Saturday, April 28, 2018

मागे, मध्यात आणि पुढे

माझ्या काही आवडीच्या इंग्लिश मालिकांपैकी एक म्हणजे मॉडर्न फॅमिली. एका वयस्कर अमेरिकन व्यावसायिक गृहस्थ,त्याच्याहून तरुण असलेली त्याची मूळची कोलंबियन बायको, तिचा पहिल्या नवऱ्यापासूनचा मुलगा - असं एक कुटुंब. या गृहस्थाला त्याच्या पहिल्या घटस्फोटित बायकोपासून दोन मुलं आहेत. त्यातली मुलगी, तिचा नवरा, त्यांची तीन मुलं असं दुसरं कुटुंब. तिसरं कुटुंब या गृहस्थाच्या मुलाचं आहे. हा मुलगा गे आहे. तो, त्याचा साथीदार (शब्द अधिक योग्य वाटतो! 'नवरा' आणि 'बायको' म्हटल्यावर ज्या स्वाभाविक पण तरी कधीकधी नकोशा वाटणाऱ्या छटा जाणवतात त्या एकदम पुसून निघतात. अर्थात मालिकेत हे दोघेही लग्न करतातच.) आणि त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी असं तिसरं कुटुंब. ही तीन कुटुंबं आणि या मंडळींचे परस्परसंबंध, त्यांच्यातलं प्रेम आणि मारामाऱ्या, इतर उपकथानकं अशी एकूण मनोरंजक मालिका आहे. यातल्या गे जोडप्याच्या चित्रणाबाबत मी थोडा विशेष उत्सुक होतो कारण हे चित्रण प्रथमच बघायला मिळत होतं. अमेरिकेतील किंवा अन्य ठिकाणच्या गे लोकांचं या चित्रणाबाबत काय म्हणणं आहे याचा शोध अद्याप तरी मी घेतलेला नाही, पण मला हे चित्रण आवडलं. 

मालिकेतील एका भागात या दोन्ही पुरूषांच्या चुंबनाचा एक प्रसंग आहे. जेव्हा तो सीन सुरू होत होता तेव्हा मी मला स्वतःला मुद्दाम आतमध्ये निरखत होतो. दोन पुरूषांचं चुंबन दृश्य तोवर मी पाहिलं नव्हतं. (एके काळी हिंदी चित्रपटांतून समलिंगी संबंधांची फक्त टवाळीच केली जायची. नंतर त्याकडे गांभीर्याने पाहिलं जाऊ लागलं. 'दोस्ताना' या चित्रपटात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचं एक चुंबनदृश्य होतं. ते स्पष्टपणे चित्रित केलं गेलं नव्हतं. अलीकडे हिंदी चित्रपटाला शंभर वर्षं पूर्ण झाल्याबद्दल 'बॉम्बे टॉकीज' हा चार स्वतंत्र लघुकथांचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील करण जोहरने दिग्दर्शित केलेल्या कथेत दोन पुरुषांचं चुंबन दृश्य स्पष्टपणे चित्रित केलं गेलं होतं.) त्या दोघांनी एकमेकांचं चुंबन घेतलं तेव्हा माझ्या मनात नक्की काय काय उमटलं याची मी नोंद ठेवली होती. मला ते दृश्य सहजपणे बघता आलं असलं तरी स्री-पुरूषाचं चुंबन पाहतानाची सहजता त्यात होती असं मी खात्रीशीरपणे सांगू शकत नव्हतो. यातला एक भाग असा की त्यात मला चुकीचं काहीच वाटत नव्हतं हे पूर्णपणे खरं, पण मला त्याची 'सवय' नव्हती. त्यामुळे अगदी एक क्षण मला जो 'वेगळेपणा' जाणवला तो त्या सवयीच्या अभावी जाणवला होता. पण तो अगदी एक क्षणच होता. त्यातून बाहेर येऊन मी पुढे बघू लागलो. 

एखाद्या नवीन गोष्टीचा स्वीकार/अस्वीकार करणं याला दोन-तीन बाजू आहेत. एक म्हणजे ती गोष्ट अयोग्य वाटून अजिबातच स्वीकारता न येणं. दुसरी म्हणजे ती गोष्ट तत्त्वतः मान्य असणं, पण स्वीकारायला जड जाणं आणि तिसरी म्हणजे ती थोड्याच प्रयत्नांनी किंवा अगदी सहजदेखील स्वीकारून पुढे जाणं. आपण स्वीकृत केलेल्या गोष्टींचा नकळत आपल्या मनात एक 'साचा' तयार होतो आणि हा साचाच फक्त योग्य आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्याबाहेरचं काही दिसलं की आपल्याला ते योग्य वाटत नाही किंवा स्वीकारता येत नाही. 

पण यात एक मेख आहे. आणि त्यावर नीट विचार केला पाहिजे. या सदरातील अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे 'क्ष' नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे 'य' नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे पाहायला नको. हे पुन्हा एकदा इथे नोंदवू. यात म्हणायचं असं आहे की एकाची परंपरा दुसऱ्याची नवता असू शकते. हे उलटही असू शकतं. आता या पार्श्वभूमीवर अमुक इतक्या अंतरावर पोचलेला मनुष्य आधुनिक आणि त्याच्या मागे असलेला मनुष्य पारंपरिक असं म्हणता येईल का? वर दिलेलं उदाहरण घेऊ. दोन पुरूषांचं चुंबन बघणं एखाद्याला फारसं जड गेलं नाही. हेच दुसऱ्या एखाद्याला फारच अवघड गेलं. तिसरा एक असा आहे की त्याला चुंबन दृश्य दाखवणंच गैर वाटतं. चौथा एक असा आहे की ज्याला समलिंगी संबंधच मान्य नाहीत. आता या सगळ्यांमध्ये आधुनिक कोण आणि पारंपरिक कोण असं विचारलं तर पहिला मनुष्य आधुनिक आहे असं आपण म्हणू. पण त्याला दोन पुरूषांचं नातं मान्य आहे. तीन पुरूषांचे परस्पर प्रेमसंबंध आहेत हे त्याला मान्य होत नाही. मग तो आधुनिक होतो का?

मला जाणवलेलं एक सत्य असं आहे की आपण सगळे वेगवेगळा पायऱ्यांवर उभे असतो. आणि त्यावरून आपल्यात संघर्ष सुरू असतो. म्हणजे मी ज्या पायरीवर उभा आहे तिथून मला समोरचं सुंदर दृश्य दिसतंय. ते इतरांना दिसत नाही म्हणून मी त्रागा करून घेतो. पण माझ्या हे लक्षात येत नाही की मी जिथे उभा आहे तिथे यायला इतरांना अजून वेळ लागणार आहे. माझ्यापुढे निघून गेलेल्या काहींना माझ्याबद्दल हेच वाटत असेल. इथे आपण तात्त्विक संघर्षापाशी येतो. आधुनिकता म्हणजे नक्की काय आणि परंपरा म्हणजे नक्की काय हे प्रश्न आपल्याला पडतात. 

'एव्हरी वॉर इन द वर्ल्ड इज द वॉर ऑफ डेफिनेशन्स' असं म्हटलं जातं. आधुनिकता आणि परंपरेच्या बाबतीत हे वॉर सुरू असतं याचंही कारण हेच आहे. पण मग हा तिढा सुटणार कसा? मला याचं उत्तर असं दिसतं की विशिष्ट क्षणी, विशिष्ट ठिकाणी जे बल प्रभावी असेल ते जिंकेल. एखाद्या समाजात विशिष्ट कालखंडात विशिष्ट धारणा का प्रभावी असतात याची कारणं संमिश्र आहेत. त्या बदलतात कशा याचंही उत्तर संमिश्र आहे. वैचारिक प्रबोधन, तांत्रिक प्रगती, त्या त्या समाजाची विशिष्ट 'वीण' आणि त्यातून घडलेली विशिष्ट मानसिकता असे विविध घटक त्याला कारणीभूत असतात. 

यातला तिसरा घटक मला विशेष प्रभावशाली वाटतो. 'मेंढा-लेखा' या गावाचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गडचिरोली जिल्ह्यातील या लहानशा गावाने आपल्या परिसरातील वनावर सामूहिक हक्काचा दावा २००९ साली मान्य करून घेतला. असं करणारं हे देशातील पहिलं गाव आहे. या गावाचं वैशिष्ट्य असं की इथल्या ग्रामसभेत सर्वसहमतीने निर्णय घेतले जातात. ('गोष्ट मेंढा लेखाची' या मिलिंद बोकील लिखित पुस्तकात या गावाची प्रेरणादायक कथा वाचता येईल). तिथे गेलो असताना तिथले ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल मला म्हणाले की सर्वसहमतीचं तत्त्व, सामूहिक वनहक्क या गोष्टी इथे यशस्वी झाल्या कारण मुळात या गावातील लोकांमध्ये एक वेगळेपण आहे. त्यांचं हे म्हणणं माझ्या लक्षात राहिलं होतं. ही मानसिकता कशी घडवायची हाच एक प्रश्न असतो. 

