्ती, त्यांच्या संघटना, राष्ट्रीय पातळीवरील नेटवर्क यांना सहभागी करून घ्यावे. आज तसे होत नाही आहे.
  • शासनाने हे लक्षात घ्यावे की वेश्याव्यवसाय एकटीने करण्याऐवजी एकत्रितरित्या करणं स्रियांना अधिक सुरक्षित वाटतं. शिवाय वेश्यावस्तीत या स्रिया ज्या घरात राहतात त्या घरांच्या मालकिणी-मालक, वस्तीतले दलाल हे सगळे नेहमीच शोषण करणारे नसतात असे स्रियांचे अनुभव सांगतात. वस्तीमध्ये या स्रियांसाठी एक सपोर्ट सिस्टीम तयार झाली आहे. हे वास्तव लक्षात न घेता ट्रॅफिकिंग रोखण्याच्या नावाखाली वेश्याव्यवसायावरच कारवाईचा बडगा उगारणे चुकीचे आहे.
  • वेश्याव्यवसायाकडे 'व्यवसाय' म्हणून बघावे. इतर व्यवसायांसारखा हा व्यवसाय आहे हे मान्य केले की मग त्यानंतर पुढच्या गोष्टी घडू शकतील.
  • वेश्याव्यवसायाचा संबंध लैंगिक व्यवहाराशी आहे आणि लैंगिक व्यवहाराकडे समाज म्हणून आपण स्वच्छ दृष्टीने बघत नाही ही एक मुख्य अडचण आहे. त्यामुळे स्वेच्छेने हा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडेही आपण सकारत्मकतेने पाहू शकत नाही. शासनाच्या वेश्याव्यवसायाबाबतच्या धोरणात याच मानसिकतेचे प्रतिबिंब पडलेले दिसते. या मानसिकतेत बदल होण्याची गरज आहे.
  • एखादी स्री स्वेच्छेने वेश्याव्यवसाय करत असेल तर ती तो स्वेच्छेने करत नाही, नाईलाजाने करते आणि म्हणून त्यात खऱ्या अर्थाने 'स्वेच्छा' नाहीच असा युक्तिवाद बरेचदा केला जातो. या युक्तिवादातील अडचण अशी आहे की स्वेच्छेचा मुद्दा केवळ वेश्याव्यवसायालाच नव्हे तर इतरही व्यवसायांना लागू होतो. अनेकजण नाईलाज म्हणून नोकरी-व्यवसाय करत असतात. पण त्या व्यवसायांबाबत हा युक्तिवाद केला जात नाही. याचे कारण पुन्हा लैंगिक व्यवहाराकडे पाहण्याची दृष्टी हेच आहे. विवाहाव्यतिरिक्त येणारे लैंगिक संबंध अनैतिक मानले जाणे यातच मुळात घोळ आहे. लैंगिक संबंध ही नाजूक गोष्ट आहे, त्यात काळजी घ्यायला हवी, मानवी संबंध व समाजव्यवस्था यादृष्टीने लैंगिक व्यवहारांचे नियमन करणे आवश्यक आहे हे मान्यच आहे, पण म्हणून लैंगिक व्यवहारच मोडीत काढणे योग्य नाही. हे लैंगिक व्यवहार पैशाच्या आधारे, व्यवसाय म्हणून, व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य याची काळजी घेऊन होत असतील तर त्यांना विरोध करण्याचे काही कारण नाही.
  • लैंगिक गरज ही माणसाची गरज आहे. लग्नसंस्थेमार्फत या गरजेचे नियमन काही अंशी केले जात असले तरी ते पूर्णतः केले जात नाही. लग्नसंस्थेच्याबाहेर असणाऱ्या व्यक्तींची लैंगिक गरज हाही एक मुद्दा आहेच. वेश्याव्यवसाय अस्तित्वात आहे कारण विविध व्यक्तींच्या, वयाच्या विविध टप्प्यांवरील लैंगिक गरजेची व लैंगिक आकांक्षांची पूर्तता समाजातील स्री-पुरुषांच्या परस्पर सहकार्यातून होण्याची समाजमान्य व्यवस्था अस्तित्वात नाही. म्हणूनच लग्नसंस्थेला समांतर असलेली वेश्याव्यवस्था इतिहासात खूप आधीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे वेश्याव्यवसायाच्या गुन्हेगारीकरणाने प्रश्न संपणारे नाहीत. लैंगिक गरजेचे/इच्छेचे नियमन हा प्रमुख विषय आणि ती गरज/इच्छा पैशाच्या मोबदल्यात पूर्ण करण्याला मान्यता असणे/नसणे हा उपविषय असे दोन मुद्दे आहेत. त्यावर काम केलं तर कदाचित वेश्याव्यवसायाचं स्वरूप बदलायला मदत होईल.

(या विषयासंदर्भातील विचारी प्रतिक्रियांचं स्वागत आहे.)

