Tuesday, June 10, 2025

न भेटलेल्या सहयात्रिकाचं स्मरण

लेखकाने लिहितं असणं, विविध 'ट्रिगर्स'मुळे लिहितं असणं, वाचकांना वाचन थांबवणं अशक्य करणं, विलक्षण सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती आणि लेखकीय 'कारागिरी' अजिबात दिसू न देताही तिचा योग्य तो उपयोग करून घेण्याचं कौशल्य यांच्या बळावर रंगीबेरंगी माणसांनी नटलेलं 'चित्रमय जगत' उभं करणं, लोकांना त्यात रमवून टाकणं ही 'लेखकपणा'ची वैशिष्ट्यं वाचकांसाठी कुतूहलाचा विषय असतो. त्यातही मग एखादा लेखक जेव्हा तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग होतो आणि त्याचा प्रभाव लक्षणीय काळापर्यंत राहतो तेव्हा तर अशा लेखकाबद्दल अधिकच कुतूहल वाटतं. लेखकाने लोकांच्या जगण्यात स्थान मिळवणं ही त्याच्या सर्जनशीलतेला मिळालेली पावती असते. महाराष्ट्र देशी हे ज्या लेखकांच्या वाट्याला आलं त्यातले पु. ल. देशपांडे अग्रणी! पुलं वयाच्या साठीत होते तेव्हा 'टीन एज'मधली माझ्यासारखी मुलं त्यांची प्रवासवर्णनं, व्यक्तिचित्रं, ललित लेख, नाटकं वाचून हरखून जात होतो. आजच्या 'मीमांसक' भाषेत (पण नकारात्मक नव्हे तर सकारात्मक अर्थाने) बोलायचं तर आमच्यासाठी पुलंचं लेखन म्हणजे 'डोपामाइन'चा आद्य स्रोत होतं! (नाटक 'वाचणं' याबद्दल कुणाचं काय मत असेल ते असो; पण टेबलावर किंवा एका हातात जेवणाचं ताट आणि एकीकडे 'तुझे आहे तुजपाशी'चं कितव्यांदा तरी वाचन हे दृश्य आमच्या घराने असंख्य वेळा पाहिलं होतं! आता पुस्तकाची जागा स्क्रीनने घेतली आहे. यावर वेगळी चर्चा संभवते. पण ते असो).

एकविसाव्या शतकाची पहिली पंचवीस वर्षं पूर्ण होण्याच्या टप्प्यावर विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या पुलंबद्दल एक नक्की म्हणता येईल की हा लेखक शिळा व्हायला तयार नाही. म्हणजे 'एकेकाळी पारायणं केलेली पुलंची पुस्तक आजही वाचतो' या अर्थी नव्हे. त्या वाचनाने तेव्हा जे आत उतरवलं ते अजूनही टवटवीत आहे या अर्थाने. त्यासाठी ती पुस्तकं पुन्हा वाचायची गरज नसते. नंदा प्रधान/लखू रिसबूड/नारायण/चितळे मास्तर/नाथा कामत/सखाराम गटणे/अंतू बर्वा/बबडू/हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका आणि इतर 'लोकोत्तर' वल्ली किंवा 'असा मी असामी'तले धोंडोपंत, शंकऱ्या, नानू सरंजामे, 'गुरूदेव' आणि कायकिणी गोपाळराव, 'बटाट्याच्या चाळी'तले आचार्य बाबा बर्वे, कोचरेकर मास्तर, सोकरजी त्रिलोकेकर, म्हाळसाकांत पोंबुर्पेकर, जनोबा रेगे, एच्च. मंगेशराव आणि वरदाबाई, नागूतात्या आढ्ये, 'वाऱ्यावरची वरात'मधली 'रविवार सकाळ' आणि 'साक्ष', 'म्हैस'मधली 'सुबक ठेंगणी', मधू मलुष्टे, झंप्या दामले, उस्मान शेठ, 'तुम्ही काही म्हणा उस्मानशेठ, सर्व धर्म सारखे...ऑम्लेट!' म्हणणारे बगूनाना, 'स्वातंत्र्यपूर्व ते स्वातंत्र्योत्तर' टेप लावणारे बाबासाहेब मोरे, धर्मा मांडवकर, 'ती फुलराणी'मधली मंजुळा, अशोक जहागीरदार, विश्वनाथ जोशी आणि मटक्याच्या अड्ड्यावरील तत्त्वज्ञ दगडोबा साळुंके, पुलंच्या लेखणीतून आपल्याशी थेट बोलणारे अनेक प्रसंग, व्यक्ती आणि ठिकाणं - हे सगळं पुन्हा वाचायची गरजच नसते इतकं ते तुमच्या आत भिनलेलं असतं. दैनंदिन संवादात पुलंच्या पात्रांचे संदर्भ आणि संवाद आजही हजेरी लावतात. पुलंच्या लेखनाचं साहित्यिक मूल्यमापन जे व्हायचं ते होवो; मराठी वाचकांनी त्यांना दिलेला कौल अबाधित आहे. 

पुलं साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट अशा सगळ्या क्षेत्रात केवळ वावरले इतकंच नाही तर त्यांनी त्या त्या क्षेत्रात एक उंची गाठली. मात्र त्यांचं पहिलं प्रेम संगीतावर होतं. एकाच वेळी एका ठिकाणी गाण्याची मैफल आणि दुसऱ्या ठिकाणी साहित्यिक कार्यक्रम असं असेल तर मी गाण्याच्या मैफिलीला जाईन असं ते म्हणाल्याचं अनेकांना माहीत असेल. म्हणूनच बहुधा त्यांनी चितारलेल्या व्यक्तीचित्रांमध्ये गायक, संगीतकारांची व्यक्तीचित्रं विशेष उठून दिसतात. पुलंची व्यक्तीचित्रं म्हणजे त्यांच्या 'गुण गाईन आवडी' स्वभावाची द्योतक आहेत. गायक, लेखक, अभिनेते, नातलग, मित्र, शिल्पकार, सामाजिक-राजकीय विचारवंत, कार्यकर्ते, बाबा आमटेंसारखे मोठे समाजसेवक अशांविषयी लिहिताना पुलंची लेखणी कमालीची कृतज्ञ होई, भारावून जाई. त्यामुळे पुलंनी 'व्यक्तीचित्रण म्हणजे केवळ गुणवर्णन' असा पायंडा पाडल्याचा आरोपही त्यांच्यावर होतो. पण त्यांनी लिहिलेली काही व्यक्तीचित्रं, विशेषतः भास्करबुवा बखले आणि पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांची, वाचली तर हा समज पूर्णपणे बरोबर नाही याची खात्री पटते. बखले आणि पलुस्कर या दोन्ही व्यक्तीचित्रणात पुलंमधल्या गुणग्राहक, भावुक रसिकाइतकाच त्यांच्यातला संगीताच्या इतिहासाचा अभ्यासकही ठसठशीतपणे दिसतो. इतरही बऱ्याच व्यक्तीचित्रांमधून त्यांच्यातल्या सामाजिक-सांस्कृतिक भाष्यकाराची झलक मिळत असते. ('विश्रब्ध शारदा'च्या दुसऱ्या खंडाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना हे आणखी एक उदाहरण). फक्त होतं असं की त्या व्यक्तीचित्रणाचा एकूण बाज प्रेमाचा, भारावलेपणाचा असल्याने काही गंभीर तपशील वाचक/समीक्षकांकडून निसटून जातात. पुलं गेल्यानंतर पुढच्याच वर्षी, २००१ साली प्रकाशित झालेल्या 'एक शून्य मी' या त्यांच्या लेखसंग्रहातले काही लेख (विशेषतः 'एक शून्य मी' हाच लेख) वाचून 'अरे! पुलंनी गंभीर लिखाणही केलेलं आहे की!' असा बऱ्याच वाचकांना साक्षात्कार झाला. (त्यात मीही होतो). या संग्रहातल्या त्यांच्या 'नामस्मरणाचा रोग' या लेखाने समाजमाध्यमांची वारी केल्याचं अलीकडे दिसलं. 

माणसाच्या जगण्यात साहित्याचं प्रयोजन काय, किंवा कलेचं प्रयोजन काय, उत्तम साहित्य/कला कशाला म्हणायचं यावर आजवर अगणित पानं खर्ची पडली असतील. माणूस, आणि त्यातही समीक्षक माणूस, स्वतःची दृष्टी, स्वतःचा काहीएक विचारव्यूह घेऊन जगत असल्याने हे होतच राहणार. पण समीक्षेच्या अदृश्य दडपणाखालीदेखील कलावंत त्यांची निर्मिती करत राहतात, समीक्षेला खाद्य पुरवत राहतात हे मला अधिक विशेष वाटतं. 'मोनालिसा स्माइल' या चित्रपटात कला इतिहास शिक्षक कॅथरीन (ज्युलिया रॉबर्ट्स) एकदा विद्यार्थिनींना चेम सूटीन या फ्रेंच इंप्रेशनिस्ट चित्रकाराचं 'कॅरकस ऑफ बीफ' या शीर्षकाचं एक चित्र दाखवते. ते चित्र मुलींनी आजवर पाहिलेल्या चित्रांमधून तयार झालेल्या त्यांच्या सौंदर्यदृष्टीला धक्का देणारं असतं. आणि मुख्य म्हणजे ते 'सिलॅबस'चा भाग नसतं. या 'आउट ऑफ सिलॅबस' चित्राबद्दल चर्चा सुरु होते. त्यात कॅथरीन म्हणते की तुम्हांला हे चित्र 'आवडायला'च हवं असं अजिबात नाही; पण तुम्ही ते 'विचारात' मात्र जरूर घेतलं पाहिजे. मला वाटतं हा विचार कलात्मक अभिव्यक्तीबाबत, कला क्षेत्रातील पारंपरिक आणि आधुनिक दोन्ही आविष्कारांबाबत साधकबाधक चर्चा करताना लक्षात घ्यावा असा आहे. पुलंना वाचकांचं उदंड प्रेम मिळालं आणि दुसरीकडे समीक्षकीय दंडुक्यांनीही त्यांना सोडलं नाही. त्यांच्या काही लेखांमधून (उदा. 'विनोदी लेखन म्हणजे साहित्य? हॅट, हडत् किंवा हुडुत!' हा 'अघळपघळ'मधला लेख) त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. सुधीर बेडेकर, फ. मुं. शिंदे यांना दिलेल्या मुलाखतींमध्येही ते याबद्दल बोलले आहेत. (दोन्ही मुलाखती 'पुरचुंडी' या पुस्तकात आहेत. फ. मुं. शिंदेंना दिलेल्या मुलाखतीत भालचंद्र नेमाड्यांनी पुलंवर केलेल्या टीकेबद्दल पुलं जे बोलले आहेत ते ज़रूर वाचावं. आणि सुधीर बेडेकरांना दिलेल्या मुलाखतीत पुलंवर होणाऱ्या 'मध्यमवर्गीय लोकांचा मध्यमवर्गीय लेखक' आरोपाबद्दल ते जे बोलले आहेत तेही अवश्य वाचावं. पुलंसारखा लेखक 'माणूस' म्हणून कसा मोठा होता आणि वाचकांना तो का आवडतो हे लक्षात येईल!). स्वतः पुलंनी थिएटर ऑफ द ॲब्सर्ड, नवकविता, एकूणच त्यांना 'अनाकलनीय' वाटणाऱ्या कलाविष्कारांबद्दल विडंबनात्मक लेखन केलं आहे. भाऊ पाध्येंच्या लेखनशैलीचीही त्यांनी टोपी उडवली आहे. साहित्याच्या, कलेच्या क्षेत्रात भिन्न वृत्तीच्या, भिन्न विचारप्रवाहांचे पाईक असलेल्या कलाकार-समीक्षकांकडून टीकेची जी देवाण-घेवाण चालते ती ही मंडळी 'माणूस' आहेत हेही लक्षात घेत पाहावी लागते. मला जाणवणारं पुलंचं एक वैशिष्ट्य असं की ते जेव्हा भक्कम आणि निर्विष विनोदाचा आधार घेत टोप्या उडवत तेव्हा त्यातून होणारी 'रसनिष्पत्ती' लाजवाब असे! आज 'रोस्टिंग' हा विनोदाचा प्रकार चांगला रूळला आहे; पण त्यावेळी पुलंनीही काही प्रमाणात हे रोस्टिंग केलं होतं. प्रश्न मुळात विनोदाला मान्यता आणि प्रतिष्ठा देण्याचा आहे. 'विनोद' या साहित्यप्रकाराच्या स्वरूपातच अतिशयोक्ती, थोडी आक्रमकता, थोडे बोचकारे काढण्याची क्षमता हे सगळं असतं हे मान्य करण्याचा आहे. समाज म्हणून, वाचक-प्रेक्षक म्हणून तुम्ही हे करू शकलात तरच पुढची चर्चा संभवू शकते. 

आणि या आघाडीवर आज पुलंचं काय झालं असतं हा विचारही करवत नाही. जेव्हा पुलं विनोद करत होते (आणि जोडीला 'ठणठणपाळ'ची अद्भुत वटवट सुरू होती) तेव्हाही काही प्रमाणात त्यांना त्याचे काही उलट फटके बसत होते. 'वाऱ्यावरची वरात' सुरू होताना पुलं प्रेक्षकांसमोर येऊन 'आमचा हा कार्यक्रम मजेचा आहे. म्हणजे हसून सोडून द्यायचा आहे. त्यात 'साहित्यिक मूल्य वगैरे शोधू नका. सापडणार नाही' असं म्हणून पुढे अगदी काकुळतीने 'कृपा करून कुणी रागवू-बिगवू नका हं' असं म्हणायचे. पण तरी एकूणात बघता लोकांची विनोद स्वीकारण्याची, सहन करण्याची तयारी बरीच बरी होती असं म्हणता येतं. आज कदाचित पुलंचं अवघड झालं असतं. 'या भारतमातेनं एक वैताग आणलाय. जरा कुठे थोडा वेळ नातवंडांना खेळवेल तर नाव नाही. उठसूठ आपली सुपुत्रांना हाका मारत असते' असं त्यांनी एके ठिकाणी ओघात लिहिलं आहे. परदेशात स्त्री-पुरूषांचा मुक्त वावर पाहून 'आम्ही मात्र स्वतः प्रभू रामचंद्र असल्यासारखे सीतामायांना आमच्या मागून वागवत चाललो होतो' असं ते एका प्रवासवर्णनात लिहितात. आणखीही काही उदाहरणं आहेत. आता आज त्यांनी हे विनोद केले असते तर कदाचित संस्कृतीरक्षक आणि देशभक्तांनी त्यांच्या घरावर मोर्चे नेले असते आणि पुलंवर 'अर्बन नक्षल'चा शिक्काही बसला असता. 

१९२० ते २००० हा पुलंचा ऐंशी वर्षांचा कालखंड राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात ज्या वेगाने पुढे सरकत गेला तितकाच वेग बहुधा २००० ते २०२५ या पंचवीस वर्षांच्या काळाला आहे. या काळातला बदलाचा वेग अचंबित करणारा आहे. डिजिटल जग वेगवान, सोयी-सुविधांचं असलं तरी ते बऱ्याच प्रमाणात हिंसकही आहे. एकीकडे 'प्रॉब्लेम ऑफ प्लेन्टी' आहे तर दुसरीकडे (ऐतिहासिक) अभावग्रस्तताही आहे. असं असतानाही बाजाराच्या तावडीतून कुणीच सुटलेलं नाही. लेखकही नाही. पुलं ज्या काळात वावरत होते तेव्हा लेखक आजच्याइतका असुरक्षित, प्रभावक्षम नव्हता. लेखक त्याच्या काळाचं अपत्य असतो असं म्हणतात; पण त्याचबरोबर तो त्याच्या काळाला काही प्रमाणात आकारही देत असतो. आज लेखकापुढे 'काळाचं अपत्य' असण्याला पर्याय नसल्यासारखी स्थिती आहे. वाचक आपल्या लेखकाचा शोध घेत असत; पण आता लेखकाला आपला 'टारगेट' वाचक शोधावा लागतो. कारण वाचकांचं लक्ष प्रचंड विभागलेलं आहे. एक तर वाचकाचा प्रेक्षक झाला आहे. त्यामुळे चोवीस तास स्क्रीनवर गळणाऱ्या 'कंटेंट'वरचे त्यांचे डोळे आपण लिहिलेल्या कथेकडे वळवण्याची उस्तवार लेखकालाच करावी लागते.    यातून आजचा लेखक या काळासारखाच विखंडित, विस्कळीत झालेला दिसतो. (हे म्हणणं म्हणजे काही अंतिम निवाडा नाही. एक ढोबळ निरीक्षण आहे इतकंच). आज पुलं असते तर कदाचित ते स्वतःदेखील समाजमाध्यमांच्या जंजाळात हरवले असते. कारण त्यांचा स्वभाव माणसांमध्ये रमण्याचा होता. पण त्यामुळे ते स्वतः भरभक्कम निर्मिती करण्याऐवजी समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांना उत्तरं देत बसले असते. अंतहीन चर्चांमध्ये अडकले असते. (अर्थात सुनीताबाईंनी त्यांना बाहेर काढलं असतं!). पुलंनंतर त्यांच्यासारखा हरहुन्नरी, अष्टपैलू लेखक-कलावंत मराठी जगतात अद्याप झाला नाही; पण भविष्यात कधी होईल का असा प्रश्न काहीजणांच्या मनात येत असेल. मला हा प्रश्न तितकासा प्रस्तुत वाटत नाही कारण कलाकृती आणि कलावंत या दोहोंच्या 'निर्मिती'बाबत आपण गणिती पद्धतीने काहीच सांगू शकत नाही. (शिवाय वर उल्लेख केलेली 'काळाची दुखणी' आहेतच!). पुलांसारखा लेखक होवो अथवा न होवो, जे लेखक होतील त्यांनी त्यांच्यासारखा 'माणूस' लेखक व्हावं असं मात्र मनापासून वाटतं. पुलंमधला लेखक, रसिक आणि सहृदय माणूस वेगळा काढता येत नाही इतके ते एकजीव झालेले दिसतात. पुलंबद्दल आत्मीयता वाटण्याचं हे एक मुख्य कारण आहे. 

