Wednesday, October 10, 2018

आपलं कामजीवन 

ओट्यावर वाळत घातलेल्या भांड्यांना पाय फुटून ती निमूटपणे आपापल्या जागेवर जाऊन बसली असती तर आयुष्यात सुखाचे काही प्रहर अजून आले असते असं ज्या क्षणी वाटतं तो क्षण म्हणजे आपल्या कामजीवनाचा उत्कर्षबिंदू असतो. आपलं कामजीवन हे आपल्या जड-चेतन विश्वाइतकंच बहुरंगी, बहुढंगी आहे. रोज रात्री दाराबाहेरच्या कडीला दुधाची पिशवी अडकवण्यापासून ते दहाएक वर्षांतून एकदा घराला रंग देण्यापर्यंत कामजीवनाची अद्भुत रूपं फक्त चकितच करणारी नाहीत, तर मानवाविषयी करुणा उत्पन्न करणारी आहेत.

भाई देशपांडे एकदा म्हणाले होते, "सुनीताला कामं दिसतात. मला दिसतच नाहीत." अशा थोर भाग्याच्या पुरुषांपैकी आपण नाही याची जाणीव होऊन, फेमिनिझमचं बाळकडू घेत राहिल्यानं माझं कामजीवन समृद्ध झालं आहे हे आरंभीच नमूद करतो. घर हे मुळात राहण्यापेक्षा काम करण्याची जागा आहे. जेरड डायमंडपासून युव्हाल नोआ हरारीपर्यंत अनेकांनी शेतीनं माणसाची प्रमुख गोची केली असं लिहिलं आहे. माझा मुद्दा त्याहूनही खोलातला आहे. शेतीनंच नव्हे तर काहीतरी करत राहण्याच्या वृत्तीनं माणसाची गोची केली आहे. मग ती शेती असो किंवा अन्य काही असो. जीव वाचला, पोट भरलं, झोपायची सोय झाली की गप राहायचं सोडून 'अजून काहीतरी करू' असं ज्याक्षणी माणसाला वाटलं तो क्षण माणसाची ऐतिहासिकदृष्ट्या लक्षणीय गोची करणारा होता. सारखं काहीतरी करणं हा माणसाला मिळालेला शाप आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण एक काम दुसरी कामं जन्माला घालतं. शिवाय त्यानं इतरांची कामलालसा वाढते, ते वेगळंच. साहित्याचंच उदाहरण घेऊ. (इतकं निरुपद्रवी दुसरं कोण आहे!) एके काळी मोजकेच दिवाळी अंक निघत असत. ती संख्या आता शे-दोनशेच्या घरात आहे असं ऐकतो. शिवाय ऑनलाइन अंकही प्रसिद्ध होऊ लागले. एवढं होऊन सांस्कृतिक सुस्कारे कमी झाले का? तर नाही. खरं तर सांस्कृतिक उपक्रम जेवढे वाढतील तेवढी संस्कृती अधिकाधिक धोक्यात येत जाते. जेव्हा काही लिहिलं जात नव्हतं तेव्हा वास्तविक काही अडत नव्हतं. साहित्य आलं, आणि पाठोपाठ साहित्यव्यवहारही आला. पुढे मग अर्थातच व्यवहार साहित्यावर भारी पडू लागला आणि संमेलनं, चर्चासत्रं, व्याख्यानं सुरू होऊन, जे लिहिलं आहे ते का लिहिलं आहे, किंवा जे लिहिलंच नाही ते का लिहिलं नाही, याविषयी चर्चा झडू लागल्या. आजमितीस मराठीत जितकं साहित्य निर्माण होतं त्याहूनही जास्त चर्चा निर्माण होते. (यात फेसबुक धरलेलं नाही. ते धरलं तर कहरच होईल.) मला तर असंही वाटतं की कालांतरानं चर्चक-समीक्षकच सेंटर कोर्टात उतरून एकमेकांशी मॅच खेळतील आणि लेखक चेंडू उचलून देण्यापुरते राहतील.

काहीही न करण्यात जो आनंद आहे त्याला माणूस पारखा झाल्यानं माणसाचं जीवन विस्कळीत झालं आहे. रोज सकाळी सहस्रांच्या संख्येनं आवराआवरी करून, बूट चढवून कामाला जाणं आणि हे अनंत सकाळी करत राहणं हे प्रगतीचं नसून अधोगतीचं लक्षण आहे. खूप काम करून तर मधमाशासुद्धा आपलं जीवन व्यतीत करतात. काम खूप वाढवून ठेवणाऱ्या प्राण्याला प्रगत कसं काय म्हणायचं हा एक मोठाच प्रश्न आहे. कामं कमी कमी व्हायला हवीत. तर ती प्रगती. यंत्रानं कामं सोपी केली ही तर गेल्या दोन शतकातील सर्वांत मोठी थाप आहे. यंत्रानं काही केलं असेलच तर नवीन कामं निर्माण केली आहेत. माणूस चंद्रावर गेला याचं पुष्कळ कौतुक होतं. पण तो चंद्रावर गेल्यानं नक्की काय झालं याचं उत्तर हे कौतुक करणाऱ्यांपैकी कितीजण देऊ शकतील याची मला रास्त शंका आहे. एकूणच माणसाच्या काम करण्यामुळे तो रिकामपणाच्या आनंदाला कसा मुकला आणि त्याच्यातील परात्मभाव कसा वाढीस लागला ही एलिएनेशनची थिअरी समूळ विस्तारानं सांगणं आज गरजेचं झालं आहे.

या एलिएनेशनची सुरुवात घरापासूनच होते. रोज सकाळी एखाद्या सुखद, बेधुंद करणाऱ्या आठवणीनं (किंवा अजिबात कुठलीच आठवण वगैरे न येता) जाग न येता; पाण्याचा पंप चालू करायचा आहे या आठवणीने जाग येणं ही एक मन विषण्ण करणारी गोष्ट आहे. आणि ही नुसती सुरुवातच असते. पुढचा संपूर्ण दिवस म्हणजे एक न संपणारी कामसाखळी असते. आणि या साखळीतील कामांचे, उपकामांचे, त्यातून उद्भवणाऱ्या वैतागांचे, उपवैतागांचे इतके नमुने आणि कंगोरे आहेत की 'कामेची केला दीन किती नर' असं म्हणावंसं वाटतं. ओट्यावरची भांडी नुसती आपापल्या जागी ठेवली की झालं असं होत नाही. ओट्यावरचं पाणी पुसून घ्यायला लागतं. स्वयंपाक झाला की अन्न मिळतं हे ठीक, पण त्याबरोबरच बर्नरखालची तबकडी स्वच्छ करणं आणि शेगडीच्या मागच्या भिंतीवरील डाग पुसणं ही कामं वाढतात. विशेषतः भरतासाठी वांगं भाजताना ती तबकडी जी काय विद्रूप होते, त्याला तोड नाही. भाजी शिजली की झालं असं नसतं. उरलेली भाजी काढून ठेवावी लागते. उन्हाळयात चुकून भाजी फ्रिजच्या बाहेर राहिली तर संपलंच. कुकर लावणं हे वास्तविक किती सोपं काम आहे? पण त्यातही भात सांडला तर पाणीमिश्रित भातातलं पाणी वेगळं करून भात वेगळा करणं हे काम वाढतं. पोळ्या करणं हा तर फारच सेक्सी प्रकार आहे. एक तर कणीक नीट असावी लागते. ती असली आणि नीट मळली गेली तरी कधीकधी - फॉर सम अननोन रीझन - फुलके फुलायचं नावच घेत नाहीत. सगळं नीट असताना एखादा फटाका का फुटत नाही, हे जसं कळत नाही तसंच इथेही आहे. शिवाय पोळ्या लाटतानाही काही पोळ्या बहुधा केवळ निषेध म्हणून व्यवस्थित लाटून घेत नाहीत. आणि पोळ्या करून झाल्या की ओट्यावर सांडलेलं पीठ पुसून घेणं हा कार्यक्रम आहेच.

सिंक हा द्रौपदीच्या अक्षयपात्रासारखाच प्रकार आहे. फक्त ते पात्रांचं अक्षयपात्र आहे. सिंक पूर्ण रिकामं आहे, त्यात अगदी एकही चमचा नाही हे दृश्य बघायला मी, साहित्यसंमेलनात व्यासपीठावर एकही राजकारणी नाही हे दृश्य बघण्याइतकाच उत्सुक असतो. सिंक हे जसं पात्रांचं अक्षयपात्र आहे तसं बरणी हे पदार्थांचं कृष्णविवर आहे. त्यातून वस्तू बघता बघता नाहीशा होतात. म्हणजे तुम्ही यादी वगैरे करता, सगळ्या गोष्टी आणता. तूरडाळ शिल्लक आहे असा तुमचा दृढविश्वास असतो आणि नेमका दुसऱ्या दिवशी तुरीच्या डाळीनं बरणीचा तळ गाठल्याचं लक्षात येतं. अशा वेळी स्वतःवर चरफडण्यापेक्षा दुसरं काही करता येत नाही. बरेच दिवस झाले कुळथाचं पिठलं केलं नाही, म्हणून कुळथाच्या पिठल्याचे डोहाळे लागावेत तर कुळीथ पीठ आणावं लागणार आहे असा साक्षात्कार होतो. केव्हातरी पुलावाचा वगैरे बेत ठरतो. तुम्ही भाज्या आणून दिलेल्या असतात. चिरून ठेवलेल्या असतात. तांदूळ धुऊन ठेवलेले असतात. पुढचा भाग अर्धांगिनीवर सोपवून तुम्ही नेटफ्लिक्स उघडून बसता. वीसएक मिनिटं होतात न होतात तोच 'अरे, तमालपत्र राहिलंच की' हे कानी पडतं. मग फ्रॅंक अंडरवुड, वॉल्टर व्हाइट किंवा अशाच कुणा सिद्धपुरुषांच्या लीळा पाहण्याचं अर्धवट सोडून तमालपत्र आणण्यासाठी उठावं लागतं. दुकान फार लांब असतं असं नाही, पण व्यत्यय ही संख्यात्मक संकल्पना नसून गुणात्मक संकल्पना आहे. त्यामुळे व्हायचा तो त्रास होऊन गेलेला असतो.

घेऊ घेऊ म्हणून चाललं होतं, ती रॉयल एनफिल्ड घेतल्यावर पाचशे सीसी इंजिनात उत्पन्न होणाऱ्या भरभक्कम टॉर्कइतकाच भरभक्कम आनंद झाला होता. त्या आनंदाच्या भरात 'आता काय होईल ते होईल, पण एनफिल्डच्या हँडलला पिशवी अडकवायची नाही' अशी भीष्मप्रतिज्ञा मनातल्या मनात केली होती. ती सुमारे दीड दिवस टिकली. कृष्णविवरासमोर एनफिल्ड काय चीज आहे?

