Saturday, August 18, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा - २

माझे वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझ्या वरचेवर वाद-चर्चा व्हायच्या. गांधीं-विनोबांच्या प्रभावाखाली असलेले वडील आणि गांधी-विनोबांचा प्रभाव असला तरी 'मायक्रोसॉफ्ट-गूगलोत्तर' काळातला, आंबेडकर-डार्विन-स्त्रीवाद याही रसायनांकडे आकर्षित झालेला मी अशा दोन व्यक्तींमधली ती टक्कर असायची. मात्र त्यांचं एक म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले की आम्ही सगळे गांधींच्या खांद्यावर बसून जग बघतोय. त्यामुळे आम्हांला थोडं दूरवरचं दिसू शकतं. तू आमच्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे आम्हांला जे दिसत नाही ते तुला दिसत असणार हे मला मान्य आहे!

हा मुद्दा मला नोंद घेण्याजोगा वाटला कारण तो एका गांधीवादी कार्यकर्त्याकडून आला होता. चिकित्सेची 'स्पेस' खुली ठेवणारा होता. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे आपण भारतीय वृत्तीने 'पूजक' आहोत. आपल्याला एखाद्या अधिष्ठानाची सतत गरज असते. (आपल्या कामासाठी प्रेरणा म्हणून, आपल्यावर विवेकाचा अंकुश राहावा म्हणूनही ते होतं, परंतु याचे इतरही काही पैलू आहेत. सध्या एवढंच नोंदवून पुढे जाऊ.) 'वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) वास्तवा'ला महत्त्व न देता किंवा तिकडे दुर्लक्ष करून 'आपल्या मनात वसत असलेल्या' (पर्सीव्ह्ड, आपल्याला समजलेल्या) वास्तवाला महत्त्व देण्याच्या आपल्या मनोवृत्तीत आपल्या पूजक वृत्तीची मुळं दडलेली आहेत. आपली ही 'पूजक' वृत्ती एक ऐतिहासिक परिपाक आहेच, पण त्याबरोबर जातीय, आर्थिक विभागणीने आणि सरंजामी वृत्तीच्या अवशेषांनी शतभंग झालेलं आपलं समाजमानस आपल्या या वृत्तीला खतपाणी घालत असतं. मुद्दा असा की आपण जेव्हा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्या नैसर्गिक किंवा वैचारिक घडणीमुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता गृहीत धरूनही त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यातल्या 'इसेन्स'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज  आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यांचे विचार स्थलकालसापेक्ष असू शकतात हे मान्य करायची तयारी असावी लागते. (रावसाहेब कसबे यांच्या 'आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार' या पुस्तकातील पहिलं प्रकरण 'महापुरूष' यादृष्टीने वाचण्यासारखं आहे. 'महापुरूषांचा विचार फार सावधगिरीने करावा लागतो' हे त्यांचं म्हणणं तर अगदीच पटतं.) 

हे सगळं लक्षात घेऊन गांधीजींबाबत वस्तुनिष्ठपणे, 'इसेन्स'चा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून विचार केला तरी मला ते 'गायडिंग लाइट' सारखे वाटतात. परंतु त्यांची मांडणी स्वप्नवत, आदर्शवादी आहे आणि तिला प्रत्यक्षाच्या मर्यादा आहेत, मानवी आकांक्षा, मानवी व्यवहार यांचा विचार करता ती पुरी पडत नाही असं अनेकांचं मत असतं. मागच्या लेखाच्या शेवटी ज्या तीन लेखांचा उल्लेख केला आहे त्यातील विश्राम गुप्ते यांच्या मांडणीत हा मुद्दा येतो. गांधीवाद आणि आधुनिकतावाद या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत असं त्यांच्या लेखाचं गृहीतक असल्याचं त्यांनी लेखात नमूद केलं आहे. त्यांचं विश्लेषण 'प्रत्यक्षातील अडचणींच्या' पार्श्वभूमीवर आदर्शाची चिकित्सा करणारं आहे तर चैत्रा रेडकर यांनी 'हिंद स्वराज'चं विश्लेषण करताना या पुस्तकातून पर्यायी जीवनशैलीच्या विकासाची गुणसूत्रे सापडतात असं म्हटलं आहे. हिंद स्वराजच्या लेखनामागचे राजकीय संदर्भही त्यांनी तपासले आहेत. त्यांचा एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटला - 'औद्योगिक भांडवलशाहीमुळे खेड्यांच्या वाट्याला आलेली विपन्नावस्था, ग्रामीण भागांचे शहरांकडून होणारे शोषण, शहरांवरील ग्रामीण भागांचे परावलंबित्व या सर्व बाबींचे भान गांधी आणि मार्क्स दोघानांही होते. यावरील इलाज म्हणून मार्क्सने उत्पादन साधनांवरील मालकीचा प्रस्ताव मांडला तर गांधींनी यंत्रविवेक सुचवला. बाजारी अर्थव्यवस्थेतून मुक्तीसाठी उत्पादन साधनांवर सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्क्सचा मार्ग आपल्याला क्रांतिकारी वाटतो, मात्र गांधींनी सुचवलेला मार्ग स्वप्नाळू, अवास्तव आणि अशक्य वाटतो याचा अर्थ काय लावायचा?'  