'कृतज्ञ असणं ही सर्वात सुंदर गोष्ट आहे आणि कृतघ्न असणं सर्वात कुरूप गोष्ट आहे' असं पुलंनी म्हटलं आहे. सांस्कृतिक-वैचारिक क्षेत्रात चर्चा, समीक्षा, 'विचारधारा आणि व्याख्यांची युद्धं' हे सगळं सुरू असायला हरकत नाही; पण पुलंचं हे साधं म्हणणं लक्षात ठेवून ते केलं तर कदाचित हा प्रवास सुसह्य होईल. पुलंना 'आनंदयात्री' म्हटलं जातं त्याची अशा वेळी आठवण होते. ते आज असते तर त्यांनी काय केलं असतं किंवा नसतं याचं मला फारसं कुतूहल नाही; पण त्यांच्यासारखा 'सहयात्री' आपल्याबरोबर आहे याचा मला अतीव आनंद झाला असता!

(लोकसत्ता, 'लोकरंग' ८ जून २०२५) 

Wednesday, February 26, 2025

गांधीजी : ‘अवघड आदर्श’ ते ‘सुलभ वर्तन’

गांधीजी आपल्याला कसे दिसतात, अकादमिक अभ्यासाच्या पलीकडे जात लोकांच्या दैनंदिन जगण्यात गांधीजींचं काय स्थान आहे  याचा विचार करताना काहीसं भोवऱ्यात सापडल्यासारखं होतं. ते अशासाठी की गांधीजींचा 'रिलेव्हन्स' संपला आहे का यावरचं माझं स्पष्ट उत्तर 'नाही' असं असलं तरी गांधीजींबद्दल आज हजारो पुस्तकं आणि लक्षावधी पानं उपलब्ध असतानाही भारतीयांना गांधीजी नीट कळले आहेत का आणि मुख्य म्हणजे, गांधीजींकडून आपण काय घ्यायचं हे नीट कळलं आहे का हे प्रश्न हैराण करत राहतात.

गांधीविचारांबाबत खुद्द गांधीजींचं लेखन वाचलेलं नसण्याबरोबरच गांधीजींबाबत स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जे राजकारण खेळलं गेलं त्याचाही गांधीजी 'न कळण्याला' हातभार लागला आहे. हिंदुत्ववादी विचारधारेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून सातत्याने, चिकाटीने गांधीजी आणि गांधीविचार मलीन करण्याचा प्रयत्न केला.गांधीजी म्हणजे 'नेभळट अहिंसक' अशी प्रतिमा जनमानसात रुजवण्यात त्यांना यश आलं. (मी माध्यमिक शाळेत असताना शाळेतील समाजशास्त्राचे शिक्षक आणि मराठीच्या शिक्षिका वर्गात मुक्तकंठाने गांधीजींवर तोंडसुख घेत). दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववादाच्या शीर्ष नेतृत्वाने मात्र कधीच गांधीजींवर थेट टीका केली नाही. कायम त्यांचे गोडवे गायले. गांधीजींची 'दुसरी हत्या' करण्याचं काम केलं ते या शीर्ष नेतृत्वाच्या हाताखालील असंख्य 'फूट सोल्जर्स'नी. गांधी म्हणजे अहिंसा, म्हणजे थोडक्यात हिंसा सहन करणं आणि हिंसेचा प्रतिकार न करणं, हे समीकरण तर लोकांच्या मनात इतकं घट्ट बसवलं गेलं आहे की गांधींनी लोकांना एकत्र करून संघटितपणे सत्याग्रह घडवले, लोकांनी परदेशी कपड्यांवर, परदेशी मालावर बहिष्कार घातले, लोक निर्भयपणे ब्रिटिश सत्तेसमोर उभे राहिले, स्त्रिया फार मोठ्या संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात आल्या हा सगळा इतिहास जणू आता विस्मृतीतच गेला आहे. गांधी म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांत बाधा आणणारे कुणीतरी होते अशा प्रकारची मांडणी सातत्याने होताना दिसते. वस्तुतः गांधीजी काँग्रेसप्रणित स्वातंत्र्य चळवळीच्या अग्रभागी होते. सशस्त्र क्रांतिकारक त्यांच्या मार्गाने जात होते आणि आज जी मंडळी उठता बसता गांधींच्या नावाने बोटं मोडतात, गांधीजी नसते तर स्वातंत्र्य लवकर मिळालं असतं असं म्हणतात त्यांचे पूर्वज या सगळ्यात कुठेच नव्हते! 

गांधीजी आणि त्यांचा 'रिलेव्हन्स' या विषयावर चर्चा करताना गांधीजी आणि हिंदुत्ववादी राजकारण हा संदर्भ पूर्णपणे टाळता येणं शक्य नाही म्हणून हे नोंदवलं. 

तर मुद्दा असा की गांधीजी आपल्याला नीट कळले आहेत का? आणि जर गांधीजी म्हणजे 'एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' किंवा 'रोज खजूर खा, तांबडा भोपळा खा, सिनेमा बघू नका, कुठलंही यंत्र वापरू नका' हे आपलं आकलन असेल तर आपली प्रचंडच मोठी गफलत झाली आहे! ('एका गालावर कुणी मारलं तर दुसरा गाल पुढे करा' हे मुळात येशू ख्रिस्ताचं वचन आहे. गांधीजींचं नाही.) गांधीजींचं एकूण तत्त्वज्ञान, त्यांचा 'जीवनमार्ग' हा अहिंसा, सत्य, साधेपणा, स्वावलंबन या मूल्यांवर आधारित आहे हे स्पष्टच आहे. त्यांची एक जीवनदृष्टी होती. परस्परपूरक आणि माणसाचं 'मनुष्यत्व' सिद्ध करणारं जीवन कसं असावं याविषयी त्यांची एक धारणा होती. आता या विशिष्ट जीवनदृष्टीवर आधारलेलं प्रत्यक्ष जीवन कदाचित कुणाला 'अव्यवहार्य' वाटूच शकतं. पण प्रश्न असा आहे की अशी जीवनदृष्टी असण्याचा आणि त्याप्रमाणे जगण्याचा गांधीजींना अधिकार आहे की नाही? ते ज्या पद्धतीने जगले तंतोतंत त्याच पद्धतीने जगानेदेखील जगावं यासाठी त्यांनी कधी कुणाला वेठीला धरलं नाही. जगाने - निदान भारताने, त्यांच्या आसपासच्या माणसांनी, एक विशिष्ट जीवनशैली स्वीकारावी अशी त्यांची इच्छा नक्कीच असणार/होती, त्यांच्या लेखनातून, भाषणांतून त्यांनी आपल्या जीवनशैलीचा प्रसारही केला असेल; पण पुन्हा तोच प्रश्न - त्यांना तसं करण्याचा अधिकार का नसावा? झालं असं की गांधीजींची एकूण मांडणी इतकी वेगळी आणि अनोखी होती की 'हे काहीतरी ग्रेट आहे' असं वाटून सगळ्यांना गांधीजींचा नैतिक धाक वाटू लागला. पण 'हे ग्रेट आहे'च्या पोटात 'आपल्याला काय हे जमणार नाही' हाही विचार होता. त्याचंच पर्यवसन पुढे 'हे अव्यवहार्य आहे' या विचारात झालेलं दिसतं. 

गांधीजींना त्यांच्या अनुयायांनी, राजकीय वारसांनी गांधीजींना एका उंचीवर नेऊन ठेवलं आणि त्यातून गांधी म्हणजे एक 'अवघड आदर्श' आहे, तो प्रत्यक्षात साध्य करता येत नाही अशी समजूत सार्वत्रिक झाली. वर उल्लेख केल्याप्रमाणे यात भर म्हणून हिंदुत्ववादी विचारधारेने गांधीजींची पुरेपूर बदनामी होईल याची काळजी घेतली. आंबेडकरवादी, कम्युनिस्ट, समाजवादी यांचेही गांधीजींशी मतभेद होतेच; पण त्यांनी गांधीजींबाबत विद्वेषी, विखारी आणि खोटा प्रचार केला नाही. क्वचित काही ठिकाणी तीव्र भाषा वापरलेली आढळू शकेल; पण हिंदुत्ववाद्यांनी जसं गांधी-नेहरूंना शत्रू मानलं होतं तसं इथे नक्कीच झालेलं नाही.   

एका लेखाच्या मर्यादेत आपल्याला सर्वच मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करता येणार नाही; पण गांधीजींबाबत 'ते यंत्रविरोधी होते, त्यांना आधुनिकता नको होती' हा जो आक्षेप दिसतो त्याविषयी थोडं बोलता येईल. यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे असं मला दिसतं. (मला कुणी विचारलं की गांधीजी आपल्याला काय देतात तर माझं एका शब्दातलं उत्तर 'नीतीविवेक' हे असेल). माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते.  माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अत्यंत महत्त्वाचं वाटत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. 

आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसतो का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या खात्यावर टाकायच्या हा प्रश्न आहे. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण त्याचा वापर विद्वेषी प्रचारासाठी केल्याने काय झालं आहे हे आपल्याला माहीत आहे. इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग?

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, 'आत्मबल'युक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात. प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात. 

गांधीजींनी पूर्ण यंत्रविरोध केलेला नाही तर यंत्रविवेक सांगितला आहे. आज आपण 'डिजिटल डीटॉक्स'बद्दल बोलतो आहोत. 'स्क्रीन टाइम' कमी करण्याबद्दल बोलतो आहोत. पर्यावरणीय संकटाबद्दल बोलतो आहोत. आत्मिक शांतीबद्दल बोलतो आहोत. यंत्रांचा वापर जेव्हा आजच्यापेक्षा कैक पटीने कमी होता तेव्हा गांधीजी असंच काही सांगत होते यात त्यांचं द्रष्टेपण दिसून येतं. 'पर्यावरण रक्षण' हा शब्ददेखील चर्चेत नव्हता तेव्हा गांधीजी पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करत होते - पर्यावरणपूरक जीवनशैली हा शब्द न वापरता! लक्षात घेण्याजोगा भाग हा की अशी जीवनशैली स्वीकारणं याला त्यांच्या दृष्टीने एक 'स्वतोमूल्य' होतं. पर्यावरणाचा इतका विनाश होईल याची त्यांना कदाचित त्या क्षणी कल्पनाही नसेल; पण पर्यावरणाला बाधा पोचेल म्हणून नाही तर एक जीवनमूल्य म्हणून विशिष्ट जीवनशैली स्वीकारली पाहिजे हा त्यांचा विचार निश्चितच क्रांतदर्शी होता.  

गांधीजींबाबत एक अडचण अशी झाली आहे की त्यांचा वापर मोजमापाच्या फूटपट्टीसारखा केला जातो. म्हणजे गांधीजींचा प्रभाव असलेल्या एखाद्याने जर नवीन कार घेतली किंवा बंगला बांधला तर 'हे तुम्हांला बरं चालतं? आता कुठे गेला तुमचा गांधीवाद?' असं त्याला विचारलं जाऊ शकतं. गांधीजी ज्या जीवनशैलीचा पुरस्कार करत होते तिच्याशी सुसंगत नसलेल्या काही गोष्टी करूनही आपण गांधीजींच्या प्रभावात आहोत असं म्हणणं योग्य होईल का या प्रश्नाचं उत्तर मी 'हो, होईल' असं देईन. याचं कारण असं की गांधीविचाराचा परीघ बराच मोठा आहे आणि 'गांधीविचार' या फूटपट्टीने सगळंच मोजत राहिलं तर मग जोवर आपण पंचा नेसत नाही तोवर आपल्याला गांधींचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं म्हणावं लागेल. वर म्हटलं तसं नीतीविवेक हा गांधीविचाराच्या गाभ्याशी आहे. त्यामुळे त्या कसोटीवर आपली कृती घासून पाहणं हे आपण जरूर करावं. गाडी किंवा बंगला बाजूला ठेवू, आपण बाजारातून साधा शर्ट घेतला तरी त्या शर्टच्या निर्मितीत कुणाचं शोषण झालेलं नाही असं आपण खात्रीपूर्वक सांगू शकणार नाही. पण म्हणून आपण शर्टदेखील घ्यायचा नाही असं ठरवण्यात हशील नाही. आपण कपड्यांच्या मोहात किती अडकायचं हा निर्णय मात्र आपण विवेकाने घेऊ शकतो. शिवाय जर एखाद्याला खरंच वाटलं की मी माझा शर्ट माझ्या हाताने तयार करेन आणि त्याने तसं केलं तर ते अर्थातच प्रशंसनीय आहे. पण गांधीविचार उचलून धरण्यासाठी तशी पूर्वअट असू शकत नाही. (आजही हाताने सूत कातून त्याचे कपडे वापरणारे काहीजण आहेत. पुण्यात राहणारे माधव सहस्त्रबुद्धे हे एक उदाहरण. माधवदादा सूतकताईचं प्रशिक्षणही देतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडीओ पाहता येतील). 

एका बाबतीत मात्र मी आग्रही आहे. आपण जर गांधीविचारांमुळे खरोखरच प्रभावित झालो असू तर ते आपल्या संवादी आणि सहिष्णू असण्यातून मात्र दिसायला हवं. याबाबतचा माझा अनुभव सांगावासा वाटतो. मी गेली बरीच वर्षं फेसबुकवर सक्रीय होतो. वर उल्लेख केलेली संवादमालिका मी फेसबुकवर लिहिली यात फेसबुकचा एक व्यासपीठ म्हणून जसा सहभाग आहे तसाच याच माध्यमावर पडलेले गटतट, त्यांच्यातला विसंवाद आणि विखार ही कारणेही आहेत. राजकीय ध्रुवीकरण इतक्या घातक वळणावर आलं आहे की विवेक जागृत असणाऱ्या कुणाही माणसाला अगदी नैराश्य यावं. अशा वातावरणात गांधीजींचा शांत, संयमी स्वरच मदतीला येणार आहे. या सगळ्या कोलाहलाला भेदून जाणार आहे. फेसबुकवरील माझ्या वावरात मी संयमीपणे, दुराग्रह न बाळगता, विरोधी मताला - अगदी विद्वेषी टिप्पण्यांनाही शांतपणे उत्तर देत जे लेखन केलं त्याचा प्रेरणास्रोत मला गांधीविचारच वाटतो. आणि मला हे आवर्जून नोंदवावंसं वाटतं की शांतपणे प्रतिवाद करण्याचे सकारात्मक परिणाम मला दिसलेले आहेत. विरोधी मत असलेले अनेकजण माझ्याशी शांतपणे बोलते झाले आहेत. 'माणूस परिवर्तनशील आहे, माणसात बदल होऊ शकतो, माणसातला माणूस जागा करणं हे माझं उद्दिष्ट असायला हवं' यावर गांधीजींचा विश्वास होता. या मूलभूत विश्वासाचा माझ्या व्यक्तिगत आयुष्यात आणि सामाजिक आयुष्यातही मला फार फायदा झाला आहे. 

त्यामुळे आपल्याला सगळ्या चर्चेअंतीदेखील जर गांधीजी 'टोकाचे आदर्शवादी' वाटत असतील तर ठीक आहे. तो मुद्दा बाजूला ठेवू. त्यांचं व्यापक तत्त्वज्ञान/विचार बाजूला ठेवू. पण त्यांनी ज्या मूल्यांचा आग्रह धरला ती मूल्यं - खरं बोलणं, दुसऱ्याचं ऐकून घेणं, संवाद करत राहणं, मुळात माणसांविषयी मनामध्ये प्रेम असणं - ही जरी आपण रोजच्या जगण्यात आचरणात आणू शकलो तरी पुष्कळ झालं.एवढी एक सोपी फूटपट्टी लावली आणि बाकी अवजड फूटपट्ट्या बाजूला ठेवल्या तरी हरकत नाही. इथे यशस्वी झालो की हळूहळू इतर आघाड्यांवरही यश येऊ शकेल! 

('संवाद' या अन्नपूर्णा परिवाराच्या मासिकात प्रकाशित) 


Wednesday, February 19, 2025

इतिहासाचं ओझं आणि वर्तमानाची फाळणी

इतिहासातील घडामोडींकडे आपण जेव्हा आज बघतो आणि आपल्याला त्या अन्याय्य वाटतात तेव्हा त्याबद्दल आपल्या मनात संताप खदखदत राहणं हे समजण्यासारखं आहे. इतिहासातील विध्वंस-अन्याय-शोषणाचं उत्तर जेव्हा शे-दोनशे वर्षांनी एखादं विध्वंसक कृत्य करून दिलं जातं तेव्हा त्याचं समर्थनही केलं जातं. बाबरी मशीद पाडणं बरोबर होतं असं मागे केव्हातरी बोलताना आरएसएसमधला एक मित्र म्हणाला होता. त्याबाबत तो अर्थातच पूर्णपणे ठाम होता - सगळेच हिंदुत्ववादी असतात तसा. आता याची एक 'फ्लिप साइड' अशी आहे की ज्या समूहातर्फे हे उत्तर दिलं जातं त्या समूहालाही जर त्या समूहाने केलेल्या इतिहासातील गैरकृत्यांबद्दल कुणी प्रत्युत्तर दिलं तर त्याला ते स्वीकारणं भाग पडतं. उदा. बाबरी मशीद पाडण्याचं जसं समर्थन होऊ शकतं तसं जर समजा मूळच्या बौद्धांनी (नवबौद्ध नव्हेत) पूर्वी जिथे बौद्ध लेणी होती असं एखादं मंदिर पाडलं आणि ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याचा आमचा मार्ग म्हणून त्याचं समर्थन केलं तर सवर्ण हिंदूंना ते मान्य करावं लागेल. आजच्या दलितांचा संदर्भ घेतला तर ज्या मंदिराच्या बांधकामात महारांचा बळी गेला आहे असं एखादं मंदिर पाडलं तर ते समर्थनीय होईल. किंवा आमच्यावरील ऐतिहासिक अन्यायाचं परिमार्जन करण्याची आमची प्रतीकात्मक कृती म्हणून एखादं मंदिर पाडलं असंही आर्ग्युमेंट होऊ शकेल. ही उदाहरणं म्हणून सांगितली आहेत. या आर्ग्युमेंट्सच्या योग्यायोग्यतेबाबत वेगळं बोलता येईलच. (पराकोटीचा अन्याय सहन करूनही दलितांकडून कधी विध्वंसक कृत्य झालेलं नाही हे इथे नोंदवावंच लागेल).  