२४ ऑक्टोबर २०१८, फेसबुक पोस्ट

Saturday, October 13, 2018

प्रोग्रॅमिंगच्या पलीकडचं प्रेम

'निःशब्द' हा रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेला चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. साठ वर्षांचा एक गृहस्थ विजय (अमिताभ बच्चन) आणि त्याच्या विशीतल्या मुलीची मैत्रिण जिया (जिया खान) हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. यातून मोठा गहजब उडतोआणि सगळेच नातेसंबंध ताणले जातात. विजयच्या मनात अपराधभाव दाटून येतो आणि शेवटी सगळीच नाती तुटतात. कथेचा शेवट दुःखात होतो. 

आपण ही कथा उदाहरणादाखल म्हणून घेऊया, पण ती उदाहरणादाखल आहे हेही लक्षात ठेवूया. या कथेतील पुरूषाच्या जागी स्त्री असू शकेल आणि ती तिच्याहून वयाने बऱ्याच लहान असलेल्या तरूणाच्या प्रेमात पडू शकेल. किंवा एखाद्या उदाहरणात समवयस्क स्त्री-पुरूष लग्नबाह्य प्रेमात पडू शकतील. 'निःशब्द'मध्ये विजयच्या मनात जे होतं ते प्रातिनिधीक आहे. वास्तविक पाहता प्रेमात पडणं ही एक चांगली गोष्ट आहे. सुंदर गोष्ट आहे. दुसऱ्या बाजूने असं म्हणता येईल की तिचं उदात्तीकरण करण्याचीही खरं तर गरज नाही. एक सहज भावना म्हणून प्रेमाकडे बघण्यात काहीच अडचण असता कामा नये. प्रेमात गुन्हेगारी स्वरूपाचं काहीच नाही. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. स्त्री-पुरूषांमधील प्रेम हे सहजतेने घेतलं जात नाही. मुळात आपण प्रेमात पडलो म्हणजे आपलं काहीतरी चुकतंय असं प्रेमात पडणाऱ्यालाच आधी वाटतं. पहिल्यावहिल्या किंवा तारूण्यातील प्रेमात बहुधा असं वाटत नाही, पण लग्न झाल्यावर किंवा प्रौढावस्थेत कुणाविषयी प्रेम वाटलं तर अपराधभावाने मन दबून जातं. असं होतं कारण आपण प्रेमभावनेला स्वतंत्र, मोकळं ठेवलेलं नाही. स्त्री-पुरूषांमधील 'रोमँटिक लव्ह' हा सुटा विषय म्हणून रोमांचक वाटला तरी प्रत्यक्ष जगण्यात आपण प्रेमाला 'ओझं' केलं आहे किंवा ते आपल्याकडून झालं आहे. आदिम अवस्थेपासून आजच्या अवस्थेपर्यंत येताना आपण अनेक गोष्टी स्वीकारल्या, अनेक नाकारल्या, अनेक गोष्टींना वळण दिलं. त्यामुळे आपलं मानस हे स्वतंत्रपणे, आपण एकट्याने घडवलेलं असणं शक्य नाही. आपल्या मानसिकतेमागे 'माणसाची महाकथा' उभी आहे. आपलं मन हे एका अर्थी 'प्रोग्रॅम्ड' आहे. पण माणूस आणि इतर सजीवांमध्ये एक प्रमुख फरक असा केला जातो की 'माणूस हा जाणिवेची जाणीव असणारा सजीव आहे'. त्यामुळेच तो जाणिवेला आकार देऊ शकतो. मागच्या लेखात आपण युव्हाल हरारीने मांडलेली 'कल्पित वास्तव' ही संकल्पना पाहिली होती. आपण 'कल्पित वास्तवा'वर विश्वास ठेवणारे मनुष्यप्राणी आहोत, पण 'कल्पित वास्तव' आपण निर्माण करतो याचीही आपल्याला जाणीव आहे. 

मग या आपल्या बलस्थानाचा आपल्याला उपयोग होऊ शकेल का? विजय आणि जिया प्रेमात पडल्यावर जो गहजब उडतो तो टाळून त्या दोघांच्या जाणिवांकडे थोड्या तटस्थपणे बघणं आपल्याला शक्य आहे का? आपण जी नैतिकतेची भक्कम भिंत आपल्या आंतरिक प्रेरणांभोवती उभी केली आहे त्या भिंतीवर चढून पलीकडे पाहायचा प्रयत्न आपण करू शकतो का? गडबड अशी होते की ही भिंत आहे, हा जगाचा शेवट नाही हेच आपण लक्षात घेत नाही. भिंतीपलीकडे काहीतरी असू शकतं हा विचार करायला आपण शिकायला हवं. वरील उदाहरणात विजय त्याच्या प्रेमाबद्दल बायकोला लगेच सांगू शकत नाही. अपराधभाव त्याला ग्रासून टाकतो. तो तिला सांगतो पण कालांतराने. इतक्या वर्षांच्या सहजीवनानंतर तो आपल्या मनातलं मोकळेपणाने, दडपण न घेता बायकोला सांगू शकत नाही कारण असं काही होणं हे चुकीचं आहे अशी दोघांचीही ठाम धारणा आहे. वास्तविक लग्न झालेलं असताना अन्य कुणाविषयी प्रेम/आकर्षण वाटणं हे मुळात याचं द्योतक आहे की या मानवी उर्मींचा लग्न झालेलं असण्या/नसण्याशी संबंध नाही. लग्नव्यवस्था, त्यावर आधारलेली कुटुंबव्यवस्था जर इतकी कार्यक्षम आणि परिणामकारक असेल तर स्त्री-पुरूषांच्या मनात असे विचारच येता कामा नयेत. पण तसं होताना दिसत नाही. कारण व्यवस्था हा नियमनाचा प्रयत्न असतो आणि त्याबद्दल व्यवस्थेचा आदर करायला हवाच, पण व्यवस्थेतून निर्मूलन होऊ शकत नाही. 