परंपरा आणि आधुनिकतेसंदर्भात चर्चा करताना त्यातील तात्त्विक स्पष्टतेचा मुद्दा लक्षात घेऊन आपण पुढे गेलो तर आपला मार्ग सुकर होतो. पण माणसाच्या मुक्ततेची नवी दिशा दाखवणाऱ्या विशिष्ट आधुनिकेतचा आग्रह धरणं हेही अपरिहार्य असतं. मानवी नातेसंबंध या आधुनिकेतच्या कक्षेत येतात. आपण सहसा नातेसंबंधांबाबत प्रयोग करायला कचरतो. ते केले पाहिजेत. विज्ञान जसं प्रयोगाशिवाय पुढे जाऊ शकत नाही तसंच कौटुंबिक-सामाजिक रचनासुद्धा नातेसंबंधातील प्रयोगाशिवाय सुदृढ राहू शकत नाही. यापुढील काही लेखांमध्ये नातेसंबंधांच्या नव्या रचनेबाबत आपण चर्चा करू.   

Saturday, April 14, 2018

'आँखों देखी' ची दृष्टी

इंग्लिश भाषेत 'अनलर्निंग' हा एक चांगला शब्द आहे. इंग्लिशमधील 'डिझर्व्ह' ला जसा चपखल मराठी शब्द सापडत नाही तसंच  'अनलर्निंग' बाबतही म्हणता येईल. आपण आजवर जे पाहिलं, अनुभवलं त्यातून आणि औपचारिक शिक्षणातून जे शिकलो ते थोडं बाजूला ठेवून नव्या दृष्टीने, नव्या बाजूने काही शिकणं म्हणजे 'अनलर्निंग'. गेल्या २-३ लेखांमध्ये आपण प्रश्न विचारण्याबद्दल बोलतो आहोत. 'अनलर्निंग' ही प्रश्न विचारण्याला समांतर अशी एक प्रक्रिया आहे. हाच धागा धरून मला या लेखात एका चित्रपटाबाबत काही सांगायचं आहे. 

'सिनेमा' हा एकूणातच माझ्या प्रेमाचा विषय आहे. 'गोष्ट सांगण्याचं' अतिशय प्रभावी माध्यम म्हणजे सिनेमा. कथा, सादरीकरण, अभिनय, संगीत अशा विविध अंगांनी आपल्याला अनेक चित्रपट आवडतात. पण काही चित्रपट असे असतात की ते पुसता येणार नाही असा ठसा उमटवतात. हिंदी, मराठी व इंग्लिश भाषेतील अनेक चित्रपटांनी माझ्या बाबतीत हे केलं. लेखनविश्वात जसे कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांसोबतच वैचारिक लेखन हाही एक प्रकार असतो तसाच 'वैचारिक चित्रपट' असा एक प्रकार मला करावासा वाटतो. २०१३ साली रजत कपूर या दिग्दर्शकाचा 'आँखो देखी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट लिहिलाही त्यानेच होता. तुमच्यापैकी काहींनी तो पाहिला असेल. हा चित्रपट काही फारसा चालला नाही. (चांगल्या, काहीतरी वेगळं देणाऱ्या चित्रपटाचं जे होतं तेच याचंही झालं.) रजत कपूरचे 'मिक्स्ड डबल्स', 'मिथ्या' हे चित्रपट अतिशय प्रभावी होते. 'वैचारिक' दृष्ट्या प्रेक्षकाला हलवण्याची क्षमता असलेले जे मोजके दिग्दर्शक आहेत, त्यातला हा एक दिग्दर्शक. त्यामुळे त्याचा हाही चित्रपट वेगळा असणार याची खात्री होती. पण चित्रपट पाहिल्यावर मात्र मी रजत कपूरला दंडवतच घातला. 

दिल्लीच्या एका गजबजलेल्या भागात राहणारं एक मध्यमवर्गीय कुटुंब. अगदी सरळसोट. कुठल्याही इतर चार कुटुंबांसारखं. आपला कथानायक म्हणजे या कुटुंबाचा प्रमुख - पन्नाशीच्या पुढचा एक गृहस्थ. बायको, एक मुलगी, एक मुलगा, धाकटा भाऊ, त्याची बायको आणि मुलगा असं एकत्र कुटुंब. एके दिवशी कुणीतरी वार्ता आणतं की घरातल्या मुलीचं अमुक एका मुलाबरोबर 'प्रकरण' सुरु आहे आणि तो मुलगा काही चांगला नाही. झालं! हे ऐकून आपला कथानायक, त्याचा भाऊ, मेव्हणा, आसपासची दोन टाळकी असे सगळे मिळून त्या मुलाचा समाचार घ्यायला म्हणून निघतात. मात्र त्या मुलाला प्रत्यक्ष भेटल्यावर जेव्हा तो थोड्याश्या दटावणीनंतर रडू लागतो तेव्हा कथानायकाच्या लक्षात येतं की हा तर अगदीच सरळ-साधा मुलगा आहे. आपलंच चुकलं. घरी आल्यावर तो विचारात पडतो. त्याच्या लक्षात येतं की आपण फार चटकन विश्वास ठेवतो कुणावरही. आपल्या डोक्यात लहानपणापासून गोष्टी घुसवल्या जातात, आपल्या आजूबाजूचं जग ओरडून आपल्याला अनेक गोष्टी सांगत असतं आणि आपण ते निमूटपणे होऊ देतो. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तो घरात जाहीर करतो की आजपासून मी कुठल्याही ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. प्रत्येक गोष्टीला पारखून घेईन, प्रश्न विचारेन, स्वतः अनुभव घेईन आणि मगच माझा निर्णय घेईन. नव्या निश्चयाच्या उमेदीने तो घराबाहेर पडतो. पुढे काय होतं हे प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे. पण तरी तो घराबाहेर पडल्यानंतर लगेचचा प्रसंग सांगायचा मोह टाळता येत नाही. बाहेर पडल्या पडल्या त्याला त्याच्या गल्लीतले परिचयाचे पुजारी भेटतात. त्याला प्रसाद देतात. हातातला प्रसाद निरखून बघत तो एक क्षण थबकतो, मग प्रसाद खातो आणि म्हणतो 'हा कलाकंद होता. गोड होता. चांगला होता.' त्यावर पुजारी परत 'हा प्रसाद आहे' असं सांगतात. तरी तो  'हा कलाकंद होता. गोड होता', एवढंच म्हणत त्यांना निरोप देतो.

'मला एवढं समजलं' या बिंदूपाशी निग्रहाने थांबायचा त्याचा प्रयत्न त्याला मुक्ततेचा अनुभव देतो. पन्नाशीच्या पुढचा हा गृहस्थ  'अनलर्निंग' चा मार्ग स्वीकारतो आणि त्याचा हा सगळा प्रवास प्रेक्षकांसाठी देखील डोळे उघडणारा ठरतो. एका प्रसंगात तर मी त्याला बसल्या जागेवरून टाळीच दिली. 'वस्तू हातातून सोडली की ती खाली पडते यातलं मला फक्त 'ती खाली पडते' एवढंच समजलं, ती का खाली पडते हे मला माहीत नाही' असं याने म्हटल्यावर एकजण 'ती गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते' असं अपेक्षित उत्तर देतो. त्यावर हा 'तुझ्याकडे बघून तुला गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय हे कळतं आहे असं वाटत नाही' असं म्हणतो. आता यावर मी खरंच विचार केला, न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला होता, गुरुत्व बल ९.८ मीटर्स / सेकंदाचा वर्ग इतकं असतं हे आपणही शिकलोय. पण हे सगळं 'मला' नक्की कितपत कळतंय ? 'गुरुत्वाकर्षण' म्हणजे काय हे मी विस्तृतपणे, सप्रमाण दाखवून देऊ शकतो का? तर नाही. 

'आँखों देखी'च्या नायकाची 'एन्क्वायरी'ची जी पद्धत आहे ती आपल्याला बरंच काही देऊन जाते. या चित्रपटाने माझ्यावर फार परिणाम केला. माहिती, ज्ञान आणि पुढे 'माझी मनोभूमिका' या साखळी प्रक्रियेमध्ये आपण शांत, निगर्वी, 'विद्यार्थी' भूमिकेमध्ये असायला हवं हे समजणं मला 'आतमध्ये' शांत करून गेलं. बरं, चित्रपटात त्याचा दृष्टीकोन सतत, संपूर्णपणे संशयवादी असाही नाही. काही बाबतीत स्वतःला अनुभव नसला, माहीत नसलं तरी दुसऱ्याला झालेलं ज्ञानही मी स्वीकारलं पाहिजे याला त्याची तयारी आहे. पण मी आधी लिहिलं तसं हे सगळं प्रत्यक्ष बघण्यात मजा आहे. 

