Tuesday, December 17, 2019

पुरूषातून 'माणूस' घडवण्याचा प्रश्न

आपलीच असं नव्हे तर जगभरातली आजवरची साधारण समाजव्यवस्था, या व्यवस्थेेने घडवलेलं समाजमानस आणि त्यातून उभे राहिलेले स्त्रियांचे प्रश्न यावर चर्चा होणं, त्यावर काम होणं, सामाजिक सुधारणा होणं, कायद्यात सुधारणा होणं ही प्रक्रिया सुरू होऊन बराच काळ लोटला असला तरी मुळापाशी अजून बरंच काम व्हायची गरज आहे याची साक्ष पटवणारे प्रसंग वरचेवर घडत असतात. बलात्कार व हिंसेच्या अमानुष घटनांनी देश हदरून जात असतानाच मेघना गुलजार या संवेदनशील दिग्दर्शकाच्या नव्या चित्रपटाच्या ट्रेलरने स्त्रीला केवळ ती स्त्री आहे म्हणून ज्या गोष्टींचा सामना करावा लागला आहे त्यातीलच एका, काहीशा विस्मृतीत गेलेल्या गोष्टीला उजाळा मिळाला आहे. ‘छपाक’ या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पडुकोण आपल्याला अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या तरूणीच्या भूमिकेत भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी अग्रवाल या मुलीच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटातून लक्ष्मी अग्रवालवर झालेला अॅसिड हल्ला आणि तिचा पुढचा लढा आपल्याला दिसेलच, पण या विषयासंदर्भातील प्रमुख प्रश्न अर्थातच 'हे का होतं?' आणि 'हे कसं थांबवायचं?' हे आहेत.

सामाजिक गुन्ह्यांमागची कारणं शोधत आपण त्यांच्या मुळाशी जाऊ लागलो की आपल्याला आपल्याच समाजव्यवस्थेतील अनेक कमकुवत धागे दिसू लागतात. त्यामुळे प्रभावित झालेल्या माणसांतील विविधांगी गुणदोष दिसू लागतात. गुन्हेगार हा 'कारण' आहे की 'परिणाम' आहे हाही प्रश्न आपल्याला पडू लागतो. स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत ते पाहता आपण समाज म्हणून अजूनही स्त्रीच्या मानसिक,शारीरिक उर्मींना पूरक असा पुरूष घडवू शकलेलो नाही हे सिद्ध होतच आहे. अर्थात हे एक ढोबळ विधान आहे. पुरूषांमध्ये बदल झाले आहेत, होत आहेत. आज त्याबाबतचं चित्र आशादायक आहे. मात्र त्याचवेळी विविध स्तरातील पुरूषांसोबत विविध पातळ्यांवर , विविध पद्धतीने काम करणं गरजेचं आहे हेही आधोरेखित होतं आहे. स्त्री- पुरुष संबधाचा विचार करताना प्रेम, मैत्री, आकर्षण, लैंगिक इच्छा या भावभावनांचा अनेकविध छटा आणि त्यांचा या संबंधावरील परिणाम आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आपल्याला हेही लक्षात घ्यावं लागतं की समाजाची घडी ज्याप्रकारे लागत गेली आहे आणि त्यातून ज्याप्रकारे विविध प्रकारच्या विषमतेला मूक मान्यता मिळत गेली आहे. त्यातून स्त्री-पुरूष संबंधावर मोठा परिणाम झाला आहे. स्त्री-पुरूष संबंध हे इतर मानवी संबंधांसारखेच 'द्वंद्वात्मक' आहेत आणि त्याला स्त्री पुरुषांमधल्या आदिम आकर्षणाची जोड आहे. दोन मित्रांमध्ये भांडण झालं की त्यांच्यात वादावादी होईल, कदाचित मारामारीही होईल. इतर वेगवेगळ्या नात्यांबाबत भांडण, मतभेद वेगवेगळी रूप धारणं करतील. स्त्री-पुरूष नात्यातही, म्हणजे रोमँटिक नात्यातही हे लागू होतं. मात्र रोमॅंटिक स्वरूपाच्या नात्यात किंवा त्या नात्याला सुरूवातदेखील व्हायच्या अगोदर स्वत:ला किंवा दुसऱ्याला उद्ध्वस्त करण्याइतपत टोकाचा विचार माणसाकडून का केला जातो हे समजून घेणं, त्यावर बोललं जाणं आवश्यक आहे.

यात माणूस म्हणजे प्रामुख्याने पुरूष अपेक्षित आहे, कारण एकतर्फी प्रेमातून एखाद्या मुलीला त्रास देणं, प्रेम नाकारलं गेल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला करणं इथंपासून ते स्वत:चा देवदास करून घेऊन आपलं आयुष्य निराशेच्या गर्तेत लोटून देणं इथवरच्या सर्व प्रकारात पुरूषच अग्रेसर आहेत. यातून 'सामान्यत: पुरूष स्त्रीपेक्षा प्रेमाच्या बाबतील असमंजस व कमकुवत आहे' या विधानाला पुष्टी मिळते. आपल्याला नेमक्या याच मानसिकतेमागील कारणं शोधता यायला हवी आहेत.

स्त्री-पुरुष संबंधामध्ये प्रेम, आकर्षण ही भावना बऱ्याच गुंतागुंतीची आहे. या भावनांच्या मानसशास्त्रीय व जीवशास्त्रीय अंगान केलेल्या तपशीलवार विश्लेषणात जाणं आवश्यक आहेच कारण त्याशिवाय त्यांच संपूर्ण आकलन होणं शक्य नाही. (खरं तर आपण आपल्या प्रत्येकच भावनेचा अभ्यास करायला हवा कारण आपल्या भावनाच आपल्याकडून बरंच काही करून घेत असतात). इथे आपण एक अगदी छोटा प्रयत्न करून बघूया. 

स्त्री-पुरूषांबाबत लैंगिक आकर्षण हा एक आदिम 'फोर्स' आहे. निसर्गाला स्त्री-पुरूष जवळ यायला हवे आहेत कारण त्यातून पुनरूत्पादन होणार आहे. या आकर्षणाच्या वर, मानवी संस्कृतीच्या प्रवाहात जो एक सुंदर स्तर निर्माण झाला आहे तो प्रेमाचा आणि त्याच्या विविध छटांचा आहे. मला असं दिसतं की आज आपल्यासमोरचं आव्हान हे आहे की प्रेम, आकर्षण या संकल्पनांना त्यांच्या कमालीच्या ठोकळेबाज, एकांगी रूपातून बाहेर काढणं आणि त्यांचा अधिक प्रगल्भ, समावेशक अर्थ मुलामुलींच्या मनामध्ये रूजवणं.

प्रेम ही भावना निर्माण कशी होते? आपल्याला अमुक मुलींविषयी जे वाटतं ते प्रेम आहे म्हणजे काय आहे? तिला जर आपल्याविषयी काही वाटतं नसेल तर आपण तिथून मागे का फिरू शकत नाही? एका मुलीने आपल्याला नाही म्हटंले म्हणून आपण तिच्यावर अॅसिड फेकण्याइतके हिंसक का होतो? आपल्या आत असं काय आहे जे आपल्याला इतकं हिंसक बनवतं? हे व असे अनेक प्रश्न पुरूषांनी स्वत:ला विचारणं आणि समाजाने - प्रामुख्याने पालक, शिक्षक, मित्र आणि हितचिंतक यांनी - पुरूषांना त्याबाबत तपासत राहणं फार आवश्यक आहे. स्त्री-पुरूष संबधांना मिळालेलं हिंसेचे हे भयानक परिमाण आपल्याला सामूहिक प्रयत्नानेच नाहीसं करता येईल. मला असं दिसतं की त्यासाठी मुलांच्या वाढीच्या वयात त्यांच्या मानसिक स्वास्थाकडे सतत लक्ष देत राहणं गरजेचं आहे. माणसामध्ये हिंसेची बीज आहेतच. ती पुरूषांमध्ये अधिक प्रमाणात आहेत कारण आपल्या पृथ्वीवरील अस्तित्वाच्या लढाईच्या खूप पहिल्या टप्प्यापासून राज्यव्यवस्थेच्या, समाजव्यवस्थेच्या अलीकडील टप्प्यापर्यंत पुरूषातील आक्रमकता व वर्चस्ववादी वृत्ती यांनी कळीची भूमिका बजावली आहे. पुरूषामधील हिंसेला जैविक आणि समाजरचनेतून मिळालेला सामाजिक असे दोन्ही आधार आहेत. या दोन्हींना ओळखून त्याविषयी पुरूषांना जागं करत राहणं आणि हिंचेची धार कमी करत राहणं हे आपल्याला करावं लागणार आहे.