बसल्या जागी अंतःचक्षूंना कामं दिसणं तर फार वाईट. म्हणजे तुम्ही विचार करत असताना मराठी साहित्याच्या सद्यस्थितीबद्दल (वाढवून ठेवलेल्या कामाचे परिणाम. दुसरं काय!); पण प्रत्यक्षात विचार घरंगळत असतो तो 'दूध गार झाल्यावर विरजण लावायचं आहे' हा. मराठी कथेला पाहिल्यासारखं टोक उरलं आहे की नाही या विषयावर काही लिहिताना 'कोथिंबीर निवडायची राहिली आहे' हा टोकदार विचार जखम करून जातो. (शेपू, कोथिंबीर आणि मेथी निवडणे ही सृजनशक्तीपाताची त्रिसूत्री आहे. आपल्याकडे 'रेनेसान्स' झालं नाही याच्या काही कारणांपैकी एक कारण इथल्या समाजाला भाज्या निवडाव्या लागत होत्या हे आहे. यावर वाद घालायला आपण तयार आहोत!) 'महाराष्ट्रातील प्रबोधनाची वाटचाल' यावर तुम्ही काहीएक मौलिक, आंतरिक गुंतागुंतयुक्त विचार करत असताना स्वयंपाकघरातल्या व्हाइट बोर्डावर लिहिलेली कामांची यादी डोळ्यांसमोर नाचू लागते आणि प्रबोधनाची वाटचाल मंदावते. हे सगळं कशामुळे? तर कामामुळे. म्हणून जीवनाला आराम पडण्यासाठी जीवनातील काम काढून टाकलं पाहिजे. त्यासाठी 'काहीही न करणे' या एकमेव आनंददायी क्रियेला सतत प्रोत्साहन देणं गरजेचं आहे.

'काहीतरी करू' यात ट्रिपला वगैरे जाणंसुद्धा सामील आहे. ट्रिप हा वास्तविक तापदायक प्रकार आहे. ज्या कुठल्या प्रेक्षणीय स्थळी तुम्ही जाता तिथे उंचावलेल्या हातांमधल्या कॅमेऱ्यांपेक्षा वेगळं काय दिसतं? तारखा ठरवा, तिकिटं बुक करा, सामान भरा (यात काहीतरी विसरणं आणि काहीतरी उगीच घेतलं जाणं हे नेहमीचं आहे. थंडी असेल म्हणून स्वेटरने बॅगेतली जागा अडवायची आणि तिथे गेल्यावर उकाडा हजर किंवा पाऊस नसेल म्हणून घेतलेली छ्त्री बाजूला काढायची आणि पोचल्यावर स्वागताला पाऊस हजर!), भलामोठा प्रवास करा, हॉटेलात चेक-इन करा, तिथे अमुक-नाही-तमुक-नाही म्हणून मॅनेजमेंटशी भांडा, चार ठिकाणच्या गर्दीत सामील होऊन काहीतरी बघितल्याचा आपल्याला आनंद झालाय हे स्वतःच्या मनावर ठसवा - हा एवढा खटाटोप सांगितलाय कुणी? 'प्रवासाने माणसाला शहाणपण येते' वगैरे सुविचार तर पूर्णपणे दिशाभूल करणारे आहेत. प्रवासामुळे फक्त खर्च होतो. शहाणपण ही वस्तू मुळातच तुमच्याकडे असावी लागते. त्यासाठी वणवण करायची गरज नसते. मनुष्यप्राणी हा एक कल्पनातीत वैचित्र्यानं भरलेला प्रकार आहे हे कळण्याकरता प्रवास कशाला हवा?

कामजीवन हे एक्स्पोनेन्शियली तापत जाणारं प्रकरण आहे. त्यामुळे वेळच्या वेळीच आवर घातला नाही तर ते हाताबाहेर जाऊ शकतं. त्यासाठी आजूबाजूला सजगपणे बघत ज्या ज्या ठिकाणी कामाचं उगमस्थान दिसेल त्या त्या ठिकाणी ठामपणे 'नाही' म्हणणं आवश्यक आहे. खरेदी वगैरे तर अगदीच टाळावी. जेव्हा खरेदी मिनिमम होईल तेव्हाच इकॉनॉमी ऑप्टिमम होईल. या एकूणच प्रश्नाबाबत मुळात एक गोष्ट माझ्या पक्की लक्षात आली आहे. काहीही न करता निवांत बसलो असतानाच ती लक्षात आली. युरेका मोमेंटच म्हणा ना. (मूलभूत जाणिवा निवांतपणा असतानाच होतात. न्यूटन, आर्किमिडीज साक्ष आहेत. फक्त इतर लोकांनी त्यांनी लावलेल्या शोधापाशी थांबायला हवं होतं. गुरुत्वाकर्षण आहे हे कळलं ना? उत्तम. पुढे जाऊन आकाशात रॉकेट्स कशाला सोडायची?) मी त्याला 'द ह्यूमन ट्रूथ' असं नाव दिलं आहे. हे ट्रुथ असं - माणसं काहीएक संख्येनं एकत्र आली की करेक्ट असं काही घडण्याची शक्यताच लयाला जाते. एकत्र आली की माणसं काहीतरी घोळच घालतात. (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहेच!) त्यामुळे काहीतरी करण्याची जळमटं लोकांच्या मनातून काढून टाकणं अगत्याचं झालं आहे. काहीही न करण्याकरता माणसं एकत्र येतील तेव्हाच मानवी इतिहास आश्वासक वळण घेईल. अन्यथा कामजीवन माणसाचं माकड करतच राहणार आहे!

(ऐसी अक्षरे, दिवाळी २०१८)


Sunday, October 7, 2018

कवितेत आणि कवितेबाहेर

दिनकर मनवर यांच्या 'पाणी कसं अस्तं' या कवितेतील एका उल्लेखावरून जो वाद सुरू झाला तो एकाच वेळी खेदजनक आणि विचारप्रवृत्त करणाराही आहे. 'विचारप्रवृत्त करणारा' असं म्हणण्याचं कारण हे की या वादाच्या निमित्ताने मनात घोळत राहणारे आणि कालांतराने नाहीसे होणारे काही मुद्दे पुन्हा मनात घोळू लागले. त्यांचा संबंध कलाकाराशी आणि कलात्मक अभिव्यक्तीशी आहे. यात अंतिम असं काही बोलता येईल असं वाटत नाही, पण जे जाणवतं ते सांगायचा प्रयत्न करतो.

'टीकास्वयंवर' या पुस्तकातील 'मराठी कादंबरी : प्रेरणा व स्वरूप' या लेखात भालचंद्र नेमाडेंनी चि. त्र्यं. खानोलकरांच्या कादंबऱ्यांवर विस्तृत टिप्पणी केली आहे. त्यात 'अगोचर' या खानोलकरांच्या कादंबरीतील बलात्काराचा एक प्रसंग त्यांनी उद्धृत केला आहे. 'कुणी तिच्या झिंज्या ओढीत होते तर कुणी तिची चोळी फाडून तिचे घट्ट स्तन चुरगळीत होते' या वाक्यात 'घट्ट' हा शब्द लेखकाने वाचकांचे लिंगसंवेदन उत्पन्न करण्यासाठी म्हणून वापरला आहे आणि त्यातून लेखकाची नैतिकता उघड होते असं नेमाडे लिहितात. एका हिंसक, निषेधार्ह घटनेचं वर्णन करताना हा कामोत्तेजित करणारा शब्द लेखकाला वापारावासा वाटणं याला त्यांचा आक्षेप आहे. हा आक्षेप पूर्णपणे पटण्यासारखा आहे. परंतु खानोलकरांना 'मॅटर ऑफ फॅक्ट' म्हणून हा शब्द वापरायचा होता ही शक्यता असू शकते का हाही प्रश्न विचारता येऊ शकेल. नेमाडेंनी खानोलकरांच्या कादंबरीलेखनाची, त्यांच्या शैलीची चिकित्सा करताना या कादंबऱ्यांना थ्रिलर फँटसीचं स्वरूप आहे, त्यात दुःखाचं संवेदन नाही, अनुभूतीचं दारिद्र्य भाषेच्या अलंकरणाने आणखी हास्यास्पद होते (हे विशिष्ट निरीक्षण स्वतंत्र मुद्दा म्हणून मला महत्त्वाचं वाटलं. हा मुद्दा 'लेखक' होण्याच्या महत्त्वाकांक्षेने केल्या गेलेल्या, परंतु अलंकरणाला, शाब्दिक कसरतीला अधिक महत्त्व देत पुनुरुक्तीत अडकलेल्या इतरही लेखनाला लागू होऊ शकेल) असं म्हटलं आहे. ही निरीक्षणे समीक्षा दृष्टीला पटावीत अशीच आहेत. परंतु आक्षेप मान्य करूनही खानोलकरांच्या कादंबऱ्या स्वतंत्रपणे मला आवडल्या असं कुणी म्हणू शकेल.

हे उदाहरण दिनकर मनवरांच्या कवितेसंदर्भात आठवायचं कारण 'काय लिहिलं आहे' आणि 'काय प्रतीत होत आहे' यात फरक असण्याची शक्यता नेहमीच अस्तित्वात असल्याने कलाकृतीला 'अभिव्यक्ती' आणि 'अभिव्यतीचा परिणाम' हे दोन आयाम प्राप्त होतातच होतात. कलाकृती त्यातून सुटू शकत नाही हे एका अर्थी दुःखद आहे असं म्हणता येईल पण ते कलाकृतीचं 'भागधेय' आहे. दिनकर मनवर यांनी लैंगिक संवेदना उत्पन्न करण्याच्या उद्देशाने किंवा विशिष्ट समूहातील स्त्रीचा अवमान करण्याच्या उद्देशाने लिहिलं नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळे हेतूबद्दल शंका नाहीच. पण प्रश्न हेतूचा नसून परिणामांचा आहे.

अस्मितेचा स्त्रीशी आणि स्त्रीच्या चित्रणाशी फार जवळचा संबंध आहे. आपल्या जाती/समूहातील स्त्रियांचे प्रश्न काय आहेत याविषयी फारसे उत्सुक नसणारे लोकही त्या स्त्रियांच्या शीलरक्षणाविषयी, त्यांच्या प्रतिमेविषयी संवेदनशील असतात. हा गुंता साहित्य-कलेच्या पुढे जाऊन पुरूष म्हणूनच्या काही जैविक वृत्तींपाशी, पुरूषसत्ताक राजकारणापाशी आणि त्याने घडवलेल्या मानसिकतेपाशी जाऊन पोचतो. त्याविषयी स्वतंत्रपणे लिहावं असं बरंच आहे कारण त्यात पुरूष आक्रमक म्हणून आणि हतबल म्हणूनही अडकलेला आहे. त्यामुळे हा मुद्दा फक्त नोंदवून पुढे जाऊ. कवितेत आदिवासी मुलीऐवजी इतर समूहातील मुलीचा उल्लेख असता तर चाललं असतं का असा प्रश्न या वादासंदर्भात विचारला गेला. अशा वादाच्या प्रसंगी कलाकाराच्या सामाजिक बांधिलकीचा मुद्दाही डोकं वर काढतो. म्हणजे भोवतालच्या जगात इतके प्रश्न असताना तुम्ही अभिव्यक्तीचं काय घेऊन बसलात? तुम्ही प्रत्यक्ष कृती कधी करणार? असे प्रश्न विचारले जातात. लेखक-कवीच्या 'लेखक-कवी असण्या'तच अंतर्भूत असलेल्या गुणधर्माच्या आधारे, कृतीशील लेखक-कवींच्या उदाहरणांच्या आधारे याची उत्तरे देता येतील. पण त्याने वाद शमत नाही. याचं कारण कलाकृतीमुळे निर्माण झालेली भावनिक अस्थिरता हे आहे.
समग्रपणे विचार करत तयार  झालेली मनोभूमिका आणि भावनिक स्थिरता ढळवणारी काही घडलं की त्यावर हल्ला चढवणारी मनोभूमिका यात दुसरी बरेचदा जिंकते. दिनकर मनवर गंभीरपणे कविता लिहिणारे कवी आहेत, त्यांचं सामाजिक भान जागृत आहे - प्रखर आहे हे मुद्दे भावनिक स्थिरतेला धक्का लागल्यावर लक्षात घेतले जाऊ शकत नाहीत. (खरं तर भावनिक स्थिरतेला धक्का लागला की एखादा विचारी अभ्यासकदेखील तीव्रतेने प्रतिक्रिया देऊ शकतो. बौद्धिक क्षमता असूनही जाणिवांचे अनेक आयाम संवेदनेच्या कक्षेत राहणे हे आपलं - सेपियन्सचं - एक लक्षण आहेच.) दुसरा मुद्दा तफावतीचा आहे आणि तो महत्त्वाचा आहे.