वरील मुद्द्याचा रोख अर्थातच परिवर्तनाच्या सामाजिक-राजकीय चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्या-विचारवंतांकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कदाचित मार्क्स आणि गांधी दोघांचीही मांडणी अवघड, स्वप्नाळूच असेल. मात्र इथे आपण एक लक्षात घेऊ की सर्वच क्रांतदर्शी विचारवंतांचा रोख सहअस्तित्व सुकर व्हावं, समाजात शांती-समृद्धी-न्याय असावा याकडे असतो. त्यासाठीचा त्यांचा असा एक 'पर्स्पेक्टिव्ह' असतो. त्याचा विस्तार आपल्याला करावा लागतो. मला असं दिसतं की गांधीवाद, मार्क्सवाद किंवा इतर कुठल्याही विचारधारेचा 'गाइडलाइन' म्हणून विचार न करता त्यातील शब्दांविषयी, काही निर्णयांविषयी वाद घालत 'ते चुकले की नाही' याचा खल करण्यात आपला पुष्कळ वेळ जातो. इतिहासाचा अभ्यास म्हणून ते करायला हरकत नाहीच, पण तो आजचा आपला जीवन-मरणाचा प्रश्न करण्यात काही हशील नाही. 

मागच्या लेखात मिलिंद बोकीलांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. हा दीर्घ लेख फक्त 'हिंद स्वराज'विषयी नाही. गांधीजी हे 'एकूण प्रकरण' समजून घ्यायच्या दृष्टीने तो अतिशय उपयुक्त आहे. विज्ञानासंदर्भातील गांधीजींची मते ही एक प्रकारे त्यांच्या विचारदर्शनाला पडलेली मर्यादा आहे असं बोकील नोंदवतात. परंतु त्यांच्या सर्व विचारांतून अंतिमतः दिसणारा गांधी कोणता याचं उत्तर बोकीलांनी 'नीतीसाठी तळमळणारा गांधी' असं दिलं आहे. याशिवाय गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत लोकांचा जो गोंधळ होतो तो दूर होईल असं विवेचन त्यांनी केलं आहे. आपण गांधीजींची दृष्टी स्वीकारली नाही पण आपली स्वतःची अशी किंवा आपल्याला उपयोगी अशी विकासाची दृष्टी आपण विकसित केली नाही हे त्यांचं निरीक्षणही योग्य आहे. आजचे आपल्यासमोरचे विकासाचे आणि विकासामुळे निर्माण झालेले पेच त्याची साक्ष देतात.   

गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वतः त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वतः करून दाखवल्या. कमीत कमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.   

एक गोष्ट खरी की गांधीजींचे समकालीन बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या आदर्शांना संविधानात्मक आणि संस्थात्मक जोड दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. आंबेडकरांची धर्मविषयक आणि जातीनिर्मूलनविषयक भूमिका अधिक स्पष्ट आणि प्रखर होती आणि त्यामुळे अधिक आधुनिक होती असं म्हणता येईलच. तो स्वतंत्र विषय आहे. मात्र या सर्वच मंडळींनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या पायाभरणीत - जी अतिशय आव्हानात्मक गोष्ट होती - अतुलनीय योगदान दिलं यात शंकाच नाही. ( स्वातंत्र्यानंतर उभारल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेच्या मुंबई शाखेत कालांतराने 'सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रूरल एरियाज' या स्वतंत्र शाखेची निर्मिती करण्यात आली हे नोंद घेण्याजोगं आहे.)