आता या उदाहरणाला आणखी फाटे फुटतीलच. हिंदुत्ववादी म्हणतील की दलितांवर अन्याय झाला हे बरोबरच आहे; पण मुस्लिमांनी जशी हिंदूंची कत्तल केली तशी दलितांची कत्तल झालेली नाही. ('हिंदूंची कत्तल' याला केवळ धार्मिक आयाम नसून साम्राज्यविस्ताराचा आयाम आहे. शिवाय हिंदू राजेही आपसात लढले होतेच. पण सध्या तो मुद्दा बाजूला ठेवू).  त्यावर दलितांची एकगठ्ठा कत्तल झाली नसली तरी दलितांवरील सुट्या सुट्या हिंसेचा हिशेब काढला तर तो सामूहिक कत्तलीएवढाच होईल असं प्रत्युत्तर देता येईल. हिंदुत्ववादी म्हणतील की सवर्ण-दलित संघर्ष हा हिंदूंचा अंतर्गत मामला आहे; पण मुस्लिम हे समस्त हिंदूंचे शत्रू होते. त्यावर असं उत्तर देता येईल की अंतर्गत मामला हे सवर्णांना सोयीचं आर्ग्युमेंट आहे. आम्ही मुळात हिंदू धर्माचे शोषित आहोत. आम्हांला ज्या धर्मात मानाचं स्थानच नाही त्या धर्माच्या धुरीणांनी मुस्लिमांना टारगेट करायचं असेल तेव्हा 'अंतर्गत मामला' म्हणायचं आणि इतर वेळी वर्णश्रेष्ठत्व मिरवायचं हा दुटप्पीपणा आहे. आम्हांला मुळात हिंदू धर्माबद्दल काडीचंही प्रेम नाही. उलट इस्लाम स्वीकारल्यानंतर आमच्यातील अनेकांची स्थिती सुधारल्याचे दाखले देता येतील. (काही वर्षांपूर्वी याकूब मेमनच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी हा वादाचा मुद्दा झाला होता. बाबरीप्रमाणेच हे उदाहरण घेतलं तर याकूब मेमनचं समर्थन आणि नथुराम गोडसेचं समर्थन असे दोन मुद्दे घेता येतील आणि दोन्हीकडून वर केली आहेत त्या धर्तीची आर्ग्युमेंट्स करता येतील).

वरील चर्चा ही मुद्द्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने केली आहे. एखाद्या वादाकडे, वादग्रस्त घटनेकडे बघताना काय प्रकारची आर्ग्युमेंट्स येऊ शकतात याची झलक दाखवण्यासाठी. आर्ग्युमेंट्स, युक्तिवाद ही अनेक बाजूंनी लढवता येण्याजोगी आणि समर्थन करता येण्याजोगी बाब असते. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या दृष्टिकोनाला घट्ट धरून आर्ग्युमेंट्स करतो तेव्हा त्याचा प्रतिवाद होऊ शकतो आणि तोही तितकाच कन्व्हिन्सिंग असू शकतो हे लक्षात घेणं आवश्यक असतं. अर्थात आपल्याला वैचारिक पातळीवर पुढे जायचं असेल तर. अन्यथा आपलं आर्ग्युमेंट लटकं पडतंय याची स्पष्ट जाणीव झालेली असतानाही ते पुढे रेटत राहिल्याची अनेक उदाहरणं पदोपदी दिसतातच.

इतिहासातील घडामोडी, अन्याय आणि आपलं आजचं वर्तमान यात आपल्याकडे इतिहास बरेचदा जिंकतो याचं एक कारण आपण प्रत्यक्षात आपला पायाखालच्या, आजच्या जमिनीवर उभे असलो तरी मनातून आपण 'इतिहासाच्या जमिनी'वर उभे आहोत हे आहे. एका अर्थी आपण इतिहासाचे गुलाम आहोत. कुठल्याही कट्टर धार्मिक विचारसरणीला तर इतिहासाला रजा देणं कधीच परवडत नाही. कारण तसं केलं तर त्यांच्या तथाकथित 'वैचारिक पाया'खालची जमीनच हिसकावली जाते! त्यामुळे पंधराव्या-सोळाव्या शतकात जे झालं त्याच्या आधारे आज एकविसाव्या शतकात आपण काही विचार-कृती करायला नको हा विचार त्यांना पटू शकत नाही. त्यांचं मानसच इतिहासाच्या मोल्डमध्ये घडवलं गेलेलं असतं. अशा मानसिकेतला कसं सामोरं जायचं हा एक मोठाच प्रश्न असतो. (इतिहास हा मुद्दा महत्त्वाचा मानायचाच असेल तर 'हिंदू-मुस्लिम संबंध : तेव्हा आणि आता' तसंच 'सवर्ण-दलित संबंध : तेव्हा आणि आता' असे दोन विषय उभे राहू शकतात).

यानंतर आता याच विषयाशी जोडलेली पण थोडी वेगळी चर्चा करू. काही हिंदी चित्रपटांच्या संदर्भाने आहे. एका सांस्कृतिक अवकाशात हिंदू-मुस्लिम संबंधांबद्दल काही आश्वासक चित्रण होत होतं हे सामाजिक चर्चाविश्वासाठी मार्गदर्शक ठरू शकेल.    

'आमिर' नावाचा एक फार प्रभावी चित्रपट २००८ मध्ये येऊन गेला. (दिग्दर्शक - राजकुमार गुप्ता). खिळवून ठेवणारी कथा, अमित त्रिवेदीचं अफलातून संगीत, उत्तम सिनेमॅटोग्राफी, अवाक करणारा शेवट! मुंबई एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या एका इस्लामिक दहशतवादी गटाचा सूत्रधार (गजराज राव) एका तरुण डॉक्टरला (राजीव खंडेलवाल) त्याच्याकरवी बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी वेठीला धरतो. त्याच्या कुटुंबीयांना ओलीस ठेवलं जातं. हा डॉक्टरही मुस्लिम आहे. चित्रपट अवश्य बघावा असा आहे.  

चित्रपट पाहिल्यानंतर माझ्या एका सहकाऱ्याशी त्याबाबत चर्चा झाली होती. दहशतवादी गटाचा सूत्रधार त्या तरुण डॉक्टरला मुंबईत डोंगरीमध्ये बरंच फिरवतो. तिथले काही व्यावसायिक (हॉटेलचालक, दुकानदार, एसटीडी बूथचालक इ.) कटात सामील असतात. त्यातल्या प्रत्येकाकडून या तरुणाला पुढच्या सूचना मिळत जातात असं चित्रण होतं. यावर बोलताना माझा सहकारी म्हणाला की चित्रपटात सर्वसामान्य मुस्लिम माणूस दहशतवादी कटात सामील आहे असं दाखवलं आहे ते काही बरोबर नाही. त्यावर माझं असं म्हणणं होतं की डोंगरीसारख्या भागात बहुसंख्य मुस्लिम व्यावसायिक असणं स्वाभाविकच आहे आणि दुसरं म्हणजे एखाद्या दहशतवादी कृत्यामागे मोठं प्लॅनिंग असणार हेही सरळ आहे. त्यात सामील होणारे आपणहून सामील झाले की दबावाखाली सामील झाले हाही एक प्रश्न आहेच. पण मुस्लिम समुदायातील लोक त्यात सामील आहेत या चित्रणात मला काही गैर वाटलं नाही. मुख्य म्हणजे सारासार विचार करणारा तो विवेकी मुस्लिम डॉक्टर हा कथानायक आहे हे महत्त्वाचं आहे.

मुळात माझ्या सहकाऱ्याने हा मुद्दा मांडेपर्यंत माझ्या डोक्यात तसं काही आलंच नव्हतं. पण नंतर त्याच्या म्हणण्यावर विचार करूनही मला ते फारसं पटेना. या गोष्टीला आता बरीच वर्षं झाली. दोन हजारच्या दशकापर्यंत आमिर, रंग दे बसंती, वेन्सडे आणि इतरही काही थेट सामाजिक-राजकीय भाष्य करणारे चित्रपट निर्माण होत होते. 'संरक्षण मंत्रालयातील भ्रष्टाचार' हा मुद्दा घेतलेल्या 'रंग दे बसंती'ला तर अनेक पारितोषिके मिळाली. राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. (आज हे अशक्यप्राय वाटतं!) या चित्रपटात एक हिंदुत्ववादी एका मुस्लिमाशी हळूहळू मैत्री करतो हेही प्रभावीपणे दाखवलं गेलं होतं. ज्या नसीरुद्दीन शहाला हिंदुत्ववादी आज सतत टारगेट करतात त्याने 'वेन्सडे'मध्ये इस्लामिक दहशतवादामुळे पेटून उठलेल्या सामान्य माणसाची भूमिका केली होती. इस्लामिक दहशतवादाबद्दल बोलताना वेन्सडे, सरफरोशसारख्या सिनेमात भारतीय मुस्लिम पोलीस अधिकारी (भूमिकेत अनुक्रमे जिमी शेरगिल, मुकेश ऋषी) दाखवले गेले होते. दहशतवादी मुस्लिम असले तरी त्याला विरोध करणारे मुस्लिमही आहेत, ते भारताच्या पोलीस खात्यात आहेत हे दाखवलं जात होतं. खरं तर बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये मुस्लिम व्यक्तिरेखांना आवर्जून स्थान दिलं जात होतं असं दिसतं. (आज मात्र स्थिती पालटली आहे. मुस्लिमांचं दानवीकरण हा बऱ्याच चित्रपटांचा अजेंडा आहे). मुस्लिमांना भारतात आपलं समजलं जात नाही या पार्श्वभूमीवर त्यांना सामावून घ्यायच्या दृष्टीने हे होत होतं. तसा स्पष्ट उल्लेखही व्हायचा. दुसरीकडे 'क्रांतिवीर'सारख्या चित्रपटात वस्तीतला एक मुस्लिम मनुष्य जेव्हा बहकून हिंदूंविरुद्ध भडकाऊ बोलू लागतो तेव्हा नाना पाटेकर त्याच्या कानफटात मारून (आणि अर्थातच पल्लेदार डायलॉग ऐकवून) भानावर आणतो. 'सरफरोश'मधला मुकेश ऋषी आणि आमिर खानचा संवादही अनेकांना आठवत असेल. २०१९ मध्ये, म्हणजे अगदी अलीकडे आलेल्या 'बाटला हाउस'मध्ये जॉन अब्राहमने साकारलेला पोलीस अधिकारी मीडियाशी बोलताना म्हणतो की इथे काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने आम्ही आलो आहोत. यात मुस्लिमांना टारगेट करण्याचा प्रश्न कुठे येतो?

ही उदाहरणं द्यायचं कारण असं की चित्रपट निर्माण करणारे आणि ते बघणारे दोघांचीही दृष्टी तुलनेने अधिक स्वच्छ होती असं वाटतं. आणि बहुतांश समाजमानस प्रत्यक्षातही असंच होतं असं वाटतं. किमान आज जो एकारलेपणा आला आहे तो नव्हता. मुस्लिमांचा अजिबात द्वेष नाही, मुस्लिमांची भारतात होणारी कुचंबणा समजते आहे, त्याबाबत त्यांना पूर्ण पाठिंबा आहे हे एकीकडे असतानाच मुस्लिमांबद्दल 'ब्लॅंकेट' स्वरूपातील अनाठायी सहानुभूतीही नाही - विशेषतः इस्लामिक दहशतवादाचा स्पष्ट निषेध आहे - अशी बहुस्तरीय आणि म्हणूनच सुस्पष्ट भूमिका आपण घेतोय का हे तपासून पाहावं लागेल. वर उल्लेख केलेल्या चित्रपटांमधून, प्रसंगांमधून हे पाहायला मिळतं; पण वास्तवात मात्र दोन टोकं तयार होतात. एका गटाने मुस्लिमांना 'संपूर्ण झिडकारायचं' आणि एका गटाने त्यांना 'संपूर्ण स्वीकारायचं' असं काही होतंय का असं वाटतं. 

सवर्ण-दलित-मुस्लिम हे कोन आणि धर्मनिरपेक्ष व हिंदुत्ववादी हे दोन प्रवाह एकमेकात गुंतलेले आहेत. या सगळ्याला इतिहासाचं विशिष्ट पद्धतीने करून दिलं जाणारं आकलन, अनुभव व जडणघडण, मुख्य म्हणजे राजकारण आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यातून निर्माण होणारी मानसिकता, विचारव्यूह, एकारलेपणा यांचे आयाम आहेत. यातले धागे सुटे करून त्यांच्याविषयी बोलत राहणं आवश्यक आहे असं वाटतं. आजच्या भारतात बहुसंख्याकवाद ज्या प्रमाणात आणि ज्या तीव्रतेने पसरला आहे आणि 'धार्मिक ओळख' विवेकाला ज्या प्रकारे गिळंकृत करू पाहते आहे त्या पार्श्वभूमीवर हे करणं फारच आवश्यक आहे. हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी दोन्ही गटातील समंजस व्यक्तींना एकत्र येऊन काही करता येईल का याचाही विचार होऊ शकतो. निदान चर्चेच्या काही फेऱ्यांनंतर आपल्यात काही प्रमाणात 'अखंडता' निर्माण होऊ शकते की आधीपासून झालेली 'फाळणी'च अटळ आहे हे तरी लक्षात येईल!

(फेसबुक पोस्ट्सवरून संकलित)  

Monday, February 17, 2025

चार शब्द

१) संवेदना 

'अमेरिकन फिक्शन' हा २०२३ सालचा चित्रपट 'मॉँक' नावाच्या एका आफ्रो-अमेरिकन लेखकाभोवती फिरतो. अमेरिकन कृष्णवर्णीय लेखकांचं साहित्य हे बहुतांशी त्यांच्या जगण्याविषयी, वांशिक भेदभावामुळे त्यांना सोसाव्या लागलेल्या अन्यायाविषयी असतं; पण त्यापलीकडे जाऊन सांगावं असं इतरही बरंच कृष्णवर्णनीय लेखकांकडे असू शकतं, ते त्यांनी सांगावं, आपल्या लेखकीय प्रतिभेला न्याय देत उत्तम कथनात्म साहित्याची निर्मिती करावी अशी त्याची अपेक्षा असते. त्यामुळे लेखकांनी त्यांच्या दुःखाच्या कहाण्या सांगत बसणं हे त्याला पटत नाही. याबाबत त्याचा एका लोकप्रिय कृष्णवर्णीय लेखिकेशी झालेला संवादही ऐकण्यासारखा आहे. त्याचा एक मुख्य आक्षेप हाही असतो की प्रकाशकांना कृष्णवर्णीयांचं दुःख जगवत ठेवण्यात व्यावसायिक इंटरेस्ट आहे. कारण ते विकलं जातं. कृष्णवर्णीय लेखकाने तेवढंच करावं अशी त्यांची अपेक्षा असते. 

वांशिक भेदभाव आहे आणि त्याचे चटके कृष्णवर्णीयांना बसले आहेत, आजही बसत आहेत हे तो नाकारत नाही. चित्रपटात त्याला स्वतःला आलेला एक अनुभवही दाखवला आहे. तरीही त्याला लेखक म्हणून स्वतःचं अस्तित्व केवळ आपल्या कृष्णवर्णीय असण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही आहे. हा चित्रपट मला अतिशय रोचक वाटला. आपल्याकडेही दलित साहित्याबद्दल अशा प्रकारची चर्चा झालेली आहे. या चित्रपटाबद्दल आणि त्यातील मांडणीबाबत स्वतंत्रपणे बोलता येईल. पण मला ते इथे करायचं नाही. हा चित्रपट आठवला त्याचं कारण वेगळं आहे. 

अन्याय-उपेक्षा, त्याबद्दल संवेदनशील असणं-नसणं, 'व्हिक्टिमायझेशन'मध्ये 'रमणं' आणि त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणं ही चित्रपटातली मध्यवर्ती चर्चा आहे. ती बघत असताना आपल्याला संवेदनशील असण्याबाबत काही प्रश्न पडत जातात. संवेदनशील मनाला काही गोष्टी अगदी स्पष्टपणे स्पर्श करतात, त्यातून त्या मनात अस्वस्थता-दुःख निर्माण होतं हे बरोबर. मात्र संवेदनशीलता आणि संवेदनशीलतेच्या पलीकडे जाणारी वस्तुनिष्ठता या दोन्हीच्या टोकाला जाणं शक्य असलं तरी ज्याला कदाचित विवेकी/सम्यक/रॅशनल विश्लेषण म्हणता येईल असा अवकाश या दोन्हीच्यामध्ये आहे असं दिसतं. मी आसपासचं दारिद्र्य बघतो आणि त्यामुळे दुःखी होतो ही एक चांगली सुरुवात आहे, ते मनुष्यत्वाचं चांगलं लक्षण आहे. यातला तात्त्विक भाग असा की माझी संवेदनशीलता मी लादावी की नाही? याबाबत थोडं अधिक बोलूया. 