कवितेतील उल्लेख न खटकणारे लोक जसे आहेत तसाच तो उल्लेख खटकणारे लोकही आहेत. त्यातही आदिवासी मुलीचा संदर्भ असल्याने विरोधाला आणखी धार आहे. यातील आदिवासी हा मुद्दा बाजूला ठेवून फक्त अवयवाचा विचार केला तर असं दिसतंच की स्त्रीच्या अवयवांशी पुरूषाची लैंगिक इच्छा घट्ट जोडून टाकली गेली आहे. 'स्तन' हा शब्द उच्चारला किंवा स्तनांचं चित्र डोळ्यापुढे आणलं की किती पुरूषांना बाळाचं दुग्धपान आठवतं, किती पुरूषांचं लैंगिक संवेदन जागं होतं आणि किती पुरूषांमध्ये पूर्ण न्यूट्रॅलिटी जागी राहते असा प्रयोग करून बघायला हरकत नाही. आणि लैंगिक संवेदन जागं होत असेल तरी अपराधी वाटायचं कारण नाही. कपडे आणि कपड्यांशी जोडली गेलेली सभ्यता याने आपल्याला सुरक्षा, सौंदर्यदृष्टी वगैरे दिली असली तरी ते 'सुपरस्ट्रक्चर' आहे. या गोष्टींनी आपली लैंगिक-भावनिक गोचीदेखील  केली आहे. शिवाय आपल्याकडे भाषा आहे असं आपण म्हणतो, पण आपल्याकडे स्पष्टपणे बोलण्याइतपत भाषाच नसते बरेचदा. उदा. एखादा मुलगा/मुलगी मला 'हॉट' वाटतो/वाटते यातल्या 'हॉट' मधला नेमका अर्थ पकडेल असा शब्द मराठीत नाही. प्रेम किंवा आकर्षणासारखी सहज भावना व्यक्त करणं हेसुद्धा जिथे शब्दांतून नीट जमत नाही तिथे लैंगिक आकर्षणाबद्दल काय बोलणार? आपण एकूणातच शरीराला खासगीत कोंडून ठेवलं आहे. (मला काही इंग्लिश मालिका आवडण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे शरीर, लैंगिक इच्छा याच्याशी संबंधित अनेक गोष्टींना सहजतेने मांडण्याची, त्याविषयी बोलायची आणि विनोदाच्या मुशीतून सहज-सुंदर करण्याची हातोटी तिथे बघायला मिळते. कितीतरी एपिसोड्स आणि त्यातील उल्लेख आठवतात.) माध्यमांतून कलात्मकपणे या विषयांवर बोललं गेलं की या विषयातील ताण हलके व्हायला मदत होते. हा सहजभाव येणं महत्त्वाचं आहे. स्त्रीच्या स्तनांबद्दल आज स्त्रीमध्ये सहजभाव नाही कारण तो पुरूषात नाही. पुरूषात नाही कारण त्याच्या कामनेचं एक केंद्र असलेले स्तन झाकलेले आहेत. ते झाकलेले आहेत कारण पुन्हा तेच - पुरूषात सहजभाव नाही. हे एक चक्र तयार झालं आहे आणि ते मोडल्याखेरीज स्त्रीविशिष्ट उल्लेखांनी बिथरून जाणं थांबणार नाही. 'स्तन' हा शब्द रोजच्या बोलण्यात सार्वत्रिक झाल्याशिवाय त्याला चिकटलेली लैंगिक संवेदनाची धार कमी होणार नाही. (स्त्रीचे स्तन हे पुरूषाच्या कामनेचं केंद्र का असतात हा पुरूषाच्या लैंगिक आणि मानसशास्त्रीय घडणीशी जोडलेला प्रश्न आहे. याविषयी गूगल सर्च केल्यास प्राथमिक माहिती मिळू शकेल.)

कवितेतील उल्लेखाने जो वाद सुरू झाला तो समाजातील तफावतीकडे निर्देश करतो. ही कविता वाचताना वर्गातील आदिवासी मुलीला संकोचल्यासारखं होईल असा एक मुद्दा पुढे आला आहे. व्यवहार्य अडचण म्हणून हा मुद्दा मान्य होण्यासारखा आहे. जगण्यात आणि मानसिकतेत तफावत असताना एका दृष्टिकोनाचा आग्रह धरणं आपल्याला टिकाऊ उत्तरांकडे नेत नाही. 'आदिवासी' किंवा अन्य समूहवाचक, जातीवाचक उल्लेख जर विभागणीचं द्योतक आहे तरत्या विभागणीपोटी होणाऱ्या परिणामांनाही सामोरं जावं लागेल. 'वस्तुस्थिती' ही चीज आदर्श, सिद्धांत, विचारधारा या सगळ्याला पुरून उरणारी असते. जात, आयडेंटिटी, अस्मिता या गोष्टी त्रासदायक असल्या तरी त्या 'वस्तुस्थिती' आहेत. त्यामुळे  सामोरं जाताना आयडियॉलॉजिकल पाया असलेली स्ट्रॅटेजी वापरल्याशिवाय तरणोपाय नाही. आदिवासी, मुलगी आणि स्तन हे तीन विषय/शब्द खरं तर सामाजिक रचित, सांस्कृतिक रचित आणि जैविक रचित या तीन रचितांचं आणि ती एकमेकांत गुंतलेल्या वास्तवाचं प्रतिनिधीत्व करतात. कवितेतील उल्लेखाने कुणी दुखावलं जायचं, कुणाला राग यायचं काहीच कारण नाही हे एका बाजूला बरोबरच आहे. यात राजकीय हेतू असतील तर तो आणखी वेगळाच मुद्दा आहे! पण या उल्लेखाने खरोखरच कुणी दुखावले गेले असतील तर त्यांच्याशी संवाद झाला पाहिजे असं वाटतं. आदिवासी हा शब्द विशिष्ट समूहाकडे निर्देश करतो हे खरंच आहे. हा समूह एका संस्कृतीचं, परंपरेचं आणि ज्ञानसाठ्याचं प्रतिनिधीत्व करतो. जातीय तेढ वाढलेली असण्याच्या पार्श्वभूमीवर जल-जंगल-जमीन याच्याशी जोडल्या गेलेल्या, पर्यायी जीवनशैली म्हणून काहीएक प्रारूप जगासमोर ठेवण्याची क्षमता असलेल्या आदिवासी समूहांचं 'असणं' महत्त्वाचं आहे. त्यांची आणि आपली नाळ मुळात एकाच ठिकाणी जोडलेली आहे. आपण वेगळे झालो आहोत हे खरं आहे, आपल्यावर त्यांनी रागवावं याची पुष्कळ कारणं आपण त्यांना दिली आहेत. त्यात भर पडायला नको असं मनापासून वाटतं.

(७ ऑक्टोबर २०१८, लोकसत्ता) 

Saturday, September 15, 2018

मॅन, वुमन आणि मन

मागील लेखात आपण जातवास्तवाच्या आव्हानांविषयी बोललो होतो. विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं आपण म्हटलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या पुस्तकाचा आपण आधार घेतला होता त्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात आंतरजातीय विवाह हा जातीव्यवस्था नष्ट करण्याचा एक मार्ग आहे असं त्यांनी नोंदवलेलं आहे. परंतु जात ही एक संकल्पना आहे, मनोवस्था आहे आणि त्यामुळे एखादा भौतिक अडथळा आपण दूर करतो तशी ती दूर होणार नाही - त्यासाठी संकल्पनात्मक बदलच करावा लागेल असं ते पुढे लिहितात. हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे. लेखाच्या शेवटी आपणही 'जात-धर्माने येणारा कमकुवतपणा नाकारणारं मन हवं आहे' असं म्हटलं होतं. 

'मनात बदल करणे' हा लिहायला-बोलायला सोपा, पण प्रत्यक्षात महाकठीण, त्रासदायक मुद्दा आहे. जेव्हा जेव्हा जुन्या-नव्याचा संघर्ष होतो, काहीतरी नवीन पुढे येऊन उभं ठाकतं तेव्हा स्वीकृती आणि अस्वीकृतीच्या रस्सीखेचीत मन दमून जात असतं. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात नवं काही मांडणाऱ्यांनी हे लक्षात घेऊन आपलं म्हणणं शांतपणे  मांडत राहणं श्रेयस्कर असतं. अभिव्यक्ती कधीकधी तिखट व्हायला हरकत नसते - कारण तिरकस, तिखट मांडणीसुद्धा परिणामकारक ठरू शकते. फक्त मुद्दा माणसांशी जोडून घेण्याचा असतो. आपला उद्देश जर बदल घडवणं हा असेल तर ती लांब पल्ल्याची लढाई आहे हे विसरून चालत नाही. आपले व्यूह त्या अनुषंगाने आखावे लागतात. 

विवाहसंस्था हा जातिव्यवस्थेशी घट्ट जोडलेला मुद्दा आहे. परंतु त्याचबरोबर आणि कदाचित त्याच्याही आधी तो स्त्री-पुरूष संबंधांशी जोडलेला मुद्दा आहे. स्त्री-पुरूष संबंध हा जातीप्रमाणेच इतरही अनेक सामाजिक रचितांचा पाया असतो. यातला एक मुख्य भाग अर्थातच माणसाची प्रजाती वाढवणे हा आहे. म्हणूनच स्त्री-पुरूष संबंधांचं नियमन आपल्या सामाजिक व्यवहारांच्या नियमनातील एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. या लेखात आपण या विषयावरील चर्चेला सुरूवात करू.  
     
व्यक्तींमधील नातेसंबंध हा एक रोचक, रंजक असा विषय आहे. त्याबरोबरच तो एक तणावपूर्ण विषयही आहे. सामाजिक-आर्थिक रचितांमुळे आणि मानवी उर्मींमुळे नातेसंबंधांमध्ये ताण येतातच. आजच्या कुटुंबाच्या, सामाजिक संबंधांच्या स्वरूपात जे ताण आहेत ते या संबंधांना सुरूवात झाली तेव्हापासूनचे ताण आहेत. त्यामुळे नातेसंबंधांविषयी बोलताना एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी की या विशिष्ट बाबतीत मानवी मेंदू काही हजार वर्षांपूर्वीच्या मानवी मेंदूसारखाच आहे. आपण तंत्रज्ञानात पुष्कळ प्रगती केली असली तरी ज्या भावभावनांचे आपण काही हजार वर्षांपूर्वी गुलाम होतो त्याचे गुलाम आपण अजूनही आहोत. तो एक मोठा संशोधनाचाच विषय आहे. टोळी समाजापासून आजवर आपल्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या, आपल्या वर्तनाला आकार देणाऱ्या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे लैंगिकता आणि राजकारण. मानवी भावनांचा, इच्छा-आकांक्षांचा  'स्पेक्ट्रम' खूप मोठा आहे, त्यात अनेक छटा आहेत आणि या दोन गोष्टी त्यातील अनेकांवर आपलं वर्चस्व गाजवतात. 