या चित्रपटाचं मोठं वैशिष्ट्य हे की तो अगदी साध्या माणसातल्या वैचारिक परिवर्तनाची गोष्ट सांगतो. आणि त्यात कसलाही अभिनिवेश नाही. चित्रपटाला कथानायकाच्या मुलीच्या लग्नाची पार्श्वभूमी आहे, कथानायक आणि त्याच्या भावामधल्या संघर्षाची डूब आहे, मध्यमवर्गीय जगण्याचे अनेक संदर्भ आहेत. चित्रपट बघताना ही गोष्ट आपल्या शेजारच्या घरात घडते आहे असं वाटत राहतं. कथानायकाच्या वैचारिक उलाघालीच्या पार्श्वभूमीवर इतर सगळी माणसं, त्याच्या स्वतःच्या मानवी मर्यादा हे सगळं आपलं वाटतं. मागच्या लेखात मी म्हटलं होतं तसं संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. 'आँखों देखी' चा नायक नेमकं हेच करतो.     
आकलनासाठी आवश्यक अशा 'एन्क्वायरी'च्या पहिल्या पायरीवर या नायकासारखा पुरेसा काळ न घालवल्यानं पुढच्या पायऱ्यांवर अडचणी येतात. कारण सुरूवातच चुकलेली असते. विशेष म्हणजे 'मला एवढं माहीत आहे, पुढचं माहीत नाही' ही भूमिका, ही जाणीव परंपरा असो की नवता - दोन्ही ठिकाणी लागू होते. म्हणजे असं की परंपरेचं पालन करताना 'हे परंपरेचं पालन आहे' इथेच थांबून परंपरा पालनाच्या पुष्ट्यर्थ तोकडे दावे केले गेले नाहीत तरी पुष्कळ होईल. आणि नवतेच्या बाबतीत 'हा प्रयोग आहे. याच्या परिणामांसाठी तयार राहूया' असा मोकळेपणा असेल तर ते हितकारक ठरेल.          

आज टीव्हीच्या आणि समाजमाध्यमांच्या रेट्यामुळे अनावश्यक माहितीची, अर्धवट ज्ञानाची आणि असत्याची भीतीदायक घुसळण होते आहे. त्यातून माणसांची मनंही अस्थिर होत आहेत, आपल्यापर्यंत आलेले माहितीचे तुकडे कसलीही शहानिशा न करता खरे मानले जातायत. अशा वेळी 'आँखों देखी'च्या दृष्टीचं महत्त्व पटल्यावाचून राहत नाही. आज आपल्याकडे जी सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरणाची परिस्थिती दिसते आहे त्यात तर ही दृष्टी औषधाचं काम करू शकेल!

Saturday, March 31, 2018

का आणि कसं?

माझी एक फार जुनी इच्छा आहे. गमतीशीर वाटेल. पण आहे. रस्त्यात किरकोळ अपघात बरेचदा घडतात. एखादी गाडी दुसरीला ठोकते. कधी वेगामुळे, कधी 'ब्लाइंड टर्न'वर दोन वाहनांची टक्कर होते. आमच्या घरासमोर एक छोटा चौक आहे. तिथे असं बरेचदा घडतं. गंभीर स्वरूपाचं कधी काही घडलेलं नाही. पण किरकोळ धक्का आणि परिणामी शाब्दिक बुक्की असा एक कार्यक्रम होतो. या कायक्रमात दोघेहीजण 'मी कसा बरोबर होतो' हे प्रामुख्याने सांगत एक प्रेमळ संवाद सुरू करतात. पुलंची 'म्हैस' आठवायची झाली तर 'बा'चा'बा'ची सुरू होते! तर माझी इच्छा ही की कधीतरी आपल्याला असं दृश्य बघायला मिळेल ज्यात ज्यांचा अपघात झाला आहे ते दोघे शांतपणे 'हा अपघात नक्की का आणि कसा घडला'याची चर्चा करतील, एका निष्कर्षावर येतील आणि तोडगा काढून आपल्या वाटेने निघून जातील. आजही लोक तोडगा काढतातच, पण ती प्रक्रिया काही सुखावह नसते. 

'प्रश्न विचारण्याने आपण असा काय तीर मारणार आहोत?'असा प्रश्न प्रश्न विचारायच्या वृत्तीवर केला जाऊ शकतो असं मागच्या लेखाच्या शेवटी आपण म्हटलं होतं. त्याचं एक उत्तर म्हणून वर दिलेल्या उदाहरणाकडे आपल्याला बघता येईल. अपघात तर झाला आहे, कुणाची तरी किंवा दोघांचीही चूक तर आहेच, नुकसान तर झालंच आहे - तर आता 'हे का झालं?' हा प्रश्नच विचारला नाही तर घटनेचा उलगडा कसा होणार? पण प्रश्न न विचारल्याने 'मी बरोबर होतो. चूक त्याची आहे' या गृहीतकानेच वाद सुरू होतो. किंबहुना 'माझं बरोबरच आहे' हे गृहीत धरून जे काही बोललं जातं ती चर्चा किंवा विश्लेषण नसून 'वाद' असतो. (विचारधारांचे 'वाद' होण्याच्या मुळाशी हाच धागा असतो हे लक्षात येईल.) त्यामुळे 'अपघात कसा झाला?' हा प्रश्न विचारणं अत्यावश्यक आहे. 'मी बरोबरच होतो' हे विधान करणं अनावश्यक आहे. कारण मग विश्लेषण होऊच शकत नाही, उत्तर मिळू शकत नाही. 

'प्रश्न विचारणं' या गोष्टीचं महत्त्व अतिव्यापक आहे. मी ज्या पेनाने हा लेख लिहिला आणि नंतर ज्या कीबोर्डवर मी तो टाईप केला ते पेन, कीबोर्ड, कंप्यूटर या वस्तू निर्माण कशा झाल्या हे मला माहीत नाही. म्हणजे या वस्तू कारखान्यात तयार होतात एवढंच मला माहीत आहे. मला निर्मिती प्रक्रिया माहीत नाही. माझ्या मनात विविध विचार येतात, विकारही येतात, मी माझ्या परीने विश्लेषण करतो - हे कसं होतं, मी ते का करतो याचं निश्चित उत्तर माझ्याकडे नाही. थोडक्यात माझ्या आसपास मी पाहिलं तर मला शेकडो प्रश्नांची मालिका दिसते आणि आपण अज्ञानी आहोत ही माझी जाणीव तीव्र होत जाते. पण या प्रश्नमालिकेमुळे आणि आपण अज्ञानी आहोत या जाणिवेमुळे मी एकाच वेळी अस्वस्थ होतो आणि शांतही होतो. 

अस्वस्थ वाटतं कारण आपल्याला आपल्या मर्यादांची जाणीव होते. पण त्याचबरोबर शांत वाटतं कारण 'आपल्याला जाणीव झाली आहे' याची जाणीव होते आणि आपला रस्ता योग्य आहे, या रस्त्याने गेलो तरच आपल्याला थोडं काही कळू शकेल हेही जाणवतं. जगात 'कारणांचा पसारा' इतका आहे की तो आवरणं जवळजवळ अशक्य आहे. पण जर माझ्या मनात प्रश्न असतील तर माझ्या कुठल्याही कृतीची प्रस्तुतता, योग्यायोग्यता ठरवायला मला मदत होते. दुसरं म्हणजे एखाद्या जरी प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं तेव्हा होणारा आनंद अवर्णनीय असतो. 'आध्यात्मिक' या शब्दाला आज फार वेगवेगळे अर्थ आणि संदर्भ येऊन चिकटले आहेत. मी या शब्दाकडे 'एखादी प्रखर अनुभूती', 'मी आणि सृष्टी यांच्यातील एकत्व जाणवण्याचा क्षण', 'ज्ञानजाणीव' अशा अर्थांनी बघतो. उत्तर सापडण्याचा आनंद हा अशाच स्वरूपाचा असतो. जगातील अनेक संशोधकांना, शास्त्रज्ञांना याचा अनुभव असतो. आर्किमिडीज 'युरेका' असं ओरडत अंघोळ अर्धवट सोडून बाहेर आला ही गोष्ट आपण वाचलेली असते. पण त्या क्षणाचा आनंद फक्त आर्किमिडीजलाच माहीत असतो. हा आनंद महत्त्वाचा आहे कारण असा आनंद जेव्हा जेव्हा कुणाला झाला आहे तेव्हा माणसाने इतिहासात एक पाऊल पुढे टाकलं आहे. आर्किमिडीज किंवा इतर मोठ्या संशोधकांइतकी बौद्धिक चिकाटी आपल्याकडे नसेल, पण तरीही आपल्या ज्ञानाच्या मर्यादित परिघातदेखील हा आनंद आपल्याला मिळवता येऊ शकतो. म्हणून प्रश्न विचारण्याचं महत्त्व आहे. 