२) सम्यकता 

पुण्यातील बुधवार पेठेत 'सहेली' या संस्थेमार्फत वेश्यागृहांना भेट देताना एक विशेष अनुभव आला होता. एका वेश्यागृहाच्या मालकिणीशी - जिला घरवाली म्हणतात - बोलताना 'सहेली'ची कार्यकर्ती म्हणाली की आम्ही अमुक दिवशी मेडिकल चेक-अप ठेवला होता. तुम्हांला कळवलं होतं. पण तुम्ही कुणीच आला नाहीत. का नाही आलात? त्यावर ती घरवाली काहीशा फटकळपणे उत्तरली - 'तुम्ही इकडे यायचं की. आम्ही कशाला तिकडे येऊ?'  तिच्या उत्तरात 'गरज तुम्हाला आहे - आम्हांला नाही' असं अभिप्रेत होतं. 

आता तिच्या या उत्तराला अनेक कंगोरे आहेत. ते अगदी बरोबर उत्तर आहे असं म्हणता येत नाही. पण त्यातला 'गर्भित संदेश' मला विचार करण्यासारखा वाटला. आणखी एक अनुभव सांगतो. 

माध्यमिक शाळेत असतानाचा प्रसंग. मी गिरणीतून पीठ घेऊन घरी येत होतो. काहीतरी झालं आणि हातातला डबा खाली पडला. पीठ रस्त्यावर पडलं. आता नीट आठवत नाही; पण बहुधा मी वरवरचं थोडं पीठ घेतलं आणि बाकी तिथेच टाकून दिलं आणि घरी आलो. थोड्या वेळाने पुन्हा बाहेर पडलो आणि त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर एक मनुष्य ते पडलेलं पीठ गोळा करत होता. ते दृश्य पुढे अनेक वर्ष लक्षात राहिलं. आजही त्याची अंधुक इमेज डोळ्यापुढे आहे. 

पीठ गोळा करणारा तो मनुष्य स्वतःच्या मूर्खपणाने गरीब झाला होता असं एक अर्थशास्त्रीय विश्लेषण कुणी करू शकेल. तसा तो झाला होता का याची माहिती माझ्याकडे नाही. आणि जरी तो तसा गरीब झाला असेल तरी त्याच्या मूर्खपणाची शिक्षा अशी असावी का हा असा प्रश्न उरतोच. भारतात अनेक लोक ड्रेनेजमध्ये उतरल्याने मेले आहेत. हे सगळे लोक त्यांच्या मूर्खपणामुळे गरीब राहिले (आणि मेले) असंही आर्ग्युमेंट करता येईल. सिग्नलला, स्टेशनवर लोक भीक मागत असतात. हे सगळे लोक कामचुकार आहेत, यांना काम करायला नको, हे मुद्दाम मुलांना भीक मागायला लावतात इ. युक्तिवाद ऐकत मी मोठा झालो. या युक्तिवादात कदाचित काही प्रमाणात तथ्य असेलही; पण हे युक्तिवाद करणाऱ्यांनी किती भिकाऱ्यांवर रीसर्च करून हा निष्कर्ष काढला आहे हे कधी कळलं नाही. समजा भारतात लाखभर भिकारी असतील (आकडा केवळ उदाहरण म्हणून घेतला आहे) तर त्यातील किती आपल्या मूर्खपणामुळे भिकेला लागले आणि कितीजण भिकेला लावले गेले याची काही आकडेवारी यांनी गोळा केली आहे का हे कळायला मार्ग नव्हता.   

एकदा लोहगड ट्रेकला गेलो होतो. मळवलीला चहा-वडापावसाठी थांबलो होतो. तिथे एक बाई आली. घुटमळत उभी होती. चहावाल्याने विचारलं 'काय पाहिजे?' ती नीट शब्दात 'भीक' असं म्हणाली. बाजूलाच उभ्या असलेल्या मला फार अपराधी वाटलं. 'तार्किक' विचार केला तर मला अपराधी वाटायची काय गरज असं कुणी म्हणेल. पण काहीजणांना भीक मागून जगावं लागतं आणि मला तसं जगावं लागत नाही यात माझा काही म्हणजे काहीच दोष नाही यावर मला लगेच निर्णय देता येत नाही खरा. म्हणजे मी दोषी नसेनही; पण ते सिद्ध कसं करायचं मला कळत नाही. 

या अनुभवांमुळे जाणवलेली अस्वस्थता नमूद केल्यानंतर आता वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करू. 

रस्त्यावर पडलेलं पीठ उचलणारा मनुष्य दुःखात आहे हे माझं गृहीतक होतं का? आता त्याची त्याच्या जगण्याबद्दल काही तक्रार नाही असं असेल तर मग माझ्या वाटण्याला किंवा काही संस्था संघटनांनी त्याच्या प्रश्नांवर काम करण्याला काही अर्थ उरतो का? तात्त्विक मुद्दा म्हणून हा कदाचित मान्य होण्यासारखा असला तरी पुन्हा हाही ॲबसोल्यूट पातळीवरचा विचार झाला. (अंबानीवर कशाला जळता? तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल या विचारासारखाच). माणसाचं जगणं कस असावं यावरच जर आपलं - ह्यूमॅनिटीचं - एकमत नसेल तर मग पुढे जाण्यात काही अर्थ नाही. तो मजूर आजही कदाचित खोल दुःखात बुडालेला नसेल. पण त्याला जर पुरेसं पीठ विकत घेता आलं, दोन वेळा चांगलं आणि पोषक अन्न मिळालं, राहण्यासाठी त्याला पुरेशी जागा मिळाली तर तो आज आहे त्यापेक्षा नक्कीच जास्त आनंदी होईल. 

३) सहकार्य 

पुढचा प्रश्न असा की 'असं व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का?' असं विचारलं तर कुठल्याही 'इझम'चे पाठीराखे किंवा सामाजिक-आर्थिक विषयांचा फार अभ्यास नसणारे पण सारासार विवेक जागा असणारे कुणी 'नाही' म्हणणार नाहीत. फक्त हे कसं साध्य होईल यावर मतभेद होतील. संपत्ती काही मूठभरांकडे एकवटलेली असताना तो मजूर एक किमान आवश्यक 'क्वालिटी ऑफ लाईफ' असलेलं जगणं कसं जगू शकेल असा प्रश्न काहीजणांना पडेल तर काहीजण हा 'मागणी-पुरवठ्याचा' प्रश्न आहे - मजूर जर संख्येने प्रचंड असतील तर ‘लेबर कॉस्ट’ कमीच राहणार आहे. जर त्यांची संख्या कमी झाली तर त्यांचं उत्पन्न वाढेल असा युक्तिवाद करतील. 

संपत्ती मूठभरांच्या हातात एकवटलेली आहे या विधानाचीही थोडी फोड करावी लागेल असं मला वाटतं. संपत्ती मोठ्या प्रमाणात वर एकवटलेली आहे हे बरोबरच आहे. अंबानी-अदानीसारख्यांकडे पाहिलं की ते कळतंच. पण तिथून पुढे गेलं की जे इतर मोठे-मध्यम उद्योगपती-भांडवलदार दिसतील त्यांच्याही हातात ती आहे असं म्हणता येईल. पुढे जात आयटी, बँकिंग आणि इतर क्षेत्रात काम करणारे नोकरदार-व्यावसायिक पाहिले तर त्यांच्याकडेही काही संपत्ती एकवटली आहे असं म्हणता येतं. अंबानी-अदानीकडे एका व्यक्तीच्या हातात, आणि तिथून खाली आलं की एकेका इंडस्ट्रीच्या (म्हणजे तिथे काम करणाऱ्या अनेकांच्या) हातात संपत्ती एकवटली आहे असं दिसेल. मुळात संपत्ती जर कायदेशीर मार्गाने कमावली असेल तर कुणाकडे किती संपत्ती असावी यावर काही निर्बंध नाही. पण कायदेशीर मार्गांना डावलून, उद्योगपतींना फेवरेबेल धोरणं राबवून संपत्ती काहीजणांकडेच वळवली जाते यावर आक्षेप आहे आणि तो योग्य आहे.

'क्वालिटी ऑफ लाइफ'चा प्रश्न लोकसंख्येशी निगडीत आहे की लोकसंख्येला पूरक धोरणं न राबवता उद्योगांना पूरक धोरणं राबवण्याशी निगडीत आहे, बाजारात निकोप स्पर्धा हवी असं म्हणत प्रत्यक्षात त्या स्पर्धेत भाग घेणं शक्यच होणार नाही अशी स्थिती निर्माण करण्याशी आहे, 'ठेविले अनंते' म्हणत उद्यमी मानसिकताच नसण्याशी आहे की आणखी संबंधित घटकांशी आहे यावर बोलताना कुठल्या एकाच बाजूला जबाबदार धरता येईल असं मला वाटत नाही. पण भांडवली व्यवस्थेनं उत्तम जम बसवला असताना लोकप्रिय 'ट्रिकल डाउन' सिद्धांतानुसार बघितलं तर तळातल्या वर्गात फार लक्षणीय फरक पडला आहे असं दिसत नाही. असंघटित क्षेत्रातील कामगार (असंघटित क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात असणं) हा त्यासंदर्भातला एक मोठा प्रश्न असावा. 

या संदर्भात एका निबंधाचा उल्लेख करावासा वाटतो. प्रा. वि. म. दांडेकर आणि प्रा. नीलकंठ रथ यांचा 'पॉव्हर्टी इन इंडिया' हा निबंध 'इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली'च्या अंकात १९७१ च्या सुरुवातीला प्रकाशित झाला होता. पुढे दांडेकरांनी या निबंधाचा मराठी संक्षेप केला तो 'माणूस' च्या ३१ मार्च १९७१ च्या अंकात प्रकाशित झाला. पुढे पन्नास वर्षांनी 'माणूस'च्या त्या अंकाचं पुनर्प्रकाशन मनोविकास प्रकाशनाने केलं. दिवंगत लेखक-अभ्यासक नंदा खरे यांनी या पुस्तकाचं संकलन केलं होतं. 'भारतातील गरिबी' या शीर्षकाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या अखेरीस नंदा खरे यांनी 'भविष्य दरिद्री असायला नको!' असा एक लेख लिहिला आहे. त्यात 'लोकसंख्या आणि दबाव' असा एक विभाग आहे. त्यातील सुरुवातीचा उतारा असा - 

१९७९ मध्ये सुमारे ५४.१ कोटी भारतीय होते. आज २०२१ साली जनगणना व्हायला हवी होती, पण ती कोव्हिडमुळे टाळली गेली आहे. तशीही काटेकोर अंकबद्ध माहिती सरकारांना महत्त्वाची वाटत नाही आहे. पण २००१ (१०१.९ कोटी), २०११ (११८.६ कोटी) हे आकडे पाहता आजची लोकसंख्या १३७ कोटींजवळ असावी. म्हणजे आज 'भारतातील गरिबी' काळाच्या (१९७१) अडीचपट भारतीय आहेत! त्यांना सांभाळणं उपलब्ध सोई-सुविधांवर, नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड दबाव आणतं आहे.

शिडाच्या जहाजांच्या प्रवासाबद्दलच्या परिभाषेत एक 'वाऱ्याच्या फार जवळ जाणं', ‘सेलिंग क्लोज टू द विंड’ असा शब्दप्रयोग केला जातो. सुरक्षित प्रवासासाठी सर्वच्या सर्व उपलब्ध वारा शिडांमध्ये 'भरून' घेणं धोक्याचं ठरू शकते. शहाणी पद्धत अशी की वेग जरा कमी मिळाला तरी जहाज वाऱ्याशी थोडाफार कोन करून हाकावं. तसं न केल्यास जराशाही वाऱ्यातल्या फरकाने जहाज उलटू शकतं! माझ्या मते आपण आज भारतातच नव्हे तर जगभरात, वाऱ्याच्या नको तितक्या जवळ जाऊन काहीतरी अडाणी वेग गाठू पाहतो आहोत आणि त्याला 'विकास' म्हणतो आहोत.

माझ्या मते आज गरज विकासाची नाही, तर नैसर्गिक संसाधनांच्या शहाण्या वापरातून पूर्ण समाजाला दारिद्र्य रेषेच्या वर उचलण्याची आहे. त्यासाठी समाजाच्या पॉवरफुल, पॉवरबाज वर्गाला काही त्याग करावा लागेल. पण तो करायचं टाळल्यास जहाज वाऱ्याच्या फार जवळ जाऊन पलटी मारू शकते!

दांडेकर-रथ यांनीही आपल्या निबंधामध्ये 'बेकारीनिवारणाकरता लागणारा जादा पैसा कुठून आणावयाचा हा प्रश्न पुनःपुनः कितीदाही विचारला तरी त्याला एकच उत्तर आहे ते असे की ज्यांच्यापाशी पैसा आहे त्यांच्यापासून तो घेतला पाहिजे' असं म्हटलं आहे. त्यासाठी सर्वात श्रीमंत ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात फक्त १५ टक्के कपात केली आणि त्या खालोखाल श्रीमंत असलेल्या ५ टक्के लोकांनी आपल्या खर्चात ७.५ टक्के कपात केली तरी आवश्यक तो पैसा उभा राहू शकेल असं ते लिहितात. (दांडेकर-रथ यांच्या गणितानुसार हा आकडा आठशे कोटी इतका होता).    

हे पुस्तक अवश्य पाहावं. मला यातला एक 'टेक-अवे' असा दिसतो की पैसा या वस्तूकडे सर्वस्वी, पूर्णांशाने 'न्याय्य, राइटफुल रिवॉर्ड' म्हणून न पाहता 'इंस्ट्रूमेंट ऑफ सोशल बेटरमेंट' म्हणून पाहता आलं तर फरक पडू शकेल.      

४) न्याय 

'जॉली एलएलबी' चित्रपटाच्या अखेरीस वकील (अर्शद वारसी) कोर्टात जे भाषण करतो ते फार प्रभावी आणि नेमकं आहे. रस्त्यावर झोपणाऱ्या गरीब लोकांबद्दल बोलताना तो म्हणतो 'कहाँ से आते है ये लोग? इनके पास ना रहने को घर है, ना रोजगार है, ना पैसा है...फिर क्यूँ चले आते है हमारे खूबसूरत शहरों की खूबसूरती पर बट्टा लगाने? लेकिन इन भूखे-नंगे भिकारियों के पास भी एक चीज का हक है जनाब...और वो है जस्टिस. और ये हक उन्हें देता है हमारा संविधान'.  

आपण जेव्हा आर्थिक विषमता, विकास आणि विस्थापन किंवा तत्संबंधी विषयांवर विचार करतो तेव्हा मला या 'जस्टिस'मध्ये एक उत्तर सापडतं. प्रश्न गरीब-श्रीमंत असण्यापेक्षा न्यायाचा जास्त आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नाबद्दल घमासान चर्चा सुरू होती तेव्हा ती 'कुणी जास्त पैसे कमावले आणि उधळले म्हणून काय झालं - त्यांचे पैसे आहेत त्यामुळे तो त्यांचा हक्क आहे', ‘तुम्हीही लग्नात पैसे उडवताच की’, 'पण हे पैशाचं विकृत प्रदर्शन आहे' ‘अशी वेगवेगळ्या दिशांना ताणली जात होती. समाजमाध्यमं गोष्टी ताणण्याकरताच असतात हे खरं असलं तरी असं वाटलं की अशी चर्चा ताणण्यापेक्षा ‘जे सगळं चालू आहे, किंवा आजवर होत आलं आहे ते न्यायोचित आहे का?’ यावर चर्चा झाली तर ती कदाचित जास्त फलदायी होईल. (‘सामाजिक न्याय’ हा शब्द आपल्या सार्वजनिक चर्चाविश्वात – लोकांच्या दैनंदिन चर्चेतही यावा).   

दुसरं म्हणजे जगणं अर्थकारणाशी निगडीत असलं तरी ‘माणूस असण्याचा गाभा’ अर्थशास्त्रात लपलेला नाही. त्यामुळे अर्थशास्त्रीय खुलासे ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ उत्तरं देतील कदाचित; पण त्यातून आपण ‘माणूस’ आहोत म्हणजे काय आहोत, माणूस असण्याचा अर्थ काय याचं उत्तर मिळणार नाही. जर सगळं फक्त अर्थशास्त्रापुरतं, कोरड्या हिशेबापुरतं मर्यादित असेल तर मग माणसाला कधीच कुठल्या गोष्टीचं वाईट वाटण्याचं कारण नाही. उद्या आपल्या डोळ्यासमोर एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केली तरी त्याचं अर्थशास्त्रीय उत्तर देता येईलच! 

आरती प्रभू 'कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे' म्हणून गेले आहेत. (बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून, देअर इज अ क्राइम हे मारियो पुझोचं विधानही याच धर्तीचं आहे). ही केवळ कवीकल्पना आहे की वास्तवात खरंच तसं होतं आहे हे तपासण्याची जबाबदारी आपली आहे. 'तुम्ही मेहनत करा, तुम्हीही श्रीमंत व्हाल' हे विधान 'ॲबसोल्यूट' पातळीवर खरं असेलही; पण आपण त्या पातळीवर जगतो का? तर नाही. आपण 'रिलेटिव्ह' पातळीवरच जगत असतो. त्यामुळे उत्पन्नातील विषमता ही नैसर्गिक न्यायानेच तयार होत असते असं म्हणता येत नाही.   