आजवर हे अनेकदा बोललं गेलं आहे की मुलांना विशेष वागणूक देऊन वाढवणं हे त्यांच्यासाठी आणि समाजासाठी घातक ठरत आलं आहे. त्यामुळे पहिला धडा म्हणून तो आपण लक्षात ठेवायला हवाच. सर्वसाधारणपणे पाहता असं दिसतं की पुरूषामध्ये लैंगिक इच्छा ही स्त्रीपेक्षा जास्त प्रमाणात आपला अंमल गाजवत असते. स्त्री ही 'प्राप्त करण्याची गोष्ट' आहे हे पुरूषाच्या मनोवृत्तीत त्याच्याही नकळत आकार घेत असतं. यात जसा जैविक ऊर्मींचा हात आहे तसाच सामाजिक घडणीचाही हात आहे. त्यामुळे पुरूषाला पारंपरिक पौरूषाच्या कल्पनांपासून जाणीवपूर्वक दूर नेणं हा त्याच्यातील जैविक उर्मीला वळण देण्याच्या प्रयत्नातला एक महत्त्वाचा भाग आहे. सामाजिक विषमता आणि त्यातून स्त्री पुरूष संबंधांवर होणारे परिणाम हा एक विस्तृत आणि वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. त्यावर व्यक्तिशः कुणाला काय आणि किती करता येईल हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे तो मुद्दा बाजूला ठेवला तर आपल्याला आपल्या नियंत्रणाच्या कक्षेत तरी संवेदनशील, सजग आणि पुरूष असण्याच्या अहंकाराच्या ओझ्यापासून मुक्त असलेला 'माणूस' घडवता येईल का हा विचार आपण सर्वांनी करावा. आपण मुलाला केवळ तो मुलगा आहे म्हणून स्वयंपाकघरातील कामातून सूट देतो का हे तपासण्यापासून त्याचं लैंगिक व मानसिक स्वास्थ्य कसं आहे हे चाचपून बघण्यापर्यंत अनेक गोष्टींचा यात अंतर्भाव होऊ शकतो. अशा गोष्टी ओळखून आपण त्यावर काम सुरू केलं तर ते आपल्या मुलींना आपणच निर्माण केलेल्या या समाजात सुरक्षित वाटण्याच्या दिशेने पडलेलं एक आश्वासक पाऊल ठरेल! 

- दिव्य मराठी 'मधुरिमा' (१७ डिसेंबर २०१९)

Sunday, December 8, 2019

वास्तवाचा दाह, वास्तवाचं आकलन

'बलात्कार' या विषयावर काही लिहायचं, बोलायचं बाकी आहे का हा एक आणि तसं केल्याने काही फरक पडणार आहे का हा दुसरा, असे दोन प्रश्न मनात येतात. ते काहीशा हतबलतेने आलेले प्रश्न आहेत. आपल्या - होमो सेपियन्सच्या - जगण्यात आपण इथवर आलो, नेत्रदीपक प्रगती केली हे अचंबित करत असताना त्या जाणिवेच्या तळातून 'आपण इथवर येऊन चूक केली का?' असा एक विरुद्ध, अस्तित्ववादी प्रश्न डोकं वर काढतो. हा प्रश्न पडायला कारण ठरेल अशा घटना आजूबाजूला घडत असतात. आपणच निर्माण केलेल्या वास्तवाच्या दुखऱ्या बाजू आपल्या 'सिव्हिलाइज्ड' जगण्यावर धडका देत असतात. भौतिक अर्थाने आपलं जगणं पुष्कळ सुखकर झालं आहे हे खरं आहे. आपण तुलनेने पुष्कळ सुरक्षित जीवन जगतो आहोत आणि जीवन सुरक्षित झाल्यावर सुरू झालेल्या सांस्कृतिक प्रवाहाला आपण जगण्याचा भाग बनवलं आहे. परंतु कला-संस्कृतीबरोबर राजकारण-शिक्षण-धर्म-तत्त्वज्ञान-नीती या आणि अशा इतर वर्तुळांमधून आपलं जगणं फिरत असताना खाडकन मुस्कटात मारल्यासारखी एखादी घटना घडते आणि आपण क्षणभर सुन्न होतो. यातला आणखी एक सूक्ष्म भाग असा की शास्त्रीयदृष्ट्या एक - म्हणजे होमो सेपियन - आणि सामाजिकदृष्ट्या शेकडो तुकड्यात विभागलल्या गेलेल्या आपल्यामधील कोण, कधी, कशाने सुन्न होतं हाही एक अभ्यासाचा विषय आहे आणि तो मनुष्य या एका प्रजातीचं शतभंग स्वरूप आपल्यासमोर ठेवतो. 

हैदराबाद येथील प्रियांका रेड्डी या व्यवसायाने पशुवैद्यकीय डॉक्टर असलेल्या सव्वीस वर्षांच्या तरूणीवर गेल्या आठवड्यात सामूहिक बलात्कार झाला आणि बलात्काऱ्यांनी तिचा खून करून तिचा मृतदेह जाळून टाकला. त्याच दिवशी रांचीमध्ये विधी शाखेच्या एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आणि तमिळनाडूतील कांचीपुरम येथे रोजा नावाच्या एका वीस वर्षाच्या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार आणि हत्या या घटनांमधील सातत्य नवीन नाही. गेल्या काही वर्षातली अनेक घटनांची यादी आपल्यासमोर आहे. खैरलांजी, दिल्ली, कोपर्डी, कठुआ, उन्नाव ही काही ठळक नावं. अशा घटनांनंतर संतापाची लाट उसळणं, त्यातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येणं हे समजण्याजोगं आहे. असं होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. विविध सामाजिक प्रश्नांवर लोकांकडून उत्स्फूर्तपणे आंदोलन होत राहणं हे आश्वासक आहे. मात्र त्याचवेळी या सगळ्या भीषण वास्तवाच्या पोटात नक्की काय आहे आणि जे आहे ते का आहे, त्याचं काय करायचं या प्रश्नाला आपण सामोरं गेलं पाहिजे. 

बलात्कारासारख्या घटनेचे आरंभ बिंदू वेगवेगळे असू शकतात. अनियंत्रित किंवा विकृत लैंगिक इच्छा, लैंगिक उपासमार, पुरूषसत्ताक व्यवस्थेत घडलेल्या मानसिकतेतून निपजलेला स्त्रीबद्दलचा दूषित दृष्टीकोन, गुन्हेगारी पर्यावरणात वाढल्याने घडलेली आणि ज्याला समाज 'गुन्हा' म्हणतो त्याला गुन्हा न मानण्याची मानसिकता, कधी सेंद्रीयपणे तर कधी सामाजिक पर्यावरणामुळे घडलेली हिंसक वृत्ती अशा विविध सुट्या कारणांपैकी काहींच्या / सर्वांच्या एकत्रीकरणामुळे घडलेलं पुरूषाचं मानस बलात्काराच्या मुळाशी आहे. इथे आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. 'सामान्यीकरण' हा सत्यशोधनाचा आणि त्यामुळे होणाऱ्या ज्ञानाचा शत्रू आहे. 'स्त्री अशी असते', 'पुरूष असा असतो' अशी विधानं किंवा या गृहीतकांवर आधारलेलं चित्रण ललित लेखनात करायला हरकत नाही, पण सामाजिक संशोधनात ते होऊ नये. दुसऱ्या बाजूने हेही खरं आहे की स्त्रीविशिष्ट आणि पुरूषविशिष्ट असे काही गुणधर्म आहेत. ते जैविक आणि सामाजिक अशा दोन्ही प्रभावांमुळे तयार होत असतात. एखाद्या विशिष्ट घटनेचं विश्लेषण करताना त्यामागे हे गुण कार्यरत होते का हे तपासण्याची काळजी मात्र घ्यायला हवी. बलात्काराच्या गुन्ह्यांमागे जे पुरूषी मानस आहे ते तसं का घडत गेलं आहे याचा विचार केल्याशिवाय त्यावर उपाय करणं शक्य होणार नाही आणि परिणामी बलात्कार थांबणारही नाहीत. 

आपण जेव्हा 'का?' हा प्रश्न सतत विचारतो तेव्हा आपण मुळापाशी जाऊ लागतो. बलात्काराचे गुन्हे थांबत नाहीत हे वास्तव या प्रश्नाच्या मुळापाशी आवश्यकतेइतकं काम झालेलं नाही या दुसऱ्या वास्तवाची साक्ष देतं. एकीकडे मूल्याधारित विचार रूजवण्यासाठी प्रबोधनाच्या अंगाने काम होत राहणं आणि दुसरीकडे व्यवस्थेच्या पातळीवर कायदा, सुरक्षेचे विविध उपाय या अंगाने काम होत राहणं आवश्यक आहे. (प्रबोधनाची चळवळ आणि प्रशासन दोन्हीकडून दोन्ही अंगाने कामं होऊ शकतातच). परंतु समाजाच्या विषम रचनेचं काय? पराकोटीची आर्थिक विषमता असताना, त्या विषमतेमुळे लोकांचं जगणं, त्यांचे विचार प्रभावित होत असताना मूल्यविचारांबाबत सगळेजण एकाच पातळीवर यावेत ही अपेक्षा फोलच ठरणार. जगण्याकरताच जर लढाई करायला लागत असेल तर मूल्यांचं महत्त्व कमीच होत जातं. याचा अर्थ मूल्यविचार महत्त्वाचा नाही असं अजिबातच नाही, पण त्याच्या प्रसाराला मर्यादा आहेत, तो विचार उद्ध्वस्त करणाऱ्या गोष्टी आजूबाजूला घडणार याची मानसिक तयारी असणं आवश्यक आहे. मूल्यविचार आणि वास्तवाचं स्वरूप यांच्यातला झगडा कमी व्हायचा असेल तर मूल्यविचारांचा निव्वळ पुरस्कार करून चालणार नाही. त्याकरता वास्तवाच्या डोहात उतरावं लागेल. बलात्काराच्या बऱ्याचशा घटनांमधील गुन्हेगारांची सामाजिक -शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर हे लक्षात येईल. समाजाच्या या 'अंडरबेली'पर्यंत आपण -  बुद्धिवंत आणि विचारी लोक - पोचलेलो नाही. याला अपवाद अर्थातच असतील. शिवाय यात व्यावहारिक अडचणी असू शकतील. इतरही कारणं असतील. पण जिथे काम होणं गरजेचं आहे तिथे ते होत नसेल तर आहे त्या चित्रात फारसा बदल होणार नाही. एका बाजूला लेख लिहिले जातील, चर्चा होतील, मतं व्यक्त केली जातील आणि काही दिवसांनी पुन्हा बलात्काराची बातमी येईल. 

