Saturday, January 20, 2018

पेशन्स फॉर परिवर्तन

पुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत. 'आम्ही सूक्ष्मात जातो' हा उपहासगर्भ लेख १९७८ सालचा आहे, तर 'मला दिसलेले विनोबा' हे व्यक्तिचित्रण १९५४ साली लिहिलेलं आहे. 'मला दिसलेले विनोबा' या लेखात एक छोटा किस्सा आहे. भूदानयात्रा सुरू आहे. देवराम नावाचा एक कार्यकर्ता विनोबांकडे गावकऱ्यांची तक्रार घेऊन येतो. लोक अडाणी आहेत, त्यांना भूदानाचं महत्त्व पटत नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यावर विनोबा म्हणतात, "अरे, लोक हुशार आहेत. अनोळखी माणसावर एकदम विश्वास टाकणारे लोक अडाणी आहेत की हुशार - सांग बघू!"

हा किस्सा मला विविध वेळी, विविध प्रसंगात आठवला आहे. मी तो बरेचदा उद्धृतही केला आहे. कुठलीही नवीन मांडणी करताना ती अशी हवी की समजून घेणाऱ्याच्या सर्व शंकांची उत्तरं ती देऊ शकेल. नवीन विचार करणाऱ्यावर जबाबदारी जास्त आहे कारण तो काहीतरी बदल करू बघतोय. तो जे मांडतो आहे त्याच्या अनेकविध बाजूंवर त्याने विचार केला आहे हे जर समोरच्याला दिसलं तर त्याचा विश्वास बळावतो. आधुनिकतेचा पुरस्कार करताना हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ज्या लोकांकडे नवीन विचार घेऊन जातोय त्यांच्या काहीएक धारणा आहेत. त्यात कदाचित मूल्यदृष्ट्या चुकीच्या धारणाही असतील. पण तरी संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलं तर बदलाची शक्यता वाढते. 

मला ही जाणीव एका टप्प्यावर होऊ लागली. वर उल्लेख केलेला पुलंचा लेख  मी शाळकरी वयात वाचला होता, पण त्यातला आशय पोचायaला अर्थातच काही काळ जावा लागला. आपल्याला समाजात, लोकांच्या मानसिकतेत काही बदल व्हावा असं वाटतं, जे प्रचलित आहे त्यातलं बरचसं आपल्याला पटत नाही, आपल्या मनात विद्रोह निर्माण होतो, आपण त्यातून व्यक्त होतो हे कळत होतं. मनातली हे प्रक्रिया परिचयाची झाली होती. त्याचं एक समाधानही होतं (आहे). पुढे 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाशी व त्याआधी 'पुरूष उवाच' या अभ्यासगटाशी जोडला गेलो तेव्हा या सगळ्याला एक व्यासपीठ मिळालं. त्यानंतरच्या काळात 'आंदोलन', 'आजचा सुधारक' या मासिकांच्याही संपर्कात आलो. या सर्व मासिकांच्या स्वरूपात फरक असला तरी ही सर्व मासिकं विविध क्षेत्रात परिवर्तनाचा, प्रबोधनाचा प्रयत्न करणारी मासिकं होती. पुढे फेसबुक जन्माला आलं आणि तिथे एक वेगळंच विश्वरूपदर्शन होऊ लागलं. परस्परविरोधी सामाजिक, कलात्मक आणि प्रामुख्याने राजकीय विचारांचे लोक चर्चा करताना, भांडताना दिसू लागले. परिवर्तनाची आस असणाऱ्या माझ्यातल्या मनुष्याला या प्रवासात जी एक जाणीव झाली ती ही की आपल्याला आत्ता वाटतंय त्याच्या दहापट पेशन्स ठेवला तर आपण थोड्या बदलाची आशा करू शकतो. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक रचना - ज्या वषानुवर्षं अगणित लोकांना बांधून ठेवतात - त्या सहजासहजी हलवता येत नाहीत. परिवर्तनाच्या संदर्भात इथे मला एक विशेष गोष्ट जाणवली ती ही की 'प्रश्न फक्त माणसांचा नसून माणसांच्या संख्येचाही आहे!'