स्त्री आणि पुरुषांमधील नातेसंबंध ही नातेसंबंधांची विशेष जातकुळी आहे. त्यातही छटा आहेतच. म्हणजे स्त्री - पुरुषांमधलं आदिम आकर्षण व प्रेम - ज्याचा पाया लैंगिकता आहे - ही एक मुख्य छटा. त्यानंतर कुटुंब संस्थेच्या विकासानंतर आई - मुलगा, बहीण - भाऊ, वडील - मुलगी या प्रेमाच्या इतर छटा येतात. निव्वळ लैंगिक आकर्षणाच्या वर भावनांचे स्तर चढत जाऊन स्त्री - पुरुषांमध्ये जे रोमँटिक नातं तयार होतं त्या नात्याचे बहुविध आयाम स्त्री - पुरुषांमधील नात्याला कायम आंदोलित करत आले आहेत.  युव्हाल हरारी या अभ्यासकाचं 'सेपियन्स' हे सध्या गाजत असलेलं पुस्तक आहे. या पुस्तकात त्याने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. होमो सेपियन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाच्या प्रजातीने पृथ्वीवर आपलं बस्तान बसवलं त्यात त्याच्या 'कल्पित वास्तव' (Imagined Reality) रचण्याच्या क्षमतेचा मोठा वाटा होता. हे कल्पित वास्तव म्हणजे काय ? तर काल्पनिक कथानक रचणं आणि ते लोकांना पटवून देणं. होमो सेपियन्सनी जे समूहजीवन उभारलं आणि आजचे होमो सेपियन्स - म्हणजे तुम्ही-आम्ही सगळे - ज्या गुंतागुंतीच्या समूहजीवनात जगतो आहोत त्याचा आरंभ कल्पित वास्तवामुळे झाला असं युव्हाल हरारी लिहितो. देव, धर्म, मानवाधिकार, ईश्वर, समता व बंधुतेसारखी मानवी मूल्यं ही कल्पित वास्तवाची उदाहरणं आहेत. अनेकजणांनी या कल्पित वास्तवावर श्रद्धा ठेवली आणि त्यातून समाज रचना आकारास येत गेली. हे अधिक तपशिलात समजून येण्यासाठी 'सेपियन्स' वाचणं इष्ट होईल. पण मला स्त्री - पुरुष नातेसंबंधांचा विचार करताना या 'कल्पित वास्तवा'ची आठवण झाली कारण या विषयाचा विचार करत असताना एक प्रश्न पडतो तो असा की स्त्री - पुरुष संबंधांचं 'मूळ सत्य', 'खरं वास्तव' काय आहे ?

हा प्रश्न कदाचित काहींना अप्रस्तुत वाटेल, विषयाचा कीस पाडायच्या उद्देशाने विचारल्यासारखा वाटू शकेल. पण स्त्री-पुरूषांनामधील रोमँटिक नात्याविषयी, इंटिमेट रिलेशनविषयी बोलताना हा प्रश्न विचारणं तत्त्वतः महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या प्रश्नाचं एक स्पष्ट उत्तर 'लैंगिकता' हे आहे. पण लैंगिकता म्हणजे तरी नक्की काय ? म्हणजे एखाद्या स्त्रीकडे / पुरुषाकडे पाहून एखाद्या पुरुषामध्ये / स्त्रीमध्ये कामभावना जागी होऊन शरीरसंबंधांची इच्छा निर्माण होणं ही लैंगिकता की आवडलेल्या स्त्री / पुरुषाला ओझरता स्पर्श केल्याने मनात निर्माण होणारं समाधान / बेचैनी म्हणजे लैंगिकता? आणि जर केवळ अव्यक्त आकर्षण असेल तर तीही लैंगिकता का? सेक्शुअल आणि असेक्शुअल यामधल्या फरकाची रेघ कशी आखायची? लैंगिकता या शब्दाचा अर्थ आपण सहसा शारीरिक आकर्षण, शरीरसंबंध याच्याशी जोडतो. पण कुठल्याही भावनेसारखाच लैंगिकतेचाही 'स्पेक्ट्रम' असतो, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. स्त्री व पुरुषामध्ये जे ताण अस्तित्वात असतात त्यात जैविक ताणही आहेत हे जर आपण समजून घेतलं तर या संबंधांचं व्यवस्थापन सोपं होईल. स्त्री व पुरुषाच्या विशिष्ट वर्तनाच्या मुळाशी जाणं सोपं होईल. 'लिंगभाव' हा शब्द या संदर्भात समर्पक आहे कारण तो लिंगविशिष्ट जाणिवेशी जोडलेला आहे.

मानवी इतिहासाच्या वाटचालीत आपण जी मूल्यं रुजवली ती युव्हाल हरारी म्हणतो तशी कल्पित वास्तवं असली तरी ती अस्तित्वाच्या लढाईत उपयुक्त ठरली आणि पुढे समूहजीवनासाठीदेखील उपयुक्त ठरली, व्यक्तीच्या स्वतंत्र व आनंदी जगण्यासाठी उपकारक ठरली. त्यामुळे तिथे काहीच दुमत नाही, परंतु जैविक प्रेरणा आपल्यावर अजूनही 'हावी' होऊ शकतात हे लक्षात न घेता मूल्यव्यवस्थेच्याच आधारे स्त्री - पुरुषांच्या वर्तनाचा उलगडा करायचा प्रयत्न केला तर तो यशस्वी होत नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. जैविक प्रेरणांचा उल्लेख अशासाठी कारण आपण इथे स्त्री - पुरुषांमधील जैविक ताणाचा विचार करतो आहोत. स्त्री - पुरुष संबंधांना मित्रत्व, ममत्व, सहानुभूती हे आयाम अर्थात आहेतच आणि ते निःसंशयपणे 'प्रगल्भ आयाम' आहेत. परंतु स्त्री - पुरुषांमध्ये प्रेम, लैंगिक आकर्षण हे आयाम जैविक ताण निर्माण करतात म्हणून त्यावर विचार करणं आवश्यक वाटतं. कालानुरूप हे आयाम बदलतात हेही खरं आहे. म्हणजे पन्नासच्या दशकातील प्रेमभावना आणि आजची प्रेमभावना यात मूलभूत साम्य असलं तरी प्रकटीकरणात, प्रेमभावनेशी 'डील' करायच्या पद्धतीत आज फरक पडला आहे. लैंगिकता आपलं अस्तित्व स्पष्टपणे ठसवू पाहते आहे. या पार्श्वभूमीवर पुढील लेखात प्रेम, लैंगिकता यावर अधिक तपशीलात बोलू आणि त्याआधारे स्त्री-पुरूष संबंधांचं नवीन आकलन होऊ शकेल का ते तपासून पाहू.     

Saturday, September 1, 2018

जातवास्तवाचं आव्हान

एक जुना प्रसंग आठवतो. कॉलेज संपवून मी नोकरीला लागलो होतो. आमच्या कॉलनीतील एका परिचितांकडे काही कामाने जाणं व्हायचं. त्यांचा मुलगा त्यावेळी बहुधा सहावी-सातवीत होता. एके दिवशी त्याने मला अचानक विचारलं, "तू कोण आहेस?" मला आधी कळेना, पण नंतर लक्षात आलं की तो माझी जात विचारत होता. एका शाळकरी मुलाने मला असं विचारावं याची मला मौज वाटली. आज इतक्या वर्षांनी हे आठवल्यावर पुन्हा मौज वाटलीच, पण उद्विग्नही व्हायला झालं. 

आपण राहतो त्या समाजाशी, त्या समाजाच्या मानसिकतेशी आपली नाळ जुळते का याचं प्रत्येकाचं उत्तर असेल. माझं प्रामाणिक उत्तर 'नाही' कडे झुकण्याचं एक कारण आपल्या समाजातील जन्माधिष्ठित विभागणी हेही आहे. नाळ जुळत नाही हे बहुधा उद्वेगाने वाटतं पण त्याचवेळी भारतीय समाज, त्याचे अनेकविध पैलू हे समाजशास्त्रीयदृष्ट्या कुतूहलाचं वाटतं हेही खरं. आपलं सामाजिक स्थान बऱ्याच गोष्टी निश्चित करत असतं. 'मी विचार करू शकतो, लिहितो' यातला एक (मोठा) वाटा माझ्या वर्गीय स्थानाचा असतो आणि भारतीय संदर्भात तो जातीचाही असतो हे जाणवणं तसं विषण्ण करणारं आहे. आपल्या समाजातील जातवास्तवाचा विचार करताना मला विलास सारंगांच्या 'मॅनहोलमधला माणूस' या पुस्तकाची आठवण होते. मराठी साहित्य, समाज आणि  जातवास्तव हा या पुस्तकाचा विषय आहे. सारंग एके ठिकाणी लिहितात, 'अनेक शतकं समाजाने जातिव्यवस्था राबवलेली आहे. पिढ्यान पिढ्या हे ज्ञान मेंदूत संक्रमित झालेलं आहे आणि ते भारतीय माणसाच्या मनात नेणिवेचा भाग बनलेलं आहे. याही पुढे जाऊन असं म्हणता येईल की जातिभान हा घटक भारतीय माणसाच्या जनुकांचा भाग बनलेलं आहे. जातिवास्तवाचं प्रदीर्घ सातत्य लक्षात घेता जातियंत्रणा ही भारतीय माणसाच्या जनुकसंचिताचा भाग बनलेली असणं शक्य आहे. पुढल्या वीसेक वर्षात मेंदूतील जातिज्ञानाचं शरीरशास्त्रीय अस्तित्व पडताळून पाहता येणं शक्य आहे.'

'जात ही भारतीय समाजमनाच्या नेणिवेचा भाग बनली आहे' हे सारंगांचं विधान माझ्या मनातील विचार प्रतिबिंबित करणारं होतं. जातवास्तवाकडे मी 'आधुनिकतेतला अडसर' म्हणून तर बघतोच पण त्याच्याही आधी समाजाचं 'गुणवत्तापूर्ण जगणं' रोखणारा घटक म्हणूनही बघतो. जात या मुद्द्याबरोबर ओघाने येणारा मुद्दा म्हणजे आरक्षण.  सामाजिक विषमता दूर व्हायला मदत व्हावी म्हणून आरक्षणाची कल्पना अंमलात आणली गेली आणि ते स्वागतार्हच आहे. जन्माधिष्ठित विभागणीमुळे ज्यांच्यावर पिढ्यानपिढ्या अन्याय झाला त्यांना आता समान संधी मिळाव्यात म्हणून केलेलं हे 'पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन' होतं. आज या विषयातील गुंते वाढले आहेत आणि खरं सांगायचं तर त्यावर  बोलण्याइतका माझा अधिकार नाही. काही गोष्टी अगदीच जाणवतात, पण त्यावर निर्णायक काही म्हणता येईल असं वाटत नाही. (जात जायला हवी हे निर्णायकपणे वाटतं!) त्यामुळे आरक्षण हा मुद्दा बाजूला ठेवून आपण 'जात' या आरक्षणाच्या पुष्कळ आधीपासूनच्या वास्तवाबद्दल, आपण त्यावर काय करू शकतो याबद्दल बोलणार आहोत. याबाबत एक किस्सा सांगतो. काही महिन्यांपूर्वी भीमा - कोरेगावला जे घडलं त्या संदर्भाने मला एका परिचितांनी काही फॉरवर्डेड मेसेजेस पाठवले. दलित संघटनानांनी पुकारलेला बंद अनाठायी होता असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांना मी एक मोठा रिप्लाय दिला. त्यातला एक मुद्दा असा होता - 'भीमा-कोरेगावला जे घडलं' आणि ‘भीमा-कोरेगावला जे घडलं त्यामुळे पुढे जे घडलं' यातील दुसऱ्या प्रकारामुळे अस्वस्थ, संतप्त होऊन बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. तुमचे मेसेजेस त्याच धर्तीचे आहेत. पण पहिल्या प्रकाराबाबत, म्हणजे 'भीमा कोरेगावला जे घडलं' त्याबाबत तुमची प्रतिक्रिया समजली नाही. ती समजून घ्यायला मला आवडेल. एकूणच सवर्ण-दलित संघर्षाबाबत तुम्हाला काय वाटतं, फार पूर्वी नाही तर अगदी अलीकडील काळापर्यंत दलितांवर जे अत्याचार झाले त्याबाबत तुम्हाला काय वाटतं, खैरलांजी-खर्डा आणि इतर घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल. या घटना भयंकर होत्या आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी असं तुम्ही म्हणाल याची मला कल्पना आहे. पण त्याच्यापुढे जाऊन, जातीवर आधारित आपल्या सामाजिक रचनेबाबत तुम्हाला काय वाटतं, सवर्ण आणि मुख्य म्हणजे शिक्षित, बुद्धिमान, शहरी विकासाचे लाभार्थी म्हणून आपली काही विशेष जबाबदारी आहे की नाही याबाबत तुम्हाला काय वाटतं हे समजून घ्यायला मला आवडेल.'  

