Thursday, June 8, 2023

इतका वैचारिक गोंधळ बरा नव्हे!

राम माधव हे नवीन संसद भवनाच्या उद्घाटनप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचं समर्थन आणि प्रशंसा करणारा लेख लिहितात आणि ‘लोकसत्ता’मध्ये ‘पहिली बाजू’ या सदरात या लेखाचा अनुवाद छापला जातो, यात काही नवल नाही. पण त्या लेखात (‘आपली ‘धर्मशाही’!’ – ६ जून) त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांवर- विशेषत: या मुद्दय़ांना आधारभूत असणाऱ्या राजकीय तत्त्वज्ञानावर- स्वतंत्रपणे लिहिणंच योग्य होईल. कारण तो विचारदृष्टीतील फरकाचा, सैद्धांतिक वेगळेपणाचा विषय आहे. हिंदूत्ववादी आणि उदारमतवादी, धर्मनिरपेक्ष विचारांत एक मूलभूत स्वरूपाचा फरक आहे. हे दोन्ही ‘वल्र्ड व्ह्यू’ वेगळे आहेत आणि त्याचा प्रमुख संदर्भ धर्मकारण हा आहे. काही बाबतीत संवादाच्या जागा असू शकतातच; किंबहुना काही सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात हिंदूत्ववादी उदारमतवादीदेखील असू शकतात, असतात. पण जिथं एकमत होणं शक्य नाही अशी धर्मकारण ही एक मोठी जागा आहे. या बाबतीत व्यक्तिश: मला संवादी भूमिका घेऊन चर्चा करणं आवश्यक वाटतं. परंतु असा संवादी सूर आसपासच्या प्रचंड गलक्यात विरून जातो हे वरचेवर अनुभवायला येतं. शिवाय राम माधव (किंवा रवींद्र साठे) यांच्या लेखांसारखे अगदी मूलभूत गोंधळ असलेले लेख समोर आले की विशेष हतबुद्ध व्हायला होतं. अशा वेळी स. ह. देशपांडेंसारख्या हिंदूत्वाचा (हिंदूसंघटन करण्याचा) पुरस्कार करणाऱ्या आणि त्याबाबतची सविस्तर मांडणी करणाऱ्या लेखकाची आठवण होते. देशपांडे यांच्या विचारांशी सहमत होणं शक्य नसलं तरी निदान धर्माधारित विचारपद्धतीला व्यवस्थित शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी केलं होतं हे मान्य करावं लागतं.   

राम माधव यांच्या लेखातील काही विधानं चक्रावून टाकणारी आहेत. उदा. ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ आणि ‘नेहरूवादी राजकारण फोफावले ते सामाजिक विभाजनाच्या आधारे’ ही दोन विधाने. या विधानांमधून जो धादांत खोटा संदेश जातो आहे त्याचा प्रतिवाद करावा अशीही इच्छा खरं तर होत नाही. पण तरी तो करणं आवश्यक आहे. कारण असाच विचार करत राहिलो तर ‘दुसरी बाजू’ लोकांसमोर कशी येणार, हा प्रश्न सतावत राहतो.