शाहरुख खानचं एक प्रसिद्ध विधान आहे - आधी मजबूत पैसा कमवा आणि मग फिलॉसॉफर व्हा. हे मान्य केलं तरी मजबूत पैसा कमवून झाला तरी लोक फिलॉसॉफर होताना फारसे दिसत नाहीत. चॅरिटी करतात; पण मूलभूत प्रश्न विचारताना फारसे दिसत नाहीत. बहुतेक वेळ ऑलरेडी मजबूत झालेल्या पैशाला आणखी मजबूत करताना दिसतात. पैसा कमावणं, तो खर्च करणं, लौकिक यश मिळवण्यात साफल्य वाटणं यात काही गैर नाही. बट देअर इज मोअर टू अस – ह्यूमन्स. आपण ‘माणूस’ म्हणून तरी गुंतागुंतीच्या प्रश्नांना सोपी उत्तरं देऊन मोकळं होऊ नये. मुळात योग्य प्रश्न विचारणं हेच ‘माणसा’च्या बुद्धीपुढचं एक आव्हान आहे.  

#let'snotconclude 

#let'skeepthinking 

(फेसबुक पोस्ट्सवरून संकलित)  


Wednesday, February 12, 2025

उत्क्रांतीच्या ‘सांस्कृतिक राजकारणा’ची गरज

१२ फेब्रुवारी १८०९ हा चार्ल्स डार्विनचा जन्मदिवस. त्याच्या जन्माला आता दोनशेहून अधिक वर्षं उलटून गेली. वयाच्या पन्नासाव्या वर्षी (१८५९ साली) त्याचा 'ऑन द ओरिजिन ऑफ द श्पीसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' अशा लांबलचक नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला. 'आपण कुठून आलो' या माणसाला पडलेल्या सनातन प्रश्नाच्या शोधात माणसाला मिळालेलं उत्तर 'आपल्याला आणि या पृथ्वीवरच्या एकूणच सगळ्या पसाऱ्याला निर्माण करणारा सर्वशक्तीमान ईश्वर' असं होतं. हा ईश्वर एक किंवा अनेक होते. त्याकरता कुठल्या पुराव्याची आवश्यकता नव्हती. जे परंपरेने आपल्याला सांगितलं आहे, जे आपल्या धर्मग्रंथात लिहून ठेवलं आहे ते चुकीचं कसं असेल हा विचार प्रबळ होता. आजही आहे. डार्विनच्या ग्रंथाने या सनातन प्रश्नाला वेगळी दिशा दिली हे खरं असलं तरी आजही एका मोठ्या मानवसमूहाची ईश्वरावरची श्रद्धा, धर्मश्रद्धा अजिबात ढळलेली नाही. 'क्रिएशनिस्ट (निर्मितीवादी) वि. इव्होल्यूशनिस्ट (उत्क्रांतीवादी)' असा संघर्ष आजही सुरूच आहे. देव आहे-नाही, श्रद्धा असावी-नसावी, असल्यास तिची अंधश्रद्धा कशी होऊ नये, श्रद्धा-अंधश्रद्धा यातली सीमारेषा कशी ओळखायची, सगळे तर्क पटूनही जर आपल्या आवडीच्या देवाच्या मूर्तीपुढे लीन व्हावंसं वाटत असेल तर त्याचा खुलासा कसा करायचा या आणि संबंधित मुद्द्यांवर हिरीरीने नित्य चर्चा होत असते. 

दोन उदाहरणं द्यायचा मोह आवरत नाही. पहिलं उदाहरण 'बिग बँग थिअरी' या अतिशय लोकप्रिय टीव्ही मालिकेतलं. विज्ञान आणि तर्क हे जगण्याचे आधार असलेला, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा अभ्यासक, बुद्धिमान आणि तऱ्हेवाईक, आपल्या विक्षिप्त वर्तनामुळे इतरांसाठी डोकेदुखी ठरणारा शेल्डन कूपर आणि येशू ख्रिस्तावर अतूट श्रद्धा असलेली, धार्मिक वृत्तीची त्याची आई मेरी कूपर यांच्यात वेळोवेळी झडणारे वाद हे आस्तिक-नास्तिक, सश्रद्ध-अश्रद्ध यांच्यात असलेल्या दृष्टीकोनातील, विचारातील फरकांचं एक चांगलं उदाहरण आहे. एका प्रसंगात आई म्हणते, “ठीक आहे. प्रत्येकाला त्याचं मत असण्याचा अधिकार आहे”. त्यावर शेल्डन उसळून म्हणतो, “मत? उत्क्रांती हे 'मत' नाही. ती वस्तुस्थिती आहे”. त्यावर आई उत्तरते, “आणि हे तुझं मत आहे!”

दुसरं उदाहरण शेल्डनच्या आईची भारतीय आवृत्ती असलेल्या माझ्याच एका मावशीचं. 'डार्विनने उत्क्रांतीचा 'शोध' लावला हे ठीक; पण तो लावण्याची बुद्धी त्याला कुणी दिली?' असं एकदा ती मला म्हणाली होती. तिच्या या प्रश्नानंतर मी चर्चा आवरती घेतली! (तिच्या दृष्टीने हाच मुद्दा न्यूटनच्या गुरूत्वाकर्षणाच्या शोधाला आणि इतर कुठल्याही वैज्ञानिक शोधाला लागू होईल!) 

वरील उदाहरणं प्रातिनिधिक म्हणावीत अशी आहेत. त्यात उपस्थित झालेल्या मुद्द्यांवर/आक्षेपांवर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की बहुसंख्य लोकांच्या दृष्टीने मुख्य मुद्दा 'संपूर्ण, सुसूत्र खुलाशा'चा आहे. म्हणजे असं की हे जग, आपण सजीव ही ईश्वराची निर्मिती आहे हे सुलभ स्पष्टीकरण मान्य करण्यामागे 'संशोधकीय आळस' आहे हे मान्य केलं तरी दुसऱ्या बाजूने पाहता, सर्व सजीव उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून लक्षावधी वर्षांचा प्रवास करत विशिष्ट शारीरिक-मानसिक अवस्थेत पोचले याचंही समजेल असं स्पष्टीकरण सर्वसामान्य लोकांपुढे सातत्याने आणलं गेलेलं नाही. (यातले 'समजेल असं' आणि 'सातत्य' हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत). आपण जर धर्मसंस्थेचा विचार केला तर तिने गेली हजारो वर्षं आपल्या 'सुलभ स्पष्टीकरणां'नी लोकांची मनं काबीज केली आहेत. (आजची परिस्थिती तर कमालीची गंभीर आहे. बहुसंख्य लोकांची सारासार विवेकबुद्धीदेखील धर्मश्रद्धेच्या अतिरेकी माऱ्याने पुरती पांगळी केली आहे. अशा स्थितीत 'संशोधकीय' बुद्धी' तर फार दूरची गोष्ट आहे). अर्थात धर्मसंस्थेचा क्रमशः उदय आणि क्रमशः विकास यात केवळ विश्वाची उत्पत्ती हाच एक विषय हाताळला गेलेला नाही. मानवसमूहाला नैतिक आचरणाची चौकट देण्याचं कामही धर्मसंस्थेने केलं. महत्त्वाचं म्हणजे जैविक विकासक्रमात माणसाला पडू लागलेल्या अस्तित्वविषयक प्रश्नांना हाताळण्याचं काम तिने केलं. यातून धर्मसंस्था तिच्या हजारो वर्षांच्या प्रवासात, मानवी बुद्धीच्या मर्यादांच्या बळावर ज्या भक्कमपणे उभी राहिली त्या तुलनेत दोनशे वर्षांपूर्वी सुरु झालेल्या उत्क्रांतीच्या अभ्यासाला भक्कमपणे उभं राहायला वेळ लागणार हे सरळ आहे. शिवाय उत्क्रांती हा श्रद्धेचा विषय नसून अभ्यासाचा विषय असल्याने तो अधिक व्यापक, म्हणून अधिक अवघड आणि म्हणून कमी 'रंजनमूल्य' असलेला आहे. आणि याच मुद्द्यावर विस्ताराने काही म्हणावंसं वाटतं. 

सामर्थ्य आहे ‘गोष्टी’चे...

'रंजनमूल्य' हा शब्द ज्ञानाच्या संदर्भात कदाचित थोडा विरोधाभासी वाटू शकेल; पण आपण ज्या विषयाबाबत बोलतो आहोत त्या संदर्भात आणि सर्वसामान्य लोकांना या विषयाबाबत आस्था निर्माण व्हावी या संदर्भात 'रंजन' हा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. माणसाच्या प्रवासात 'गोष्ट' हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. माणसाला पडणारे अनेक प्रश्न धर्म, अध्यात्म, गूढवाद या कक्षेतून विज्ञानाच्या कक्षेत येण्याआधी हजारो वर्षं माणसाच्या मनाची मशागत कथा-नाट्य-संगीत-चित्र आदि कलांमधून सतत सांगितल्या गेलेल्या ईश्वरी गोष्टींनी झाली आहे. याखेरीज माणसांना एकत्र आणण्यासाठी आणि एकत्र ठेवण्यासाठी माणसाने ‘गोष्टी’चा कसा प्रभावी वापर केला, ‘कल्पित वास्तवा’चा माणसाला त्याच्या जैविक-सामाजिक प्रवासात उपयोग झालाच; पण आधुनिक काळातील अनेक संस्था-संकल्पनादेखील ‘कल्पित वास्तवा’च्या आधारे कशा उभ्या राहिल्या याबाबत युव्हाल हरारीच्या लोकप्रिय ‘सेपियन्स’मधलं विवेचन अनेकांनी वाचलेलं असेल.  

ईश्वर ही संकल्पना निर्माण झाल्यापासून आजवर तिने माणसाचा पिच्छा सोडला नाही. या संकल्पनेबाबत कितीही तार्किक युक्तिवाद केले तरी बहुसंख्य माणसं ही संकल्पना टाकून देऊ शकलेली नाहीत. 'व्हाय गॉड वोन्ट गो अवे - ब्रेन सायन्स अँड द बायॉलॉजी ऑफ बीलिफ' या पुस्तकात यूजीन डाक्विली आणि अँड्र्यू न्यूबर्ग यांनी ईश्वर ही संकल्पना मानवी मेंदूत 'हार्ड-वायर्ड' झाली असल्याचं काही प्रयोगांद्वारे दाखवून दिलं आहे. मानवी मेंदूत ही संकल्पना घट्ट रुजली आणि प्रचंड तांत्रिक प्रगतीच्या पार्श्वभूमीवरदेखील ती टिकून राहिली याचा मेंदूविज्ञान आणि सामाजिक-आर्थिक प्रभावांच्या अभ्यासाच्या साहाय्याने आज उलगडा होऊ शकतो. पण यातला एक महत्त्वाचा घटक 'रंजन' हादेखील आहे. येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, राम-कृष्ण-शंकर-विष्णू आदि सर्व देव-देवतांच्या, प्रेषितांच्या कथांमध्ये फार मोठं रंजन आहे. ईश्वर, प्रेषित ही संकल्पना माणसाच्या चिंतनापेक्षाही रंजनात जास्त प्रमाणात ठाण मांडून बसलेली आहे. कारण ती एक नाट्यमय, रोमांचकारक संकल्पना आहे. त्यात एक ‘दिव्यत्वा’ची अनुभूती आहे. थरारकता आहे. आपण फारच छोटे आहोत आणि या विराट सृष्टीच्या निर्मात्याला शरण जाणं, त्याला समर्पित असणं हेच आपलं भागधेय आहे हे मनुष्य मान्य करतो आणि हे मान्य करण्यात, या समर्पणात त्याला शांतता व समाधान अनुभवता येतं. 

या पार्श्वभूमीवर निरीश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या सर्वांनीच 'सजीव उत्क्रांती' हा विषय रंजकपणे, सांस्कृतिक अवकाशात प्रवेश करत कसा सांगता येईल यावर विचार करणं आवश्यक आहे. 'मानवी उत्क्रांती हा एक अवघड विषय आहे, तो आपल्याला झेपणारा नाही' अशी सर्वसामान्य लोकांची धारणा असल्याने आणि या विषयाचा अभ्यास करण्याइतपत वेळ हाताशी नसल्याने, तशी वृत्तीही घडलेली नसल्याने अशा मनोवस्थेतील लोकांना आपण कथा, नाटक, चित्रपट, संगीत, चित्र, डिजिटल माध्यमावरील काही कल्पक प्रयोग अशा काही मार्गांनी आकर्षित करून घेऊ शकू का यावर विचारमंथन होणं आवश्यक आहे. मानवी उत्क्रांतीवर आज मुबलक प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. मराठीतही पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण ते एका वर्गापुरतं मर्यादित आहे. आणि या विषयाबाबत लोकांच्या मनात अनास्था, भीती असं बरंच काही आहे. त्यामुळे इथे गरज आहे तो कल्पक 'योजकां'ची. एका बाजूला उत्क्रांतीविषयक पुष्कळ ज्ञान उपलब्ध आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्याशी कधीच संबंध न आलेला एक मोठा मानवसमूह आहे. ज्यांना ज्ञान आहे ते स्वतः कदाचित या ज्ञानातून कल्पकपणे, सोप्या, सुटसुटीत पद्धतीने एकेक विषय लोकांपुढे काढून ठेवू शकणार नाहीत. हे काम 'योजकां'ना करावं लागेल. 

‘इंटेलिजंट डिझाइन’चं आव्हान

उत्क्रांतीचा सिद्धांत सहजपणे पचनी न पडण्याचं एक प्रमुख कारण सजीवांच्या शरीररचनेतील कमालीची गुंतागुंत हेही आहे. एकपेशीय सजीवांपासून उत्क्रांत होत होत आजचं अद्भुत वाटावं असं मानवी शरीर निर्माण झालं - त्यात डोळ्याच्या जागी डोळा बसला, कानाच्या जागी कान बसला, हृदय-फुफ्फुस-यकृत-मूत्रपिंड-आतडी इ. अवयव उत्क्रांत झाले, रक्त-मांस-स्नायू निर्माण झाले, मेंदू नावाचा एक थक्क करणारा अवयव उत्क्रांत झाला या सगळ्याची नीट फोड करून, तुकड्या-तुकड्यात समोर मांडून, त्यातून एका संपूर्ण शरीराची निर्मिती कशी झाली हे समजावून सांगणं आणि तेही रंजकपणे सांगणं हे विलक्षण आव्हानात्मक काम असणार आहे. पण ते झाल्याखेरीज अधिकाधिक लोकांना उत्क्रांतीच्या अभ्यासाकडे, वैज्ञानिक विचारपद्धतीकडे वळवणं अवघड ठरेल.  

ईश्वर नाही’ असं म्हटलं की त्यातील नकारामुळे ‘मग काय आहे?’ हा प्रतिप्रश्न लगेचच विचारला जातो. ‘ईश्वर आहे’ हे मान्य करणाऱ्यांना ईश्वराने सजीव कसे निर्माण केले, सृष्टी कशी निर्माण केली याचं क्रमवार उत्तर देता येणार नाही; पण ज्याअर्थी हे सगळं दिसतं आहे त्याअर्थी हे कुणीतरी निर्माण केलं आहे हे तार्किकच आहे असा त्यांचा विश्वास असतो. 'इंटेलिजंट डिझाइन'च्या पुरस्कर्त्यांकडून मांडला जाणारा घड्याळजीचा सिद्धांत प्रसिद्ध आहे. - एका निर्जन बेटावर जर कुणाला एक घड्याळ सापडलं तर ते तयार करणारा घड्याळजी कुठे ना कुठेतरी असणार हे सरळच आहे. त्याच न्यायाने ज्याअर्थी सृष्टी आहे त्याअर्थी सृष्टीचा निर्माता कुठे ना कुठे असलाच पाहिजे! आता या सिद्धांतातली अडचण अशी की ते विशिष्ट घड्याळ कुणी तयार केलं आहे हे माहीत नसलं तरी घड्याळ ही वस्तू कुणा मनुष्यानेच तयार केलेली आहे हे आपल्याला माहीत असतं. एखाद्या घड्याळजीला आपण भेटलेलो असतो. त्याच्याशी बोललेलो असतो. पण सृष्टीच्या निर्मितीला ते लागू होत नाही. सृष्टीच्या निर्मात्याला कुणीच भेटलेलं नाही. तिच्याशी/त्याच्याशी कुणीच बोललेलं नाही. काही सिद्धपुरुषांना, योग्यांना साक्षात्कार झाले आहेत, त्यांना देवाचं दर्शन झालं आहे असं आपण ऐकतो. पण त्या दर्शनात देवाने सृष्टीनिर्मितीची प्रक्रिया सांगितली का? डोळ्याच्या जागी डोळा कसा बसला आणि मेंदूच्या जागी मेंदू कसा बसला हे सांगितलं का? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. (आणि देव जर बोललाच तर कुठल्या भाषेत बोलेल हा आणखी एक प्रश्न!)

उत्क्रांतीच्या अभ्यासातून या प्रश्नांची सुसूत्र उत्तरं मिळावीत असा आग्रह धरला गेला तर त्यात काही वावगं नाही. (तशी उत्तरं मिळू शकतातच; पण मुख्य मुद्दा ‘कळण्या’चा आहे). ईश्वराबाबत ती/तो सर्वशक्तीमान असल्याने, तिच्या/त्याच्यापुढे आपण क्षुद्र असल्याने तिने/त्याने सृष्टीनिर्मितीचा खुलासा आपल्यापाशी करण्याचं कारणच नाही, ते आपल्या बुद्धीच्या कक्षेत येणार नाही अशी ईश्वरवाद्यांची भावना असू शकते. उत्क्रांतीच्या सिद्धांताची मात्र त्यातून सुटका नाही. आणि ईश्वरवाद्यांची अपेक्षा असली-नसली तरी एक ज्ञानशाखा म्हणून उत्क्रांतीने दिलेल्या अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं सुगम पद्धतीने लोकांसमोर मांडली जावीतच.   