अर्थात यात दोन्ही बाजू मला समजत होत्या. तीव्रतेने व्यक्त होणं, आपली हरकत नोंदवणं हे आपल्या आतल्या खळबळीला वाट देण्यासाठी एकीकडे आवश्यक आणि दुसरीकडे 'हरकत वृत्तीवर आहे, व्यक्तीवर नाही' हेही मनात जागतं ठेवणं आवश्यक. आपण आपल्या क्षमतेच्या परिघात, आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे पण 'जमिनीवरचं वास्तव' ही एक बिकट गुंतागुंत आहे आणि तिथे आपण पुरे पडणार नाही हेही लक्षात ठेवायचं. ही माझ्यासाठी साक्षात्कारी जाणीव होती. एकाच वेळी शांत व अस्वस्थ करणारी जाणीव. 

यातून मग मला असं लक्षात आलं की आपल्याला सारखं व्यक्त व्हावंसं वाटतं हे ठीक, पण आपण पुष्कळ ऐकलं पाहिजे, आपल्याला नेमके प्रश्न विचारता आले पाहिजेत. मला अमुक एका बाबतीत अमुक बदल हवा असं वाटतं, पण संबंधित व्यक्तींना काय वाटतं, ते बदलाला तयार नसतील तर का नाहीत हे आपल्याला समजायला हवं. मुख्य म्हणजे मी जर काही वेगळं बोलत असेन तर तो मुद्दा बाजूला ठेवून 'माणूस' म्हणून इतरांची माझ्याबद्दल सकारात्मक भावना हवी. अलीकडे एका गटचर्चेत सहभागी झालो होतो. एका सहभागी मुलीने फार चांगला मुद्दा मांडला. ती म्हणाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपल्या काही गोष्टी समजून घेणं अवघड असलं तरी त्यांना आपल्याविषयी आत्मीयता वाटली, ती निर्माण व्हायला पूरक असं आपलं वर्तन असेल तर आपले वेगळे विचारही ते स्वीकारतात. त्यामुळे आपण काही नवीन मांडत असलो तरी रोजच्या जगण्याच्या पातळीवर आपण इतरांसारखेच परस्परावलंबी असतो हे लक्षात घेऊन आपण स्वतःकडे 'अनेकांपैकी एक' म्हणून पाहिलं तर ते इतरांना आश्वस्त करणारं असतं. मात्र इथे एक गोष्ट नोंदवतो. आज आपल्या आसपास सध्या जी परिस्थिती दिसते ती चिंताजनक आहे. 'वेगळा विचार असला तरी माणूस म्हणून तो मला जवळचा वाटतो' याऐवजी 'केवळ वेगळा विचार आहे म्हणून तो माणूसच मला मान्य नाही' हे बळावताना दिसतं. याला अर्थातच राजकीय संदर्भ आहे आणि चिंतेची बाब ही की मानवी संबंध हे आधी राजकीय आणि मग मानवी होऊ लागले आहेत. 