विनोबा भावे यांचं 'स्वराज्यशास्त्र' नावाचं एक छोटंसं पण राजकीय विचारासंदर्भात अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. यात त्यांनी 'राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ' आणि 'राजकीय प्रश्नाचा स्वाभाविक अर्थ' दिले आहेत. भाषाभेद, धर्मभेद, आर्थिक भेद हे मूळ भेद नव्हेत. त्यामुळे तेवढेच लक्षात घेऊन व्यवस्था कशी राखायची हा राजकीय प्रश्नाचा कृत्रिम अर्थ आहे असं ते लिहितात. समाजात स्वाभाविकपणे वर्ग असा कोणताच नाही, तर कमी-अधिक सामर्थ्याची माणसे आहेत. ह्या कमीअधिक सामर्थ्याच्या माणसांनी मिळून आपली व्यवस्था कशी राखून घ्यावी हा राजकीय प्रश्नाचा मूलभूत आणि स्वाभाविक अर्थ होतो असं त्यांचं प्रतिपादन आहे. 'कृत्रिम अर्थ' आणि 'स्वाभाविक अर्थ' हा भेद आपण स्त्री-पुरूष संबंधांबाबत पाहिला तर 'नैतिकदृष्ट्या अमुक एक वर्तन योग्य असताना स्त्री-पुरूष त्याचं पालन करत नाहीत म्हणून प्रश्न निर्माण होतात' हा झाला कृत्रिम अर्थ. 'प्रेम, रोमँटिक क्षण अनुभवायची आस, शारीरिक आकर्षण, मैत्रभाव, राग-द्वेष-कंटाळा, नात्यातील साचलेपण यासारख्या इतर मानवी भावना अशा विविध पातळ्यांवर स्त्री-पुरूषांमधील आंतरसंबंध कायम कार्यरत असतात. तर त्यांची व्यवस्था कशी लावायची हा मूलभूत अर्थ आहे. (केवळ स्त्री-पुरूषच नव्हे, तर सर्वच मानवी संबंधांना हे लागू होईल). लग्न, लिव्ह इन, ओपन मॅरेज हे व्यवस्थांचे पर्याय आहेत. त्यातून स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन होईल हे खरं, पण म्हणून  व्यवस्थेला पावित्र्य बहाल करणं हे स्वतःची फसवणूक करण्यासारखं आहे. स्त्री-पुरूष संबंधांबाबत गरजेचं काय असेल तर ती सम्यक, तटस्थ दृष्टी. प्रेमामुळे, लैंगिक आकर्षणामुळे स्त्री-पुरूषात जे घडतं त्याकडे 'जगबुडी आली' या भावनेने न बघता मानवी जाणीव म्हणून बघता येण्याची क्षमता. (आणि याचं प्रशिक्षण किशोरवयात सुरू व्हायला हवं. जीवनकौशल्य या विषयावर आपण या लेखमालेत बोलणार आहोत.)

आपल्यावरील संस्कार, प्रस्थापित नैतिकता आणि यामुळे घडलेलं आपलं मानस यातून संपूर्णपणे मुक्त होणं आपल्याला शक्य नाही. पण या सगळ्याबरोबरच प्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळीने आपल्याला दिलेलं दुसरं एक साधन आहे ते म्हणजे तर्क आणि विवेक. आपल्याभोवती जे घडतं त्याला आपल्यावरील 'संस्कारां'निशी सामोरं जाण्यापेक्षा 'विवेका'ने सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. 'निःशब्द' चित्रपटाचं उदाहरण पाहिलं तर आपला नवरा वयाने मुलीच्या प्रेमात पडला आहे हे कळल्यावर बायको आणि मुलीला धक्का बसणं हे समजण्यासारखं आहे. पण आता हे घडलं आहे तर त्याला सामोरं जायचा मार्ग आपण शोधूया हा विवेकी विचार आहे. स्त्री-पुरूषांमधील जैविक ताण प्रबळ होतात, होऊ शकतात हे स्वीकारत या संबंधांचं व्यवस्थापन करणं ही विवेकी कृती आहे. पण इथेच दृष्टीचा प्रश्न येतो. प्रेमाकडे पाहण्याची आपली दृष्टी स्वच्छ नाही. प्रेमात माणूस बहकतो, तो स्वतःला समर्पित करू पाहतो आणि त्यातून त्याचंच नुकसान होतं या काळजीपोटी त्याला सावधगिरीचा सल्ला देणं हे ठीक, पण म्हणून प्रेम नाकारण्याला अर्थ नाही. मला असं वाटतं की एकीकडे चित्रपट आणि कथांमधून उभं केलेलं प्रेमाचं उदात्त रूप, प्रेम हे सर्वस्व आहे अशी कल्पना आणि दुसरीकडे प्रेमाचा साधा स्वीकारही न करणारं जातीय, वर्गीय आणि सांस्कृतिक वास्तव या परस्परविरोधी शक्तींमध्ये आपण आपलं स्वतःचं, व्यक्ती म्हणूनचं, स्त्री-पुरूष म्हणूनचं 'प्रेमाचं आकलन' करून घेण्यात कमी पडतो. ते जर होऊ शकलं तर आपण प्रेमामुळे आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या गाष्टींमुळे हबकून जाणार नाही. विजयच्या बायको आणि मुलीने 'तुम्ही दोघे प्रेमात पडला आहात. आता हे नातं पुढे कस न्यावं असं तुम्हाला वाटतं? या नात्याची आणि इतर नात्यांची व्यवस्था कशी लावावी असं तुम्हाला वाटतं?' असे प्रश्न विचारणं अधिक गरजेचं आहे. या प्रश्नांमध्ये सहजीवनाचं नवीन प्रारूप तयार व्हायच्या शक्यता आहेत. 