मानवी उत्क्रांती हा प्रचंड गुंतागुंतीचा, डोक्याला शीण आणणारा प्रवास असला तरी यात अनेक चित्तथरारक (आणि अर्थातच प्रदीर्घ कालावधीचे) टप्पे आहेत. उदा. माणूस दोन पायांवर उभा राहिला किंवा कंठातून येणाऱ्या ध्वनीतून माणसाने शब्द विकसित केला हे अतिशय रोमांचकारक विषय ठरू शकतात. आपल्या शरीरातील विविध अवयवांची उत्क्रांती यात तर ठायी ठायी थरारकता असू शकते. आज हा अभ्यास पुस्तकांमध्ये उपलब्ध आहे. एका अर्थी तो 'बंदिस्त' आहे. त्याचं 'माध्यमांतर' करून तो लोकांपुढे आणला गेला तर लोक त्याकडे खेचले जाऊ शकतील. यूट्यूबसारख्या लोकप्रिय डिजिटल माध्यमातून आज ते काही प्रमाणात होतं आहे; पण तरी ईश्वरी कथा जशा लोकांच्या दैनंदिन जगण्याचा भाग झालेल्या आहेत तसं अद्याप या विषयाचं झालेलं नाही. 

डार्विनची उलघाल

आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे, विश्वाच्या पसाऱ्याला प्रयोजन आहे, आपल्या कृतींचा हिशेब मांडणारी एक पारलौकिक शक्ती आहे हा धर्मश्रद्धेतून आलेला विचार माणसांना आधार देणारा ठरला आहे. उत्क्रांतीची दिशा जो मार्ग दाखवते त्या मार्गावर अशा आधाराला जागा नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वाला अंगभूत असा अर्थ नाही, आपल्या असण्याला प्रयोजन नाही हे मान्य करून जीवनाचा हेतू आपला आपण शोधणं, या जीवनात आनंद निर्माण करणं, जीवनेच्छा जागी ठेवणं, निश्चित उद्दिष्ट ठेवून कार्यरत राहणं शक्य आहे हे पटवून द्यावं लागेल. आणि यासाठी वर म्हटलं तसं कल्पक व्हावं लागेल.

‘डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य’ (संपादक - नंदा खरे, रवींद्र रु. पं.) या पुस्तकात विद्यागौरी खरे यांचा ‘संधिकाळातील घालमेल’ या शीर्षकाचा एक लेख आहे. या लेखात त्यांनी जीलियन बीअर लिखित 'डार्विन्स प्लॉट्स' या ग्रंथातील एक विधान उद्धृत केलं आहे - 'क्रांती फक्त वैज्ञानिकांच्या मनात घडून चालत नाही. तिला संपूर्ण प्रामाण्य तेव्हाच लाभते जेव्हा त्याच संस्कृतीतील इतर माणसांच्या विश्वासातही क्रांतिकारक बदल घडतात'. खरे यांनी पुढे डार्विनने २२ मे १८६० रोजी ॲसा ग्रे यांना लिहिलेलं पत्र दिलं आहे. (हे पत्र 'पँडिमोनियम' या हंफ्री जेनिंग्ज लिखित ग्रंथात आढळतं). पत्र मुळातून अवश्य वाचावं. त्यात डार्विन लिहितो - सृष्टीची निर्मिती सुरचित नियमांमधून झाली असावी आणि बारीकसारीक तपशील - चांगला अथवा वाईट - भरण्याचे काम आपण ज्याला योगायोग (चान्स) म्हणतो त्यावर सोडण्यात आले असावे असे मानण्याकडे माझा कल आहे. या कल्पनेमुळे मला जराही समाधान मिळत नाही. 

विवेकवादी वृत्तीचा अंगीकार केल्यानंतर विज्ञानाच्या पलीकडच्या मानवी जाणिवांची धार बोथट झाल्याने कलांचा आस्वाद घेण्याची आपली क्षमता नष्ट झाल्याने डार्विनला वाटणारं दुःख त्याने नोंदवून ठेवलं आहे असं विद्यागौरी खरे लिहितात. त्यांनी 'पँडिमोनियम'मधली डार्विनची नोंद उद्धृत केली आहे –

माझे मन म्हणजे तथ्यांच्या प्रचंड साठ्यातून सामान्य नियम घडवणारे एक यंत्र झाले आहे. पण ह्याच्यामुळे मेंदूच्या ज्या भागात उच्च अभिरुचींचे केंद्र आहे त्याचा क्षय का व्हावा हे मला कळत नाही. ह्या अभिरुची नष्ट होणे म्हणजे आनंदाचा नाश होणे. ह्यामुळे बुद्धीला हानी पोचण्याची शक्यता आहेच; पण आपल्या स्वभावातील भावनिक वृत्ती दुर्बल बनून नैतिक व्यक्तिमत्त्वाचा ऱ्हास होण्याचा धोकाही मोठा आहे.

माणूस उत्क्रांतीच्या वाटेने आज आहे तिथवर पोचला आहे हे मान्य केलं की त्याची भावनिक हतबलता, धर्मभोळेपणा, देवभोळेपणा, माणसाचा विवेक हरवणं या गोष्टीदेखील उत्क्रांतीच्याच आधारे समजून घेता येतील. आणि असं लक्षात येईल की ईश्वर, धर्म या संकल्पना त्यांच्या मुळातील स्वरूपापासून बदलत बदलत पक्षीय, सांस्कृतिक राजकारणाचे महत्त्वाचे आयाम म्हणून स्थिरावल्या आहेत. डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडायच्या आधीपासून इंग्लंडमध्ये या विषयाबाबत लोकांमध्ये कुतूहल जागं होत असल्याची 'पँडिमोनियम' मधली उदाहरणं विद्यागौरी खरे यांनी वर उल्लेख केलेल्या त्यांच्या लेखात दिली आहेत. निरीश्वरवाद भारतीय परंपरेतही आढळतोच. यात चार्वाक तर आहेच; पण 'अचेतन जडद्रव्यच मुळात आहे, चेतन जीव हा जडद्रव्याचाच विकार किंवा जडद्रव्याचीच कार्यरूप परिणती आहे, असे मत उपनिषदकाळापासून भारतात प्रचलित आहे', 'देहाहून निराळा, मृत्यूनंतर ज्याचे अस्तित्व राहते, असा आत्मा नाही असे जडवादी मत कठोपनिषदात सांगितले आहे' असं 'जडवाद' या मराठी विश्वकोशातील नोंदीत  म्हटलं आहे. ईश्वरी अस्तित्वावर शंका घेणं ही काही अर्वाचीन घटना नाही. डार्विनने उत्क्रांतीच्या सिद्धांतामधून ही चौकट आणखी घट्ट केली आणि या अभ्यासाला आजवर न मिळालेली चालना दिली. मात्र ही वैचारिक दिशा सर्वसामान्य लोकांच्या मनाचा ठाव घेऊ शकलेली नाही. भारतासारख्या देशात आज धार्मिकतेचा रेटा मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना उत्क्रांतीपुढील आव्हान मोठं आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी प्रतिक्रियावादी न होता, धोरणी विचार करत सांस्कृतिक अवकाशात भक्कमपणे उभं राहणं गरजेचं आहे. धार्मिक राजकारणाने चिकित्सेचा अवकाश कमी कमी करत नेलेला असताना जडवादाचं, निरीश्वरवादाचं ‘व्यापक, लोकाभिमुख राजकारण’ कसं असावं यावर पुरेसा विचार व्हावा. ‘सांस्कृतिक अवकाशात प्रवेश’ ही या राजकारणाची पहिली पायरी ठरू शकेल.  

(लोकसत्ता, १२ फेब्रुवारी २०२५) 

Friday, November 1, 2024

घडी मोडली कशी याचाही विचार करूया!

लोकसत्ताच्या 'पहिली बाजू' सदरात प्रकाशित होणारे लेख हे विद्यमान सत्ताधारी वर्गाच्या प्रतिनिधींची बाजू मांडणारे असतात. काल, २९ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालेला लेख (प्रक्रिया राज्याची घडी बसवण्याची) हा 'सजग रहो' अभियानाविषयी मकरंद मुळे यांनी लिहिलेला लेख एका संघटनेचे प्रतिनिधी म्हणून लिहिलेला असला तरी तो 'पहिली बाजू' या सदरात प्रकाशित होणं आणि लेखात हिंदुत्ववादी विचारधारेचा पुरस्कार करणारी मांडणी असणं यामुळे 'सजग रहो' अभियान कोणत्या राजकीय विचारधारेशी जोडलेलं आहे हे स्पष्ट होतं. अर्थात एखाद्या राजकीय विचारधारेशी जोडलं जायला हरकत नाही; पण हिंदुत्ववादी विचारधारा आणि प्रागतिक, उदारमतवादी विचारधारा यांच्यात गेली शंभराहून अधिक वर्ष जो वैचारिक संघर्ष चालू आहे त्यातील बारकावे समोर येणं, गेल्या दहा वर्षात हिंदुत्ववादी विचारधारेचं जे रूप आपल्याला पाहायला मिळालं त्यावर चर्चा होणं हे जास्त आवश्यक आहे. याचं एक प्रमुख कारण हे की सर्वसामान्य लोकांना हिंदुत्ववादी विचारांचे वाहक करण्यात राजकीय हिंदुत्वाला यश आलं असून त्यातून सर्वसामान्य लोक कमालीचे एकारलेले झाले आहेत, धर्मभावनेने पुरते पछाडले गेले आहेत. (हा वैचारिक संघर्ष शंभरहून अधिक वर्षं चालू आहे असं वर म्हटलं असलं तरी ते एकोणिसाव्या-विसाव्या शतकाच्या संदर्भात आहे. प्राचीन भारतात जडवाद वि. चैतन्यवाद हा जो संघर्ष सुरु होता तो आजही सुरु आहे आणि हा वैचारिक संघर्ष हिंदुत्ववाद वि. उदारमतवाद या संघर्षाच्या मुळाशी आहे). 

या विषयाचा वेध घेत राहणं आणि हिंदुत्ववादी तसंच उदारमतवादी दोन्ही विचारधारांच्या वाहकांशी बोलत राहणं आवश्यक आहे. पण प्रस्तुत लेखाच्या मर्यादेत त्यावर सविस्तर लिहिणं शक्य होणार नाही. मकरंद मुळे यांच्या लेखात उल्लेख केल्या गेलेल्या काही मुद्द्यांवर मात्र चर्चा करता येऊ शकेल. त्यातूनही काही गोष्टींचा उलगडा होईल. लेखात असा उल्लेख आहे की  २०२४ च्या लोकसभेत आणि विशेषत: सध्याच्या विधानसभा निवडणुकीत लढणाऱ्या राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या शक्ती ही सामाजिक स्थैर्य आणि शांतता या दृष्टीने काळजीची बाब आहे. या विधानाचा परामर्श घेऊ.           

'राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या सामाजिक शक्ती' यातून लेखकांना महाविकास आघाडीच्या मागे उभ्या असणाऱ्या सामाजिक शक्ती असं सुचवायचं आहे हे उघड आहे. कारण हिंदुत्ववादी विचारांच्या राजकीय पक्षांच्या मागे उभ्या असणाऱ्या शक्ती या सामाजिक स्थैर्य आणि शांतता या दृष्टीने लेखकांसाठी काळजीची बाब होऊ शकणार नाहीत असं मानायला पुष्कळच जागा आहे. त्यामुळे लेखात त्यांनी नाव घेतलं नसलं तरी  त्यांचा रोख 'निर्भय बनो' व भाजपविरोधी इतर सामाजिक संघटनांकडे आहे हेही स्पष्ट होतं आहे. 'निर्भय बनो' चळवळीने स्पष्ट राजकीय भूमिका घेतली आणि मे २०२३ पासून वर्षभर महाराष्ट्रात ७५ सभा घेतल्या. मात्र यामुळे सामाजिक स्थैर्य आणि शांतता कशी धोक्यात आली हे लक्षात येत नाही. वास्तविक सिन्नर येथील सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी डॉ. विश्वंभर चौधरी यांचं भाषण बंद पाडलं होतं. पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, डॉ. विश्वंभर चौधरी, ॲड. असीम सरोदे यांच्या गाडीवर भाजपच्या शहराध्यक्षांमार्फत जीवघेणा हल्ला केला गेला. अलीकडे श्याम मानव यांची सभा भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली गेली. अकोल्यात योगेंद्र यादव यांची सभा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावली. रावसाहेब कसबे यांच्या घरासमोर तर असीम सरोदे यांच्या कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे निदर्शनं करण्यात आली.  पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने एक नाट्यप्रवेश बंद पाडला होता. (नाट्यशिक्षणाचा भाग म्हणून एक सराव परीक्षा सुरु होती आणि त्यात विद्यार्थी छोटे प्रवेश सादर करत होते. ती पूर्ण नाटकं नव्हती. फक्त प्रवेश होते). ११ फेब्रुवारी २०२४ रोजी नॅशनल फिल्म्स आर्काइव्ह्जमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनेने चित्रपटाचा शो बंद पाडला. २०२३-२०२४ दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांकडून पुणे विद्यापीठात तीन-चार वेळा हल्ले केले गेले होते. 

वरील उदाहरणं लक्षात घेता सामाजिक स्थैर्य आणि शांतता कशामुळे धोक्यात येते आहे हे स्पष्ट होतं. पण स्पष्ट झालं तरी मान्य होत नाही ही आजची मोठीच अडचण आहे. राष्ट्रीय स्तरावर विचार केला तर २०१४ साली पुण्यात मोहसीन शेखच्या हत्येपासून मुस्लिमांच्या झुंडबळींची मालिका सुरु झाली. यात सुमारे पन्नासजणांचे मृत्यू झाले. मृतांमध्ये काही हिंदूही आहेत. समाजमाध्यमांचा वापर करून हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात भडकावणं गेली अनेक वर्षं सुरु आहे. भाजपची आयटी सेल यात आघडीवर आहे हे उघड गुपित आहे. इतरही अनेक उदाहरणं देता येतील. 

या अशा पार्श्वभूमीवर जर नागरी संघटनांनी आपला आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि स्पष्ट राजकीय भूमिका घेतली तर त्यात गैर काय आहे? आणीबाणीच्या काळातही अनेक सामाजिक संघटनांनी, नागरिकांनी आपला आवाज उठवला होता. आणीबाणीच्या काळात उठवलेला आवाज क्षम्य ठरतो आणि भाजपच्या राजवटीत उठवला गेलेला आवाज अक्षम्य ठरतो असं काही आहे का या प्रश्नाचं उत्तर 'हो, अक्षम्य ठरतो' असं आहे असं दिसतं जे अजिबातच योग्य नाही. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कायमच जनआंदोलनं होत आली आहेत. पण या आंदोलकांना कुणी देशद्रोही म्हणत नव्हतं. हे गेल्या दहा वर्षात सुरु झालं. शेतकरी आंदोलनाला किती वाईट प्रकारे बदनाम केलं गेलं याचा इतिहास ताजा आहे. प्रत्यक्ष पंतप्रधानांनीच संसदेत 'आंदोलनजीवी' असा शब्द वापरला तर इतरांची काय कथा?

'सजग रहो' या अभियानातर्फे हिंदूपणाच्या सबलीकरणात राज्याचे हित सामावले आहे, याची अभ्यासपूर्ण मांडणी केली जाईल असं लेखात म्हटलं आहे. हिंदूपणाचं सबलीकरण व्हावं असं जर खरंच वाटत असेल तर वर उल्लेख केलेल्या हिंदूपणाच्या आक्रमकतेकडे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक अस्थैर्याकडे गांभीर्याने बघणं आवश्यक नाही का? की हिंदू सबलीकरणात मुस्लिमद्वेष, मुस्लिमांचे झुंडबळी, विरोधी विचार दडपून टाकणं हे अंतर्भूत आहे? एखाद्या नागरी संघटनेने स्पष्ट राजकीय भूमिका घेताच तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे हे मान्य न करता त्यातून सामाजिक स्थैर्य आणि शांतता धोक्यात येते असं का म्हणावंसं वाटतं? इथे आपल्या असं लक्षात येईल की याचा संबंध हिंदुत्ववादी विचारांमधील आक्रमकतेशी आहे. आक्रमक होणं, समोरच्याला गप्प करणं हे योग्यच आहे, तोच खरा मार्ग आहे, त्यातूनच भारताचं भविष्य उज्ज्वल होईल यावर विश्वास असणं, त्याला मूल्यात्मक मान्यता दिली जाणं हे चिंतेचे विषय आहेत. 

वैचारिक-राजकीय लढ्यात एकच बाजू कायम दोषी आणि दुसरी कायम निर्दोष असं कधी होत नाही. याचं भान अर्थातच जागं असायला हवं. त्यामुळे उदारमतवादी, पुरोगामी विचारधारेची चिकित्सा करावीच. आणि ती हिंदुत्ववाद्यांनी करायच्या आधी पुरोगामी विचारांशी बांधिलकी असणाऱ्यांनीच करावी. मात्र कळीचा प्रश्न हाही आहे की हिंदुत्ववादी विचारधारेचे वाहकही हे करतील का? स्वतः स्वतःची चिकित्सा करणं, आपल्या दृष्टिकोनापेक्षा, विचारपद्धतीपेक्षा वेगळ्या दृष्टीने, पद्धतीने इतिहास आणि वर्तमानाकडे बघणं हे मला वाटतं कुणाही सजग व्यक्तीसाठी महत्त्वाचं आहे, आव्हानात्मकही आहे. 'सजग रहो' या नावातच सजगतेचा उल्लेख असल्याने ते होईल असा विश्वास वाटतो!