आपली जन्मदत्त जात, तिने प्रभावित केलेलं आपलं सांस्कृतिक जगणं, आपलं विचारविश्व आणि संथपणे, सूक्ष्मपणे, तर कधी बऱ्याच भडकपणे समाजामध्ये कळेल न कळेल अशी दरी निर्माण करत जाणारा जातिभेदाचा प्रवाह याचं आपलं आकलन काय आहे ? आपल्याला या भेदासह जगणं मान्य आहे, नाईलाजानं मान्य आहे, आपण यावर काही करू इच्छितो का असे बरेच प्रश्न मनात उभे राहतात. आणि अशावेळी मला अटळपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' या दीर्घ निबंधाची आठवण होते.

१९३६ साली लाहोरमधील जात-पात-तोडक-मंडळ या सुधारणावादी संस्थेनं आंबेडकरांना वार्षिक कार्यक्रमात व्याख्यानासाठी बोलावलं होतं. त्यांचं लिखित स्वरुपातील व्याख्यान मंडळाकडे आधी पोचलं आणि ते वाचल्यावर मंडळातील मंडळींच्या लक्षात आलं की हे प्रकरण आपल्याला झेपणारं नाही. कारण व्याख्यानात आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची कठोर चिकित्सा केली होतीच, पण त्याचबरोबर त्यांनी हिंदू धर्माचीही चिकित्सा केली होती. मंडळाने कार्यक्रम रद्द केला. हे भाषण होऊ शकलं नाही. मग आंबेडकरांनी या व्याख्यानाच्या प्रती स्वतः छापून वितरित केल्या आणि हे छोटं पुस्तक परिवर्तनवादी चळवळीचं एक धारदार हत्यार बनलं. 

आंबेडकरांचं लेखन वाचताना तुम्हाला सावरून बसायला लागतं. कारण 'बॅरिस्टर' आंबेडकर जी तार्किक आर्ग्युमेंट्स करतात त्यांनी तुम्ही गारद व्हायची शक्यता असते. 'अनाहिलेशन ऑफ कास्ट' इंग्लिशमध्ये तर उपलब्ध आहेच पण त्याचे बऱ्याच भाषांमधून अनुवाद झाले आहेत. सुगावा प्रकाशनाने 'जातिप्रथेचे विध्वंसन' या नावाने मराठी अनुवाद प्रकाशित केला आहे. (अनुवादक : गौतम शिंदे)  'भारतात सामाजिक सुधारणांना मित्र थोडे आणि टीकाकार फार' हे अधोरेखित करत आंबेडकरांच्या विवेचनाची सुरुवात होते आणि पुढे वाचताना आपण केवळ गुंगत जातो. मी हे पुस्तक वाचताना अनेक विधानं, काही परिच्छेद अधोरेखित करून ठेवले होते. वानगीदाखल काही उदाहरणं पहा - 'जात ही केवळ कामांची विभागणी नसून कामकऱ्यांची विभागणी आहे'. 'जातीचे अस्तित्व आणि जातीची जाणीव भूतकाळातील वैराची आठवण कायम ठेवण्याचं काम करते'. 'जातिपद्धती ही सामूहिक कृतीला प्रतिबंध करते'. 'चातुर्वर्ण्याच्या पद्धतीमुळे प्रत्यक्ष कृती करण्यास हिंदूंचे खालचे वर्ग असमर्थ बनवले होते'. 'बिगर हिंदूंमध्ये जातीला कोणतेही धार्मिक पावित्र्य नाही, परंतु हिंदूंमध्ये जातीला निःसंदिग्धपणे पावित्र्य दिलेले आहे. हिंदूंना त्यांचा धर्म जातींचा अलगपणा आणि विभक्तपणा एक सद्गुण म्हणून पाळण्यास भाग पाडतो. परंतु बिगर हिंदूंना त्यांचा धर्म जातींविषयी तोच दृष्टिकोन पाळण्यास भाग पाडत नाही'. 'आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी कामगार वर्गाला चेतावण्याकरता कार्ल मार्क्स म्हणाला होता, 'तुम्हाला तुमच्या बेड्यांशिवाय काहीच गमवावे लागणार नाही.' परंतु काहींना अधिक तर काहींना कमी असे वेगवेगळ्या जातींमध्ये सामाजिक व धार्मिक अधिकार अशा कौशल्यपूर्ण रीतीने विभागलेले आहेत की त्यामुळे मार्क्सची घोषणा हिंदूंना जातीपद्धतीविरुद्ध चेतवण्यास निरुपयोगी ठरते.' या पुस्तकात आंबेडकरांनी धर्माबद्दल जी मांडणी केली आहे त्यातील एक परिच्छेद तर जसाच्या तसा द्यायचा मोह होतो आहे, पण जागेअभावी तो टाळतो. 

आंबेडकरांचे विचार खरेखुरे क्रांतिकारक आहेत. त्यांनी हिंदू धर्म आणि जातीव्यवस्था याचं नीट विच्छेदन केलं आहे. कुठल्याही मांडणीवर - विशेषतः सामाजिक संरचनेबाबतच्या मांडणीवर - चर्चा होऊ शकते. कारण काही धागे सुटण्याची शक्यता असते.  त्यामुळे हे आंबेडकरांच्या मांडणीबाबतही संभवू शकेल. परंतु कनिष्ठ जातीत जन्मल्याचे अनेक चटके भोगत, त्यातून स्वतःला निग्रहपूर्वक उचलून घेत, सततच्या अभ्यासाने तर्कशक्ती विकसित करत परिवर्तनाचा पाया रचणाऱ्या आंबेडकरांचं विचारदर्शन थक्क करणारं आहे, त्यांच्याविषयी आदर जागवणारं आहे. या पुस्तकाच्या अखेरीस गांधीजींनी 'हरिजन' मध्ये आंबेडकरांच्या निबंधावर केलेल्या दोन टिप्पण्या आणि आंबेडकरांचं त्यावरील उत्तरही समाविष्ट करण्यात आलं आहे. ही चर्चाही वाचण्यासारखी आहे.  
इथवर सगळं ठीक आहे. जात व धर्म याबाबतचं आकलन वाढवण्यासाठी आंबेडकरांचं वाचन टाळणं अशक्यच आहे. पण प्रश्न पुढे आहे. प्रश्न 'आपला' आहे. 'जात' ही आजही व्यक्तीची ओळख म्हणून उभी आहेच. तेव्हा जातीसमोर हार मानायची की जातिअंतासाठीचे मार्ग शोधत राहायचं ? 'आपण' काय करायचं? मी जेव्हा माझं आडनाव लावणं बंद केलं तेव्हा आईचं नाव पुढे यायच्या आनंदाबरोबरच आपण जातीला किंचितसा - अगदी किंचितसा धक्का दिला हाही आनंद होता. पण जात ही चीज नावाव्यतिरिक्त खाणं - पिणं, कपडे, भाषा, काही सवयी अशा रूपांनीसुद्धा जिवंत असतेच. ती मनात जिवंत असते आणो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती लग्नामुळे जिवंत ठेवली जाते. आपल्याकडे विवाहसंस्था ही जातीसंस्थेची रक्षक आहे असं म्हणणं वावगं होणार नाही. मग या पहिलवानाला लोळवायचं कसं? 

जातिव्यवस्थेने केलेली गोची अशी आहे की तिने व्यक्तीला समूहभान दिलं आहे. जे आदिम टोळीसमूहाशी मिळतंजुळतं आहे. आधुनिक काळातील व्यापक समाजभान, राष्ट्रभान आणि अंतिम म्हणजे वैश्विक मनुष्यभान या सगळ्यावर ते कडी करतं. त्यामुळे आपली ओळख, अस्मिता या बाबींशी जोडलं गेलेलं हे भान काढणं फार अवघड आहे. इतर अनेक महत्त्वाच्या बाबतीत भानावर नसणारे आपण जातीबाबत मात्र फारच भानावर असतो! यातली व्यावहारिक बाजू हीच आहे की जात ही एक 'फंक्शनल' (कार्यशील, ज्याचा परिणाम रोजच्या जगण्यावर होतो अशी) गोष्ट आहे. जातीशी जोडलेली 'विवाह' हीदेखील एक 'फंक्शनल' गोष्ट आहे. व्यवस्था सुरळीत चालवायची तर मग खाणं-पिणं, सवयी, साधारण वृत्ती, श्रद्धा याबाबत आपल्यासारख्याच समूहातील मुलगा किंवा मुलगी निवडणं लोकांना श्रेयस्कर वाटतं. (इंग्लिशमध्ये 'नोन डेव्हील इज बेटर दॅन अननोन एंजल'असा एक वाक्प्रचार आहे. त्याची आठवण झाली.) पण या सोयीबरोबर संकुचितताही येते, वृथा अभिमान येतो आणि समाज विखुरला जातो.   
        
मला असं वाटू लागलं आहे की एकूण विचार करता, जातीच्या पहिलवानाची ताकद लक्षात घेता त्याच्याशी थेट दोन हात करणं जिथे जड जात असेल तिथे त्याला अशक्त कसं करता येईल हे पाहावं. त्याला जो खुराक लागतो तो कमी करत न्यावा. मग एका दिवशी तो संपेल. विलास सारंग म्हणतात तसं जात ही नेणिवेचा भाग बनली असेल, जातिभान हे आपल्या जनुकांचा भाग बनलं असेल तर काही शे - हजार वर्षांच्या या जाणिवेच्या अंगवळणी पडलेल्या भागाला काढून टाकायला कदाचित तेवढाच काळ जावा लागेल. आज जातवास्तव राजकीय कारणांमुळे आणि सामाजिक वैरभाव म्हणूनही प्रखर होत असलं तरी जातीअंताच्या आघाडीवर अगदीच अंधार आहे असंही नाही. विशेषतः तांत्रिक, आर्थिक आघाडीवरील बदल जातवास्तवाला थोडं थोडं हलवत आहेत. व्यक्तिस्वातंत्र्याची कक्षाही विस्तारते आहे. आंतरजातीय विवाह होत आहेत. त्यामुळे आशेच्या जागा दिसतात. पण नवतेला रोखण्याची ताकद जातवास्तवात अजूनही आहे. त्यामुळे आव्हान मोठं आहेच. त्यासाठी वेगवेगळ्या व्यूहरचना हव्या आहेत आणि मुख्य म्हणजे जात - धर्माच्या पोलादी पकडीतून येणारा हळवेपणा, व्यक्तिस्वातंत्र्याविषयीची भीती / तिरस्कार / अढी हे सगळं नाकारू शकणारं मन हवं आहे. सोबतीला आंबेडकर आहेतच! 