हा निराशावाद नाही. पण यात थोडी हताशा जरूर आहे. आपण समग्रपणे गोष्टी समजून घ्यायला समाज म्हणून कमी पडतोय या जाणिवेची रूखरूख आहे. यादसंर्भात 'लैंगिकता आणि पुरूषाची प्रकृती' या एका गोष्टीबाबत आपण आपलं आकलन जर वाढवलं तर या विषयाकडे बघण्याची एक दृष्टी मिळेल आणि आपला विचार योग्य दिशेने जाईल असं वाटतं. 

इंग्लिशमध्ये 'मेल इरेक्शन हॅज नो कॉन्शन्स' असा एक वाक्प्रयोग आहे. इथे लक्षात घ्यायची महत्त्वाची गोष्ट ही की कॉन्शन्स नसणं हे योग्य आहे असं इथे म्हणायचं नाही. 'कॉन्शन्स नसतो' ही वस्तुस्थिती फक्त सांगायची आहे. पुरूषांची लैंगिक इच्छा चाळवली जाण्याचे अनेक प्रकार विविध माध्यमांमधून उपलब्ध असले तरी पुरूषाच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे याचा फारसा अभ्यास होताना दिसत नाही. (स्त्रीच्या लैंगिक मनोविश्वाचं स्वरूप काय आहे यावरही अभ्यास होत नाही. पुरूषाचा उल्लेख करण्याचं साधं कारण हे की त्याची लैंगिक इच्छा धोकादायक वळणं घेते हे अनेक वेळा दिसलं आहे.) इरेक्शन असलेला, येऊ घातलेला पुरूष त्याच्या 'नॉर्मल' रूपाहून वेगळं रूप धारण करू शकतो. पुरूषाची लैंगिक इच्छा ही 'इंसर्टिव्ह' स्वरूपाची असते तर स्त्रीची 'रिसेप्टिव्ह' स्वरूपाची असते. पुरूषाला 'आतलं बाहेर' टाकायचं असतं आणि स्त्रीला 'बाहेरचं आत' घ्यायचं असतं. स्त्रीदेखील लैंगिकदृष्ट्या अतृप्त असूच शकते. पण त्यामुळे ती हिंसक होताना दिसत नाही. पुरूषाबाबत हा 'फोर्स' फार मोठ्या प्रमाणावर काम करतो आणि प्रसंगी त्याच्या विवेकालाही खाऊन टाकतो याच्या मुळाशी लैंगिक संबंधांमधून प्रजोत्पादन होतं हे कारण आहे. तो 'फोर्स' इतक्या ताकदीचा आहे कारण आपण तांत्रिकदृष्ट्या प्रचंड प्रगती केलेली असली तरी आपण प्रजोत्पादन अजूनही लैंगिक संबंधांतूनच करतो आहोत. त्याला अनुसरून स्त्रीचं व पुरूषाचं जे मानस घडलं आहे, जी वृत्ती घडली आहे त्यात अद्याप मोठा बदल झालेला नाही. स्त्रीमध्ये तिचं बीज मासिक पाळीद्वारे बाहेर पडतं तर पुरूषामध्ये ते वीर्यस्खलनाद्वारे बाहेर पडतं. पुरूषबीजाचा संयोग स्रीबीजाशी होणार नसला तरी त्याला शरीराबाहेर पडावंच लागतं. सुरूवातीला पाहिलं त्याप्रमाणे पुरूषाच्या मनात बलात्काराच्या आरंभ बिंदूंचं जे मिश्रण कार्यरत असतं त्यात हा एक जैविक भाग कार्यरत असतो. 

पण म्हणजे मग जैविक प्रेरणा म्हणून पुरूषांना कायम सूट द्यायची का? अजिबात नाही. पण ही जैविक प्रेरणा आहे याची जाणीव त्यांना आणि स्त्रियांना करून द्यायची. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की लैंगिक इच्छेबाबत, त्यातून येणाऱ्या अवघडलेपणाबाबत नुसतं तोंडाने बोललं तरी तो ताण हलका व्हायला मदत होते. ती इच्छा 'डायव्हर्ट' करण्याचे मार्ग शोधता येतात. लोकसत्ता 'चतुरंग'मधील २०१८ सालच्या माझ्या सदरातील एका लेखात मी पुरूषांसाठी 'सेक्स ऑडिट' करावं असं सुचवलं होतं. त्यावर खरोखर विचार व्हावा. बलात्काराचा विचार करताना 'एक अत्यंत आदिम, सहज क्रिया - ज्यात खरं तर अगदी सौम्य स्वरूपाची हिंसाही अंतर्भूत असू शकते - ती इतक्या टोकाच्या हिंसकतेकडे जाते आहे याचा अर्थ पुरूषांच्या मनात आणि आपल्या सामाजिक रचनेत काहीतरी मोठी गडबड होतेय का' हा विचार आपण केला तर आपल्याला काही उत्तरं मिळू शकतील. इथे आपल्याला पुरूषाची लैंगिकता, पुरूषसत्ताक व्यवस्थेने घडवलेली त्याची वर्चस्ववादी वृत्ती, त्यातून स्त्रीकडे 'माणूस' म्हणून न पाहता निव्वळ 'माझ्या इच्छापूर्तीचं साधन' म्हणून पाहण्याची लागलेली सवय, परिस्थितीजन्य कारणं या सगळ्याचा सुटा सुटा आणि एकत्रित दोन्ही प्रकारे विचार करायला हवा. बलात्कारांच्या अनेक केसेस समोर घेऊन त्यामागील नेमक्या कारणांचा सामाजिक संशोधनाच्या दृष्टीने अभ्यास करायला हवा. समाजातील पुरूषांच्या कोणत्या 'सेगमेंट'वर काम करण्याची जास्त गरज आहे हे शोधायला हवं. पुरूषांच्या वर्तनाचे तपशील, त्यातील वीक पॉईंट्स समजून घ्यायला हवेत. पुरूषांनी त्यांच्या लैंगिक मनोविश्वाला पोर्नोग्राफी, अचकट-विचकट विनोद, स्त्रीचं वस्तूकरण यात बंदिस्त न करता हे मनोविश्व सार्वजनिक चर्चाविश्वाचा भाग व्हायला हवं. 

बलात्काराच्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे सार्वजनिक चर्चाविश्वात 'स्त्री विरुद्ध पुरूष' असं एक चित्र उभं राहिल्यासारखं दिसतं. अर्थात हे चित्र केवळ याच संदर्भात उभं राहतं असंही नाही. स्त्रीवादी सिद्धांतनातून पुरूषसत्ताक व्यवस्थेची जी चिकित्सा झाली आहे आणि पुरूषांसमोर जो आरसा धरला गेला आहे त्यातून दिसणारं आपलं रूप मान्य न करण्याच्या पुरूषांच्या अहंकार प्रेरित वर्तनातूनही हा संघर्ष उभा राहतो आहे. दुसऱ्या बाजूने पाहता स्त्रीवादी सिद्धांतनाचं उपयोजन स्त्री-पुरूष संबंधातील प्रत्येक आयामाला लावण्याच्या आग्रहातूनही हे होत आहे. खरं तर वैचारिक संघर्षातून सामाजिक आकलन अधिक नेमकं होत जाणं अपेक्षित आहे, पण तसं न होता शत्रुभावी विचार प्रबळ होताना दिसतो आणि ते धोक्याचं आहे. 

विविध सामाजिक समस्या आपल्यासमोर आपल्या 'प्रगत मेंदू'ला आव्हान देत उभ्या असतात. आपला देश एकाच वेळी अनेक शतकांमध्ये जगत असल्याने इथल्या सामाजिक प्रश्नांचं स्वरूप अधिक गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेताना एकांगी विचार करण्याचं टाळणं, संख्याशास्त्रीय माहितीचा आधार घेणं, सरसकटीकरण न करता 'स्पेसिफ़िसिटी' लक्षात घेणं आणि कारणांच्या मुळाशी जाण्यासाठी 'फिल्ड'वर उतरणं याला पर्याय नाही. बलात्काराबाबत बोलायचं झालं तर भारतीय पुरूष हा भारतीय स्त्रीचा ऐतिहासिक गुन्हेगार आहे यात शंकाच नाही. परंतु त्याला गुन्हेगार राहू न देण्यासाठी आजच्या भारतीय स्त्रीने 'पुरूष प्रबोधना'च्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवायला हवा. ही तिला केलेली विनंती आहे. तिच्या सहभागाशिवाय 'पुरूषांचं सक्षमीकरणा'ला प्रबोधनाच्या चळवळीच्या कार्यक्रमपत्रिकेत प्रमुख स्थान मिळणार नाही!    

- लोकसत्ता 'लोकरंग' (८ डिसेंबर २०१९)


Sunday, November 10, 2019

उदारमतवादाचा प्रवास आणि हिंदुत्ववादाचा थांबा

वसंत पळशीकर यांचा 'गोध्रा'या शीर्षकाचा एक लेख 'नवभारत'च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या 'गोध्रा' या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये [प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या 'जिहाद, गुलाल आणि सारीपाट' या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत. 