'तत्त्वविचार' हा शब्द जड वाटला तरी तो महत्त्वाचा आणि दिशादर्शक आहे. प्रेम असो, राग असो, भौतिक इच्छा-आकांक्षा असोत की लैगिंक आकर्षण असो - आपण आपल्या वैचारिक सामर्थ्याच्या आणि वैज्ञानिक दृष्टीच्या बळावर या प्रत्येक उर्मीचा तात्त्विक विचार केला तरच आपल्याला प्रत्यक्षात काय करायचं हे कळू शकेल. चूक-बरोबर ठरवण्याआधी 'स्वरूप समजून घेणं' महत्त्वाचं आहे. पुढील लेखात आपण 'प्रेमाची व्यवस्था' लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या 'पॉलीॲमरी' या संकल्पनेच्या 'अंलबजावणी'विषयी बोलू. या संकल्पनेवर गेल्या वर्षी एक विस्तृत लेख मी 'चतुरंग'मध्येच लिहिला होता. ज्यांनी तो लेख वाचला नसेल त्यांना  https://www.loksatta.com/lekh-news/articles-in-marathi-on-what-is-polyamorous-relationship-1580267/ या लिंकवर तो वाचता येईल. (हा लेख या ब्लॉगवर इथे वाचता येईल.)




Wednesday, October 10, 2018

आपलं कामजीवन 

ओट्यावर वाळत घातलेल्या भांड्यांना पाय फुटून ती निमूटपणे आपापल्या जागेवर जाऊन बसली असती तर आयुष्यात सुखाचे काही प्रहर अजून आले असते असं ज्या क्षणी वाटतं तो क्षण म्हणजे आपल्या कामजीवनाचा उत्कर्षबिंदू असतो. आपलं कामजीवन हे आपल्या जड-चेतन विश्वाइतकंच बहुरंगी, बहुढंगी आहे. रोज रात्री दाराबाहेरच्या कडीला दुधाची पिशवी अडकवण्यापासून ते दहाएक वर्षांतून एकदा घराला रंग देण्यापर्यंत कामजीवनाची अद्भुत रूपं फक्त चकितच करणारी नाहीत, तर मानवाविषयी करुणा उत्पन्न करणारी आहेत.