Saturday, August 18, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा - २

माझे वडील सर्वोदयी कार्यकर्ते होते. त्यांच्याशी माझ्या वरचेवर वाद-चर्चा व्हायच्या. गांधीं-विनोबांच्या प्रभावाखाली असलेले वडील आणि गांधी-विनोबांचा प्रभाव असला तरी 'मायक्रोसॉफ्ट-गूगलोत्तर' काळातला, आंबेडकर-डार्विन-स्त्रीवाद याही रसायनांकडे आकर्षित झालेला मी अशा दोन व्यक्तींमधली ती टक्कर असायची. मात्र त्यांचं एक म्हणणं माझ्या लक्षात राहिलं. ते म्हणाले की आम्ही सगळे गांधींच्या खांद्यावर बसून जग बघतोय. त्यामुळे आम्हांला थोडं दूरवरचं दिसू शकतं. तू आमच्या खांद्यावर बसला आहेस. त्यामुळे आम्हांला जे दिसत नाही ते तुला दिसत असणार हे मला मान्य आहे!

हा मुद्दा मला नोंद घेण्याजोगा वाटला कारण तो एका गांधीवादी कार्यकर्त्याकडून आला होता. चिकित्सेची 'स्पेस' खुली ठेवणारा होता. मुळात एक गोष्ट मान्य करायला हवी ती म्हणजे आपण भारतीय वृत्तीने 'पूजक' आहोत. आपल्याला एखाद्या अधिष्ठानाची सतत गरज असते. (आपल्या कामासाठी प्रेरणा म्हणून, आपल्यावर विवेकाचा अंकुश राहावा म्हणूनही ते होतं, परंतु याचे इतरही काही पैलू आहेत. सध्या एवढंच नोंदवून पुढे जाऊ.) 'वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) वास्तवा'ला महत्त्व न देता किंवा तिकडे दुर्लक्ष करून 'आपल्या मनात वसत असलेल्या' (पर्सीव्ह्ड, आपल्याला समजलेल्या) वास्तवाला महत्त्व देण्याच्या आपल्या मनोवृत्तीत आपल्या पूजक वृत्तीची मुळं दडलेली आहेत. आपली ही 'पूजक' वृत्ती एक ऐतिहासिक परिपाक आहेच, पण त्याबरोबर जातीय, आर्थिक विभागणीने आणि सरंजामी वृत्तीच्या अवशेषांनी शतभंग झालेलं आपलं समाजमानस आपल्या या वृत्तीला खतपाणी घालत असतं. मुद्दा असा की आपण जेव्हा ऐतिहासिक महत्त्वाच्या व्यक्तींचा विचार करतो तेव्हा आपल्या नैसर्गिक किंवा वैचारिक घडणीमुळे त्या व्यक्तीच्या प्रेमात असण्याची शक्यता गृहीत धरूनही त्या व्यक्तीच्या विचारांवर, त्यातल्या 'इसेन्स'वर लक्ष केंद्रित करण्याची गरज  आपल्याला लक्षात घ्यावी लागते. त्यांचे विचार स्थलकालसापेक्ष असू शकतात हे मान्य करायची तयारी असावी लागते. (रावसाहेब कसबे यांच्या 'आंबेडकरवाद - तत्त्व आणि व्यवहार' या पुस्तकातील पहिलं प्रकरण 'महापुरूष' यादृष्टीने वाचण्यासारखं आहे. 'महापुरूषांचा विचार फार सावधगिरीने करावा लागतो' हे त्यांचं म्हणणं तर अगदीच पटतं.) 

हे सगळं लक्षात घेऊन गांधीजींबाबत वस्तुनिष्ठपणे, 'इसेन्स'चा मुद्दा डोळ्यापुढे ठेवून विचार केला तरी मला ते 'गायडिंग लाइट' सारखे वाटतात. परंतु त्यांची मांडणी स्वप्नवत, आदर्शवादी आहे आणि तिला प्रत्यक्षाच्या मर्यादा आहेत, मानवी आकांक्षा, मानवी व्यवहार यांचा विचार करता ती पुरी पडत नाही असं अनेकांचं मत असतं. मागच्या लेखाच्या शेवटी ज्या तीन लेखांचा उल्लेख केला आहे त्यातील विश्राम गुप्ते यांच्या मांडणीत हा मुद्दा येतो. गांधीवाद आणि आधुनिकतावाद या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत असं त्यांच्या लेखाचं गृहीतक असल्याचं त्यांनी लेखात नमूद केलं आहे. त्यांचं विश्लेषण 'प्रत्यक्षातील अडचणींच्या' पार्श्वभूमीवर आदर्शाची चिकित्सा करणारं आहे तर चैत्रा रेडकर यांनी 'हिंद स्वराज'चं विश्लेषण करताना या पुस्तकातून पर्यायी जीवनशैलीच्या विकासाची गुणसूत्रे सापडतात असं म्हटलं आहे. हिंद स्वराजच्या लेखनामागचे राजकीय संदर्भही त्यांनी तपासले आहेत. त्यांचा एक मुद्दा मला विशेष महत्त्वाचा वाटला - 'औद्योगिक भांडवलशाहीमुळे खेड्यांच्या वाट्याला आलेली विपन्नावस्था, ग्रामीण भागांचे शहरांकडून होणारे शोषण, शहरांवरील ग्रामीण भागांचे परावलंबित्व या सर्व बाबींचे भान गांधी आणि मार्क्स दोघानांही होते. यावरील इलाज म्हणून मार्क्सने उत्पादन साधनांवरील मालकीचा प्रस्ताव मांडला तर गांधींनी यंत्रविवेक सुचवला. बाजारी अर्थव्यवस्थेतून मुक्तीसाठी उत्पादन साधनांवर सामूहिक मालकी प्रस्थापित करण्याचा मार्क्सचा मार्ग आपल्याला क्रांतिकारी वाटतो, मात्र गांधींनी सुचवलेला मार्ग स्वप्नाळू, अवास्तव आणि अशक्य वाटतो याचा अर्थ काय लावायचा?'  

वरील मुद्द्याचा रोख अर्थातच परिवर्तनाच्या सामाजिक-राजकीय चळवळीत असणाऱ्या कार्यकर्त्या-विचारवंतांकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी कदाचित मार्क्स आणि गांधी दोघांचीही मांडणी अवघड, स्वप्नाळूच असेल. मात्र इथे आपण एक लक्षात घेऊ की सर्वच क्रांतदर्शी विचारवंतांचा रोख सहअस्तित्व सुकर व्हावं, समाजात शांती-समृद्धी-न्याय असावा याकडे असतो. त्यासाठीचा त्यांचा असा एक 'पर्स्पेक्टिव्ह' असतो. त्याचा विस्तार आपल्याला करावा लागतो. मला असं दिसतं की गांधीवाद, मार्क्सवाद किंवा इतर कुठल्याही विचारधारेचा 'गाइडलाइन' म्हणून विचार न करता त्यातील शब्दांविषयी, काही निर्णयांविषयी वाद घालत 'ते चुकले की नाही' याचा खल करण्यात आपला पुष्कळ वेळ जातो. इतिहासाचा अभ्यास म्हणून ते करायला हरकत नाहीच, पण तो आजचा आपला जीवन-मरणाचा प्रश्न करण्यात काही हशील नाही. 

मागच्या लेखात मिलिंद बोकीलांच्या लेखाचा उल्लेख केला आहे. हा दीर्घ लेख फक्त 'हिंद स्वराज'विषयी नाही. गांधीजी हे 'एकूण प्रकरण' समजून घ्यायच्या दृष्टीने तो अतिशय उपयुक्त आहे. विज्ञानासंदर्भातील गांधीजींची मते ही एक प्रकारे त्यांच्या विचारदर्शनाला पडलेली मर्यादा आहे असं बोकील नोंदवतात. परंतु त्यांच्या सर्व विचारांतून अंतिमतः दिसणारा गांधी कोणता याचं उत्तर बोकीलांनी 'नीतीसाठी तळमळणारा गांधी' असं दिलं आहे. याशिवाय गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाबाबत लोकांचा जो गोंधळ होतो तो दूर होईल असं विवेचन त्यांनी केलं आहे. आपण गांधीजींची दृष्टी स्वीकारली नाही पण आपली स्वतःची अशी किंवा आपल्याला उपयोगी अशी विकासाची दृष्टी आपण विकसित केली नाही हे त्यांचं निरीक्षणही योग्य आहे. आजचे आपल्यासमोरचे विकासाचे आणि विकासामुळे निर्माण झालेले पेच त्याची साक्ष देतात.   

गांधीजींबाबतची विविध मते लक्षात घेतली तर असं दिसतं की त्यांचा अंतिम उद्देश एका नव्या वास्तवाची निर्मिती करण्याचा होता. ते वस्तुगत, व्यवहार्य प्रश्नांशीच झुंजत होते. त्यांच्या कल्पनेत एक माणूस होता आणि त्यांच्या विरोधकांनाही मान्य करावी लागेल अशी बाब म्हणजे ते स्वतः त्या माणसाचं प्रतिबिंब होते. गांधीजींना नैतिक उंची प्राप्त झाली कारण बऱ्याच अव्यवहार्य गोष्टी त्यांनी स्वतः करून दाखवल्या. कमीत कमी गरजा ठेवून जगता येतं हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं.   

एक गोष्ट खरी की गांधीजींचे समकालीन बाबासाहेब आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल यांनी गांधीजींच्या आदर्शांना संविधानात्मक आणि संस्थात्मक जोड दिली. गांधी आणि आंबेडकर यांच्यात काही मतभेद होते हे सर्वश्रुत आहे. आंबेडकरांची धर्मविषयक आणि जातीनिर्मूलनविषयक भूमिका अधिक स्पष्ट आणि प्रखर होती आणि त्यामुळे अधिक आधुनिक होती असं म्हणता येईलच. तो स्वतंत्र विषय आहे. मात्र या सर्वच मंडळींनी नव्याने स्वतंत्र झालेल्या देशाच्या पायाभरणीत - जी अतिशय आव्हानात्मक गोष्ट होती - अतुलनीय योगदान दिलं यात शंकाच नाही. ( स्वातंत्र्यानंतर उभारल्या गेलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेच्या मुंबई शाखेत कालांतराने 'सेंटर फॉर टेक्नॉलॉजी अल्टरनेटिव्ह्ज फॉर रूरल एरियाज' या स्वतंत्र शाखेची निर्मिती करण्यात आली हे नोंद घेण्याजोगं आहे.)

गांधीजी, त्यांचा प्रभाव, देशाची 'डेव्हलपमेंट पॉलिसी', त्यातील कच्चे दुवे, त्यातूनच उभं राहिलेलं नर्मदा बचाओ आंदोलनासारखं जनआंदोलन, त्याच्या मागेपुढे उभी राहिलेली इतर अनेक जनआंदोलनं, शासकीय दमन, भांडवलशाहीचे हितसंबंध, लोकसंख्येचा प्रश्न आणि पर्यायी विकासाच्या वाटा हा एक मोठा अभ्यासविषय आहे. गांधीजींच्या मूळ मांडणीची परिणती पुढे 'सामाजिक न्याया'चे प्रश्न उभे करण्यात झालेली दिसते आणि ती अतिशय आश्वासक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगती, भौतिक विकासाची ऊर्मी जोवर सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला बरोबर घेऊन चालते तोवरच तिचा चेहरा मानवी राहतो, अन्यथा ती भेसूर होऊ लागते हे पुन्हा पुन्हा दिसून आलं आहे.   

संबंधित विषयाबाबत शोध घेण्यासारखं बरंच आहे. यापुढील एक-दोन लेखामधून आपण तसा प्रयत्न करू. मात्र सध्या ही चर्चा थांबवून पुढच्या लेखात आपण वेगळ्या विषयाकडे वळणार आहोत.  