'गोध्रा' या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की 'विशुद्ध धर्मा'चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की 'विशुद्ध धर्म' हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते. 

आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.

गेल्या काही वर्षातील मॉब लिंचिंगच्या घटना, गोरक्षकांचे हल्ले, कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कठुआ घटनेनंतर मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते. 

याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, 'मल्टीपोलर' रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. दोन-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक आणि समाजमाध्यमांवर अतिशय सक्रीयपणे भाजपचा अजेंडा पुढे नेणाऱ्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर 'व्हॉट्सअॅप चर्चा' झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण 'शांततामय सहअस्तित्व' कसं टिकवायचं ?       
   
मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे 'होलिस्टिक' विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले  तर मला 'फक्त त्या गोष्टींचं स्वागत' करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं. मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष 'सुधारला', माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही 'सुधारण्याची स्पेस' नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. त्यांची फेसबुक व ट्विटरवरील अभिव्यक्ती कधीकधी टोकाची विद्वेषी असते. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं. 

हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे 'पुरोगामी' शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही 'वॉटर टाइट कंपार्टमेंट्स' नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं 'विशुद्ध धर्मपालन' करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (स्लॅश जाणीवपूर्वक वापरला आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.) ती 'भारतीयत्वा'कडे, 'आधुनिकते'कडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की 'हिंदू' म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त 'हिंदू' असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे 'हिंदू' आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. 'हिंदू आयडेंटिटी' हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही. 

एकीकडे टोकदार स्वरूपाचा हिंदुत्ववाद प्रबळ होत असताना दुसरीकडे बहुसंख्य 'हिंदू मानस' अजूनही 'हिंदू असण्या'प्रती हळवं आहे आणि त्यांना हिंदू धर्माची चिकित्सा नको आहे किंवा मुस्लिम धर्माची चिकित्सा झाली तरच हिंदू धर्माची चिकित्सा मान्य आहे असं दिसतं. त्याचा एक साइड इफेक्ट म्हणजे ज्या घटनांचा संबंध अतिरेकी हिंदुत्ववादाशी पोचतो त्याबद्दलही कुणी काही बोलू नये अशी अपेक्षा तयार झाल्यासारखी दिसते.     
  
मला असं वाटतं की आज झुंडीची मानसिकता ज्याप्रकारे वाढते आहे ती लक्षात घेता आपल्या धर्माविषयी सॉफ्ट कॉर्नर असणारी जी धार्मिक मानसिकता आहे (हिंदू आणि मुस्लिम दोन्ही) तिकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. कारण जी मानसिकता आज 'सॉफ्ट' आहे ती उद्या 'हार्ड' होतेच कारण या मानसिकतेचा पायाच मुळात 'रॅशनल' नाही आहे. धार्मिक दुखावलेपण हे तीव्र स्वरूपाचं असतं आणि तिथे प्रतिवाद केला तरी तो स्वीकारला जात नाही. एका धार्मिक कट्टरतेची चिकित्सा दुसऱ्या धार्मिक कट्टरतेच्या 'रेफरन्स'नेच झाली पाहिजे यात 'लॉजिकल फॅलसी' आहे - म्हणजे ते तर्कदृष्ट्या योग्य नाही. पण भारतीय संदर्भात त्याला वेगळा आयाम आहे हे खरं. कारण कट्टर हिंदुत्ववाद हा कट्टर मुस्लिम धार्मिकतेची प्रतिक्रिया म्हणून उभा राहिला आणि बळकट झाला असं म्हटलं जातं. याबाबत एक विचार करायला हरकत नाही. समजा भारतावर मुस्लिम शासकांनी राज्य केलं नसतं आणि पुढे मुस्लिम मूलतत्त्ववादाची झळ भारताला पोचलीच नसती तर हिंदू धार्मिकता कट्टर न होता जातीय कट्टरताच फक्त उरली असती असं म्हणता येईल का? 'जर-तर' च्या प्रश्नांना फारसा अर्थ नसतो हे खरं, पण हिंदू धार्मिकतेच्या स्वरूपाचा विचार करताना हा प्रश्न मनात डोकावतो आणि तो तितकाही अप्रस्तुत वाटत नाही. आणि गंमत म्हणजे आज धार्मिक कट्टरता जशी आहे तशीच जातीयही आहेच. धार्मिक आहे म्हणून सगळे एकत्र एका झेंड्याखाली आहेत असं झालेलं नाही. याला धार्मिक पुनुरुज्जीवनाच्या प्रयत्नांना आलेलं अपयश म्हणायचं, मर्यादित यश म्हणायचं की याची अन्य प्रकारे चिकित्सा करायची हाही एक प्रश्न आहेच. सध्या तो नोंदवून पुढे जाऊ. 

एक गोष्ट स्पष्ट आहे की धर्माची प्रस्तुतता मान्य केली तरी धर्म बहुसंख्य माणसांना हळवा आणि म्हणून कट्टर बनवत असल्याने धर्माच्या कक्षेच्या बाहेर राहून जे विचार करू शकतात त्यांच्यावर जास्त जबाबदारी येऊन पडते. पुढे जाण्याआधी एक किस्सा सांगतो. 'साइनफेल्ड' ही एक गाजलेली अमेरिकन मालिका. 'फ्रेंड्स'च्या आधीची. यातील एका भागात एका स्री व्यक्तीरेखेच्या तोंडी असा संवाद आहे की तिचं आणि गांधींचं पॅशनेट प्रेमप्रकरण होतं. 'गांधी त्यांचं टक्कल असलेलं डोकं तेलात बुडवून माझ्या शरीरावर फिरवत असत' असं ती म्हणते. (मूळ इंग्लिशमध्ये ऐकायला हे अधिक गंमतीदार वाटतं). आता हे बघत असताना मी हसत होतो. याचं कारण काय? एक म्हणजे मी लिबरल आहे, दुसरं म्हणजे विनोदी म्हणूनही, त्या विशिष्ट संदर्भात मला ते मान्य होतं. पण हा किंवा असा विनोद एखाद्या कट्टर हिंदुत्ववाद्याने केला असता तर मला तो चालला असता का? याचं उत्तर असं की विनोद जर खरंच दर्जेदार (आता यात सापेक्षता आहे, पण त्याला इलाज नाही!) असेल तर आवडेल. नसता तर राग आला असता किंवा तिकडे दुर्लक्ष केलं असतं किंवा स्वतंत्रपणे त्याचा उल्लेख लेखात वगैरे केला असता. मी जरी विनोद एंजॉय केला तरी तो 'निखळ विनोद' आहे की 'राजकीय स्टेटमेंट' आहे हे मला समजलं असतं. आता आपण दुसऱ्या बाजूला जाऊ. मी जर कट्टर हिंदू धार्मिकतेबाबत विनोदाने काही लिहिलं तर एखादा हिंदुत्ववादी ते विनोदाने घेऊ शकत नाही कारण त्याला त्यात निखळ विनोद दिसत नाही. त्याला त्यात राजकीय कोन दिसतो कारण विनोदाच्या मांडणीकडे तो त्या कोनातून बघतो. (आमच्या एका बऱ्यापैकी हिंदुत्ववादी काकांनी केलेला एक विनोद आठवला. कशावरून तरी तलाकविषयी बोलणं सुरू होतं. माझी आई उर्दू माध्यमाच्या शाळेत शिक्षिका होती. तिथे बऱ्याच मुस्लिम शिक्षिका होत्या. मी सहज म्हटलं की मला आठवत नाही कधी तलाक वगैरे झाल्याचं. त्यावर काका म्हणाले - नोकरी करणाऱ्या बायकोला कोण तलाक देईल? मी काकांना एक हिंदुत्ववादी टाळी दिली!)  

हा एक तिढा आहे आणि विशिष्ट संदर्भात आपण निव्वळ व्यक्ती म्हणून राहू शकत नाही हे आपल्याला मान्य करावं लागेलच. पण याच्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की संघटित धर्माच्या कक्षेबाहेर असणाऱ्या माझ्यासारख्याकडे जास्त जबाबदारी असली तरी जे कक्षेच्या आत आहेत त्यांनीही परिघाकडे थोडा प्रवास करायला हरकत नाही. मुळात एक तर गांधी, फाळणी, काश्मीर, हिंदू-मुस्लिम संघर्ष याबाबत पुष्कळ गैरसमज असतात. राजकीय स्थित्यंतराच्या काळात जे घडतं त्याचं सोपं आणि सोयीस्कर आकलन करून दिलं जातं. त्यामुळे हिंदुत्ववादाच्या स्वरूपाविषयी काही बोललं तर त्याचा संबंध काश्मीर, फाळणी, मुस्लिम तुष्टीकरण याच्याशी न जोडता 'हे आपल्याच सामाजिक सुधारणेसाठी उपयोगी असू शकेल' असा विचार तरी किमान करून पाहावा.  

आज जे अस्वस्थ करणारं चित्र दिसतं त्या पार्श्वभूमीवर मला दोन-तीन गोष्टी दिसतात - 

  • एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची 'ग्रॅव्हिटी' लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं - जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.) 
  • दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर माफी मागणं. यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता 'माणूस दुखावला गेला' म्हणून माफी मागणं आवश्यक आहे असं मला वाटतं. 
  • तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!