भाई देशपांडे एकदा म्हणाले होते, "सुनीताला कामं दिसतात. मला दिसतच नाहीत." अशा थोर भाग्याच्या पुरुषांपैकी आपण नाही याची जाणीव होऊन, फेमिनिझमचं बाळकडू घेत राहिल्यानं माझं कामजीवन समृद्ध झालं आहे हे आरंभीच नमूद करतो. घर हे मुळात राहण्यापेक्षा काम करण्याची जागा आहे. जेरड डायमंडपासून युव्हाल नोआ हरारीपर्यंत अनेकांनी शेतीनं माणसाची प्रमुख गोची केली असं लिहिलं आहे. माझा मुद्दा त्याहूनही खोलातला आहे. शेतीनंच नव्हे तर काहीतरी करत राहण्याच्या वृत्तीनं माणसाची गोची केली आहे. मग ती शेती असो किंवा अन्य काही असो. जीव वाचला, पोट भरलं, झोपायची सोय झाली की गप राहायचं सोडून 'अजून काहीतरी करू' असं ज्याक्षणी माणसाला वाटलं तो क्षण माणसाची ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय गोची करणारा होता. सारखं काहीतरी करणं हा माणसाला मिळालेला शाप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एक काम दुसरी कामं जन्माला घालतं. शिवाय त्यानं इतरांची कामलालसा वाढते, ते वेगळंच. साहित्याचंच उदाहरण घेऊ. (इतकं निरुपद्रवी दुसरं कोण आहे!) एके काळी मोजकेच दिवाळी अंक निघत असत. ती संख्या आता शे-दोनशेच्या घरात आहे असं ऐकतो. शिवाय ऑनलाइन अंकही प्रसिद्ध होऊ लागले. एवढं होऊन सांस्कृतिक सुस्कारे कमी झाले का? तर नाही. खरं तर सांस्कृतिक उपक्रम जेवढे वाढतील तेवढी संस्कृती अधिकाधिक धोक्यात येत जाते. जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं तेव्हा वास्तविक काही अडत नव्हतं. साहित्य आलं, आणि पाठोपाठ साहित्यव्यवहारही आला. पुढे मग अर्थातच व्यवहार साहित्यावर भारी पडू लागला आणि संमेलनं, चर्चासत्रं, व्याख्यानं सुरू होऊन, जे लिहिलं आहे ते का लिहिलं आहे, किंवा जे लिहिलंच नाही ते का लिहिलं नाही, याविषयी चर्चा झडू लागल्या. आजमितीस मराठीत जितकं साहित्य निर्माण होतं त्याहूनही जास्त चर्चा निर्माण होते. (यात फेसबुक धरलेलं नाही. ते धरलं तर कहरच होईल.) मला तर असंही वाटतं की कालांतरानं चर्चक-समीक्षकच सेंटर कोर्टात उतरून एकमेकांशी मॅच खेळतील आणि लेखक चेंडू उचलून देण्यापुरते राहतील.

काहीही न करण्यात जो आनंद आहे त्याला माणूस पारखा झाल्यानं माणसाचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोज सकाळी सहस्रांच्या संख्येनं आवराआवरी करून, बूट चढवून कामाला जाणं आणि हे अनंत सकाळी करत राहणं हे प्रगतीचं नसून अधोगतीचं लक्षण आहे. खूप काम करून तर मधमाशासुद्धा आपलं जीवन व्यतीत करतात. काम खूप वाढवून ठेवणाऱ्या प्राण्याला प्रगत कसं काय म्हणायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. कामं कमी कमी व्हायला हवीत. तर ती प्रगती. यंत्रानं कामं सोपी केली ही तर गेल्या दोन शतकातील सर्वांत मोठी थाप आहे. यंत्रानं काही केलं असेलच तर नवीन कामं निर्माण केली आहेत. माणूस चंद्रावर गेला याचं पुष्कळ कौतुक होतं. पण तो चंद्रावर गेल्यानं नक्की काय झालं याचं उत्तर हे कौतुक करणाऱ्यांपैकी कितीजण देऊ शकतील याची मला रास्त शंका आहे. एकूणच माणसाच्या काम करण्यामुळे तो रिकामपणाच्या आनंदाला कसा मुकला आणि त्याच्यातील परात्मभाव कसा वाढीस लागला ही एलिएनेशनची थिअरी समूळ विस्तारानं सांगणं आज गरजेचं झालं आहे.

या एलिएनेशनची सुरुवात घरापासूनच होते. रोज सकाळी एखाद्या सुखद, बेधुंद करणाऱ्या आठवणीनं (किंवा अजिबात कुठलीच आठवण वगैरे न येता) जाग न येता; पाण्याचा पंप चालू करायचा आहे या आठवणीने जाग येणं ही एक मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. आणि ही नुसती सुरुवातच असते. पुढचा संपूर्ण दिवस म्हणजे एक न संपणारी कामसाखळी असते. आणि या साखळीतील कामांचे, उपकामांचे, त्यातून उद्भवणाऱ्या वैतागांचे, उपवैतागांचे इतके नमुने आणि कंगोरे आहेत की 'कामेची केला दीन किती नर' असं म्हणावंसं वाटतं. ओट्यावरची भांडी नुसती आपापल्या जागी ठेवली की झालं असं होत नाही. ओट्यावरचं पाणी पुसून घ्यायला लागतं. स्वयंपाक झाला की अन्न मिळतं हे ठीक, पण त्याबरोबरच बर्नरखालची तबकडी स्वच्छ करणं आणि शेगडीच्या मागच्या भिंतीवरील डाग पुसणं ही कामं वाढतात. विशेषतः भरतासाठी वांगं भाजताना ती तबकडी जी काय विद्रूप होते, त्याला तोड नाही. भाजी शिजली की झालं असं नसतं. उरलेली भाजी काढून ठेवावी लागते. उन्हाळयात चुकून भाजी फ्रिजच्या बाहेर राहिली तर संपलंच. कुकर लावणं हे वास्तविक किती सोपं काम आहे? पण त्यातही भात सांडला तर पाणीमिश्रित भातातलं पाणी वेगळं करून भात वेगळा करणं हे काम वाढतं. पोळ्या करणं हा तर फारच सेक्सी प्रकार आहे. एक तर कणीक नीट असावी लागते. ती असली आणि नीट मळली गेली तरी कधीकधी - फॉर सम अननोन रीझन - फुलके फुलायचं नावच घेत नाहीत. सगळं नीट असताना एखादा फटाका का फुटत नाही, हे जसं कळत नाही तसंच इथेही आहे. शिवाय पोळ्या लाटतानाही काही पोळ्या बहुधा केवळ निषेध म्हणून व्यवस्थित लाटून घेत नाहीत. आणि पोळ्या करून झाल्या की ओट्यावर सांडलेलं पीठ पुसून घेणं हा कार्यक्रम आहेच.