Saturday, August 4, 2018

गांधीजी, आधुनिकता आणि दुविधा – १

'महात्मा गांधी' हे दोन शब्द समस्त भारतीयांच्या मनात काहीएक हालचाल निर्माण करतात. ही हालचाल बहुस्तरीय असते. ही हालचाल होते कारण या नावाबरोबर मनात जे काही उलट-सुलट उमटतं ते टाळून आपल्याला पुढे जाता येत नाही. आज राजकीय पटलावर जवाहरलाल नेहरूंची छाया गडद झालेली (केलेली) दिसते आणि गांधी नावापुरते उरले आहेत असं दिसतं. पण भारतातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर गांधींचा सहज प्रभाव बराच काळ राहिला. आज त्याची तीव्रता कमी-जास्त होत असली तरी गांधींची आठवण होत नाही असं होत नाही. 'गांधी' हा माणूस आणि विचार भारतीय जाणिवेत आहेच. बदलत्या काळाच्या ओघात गांधी विचार काय होता, त्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक बाजू काय होत्या हे सर्वसामान्यांच्या स्मृतीतून पुसलं जात 'गांधी' हे साधारणपणे चांगुलपणा मोजण्याचं एक 'स्टॅंडर्ड' म्हणून उरलं आहे. मात्र भारतात आणि जगातदेखील गांधीजींविषयी आजवर इतकं लिहिलं आणि बोललं गेलं आहे की त्या प्रसिद्ध 'हत्ती आणि सात आंधळे' या गोष्टीतील हत्तीच्या जागी गांधीजींना सहज ठेवता येईल!

गांधीजी हा माझ्या कुतूहलाचा विषय आहे. काही मूलभूत विचार काळ बदलला तरी सुसंगत ठरतात. गांधींनी असे विचार दिले आहेत आणि स्वतःच्या कृतीतून त्यांची परिणामकारकता सिद्ध केली आहे. शिवाय माझ्यासारख्या माणसाला तर 'कर के देखो' म्हणणारे गांधी जवळच्या मित्रासारखेच वाटतात. परंपरा आणि आधुनिकता या संघर्षात गांधीजींनी अतिशय महत्त्वाचे 'कन्सर्न्स' उपस्थित केले आहेत. त्यामुळे आपल्या चर्चेत गांधीजी येणं अगदी अपरिहार्यच होतं. 

'हिंद स्वराज' हे गांधीजींचं एक गाजलेलं पुस्तक. १९०९ साली लंडन ते दक्षिण आफ्रिका या प्रवासात दहा दिवसात त्यांनी हे पुस्तक लिहिलं. लंडनमध्ये त्यांना जे स्वराज्यप्रेमी भारतीय तरूण भेटले त्यांच्याशी झालेल्या संवादाचं सार या पुस्तकात आहे. 'संपादक आणि वाचक' अशा दोघांमधील संवादातून गांधीजी आपले विचार मांडतात. मूळ गुजराती पुस्तकाचा त्यांनी स्वतःच इंग्लिश अनुवाद केला. दोन्ही पुस्तकांवर सरकारने बंदी घातली होती. १९१५ साली गांधीजी भारतात आले. आल्यावर त्यांनी पुन्हा इंग्लिश अनुवाद प्रसिद्ध केला. यावेळी मात्र सरकारने त्याचा विरोध केला नाही. गांधीजी आफ्रिकेत असताना गोपाळ कृष्ण गोखले यांनी हे पुस्तक वाचलं होतं. त्यांना ते आवडलं नाही आणि गांधीजी हे पुस्तक स्वतःच रद्द करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. परंतु गांधीजींनी तसं केलं नाही. ते म्हणाले की हे पुस्तक मी पुन्हा लिहिलं असतं तर त्याच्या भाषेत मी सुधारणा केली असती पण माझे मूळ विचार तेच आहेत. पुढे तीस वर्षांनंतर, १९३८ साली 'आर्यन पाथ' या मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इंग्लिश मासिकाने 'हिंद स्वराज अंक' प्रकाशित केला होता. या मासिकाला पाठवलेल्या लहानशा पत्रात गांधीजींनी हेच म्हटलं आहे. या पत्रात आणखी एक गंमत आहे. पत्राच्या शेवटी गांधीजी लिहितात - 'दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना मार्गदर्शन करण्याचं मोलाचं काम या पुस्तकाने केलं हे मी वाचकांना सांगू इच्छितो. याच्या विरुद्ध बाजूने विचार करण्यासाठी वाचकांनी माझ्या एका स्वर्गीय मित्राचे मतही लक्षात घ्यावे. 'हे पुस्तक एका मूर्ख माणसाने लिहिलं आहे' असं तो म्हणाला होता.'

एका मूर्ख माणसाने बऱ्याच शहाण्यांना विचारात पाडलं असं या पुस्तकात काय आहे? 'हिंद स्वराज' ज्यांनी वाचलं आहे ते त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतीलच, पण ज्यांनी ते वाचलेलं नाही त्यांनी ते जरूर वाचावं. थोडे धक्के बसतील, पण तरी वाचावं. 'हिंद स्वराज' मध्ये गांधीजींनी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचं माहात्म्य अधोरेखित करत पाश्चात्त्य आधुनिकतेवर कठोर टीका केली आहे. आपण ज्याला सहजपणे प्रगतीचं लक्षण म्हणतो अशा अनेक गोष्टी त्यांनी कुचकामाच्या ठरवल्या आहेत. उदा. रेल्वे, डॉक्टर आणि वकील यांनी भारताला कंगाल केलं आहे असं ते म्हणतात. सुधारणा, विकास हा एक प्रकारचा आजार आहे असं ते सांगतात. आणि मौज अशी आहे की आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ते जे मुद्दे मांडतात ते वाचून आपण त्याक्षणी तरी नकळत होकारार्थी मान डोलावतो. आपल्याला ते व्यावहारिकदृष्ट्या पटत नाही, पण त्या म्हणण्यात सत्यांश आहे असं वाटतं. पुस्तकातील मांडणी धक्कादायक वाटली तरी १९२४ साली या पुस्तकाच्या संदर्भाने झालेल्या एका चर्चेतील गांधीजींचं म्हणणं अधिक आश्वासक वाटतं.  या चर्चेत ते म्हणतात की मी यंत्रांच्या विरोधात नाही. आपलं शरीर हे एक नाजूक यंत्रच आहे. चरखा हे यंत्रच आहे. परंतु अडचण अशी आहे की आपण आज यंत्रांच्या मागे वेड्यासारखे धावत आहोत. यंत्रांचा वापर करण्यामागे जे प्रेरक कारण आहे ते 'श्रमाची बचत' हे नसून 'संपत्तीचा लोभ' हे आहे. हे विधान खोलात विचार करण्यासारखं आहे. 

यंत्र, आधुनिकता याबाबत गांधीजींचा जो 'डिनायल मोड' दिसतो त्याचा संबंध त्यांना जो 'नीतिमान माणूस' निर्माण व्हावासा वाटत होता त्याच्याशी आहे. माणसाची भौतिक प्रगती, सुखसुविधायुक्त जीवन आणि माणसाची नैतिक उन्नती या झगड्यात त्यांची निवड स्पष्ट होती. खरं तर नैतिक उन्नतीला पर्यायच असू शकत नाही, पण भौतिक प्रगती जेव्हा हळूहळू समाजमनाचा कब्जा घेते तेव्हा नैतिकता 'बॅक सीट'ला जाऊ लागते आणि मग निवडीचीच वेळ येते.  माणूस हा परंपरानिष्ठ, आधुनिकतावादी असा काही असण्यापेक्षा 'माणूस' म्हणून उन्नत असणं गांधीजींना अभिप्रेत होतं आणि त्याच्या आड जे येईल ते नको असं त्यांचं म्हणणं होतं. मग ती परंपरा असो की आधुनिकता. गांधीजींची 'फंडामेंटल' मांडणी तात्त्विक संघर्षाला जन्म देणारी आहे. आज आपण यंत्रांनी घेरले गेलो आहोत. आपलं आयुष्य सोपं झालं आहे. पण आपण जर यंत्र उत्पादनाची पूर्ण साखळी (कच्चा माल - त्यावरील प्रक्रिया - उत्पादन - वितरण) जवळून पाहिली तर तिथे सगळं आलबेल आहे असं आपण म्हणू शकू का? मॉलमध्ये किंवा दुकानात वस्तूंच्या अवतीभवती जी प्रसन्नता आणि चकचकीतपणा दिसतो तो या उत्पादन साखळीतल्या प्रत्येक टप्प्यावर आणि मुख्य म्हणजे त्यात गुंतलेल्या माणसांच्या जगण्यात आणि अंतरंगात दिसेल का? भौतिक प्रगती झाली, पण त्याबरोबर वाढलेलं प्रदूषण, शहरातील बेसुमार गर्दी आणि बकाल जगणं, गुन्हेगारी, आर्थिक विषमता या गोष्टी भौतिक प्रगतीच्या कुठल्या अकाउंटला टाकायच्या हा प्रश्न आहे. 'प्यासा' चित्रपटात साहिर लुधियानवीसारखा कवी वेश्यावस्ती पाहणाऱ्या नायकाच्या मनात 'जिन्हें नाज है हिंद पर वो कहाँ है?' हा प्रश्न उभा करतो. माझं लहानपण भिवंडीत गेलं. तिथल्या यंत्रमाग चालवणाऱ्या कामगारांची राहायची जागा आणि कामाची जागा दोन्ही बघताना अगदी हाच प्रश्न मनात येतो. अनेक ठिकाणी फिरताना हा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. आज आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट या गोष्टी वापरतो, पण त्यांचे दुष्परिणाम लपून राहिलेले नाहीत. व्हॉट्सअॅप हे संवादाचं माध्यम म्हणून चांगलं आहे, पण जर त्यावरून अफवा पसरून काही निर्दोष लोकांचे जीव जात असतील तर काय करायचं? इथे गांधीजींच्या 'माणसाची' आठवण होतेच. माणूसच जर घडायचा बाकी आहे तर त्याच्या हाती यंत्र देऊन काय उपयोग? 

आधुनिकतेने माणसासमोर टाकलेले काही पेच गहन आहेत. एक गोष्ट खरी की तंत्रज्ञान विरुद्ध माणूस असा मूळ झगडा नाही. मूळ झगडा माणूस विरूद्ध माणूस असाच आहे. नैसर्गिक संसाधनं आणि उत्पादन साधनांवरील केंद्रित मालकी, काही मोजक्या लोकांच्या बुद्धीमुळे शक्य झालेली आणि मोजक्या लोकांच्या नियंत्रणात राहणारी तंत्रज्ञानाची झेप, मात्र त्यातून प्रभावित होणारं असंख्यांचं जगणं आणि या सगळ्या गतिशील वास्तवात शासनयंत्रणेचा सहभाग आणि नियंत्रण असे विविध मुद्दे इथे विचारात घ्यावे लागतात. गांधीजींचं वैशिष्ट्य हे की माणसाची स्वतंत्र, स्वावलंबी, आत्मबलयुक्त आणि सामाजिक दृष्टी असलेली घडण डोळयासमोर ठेवून ते समाजनिर्मितीचा विचार करतात.  प्रत्यक्षात ते शक्य झालं का, होईल का हा मुद्दा वेगळा, पण विवेक जागा ठेवायचं, मूलभूत प्रश्न विचारायचं काम गांधीजी करतात. 'थांबा आणि विचार करा' हे सांगतात आणि म्हणूनच ते आपल्यासाठी 'गाइडिंग लाइट' ठरतात!   