यासंदर्भात मला आणखी एक असं वाटतं की कदाचित स्ट्रॅटेजी म्हणून 'डावा हिंदू' ही ओळख माझं म्हणणं पोचवायला उपयुक्त ठरू शकेल. संघटित धर्मापासून मुक्त होण्याच्या वाटचालीत आधी धार्मिक ओळख पुढे आणणं हेच कदाचित उपकारक ठरेल. धर्माचा प्रभाव असलेल्या समाजात धर्माची चौकट संवादाची जागा मोकळी करते म्हणून हे करायचं. हिंदुत्ववादी संघटनांचं यश धार्मिक ओळखीला चेतवण्याच्या सोप्या मार्गावरून गेल्यामुळे आहे. तिथे 'मूलभूत परिवर्तनाचं आव्हान' घेणं टाळलेलं आहे किंवा परिवर्तनाचं आव्हान घेतलं तरी ते बहुतेकदा धर्म-जातीच्या स्ट्रक्चरला, आर्थिक संरचनेच्या स्ट्रक्चरला धक्का न लावता घेतलेलं आहे. परिवर्तनात जेव्हा मूलभूत वैचारिक परिवर्तन अभिप्रेत असतं तेव्हा ते मोठं आव्हान असतं. हिंदुत्ववादी विचारात मूलभूत वैचारिक परिवर्तनापेक्षा हिंदुहितवाद, सेवाभाव या गोष्टी अधिक प्रभावी आहेत. त्या बळावर त्यांनी संस्थात्मक बांधणीही केली आहे. परंतु त्याला धर्माची दृश्य-अदृश्य चौकट आहेच. मग परिवर्तनाच्या विचारानेदेखील ही दृश्य-अदृश्य चौकट स्वीकारावी. आज कदाचित या चौकटीपासून बरीच फारकत घेतल्याने परिवर्तनाचा विचार रूजवता येत नसेल. 'मी तुमच्यातला नाही' असं सांगण्यापेक्षा 'मी तुमच्यातलाच आहे आणि मला माझं वेगळं म्हणणं मांडायचं आहे' असं म्हणणं अधिक फलदायी ठरू शकेल.

माझा एक मित्र मानवी उत्क्रांतीचा चांगला अभ्यासक आहे. त्याच्याबाबत सांगावी अशी एक विशेष गोष्ट म्हणजे त्याने या विषयाचे लहान मोड्यूल्स तयार केले आहेत आणि तो शाळेतील मुलांसमोर ते सादर करतो. त्याचं काम आणि त्याचा दृष्टीकोन मला खूप महत्त्वाचा वाटतो. एकदा गप्पा मारताना तो म्हणाला होता की उत्क्रांतीचा विषय निघाला की मी लोकांना सांगतो की देव आहे-नाही या वादात आपण पडायलाच नको. मी देवाचं अस्तित्व नाकारण्याकरता उत्क्रान्तीचा अभ्यास केलेला नाही. हा अभ्यास करताना मला जाम मजा आली म्हणून मी तो केला. ती मजा तुम्हालाही अनुभवता येईल म्हणून तुम्ही हा अभ्यास करा!

मला असं दिसतं की परिवर्तनाचा विचारदेखील लहान मोड्यूल्समधूनच प्रभावीपणे पोचेल. त्याचाच एक भाग 'डावा हिंदू' ही स्वतःची ओळख न्यूट्रॅलिटीने मान्य करणे हा असू शकेल. माणूस धार्मिक होतो, कट्टर होतो याच्या मुळाशी माणसाचं 'व्हल्नरेबल' मन आहे. मग मन जर व्हल्नरेबल आहे तर ते परिवर्तनाकडेही झुकू शकेल. त्यासाठी परिवर्तनवादी विचारात परिवर्तनशीलता हवी!

- 'सृजन' दिवाळी अंक, २०१९ 

Tuesday, November 5, 2019

गांधीविचार : अध्याय २०१९

गांधींच्या बाबतीत सजगपणे, जाणतेपणानं विचार करायला मी कधी सुरुवात केली हे मला सांगता यायचं नाही. गांधी, नेहरु, जेपी आणि विनोबा हे सगळेजण लहानपणापासून पुस्तकं, चर्चा आणि प्रभाव या स्वरुपात घरामध्ये वास्तव्य करत होते. माझ्या वडिलांची ‘सर्वोदयी’ विचारदृष्टी जगण्याची मूल्यात्मक बाजू सतत स्पष्टपणे दाखवत होती.  व्यावहारिक पातळीवर जगण्याचे अनेक संघर्ष होतेच आणि त्यावेळी ‘या मूल्यांचं नक्की काय करायचं ?’ हा प्रश्‍न पडला नाही असंही नाही, पण या सर्व मंडळींनी जे भरणपोषण केलं त्याचे परिणाम पुढे अनेकदा प्रत्ययास आले.

गांधी हे एक विचारात पाडणारं, कधी कधी गोंधळात पाडणारं रसायन आहे यात शंकाच नाही. गांधींविषयी नव्याने काही लिहायची गरज आहे का असं एकीकडे वाटत असताना दुसर्‍या बाजूने गांधीविचारांच आकलन करुन घ्यायची उत्सुकता असणारी नवीन पिढीही तयार होताना दिसते. गांधी हा समकालीन सामाजिक, राजकीय विचारातला एक ‘लंबी रेस का घोडा’ आहे आणि गांधीविचार हा मानवी परस्पर संबंध, मानवी आकांक्षा, मानवनिर्मित अनेक व्यवस्था यांच्या ‘फंक्शनिंग’मध्ये कमी-अधिक प्रमाणात योगदान देत असतो. हे वारंवार दिसून येतं. आपण गेल्या दोन शतकांकडे नजर टाकली तर ‘व्यवस्था-विचार’ म्हणून उदयास आलेल्या मार्क्सवादानंतर गांधीविचार हा आणखी एक ‘व्यवस्था-विचार’ होता असं स्पष्टपणे दिसतं. भारतीय सामाजिक अभिसरणाची सुरुवात, जोतिबा फुले, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, र.धों.कर्वे, बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि इतरही अनेक अभ्यासक विचारवंत-कार्यकर्त्यांच्या योगदानातून होते. भारतीय समाज प्रवाहाला वळण देण्यात या सगळ्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. गांधींच्या बाबतीत जो अधिकचा फरक पडला तो त्यांच्या राजकीय प्रभावामुळे, त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक मांडणीमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या रचनात्मक कार्याच्या दिशेमुळे. खरं पाहता निव्वळ वैचारिक, आधुनिकता केंद्री, क्रांतदर्शी दृष्टीने तुलना केली तर आंबेडकरांचं जातिबद्ध भारतीय समाजाचं आकलन आणि या समाजाच्या रचनेमध्ये मुळातून काही बदल करण्यासाठीची वैचारिक दिशा ही गांधींपेक्षा अधिक’ मूलगामी आहे असं म्हणता येईल. र.धों.कर्व्यांचे स्त्री-पुरुष संबंधाबाबतचे, संतती नियमनाबाबतचे विचार पाहता या विशिष्ट मुद्यावर ते गांधींपेक्षा अधिक पुढे होते असंही दिसू शकेल. त्यमुळे प्रागतिकतेच्या विविध निकषांवर गांधी मागे पडण्याचीच शक्यता जास्त आहे. असं असताना गांधी विचार ‘शिळा’ होत नाही, समाजिक संबंधांमध्ये,राजकीय ’ जाणिवेच्या व आनुषंगिक भूमिकेच्या बाबतीत तो सतत अस्तित्व टिकवून ठेवतो याचं कारण काय असावं?

मला याचं कारण हे दिसतं की गांधीविचार हा ‘आतून बाहेर’ असा प्रवास करणारा विचार आहे. गांधींची एकादश व्रते आणि त्यांच्या मांडणीतला नैतिकतेचा, साधनशुचितेचा आग्रह, त्यांचं एकूण तत्त्वज्ञान माणसाला एका उन्नत पातळीवर नेण्याचा प्रयत्न करणारं आहे. त्यात मग अर्थातच अवघड आदर्श आहेत. आपण ज्याला सहजपणे ‘अव्यवहार्य’ म्हणू अशा गोष्टी आहेत. रसहीन-एकसुरी वाटेल अशी जीवनशैली आहे. व्यवस्था-विचार करायचा तर मानव-विचारापासून सुरुवात करायला हवी हे मार्क्सही म्हणतो; पण आधुनिकता, सहज प्रेरणांना न्याय, उद्यमशीलता, सृजनशीलता या व इतर पैलूंना कवेत घ्यायचं स्वातंत्र्य असणार्‍या माणसाची ‘नैतिक बैठक’ काय असावी हा गांधीविचाराचा गाभा आहे. या नैतिक भूमिकेविषयी मत-मतांतरं असू शकतात. कारण गांधीविचार हा प्रामुख्याने 'माणूस कसा असतो?' यापेक्षा 'माणसाने कसं असायला हवं?' याचा विचार करतो. त्यामुळे तो रूढार्थाने 'व्यवहार्य' होत नाही आणि मतभेद उत्पन्न होतात. शिवाय गांधीविचारांचं सुलभीकरण, अपप्रचार, चुकीचे अर्थ लावणं यामुळेही गांधींबद्दल भरपूर गैरसमज होतात.  