सिंक हा द्रौपदीच्या अक्षयपात्रासारखाच प्रकार आहे. फक्त ते पात्रांचं अक्षयपात्र आहे. सिंक पूर्ण रिकामं आहे, त्यात अगदी एकही चमचा नाही हे दृश्य बघायला मी, साहित्यसंमेलनात व्यासपीठावर एकही राजकारणी नाही हे दृश्य बघण्याइतकाच उत्सुक असतो. सिंक हे जसं पात्रांचं अक्षयपात्र आहे तसं बरणी हे पदार्थांचं कृष्णविवर आहे. त्यातून वस्तू बघता बघता नाहीशा होतात. म्हणजे तुम्ही यादी वगैरे करता, सगळ्या गोष्टी आणता. तूरडाळ शिल्लक आहे असा तुमचा दृढविश्वास असतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीनं बरणीचा तळ गाठल्याचं लक्षात येतं. अशा वेळी स्वतःवर चरफडण्यापेक्षा दुसरं काही करता येत नाही. बरेच दिवस झाले कुळथाचं पिठलं केलं नाही, म्हणून कुळथाच्या पिठल्याचे डोहाळे लागावेत तर कुळीथ पीठ आणावं लागणार आहे असा साक्षात्कार होतो. केव्हातरी पुलावाचा वगैरे बेत ठरतो. तुम्ही भाज्या आणून दिलेल्या असतात. चिरून ठेवलेल्या असतात. तांदूळ धुऊन ठेवलेले असतात. पुढचा भाग अर्धांगिनीवर सोपवून तुम्ही नेटफ्लिक्स उघडून बसता. वीसएक मिनिटं होतात न होतात तोच 'अरे, तमालपत्र राहिलंच की' हे कानी पडतं. मग फ्रॅंक अंडरवुड, वॉल्टर व्हाइट किंवा अशाच कुणा सिद्धपुरुषांच्या लीळा पाहण्याचं अर्धवट सोडून तमालपत्र आणण्यासाठी उठावं लागतं. दुकान फार लांब असतं असं नाही, पण व्यत्यय ही संख्यात्मक संकल्पना नसून गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे व्हायचा तो त्रास होऊन गेलेला असतो.

घेऊ घेऊ म्हणून चाललं होतं, ती रॉयल एनफिल्ड घेतल्यावर पाचशे सीसी इंजिनात उत्पन्न होणाऱ्या भरभक्कम टॉर्कइतकाच भरभक्कम आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात 'आता काय होईल ते होईल, पण एनफिल्डच्या हँडलला पिशवी अडकवायची नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा मनातल्या मनात केली होती. ती सुमारे दीड दिवस टिकली. कृष्णविवरासमोर एनफिल्ड काय चीज आहे?

बसल्या जागी अंतःचक्षूंना कामं दिसणं तर फार वाईट. म्हणजे तुम्ही विचार करत असताना मराठी साहित्याच्या सद्यस्थितीबद्दल (वाढवून ठेवलेल्या कामाचे परिणाम. दुसरं काय!); पण प्रत्यक्षात विचार घरंगळत असतो तो 'दूध गार झाल्यावर विरजण लावायचं आहे' हा. मराठी कथेला पाहिल्यासारखं टोक उरलं आहे की नाही या विषयावर काही लिहिताना 'कोथिंबीर निवडायची राहिली आहे' हा टोकदार विचार जखम करून जातो. (शेपू, कोथिंबीर आणि मेथी निवडणे ही सृजनशक्तीपाताची त्रिसूत्री आहे. आपल्याकडे 'रेनेसान्स' झालं नाही याच्या काही कारणांपैकी एक कारण इथल्या समाजाला भाज्या निवडाव्या लागत होत्या हे आहे. यावर वाद घालायला आपण तयार आहोत!) 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल' यावर तुम्ही काहीएक मौलिक, आंतरिक गुंतागुंतयुक्त विचार करत असताना स्वयंपाकघरातल्या व्हाइट बोर्डावर लिहिलेली कामांची यादी डोळ्यांसमोर नाचू लागते आणि प्रबोधनाची वाटचाल मंदावते. हे सगळं कशामुळे? तर कामामुळे. म्हणून जीवनाला आराम पडण्यासाठी जीवनातील काम काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी 'काहीही न करणे' या एकमेव आनंददायी क्रियेला सतत प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