पुढील लेखात आपण हीच चर्चा पुढे नेणार आहोत. दरम्यान प्रस्तुत विषयासंदर्भात हे तीन लेख जरूर वाचावेत - १) ‘महात्मा गांधी’ (मिलिंद बोकील, दीपावली - दिवाळी २०१७), २) 'हिंद स्वराज - समाजसापेक्ष विकासाच्या प्रतिमानाचा आराखडा' (चैत्रा रेडकर, आंदोलन - जानेवारी-फेब्रुवारी २०११' ३) ‘हिंद स्वराज आणि आधुनिकता' (विश्राम गुप्ते, मुक्त शब्द - दिवाळी २०१७.) या लेखांसाठी माझ्याशी संपर्क साधता येईल.

Saturday, July 21, 2018

मध्यांतरातील संवाद

एखादी नवीन मांडणी करण्याआधी वास्तवातील बारकावे, सूक्ष्मभेद (न्यूअन्सेस) लक्षात घेऊन नवीन विचारासाठी समतल क्षेत्र निर्माण करणे गरजेचे असते. आपण आजवर जी चर्चा केली आहे त्यात हा विचार जागा होता. किंबहुना आजवरच्या चर्चेचं स्वरूपच तसं होतं. आता यापुढील लेखांमधून विश्लेषणात्मक विचार करण्याबरोबरच काही विशिष्ट मुद्द्यांवर थेट चर्चा करू या. नातेसंबंधांचे नवीन प्रारूप याविषयी आपण बोलायला सुरूवात केली आहेच. स्री-पुरूष सहजीवन, प्रेम, लैंगिक संबंध या अंगांनी तो धागा पुढे न्यायचा प्रयत्न करू. याशिवाय जीवन कौशल्ये (लाइफ स्किल्स) आणि सामाजिक शिष्टाचारांच्या संदर्भातही काही नवीन सापडतंय का ते पाहू. राष्ट्रवाद, पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, धर्माची प्रस्तुतता आणि निधर्मी जगणं हे मुद्दे आज सतत चर्चेत आहेत. त्यावर आपल्याला काही मांडता येतंय का ते पाहू. हे विषय राजकीयदृष्ट्या संवेदनशील झाले असले तरी ते मुळात संकल्पनात्मक आणि सामाजिक महत्त्वाचे आहेत. आणि दुसरं म्हणजे राजकीय क्षेत्र आपण आपल्या चर्चेत अस्पर्शित ठेवावं असंही अजिबात नाही.       
    
परंपरा आणि नवता, श्रद्धा आणि तर्क, धर्म आणि विज्ञान या गोष्टी परस्परविरोधी वाटल्या तरी त्या 'इनहेरंटली' तशा असतात का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मुळात हे लक्षात घ्यायला हवं की विचारांचं, कृतीचं नामकरण करणं ही आपली मानसिक (आणि मानसिक आहे म्हणून सामाजिकही) गरज असते. लेखमालेच्या अगदी पहिल्या लेखात आपण म्हटलं होतं की परंपरा म्हणजे ‘क्ष’ नावाची एक गोष्ट आहे आणि नवता म्हणजे ‘य’ नावाची एक गोष्ट आहे अशा साचेबद्ध पद्धतीने आपण या संकल्पनांकडे बघायला नको. यांनतर आपण असंही म्हणालो आहोत की सामान्यीकरण करणं बरेचदा आवश्यक असलं तरी वास्तवाचे अनेकविध पैलू असतात आणि यातील एखादा किंवा अनेक पैलू आपण सोयीसाठी जे नामकरण करतो त्याच्या विरोधीही असू शकतात. 'बर्डमॅन' हा माझा एक अतिशय आवडता चित्रपट आहे. या चित्रपटातील एका गहन अवतरणाची इथे आठवण होते -  'अ थिंग इज अ थिंग, नॉट व्हॉट इज सेड ऑफ दॅट थिंग!' भाषा ही आपली 'फ्रेंड, फिलॉसॉफर, गाइड' असली तरी भाषा वापरून ज्या वास्तवाचं वर्णन करायचं ते वास्तव इतकं व्यामिश्र असतं की तिथे तीही कधीकधी कमी पडते. (बर्डमॅनमधील 'कोट'ला समांतर जाणारी 'रॉकस्टार' या हिंदी चित्रपटामधील इर्शाद कामिल यांनी लिहिलेल्या गाण्याची ओळ आहे - जो भी मैं कहना चाहूँ, बरबाद करे अल्फाज मेरे...!)         

परंपरेचं एक मोठं बलस्थान असं असतं की ती माणसाला सुरक्षितता देते. तंत्रज्ञानाने माणसाचं जगणं मोठ्या प्रमाणात बदलून टाकलं असलं तरी माणसाच्या मनातील आदिम जाणिवा तंत्रज्ञानाला अद्याप तरी बदलता आलेल्या नाहीत. माणसाच्या कृत्यांमागे, वर्तनामागे कारण म्हणून कार्यरत असणाऱ्या भावना कुठल्या याचं उत्तर आपण देऊ शकू. पण सूक्ष्म विचार केला तर असं दिसेल की 'भीती' ही भावना सर्वात प्रबळ असते. स्वार्थ - म्हणजेच स्वहित / स्वसुख या भावनेच्या पोषणासाठीही भीतीच मदत करते. जीवशास्रीय व इतरही अभ्यासासंदर्भात प्रॉक्झिमेट कॉझेस (नजीकची कारणे) आणि अल्टिमेट कॉझेस (अंतिम कारणे) अशी कारणांची वर्गवारी केली जाते. एखाद्या घटनेमागचं लगेचचं कारण वेगळं आणि मुळाशी असलेलं अंतिम कारण वेगळं असतं. दैनंदिन जगण्यातील एखादं उदाहरण पाहू. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे गाडीला अपघात झाला हे झालं अपघाताचं नजीकचे कारण. पण चालकाचं नियंत्रण का सुटलं? त्याच्या मनःस्थितीत काही बदल झाले का की ज्यांच्यामुळे नियंत्रण सुटलं? याचं उत्तर म्हणजे अंतिम कारण. आपल्या अनेक विचार-वर्तनामागे भीती हे अंतिम कारण असतं. निसर्गात चाललेल्या 'टिकून राहण्याच्या' लढाईत माणूस आज पुढे आला असला तरी त्या आदिम भीतीने त्याची पाठ सोडलेली नाही. मृत्यूच्या भयाबरोबर सामाजिक दडपण, प्रतिष्ठा टिकवणे, इतरांच्या नजरेतून उतरण्याचं भय या आणि अशा इतर भयांपोटी माणूस अनेक गोष्टी करतो. यात परंपरा जगण्याला एक समाजमान्य चौकट देते आणि बहुतांश माणसांना त्यात सुरक्षित वाटतं. 

नवतेचा विचार अगदी व्यावहारिक संदर्भात केला तर माणूस सर्वसाधारणपणे नवं काही कधी स्वीकारतो याचं एक स्पष्ट उत्तर असंही आहे की त्यात काही फायदा असेल तर! (या फायद्याचं मूळही अखेरीस भीतीत सापडतं. सुख, फायदा या गोष्टींमुळे अंतिमतः सुरक्षितताच मिळणार असते). बँकेत एफडी करण्यापेक्षा शेअर मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात अधिक फायदा आहे म्हणून आपण तिथे पैसे गुंतवतो. एटीम, इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आज मोठ्या प्रमाणात वापरलं जातं कारण ते सोयीस्कर आहे. वेळ वाचवणारं आहे. मात्र जगण्याच्या व्यवहारी-आर्थिक बाजूंना जे लागू होतं ते सामाजिक रचनेच्या इतर अंगांना लागू होतंच असं नाही. त्यामुळे मोबाइलमधल्या नावीन्याचं स्वागत करायला आपण उत्सुक असतो, तिथे नैतिकतेच्या भानगडी नसतात. पण प्रेम, लग्न, लैंगिक संबंध याबाबत आपण नावीन्याचं स्वागत करायला बिचकतो. 'प्रयोग कुठे करायचे' याबाबत आपल्या धारणा घट्ट असतात. कारण आपल्या धारणा आपली 'कम्फर्ट लेव्हल' निश्चित करत असतात.  

सामाजिक संदर्भात, विशिष्ट मुद्द्यांबाबत ही कम्फर्ट लेव्हल वाढवणे हा रचनात्मक नवतेचा एक प्रमुख प्रयत्न असायला हवा. वास्तवात हे होण्यासाठी ज्या माध्यमांचा हातभार लागू शकतो त्यात साहित्य, नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन आणि आता इंटरनेट अशी विविध माध्यमे आहेत. यातील टीव्ही आणि इंटरनेट या दोन माध्यमांकडे बघणं मला विशेष मौजेचं वाटतं. कारण एकीकडे परंपरेची स्पेस विस्तारताना दिसते तर दुसरीकडे नवतेची. इंटरनेटवर व्यक्तिगत देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर होत असल्याने, व्यक्तींचं एकमेकांना 'अती एक्स्पोजर' मिळत असल्याने तिथले प्रश्नही बिकट आहेत हे खरं, पण विषयांची हाताळणी या अंगाने पाहिलं तर इंटरनेट हे अधिक मुक्त व्यासपीठ आहे. मागच्या लेखात उल्लेख केला होता त्याप्रमाणे उपद्रव मूल्य असणारी अभिव्यक्ती तिथे असली तरी त्याचबरोबर कलात्मक, परफॉर्मन्स बेस्ड अभिव्यक्तीही तिथे आहे. इंटरनेटचं विश्व आज प्रचंड विस्तारलं आहे. ऑनलाईन स्ट्रीमिंगद्वारे चित्रपट आणि मालिकांबरोबरच अनेक विषयांवरील फिल्म्स, डॉक्युमेंटरीज पाहता येतायत. विनोदाला - आणि बेधडक विनोदाला - भरपूर वाव मिळतो आहे. एआयबीसारख्या यूट्यूब चॅनेलवर पारंपरिक भारतीय लग्नातील ढोंगी पणाची खिल्ली उडवणारे धमाल व्हीडिओज आहेत. मराठी यूट्यूब चॅनल्सही आहेत. स्टॅन्ड-अप कॉमेडी हा प्रकार पुष्कळच लोकप्रिय आहे. या कॉमेडीच्या विषयात कुटुंबसंस्था, लग्नसंस्था, पालक-मुले, प्रेम आणि लैंगिकता, पोर्नोग्राफी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा-टिप्पणी केली जात आहे. ती उपरोधिक, परंपरेतील दोषांवर बोट ठेवणारी, व्यक्तिस्वातंत्र्याचा - विशेषतः स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी आहे. बहुतांश कॉमेडियन्स पुरूष असले तरी अदिती मित्तलसारखी स्त्री कॉमेडियनदेखील तिच्या धडक सादरीकरणातून आपला प्रभाव टाकते आहे. अलीकडे नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला 'लस्ट स्टोरीज' हा चित्रपट, 'सेक्रेड गेम्स'सारखी मालिका भारतीय प्रेक्षकाला नवी वळणं घ्यायला लावत आहेत. दुसरीकडे टीव्हीवर मात्र प्रयोगशीलतेची दारं बंद असल्यासारखी आहेत. रिअ‍ॅलिटी शोजमधून नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळालं असलं तरी टीव्ही मालिकांचं साधारण रंगरूप डोळे दिपवणारं आहे! टीव्ही घरातील सगळे एकत्र बघतात आणि इंटरनेट हे 'व्यक्तिगत माध्यम' आहे त्यामुळे त्यात फरक असण्याबद्दल काही म्हणणं नाही, पण सगळे एकत्र बसून जे बघत आहेत त्याच्याहून पुष्कळ चांगलं असं काही बघू शकतील!

असो. पुढील लेखापासून आपण सुट्या विषयांवर बोलायला सुरूवात करू.