माणसाचं एक प्रमुख वैशिष्ट्य असं की त्याच्या आदिम काळातील जगण्याच्या लढाईपासून ते आजच्या अत्याधुनिक जगण्यापर्यंत त्याने ‘विचारधारा’ जन्माला घातल्या आहेत. दुसर्‍या बाजूला त्याचं आजचं दैनंदिन जीवन इतकं गुंतागुंतीचं आहे की ‘विचारधारा’ बरहुकूम वागत येईलच असं नाही. माणसाला क्षणोक्षणी कसले ना कसले निर्णय घ्यावे लागतात. तिथे विचारधारेबरोबरच, किंबहुना त्याहूनही थोड्या जास्त प्रमाणात, त्याच्या मूलभूत प्रेरणाच प्रभावी ठरत असतात. गांधींचं मला जाणवलेलं वैशिष्ट्य असं की त्यांनी या मूलभूत प्रेरणांच्या - 'ह्यूमन इंस्टिंक्ट’च्या जागी ‘इन्हेस्टिगेशन’ला आणून बसवायचा प्रयत्न केला. समग्र गांधीविचाराची व्यापकता, त्याविषयीची मत-मतांतरे, त्यांची राजकीय भूमिका या सगळ्यावर पुष्कळ चर्चा होत असते. होत राहीलही. तो एक अभ्यास विषय आहेच. पण समकालीन संदर्भात गांधींची प्रस्तुतता यावर ‘मला’ - म्हणजे नव्वदीच्या दशकात मोठ्या झालेल्या आणि पुढे आर्थिक उदारीकरण, इंटरनेट, मोबाईल, गूगल अन् फेसबुक, यू ट्यूब आणि नेटफिक्स, जनलोकपाल आंदोलन, नर्मदा बचाओ आंदोलन आणि देशभरात सुरु असलेली इतर जनआंदोलनं, टीव्हीची मनोरंजन आणि पत्रकारिता या दोन्ही अंगांनी झालेली संपूर्ण अवनती, उजव्या आणि डाव्या विचारातला तीव्र झालेला संघर्ष, बहुसंख्याकवादाला चढलेली धार आणि त्यातून निर्माण झालेले प्रश्न, 'सत्योत्तर' काळाचे प्रश्न या आणि आनुषंगिक उलथापालथीचा साक्षीदार असलेल्या एका भारतीयाला - काय वाटतं हे अधिक आत्मीयतेने सांगावसं वाटतं.

फेसबुक हे राजकीय - सामाजिक विचारांचं रणांगण बनलं आहे हे या माध्यमाशी परिचित असलेल्या बहुतेकांना माहीत आहे. याच मैदानात मीही माझं म्हणणं अनेक वर्ष मांडत आलो आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी मी फेसबुकवर ‘मी आणि गांधीजी’ ही संवादमालिका लिहू लागलो. वर उल्लेख केलेल्या ‘अस्वस्थ वर्तमाना’त जगणारा एक तरुण आणि गांधीजी यांच्यात ‘आज’ घडणारा संवाद असं या मालिकेचं स्वरुप आहे. यातले गांधीजी हे ‘महात्मा गांधी’ असले तरी ‘मी’च्या मित्राच्या जागी आहेत. त्यामुळे त्यांच्यातला संवाद मित्रांमधल्या संवादासारखा आहे. मला हे लिहावसं वाटलं, गांधीजींना ‘बोलवावसं’ वाटलं याच्यातच गांधीविचार आज मार्गदर्शक ठरु शकतो हा विश्‍वास दिसून येतो.

इथे एक गोष्ट स्पष्ट करुन घेऊ. ‘गांधीविचार’ म्हटलं की त्यात अनेकविध गोष्टी येऊ शकतात. मला गांधीविचारातला वर उल्लेख केलेला ‘इन्व्हेस्टिगेशन’चा भाग आकर्षित करतो. त्याचा मी संवादमालिकेमध्ये उपयोग केलेला आहे. आता एक गोष्ट खरी की माझा व्यक्तिगत वैचारिक कल (जो गांधीवाद - नेहरूवाद - मार्क्सवाद - स्त्रीवाद - उदारमतवाद यांच्या एका मिश्रणातून तयार झाला आहे) या संवादांमध्ये अधूनमधून प्रतिबिंबित होतो. पण माझा प्रयत्न ‘इन्व्हेस्टिगेशन’चा, विचार तपासून बघण्याचा असतो. स्वतःला तपासून बघणं, स्वतःमध्ये सुधारणेच्या जागा कुठे आहेत त्या शोधणं हा २०१९ मधल्या ‘मला’ आणि १९४० मधल्या गांधींना जोडणारा दुवा ठरतो.

मी मागे लेख/चर्चांमधून अनेक वेळा उल्लेख केलेला मुद्दा इथे पुन्हा लिहितो, कारण तो आवश्यक आहे असं मला वाटतं. वैचारिक कल, व्यक्तिगत घडण, व्यक्तिगत अनुभव हे सगळं एका बाजूला ठेवलं तरी दुसर्‍या बाजूला एक मानवीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा विचार आहे आणि त्याचा आपल्याला आज विसर पडलाय की काय अशी शंका येते. हा विचार खरं तर अजिबात गुंतागुंतीचा नाही. साधा सरळ आहे. तो अगदी आपल्या आईबाबांनी घरी शिकवलेला असेल इतका साधा आहे. ‘माझं चुकू शकतं’ हा तो विचार. मला असं दिसतं की कमालीचं राजकीय ध्रुवीकरण झालेल्या आजच्या काळात ‘आपलं काहीतरी चुकत असेल’ एवढी शक्यता जरी आपण आपल्या मनाशी बोललो तरी ती एक मोठी सुरुवात ठरेल!

आपल्याला आज असं वाटत नाही कारण आपलं टोकाचं ‘पक्षीय राजकीयीकरण’ झालं आहे. राजकीय भूमिका असण्याबद्दल आक्षेप नाहीच, पण ‘राजकीय हिंसकता’ असण्याबद्दल नक्की आक्षेप आहे. कारण त्याचं पर्यवसन समाजस्वास्थ बिघडण्यात, परस्पर सौहार्द बिघडण्यात होतं. आपण आज या ‘राजकीय हिंसकते’च्या प्रभावाखाली आलो आहोत. माणसातली आदिम ‘टोळी जाणीव’ तीव्र होत आहे आणि आधुनिक उपकरणांनी, तंत्रज्ञानाच्या चमत्कारांनी वेढलेले आपण मनातून मात्र आदिम जाणिवांचे गुलाम होत आहोत. आपण वैचारिकदृष्ट्या इतके ‘स्थितीशील’ कसे झालो ? हिंसक राजकारणाने आपल्यातला स्वतंत्रपणे विचार करु शकणारा, कुठल्याही संघटनेचं - पक्षाचं - नेत्याचं जोखड नाकारणारा लोकशाहीवादी सजग नागरिक कसा काय संपवला? यावर एक प्रतिवाद असा आहे की, मुळातच आपण स्वतंत्र विचार वगैरे करणारे, समता-स्वातंत्र्य-वैज्ञानिकतेचा पुरस्कार करणारे नव्हतोच. आपण परंपराप्रिय आहोत. आपल्याला अधिकारांची, श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची उतरंड मनातूनच आवडते. आज फक्त ते कमकुवत आवरण गळून पडलंय आणि आपल्यातला मूळ ‘विघटित भारतीय’, ‘एकारलेला भारतीय’ समोर आला आहे. आज जर आपण सार्वजनिक चर्चाविश्वाकडे नजर टाकली तर हे सहज लक्षात येईल. आपली 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' कमालीची कमी झाली आहे / आहे. 'न्यूरोप्लॅस्टिसिटी' म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यभर त्याच्या मेंदूमध्ये नवीन न्यूरल कनेक्शन्स तयार करून मेंदूमध्ये बदल होण्याची क्षमता. या क्षमतेमुळे न्यूरॉन्स नवीन परिस्थतीला, एखाद्या बदलाला, नव्या माहितीला प्रतिसाद देऊ शकतात. आपल्या मेंदूचा हा एक भौतिक गुणधर्म आहे आहे. अ‍ॅडल्ट ब्रेनपेक्षा डेव्हलपिंग ब्रेनमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असते. साध्या भाषेत सांगायचं तर न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त असणं म्हणजे सवयीच्या नसलेल्या परिस्थितीला, विचाराला लवकर 'अ‍ॅडजस्ट' होणं. त्या विचाराप्रती लगेच आक्रमक न होता तो तपासायचा प्रयत्न करणं. एक उदाहरण घेऊ. दोन माणसांना प्रत्येकी एक केळं दिलं. ते दिसायला केळ्यासारखंच आहे, पण चव कारल्यासारखी आहे. दोघांनाही खाल्ल्यावर विचित्र वाटेल, आवडणार नाही. कारण 'केळं खायचं आहे' या विचारातच 'विशिष्ट चवीचं फळ खायचं आहे' हा विचार अनुस्यूत असतो. त्यामुळे दोघेही भांबावतील. परंतु कारल्याच्या चवीचं  केळं असू शकतं या वस्तुस्थितीचा स्वीकार जो मनुष्य तुलनेने सहजगत्या, लवकर करेल त्याची न्यूरोप्लॅस्टिसिटी जास्त आहे असं म्हणता येईल. आता ही परीक्षा अनेक गोष्टींबाबत घेता येऊ शकते. आजच्या 'वैचारिकदृष्ट्या विस्कटलेल्या' काळात आपण अस्मिता, राजकीय पक्ष, विचारसरणी, ऐतिहासिक व्यक्ती यांची ओझी वागवत जगतो आहोत. अशा वेळी आपण जेव्हा विरोधी मताविषयी सहिष्णु असलं पाहिजे असं म्हणतो तेव्हा त्याचा 'भौतिक अर्थ' न्यूरोप्लॅस्टिसिटी वाढवणं हा असतो. माणसं एकच बाजू का घेतात, समोर दिसत असूनदेखील सत्य का नाकारतात किंवा सत्याकडे काणाडोळा का करतात याचं उत्तर न्यूरोप्लॅस्टिसिटीमध्ये दडलेलं आहे. ती त्याला एकतर्फी, एका बाजूला झुकण्याचा गुण बहाल करते.  