'काहीतरी करू' यात ट्रिपला वगैरे जाणंसुद्धा सामील आहे. ट्रिप हा वास्तविक तापदायक प्रकार आहे. ज्या कुठल्या प्रेक्षणीय स्थळी तुम्ही जाता तिथे उंचावलेल्या हातांमधल्या कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं काय दिसतं? तारखा ठरवा, तिकिटं बुक करा, सामान भरा (यात काहीतरी विसरणं आणि काहीतरी उगीच घेतलं जाणं हे नेहमीचं आहे. थंडी असेल म्हणून स्वेटरने बॅगेतली जागा अडवायची आणि तिथे गेल्यावर उकाडा हजर किंवा पाऊस नसेल म्हणून घेतलेली छ्त्री बाजूला काढायची आणि पोचल्यावर स्वागताला पाऊस हजर!), भलामोठा प्रवास करा, हॉटेलात चेक-इन करा, तिथे अमुक-नाही-तमुक-नाही म्हणून मॅनेजमेंटशी भांडा, चार ठिकाणच्या गर्दीत सामील होऊन काहीतरी बघितल्याचा आपल्याला आनंद झालाय हे स्वतःच्या मनावर ठसवा - हा एवढा खटाटोप सांगितलाय कुणी? 'प्रवासाने माणसाला शहाणपण येते' वगैरे सुविचार तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. प्रवासामुळे फक्त खर्च होतो. शहाणपण ही वस्तू मुळातच तुमच्याकडे असावी लागते. त्यासाठी वणवण करायची गरज नसते. मनुष्यप्राणी हा एक कल्पनातीत वैचित्र्यानं भरलेला प्रकार आहे हे कळण्याकरता प्रवास कशाला हवा?

कामजीवन हे एक्स्पोनेन्शियली तापत जाणारं प्रकरण आहे. त्यामुळे वेळच्या वेळीच आवर घातला नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं. त्यासाठी आजूबाजूला सजगपणे बघत ज्या ज्या ठिकाणी कामाचं उगमस्थान दिसेल त्या त्या ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणणं आवश्यक आहे. खरेदी वगैरे तर अगदीच टाळावी. जेव्हा खरेदी मिनिमम होईल तेव्हाच इकॉनॉमी ऑप्टिमम होईल. या एकूणच प्रश्नाबाबत मुळात एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे. काहीही न करता निवांत बसलो असतानाच ती लक्षात आली. युरेका मोमेंटच म्हणा ना. (मूलभूत जाणिवा निवांतपणा असतानाच होतात. न्यूटन, आर्किमिडीज साक्ष आहेत. फक्त इतर लोकांनी त्यांनी लावलेल्या शोधापाशी थांबायला हवं होतं. गुरुत्वाकर्षण आहे हे कळलं ना? उत्तम. पुढे जाऊन आकाशात रॉकेट्स कशाला सोडायची?) मी त्याला 'द ह्यूमन ट्रूथ' असं नाव दिलं आहे. हे ट्रुथ असं - माणसं काहीएक संख्येनं एकत्र आली की करेक्ट असं काही घडण्याची शक्यताच लयाला जाते. एकत्र आली की माणसं काहीतरी घोळच घालतात. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच!) त्यामुळे काहीतरी करण्याची जळमटं लोकांच्या मनातून काढून टाकणं अगत्याचं झालं आहे. काहीही न करण्याकरता माणसं एकत्र येतील तेव्हाच मानवी इतिहास आश्वासक वळण घेईल. अन्यथा कामजीवन माणसाचं माकड करतच राहणार आहे!

(ऐसी अक्षरे, दिवाळी २०१८)


Sunday, October 7, 2018

कवितेत आणि कवितेबाहेर

दिनकर मनवर यांच्या 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. 'विचारप्रवृत्त करणारा' असं म्हणण्याचं कारण हे की या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.

'टीकास्वयंवर' या पुस्तकातील 'मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप' या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात 'अगोचर' या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. 'कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते' या वाक्यात 'घट्ट' हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नैतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापारावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का हाही प्रश्न विचारता येऊ शकेल. नेमाडेंनी खानोलकरांच्या कादंबरीलेखनाची, त्यांच्या शैलीची चिकित्सा करताना या कादंबऱ्यांना थ्रिलर फँटसीचं स्वरूप आहे, त्यात दुःखाचं संवेदन नाही, अनुभूतीचं दारिद्र्य भाषेच्या अलंकरणाने आणखी हास्यास्पद होते (हे विशिष्ट निरीक्षण स्वतंत्र मुद्दा म्हणून मला महत्त्वाचं वाटलं. हा मुद्दा 'लेखक' होण्याच्या महत्त्वाकांक्षेने केल्या गेलेल्या, परंतु अलंकरणाला, शाब्दिक कसरतीला अधिक महत्त्व देत पुनुरुक्तीत अडकलेल्या इतरही लेखनाला लागू होऊ शकेल) असं म्हटलं आहे. ही निरीक्षणे समीक्षा दृष्टीला पटावीत अशीच आहेत. परंतु आक्षेप मान्य करूनही खानोलकरांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे मला आवडल्या असं कुणी म्हणू शकेल.

हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण 'काय लिहिलं आहे' आणि 'काय प्रतीत होत आहे' यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला 'अभिव्यक्ती' आणि 'अभिव्यतीचा परिणाम' हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुःखद आहे असं म्हणता येईल पण ते कलाकृतीचं 'भागधेय' आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.