स्री-पुरूष संबंध, या दोघांची जीवशास्त्रीय आणि सामाजिक घडण, त्यांच्या लैंगिक संबंधांचं विश्व हा माझ्या आस्थेचा विषय आहे. पौगंडावस्थेपासून आत्तापर्यंत पुरूष म्हणून आणि माणूस म्हणून मी वेगवेगळ्या अनुभवांतून, जाणिवांतून गेलो. पुरूषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीवर अन्याय होतो, तिचं शोषण होतं. हे थांबलं पाहिजे. त्यासाठी पुरूषांनी पुढे यायला पाहिजे हे तर कधीच उमगलं होतं. पण 'पुरूष विशिष्ट प्रकारे वागतो ते का?' हा विचार सुरू झाला, पुरूषाच्या (आणि स्त्रीच्याही) लैंगिक मनोविश्वाचा मानवी उत्क्रान्तीच्या आधारे थोडा अभ्यास केला तेव्हा काही गोष्टी नव्याने समजल्या. 'पुरूष बलात्कार करतो' या विधानानंतर अर्थातच 'हे वाईट आहे, भयंकर आहे. पुरूषांमध्ये सुधारणा व्हायला हवी आहे' ही विधाने येतात. पण 'पुरूष बलात्कार का करतो?' हा प्रश्न विचारला की संशोधनाची सुरूवात होते. 'संवेदना' आणि 'संशोधन' या दोन्ही परस्परपूरक गोष्टी आहेत. केवळ संवेदना असेल तर उत्तर सापडणार नाही. केवळ संशोधन असेल तर संशोधनाचा उचित उपयोग कसा करायचा, संशोधन 'राबवायचं' कसं हे कळणार नाही. संवेदनेतून कार्यकारणभाव कळत नाही. तो संशोधनातूनच कळू शकतो. 'पुरूष असा का वागतो?' हा प्रश्न आणि पुढचा अभ्यास हा माझ्यासाठी 'युरेका' क्षण होता. हेच लग्नसंस्थेबाबतही झालं. 'नवरा' हा प्रॉब्लेम नाही आहे आणि 'बायको' हाही प्रॉब्लेम नाही आहे - प्रॉब्लेम 'लग्न' हा आहे याची जाणीव झाली तेव्हा लग्नसंस्थेमध्ये लवचीकता कशी आणता येईल असा विचार सुरू झाला. स्त्री-पुरूष संबंधांचं 'गतिशास्त्र' (डायनॅमिक्स) पाहताना प्रत्येक ठिकाणी 'का?' हा प्रश्न विचारला तरच आपण उत्तरांकडे जाऊ, अन्यथा संवेदनेमध्ये अडकून राहू हे जाणवणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. 

प्रख्यात इतिहास संशोधक इ. एच. कार यांचं इतिहासाच्या अभ्यासाबाबतचं एक अवतरण आहे. 'व्हॉट इज हिस्टरी?' या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात की इतिहासाचा अभ्यास म्हणजे केवळ घटनांचा अभ्यास नव्हे तर घटनेमागच्या कारणांचा अभ्यास. खरा इतिहासकार आणि अधिक व्यापकपणे - खरा विचारवंत, म्हणजे 'का?' हा प्रश्न सतत विचारणारा मनुष्य. त्यांचं हे म्हणणं इतिहासच नव्हे तर सर्वच क्षेत्रातील संशोधनाबाबतचं सार्वकालिक सत्य सांगतं.               

संशोधन ही फक्त प्रयोगशाळेतच करायची गोष्ट आहे असं नाही. आपण 'का?' हा प्रश्न आपल्या दैनंदिन जगण्याशी संबंधित गोष्टींबाबत दैनंदिन जगण्याच्या ठिकाणीच विचारू शकतो. तसा तो विचारला तर आपल्याला नव्या वाटा सापडतात. आपल्यापैकी प्रत्येकाची काही बलस्थाने आहेत, काही मर्यादा आहेत. व्यक्तिशः आपण जगात किती सकारात्मक बदल घडवू शकतो हे सांगता येणार नाही. पण प्रश्न विचारायची, विविध बाजूंनी विश्लेषण करण्याची वृत्ती जरी आपण अंगिकारली तरी याचा एकत्रित परिणाम म्हणूनसुद्धा अनेक गोष्टी सुकर होतील. 

Saturday, March 17, 2018

प्रश्न प्रश्न विचारण्याचा आहे

'तत्त्वज्ञान म्हणजे काय?' हा प्रश्न म्हणजे तत्त्वज्ञान स्वतः प्रत्येक गोष्टीबाबत जो प्रश्न विचारतं त्याच प्रकारचा  प्रश्न आहे. त्याची विविध अंगांनी उत्तरेही दिली गेली आहेत. मला स्वतःला तत्त्वज्ञान म्हणजे संकल्पनांची चर्चा, संकल्पनांचे विश्लेषण आहे असं वाटतं. विश्वाच्या उत्पत्तीपासून ते या विश्वाचा घटक असलेल्या माणसाच्या मनापर्यंतचे अनेक विषय तत्त्वज्ञानाच्या कक्षेत येतात. गेल्या काही शतकांतील वैज्ञानिक संशोधनाने तत्त्वज्ञानाच्या कक्षेतील काही प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत आणले. माणसाला दुःख होतं ते का हा प्रश्न तात्त्विक अंगाने चर्चिला जाऊ शकतो, पण दुःख नामक जाणीव जेव्हा होते तेव्हा मानवी मेंदूत नक्की काय घडतं, कोणती रसायने स्रवतात हे विज्ञान शोधू शकतं. दुःखाप्रमाणेच इतर भाव-भावनांनाही हे लागू होईल. मानवी जाणिवेचा संपूर्ण खुलासा, जाणिवेचं संपूर्ण आकलन अजून झालेलं नसलं तरी जाणीव ही गूढ अशी बाब नसून ती मुळात भौतिक गोष्ट आहे, रासायनिक क्रियांचा जाणीव हा परिणाम आहे इथपर्यंत विज्ञान आलं आहे. विज्ञान सततच्या प्रयत्नांतून अनेक गुंते सोडवू शकतं. त्यामुळे आपल्या सर्व समस्यांवरचा मार्ग विज्ञानच दाखवू शकेल याविषयी शंका नसली तरी तत्त्वज्ञान संकल्पनात्मक, मूल्यात्मक झगड्यात कळीची भूमिका बजावत असल्याने आपण तत्त्वज्ञानाला टाळू शकत नाही. तत्त्वज्ञान हा शब्द आणि हा विषय रूक्ष किंवा अवघड वाटला तरी प्रत्येक व्यक्ती जगताना तिचं तिचं म्हणून एक तत्त्वज्ञान घेऊनच जगत असते. व्यक्ती जे लहान-मोठे निर्णय घेते त्याला तिच्या तत्त्वज्ञानाचाच आधार असतो. 

लेखाच्या सुरुवातीलाच तत्त्वज्ञानाचा आधार घ्यावासा वाटला याला कारणही तसंच आहे. मी एक चांगला संशयात्मा आहे. त्यामुळे 'आपल्याला आत्ता जे वाटतंय ते बरोबर आहे का?' हा प्रश्न माझ्या मनात वरचेवर येत असतो. आपण काहीएक मत-निरीक्षण-विचार मांडतो. यात समता व स्वांतत्र्यासारख्या मूलभूत मूल्यांना उचलून धरणारे जे विचार आहेत त्यांच्याबाबत मला शंका नसते, पण इतर बाबतीत मनामध्ये संघर्ष होत असतो. खरं तर समता व स्वांतत्र्य या संकल्पनांबाबतही प्रत्यक्षातील मानवी जगण्याच्या संदर्भात, या संकल्पनांच्या नेमक्या अर्थाच्या संदर्भात चर्चा होऊ शकते. पण या मूल्यांचे जे साधारण स्वरूप आहे त्याबाबत मूलभूत तात्त्विक मतभेद नाहीत हे खरं. इतर बऱ्याच बाबतीत (म्हणजे सामाजिक विश्लेषणासंदर्भात) होतं असं की सामाजिक, आर्थिक, राजकीय बले इतकी जोरदार असतात की आपण नक्की कुठल्या स्थानावरून बोलायचं असा प्रश्न पडतो. 

गेल्या दोन लेखांमध्ये श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत लिहिल्यानंतर असं जाणवलं की या विशिष्ट विषयाचा संबंध माणसाच्या मानसिक घडणीशी, त्याच्या सामाजिक स्थानाशी आहे हे खरं पण या सगळ्याची नोंद घेऊन, आपल्या मनातील विचारकलहाला लक्षात घेऊन आपल्याला एका ‘किमान साधारण भूमिके’वर यावं लागतं. असं नाही केलं तर परिवर्तनाचा मार्गच आखला न जाण्याची भीती असते. 