गांधीजी, त्यांचा प्रभाव, देशाची 'डेव्हलपमेंट पॉलिसी', त्यातील कच्चे दुवे, त्यातूनच उभं राहिलेलं नर्मदा बचाओ आंदोलनासारखं जनआंदोलन, त्याच्या मागेपुढे उभी राहिलेली इतर अनेक जनआंदोलनं, शासकीय दमन, भांडवलशाहीचे हितसंबंध, लोकसंख्येचा प्रश्न आणि पर्यायी विकासाच्या वाटा हा एक मोठा अभ्यासविषय आहे. गांधीजींच्या मूळ मांडणीची परिणती पुढे 'सामाजिक न्याया'चे प्रश्न उभे करण्यात झालेली दिसते आणि ती अतिशय आश्वासक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, भौतिक विकासाची ऊर्मी जोवर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बरोबर घेऊन चालते तोवरच तिचा चेहरा मानवी राहतो, अन्यथा ती भेसूर होऊ लागते हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे.   

संबंधित विषयाबाबत शोध घेण्यासारखं बरंच आहे. यापुढील एक-दोन लेखामधून आपण तसा प्रयत्न करू. मात्र सध्या ही चर्चा थांबवून पुढच्या लेखात आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत.  

Saturday, August 4, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा – १

'महात्मा गांधी' हे दोन शब्द समस्त भारतीयांच्या मनात काहीएक हालचाल निर्माण करतात. ही हालचाल बहुस्तरीय असते. ही हालचाल होते कारण या नावाबरोबर मनात जे काही उलट-सुलट उमटतं ते टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही. आज राजकीय पटलावर जवाहरलाल नेहरूंची छाया गडद झालेली (केलेली) दिसते आणि गांधी नावापुरते उरले आहेत असं दिसतं. पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला. आज त्याची तीव्रता कमी-जास्त होत असली तरी गांधींची आठवण होत नाही असं होत नाही. 'गांधी' हा माणूस आणि विचार भारतीय जाणिवेत आहेच. बदलत्या काळाच्या ओघात गांधी विचार काय होता, त्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बाजू काय होत्या हे सर्वसामान्यांच्या स्मृतीतून पुसलं जात 'गांधी' हे साधारणपणे चांगुलपणा मोजण्याचं एक 'स्टॅंडर्ड' म्हणून उरलं आहे. मात्र भारतात आणि जगातदेखील गांधीजींविषयी आजवर इतकं लिहिलं आणि बोललं गेलं आहे की त्या प्रसिद्ध 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीतील हत्तीच्या जागी गांधीजींना सहज ठेवता येईल!

गांधीजी हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. काही मूलभूत विचार काळ बदलला तरी सुसंगत ठरतात. गांधींनी असे विचार दिले आहेत आणि स्वतःच्या कृतीतून त्यांची परिणामकारकता सिद्ध केली आहे. शिवाय माझ्यासारख्या माणसाला तर 'कर के देखो' म्हणणारे गांधी जवळच्या मित्रासारखेच वाटतात. परंपरा आणि आधुनिकता या संघर्षात गांधीजींनी अतिशय महत्त्वाचे 'कन्सर्न्स' उपस्थित केले आहेत. त्यामुळे आपल्या चर्चेत गांधीजी येणं अगदी अपरिहार्यच होतं. 

'हिंद स्वराज' हे गांधीजींचं एक गाजलेलं पुस्तक. १९०९ साली लंडन ते दक्षिण आफ्रिका या प्रवासात दहा दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लंडनमध्ये त्यांना जे स्वराज्यप्रेमी भारतीय तरूण भेटले त्यांच्याशी झालेल्या संवादाचं सार या पुस्तकात आहे. 'संपादक आणि वाचक' अशा दोघांमधील संवादातून गांधीजी आपले विचार मांडतात. मूळ गुजराती पुस्तकाचा त्यांनी स्वतःच इंग्लिश अनुवाद केला. दोन्ही पुस्तकांवर सरकारने बंदी घातली होती. १९१५ साली गांधीजी भारतात आले. आल्यावर त्यांनी पुन्हा इंग्लिश अनुवाद प्रसिद्ध केला. यावेळी मात्र सरकारने त्याचा विरोध केला नाही. गांधीजी आफ्रिकेत असताना गोपाळ कृष्ण गोखले यांनी हे पुस्तक वाचलं होतं. त्यांना ते आवडलं नाही आणि गांधीजी हे पुस्तक स्वतःच रद्द करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु गांधीजींनी तसं केलं नाही. ते म्हणाले की हे पुस्तक मी पुन्हा लिहिलं असतं तर त्याच्या भाषेत मी सुधारणा केली असती पण माझे मूळ विचार तेच आहेत. पुढे तीस वर्षांनंतर, १९३८ साली 'आर्यन पाथ' या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्लिश मासिकाने 'हिंद स्वराज अंक' प्रकाशित केला होता. या मासिकाला पाठवलेल्या लहानशा पत्रात गांधीजींनी हेच म्हटलं आहे. या पत्रात आणखी एक गंमत आहे. पत्राच्या शेवटी गांधीजी लिहितात - 'दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम या पुस्तकाने केलं हे मी वाचकांना सांगू इच्छितो. याच्या विरुद्ध बाजूने विचार करण्यासाठी वाचकांनी माझ्या एका स्वर्गीय मित्राचे मतही लक्षात घ्यावे. 'हे पुस्तक एका मूर्ख माणसाने लिहिलं आहे' असं तो म्हणाला होता.'