अस्मितेचा स्त्रीशी आणि स्त्रीच्या चित्रणाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या जाती/समूहातील स्त्रियांचे प्रश्न काय आहेत याविषयी फारसे उत्सुक नसणारे लोकही त्या स्त्रियांच्या शीलरक्षणाविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी संवेदनशील असतात. हा गुंता साहित्य-कलेच्या पुढे जाऊन पुरूष म्हणूनच्या काही जैविक वृत्तींपाशी, पुरूषसत्ताक राजकारणापाशी आणि त्याने घडवलेल्या मानसिकतेपाशी जाऊन पोचतो. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं असं बरंच आहे कारण त्यात पुरूष आक्रमक म्हणून आणि हतबल म्हणूनही अडकलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा फक्त नोंदवून पुढे जाऊ. कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या 'लेखक-कवी असण्या'तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतीशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.
समग्रपणे विचार करत तयार  झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारी काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बरेचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे - प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणे हे आपलं - सेपियन्सचं - एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.

कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की स्त्रीच्या अवयवांशी पुरूषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. 'स्तन' हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरूषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरूषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरूषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही. कपडे आणि कपड्यांशी जोडली गेलेली सभ्यता याने आपल्याला सुरक्षा, सौंदर्यदृष्टी वगैरे दिली असली तरी ते 'सुपरस्ट्रक्चर' आहे. या गोष्टींनी आपली लैंगिक-भावनिक गोचीदेखील  केली आहे. शिवाय आपल्याकडे भाषा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याकडे स्पष्टपणे बोलण्याइतपत भाषाच नसते बरेचदा. उदा. एखादा मुलगा/मुलगी मला 'हॉट' वाटतो/वाटते यातल्या 'हॉट' मधला नेमका अर्थ पकडेल असा शब्द मराठीत नाही. प्रेम किंवा आकर्षणासारखी सहज भावना व्यक्त करणं हेसुद्धा जिथे शब्दांतून नीट जमत नाही तिथे लैंगिक आकर्षणाबद्दल काय बोलणार? आपण एकूणातच शरीराला खासगीत कोंडून ठेवलं आहे. (मला काही इंग्लिश मालिका आवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे शरीर, लैंगिक इच्छा याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना सहजतेने मांडण्याची, त्याविषयी बोलायची आणि विनोदाच्या मुशीतून सहज-सुंदर करण्याची हातोटी तिथे बघायला मिळते. कितीतरी एपिसोड्स आणि त्यातील उल्लेख आठवतात.) माध्यमांतून कलात्मकपणे या विषयांवर बोललं गेलं की या विषयातील ताण हलके व्हायला मदत होते. हा सहजभाव येणं महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या स्तनांबद्दल आज स्त्रीमध्ये सहजभाव नाही कारण तो पुरूषात नाही. पुरूषात नाही कारण त्याच्या कामनेचं एक केंद्र असलेले स्तन झाकलेले आहेत. ते झाकलेले आहेत कारण पुन्हा तेच - पुरूषात सहजभाव नाही. हे एक चक्र तयार झालं आहे आणि ते मोडल्याखेरीज स्त्रीविशिष्ट उल्लेखांनी बिथरून जाणं थांबणार नाही. 'स्तन' हा शब्द रोजच्या बोलण्यात सार्वत्रिक झाल्याशिवाय त्याला चिकटलेली लैंगिक संवेदनाची धार कमी होणार नाही. (स्त्रीचे स्तन हे पुरूषाच्या कामनेचं केंद्र का असतात हा पुरूषाच्या लैंगिक आणि मानसशास्त्रीय घडणीशी जोडलेला प्रश्न आहे. याविषयी गूगल सर्च केल्यास प्राथमिक माहिती मिळू शकेल.)

कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. 'आदिवासी' किंवा अन्य समूहवाचक, जातीवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तरत्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. 'वस्तुस्थिती' ही चीज आदर्श, सिद्धांत, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या 'वस्तुस्थिती' आहेत. त्यामुळे  सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधीत्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं. आदिवासी हा शब्द विशिष्ट समूहाकडे निर्देश करतो हे खरंच आहे. हा समूह एका संस्कृतीचं, परंपरेचं आणि ज्ञानसाठ्याचं प्रतिनिधीत्व करतो. जातीय तेढ वाढलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर जल-जंगल-जमीन याच्याशी जोडल्या गेलेल्या, पर्यायी जीवनशैली म्हणून काहीएक प्रारूप जगासमोर ठेवण्याची क्षमता असलेल्या आदिवासी समूहांचं 'असणं' महत्त्वाचं आहे. त्यांची आणि आपली नाळ मुळात एकाच ठिकाणी जोडलेली आहे. आपण वेगळे झालो आहोत हे खरं आहे, आपल्यावर त्यांनी रागवावं याची पुष्कळ कारणं आपण त्यांना दिली आहेत. त्यात भर पडायला नको असं मनापासून वाटतं.

(७ ऑक्टोबर २०१८, लोकसत्ता)