ही ‘किमान साधारण भूमिका’ कोणती? तर 'प्रश्न विचारणं' ही ती भूमिका आहे. मला वाटतं की दिवसाच्या शेवटी आपल्याला एखाद-दोन तरी प्रश्न पडले असतील तर तो दिवस कारणी लागला असं म्हणायला हरकत नाही! आणि ते प्रश्न फार अवघड असावेत असंही नाही. जग निर्माण कसं झालं किंवा सजीव निर्माण कसे झाले हे मोठे प्रश्न आहेत. पण रोजच्या जगण्याशी संबंधित प्रश्नदेखील पडावेत. प्रश्नांची ही रेंज कुटुंबव्यवस्था, नातेसंबंध इथपासून ते समाजव्यवस्थेपर्यंत असू शकते, असावी. सॉक्रेटिस या ग्रीक तत्वज्ञाची प्रश्न विचारून गोष्टी समजून घ्यायची पद्धत होती. 'सॉक्रेटिक डिबेट' या नावाने ती ओळखली जाते. एखाद्या विधानाची, मताची, दृष्टीकोनाची वेगवेगळ्या बाजूंनी, तर्कशास्त्राचे निकष लावूनउलटतपासणी करणे हे यातलं मुख्य सूत्र आहे. पद्धतीच्या तपशीलात जायची आवश्यकता नाही, पण यातला गाभा लक्षात घ्यायला हवा. प्रश्न विचारणे आणि त्यातून 'क्रिटिकल थिंकिंग' (विश्लेषणात्मक विचारपद्धती) विकसित करणे हा तो गाभा आहे. माणसाच्या उत्क्रान्तीच्या प्रवासात त्याने दोन प्रवृत्ती जपलेल्या आहेत. एक म्हणजे 'फाईट' आणि दुसरी म्हणजे 'फ्लाईट'. पहिली प्रवृत्ती त्याला आव्हानांशी लढायला लावते आणि दुसरी त्याला आव्हानांपासून पळून जायला लावते. आदिम संदर्भात या दोन्हीमध्ये चूक-बरोबर ठरवणं अप्रस्तुत होईल. कारण जगण्याच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरता या दोघातलं जमेल ते करणं भाग होतं. या प्रवृतीचे अंश माणसात आजही दिसतात. आपल्या इतरही भाव-भावना आदिम स्वरूपात आजही टिकून आहेत. परंतु या आदिम भाव-भावानांबरोबरच माणसाने प्रश्न विचारायची वृत्ती जागी ठेवली म्हणून तो पुढे येऊ शकला. आता त्याने केलेली प्रगती नेत्रदीपक असली तरी त्यातून नवीन आव्हाने उभी राहतात हा मुद्दा आहे, पण ही प्रगती साध्य करणं हे निश्चितच उल्लेखनीय आहे, गौरवास्पद आहे. या प्रगतीचे लाभार्थी पुष्कळजण आहेत. तुम्ही-मी सगळेच. मात्र गंमत ही आहे की आपण या लाभाचे धनी होण्यातच धन्यता मानतो आहोत. आपण स्वतः कदाचित तांत्रिक प्रगतीत योगदान देऊ शकणार नाही कारण त्या विषयातलं ज्ञान आपल्याकडे नाही. परंतु आपला दृष्टीकोन तरी चिकित्सक असू शकतो? ज्याला आपण 'शिक्षण' म्हणतो ते केवळ विषयांचं ज्ञान देणारं नसून 'विश्लेषक बुद्धी' विकसित करणार असावं अशी अपेक्षा तर आपण ठेवू शकतो?

परंपरा आणि परंपरेनुसार वर्तन माणसाला एक 'जमीन' मिळवून देतं हे मान्यच आहे, परंतु अधिकाधिक लोकांनी जर नवीन विचार केला, परंपरेला प्रश्न विचारले तर नवीन जमीन तयार होईल. ही मशागत झाली नाही तर नवीन काही पिकणार कसं? हे लिहिताना मला एक प्रसंग आठवला. शाळेतल्या एका जुन्या मित्राकडे गेलो होतो. त्याची बायको (तीही आमची वर्गमैत्रीण) त्यांच्या लहान मुलीचं डोकं देवापुढी टेकवायचा प्रयत्न करत होती. फार गमतीदार दृश्य होतं. ती मुलगी बिचारी काही केल्या डोकं टेकवायला तयार नव्हती. (कारण तिला मुळात काही कळतच नव्हतं). आणि माझी मैत्रीण मात्र तिला मूर्तीपुढे नतमस्तक करून सोडायच्या हट्टाला पेटली होती. माझ्या मनात विचार आला की हा आग्रह कशासाठी? माणसामध्ये नम्रता असायला हवी हे योग्यच आहे, पण ती अशाच पद्धतीने येऊ शकते का? मला स्वतःला मूल नसल्याने मला काही प्रश्नांचा सामना करावा लागलेला नाही. पण जर कुणा लहानग्याने मला प्रश्न केला की 'देव असतो का?' तर मी 'माहीत नाही' म्हणेन. देव, धर्म, जन्म, मृत्यू, सामाजिक विषमता या व इतर विषयांबाबत आपण मुलांशी स्पष्टपणे बोलायला हवं. मला असं वाटतं की आपण काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यापासून लपवून ठेवतो आणि काही गोष्टी आपल्या भीतीमुळे त्यांच्यावर लादतो. 'जर मला शिक्षा करणारी देव नामक व्यक्ती किंवा शकी नाहीच आहे तर मी चांगलं का वागू?' असा प्रश्न जर कुणी केला तर किंवा कुणाचं वर्तन अनिर्बंधतेच्या दिशेने जाताना दिसलं तर मी जे उत्तर देईन ते माणूस म्हणूनच्या माझ्या बौद्धिक उंचीचं मोजमाप करणारं असेल. माणूस म्हणून मी माझ्या स्वतःच्या आणि इतरांबरोबरच्या जगण्याचं नियमन करू शकलो, त्याला सकारात्मक वळण देऊ शकलो, तर्काचा आग्रह धरतानाच मानवी जगण्याला जो संवेदनेचा ओलावा लागतो तो टिकवून ठेवू शकलो तर माणूस म्हणूनच ते माझं श्रेय असेल. माझ्या प्रश्नांचं, माझ्या दुःखाचं, अडचणीचं उत्तर शोधायला - किमान त्यांचं नियमन करायला मला अदृश्य शक्तीवर विसंबून राहायला लागत नाही, माझ्या आसपासची माझ्यासारखी माणसंच ते काम करू शकतात हे जर शक्य झालं तर आणखी काय हवं?

प्रश्न विचारणं हे ठीक, पण प्रश्न विचारून तरी आपण असा काय तीर मारणार आहोत असा एक प्रश्न येऊ शकेल. त्यावर पुढील लेखात बोलूया. 

Saturday, February 17, 2018

श्रद्धेचं 'वर्गी'करण

'श्रद्धेची चुकलेली वाट' या मागच्या लेखानंतर याच विषयावर थोडं अजून लिहावं, थोडा अजून शोध घ्यावा असं मला वाटत होतं. लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही प्रतिक्रियांमुळे तो विचार बळावला आणि हा लेख लिहायला मी उद्युक्त झालो. 

श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघात काही फरक आहे का हा एक कळीचा प्रश्न आहे. तात्त्विकदृष्ट्या विचार केला तर  या प्रश्नाचं उत्तर 'नाही' असं द्यावं लागेल कारण श्रद्धादेखील मुळात अंतर्मनात उगवलेली, तिथे वसलेली आणि प्रश्नांच्या पलीकडची गोष्ट आहे. परंतु श्रद्धेचं अतिशय विपर्यस्त आणि हानीकारक स्वरूप म्हणजे अंधश्रद्धा असं म्हणून या दोघींमध्ये प्रत्यक्षात एक सीमारेषा आखता येईल आणि दोघी वेगळ्या आहेत असं म्हणता येईल. आपली श्रद्धा जोपासत आणि त्याचबरोबर विवेकही जागा ठेऊन गरज भासल्यास त्या श्रद्धास्थानाच्या विरोधी भूमिका घेणारा कुणी असेल तर तेही स्वागतार्ह आहे. मनाची गरज म्हणून श्रद्धा आहे, पण ती आपल्या विचारशक्तीवर मात करत नाही आहे हे चित्र आश्वासक आहे. आज आपल्याला श्रद्धा, अंधश्रद्धा, धार्मिक श्रद्धा या गोष्टींची व्यक्तीनिहाय विखुरलेली रूपे पाहायला मिळतात आणि त्यामुळे आपण जेव्हा या गोष्टीना सामोरे जातो तेव्हा त्यांच्याबाबत एकदम तुकडा पाडल्यासारखा निर्णय देता येत नाही. या सर्वच गोष्टींचा संबंध माणसाच्या मनःस्थितीशी आहे आणि इथे आपल्याला समाजातील विविध वर्ग लक्षात घ्यावेच लागतात. माणसाचं समाजातलं 'लोकेशन' काय आहे हे न तपासता त्याची मानसिकता आपल्या विचाराची फूटपट्टी लावून बघता येत नाही. एक अनुभव सांगतो. पुण्यातील 'सहेली' या वेश्याव्यवसायातील स्रियांच्या संघटनेशी मी जोडलेलो आहे. एकदा एका व्यावसायिक स्त्रीशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याचं लक्षात आलं. चौकशी केल्यावर तिने सांगितलं की जिना उतरताना पाय अडखळून पडले आणि लागलं. जखम डोळ्याच्या जवळ होती. मी म्हटलं, 'बरं झालं, थोडक्यात निभावलं.' त्यावर ती चटकन म्हणाली, "फिर? भगवान है ना...भगवान संभालता है.. ." तिच्या बोलण्यात आणि आविर्भावात 'देव आहे' याची एवढी खात्री होती की मी क्षणभर स्तिमित झालो. वेश्यांच्या घरात देवांची रेलचेल असते हे मी पाहिलं होतं. शिवाय देवावर श्रद्धा असते हे मला नवीन नव्हतंच. पण तिच्या बोलण्यात जो ठामपणा होता त्या ठामपणामागे, तिच्या 'देव' या संकल्पनेत तिला उभं राहायला आवश्यक असा एक आधार होता. त्या आधाराचा मी विचार करत होतो आणि मला पराभूत वाटत होतं. 