गांधींनी धर्माचं महत्त्व ओळखलं होतं हे खरंच आहे. त्यामागे त्यांची मूळची धर्मश्रद्ध वृत्ती होती. त्यांना धर्माला टाकून द्यायचं नव्हतं; पण म्हणून त्यांना धर्म थेट राजकारणातही आणायचा नव्हता. ते रामाचं नाव घेत असत; पण म्हणून त्यांनी रामाला स्वातंत्र्य चळवळीच्या केंद्रस्थानी आणलं नाही. त्यांनी कुठेही रामाच्या मूर्तीची स्थापना केली नाही. गांधींच्या आश्रमात सर्वधर्मप्रार्थना होत असे. धर्म हा त्यांच्या चिंतनाचा विषय असेल; पण त्यांनी त्याचा वापर दुसऱ्या धर्माविरुद्ध हत्यार म्हणून कधीही केला नाही. याउलट हिंदूत्ववादी राजकारणाने काय केलं हे जगजाहीर आहे. यातली मेख अशी आहे की हिंदूत्ववादी राजकारण एकाच वेळी अनेक तोंडांनी बोलण्यात वाकबगार आहे. त्यामुळे हिंदूत्ववादी राजकारण मुस्लिमांच्या विरोधात आहे असं म्हटलं की मुस्लीम राष्ट्रीय मंचसारखं उदाहरण पुढे केलं जाऊ शकतं. एपीजे अब्दुल कलामांसारखे ‘गुड मुस्लीम’ आपल्याला हवे आहेत असं म्हणत दुसरीकडे आयटी सेलच्या मार्फत मुस्लीम कसे ‘बॅड’ आहेत याचे संदेश फिरवले जातात. याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात, किंवा ‘गांधींसाठी धर्मविरहित राजकारण हे पाप होते’ असं विधान करणं याला धर्मकेंद्री राजकारण म्हणतात. गांधींनी केलं त्याला धर्मकेंद्री राजकारण म्हणत नाहीत.

सामाजिक विभाजन या शब्दाचा अर्थ काय? दोन समूहांमध्ये बेबनाव निर्माण करणं. नेहरूप्रणीत राजकारणानं हे कधी केलं? या देशात अनेक धर्माचे, जातींचे लोक राहतात आणि त्यामुळे देशाची सामाजिक वीण टिकवून ठेवण्यासाठी शीर्षस्थ नेत्यांकडून जे संतुलित, विचारी वर्तन अपेक्षित असतं ते नेहरू आणि नंतरच्या नेत्यांमध्ये दिसून येतं. आज काय स्थिती आहे? सामाजिक विभाजन कोण करतंय? हे सगळं स्पष्टपणे इथं लिहायलाच हवं का? ऐंशी-नव्वदच्या दशकात माध्यमिक इयत्तांच्या पुढलं शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या अनेकांना हे आठवत असेल की त्या वेळी सामाजिक सलोखा राखण्यासाठी शासकीय प्रसारमाध्यमं प्रयत्न करत असत. लघुपट, गाणी प्रसिद्ध होत असत. ‘मिले सूर मेरा तुम्हारा’सारखं अजरामर गाणं आणि त्याचं चित्रीकरण माझ्यासारख्या अनेकांच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. आज ‘राष्ट्रीय एकात्मता’ हा शब्द तरी ऐकू येतो का? आज पद्धतशीरपणे मुस्लीम द्वेष पसरवला जातोय ते सामाजिक विभाजन नसून सामाजिक ऐक्याचा प्रयत्न आहे का?

मग ‘नेहरूवादी विभाजन’ कुठलं?

हिंदू कोड बिल हा सामाजिक विभाजनाचा प्रयत्न होता असं राम माधव यांना वाटत असण्याची दाट शक्यता आहे. वर जो ‘वल्र्ड व्ह्यू’चा उल्लेख केला आहे तो इथं लागू होतो. हिंदू कोड बिल आणलं याचा अर्थच हिंदू आणि मुस्लिमांमध्ये विभाजन आहे हे जर गृहीतच धरलं असेल तर पुढे काही बोलण्यात अर्थ उरत नाही. आणि हिंदू कोड बिल आणून तुमच्यावर अन्याय केला आहे हे हिंदूंच्या मनात आपोआप आलेलं नाही. ते पद्धतशीरपणे निर्माण करून दिलं गेलं आहे. हिंदू-मुस्लीमसंदर्भात इतिहासात जे झालं ते कुणीही अमान्य करणार नाही. पण त्यासाठी आपलं संपूर्ण राजकारण, आपला संपूर्ण ‘डिस्कोर्स’ एकांगी ठेवणं, धर्माधारित ठेवणं हे विभाजनाचं राजकारण आहे. इतिहास खोदत न बसता आता पुढे जाऊ असं म्हणत असणाऱ्यांना पुन्हा पुन्हा मागे नेणं हे विभाजनाचं राजकारण आहे. ‘केरळ स्टोरी’मधल्या मुली ‘हिंदू’ असणं आणि लैंगिक शोषण झालेल्या मुली फक्त ‘कुस्तिगीर’ असणं हे विभाजनाचं राजकारण आहे.

‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, १९९१’च्या कलम ३ मध्ये म्हटलं आहे की कोणत्याही धर्माच्या किंवा धर्माच्या पंथाच्या प्रार्थनास्थळाचे किंवा त्याच्या भागाचे त्याच धर्माच्या दुसऱ्या पंथाच्या अथवा अन्य धर्माच्या वा त्याच्या पंथाच्या प्रार्थनास्थळामध्ये कोणालाही रूपांतर करता येणार नाही. कलम ४ मध्ये जाहीर करण्यात आलं आहे की, प्रार्थनास्थळ १५ ऑगस्ट १९४७ रोजी ज्या स्वरूपात अस्तित्वात असेल, त्याचप्रमाणे ते ठेवण्यात येईल. मात्र याच कायद्याच्या कलम ५ मध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं की ‘अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रार्थनास्थळाला.. त्यासंबंधीच्या दाव्याला, अपिलाला किंवा इतर कोणत्याही प्रक्रियेला या कायद्यातील कोणतीही तरतूद लागू होणार नाही.’ आता यावर राम माधव काँग्रेसला काय म्हणणार? हिंदू कोड बिल आणल्याने सामाजिक विभाजन झालं आणि ‘प्रार्थनास्थळे (विशेष तरतूद) कायदा, कलम ५’ नुसार सामाजिक ऐक्य साधलं गेलं? 

राजकारण करायला हरकत नाही. पण विस्तृत कालपटावरील घटनांकडे बघताना मागचे-पुढचे संदर्भ, काळाचा संदर्भ, कारणमीमांसा, उद्देश इ. मध्ये न जाता भलतेच अर्थ लावत लावत, सोयीची निवड करत करत आपला आणि इतरांचा मूलभूत वैचारिक गोंधळ तरी करू नये!

(लोकसत्ता, ७ जून २०२३)

Sunday, March 26, 2023

अवधूत नावाचा इसम

अवधूत डोंगरे हा एक 'इसम' आहे. म्हणजे तो लेखक आहे. त्याच्या चार कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यानेअनेक इंग्लिश पुस्तकांचे उत्तम मराठी अनुवाद केलेले आहेत. 'रेघ' नावाचा मराठीतील एक अतिशय दर्जेदार, उच्च संदर्भमूल्य असणारा ब्लॉग तो चालवतो. या ब्लॉगवरील लेख वाचणं हा एक दीर्घ संवादात्मक, अतिशय समृद्ध करणारा अनुभव असतो. डिजिटल व्यासपीठावरील कोलाहलात रेघेने आपलं एक वेगळं, शांत-संयमी स्थान निर्माण केलं आहे. पण हे सगळं असलं तरी अवधूत हा एक 'इसम' आहे. कुठेही भेटेल, सापडेल. बोलेल, प्रश्न विचारेल आणि आपल्याला विचारात टाकून आल्या वाटेने निघून जाईल असा इसम. 'इसम' हा 'इझमां'च्या पलीकडे जाईल असा शब्द आहे. 'इसम' फक्त असतो आणि त्याला पुष्कळ बोलायचं असतं. त्याला त्याचं आख्यान लावायचं असतं. आपल्या 'कॉमन मॅन' स्थानावरून. आणि तो ते लावत असतो. ऐकणारं कुणी आहे की नाही याची फिकीर न करता. 