सामाजिक परिवर्तनचा विचार करणाऱ्यांचं धर्म, देव, श्रद्धा याबाबतचं आकलन कमी पडतं असं मत बरेचदा मांडलं गेलं आहे. त्यात तथ्य आहे. म्हणजे मला वैचारिक दिशेबद्दल काहीच शंका नाही. माणसाच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं विज्ञानच देऊ शकतं याबाबत माझ्या मनात संदेह नाही. देवा-धर्माच्या अतिरेकाने आपलं नुकसान केलं आहे याविषयीही मला शंका नाही. पण मुद्दा आहे तो काही गोष्टींची, संकल्पनांची प्रस्तुतता (त्या मान्य नसल्या तरी) समजून घेण्याचा. देवाधर्माखेरीज आपल्याकडील समाजजीवनाला जात हा एक स्फोटक आयाम आहे. तो कितीही पुसून टाकायचा म्हटला तरी पुसला जात नाही. इथे एक लक्षात घ्यावं लागेल की या गोष्टी नुसत्या असण्यापुरत्या असत नाहीत. त्यांचं काहीएक 'फंक्शन' (कार्य) असू शकतं. हे कार्य समजून घेतलं नाही तर त्या पुसता येणार नाहीत. परंपरेवर प्रहार करताना त्यातून काही नवीन निर्माण होणार नसेल तर ते प्रहार फार काही निष्पन्न करू शकणार नाहीत. माझा एक मित्र 'पुरोगामी कर्मकांडे' सुरू करायला हवीत असं म्हणतो. यातील कर्मकांडे या शब्दामुळे बिचकून न जाता 'लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजलेले साधन' म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. ही कर्मकांडे अर्थातच वेगळी असतील. पण त्यातून एकी व्यासपीठ तयार होईल. आपण धार्मिक कर्मकांडांकडे पाहिलं तर असं दिसेल की त्यात संगीत, खेळ, कला, अशा विविध गोष्टींचा आधार घेतलेला असतो. माणसाला रंजन हवं असतं याची दखल घेऊन या गोष्टी धार्मिकतेत गुंफल्या जातात. परिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी गटचर्चा हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. त्यात रंजकता कशी आणता येईल, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रंजक पद्धतीने कसा पोचवता येईल यावर विचार केला तर बदलाची प्रक्रिया लोकांना आपलीशी वाटेल. 
स्त्री-पुरूष समता, श्रद्धा-अंधश्रद्धा, ईश्वरी अस्तित्व-निरीश्वरवाद, धर्माधारित जीवन-निधर्मी जीवन, परंपरानिष्ठ विचार-वैचारिक उदारमतवाद, साहित्य-कलाविषयक धारणा या सर्वच 'संघर्ष-क्षेत्रात' नवतेच्या, प्रबोधनाच्या पुरस्कर्त्यांनी 'सर्वसाधारणपणे माणूस हा 'एलियन' (अनोळखी, उपऱ्या) गोष्टींना बिचकणारा प्राणी आहे' हे लक्षात ठेवून धोरण ठरवलं तर नवतेचाच मार्ग सुकर होणार आहे.      

Saturday, January 6, 2018

नवे-जुने, अधिक-उणे आणि आपण

'आपण जिथे आहोत तिथवर कसे आलो' या विचाराचा धागा 'आपण जिथे होतो तिथे तरी कसे आलो?' या विचाराशी जोडलेला आहे. मी विशिष्ट कुटुंबात जन्मलो. विशिष्ट संस्कारात वाढलो. पुण्यासारख्या शहरात आलो आणि राहिलो. माझ्यावरील संस्कारांना माझ्या स्वतःच्या अशा गुणदोषांची जोड मिळाली. या सगळ्यातून माझा प्रवास वैचारिक आणि भौतिकदृष्ट्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर होत गेला. हे जसं माझं झालं तसंच इतरांचंही झालेलं आहे. आणि हे होत राहणार आहे. या प्रवासात प्रत्येकाच्या बाबतीत काही सूक्ष्म तर काही ठळक टप्पे असतील. प्रत्येकाची वेगळी कथा असेल. माणसाचा हा जो प्रवास आहे, 'जनांचा प्रवाह' जो चालला आहे त्याचं संपूर्ण, सुस्पष्ट आकलन एका व्यक्तीला, एका विचारधारेला होणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जो खेळ मांडला आहे तो विस्मयचकित करणारा आहे, त्रस्त करणारा आहे, हताश-दुःखी-अस्वस्थ करणारा आहे आणि कुतूहलाने उत्साहित करणाराही आहे. माणसाविषयी आस्था असेल, करूणा असेल तर माणसांच्या प्रवासाची गोष्ट समजून घेणं आत्मिक समाधान देणारा अनुभव ठरू शकतो. 