अशाच प्रकारचा अनुभव इतरही लोकांसंदर्भात आधी आला होता. देवाधर्माबाबत पूर्ण उदासीनता, नवीन काही करायची उर्मी, पारंपरिकतेची काहीशी चीड या प्रारंभीच्या काळापासून 'ही एकूण सगळी गुंतागुंत आहे' या विचारापर्यंतच्या प्रवासात अशा अनुभवांनी आपला ठसा माझ्या मनावर उमटवला आहे. आपण जेव्हा काही 'नवीन विचार' करतो तेव्हा तो करायची मुभा मला माझ्या सामाजिक स्थानामुळे मिळाली आहे हे लक्षात आल्यावर मला वर म्हटलं तसं पराभूतही वाटलेलं आहे. आपल्या भोवतालच्या समाजाचा आपल्याला न कळणारा प्रवाह, विविध परिस्थितीत असलेली माणसं, त्यांचं जगणं, परस्परसंबंध, त्यांचे प्रश्न, त्यांच्यावर झालेला अन्याय, त्यांचं दुखावलेपण, एकटेपण, त्यांची स्वभाववैशिष्ट्यं या सगळ्याला आपण एका सूत्रात बांधू शकतो का असा प्रश्न पडायला लागल्यावर माझा ट्रॅक थोडा बदलत गेला. दिशा बदलली नाही, पण ट्रॅक बदलला. 
वरील उदाहरणातील त्या स्त्रीशी किंवा समाजातल्या कष्टकरी वर्गातील एखाद्या माणसाशी मी श्रद्धेबाबत काय बोलू शकतो ? परिवर्तनाबाबत काय बोलू शकतो ? इथे त्याच्यावर मर्यादा येतात. कारण मी जर 'जगण्याचं मूळ डिझाइन' अधिक चांगलं करू शकत नसेन तर मला त्याच्याही पुढचं काही बोलायचा अधिकार उरतो का ? पण याची दुसरी बाजू अशी की जर 'जगण्यातील सुख-दुःखाची कारणं ईश्वरी सत्तेत / इच्छेत नाहीत तर ती मानवनिर्मित आहेत' याची जाणीव झाली नाही तर माणूस खऱ्या अर्थाने स्वतःची उन्नती साधू शकेल का? तो संघर्षाला तयार होईल का? म्हणजे मग इथेही एकच एक उत्तर नाही. इथेही आपल्याला तारतम्याने निर्णय घ्यावा लागणार आणि विशिष्ट परिस्थितीत असलेल्या माणसांना अनुकूल अशा पद्धतीने बदल घडवायचा प्रयत्न करावा लागणार. 

परिवर्तन हवं हे मान्य केलं की त्याच्या पुढचा आत्यंतिक महत्वाचा प्रश्न येतो तो हा की 'कुणाचं परिवर्तन' ? आणि यातला जो 'कुणी' आहे तो शंभर प्रकारचा आहे. त्यामुळे आपण कुणाशी बोलतोय हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. समाजात वर्गसंघर्ष सतत कार्यरत असतो. दृश्य स्वरूपात दिसला नाही तरी त्याचा अंतःप्रवाह सुरू असतोच. मानवी आकांक्षांची टक्कर होते तेव्हा तो कार्यरत असतो. ही टक्कर अगदीच क्षीण असते किंवा नसते तेव्हा तो प्रभावी नसतो इतकंच. परिवर्तनवादी विचाराने जर वर्गसंघर्ष लक्षात घेतला नाही तर ते उलट दिशेने अंगावर येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर जेव्हा मी श्रद्धेकडे बघतो तेव्हा मला जाणवतं की जो वर्ग आज सुस्थितीत आहे, शिक्षण आणि नोकरी - व्यवसायाच्या संधी ज्यांना मिळालेल्या आहेत तो वर्गदेखील चिकित्सक होऊ शकत नसेल तर ती गंभीर गोष्ट आहे. या वर्गानेही संघर्ष केला आहेच पण त्याचं फळही त्यांना मिळालेलं आहे. प्रत्येकालाच संघर्षाचं फळ मिळतं असं नाही त्यामुळे ज्यांना ते मिळालं आहे त्यांनी विश्लेषक वृत्ती ठेवावी ही अपेक्षा आहे. श्रीमंत, मध्यम आणि गरीब असं ढोबळ वर्गीकरण आपण करतो. पण मला यात दोन प्रमुख विभाग करावेसे वाटतात - आर्थिकदृष्ट्या संपन्न आणि विपन्न. ज्यांची क्रयशक्ती भरपूर आहे किंवा भरपूर नसली तरी चांगली आहे ते संपन्न वर्गात येतात. त्यांच्या क्रयशक्तीत फरक असेल, काहींकडे अतिरिक्त संपत्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात असेल तर काहींकडे त्याहून कमी असेल. परंतु दोघांनाही उद्याची भ्रांत नाही आहे. जो विपन्न वर्ग आहे त्याला उद्याची भ्रांत आहे. त्यामुळे तो 'व्हल्नरेबल' आहे. या दोघांचं मूल्यमापन करताना त्यांना वेगळे निकष लावावे लागतील. आज श्रद्धेच्या, परंपरेच्या संदर्भात संपन्न वर्गाकडे पाहिलं तर निराश व्हायला होतं कारण समाजातील हा सुरक्षित वर्ग चिकित्सक व्हायला, कृतीशील व्हायला तयार नाही. हा वर्ग धार्मिक कट्टरता, श्रद्धेचं बाजारीकरण या सगळ्याच्या विरोधी भूमिका घेताना फारसा दिसत नाही. आधुनिकता ही मोबाइल आणि इतर उपकरणांच्या वापरात नसून ती विचारपद्धतीत असावी लागते. नेमका इथेच मोठा गोंधळ झाल्याचं दिसतं. ज्या वर्गाने आधुनिकतेचं धुरीणत्व स्वीकारायचं तो वर्गदेखील प्रश्न न विचारता परंपरेचा पाईक होताना दिसतो. यात परंपरेचं अतार्किक गौरवीकरण, सामाजिक प्रश्नांबाबत विश्लेषक वृत्तीचा अभाव, रेडिमेड उत्तरांवर विश्वास या गोष्टी अधोरेखित कराव्याशा वाटतात. आणि हे फार चिंताजनक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून तुकड्या तुकड्यात जे येतं त्याला आपण ज्ञान म्हणणार असू, आपण इतिहास जर तिथे वाचणार असू तर अवघड आहे. म्हणजे मग शिक्षणाने आपल्याला माहिती दिली, पण त्यामानाने चिकित्सेची ताकद काहीच दिली नाही असं म्हणावं लागेल. 

जोपर्यंत बहुतांश मानवी व्यवहारांच्या केंद्रस्थानी पैसा आहे, पैसा माणसाला 'ड्राइव्ह' करतो आहे तोपर्यंत आपल्याला 'माणसाचं खरं मानवस्नेही रूप' दिसणार नाही अशी डाव्या विचारातील मांडणी आहे. संपन्न वर्गाची स्थितिशीलता पाहिली की यातलं तथ्य जाणवू लागतं!    

Saturday, February 3, 2018

श्रद्धेची चुकलेली वाट

समाजाने अधिक 'परिवर्तनस्नेही' होण्यासाठी सामाजिक परिवर्तनाचा ध्यास असलेल्यांचा दृष्टीकोन कसा असावा याविषयी मागच्या लेखात मी काही मुद्दे मांडले होते. या लेखात दुसऱ्या बाजूने विचार करू. म्हणजे धार्मिक-सामाजिक संदर्भात जे परंपरावादी आहेत त्यांच्यावरील जबाबदारी काय आहे ते पाहू. मागच्या लेखावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्यात नाशिकच्या एका वाचकाची प्रतिक्रिया बोलकी होती. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी अशा विविध सामाजिक वर्तुळात वावरताना काही नवीन विचार मांडणाऱ्याची कोंडी होते याचा चांगलाच अनुभव गाठीशी आहे असं त्यांनी लिहिलं होतं. हा अनुभव त्यांच्यासारखा इतरही काहींच्या गाठीशी असेल. माझ्याही गाठीशी आहे. 'आपण एकटे पडतो' अशी मला बरेचदा जाणीव होते. अर्थात या द्वंद्वातील गुंते वैचारिक वाढीच्या टप्प्यावर लक्षात येत गेले आणि मी त्यातून मार्ग काढत गेलो. प्रास्ताविकाच्या लेखात लिहिलं होतं तसं दोन माणसांमध्ये जसं द्वंद्वात्मक नातं असतं तसं दोन संकल्पनांमध्ये, विचारांमध्ये असतं. हे द्वंद्व असणार आहे,अगदी कायम असणार आहे हे लक्षात घेऊनच सर्व संबंधितांना आपलं वर्तन आखावं लागतं. या द्वंद्वात परंपरेच्या 'फंक्शन'ला समजून घ्यायची एक जबाबदारी जशी परिवर्तनवाद्यांची आहे तशीच दुसरी जबाबदारी परंपरेचं 'डिसफंक्शन' समजून घ्यायची जबाबदारी परंपरानिष्ठ लोकांचीही आहे. आणि यात कळीच्या स्थानी आहे ती 'श्रद्धा'.  