भारतीय मनोवृत्तीच्या संदर्भात हे विश्लेषण बऱ्याच अंशी खरं आहे असं मला वाटतं. पण यावर करायचं काय ? तर हा सगळा गुंता सोडवायला गांधीमार्गाचा उपयोग होतोय का पहायचं. मी माझ्यापुरता एक प्रयत्न या संवादमालिकेतून (आणि फेसबुकवरील इतरही लेखनातून) केला आणि मला हे खरचं दिसून आलं की आपली समाजिक - राजकीय भूमिका कुठलीही असली तरी आपण अंतःकरणातून, प्रामाणिकपणे स्व-चिकित्सेला तयार असलो, वैचारिक विरोध कायम ठेवला तरी ‘माणूस’ म्हणून एकमेकांशी जोडून घ्यायच्या जागा आपण सुरक्षित राखल्या तर सहअस्तित्व शांततामय होऊ शकतं. फेसबुकवर हिंदुत्ववादी विचारांच्या मंडळींशी माझी बरेचदा चर्चा झाली आहे. मी माझ्या लिखाणातून कट्टर हिंदुत्ववादाबाबतची नाराजी उघडपणे मांडली आहे. त्याचबरोबर उदारमतवाद्यांच्या दृष्टीकोनातील खटकणाऱ्या गोष्टींबाबतही मी लिहिलं आहे. या चर्चांमध्ये माझ्या हे लक्षात आलं की 'माणूस' म्हणून आपण विरोधी विचाराच्या माणसाच्या मनात प्रेमभाव निर्माण करू शकलो तर संवाद सुकर होऊ शकतो. (याबाबत तपशीलात लिहिता येईल, पण त्याबाबत स्वतंत्रपणे सविस्तर लिहिणं इष्ट होईल. कारण त्यात हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद यांच्या वैचारिक भूमिकेतील फरक, मूल्यात्मक फरक, अभिव्यक्तीची पद्धत अशा विविध मुद्द्यांवर बोलावं लागेल. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा की एखाद्या विचारधारेला एखाद्या नावाने संबोधणं ही खरं तर एक व्यावहारिक तडजोड असते. त्यातून त्या विचारधारेचा साधारण कल लक्षात येतो इतकंच. प्रत्यक्षात दोन भिन्न विचारधारांमध्ये काही साम्यस्थळंही असू शकतात.) आपण एक लक्षात घ्यायला हवं की मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या मेंदूपेक्षा विकसित (आपल्या विकासाच्या कल्पनेनुसार!) असला तरी तो अंतिमतः मनुष्य‘प्राण्या’चा मेंदू आहे. आधी म्हटल्याप्रमाणे आपले सर्व ‘इन्स्टिक्ट्स' एकविसाव्या शतकातही नीट शाबूत आहेत. प्रत्यक्ष हिंसा कमी झाली असली तरी मेंदूतली ‘हिंसकतेची केंद्रं’ बंद पडलेली नाहीत. (इथे मला असंही म्हणावसं वाटतं की त्यामुळे गडबडून जायचं कारण नाही. आपण सगळे ‘उत्क्रांतीची उत्पादनं’ आहोत. ‘भीती’ या आदिम भावनेपासून असूया, दुःख, एकटेपण, निराशा, आनंद अशा भावनांच्या कोलाहलापर्यंत आपल्या मनात भावनांचा जो भलामोठा पैस (आणि पेच!) तयार झाला आहे त्यामागचा उत्क्रांतीजन्य हेतू ‘टिकून राहणे’ हा आहे. एका टोळीत सामील होऊन राहणं, एक बाजू घेणं, राजकीयीकरण होणं हादेखील याच प्रक्रियेचा भाग आहे. पण आपलं वैशिष्ट्य हे की आपल्याला हे सगळं समजू शकतं. माणूस हा ‘जाणिवेची जाणीव’ असणारा प्राणी आहे आणि ते त्याचं बलस्थान आहे.) त्यामुळे गांधी जे सांगतात ते सहजपणे जमणारं नाही. 

गांधींचा माणसाला उन्नत करण्याचा जो प्रयत्न होता त्याचं बीज ‘जाणिवेची जाणीव’ करुन देण्यात आहे. मानवसमूह जर नैतिकदृष्ट्या समर्थ झाला, सामूहिक निर्णयक्षमता आणि कार्यक्षमता जर विकसित झाली तर ‘हे राजकारण’ आणि ‘हे जीवन’ असं द्वैत नष्ट होईल का? गांधींनी आणि त्यांच्या नंतर विनोबांनी विकेंद्रित राज्यव्यवस्थेबाबत जो विचार केला आहे तो भारतासारख्या देशासाठी पथदर्शक आहे. तो यशस्वी न होण्यामागची मुख्य अडचण सामूहिक इच्छाशक्ती आणि कृतीसामर्थ्याचा अभाव ही आहे. त्याच्या जोडीला बदलत्या काळाची आव्हानेदेखील आहेत. पण स्वयंपूर्ण आणि स्वतंत्र असण्याच्या मूलभूत विचाराचं महत्त्व त्यामुळे उणावत नाही.

गांधी आज ‘रिलेव्हंट’ आहेत का हा प्रश्‍न, हा विषय आता खरं तर जुनाच झालाय जरा. हा प्रश्‍न सारखा सारखा विचारावासा वाटतो, गांधी सारखा ‘आडवा येतो’ याचं कारणच हे आहे की, गांधी अगदी मूलभूत, अगदी आवश्यक आणि खरं तर अगदी सोपं असं काही सांगत होते. सर्वांना जर शांततेने एकत्र राहायचं असेल तर काय करायला लागेल याचा मंत्र त्यांनी दिला होता. गांधींची आठवण होत राहते कारण आपल्याला अद्याप शांततेनं एकत्र राहणं जमलेलं नाही हे आहे!  शांततामय सहअस्तित्वाचा गांधीविचार जेव्हा जगण्याचा भाग होईल तेव्हा तो वेगळा असा काही उरणार नाही. त्याची 'आठवण काढावी' लागणार नाही. मला कधीकधी असं वाटतं की गांधींना रिटायर करण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे गांधीविचार आत्मसात करणं!  गांधींना खोटा नमस्कार करणाऱ्यांनी, गांधी ज्यांना सतत सलतात त्यांनी, २०१९ साली गांधींच्या प्रतिकृतीला गोळ्या घालण्याचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं!

(तरूण भारत, दीपोत्सव २०१९)

Tuesday, February 26, 2019

प्रतीकात्मतेचे पाझर

महाराष्ट्राचे पहिले सहकारमंत्री बाळासाहेब भारदे यांनी भारतीय राजकारणाविषयी केलेलं एक विधान प्रसिद्ध आहे, 'काँग्रेस म्हणजे खुर्च्या, समाजवादी म्हणजे चर्चा, कम्युनिस्ट म्हणजे मोर्चा आणि संघ म्हणजे पूजाअर्चा'. यात जनसंघ किंवा भाजपचं नाव नसून संघाचं नाव आहे याची एक वेगळी नोंद घ्यायला हवी. त्यांचं हे निरीक्षण मार्मिक असलं तरी आजच्या संदर्भात पाहता 'भाजप म्हणजे खुर्च्या' असा बदल करणं अवाजवी ठरणार नाही. विविध पक्षांचं राजकारण कुठल्या अंगाने पुढे सरकतं, त्यातलं चूक बरोबर काय, राजकीय अपरिहार्यता आणि नैतिक पेच यांच्यातील संघर्षाचं काय याविषयी आपण विचार करू लागलो तर एक मोठाच 'डिस्कोर्स' उभा राहतो. राजकीय अभ्यासक त्याची मांडणी करतच असतात. परंतु गेल्या काही वर्षात उजव्या विचारसरणीचा वाढलेला प्रभाव, केंद्रातील भाजप सरकारवर आणि विशेषतः नरेंद्र मोदींवर होणारी टीका आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळत असलेला जनाधार या पार्श्वभूमीवर उजव्या विचारसरणीच्या विविध पैलूंवर सातत्याने चर्चा होते. याच मालिकेतला एक ताजा मुद्दा आहे, नरेंद्र मोदींनी कुंभमेळ्यातल्या पाच सफाई कर्मचाऱ्यांची केलेली पाद्यपूजा. टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार नरेंद्र मोदींनी पाच कामगारांचे पाय धुतले आणि त्यांना 'कर्मयोगी' असं संबोधलं. त्यानंतर ते म्हणाले, 'सफाई कामगार हे खरे सेवक आणि तपस्वी आहेत'.