'इसम' म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर असं जे काही उभं राहतं ते मी अवधूतला दहा-पंधरा वर्षांपूर्वी प्रथम भेटल्यापासून माझ्या डोळ्यांसमोर उभं राहत आलं आहे. त्यावेळी तो पुण्यात एका मासिकाच्या संपादकीय विभागात काम करत होता. अगदी अबोल, अंतर्मुख मनुष्य. काही लोकांना भेटलं की 'हा माणूस वेगळा आहे' असं जे आपल्याला जाणवत राहतं ते मला त्याच्याबाबतीत नेहमी जाणवत आलं आहे. अंतर्मुख म्हणजे इतका की याने कधी कुणाला गडगडाटी हसून टाळी दिली नसणार याची खात्रीच पटावी. त्याच्याहून दहा वर्षांनी मोठा असलो तरी भंकस करायची जन्मजात सवय असल्याने त्याच्यासमोर मी जरा सावरूनच असायचो/असतो. अर्थात भंकस हा अनेकपैकी एक पैलू असल्याने तो अडसर कधीच होत नाही. (शिवाय हेही सांगायला हरकत नाही की विनोद प्रिय असला तरी तत्वज्ञान तितकंच, किंबहुना थोडं जास्तच प्रिय असल्याने अवधूतसारखा समानधर्मी भेटला की माझ्यातला 'इसम'ही जागा होतो आणि आपलं आख्यान सुरु करतो.)

अवधूतशी असलेल्या 'लाँग डिस्टंस' मैत्रीने मला पुष्कळ काही दिलं आहे. मुख्य म्हणजे माझ्यातल्या आळशी, बेशिस्त माणसाला जाग आणायला मदत केली आहे. खरं सांगायचं तर कधीकधी थोडा न्यूनगंडही निर्माण केला आहे. कारण सर्वांना समान उपलब्ध असणाऱ्या 'काळ' नामक परिमाणात त्याने जे काम केलं आहे ते अचंबित करणारं आहे. आपल्याकडेही अवधूतकडे आहे तितकाच वेळ असतो; पण आपण तो पुरेपूर वापरण्यात कमी पडतो याची जाणीव झाली की शरमल्यासारखं होतं. पुस्तकांच्या दुकानात गेलं की अवधूतने अनुवाद केलेलं एखादं नवीन पुस्तक दिसतं आणि माझी स्वतःबद्दलची हताशा वाढते. माझ्यापाशी नेमका आकडा नाही; पण त्याने आजवर पंचवीस-एक तरी पुस्तकांचे अनुवाद केले असतील. आणि अनुवादक म्हणून अवधूतचं नाव असेल तर तो अनुवाद उत्तम असणार याची खात्री पटते असा त्याचा अनुवादाच्या क्षेत्रातला दरारा आहे. 