(लोकसत्ता, ३१ ऑक्टोबर २०२४)

Thursday, August 15, 2024

निर्भय बनो – ‘लोकां’कडून ‘लोकशक्ती’कडे

'निर्भय बनो' - पार्श्वभूमी 

'निर्भय बनो' ही म्हटलं तर अनेक घोषणांसारखी एक घोषणा आहे; पण या दोन शब्दांच्या घोषणेत एक मूलगामी महत्त्वाचा आशय दडलेला आहे. 'निर्भय होणं' हे आपल्या जगण्याच्या प्रत्येकच आयामात महत्त्वाचं ठरत असतं. सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आपल्या भूमिका व कृतींपासून ते अगदी कौटुंबिक, व्यक्तिगत संदर्भातसुद्धा विविध वेळी निर्भय होऊन संवाद करण्याचं मोल जाणवत असतं. 'हे मी कसं बोलू?' या प्रश्नाच्या मुळाशी जो संकोच आहे तो खरं तर परिणामांच्या भयातूनच निर्माण झालेला असतो. गांधीजींनी दिलेल्या या घोषणेतील ताकद वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या संदर्भात जाणवत राहणारी आहे.  

गांधीजींनी 'निर्भय बनो' हा नारा सर्वप्रथम बिहारमधील चंपारणच्या निळीच्या सत्याग्रहात (१९१७) दिला होता. चंपारण्यात निळीचे मळेवाले जमीनदार तिथल्या शेतकऱ्यांवर जुलूम करत होते. त्यांच्या शोषणाला, नाडवणुकीला कंटाळून हे शेतकरी गांधीजींकडे गेले. त्यानंतर गांधीजींनी चंपारण्याचा दौरा केला. त्यांच्या असं लक्षात आलं की कायदे बदलण्यासाठी संघर्ष करणं तुलनेनं सोपं आहे; पण जनतेच्या मनातील मळेवाल्यांची भीती व दहशत दूर करणं हे दूरगामी दृष्टीने महत्त्वाचं आहे. ते झालं तर बाकीचे प्रश्न मार्गी लागतील. आणि तसंच घडलं. शेतकरी निर्भयपणे आंदोलनाला उभे राहिले आणि त्यांनी चंपारणचा सत्याग्रह यशस्वी केला. गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून परत आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा पहिला लढा होता. चंपारणच्या लढ्याने भारतातल्याच नाही तर जगभरातील लोकांच्या हातात 'सत्याग्रह' हे नवीन हत्यार दिलं. पुढे हाच नारा इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीत जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या आंदोलनात दिला गेला.   

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या गेल्या अनेक वर्षात देशात अनेक जनआंदोलनं झाली. समाज आंदोलित होत राहणं, लोकांनी आपल्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येणं हे लोकशाहीचं सौंदर्य आहे. (नव्याने जन्माला आलेल्या देशाच्या संविधानाने लोकांच्या हाती हा अधिकार दिला हेही  उल्लेखनीय म्हणायला हवं). 'निर्भय बनो' हा चंपारणमधला नारा असेल किंवा ब्रिटिश सत्तेला उलथवून टाकण्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारे जे प्रयत्न केले ते प्रयत्न असतील - या सगळ्यांनी या देशातल्या लोकांमध्ये गरज पडल्यास व्यवस्थेसमोर संघर्षासाठी उभं राहण्याचा गुण रुजवला. सामाजिक-राजकीय चळवळीतल्या आपल्या पूर्वसुरींचं हे ऋण आपल्याला मान्यच करावं लागेल. 

'व्यवस्थेशी संघर्ष' करण्याच्या पोटात भारतामध्ये आणखी एक संघर्ष दडलेला आहे. आणि तो भारत स्वतंत्र होण्याआधीपासूनच सुरु आहे. तो म्हणजे हिंदुत्ववादी विचारसरणी आणि पुरोगामी विचारसरणी यांच्यातील संघर्ष. या संघर्षाचं स्वरूप, त्याची तीव्रता गेल्या जवळजवळ शंभर वर्षात बदलत गेली आहे. माझं असं अनुमान आहे की माझ्या आधीच्या पिढीत हा संघर्ष अस्तित्वात असला तरी त्याचं स्वरूप आजच्याइतकं कडवट नसावं. हिंदुत्ववादी विचारसरणीचे धुरीण २०१४ आधीदेखील काही काळ सत्तेत असले तरी या संघर्षाला आजच्याइतकं धारदार, काही वेळा विध्वंसक वाटावं असं स्वरूप प्राप्त झालं नव्हतं. पुरोगामी विचारसरणीचा पाईक म्हणून मला या विषयावर विचार करावा आणि प्रबोधनाचा मार्ग स्वीकारून काहीएक हस्तक्षेप करत राहावा असं वाटत असतं आणि तसा प्रयत्नही मी करत असतो. 

निर्भय बनो - २०२३ 

२०२३ च्या मे महिन्यात 'निर्भय बनो' याच नावाने महाराष्ट्रात सुरु झालेल्या एका मोहिमेला या वैचारिक संघर्षाची स्पष्ट पार्श्वभूमी आहे. भारत गेली दहा वर्षं अत्यंत अस्वस्थ सामाजिक-राजकीय वातावरणाचा आणि समाजविघातक ध्रुवीकरणाचा सामना करतो आहे. राजकीय संस्कृतीचं तर कधी नव्हे असं अवमूल्यन झालं आहे. धर्मांधतेने जनमानसाचा कब्जा घेतला आहे. असत्य आणि द्वेष ही प्रचारतंत्राची दोन प्रमुख हत्यारे बनली आहेत. लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन यांच्यानंतरचे हिंदुत्ववादाचे नवीन राजकीय धुरीण - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा - बऱ्याच प्रमाणात वेगळे आहेत. २०१४ पासून भाजप सरकार लोकशाही मार्गाने निवडून येत असलं तरी सरकारच्या कार्यपद्धतीत मात्र लोकशाही, लोकांचे संवैधानिक अधिकार याविषयीची आस्था दिसत नाही. अन्यथा नरेंद्र मोदींनी आंदोलकांना उद्देशून 'आंदोलनजीवी' हा हेटाळणीयुक्त शब्द वापरला नसता. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही अशी लेबल्स लावली गेली नसती. (भारतीय लोकांनी उघडपणे धार्मिक ध्रुवीकरणाचा आधार  घेणारं सरकार कसं निवडून दिलं, इतर पक्ष आणि या देशातला धर्मनिरपेक्ष, पुरोगामी विचार कसा मागे पडला हा स्वतंत्र विषय आहे. तो महत्त्वाचा आहे कारण त्यातून पुरोगामी विचारपद्धतीचं, पुरोगामी राजकारणाचं आणि त्याच्या मर्यादांचं मूल्यमापन होऊ शकेल. हे इथे फक्त नोंदवून पुढे जाऊ).   
 २०१४ साली भाजप सत्तेवर आल्यापासून भाजप सरकार आणि विशेषतः नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याविषयीचा असंतोष समाजमाध्यमांतून, औपचारिक-अनौपचारिक चर्चांमधून बाहेर येऊ लागला होताच. समाजमाध्यमे ही गेल्या दशकात एक प्रभावी हत्यार म्हणून (आणि सामाजिक-मानसशास्त्रीयदृष्ट्या काळजीचं एक नवीन कारण म्हणूनही) पुढे येऊ लागली होती. आपल्याला आठवत असेल तर अण्णा हजारेंच्या आंदोलनापासून समाजमाध्यमांनी आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. पुढे भाजपने त्याचा सर्वात प्रभावी (आणि अनेकदा अनिष्टही) वापर सुरु केला. समाजमाध्यमांनी लोकमानस मोठ्या प्रमाणात घडवलं, राजकीय मतंही प्रभावित केली हे नाकारता येत नाही. भाजपने नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी जसा हा वापर केला तसाच नरेंद्र मोदींना विरोध करण्यासाठीही समाजमाध्यमं वापरली जाऊ लागली. मुख्य प्रवाहातील माध्यमं सत्ताधाऱ्यांची तळी उचलण्यात मग्न असताना समाजमाध्यमांवर सरकारची चिकित्सा करणारे आवाज उभे राहू लागले. 

सरकारविरोधी संघर्षाची धार तीव्र व्हायला याची मदत झाली. पण आता समाजमाध्यमांच्या कक्षेतून बाहेर पडत आपण प्रत्यक्ष कृती करण्याची गरज आहे हा विचार मूळ धरू लागला आणि त्यातून 'निर्भय बनो'ची सुरुवात झाली. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, सामाजिक कार्यकर्ते-पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ असीम सरोदे यांनी 'निर्भय बनो' मोहिमेची कल्पना मांडून तिला आकार देण्यात पुढाकार घेतला होता. या तिघांच्याही नावाशी आणि त्यांच्या कामाशी महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या प्रमाणात परिचित होते/आहेत. महाराष्ट्रभरातील अनेक कार्यकर्ते, सामाजिक संघटना यांच्याशी ते जोडले गेले आहेत. मे २०२३ मध्ये मुंबईत हुतात्मा चौकात झालेल्या कार्यक्रमाने 'निर्भय बनो'ची औपचारिक सुरुवात झाली आणि मग गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या पाठबळाच्या जोरावर त्या त्या ठिकाणी जाऊन लोकांना एकत्र करणं सुरु झालं.  

जनाचा प्रवाहो... 

सुरुवातीच्या टप्प्यात छोट्या सभा होत होत्या. अगदी पन्नास-शंभरच्या घरात लोक एकत्र येत. गट बांधला जाई. नियोजनासाठी व्हॉट्सअ‍ॅपसारखं माध्यम हाताशी होतंच. पुढे सभांना येणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली. मोठं सभागृह बुक करून सभा होऊ लागल्या. संपूर्ण नियोजन स्थानिक कार्यकर्तेच करत. लोकवर्गणी काढली जाई आणि त्यातून कार्यक्रमाचा खर्च भागवला जाई. विश्वंभरभाऊ आणि असीम दोघे मुख्य व्याख्याते आणि त्यांच्याबरोबर मी, 'ब्राइट्स सोसायटी'चा संचालक आणि 'निर्भय बनो' टीमचा सहकारी  कुमार नागे आणि पुढे काही दिवसांनी असीमचे सहकारी अ‍ॅड. बाळकृष्ण निढाळकर, अ‍ॅड. श्रिया आवले असे आमच्यातले आलटून पालटून काहीजण सभांना जात असू. पुण्यापासून त्या त्या गावापर्यंतचा आणि परतीचा प्रवासखर्च सुरुवातीच्या काळात विश्वंभरभाऊ, असीम हे दोघेच उचलत असत. पुढे एका टप्प्यावर मात्र तो खर्च आयोजकांकडून घेऊ लागलो. निर्भय बनो मोहिमेसाठी विश्वंभरभाऊ, असीम यांनी स्वतः बराच आर्थिक भार उचलला आहे हे इथे आवर्जून नमूद केलं पाहिजे. 

सिन्नरला जी सभा झाली ती तिथल्या स्थानिक भाजप नेत्याने बंद पाडली होती. हा एक अनुभव वगळता इतर कुठेही सभांमध्ये व्यत्यय आला नाही. आलेल्या लोकांमध्ये प्रत्येकजण आमच्या विचारांचा असेलच असं ठामपणे अर्थातच सांगता येणार नाही. पण सभा सुरु असताना एखाद्या गटाने उठून घोषणा देणं, निषेध करणं असं कुठे घडलं नाही. वर म्हटलं तसं एका टप्प्यानंतर सभांची गर्दी खूपच वाढली. १७ ऑगस्ट २०२३ रोजी नागपूरला झालेली सभा ही पहिली चांगल्यापैकी मोठी सभा होती. त्यानंतर नांदेड, अमरावती, सेलू, अकोला इथल्याही सभा मोठ्या झाल्या. माझ्या अनुभवातली अशी एक मोठी सभा धाराशिवची होती. तीन हजार तरी लोक असावेत. आणि नियोजन उत्तम होतं. विश्वंभरभाऊ सांगतात त्यानुसार त्यांची लातूरची सभा सर्वात मोठी होती. मे २०२३ ते मे २०२४ अशा वर्षभराच्या काळात एकूण ७५ सभा झाल्या. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भ अशा सर्व भागातल्या लहान-मोठ्या गावांमधून सभा झाल्या. असीमच्या लंडन भेटीत एक छोटी सभा झाली आणि विश्वंभरभाऊ ओरिसात कालाहांडीला गेले असताना तिथेही एक सभा झाली.  

सभा होण्याआधी आणि नंतर आयोजकांशी, स्थानिक लोकांशी गप्पा होत त्यातून लोकांच्या मनात सत्ताधारी पक्षाविरुद्ध रोष आहे ही गोष्ट तर स्पष्टच दिसत होती. जवळजवळ सर्वच सभा शहरी, निमशहरी भागात झाल्या असल्या तरी मुंबई-ठाण्यासारखे 'सेंट पर्सेंट' शहरी भाग वगळता इतरत्र येणाऱ्या लोकांमध्ये ग्रामीण, शेतीच्या पार्श्वभूमीचे, छोटे व्यावसायिक असे लोक प्रामुख्याने होते. स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय होती हे मुद्दाम नोंदवलं पाहिजे. दलित आणि मुस्लिम वर्गातील लोकांची उपस्थितीही चांगली होती. सुरुवातीच्या टप्प्यात असीमच्या भाषणांमधून प्रामुख्याने महाराष्ट्रातील सत्ताबदल, पक्षांची फोडाफोडी, निवडणूक आयोगाचे निर्णय इ. बद्दल कायदा आणि संविधानाच्या कक्षेतून मांडणी होत असे. विश्वंभरभाऊंच्या व्याख्यानात मुख्यत्वे शेती व इतर उद्योगांचे प्रश्न, धार्मिक ध्रुवीकरण, उजव्या विचारसरणीकडून होणारी इतिहासाची मोडतोड यावर जास्त भर दिला जाई. (व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर समाजमाध्यमांमार्फत सातत्याने असत्याचा प्रचार-प्रसार सुरु असताना लोकांना ऐतिहासिक तथ्य सांगणं हे एक वाढीव, आवश्यक कामच होऊन बसलं आहे). 

असीम आणि विश्वंभरभाऊ दोघांचंही वक्तृत्व अतिशय प्रभावी आहे. सभेसाठी आलेले लोक कितीही उशीर झाला तरी शेवटपर्यंत थांबून मन लावून भाषण ऐकत. सिन्नरला सभा बंद पाडल्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा खुल्या मैदानात एक जंगी सभा झाली. त्या सभेत वागळे सरांचा घणाघात मी प्रथमच अनुभवला. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. वागळे सरांबाबत एक जमेची बाजू अशी आहे की ते याआधी अनेकदा वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांसमोर जिगरबाजपणे उभे राहिलेले आहेत. दुसरं म्हणजे त्यांना पत्रकारितेचा दीर्घ अनुभव आहे इतकंच नाही तर टीव्हीवरील सच्चा, निर्भीड पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्राच्या तसंच देशाच्या राजकीय इतिहासातील अनेक बारकाव्यांची त्यांना माहिती आहे, ते स्वतः अनेक घटनांचे साक्षीदार आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात विश्वासार्हता आहे.

सिन्नरच्या दुसऱ्या सभेत मी आणि बाळकृष्ण निढाळकर थोडा वेळ बाहेर आलो होतो. मैदानाबाहेरही अनेक लोक भाषण ऐकत उभे होते. तिथे एक मनुष्य भेटला आणि त्याच्याशी गप्पा सुरू झाल्या. त्याला भाषण पटत नव्हतं. लोकांची दिशाभूल करतायत असं तो म्हणाला. मी त्याच्याशी खोलात जाऊन गप्पा सुरू केल्या. माझे काही मुद्दे त्याला मान्य होत होते. काही गोष्टी त्याला नव्यानेच कळल्या होत्या. त्याच्याशी तो सहमतही होत होता. आमच्या संभाषणाच्या अखेरीस त्याने विचारलं तुम्ही कुठून आलात? मी म्हटलं आम्ही निखिल वागळेंबरोबर आलोय. निर्भय बनो टीमचे सदस्य आहोत. हे ऐकून तो एकदम चपापला आणि हसला. काही बोलला नाही. बहुधा त्याला काय बोलावं कळलं नसेल. मी त्याला म्हटलं तुम्ही तुमच्या मनातलं बोललात हे चांगलं झालं. तुमच्या मुद्द्यांवर मी विचार करेन. नंतर आम्ही आमच्या वाटेने गेलो. 

असा एखादा अनुभव सोडला तर विरोधी मताच्या कुणाशी संवाद झाला नाही. भाजपप्रणित ध्रुवीकरणाला, असत्यकथनाला, भाजपच्या मूल्यहीन राजकारणाच्या विरोधात असणारे - निदान या सगळ्याबाबत प्रश्न असणारे, याबाबत अधिक समजून घेऊ असं वाटणारे लोक सभांना मोठ्या प्रमाणात येत होते. सभांच्या वाढत गेलेल्या उपस्थितीमुळे, तिघांच्याही भाषणांना यूट्यूबवरील विविध चॅनल्सवर मिळणाऱ्या व्ह्यूजमुळे. त्यावरील कॉमेंट्समुळे महाराष्ट्रातील वातावरण बदलतं आहे याची झलक मिळू लागली होती. पुढे लोकसभा निवडणुकीच्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केलं. 