मला बरेचदा 'श्रद्धा' या शब्दापेक्षाही 'धारणा' हा शब्द योग्य वाटतो. 'धारणा' म्हणजे retentive power (ग्रहणशक्ती), understanding (समज). श्रद्धेमध्ये 'पूर्ण शरणागती' आहे, स्वतः विचार न करता विश्वास टाकणं आहे तर धारणेमध्ये थोडा तरी विचार झालेला असणं अभिप्रेत आहे. पण तरी आपण सर्वपरिचित शब्द म्हणून 'श्रद्धा' हाच शब्द वापरू आणि आपण ज्याला श्रद्धा म्हणतो ती एक प्रकारे त्या माणसाची 'समज' आहे असं गृहीत धरू. मे. पुं. रेगे यांनी त्यांच्या 'विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा' या पुस्तकात श्रद्धेविषयी महत्वाचं विवेचन केलं आहे. हे संपूर्ण पुस्तक मला या विषयातील वैचारिक स्पष्टतेसाठी महत्त्वाचं वाटतं. यातील त्यांचा 'बुद्धीप्रामाण्यवाद' हा लहानसा लेख वाचण्यासारखा आहे. 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द आपल्या चांगल्या परिचयाचा आहे. माणसाने आपल्या बुद्धीला पटेल, बुद्धीच्या कसोटीवर जे उतरेल तेच करावं असं म्हटलं जातं. आता प्रश्न असा आहे की एखादा माणूस मांजर आडवी गेली की अपशकुन होतो असं समजत असेल तर ते त्याच्या बुद्धीला पटलेलं असतं म्हणूनच तो तसं समजत असतो. अनेक सामाजिक कुप्रथा कुणाच्या तरी बुद्धीला पटणाऱ्या होत्याच. माणूस जे जे निर्णय घेतो त त्याच्या बुद्धीनेच घेतो. मग अशा बुद्धीप्रामाण्याचं काय करायचं? (रेग्यांनी पुढे यावर विस्तृतपणे लिहिलं आहे. आत्ता त्यावर लिहीत नाही, पण त्याविषयी, खरं तर या पुस्तकाविषयी, सविस्तर लिहायला आवडेल.) रेग्यांची मांडणी वाचताना मला लक्षात आलं की 'बुद्धीप्रामाण्य' हा शब्द नेहमीच सर्वत्र लागू होईल असं नाही. काही ठिकाणी तो अपुरा पडू शकतो. 'विवेकवाद' हा शब्द अधिक समर्पक आहे. या शब्दातून 'चिकित्सक वृत्ती' ध्वनित होते. हा शब्द मनुष्याच्या निर्णयक्षमतेकडे, योग्य-अयोग्य यात फरक करण्याच्या क्षमतेकडे निर्देश करतो. त्यामुळे आपल्या श्रद्धा किंवा धारणा 'बुद्धीच्या कसोटीवर' घासून बघण्यापेक्षा 'विवेकाच्या कसोटीवर' घासून बघाव्यात.   

रेगे लिहितात, 'विवेकवाद म्हणजे आपल्या समजुती, विश्वास सत्य किंवा स्वीकारार्ह ठरवण्याची किंवा असत्य आणि/किंवा त्याज्य ठरवण्याची एक विशिष्ट पद्धती आहे.'  थोडक्यात विवेकवाद ही एक प्रभावी 'तपास यंत्रणा' आहे. आपल्या ज्या काही श्रद्धा, समजुती असतील त्यांना सतत तपासत राहिलं तरच आपल्याला नवा विचार स्वीकारणं, किमान त्या विचाराला पोचपावती देणं जमू शकेल. परंपरानिष्ठ मानसिकतेची एक मुख्य अडचण अशी आहे की परंपरेने चालत आलेलं 'बरोबर' आहे आणि नवीन काहीही 'चूक' आहे अशी मनुष्याची समजूत होऊन बसते. एखाद्या नव्या गोष्टीला तपासून बघावंसं वाटणं, ती स्वीकारायला जड जाणं हे अगदीच समजण्यासारखं आहे. पण ती 'चूक' आहे असा निर्वाळा दिला जात असेल तर त्यात धोका आहे. कारण यातून सुधारणेचे मार्गच बंद होतात किंवा मला जे नवं स्वीकारता येतं तेच 'योग्य', इतर नवं 'अयोग्य' अशी मानसिकता तयार होते आणि त्याचं रूपांतर हटवादीपणात, आक्रमकतेत होतं. आपल्याकडे अशा उदाहरणांची कमतरता भासू नये!

माणसाला हळवं करणाऱ्या गोष्टीत 'श्रद्धा' अग्रस्थानी आहे. ती कुणावर, कशावर हा प्रश्नच येत नाही. ती शंकरावर, गणपतीवर, भगवद्गीतेवर, कुराणावर, दत्तगुरूंवर, ज्योतिषावर, कार्ल मार्क्सवर, महात्मा गांधींवर, हिंदुत्ववादावर - कशावरही असू शकते. आणि मग तिथे कुणी तार्किक प्रश्न केले की जो बचावाचा प्रयत्न सुरू होतो तो ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याच्या बचावाचा प्रयत्न नसतो तर आपल्या स्वतःच्या बचावाचा प्रयत्न असतो. त्यामुळे इथे एक लक्षात घ्यायला हवं की माणसाच्या जीवनात श्रद्धेचं काहीएक स्थान आहे हे मान्यच आहे, माणसाने तर्ककठोर होऊन अगदी कोरडं होऊन जावं, समर्पित भावनेचा आधार कधीच घेऊ नये अशीही अपेक्षा नाही. श्रद्धा, समर्पण या गोष्टी माणसाच्या जगण्यात 'अँकर'चं काम करत असतात हेही मान्य आहे. पण मुद्दा असा की आपण ज्या श्रद्धास्थानांवर 'विसावतो' तिथून उठून पुढच्या प्रवासाला जाणार की नाही? शिवाय तिथे पुन्हा यायची मुभा नाही असंही नाही. माणसाचा जो 'आंतरिक स्वर' आहे तो त्याला/तिला पुन्हा त्या स्थानाकडे खेचतोच. जर एखाद्या माणसाला गणपतीला नमस्कार करून किंवा ठरविक दिवशी उपास करून शांत वाटत असेल, आनंद मिळत असेल तर तो त्याला मिळू न देणं चुकीचं होईल. पण प्रश्न नमस्कारापुरता किंवा उपासापुरता मर्यादित नाही. प्रश्न वृत्तीचा आहे. आणि इथे असं दिसतं की 'श्रद्धा' ही मूळची  एका अर्थी सकारात्मक संकल्पना हळूहळू नकारात्मक होत जाते. नमस्कार करणाऱ्याला नमस्कार न करणारा खुपू लागतो आणि मग संघर्षाची ठिणगी पडते.         

आपल्या श्रद्धेची सीमारेषा आखणे हा कळीचा प्रश्न आहे आणि इथे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उगम होतो. 'विज्ञान' म्हणजे नक्की काय ही सैद्धांतिक चर्चा आपण आत्ता बाजूला ठेवू आणि असं बघू की आज धर्मश्रद्धा, परंपरा पालनाचा आग्रह याचे जे दुष्परिणाम दिसतात त्याचं काय करायचं? तर मुख्य म्हणजे सश्रद्ध, परंपरांचं पालन करणारे जे लोक आहेत त्यांनी आपल्या 'कम्फर्ट झोन' च्या बाहेर यायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा. किमान या 'कम्फर्ट झोन'च्या सीमेवर तरी यावं. आज त्यांच्या डोळ्यादेखत त्यांच्या श्रद्धेच्या विषयाचा, म्हणजे देवाधर्माचा बाजार मांडला जातो आहे. तो काही 'सश्रद्ध' लोकांनीच मांडला आहे. मग आपण जर त्या बाजाराचा भाग होत असू तर ते बरोबर आहे का हे त्यांनी स्वतःला विचारावं. या बाजारात आणि गोंगाटात निखळ श्रद्धा मुळात उरली आहे का या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी द्यावं. माझी खात्री आहे की या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळणार नाही. आज श्रद्धा खोल अंतर्मनात कमी आणि नाईलाजात, बाजारात जास्त आहे.  

श्रद्धेच्या परिणामी लोक अधिकाधिक एकारलेपणाकडे झुकतात की मुळातल्या एकारलेपणाला श्रद्धा खतपाणी घालते याचं उत्तर व्यक्तीगणिक वेगळं असू शकेल, पण आपली श्रद्धा, आपल्या समजुती ही आपली 'विचारपद्धती' होऊ लागली आहे का हा विचार प्रत्येकाने जरूर करावा. कारण श्रद्धा ही मनोवस्था होऊ शकते, विचारपद्धती होऊ शकत नाही! 

Saturday, January 20, 2018

पेशन्स फॉर परिवर्तन

पुलंनी विनोबा भावेंवर दोन लेख लिहिले आहेत. 'आम्ही सूक्ष्मात जातो' हा उपहासगर्भ लेख १९७८ सालचा आहे, तर 'मला दिसलेले विनोबा' हे व्यक्तिचित्रण १९५४ साली लिहिलेलं आहे. 'मला दिसलेले विनोबा' या लेखात एक छोटा किस्सा आहे. भूदानयात्रा सुरू आहे. देवराम नावाचा एक कार्यकर्ता विनोबांकडे गावकऱ्यांची तक्रार घेऊन येतो. लोक अडाणी आहेत, त्यांना भूदानाचं महत्त्व पटत नाही असं त्याचं म्हणणं असतं. त्यावर विनोबा म्हणतात, "अरे, लोक हुशार आहेत. अनोळखी माणसावर एकदम विश्वास टाकणारे लोक अडाणी आहेत की हुशार - सांग बघू!"