पुण्यात असताना होणाऱ्या गाठीभेटी त्याने पुणं सोडल्यावर फारच क्वचित होऊ लागल्या. अर्थात पुण्यात असतानाही वरचेवर भेटत असे असं नाही. त्याने स्वतःला वाचन-लेखन-अनुवाद याला वाहूनच घेतल्यासारखं होतं. मुळात लेखन-वाचन ही काही त्याच्या केवळ 'आवडीची गोष्ट' नाही. त्याच्यासाठी ते संवादाचं माध्यम आहे. चिंतनाचा विषय आहे. कमालीच्या गंभीरपणे करण्याची चीज आहे. मी संपादक म्हणून काम केलेलं असल्याने अवधूतसारखा लेखक संपादकासाठी किती मोलाचा असतो हे मी सांगू शकेन. लिहिण्याविषयीचं प्रेम, आस्था हा एक भाग झाला. पण मांडणीत वजन असणं, व्याकरणाच्या व इतर चुका नसणं, परिच्छेद नेमकेपणाने पाडलेले असणं, लेखनाला ओघ असणं हेही लेखनातील महत्त्वाचे भाग आहेत. सध्या आता जवळजवळ सगळेचजण लेख टाइप करून पाठवतात. वर्ड फाइल कशी तयार केली आहे याचाही संपादक म्हणून माझ्यावर प्रभाव पडत असतो. एकेकाळी कागदावर समास पाडून, सुवाच्य अक्षरात लिहिलेला मजकूर वाचताना संपादकांना जसा आनंद होत असेल तसा मला व्यवस्थित फॉर्मेट केलेली वर्ड फाइल बघून होतो. अवधूत त्याबाबतीत चुकूनही निराश करत नाही. त्याच्याकडून काहीही आलं की ते डोळे झाकून प्रिंटिंगला पाठवावं इतकं अचूक असतं. त्याच्याशी माझा संवाद हा प्रामुख्याने इमेलवर होतो. तुम्हांला जे म्हणायचं आहे ते नीट, व्यवस्थित फोड करून, संदिग्धतेला अजिबात जागा न ठेवता, सर्वंकष विचार करून आणि भाषेचा प्रभावी वापर करून लिहिता येणं ही वास्तविक फार अवघड गोष्ट नसायला हवी. पण ती दुर्मीळ झाली आहे खरी. अवधूतशी होणारा इमेल संवाद मला हा दुर्मीळ आनंद देतो. तो सोशल मीडियावर नाही. रेघेचं फेसबुक पेज आहे. त्याकरता तो फेसबुक वापरतो. पण व्यक्तिशः नाही. तिथे नसण्याबद्दलही त्याने बऱ्याच वर्षांपूर्वी सविस्तर लिहिलं होतं आणि अलीकडच्या एका भेटीत सविस्तर बोललाही होता. तू चुकूनही सोशल मीडियावर येऊ नकोस असं मी त्याला सांगितलंच. समाजमाध्यमं ही उपयुक्त माध्यमं असली तरी त्यांची एक दुसरी, दुखरी बाजूही आहे. त्याच्या खोलात जाण्याचं इथे प्रयोजन नाही, पण आपली 'परस्पर संवादाची भाषिक कुवत' या माध्यमांनी कमी केली आहे की काय अशी शंका येते. शिवाय 'डिस्ट्रॅक्शन' हा एक मोठा धोका आहेच. 

अवधूतच्या 'इसम' असण्यात त्याच्या व्यक्तित्वाचा वैशिष्ट्यांबरोबरच त्याच्या 'अपीअरन्स'चाही भाग आहे. इन न केलेला, चौकटीचा किंवा रेघांचा फुल शर्ट, दुमडलेल्या बाह्या, साधी ट्राउझर, चप्पल हा त्याचा पोशाख मी अनेक वर्षं पाहतो आहे. चेहरा अतिशय इंटेन्स. एकूणात एकदम साधासुधा. आणि हा साधेपणा 'ऑरगॅनिक' आहे. 'अंगावर येणारा साधेपणा' नव्हे. तो सहसा साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या गजबजाटात फारसा दिसत नाही. त्याला ते अगदीच वर्ज्य नसावं; पण त्याची मूळ प्रकृती शांतपणे आपलं काम करत राहण्याची आहे. लेखक असणं, लेखन करणं याबद्दल त्याची निश्चित मतं आहेत. भालचंद्र नेमाडे यांच्यावर त्याने एक फार प्रभावी, चिकित्सक लेख लिहिला आहे. मूळ लेख जरूर वाचा. पण त्यातला हा एक उल्लेख पहा -     

 'हिंदू: जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी लिहायला तीस-बत्तीस वर्षं लागली, असं वेळोवेळी कुठे ना कुठे ऐकू येतं. अगदी काही महिन्यांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीवर एक निवेदिकाही दुसऱ्या एका लेखकाची मुलाखत घेताना हे बोलून गेली. तीस वर्षं हा जगण्याचा कालावधी विविध अपरिहार्य, अटळ कामांसाठी वापरावा लागणं स्वाभाविक आहे. त्यामुळे कादंबरी लिहायला उशीर झाला, किंवा ती गडबडीत लिहिणं योग्य वाटलं नाही, इतर कामं प्राधान्यक्रमात वरती होती, अशी कारणं नोंदवली जात नाहीत. कधीतरी इतर कोणत्या मुलाखतीत ती ओझरती येतात- कौटुंबिक जबाबदाऱ्या, प्राध्यापकीय कामं, इत्यादी. हे गैर नाही. पण जणू काही तीस वर्षं एका कादंबरीचा ध्यास लेखकाला आणि वाचकांनाही होता, अशी मांडणी केली जाते. मग याची मिथकं तयार होतात. कादंबरी लिहिणं हे कष्टाचंच काम असतं, त्यासाठी कोणी प्रवास केला, वाचन केलं, तर ते त्या-त्या विषयसूत्रानुसार करावंच लागतं. पण ते नुसतं करून पुरत नाही. त्यासाठी एक मिथक तयार करावं लागतं- मोठ्ठा कालावधी, मोठ्ठं वाचन, इत्यादी. मग ते खरोखर महत्त्वाचं असल्याचं ठसवलं जातं. लेखकाचं स्वाभाविक काम म्हणून ते उरत नाही. 