मला नेहमी असं वाटतं की प्रश्न माणसांचा असण्यापेक्षा माणसांच्या संख्येचा असतो. 'परंपरा' आणि 'नवता' या दोन्हीकडे बघताना हे लक्षात ठेवावं लागतं. मी जेव्हा एखाद्या गोष्टीला 'परंपरा' म्हणतो तेव्हा ती गोष्ट काहीजणांच्या जीवनशैलीचा भाग असते. कदाचित तेही त्या गोष्टीकडे 'हे परंपरेने चालत आलेलं आहे' अशा दृष्टीने, 'परंपरा' नामक काहीएक चीज अस्तित्वात आहे हे मान्य करून बघत असतील. पण त्यामुळे त्यांच्या मनात संघर्ष निर्माण होत नाही. माझ्या मनात तो होतो. मला 'नवता' आकर्षित करते. पण मी इथे स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. तो असा की परंपरेचं काटेकोर पालन करणारा एखादा मनुष्य कधीच काही 'नवीन' करत नाही का? परंपरा आणि नवता या संज्ञा बहुतेकदा धर्म, श्रद्धा, नैतिकता या संदर्भात आणि सामाजिक व्यवस्थेच्या मूल्यांसंदर्भात वापरल्या जात असल्याने जगण्याची इतर अंगे - ज्यात व्यावसायिक, आर्थिक अंग प्रमुख आहे - दुर्लक्षित राहतात. एखादा धार्मिक, सश्रद्ध माणूस आहे. तो त्याबाबतीत परंपराप्रिय आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण तोच माणूस एखाद्या कंपनीत 'रीसर्च अँड डेव्हलपमेंट' विभागात महत्त्वाचं काम करतो आहे, त्याच्यात संशोधनाबद्दल आस्था आहे. म्हणजे धार्मिकदृष्ट्या तो परंपरेचा पाईक असला तरी त्याच्या कार्यक्षेत्रात तो नवतेचा पाईक आहे. वरील प्रश्नाच्या जोडीने येणार दुसरा स्वाभाविक प्रश्नही मी स्वतःला विचारला पाहिजे - नवतेकडे आकृष्ट होणारा कधीच परंपरेचा आधार घेत नाही का? हे प्रश्न आणि त्यांची वास्तव उत्तरे आपल्याला सांगतात की माणूस एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून आणि एक 'सामाजिक घटित'म्हणून एकाच वेळी जगत असतो. आपण दुभंग व्यक्तिमत्वाविषयी ऐकतो. मला तर वाटतं की माणूस दुभंग तर असतोच, पण तो शतभंगही असू शकतो. त्याच्या जगण्याचे अनेक धागे असतात. तो कधी एखादा धागा सोडून देतो, कधी तोच धागा धरून ठेवतो. 

माणसाच्या या 'धरसोडी'चा सूक्ष्म विचार केला तर असं लक्षात येईल की त्यामागे 'स्वार्थ' ही प्रमुख अंतःप्रेरणा कार्यरत असते. एक उदाहरण घेऊ. एखादा मनुष्य कौटुंबिक दबावामुळे परंपरेचं पालन करत असेल तर सकृतदर्शनी 'तो स्वार्थी आहे' असं आपण म्हणणार नाही. परंतु आपण थोडं अधिक खोलात जाऊ. कौटुंबिक दबावाला झुगारण्याची आणि दुसरा पर्याय निर्माण करण्याची ताकद माझ्यात नाही, त्यामुळे सध्या या चौकटीत राहणंच श्रेयस्कर आहे अशा विचाराने जेव्हा बंधनं स्वीकारली जातात तेव्हा तो 'स्वार्थी' विचार असतो हे स्पष्टीकरण आपल्याला मान्य होईल. यासाठी 'स्वार्थ' या एकाच संकल्पनेची विविध रूपे लक्षात घ्यायला हवीत. स्वार्थ ही स्व-केंद्री संकल्पना आहे हे बरोबरच आहे. पण त्यातही 'स्व-विलासी' आणि 'स्व-विरोधी' असा फरक करता येईल. पहिल्यात 'स्व'चे थेट सुख, तशा सुखाची आकांक्षा आहे. दुसऱ्यात 'स्व'च्या इच्छेला मुरड घालून, तडजोड करून 'स्व'रक्षणार्थ मिळवलेलं 'मानीव' सुख आहे. मनुष्याकडे 'स्वार्थी माणूस' म्हणून पाहिलं तरी त्या स्वार्थाची उकल करता आली तर मनुष्याच्या वागण्यातल्या 'विसंगतीची संगती' लावायला मदत होईल. 
तत्वज्ञानात द्वंद्ववाद (dualism) ही एक संकल्पना आहे. ही संकल्पना दोन विरुद्ध तत्त्वांचा संघर्ष मांडते. माणसाच्या मनाबाबत मला असं जाणवतं की संस्कृतीजन्य 'विवेक' आणि उत्क्रान्तीजन्य 'विद्रोह' हा मनाचा एक मुख्य संघर्ष आहे. मन हे कायम या द्विस्थितीमध्ये (dual mode) असतं. इतकंच नाही तर कुठल्याही गोष्टीला 'एकच बाजू' नसते, दोन बाजू असतात असं जे आपण म्हणतो त्याअर्थीही मला द्वंद्ववाद महत्त्वाचा वाटतो. 'एक' असं काही नसतं, 'दोन' असतं, 'एका'वरच सगळा भार नाही, जे आहे ते 'दोघां'चं आहे हे समजणं माझ्यासाठी वेळोवेळी महत्त्वाचं ठरलं आहे. याच तर्काने परंपरेचा, नवतेचा किंवा अन्य कुठल्याही संकल्पनेचा 'एक आणि एकच' खुलासा करता येत  नाही. संकल्पना, विचार विविध पदर घेऊन येतात. त्या सगळ्या बाजूंचं आपलं आकलन जसजसं वाढत जातं तसतशी आपली वाढ होत जाते. हा विचार केंद्रस्थानी ठेवून आपण या सदराची वाट चालणार आहोत.               