एका मूर्ख माणसाने बऱ्याच शहाण्यांना विचारात पाडलं असं या पुस्तकात काय आहे? 'हिंद स्वराज' ज्यांनी वाचलं आहे ते त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतीलच, पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांनी ते जरूर वाचावं. थोडे धक्के बसतील, पण तरी वाचावं. 'हिंद स्वराज' मध्ये गांधीजींनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं माहात्म्य अधोरेखित करत पाश्चात्त्य आधुनिकतेवर कठोर टीका केली आहे. आपण ज्याला सहजपणे प्रगतीचं लक्षण म्हणतो अशा अनेक गोष्टी त्यांनी कुचकामाच्या ठरवल्या आहेत. उदा. रेल्वे, डॉक्टर आणि वकील यांनी भारताला कंगाल केलं आहे असं ते म्हणतात. सुधारणा, विकास हा एक प्रकारचा आजार आहे असं ते सांगतात. आणि मौज अशी आहे की आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते जे मुद्दे मांडतात ते वाचून आपण त्याक्षणी तरी नकळत होकारार्थी मान डोलावतो. आपल्याला ते व्यावहारिकदृष्ट्या पटत नाही, पण त्या म्हणण्यात सत्यांश आहे असं वाटतं. पुस्तकातील मांडणी धक्कादायक वाटली तरी १९२४ साली या पुस्तकाच्या संदर्भाने झालेल्या एका चर्चेतील गांधीजींचं म्हणणं अधिक आश्वासक वाटतं.  या चर्चेत ते म्हणतात की मी यंत्रांच्या विरोधात नाही. आपलं शरीर हे एक नाजूक यंत्रच आहे. चरखा हे यंत्रच आहे. परंतु अडचण अशी आहे की आपण आज यंत्रांच्या मागे वेड्यासारखे धावत आहोत. यंत्रांचा वापर करण्यामागे जे प्रेरक कारण आहे ते 'श्रमाची बचत' हे नसून 'संपत्तीचा लोभ' हे आहे. हे विधान खोलात विचार करण्यासारखं आहे. 

यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे. माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते.  माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अभिप्रेत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. गांधीजींची 'फंडामेंटल' मांडणी तात्त्विक संघर्षाला जन्म देणारी आहे. आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसेल का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या अकाउंटला टाकायच्या हा प्रश्न आहे. 'प्यासा' चित्रपटात साहिर लुधियानवीसारखा कवी वेश्यावस्ती पाहणाऱ्या नायकाच्या मनात 'जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है?' हा प्रश्न उभा करतो. माझं लहानपण भिवंडीत गेलं. तिथल्या यंत्रमाग चालवणाऱ्या कामगारांची राहायची जागा आणि कामाची जागा दोन्ही बघताना अगदी हाच प्रश्न मनात येतो. अनेक ठिकाणी फिरताना हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण जर त्यावरून अफवा पसरून काही निर्दोष लोकांचे जीव जात असतील तर काय करायचं? इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग? 

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, आत्मबलयुक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात.  प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात!   

पुढील लेखात आपण हीच चर्चा पुढे नेणार आहोत. दरम्यान प्रस्तुत विषयासंदर्भात हे तीन लेख जरूर वाचावेत - १) ‘महात्मा गांधी’ (मिलिंद बोकील, दीपावली - दिवाळी २०१७), २) 'हिंद स्वराज - समाजसापेक्ष विकासाच्या प्रतिमानाचा आराखडा' (चैत्रा रेडकर, आंदोलन - जानेवारी-फेब्रुवारी २०११' ३) ‘हिंद स्वराज आणि आधुनिकता' (विश्राम गुप्ते, मुक्त शब्द - दिवाळी २०१७.) या लेखांसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.