स्वतः लेखक असलेला अवधूत लेखनाविषयी जेव्हा असं तटस्थपणे बोलतो तेव्हा बरं वाटतं. अवधूतच्या इतरही लेखांमधून तो शांतपणे, निरीक्षकाच्या भूमिकेतून त्याला जे दिसलं, जे 'पॉईंट आउट' करावंसं वाटलं ते करताना दिसतो. ह्रषीकेश पाळंदेसारखे काही अपवाद वगळता त्याचे समकालीन लेखक समाजमाध्यमांचा, एका अर्थी गर्दीचा भाग होऊन आपलं स्थान पक्कं करण्याच्या प्रयत्नात दिसतात. आज ते अपरिहार्य आहे असं म्हणता येईल; पण दोन्हीकडचे लेखक पाहणाऱ्या माझ्यासारख्या वाचकाला त्यांच्या 'लेखकीय वजना'त थोडा फरक जाणवतो हेही नोंदवायला हरकत नाही. लेखन हे करिअर असण्यात काहीच गैर नाही. शिवाय आज काळ असा आहे की तुम्ही अगदी थिअरॉटिकल फिजिसिस्ट असलात तरी तुमचं नाव होण्यासाठी तुम्हांला (सोशल मीडियावर) नाच करून दाखवता येणं आवश्यक ठरतं! लोकमानस असं काही बदलतं आहे की तुम्हांला दोन मिनिटात किंवा दोन परिच्छेदात 'व्यापक' बोलता येणं गरजेचं झालं आहे. पण हे करायला लागत असल्याने तुमच्या खोलात उतरण्याच्या क्षमतेवर नक्कीच परिणाम होतो असं माझं निरीक्षण आहे. अवधूतसारखा लेखक तिथे वरचढ ठरतो. त्याच्यासाठीदेखील लेखन हे एका अर्थी करिअर आहेच. पण त्याच्यात 'लेखक होण्याचा' अट्टाहास दिसत नाही कारण तो लेखक आहेच. त्याला त्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. (इथे सामान्यीकरण करण्याचा हेतू नाही. पण एक ढोबळ निरीक्षण नोंदवण्याचा उद्देश जरूर आहे.)

माध्यमांच्या कोलाहलात काही सखोल वाचनाची, 'पर्स्पेक्टिव्ह'ची गरज 'रेघ' भागवतं. माझ्यासाठी अवधूतशी होणारा संवाद हाच परिणाम साधतो. झालंय असं की आजचं वास्तव विखंडित आहे तसंच माणसंही विखंडित आहेत. दीर्घ संवाद तर फारसा कुणालाच नको असतो. आपली मतं, धारणा पुन्हा पुन्हा तपासायचीही फारशी गरज कुणाला वाटत नाही. वास्तविक कुठलंही घटित त्याच्या आगेमागे शेकडो संदर्भ घेऊन येत असतं. घटिताविषयी भरपूर चर्चा होताना दिसते; पण या संदर्भांविषयी फारशी चर्चा होत नाही. आणि चर्चेला जी वळणं फुटत जातात तो तर वेगळाच विषय! वर जो करिअरचा मुद्दा आला त्याला जोडलेला एक मुद्दा असा की लेखन हा निव्वळ आवडीचा प्रांत असून चालत नाही. त्यासाठी तार्किक क्षमतेची, सुसंगतीची (coherence - the quality of forming a unified whole) गरज असते. अगदी समकालीन घटनांवरील टिप्पणी हा विषय घेतला तरी तिथेही याची गरज असते. पण जर करिअर साधायचं असेल तर मग हे मुद्दे मागे पडतात. कारण 'लेखक होणं' हे अधिक वरचढ ठरतं. त्यातून 'सोशल डिस्कोर्स'चं नुकसान होतं. लेखक जेव्हा कथा लिहितो, कादंबरी लिहितो तेव्हा त्याच्यावर सोशल डिस्कोर्सचं ओझं देण्याचं काहीच कारण नाही. त्या लेखनाची समीक्षा हा वेगळा विषय. पण जेव्हा काही भाष्य करणारं लेखन होत असतं तेव्हा मात्र 'सोशल डिस्कोर्स'चा मुद्दा लागू होतो. या पार्श्वभूमीवर अवधूतसारखा लेखक आणि भाष्यकार महत्त्वाचा ठरतो. 