पहिल्या सभेनंतर पुढील काही महिन्यातच 'निर्भय बनो'ने वेग पकडला होता; पण हे नाव घराघरात पोचण्याचं श्रेय जातं ते मात्र पुणे भाजपला! पुण्यात जे घडलं ते घडवलं भाजपने; पण त्याचा फायदा झाला आम्हाला! 

पुण्यातला हल्ला 

पुण्यात ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सभा होणार होती. निखिल वागळे यांच्या एका फेसबुक पोस्टचा निषेध म्हणून आम्ही सभा उधळून लावणार आहोत असा थेट इशारा पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता. मी ज्या दिवशी सभेचं निवेदन द्यायला पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो त्याच दिवशी त्यांनीही आपलं धमकीवजा निवेदन पर्वती पोलीस स्टेशनला दिलं होतं. निखिल वागळे हे अर्थातच निखिल वागळे असल्याने सभा घेण्याच्या त्यांच्या निश्चयात काहीच फरक होणार नव्हता. सभास्थानी काय होईल या चिंतेत निखिल वागळे सोडून आम्ही सगळे होतो. सभा संध्याकाळी ६ वाजता राष्ट्र सेवा दलाच्या खुल्या सभागृहात होणार होती. सकाळी अकरा वाजल्यापासूनच पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. भाजपचे लोक हल्ला करणार म्हटल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) हे राजकीय पक्ष आणि इतर अनेक पुरोगामी संस्था-संघटना यांनी आपले कार्यकर्ते पाठवले होते.  साधारण साडेचारच्या आसपास राष्ट्र सेवा दलाच्या गेटवर भाजपचे लोक झेंडे घेऊन आले. घोषणा देऊ लागले. आमच्याकडून रिपब्लिकन युवा मोर्च्याच्या राहुल डंबाळे यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशी गगनभेदी घोषणा दिली आणि तिथून मग गेटवर जोरदार, थरारक घोषणायुद्ध सुरु झालं. पोलिसांनी गेट लगेच बंद करून घेतलं. आम्ही सगळे आत होतो; पण आमच्यातले काही बाहेरही होते. थोड्या वेळाने भाजपचे काही कार्यकर्ते गेटच्या बाजूच्या लेनमधून भिंतीवर चढून आत येण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी वास्तविक गेटच्या जवळ साधारण पन्नास मीटरवर निषेधासाठी वेगळी जागा दिली होती. तिथे माइकचीही सोय होती. पण हे लोक अर्थातच तिथे गेले नाहीत. हा जमाव जर हिंसक झालाच तर काय होईल असा विचार माझ्या मनात येऊन गेला. बहुधा तसं झालं नसतं; पण तसा विचार माझ्या मनात येऊन गेला खरा. 

तास-दीड तासाने जोर ओसरल्यावर आम्ही सगळे सभागृहात आलो. कार्यक्रमाला सुरुवात झाली. मी सूत्रसंचालन करत होतो. निखिल वागळे, असीम आणि विश्वंभरभाऊ असीमच्या घरून येणार होते. त्याआधी इतर वक्त्यांची भाषणं सुरु झाली. स्टेजवर मी अतिशय ताणाखाली होतो. (कार्यक्रमानंतर मला काही मित्रांनी 'तुझं टेन्शन चेहऱ्यावर दिसत होतं' असं सांगितलंच!). सारखे फोन सुरु होते. सातच्या सुमारास निखिल वागळे यांना घेऊन गाडी निघाली आहे आणि प्रभात रस्त्यावर आणि पुढे डेक्कनला खंडुजीबाबा चौकात गाडीवर हल्ला झाला आहे हे कळलं. एलआयबीचे इंस्पेक्टर 'निखिल वागळे यांनी यायचं रद्द करावं कारण काय होईल सांगता येत नाही' असं मला सारखं सांगत होते. पण वागळे सर काहीही करून येणार याची मला खात्री होती. आणि अखेरीस तसे ते आलेच! खंडुजीबाबा चौकातून पुढे आल्यावर दांडेकर पुलावर देखील हल्ला झाला होता. गाडीच्या काचा फुटल्या होत्या. इतरही नुकसान झालं होतं. तीन-चार ठिकाणी झालेल्या हल्ल्याला तोंड देत सगळेजण शेवटी सभास्थानी पोचले होते. गाडीचे ड्रायव्हर वैभव कोठुळे-पाटील आणि पुढे बसलेली श्रिया आवले, गाडीतून खाली उतरून हल्ला परतवणारे बाळकृष्ण निढाळकर यांचा विशेष उल्लेख करायला हवा.   

असीम, विश्वंभरभाऊ आणि वागळे सर तिघेही अर्थातच थोडे टेन्स्ड दिसत होते. हल्ला झाल्यावर कुणीही माणूस जसा डिस्टर्ब होईन तसेच तेही थोडे डिस्टर्ब झाले होते. स्टेजच्या पायऱ्या चढताना असीमने वागळे सरांना आपण 'जिंकलं' म्हणून मारतो तशी मिठी मारली. ते पाहून यांच्यावर काय प्रसंग गुदरला असणार याची कल्पना आली. त्यानंतर लगेचच स्थिरस्थावर होऊन कार्यक्रम सुरू झाला. तिघांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं. सभेला तुफान गर्दी झाली होती. आजवर मुख्य प्रवाहातील माध्यमं आमच्या सभांना कधीच स्थान देत नव्हती; पण ही सभा मात्र जवळजवळ सगळ्या वृत्तवाहिन्यांनी दाखवली. 

या सभेनंतर 'निर्भय बनो' हे नाव घराघरात पोचलं. पुण्यात आणि इतर अनेक ठिकाणी हल्ल्याच्या निषेधाचे कार्यक्रम घेतले गेले. राष्ट्रीय पातळीवरील माध्यमांनी या हल्ल्याची दखल घेतली. जाऊ तिथल्या सभांना गर्दी होतच होती; ती आता आणखी वाढली. मोहिमेच्या आरंभापासूनच आम्ही हा सामाजिक नसून राजकीय कार्यक्रम आहे अशी स्पष्ट भूमिका घेतली होतीच. बऱ्याच सभांच्या नियोजनात इंडिया आघाडीतील घटक पक्ष सहभागी होते. निवडणूक जवळ येऊ लागली तसा हा सहभाग वाढला. पण हे नियोजनापुरतं मर्यादित होतं. स्टेजवर राजकीय पक्षांपैकी कुणी नसणार याची काळजी आम्ही घेत होतो. वर्षभरापूर्वी मे महिन्यात मुंबईत सुरु झालेल्या या मोहिमेतली शेवटची सभा मे महिन्यात मुंबईतच कांदिवलीला झाली. 

मी सामाजिक, म्हणून मी राजकीय!

एकूण ७५ पैकी मी काही निवडक सभांना हजर होतो. प्रत्येक सभेला जाण्याची इच्छा असली तरी कामामुळे किंवा अन्य काही कारणामुळे जमलं नाही. माझ्या दृष्टीने या पूर्ण मोहिमेतील सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे जोडले गेलेले लोक! महाराष्ट्रभर सजग, लोकशाही मूल्यांवर विश्वास असणाऱ्या, द्वेषाच्या राजकारणाला नाकारणाऱ्या नागरिकांचा एक मोठा समूह तयार झाला. विश्वंभरभाऊ आणि असीम दोघांचाही जनसंपर्क आधीपासूनच अफाट होता. 'निर्भय बनो'मुळे त्यात आणखी लोक जोडले गेले आणि ते स्पष्ट राजकीय भूमिका घेऊन उभे राहिले. व्यक्तिशः मी अनेक नवीन लोकांशी, कार्यकर्त्यांशी जोडला गेलो. आपापल्या ठिकाणी एका निष्ठेने काम करत असलेल्या या लोकांशी संवाद सुरु होणं माझ्यासाठी फार समृद्ध करणारं होतं. जालन्याचे राजेभाऊ मगर, डी. के. कुलकर्णी, यशवंत सोनुने, सोलपूरच्या अस्मिता बालगावकर, गोविंद पाटील, सनी दोषी, नगरचे श्याम आस्वा, गिरीश कुलकर्णी, संभाजीनगरच्या तृप्ती डिग्गीकर, नांदेडचे सतीश कुलकर्णी, बीडचे एस. एम. देशमुख, अकोल्याचे चंद्रकांत झटाले, रत्नागिरीचे अभिजीत हेगशेट्ये, किशोर वरक, वसईचे सायमन मार्टिन, मनवेल तुस्कानो, पायस मच्याडो, ठाण्याचे शिवप्रसाद महाजन, सिंधुदुर्गचे विनय खातू, धाराशिवचे प्रशांत पाटील, दौलत निपाणीकर, सांगलीचे संजय बनसोडे, सासवडचे श्रीकांत लक्ष्मी शंकर ही काही चटकन आठवलेली नावं. अशी अनेक मंडळी!  

'निर्भय बनो' मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊ लागल्यानंतर माझ्या काही मित्रमंडळींना थोडं आश्चर्य वाटलं होतं. माझ्यासारखा साहित्य, चित्रपट, सामाजिक अभ्यासात रमणारा मनुष्य अशा राजकीय चळवळीत कसा काय सहभागी झाला याबद्दल त्यांना कुतुहूल वाटणं समजण्यासारखं होतं. मी राजकीय क्षेत्रातला मनुष्य खरोखरच नाही, त्यासाठी आवश्यक ते गुणही बहुधा माझ्यात नाहीत - पण मला आतून जाणवलेली गोष्ट सांगतो. राजकीय-सामाजिक-आर्थिक क्षेत्रं ही गुंतागुंतीची क्षेत्रं आहेत हे खरं. तसं प्रत्येकच क्षेत्राबाबत म्हणता येईल. पण मी अर्थतज्ज्ञ नसलो तरी माझ्या शहराचा, राज्याचा किंवा देशाचा जमा-खर्च कसा चालतो हे मला कळून घेता येऊच शकतं - किंबहुना ते मला कळावं याची व्यवस्था हवी असा आग्रह मी धरला पाहिजे. आपण घर चालवतो तेव्हा आपण आपलं उत्पन्न आणि आपला खर्च याचा मेळ घालत असतो. अर्थव्यवस्थेचं मूलभूत तत्त्व याहून वेगळं काय असतं? राज्य किंवा देशाच्या पातळीवर हा हिशेब अत्यंत गुंतागुंतीचा होतो हे खरं; पण तो मला समजूनच घेता येणार नाही अशी काहीशी व्यवस्था निर्माण केली जाते की काय अशी मला कधीकधी शंका येते. बहुधा आपल्यासमोर, म्हणजे नागरिकांसमोर, या एकूण व्यवस्थेचं चित्र सोपं करून कधी कुणी मांडतच नाही. आणि आपणही त्यासाठी पाठपुरावा करत नाही! तसंच राजकीय क्षेत्रात प्रत्येकच राजकीय पक्षाच्या अधिक-उण्या बाजू असल्या तरी मला सत्ताधारी पक्षाबाबत स्पष्टपणे जे दिसतंय त्याबद्दल मी स्पष्ट भूमिका घ्यायला काहीच हरकत नाही. 

मी 'निर्भय बनो' सभांमध्ये जिथे थोडा वेळ माझे विचार मांडले त्यात माझा एक मुद्दा कायम होता. तो असा की कुठलाही प्रश्न हा राजकीय-आर्थिक-सामाजिक असण्याआधी तो वैचारिक असतो. कुठलीही समस्या ही मुळात वैचारिक समस्या असते. आणि मला आज जे दिसतंय त्यानुसार भाजपच्या राजवटीत वैचारिक अधोगती मोठ्या प्रमाणावर होते आहे. बेगडी राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांना कायम नशेत ठेवायचं, लोकांच्या मूलभूत प्रश्नांना सामोरं जाण्याऐवजी निव्वळ प्रतीकात्मक गोष्टींमध्ये रमायचं, त्याचा गाजावाजा करायचा, उघड उघड असत्य बोलायचं आणि असत्याचा पद्धतशीर प्रसार करायचा, सामाजिक सौहार्दाची वीण उसवायची या गोष्टी घडताना जर मला डोळ्यासमोर दिसत असतील तर त्याबद्दल मी स्पष्ट भूमिका घेऊन उभा राहिलो तर ते स्वागतार्हच मानलं पाहिजे. खरं तर प्रत्येकानेच हे करायला हवं. मी कदाचित भाजप राजवटीच्या आर्थिक धोरणांबद्दल भाष्य करण्यासाठी योग्य माणूस नसेन, कदाचित त्या किंवा अन्य एखाद्या आघाडीवर सरकारची कामगिरी चांगलीही असेल; पण म्हणून त्याने भाजप राजवटीत भारताचं जे सामाजिक नुकसान झालं आहे त्याची भरपाई कशी होईल? सिन्नरला विश्वंभरभाऊंचं भाषण सुरु असताना तिथल्या स्थानिक भाजप नेत्याने ते बंद पाडलं. का? तर 'रामनवमीच्या दिवशी तुम्हाला कधी डीजे ऐकू आला होता का? तो आता ऐकू येतो' असं ते म्हणाले. आता यात रामाचा किंवा हिंदूंचा अवमान कुठे होता? पण हे समजून घेण्याची कुवतच नसल्याने लगेच दांडगाई करून माइक हिसकावून घेतला गेला. पुण्यात ९ तारखेच्या सभेला ललित कला केंद्रात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाने एक नाट्यप्रवेश बंद पाडल्याची पार्श्वभूमी होती. (नाट्यशिक्षणाचा भाग म्हणून एक सराव परीक्षा सुरु होती आणि त्यात विद्यार्थी छोटे प्रवेश सादर करत होते. ती पूर्ण नाटकं नव्हती. फक्त प्रवेश होते). पुण्यातील सभेनंतर लगेचच ११ तारखेला नॅशनल फिल्म्स आर्काइव्ह्जमध्ये एका हिंदुत्ववादी संघटनेने चित्रपटाचा शो बंद पाडला. पुण्यातील सभेत जी भाषणं झाली त्यात श्रावणी बुवा या फर्ग्युसन महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीचंही भाषण झालं होतं. गेल्या वर्षभरात  हिंदुत्ववादी संघटनांनी पुणे विद्यापीठात तीन-चार वेळा हल्ले केले आहेत. त्यातील एका हल्ल्यात श्रावणीदेखील सापडली होती. तिने आपला अनुभव भाषणात सांगितला. 

विवेकवाद, तर्काधिष्ठीत विचार, मानवी जगण्याच्या विविध क्षेत्रात नवीन, सस्टेनेबल संरचनांची निर्मिती, परंपरा-धर्म-श्रद्धा-भक्तीचा पुनर्विचार - थोडक्यात एक 'नवा माणूस' घडवण्याबद्दल असलेली आस्था असलेल्या माझ्यासारख्याला रोखठोक राजकीय भूमिका का घ्यावी लागली हे कळायला वरील प्रसंग पुरेसे ठरतील. आणखीही बरेच आहेत; एकूणच हिंदुत्ववाद, धार्मिक-परंपरावादी विचारसरणी आणि त्याला शह देऊ पाहणारी आधुनिक, पुरोगामी विचारसरणी यांच्यातील परस्परविरोधाबाबत तसंच आंतरसंबंधांबाबत काही सविस्तर बोलता येईल. पण तो स्वतंत्र विषय आहे. एकूण भाजप राजवटीतील या धर्मवादी गुंगीने आणि विवेक हरवलेल्या झुंडीने माझ्यासारख्याला राजकीय रिंगणात उतरवलं हे खरं. 

समारोप 

'निर्भय बनो' ही एक सातत्याने चालणारी, दीर्घ पल्ल्याची प्रक्रिया असावी असं मला वाटतं. अद्याप तरी या चळवळीला कोणतेही औपचारिक वा संस्थात्मक रूप नाही. त्याबाबत विचार सुरु आहे. ही चळवळ राजकीय असली तरी तिच्या गाभ्याशी वैचारिक परिवर्तनाची आस आहे. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून उभी राहिलेली ही चळवळ आहे. ती इथून पुढेही तशीच सुरु राहावी. कुणीतरी एक नेता आणि त्याच्यामागे अनुयायी असं स्वरूप न राहता जर नागरिकच नेते झाले आणि त्यांनी आपापल्या ठिकाणी 'निर्भय बनो'चा नारा देत दबावगट उभे केले तर या चळवळीला बळ मिळेल. अट फक्त इतकीच की ही चळवळ पुढे नेणारे लोक लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता मानणारे असावेत. भाजपप्रणित द्वेषाच्या राजकारणाला खणखणीतपणे नकार देणारे असावेत. 

'निर्भय बनो' ही लोकशाही वाचवण्यासाठी नागरिकांची चळवळ आहे असं सांगत असतानाच उद्या जर अन्य कुठला पक्ष सत्तेवर आला आणि त्याने लोकशाहीची मुस्कटदाबी सुरू केली तर त्याच्या विरोधातही आपण उभे राहू हे 'निर्भय बनो'च्या मंचावरून अनेकदा सांगितलं गेलं ही या मोहिमेकडे पाहणाऱ्या सर्वांनी लक्षात घेण्याजोगी बाब आहे. राजकारणाचं आजचं व्यक्तीकेंद्री, पक्षकेंद्री स्वरूप बदलून राजकारणावर दीर्घ काळ प्रभाव टाकू शकेल अशी लोकशक्ती निर्माण करणं हे आजच्या घडीला फार आवश्यक झालं आहे. भविष्यात 'निर्भय बनो'कडून किंवा अशा अन्य उपक्रमांमधून ते घडेल आणि सत्तेत असलेल्यांवर अंकुश ठेवण्यासाठी ही लोकशक्ती कार्यरत राहील याकरता आपण सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. 

(सर्वंकष : एप्रिल-जून २०२४)