यानंतर समाजमाध्यमांवर आणि इतरत्र अपेक्षेप्रमाणे चर्चा सुरू झालीच. त्यात अर्थातच टीका आणि समर्थन दोन्ही सूर होते. मला व्यक्तिशः हे कृत्य देशातील हजारो सफाई कामगारांच्या मूलभूत प्रश्नांची क्रूर खिल्ली उडवणारं वाटलं. निषेधार्ह वाटलं. सफाई कामगारांची, हाताने मैला वाहणाऱ्यांची अवस्था कुणापासून लपून राहिलेली नाही. गटारातील विषारी वायूमुळे देशात गेल्या वर्षी शंभरच्या वर सफाई कामगारांचे मृत्यू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काही कामगारांचे पाय धुऊन पंतप्रधान काय सुचवू पाहतात? परंपराप्रिय आणि भावनाप्रधान अशा बहुसंख्य भारतीय जनतेला भारावून टाकण्याचा हा प्रयत्न नक्की कुठल्या चौकटीत टाकायचा असा प्रश्न पडतो. तो राजकारणाच्या चौकटीत घालणं भाजप समर्थकांना मान्य होणार नाही. त्याला खरोखरीचा उमाळा, खरोखरीच सद्गदित होऊन केलेलं कृत्य म्हणावं तर अशा प्रतीकात्मक कृतीपेक्षा बरंच काही करण्याचं सामर्थ्य तुमच्या पदाने तुम्हाला दिलेलं असताना एखाद्या सर्वसामान्य, दुर्बल, श्रद्धाळू माणसासारखं मन उचंबळून आणून केवळ एका भावनिक कृतीत समाधान का मानून घ्यायचं?

या प्रश्नातच एक मेख आहे. उजव्या विचारांचा एकूण आवाका आणि या विचाराने प्रेरित कार्यपद्धती पाहिली तर असं दिसेल की इथे प्रतीकांना अतिशय महत्त्व आहे. ते करताना आपण हे लक्षात ठेवूया की आपल्या चर्चेत उजव्या विचाराचा धार्मिक-सांस्कृतिक पैलू अभिप्रेत आहे. सरसकट डावं आणि उजवं अशी विभागणी करणं ढोबळ वर्गीकरणासाठी उपयोगी ठरत असलं तरी त्यात बरेच तपशील निसटून जातात. वर्गीकरण किंवा व्याख्या करणं हे बरेचदा आकलनाला मर्यादा घालणारं ठरतं हे आपण  लक्षात ठेवूया. उजव्या विचारसरणीने कायमच लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रतीकांचा, कर्मकांडांचा, भावनिक आव्हानांचा वापर केलाय. अर्थात यातून आपल्याला दिसतंच की काही लोक एकत्र येऊन इतर काहींच्या विरुद्ध उभे राहतात. पण विचार म्हणून तो एकत्रीकरणाचाच प्रयत्न असतो, असं त्यांचं प्रतिपादन असतं. गेल्या वर्षी अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अस्थींची कलशयात्रा सगळ्या राज्यांमध्ये काढण्यात आली होती. अगदी २०१४ पर्यंत मागे गेलो तर संसदेत प्रवेश करताना नरेंद्र मोदींनी संसदेच्या पायऱ्यांवर डोकं टेकवण्याचा प्रसंगही आपल्याला आठवेल. संघाच्या विविध कार्यक्रमांपैकी शस्त्रपूजा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असतो. नवीन लोकांशी जोडून घेण्याकरता संघ स्वयंसेवक त्यांना राख्या बांधतात. प्रतीकात्मक मूल्य असलेले असे बरेच कार्यक्रम सांगता येतील. अशा प्रतीकात्मक गोष्टी संघटना बांधणीकरता, कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मकता, उत्साह निर्माण करण्याकरता आवश्यक आहेत म्हणून त्यांचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. उजव्या विचारसरणीतील ही प्रतीकात्मता खरं तर भारतीय परंपरेतूनच आलेली आहे आणि त्यामुळे ती स्वीकारणं लोकांनाही जड जात नाही.

इथवर सगळं ठीक असलं तरी गडबड अशी होते की या प्रतीकात्मतेलाच असाधारण महत्त्व प्राप्त होऊ लागतं. प्रतीकात्मक कृत्य केलं की झालं, पुढे जाऊन मूळ, अवघड प्रश्नाला भिडलो नाही तरी चालेल अशी एक विपरीत मानसिकता तयार होऊ लागते. उजव्या विचारसरणीचे बरेच कार्यकर्ते, समर्थक अशा मानसिकतेचे बळी असलेले दिसतात. हे कुणाचे दोष दाखवण्यासाठी नाही. तर आज आपण ज्या ध्रुवीकरणात जगतो आहोत ते आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी चांगलं नाही, हे सांगण्यासाठी आहे. खरं तर कुठल्याही संघटनेत, राजकीय पक्षात असणारे लोक विविध स्वभाववैशिष्टयांनी युक्त असतातच. डाव्या पुरोगामी चळवळीत देखील वैचारिक खुलेपणा नसणारे लोक असतात. याचं एक साधं कारण हे आहे की आपल्या 'विचारसरणीवर आधारित' ओळखीआधीची आपली ओळख 'माणूस' ही आहे आणि माणूस हा अनेक भल्याबुऱ्या गुणधर्मांचं गाठोडं आहे. परंतु असं असलं तरी विचारकलहाच्या पलीकडे जाऊन, आपल्या विचारसरणीशी तीव्र निष्ठा बाळगणारे 'कडवे' कार्यकर्ते तयार करण्यात संख्यात्मक दृष्ट्या उजव्या विचारसरणीला तुलनेने चांगलं यश मिळालेलं आहे.

या यशाचा एक आधार 'सहज, सोपं आव्हान' हा आहे. आता सहज-सोपं म्हणजे काय हे थोडं समजावून घेऊ. सामाजिक आणि राजकीय आघाडीवर संघ, भाजपने केलेलं काम अगदी सोपं होतं, असा याचा अर्थ नाही. परंतु हे यश मिळवण्याकरता जो आधार घेतला गेला आणि घेतला जातो, तो सोपा होता. माणसांना विशिष्ट दिशेने कार्यप्रवण करण्यासाठी धर्म, संस्कृती, राष्ट्र हे अमूर्त आणि एका अर्थी 'रेडिमेड' आधार जेव्हा घेतले जातात तेव्हा माणूस कार्यप्रवण होतो, कष्टाने कार्यही करतो. पण सामाजिक, वर्गीय, जातीय रचनांची गुंतागुंत समजून घेऊन मुळातून काही बदल घडवण्याची मानसिकता वाढीला लागत नाही. यातून कार्य उभं राहतंच, पण मानसिकता मात्र ठराविक साच्यातलीच राहते.

नरेंद्र मोदींनी केलेली पाद्यपूजा अशा मानसिकतेकडे निर्देश करते. यात व्यक्तिविशिष्ट गुणधर्माचाही भाग आहेच. ज्याला साध्या भाषेत नाटकीपणा म्हटलं जातं, तो नरेंद्र मोदींच्या स्वभावाचा एक भाग आहे. निवडणूकपूर्व काळातील प्रचार भाषणांपासून सत्तेवर आल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणांमधूनही तो दिसतो. त्यांच्या या स्वभाववैशिष्ट्यामुळे त्यांनी केलेल्या प्रतीकात्मक कृतीला धार चढतेच. आपल्या भाषणांमधून 'देशाचा पंतप्रधान' बोलतो आहे असं जाणवून देण्याऐवजी 'पक्षाचा प्रचारक' बोलतो आहे असंच वरचेवर जाणवतं. त्यातून प्रतिक्रियावादी, आक्रमक, भावनिक राजकारणाला त्यांनी अग्रस्थान दिल्याने त्यांच्या स्वतःच्याही उक्ती आणि कृतीचे पडसाद उमटणं स्वाभाविक झालंय. नरेंद्र मोदींनी स्वतःच 'नरेंद्र मोदी' हा नायक आणि खलनायक दोन्ही निर्माण केलेत!

प्रतीकात्मक कृत्यांना भावनिक महत्त्व देऊन त्यांची गरज प्रस्थापित करणं, हा उजव्या विचारसरणीत खोलवर रूजलेला विचार आहे. त्याचे आविष्कार बेगडी वाटले तरी विचारसरणीसाठी त्यांचं धोरणात्मक महत्त्व फार आहे. आज उजव्या विचारसरणीचे लोक देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हे ठरवताना दिसतात. यातून विश्लेषणाची स्पेस नष्ट होत जाते आणि सुलभीकरणाची स्पेस वाढत जाते. खेद अशा गोष्टीचा होतो की नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात काय काय चांगले बदल झाले हे मोदींचे समर्थक आपल्या फेसबुक पोस्ट्समधून सांगतात, पण प्रत्यक्ष पंतप्रधान एखाद्या शांत, गंभीर, पंतप्रधानपदाचा आब राखणाऱ्या भाषणातून ते का सांगत नाहीत असा प्रश्न पडतो! नरेंद्र मोदींनी जनहिताचा एकही निर्णय घेतला नाही असं नाहीच. पण प्रतीकात्मतेचा अतिरिक्त सोस बाळगल्याने आपण स्वतःदेखील एक 'नकारात्मक प्रतीक' होतो आणि आपल्या कार्यापेक्षा आपली विचारसरणी पृष्ठभागावर येत राहते, हे त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी लक्षात घेतलं तर बरं होईल.

(कोलाज.इन या संकेस्थळावर प्रकाशित)