भाषांतर करत असताना मूळ पुस्तकातील मांडणीविषयी प्रश्न पडून त्यावर भाषांतरकाराला काही म्हणावंसं वाटू शकतं. ते म्हणणं छापील स्वरूपात आल्याची उदाहरणं फारशी दिसत नाहीत. अवधूतची दोन मोठी टिपणं त्यादृष्टीने महत्त्वाची ठरतात. पहिलं म्हणजे 'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' (सुगावा प्रकाशन) आणि दुसरं 'एका शब्दाचा पेच - मराठी भाषांतरकाराचं टिपण' (साधना प्रकाशन).  
        
पहिल्या टिपणाची ओळख (मलपृष्ठावरील मजकूर) - 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 'ॲनाहिलेशन ऑफ कास्ट' या संहितेची एस. आनंद यांनी संपादित केलेली व त्यांनीच टिपा जोडलेली आवृत्ती 'नवयान पब्लिशिंग'नं मार्च २०१४मध्ये प्रकाशित केली. या ग्रंथासाठी एक दीर्घ प्रस्तावना 'द डॉक्टर अँड द सेंट' या शीर्षकाखाली अरुंधती रॉय यांनी लिहिली. या संपूर्ण प्रस्तावनेचं मराठी भाषांतर 'सुगावा प्रकाशना'नं 'वंश, जात व जातिव्यवस्थेचं उच्चाटन' या शीर्षकाखाली स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रसिद्ध केलं. रॉय यांच्या मांडणीसंदर्भात मराठी भाषांतरकाराचे काही तीव्र मतभेद आहेत. या मतभेदांची त्यानं केलेली नोंद स्वतंत्र पुस्तिकेच्या रूपात प्रसिद्ध करण्याचं ठरलं, ती ही पुस्तिका.

'स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण' हा मजकूर रॉय यांच्या पुस्तकाशी समांतरपणे लिहिला गेला, हे खरं. पण स्वतंत्रपणे वाचताना हा निबंध सध्याच्या काळातल्या अभिव्यक्तीविषयीचा एक अगदी लहानसा घटना-अभ्यास वा व्यक्ति-अभ्यास (केस-स्टडी) म्हणूनही वाचता येईल, असं वाटतं.

दुसऱ्या टिपणाची ओळख (पुस्तिकेचं मनोगत) -

अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात. काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे. इथे भाषांतराचा आशय टिळक-चरित्र हा असल्यामुळे वरील गुंतागुंतीची उकल करताना टिळकांच्या जीवनातील काही घटना-घडामोडींचा संदर्भही त्यात सविस्तर आलाच आहे. शेवटी त्यांच्या आयुष्यातल्या घटना-घडामोडींचे वर्णन किंवा विवरण करण्यासाठीच मूळ लेखकांनी शब्द वापरले आहेत. त्यामुळे मराठी भाषांतरकाराने टिळक-चरित्राच्या निमित्ताने इतरही संदर्भ सोबतीला घेत, त्याच्यासमोर आलेले पेच किंवा त्याला जाणवलेल्या काही शक्यता नोंदवायचा प्रयत्न या टिपणातून केला आहे.