'परंपरा आणि नवता' हे विंदा करंदीकर यांच्या एका समीक्षात्मक पुस्तकाचे शीर्षक आहे. विंदांनी 'कविता' या वाङ्मयप्रकाराबाबत त्यांच्या व्याख्यानातून, लेखांमधून जी मांडणी केली आहे त्याचं हे संकलन आहे. बीडच्या मराठवाडा साहित्य संमेलनात त्यांनी वाचलेल्या निबंधाचं शीर्षक 'परंपरा आणि नवता' असं होतं. या सदराविषयी संपादकांशी चर्चा करताना हे नाव सदराच्या विषयवस्तूसाठी मला अगदी समर्पक वाटलं. सार्वजनिक चर्चाविश्वातील अनेक चर्चा या विषयाच्या कक्षेत येतात. साहित्य, कला, सामाजिक प्रबोधन इथपासून राजकीय विचार, विज्ञान-तंत्रज्ञान, आर्थिक-व्यावसायिक क्षेत्र, शेती इथपर्यंत अनेक घटकांना हा विषय स्पर्श करतो. या विषयाचा विचार करताना आपण एक लक्षात ठेवू की 'परंपरा आणि नवता' हा एक मोठा 'स्पेक्ट्रम' आहे. यात व्यक्तिजीवनातील आणि समाजजीवनातील अनेक अंगे सामावली जाऊ शकतात. त्या सर्वच अंगांविषयी काही मांडणी करण्याची माझी पात्रता नाही. परंतु माझे जे आस्थाविषय आहेत त्याबाबत बोलायला, खरं म्हणजे संवाद साधायला आवडेल. मात्र आपण या संवादात एक काळजी घेऊ. परंपरा म्हणजे 'क्ष' नावाची एक गोष्ट आहे आणि 'नवता' म्हणजे 'य' नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. या सदरातून आपण जो शोध घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तो प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात घेऊ. शब्द आणि व्याख्या मांडणीसाठी आवश्यक असल्या तरी त्यातून आपल्या आकलनाला मर्यादा पडू शकतात. त्यामुळे आपण वैचारिक खुलेपणाने परंपरा आणि नवता या दोन्ही संकल्पनांकडे पाहूया. 

वर मी ज्याचा उल्लेख केला आहे ते माणसाच्या मनात सुरू असलेलं द्वंद्व मला नेहमीच आकर्षित करत आलेलं आहे. 'जे आहे ते' आणि 'जे वाटतंय ते' या द्वंद्वात माणूस अडकलेला असतो. या द्वंद्वाची धार कमी-जास्त होत असते, पण द्वंद्व संपत नाही. माणसाचं हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ते सर्जनशीलतेचं उगमस्थानही आहे. या द्वंद्वाचा शोध घ्यावा आणि काही धागे आपल्याला सोडवता येतात का ते पहावं हा या सदरामागचा माझा उद्देश आहे. तो सफल होतो की नाही हे आता वाचकांच्या प्रतिसादावरूनच ठरेल!