हा किस्सा मला विविध वेळी, विविध प्रसंगात आठवला आहे. मी तो बरेचदा उद्धृतही केला आहे. कुठलीही नवीन मांडणी करताना ती अशी हवी की समजून घेणाऱ्याच्या सर्व शंकांची उत्तरं ती देऊ शकेल. नवीन विचार करणाऱ्यावर जबाबदारी जास्त आहे कारण तो काहीतरी बदल करू बघतोय. तो जे मांडतो आहे त्याच्या अनेकविध बाजूंवर त्याने विचार केला आहे हे जर समोरच्याला दिसलं तर त्याचा विश्वास बळावतो. आधुनिकतेचा पुरस्कार करताना हे लक्षात ठेवावं लागतं की आपण ज्या लोकांकडे नवीन विचार घेऊन जातोय त्यांच्या काहीएक धारणा आहेत. त्यात कदाचित मूल्यदृष्ट्या चुकीच्या धारणाही असतील. पण तरी संयम बाळगून आपलं म्हणणं मांडलं तर बदलाची शक्यता वाढते. 

मला ही जाणीव एका टप्प्यावर होऊ लागली. वर उल्लेख केलेला पुलंचा लेख  मी शाळकरी वयात वाचला होता, पण त्यातला आशय पोचायaला अर्थातच काही काळ जावा लागला. आपल्याला समाजात, लोकांच्या मानसिकतेत काही बदल व्हावा असं वाटतं, जे प्रचलित आहे त्यातलं बरचसं आपल्याला पटत नाही, आपल्या मनात विद्रोह निर्माण होतो, आपण त्यातून व्यक्त होतो हे कळत होतं. मनातली हे प्रक्रिया परिचयाची झाली होती. त्याचं एक समाधानही होतं (आहे). पुढे 'मिळून साऱ्याजणी' या मासिकाशी व त्याआधी 'पुरूष उवाच' या अभ्यासगटाशी जोडला गेलो तेव्हा या सगळ्याला एक व्यासपीठ मिळालं. त्यानंतरच्या काळात 'आंदोलन', 'आजचा सुधारक' या मासिकांच्याही संपर्कात आलो. या सर्व मासिकांच्या स्वरूपात फरक असला तरी ही सर्व मासिकं विविध क्षेत्रात परिवर्तनाचा, प्रबोधनाचा प्रयत्न करणारी मासिकं होती. पुढे फेसबुक जन्माला आलं आणि तिथे एक वेगळंच विश्वरूपदर्शन होऊ लागलं. परस्परविरोधी सामाजिक, कलात्मक आणि प्रामुख्याने राजकीय विचारांचे लोक चर्चा करताना, भांडताना दिसू लागले. परिवर्तनाची आस असणाऱ्या माझ्यातल्या मनुष्याला या प्रवासात जी एक जाणीव झाली ती ही की आपल्याला आत्ता वाटतंय त्याच्या दहापट पेशन्स ठेवला तर आपण थोड्या बदलाची आशा करू शकतो. कौटुंबिक, धार्मिक, सामाजिक रचना - ज्या वषानुवर्षं अगणित लोकांना बांधून ठेवतात - त्या सहजासहजी हलवता येत नाहीत. परिवर्तनाच्या संदर्भात इथे मला एक विशेष गोष्ट जाणवली ती ही की 'प्रश्न फक्त माणसांचा नसून माणसांच्या संख्येचाही आहे!'

अर्थात यात दोन्ही बाजू मला समजत होत्या. तीव्रतेने व्यक्त होणं, आपली हरकत नोंदवणं हे आपल्या आतल्या खळबळीला वाट देण्यासाठी एकीकडे आवश्यक आणि दुसरीकडे 'हरकत वृत्तीवर आहे, व्यक्तीवर नाही' हेही मनात जागतं ठेवणं आवश्यक. आपण आपल्या क्षमतेच्या परिघात, आपल्या माध्यमातून प्रयत्न करायचे पण 'जमिनीवरचं वास्तव' ही एक बिकट गुंतागुंत आहे आणि तिथे आपण पुरे पडणार नाही हेही लक्षात ठेवायचं. ही माझ्यासाठी साक्षात्कारी जाणीव होती. एकाच वेळी शांत व अस्वस्थ करणारी जाणीव. 

यातून मग मला असं लक्षात आलं की आपल्याला सारखं व्यक्त व्हावंसं वाटतं हे ठीक, पण आपण पुष्कळ ऐकलं पाहिजे, आपल्याला नेमके प्रश्न विचारता आले पाहिजेत. मला अमुक एका बाबतीत अमुक बदल हवा असं वाटतं, पण संबंधित व्यक्तींना काय वाटतं, ते बदलाला तयार नसतील तर का नाहीत हे आपल्याला समजायला हवं. मुख्य म्हणजे मी जर काही वेगळं बोलत असेन तर तो मुद्दा बाजूला ठेवून 'माणूस' म्हणून इतरांची माझ्याबद्दल सकारात्मक भावना हवी. अलीकडे एका गटचर्चेत सहभागी झालो होतो. एका सहभागी मुलीने फार चांगला मुद्दा मांडला. ती म्हणाली की आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपल्या काही गोष्टी समजून घेणं अवघड असलं तरी त्यांना आपल्याविषयी आत्मीयता वाटली, ती निर्माण व्हायला पूरक असं आपलं वर्तन असेल तर आपले वेगळे विचारही ते स्वीकारतात. त्यामुळे आपण काही नवीन मांडत असलो तरी रोजच्या जगण्याच्या पातळीवर आपण इतरांसारखेच परस्परावलंबी असतो हे लक्षात घेऊन आपण स्वतःकडे 'अनेकांपैकी एक' म्हणून पाहिलं तर ते इतरांना आश्वस्त करणारं असतं. मात्र इथे एक गोष्ट नोंदवतो. आज आपल्या आसपास सध्या जी परिस्थिती दिसते ती चिंताजनक आहे. 'वेगळा विचार असला तरी माणूस म्हणून तो मला जवळचा वाटतो' याऐवजी 'केवळ वेगळा विचार आहे म्हणून तो माणूसच मला मान्य नाही' हे बळावताना दिसतं. याला अर्थातच राजकीय संदर्भ आहे आणि चिंतेची बाब ही की मानवी संबंध हे आधी राजकीय आणि मग मानवी होऊ लागले आहेत. 

सामाजिक परिवर्तनचा विचार करणाऱ्यांचं धर्म, देव, श्रद्धा याबाबतचं आकलन कमी पडतं असं मत बरेचदा मांडलं गेलं आहे. त्यात तथ्य आहे. म्हणजे मला वैचारिक दिशेबद्दल काहीच शंका नाही. माणसाच्या अनेकविध प्रश्नांची उत्तरं विज्ञानच देऊ शकतं याबाबत माझ्या मनात संदेह नाही. देवा-धर्माच्या अतिरेकाने आपलं नुकसान केलं आहे याविषयीही मला शंका नाही. पण मुद्दा आहे तो काही गोष्टींची, संकल्पनांची प्रस्तुतता (त्या मान्य नसल्या तरी) समजून घेण्याचा. देवाधर्माखेरीज आपल्याकडील समाजजीवनाला जात हा एक स्फोटक आयाम आहे. तो कितीही पुसून टाकायचा म्हटला तरी पुसला जात नाही. इथे एक लक्षात घ्यावं लागेल की या गोष्टी नुसत्या असण्यापुरत्या असत नाहीत. त्यांचं काहीएक 'फंक्शन' (कार्य) असू शकतं. हे कार्य समजून घेतलं नाही तर त्या पुसता येणार नाहीत. परंपरेवर प्रहार करताना त्यातून काही नवीन निर्माण होणार नसेल तर ते प्रहार फार काही निष्पन्न करू शकणार नाहीत. माझा एक मित्र 'पुरोगामी कर्मकांडे' सुरू करायला हवीत असं म्हणतो. यातील कर्मकांडे या शब्दामुळे बिचकून न जाता 'लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी योजलेले साधन' म्हणून त्यांच्याकडे बघता येईल. ही कर्मकांडे अर्थातच वेगळी असतील. पण त्यातून एकी व्यासपीठ तयार होईल. आपण धार्मिक कर्मकांडांकडे पाहिलं तर असं दिसेल की त्यात संगीत, खेळ, कला, अशा विविध गोष्टींचा आधार घेतलेला असतो. माणसाला रंजन हवं असतं याची दखल घेऊन या गोष्टी धार्मिकतेत गुंफल्या जातात. परिवर्तनाचा विचार रुजवण्यासाठी गटचर्चा हे एक प्रभावी माध्यम होऊ शकतं. त्यात रंजकता कशी आणता येईल, विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन रंजक पद्धतीने कसा पोचवता येईल यावर विचार केला तर बदलाची प्रक्रिया लोकांना आपलीशी वाटेल. 
स्त्री-पुरूष समता, श्रद्धा-अंधश्रद्धा, ईश्वरी अस्तित्व-निरीश्वरवाद, धर्माधारित जीवन-निधर्मी जीवन, परंपरानिष्ठ विचार-वैचारिक उदारमतवाद, साहित्य-कलाविषयक धारणा या सर्वच 'संघर्ष-क्षेत्रात' नवतेच्या, प्रबोधनाच्या पुरस्कर्त्यांनी 'सर्वसाधारणपणे माणूस हा 'एलियन' (अनोळखी, उपऱ्या) गोष्टींना बिचकणारा प्राणी आहे' हे लक्षात ठेवून धोरण ठरवलं तर नवतेचाच मार्ग सुकर होणार आहे.