ही दोन्ही टिपणं (पुस्तिका) आवर्जून वाचावी अशी आहेत. अवधूतमधला भाषांतरकार आपलं काम करत असताना त्याच्यातला भाष्यकार किती विचक्षणपणे त्या व्यवहाराकडे बघतो हे लक्षात येतं. 'एका शब्दाचा पेच'मध्ये त्याने टिळकांच्या व्यक्तिमत्वावर संदर्भसंपृक्त प्रकाशझोत टाकला आहे. टिळकांच्या संदर्भात वापरलेल्या 'कन्झर्व्हेटिव्ह' या शब्दापाशी रेंगाळत पुढे त्याने एक मोठाच पट मांडला आहे. 'एकेक पदर उलगडणं' म्हणजे काय त्याचा प्रत्यय हे टिपण वाचताना येतो. 

व्यक्तीचित्रात त्या व्यक्तीबाबत लिहावं असं अपेक्षित असतं. पण अवधूतमधली व्यक्ती आणि त्याच्यातला भाष्यकार वेगळा काढणं मला कठीण वाटतं. व्यक्तिगत संदर्भात मला त्याच्याबद्दल फार माहितीही नाही. एकदा बोलता बोलता त्याने एकदम 'अरे मी लग्न केलं' असं हळू आवाजात सांगितलं होतं. त्यावर मी त्याचं अभिनंदन केलं. पुढे त्याला मुलगा झाल्याचं एका मित्राकडून कळलं. त्याच्याशी बोलताना व्यक्तिगत, कौटुंबिक बोलणं होत नाही. पण तो ज्या आस्थेने साहित्यावर, सामाजिकतेवर बोलतो ते त्याचं 'व्यक्तिगत'च असतं. तो साहित्यिक-सांस्कृतिक कोलाहलापासून फक्त भौतिकदृष्ट्याच लांब आहे. रेघेवरचं त्याचं लेखन वाचलं की तो या कोलाहलात आपलं म्हणणं ठामपणे मांडतो आहे हे लक्षात येतं. रेघेवरील त्याच्या निवडक लेखांचं पुस्तक प्रकाशित होतं आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. या 'इसमा'चं आख्यान अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला त्याची मदत होईल. 

कुठलंही व्यक्तीचित्रण म्हणजे त्या व्यक्तीचं संपूर्ण चित्रण असूच शकत नाही. पण तरी काही व्यक्तींबाबत काहीतरी लिहावं असं वाटतं खरं. अवधूतबाबत मला तसं वाटत होतं. काही लिहावं असं बरेच दिवस मनात होतं. वाचकांना कदाचित हे त्याचं व्यक्तीचित्र वाटणार नाही. पण लेखक-भाष्यकार म्हणून तो मला कसा दिसतो याची कल्पना येईल. आपल्या 'वाटण्या'ला, आपल्या आतल्या गुंतागुंतीला बोलून मांडताना कधीकधी फार अवघड होतं. आमच्या मागच्या भेटीत अवधूतचं तसं होतंय असं मला जाणवलं. लेखक असण्यापेक्षा त्याचं 'इसम' असणं मला भावतं ते त्यामुळेच. त्याबाबतीत तो मला माझा सहप्रवासी वाटतो. कारण आसपास पाहिलं तर उत्तरं तयार असलेले, त्वरित निर्णय देणारे बरेचजण मला दिसतात; पण प्रश्नांपाशी रेंगाळणारे फारसे कुणी दिसत नाहीत.    

अवधूत लेखक आहे, त्याला युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळून आता काही वर्षं झाली. इथून पुढेही त्याला पुरस्कार मिळतील. पण त्याचा लेखकराव होऊ नये असं म्हणण्याचीही मला गरज वाटत नाही. कारण तसं होणार नाही याची मला खात्री आहे. इतपत तर मी त्याच्यातल्या इसमाला नक्कीच ओळखतो!