Saturday, June 28, 2008

लोकमान्य आणि आम्ही : प्रकरण २००८

केसरीवाड्यासमोर साधारण दहा - साडेदहाच्या सुमारास आम्ही सकाळची न्याहारी आटपून गाडीला किक मारायच्या बेतात होतो. दिवसातले सहा तासच फक्त चालू असणाऱ्या पुण्यातल्या अनेक हॉटेल्सपैकी एक हॉटेल तिथे आहे. पदार्थांची चव आणि 'कस्टमर सर्व्हिस' याचे जरी व्यस्त प्रमाण असले तरी पदार्थांची चव कायमच विजयी ठरत असल्यामुळे अनेक हॉटेल्समध्ये निमूटपणे ते देतील ती वागणूक सहन करीत बसावे लागते. उपर्निदिष्ट हॉटेलमध्ये बटाटेवडे उत्तम मिळतात. अर्थात बटाटेवडे संपले की परत जावे लागते. पुन्हा करायची तसदी मॅनेजमेंट घेत नाही. असो. तर सांगायचा मुद्दा गाडीला किक मारणार तोच समोर एक लक्षवेधी प्रसंग घडताना दिसला. साधारणत: केसरीवाड्याच्याच वयाचे एक प्राचीन गृहस्थ हातातली काठी जोरात हालवत रागारागाने एका दुचाकीस्वाराशी भांडत होते. असे प्रसंग टाळण्यात मजा नसते. कारण प्राचीन आणि अर्वाचीन मानव किती प्रकारांनी विकार प्रदर्शन करू शकतो याची झलक अशा प्रसंगातून बघायला मिळते.

"व्हॉट डू यू मीन बाय सॉरी ?" आजोबा,  इंग्रजीतून.
"अहो, माझं लक्ष नव्हतं" दुचाकीस्वार.
"ते तर दिसतंच आहे. तुमचं तुमच्या केसांकडे लक्ष नाही. रस्त्यातल्या माणसांची बातच सोडा. शेवटचे कधी कापले होतेत ते तरी आठवतंय का ?" आजोबा.
"त्याचा इथे काय संबंध आजोबा ?" दुचाकीस्वार.
"लक्ष देण्याबद्दल बोलतोय मी." इथे काठी आपटली गेली.
"पण मी माफी मागितली ना ?" दुचाकीस्वार.
"पण तुम्ही असं करताच कसं ? खुशाल मागेपुढे ना बघता गाडी बाहेर काढायची घाई. नशीब माझं माझ्या मागून कुणी येत नव्हतं. नाहीतर मी आधी या रस्त्यावर गेलो असतो आणि नंतर सरळ त्या रस्त्यावर." इथे काठी वर गेली.
"बरं ठीक आहे. काही झालं तर नाही ना ?"
"म्हणून काय झालं ? तुमच्यासारख्यांचा सगळ्यांना त्रास आहे. तुम्ही सिग्नल तोडणार, जोरात हॉर्न वाजवणार, चुकीचं पार्किंग करणार. तुम्ही आत्ता इथे गाडी कशी लावली होतीत ?"
"म्हणजे?"
"म्हणजे मेन स्टँडला की साईड स्टँडला?"
"साईड स्टँडला."
"म्हणजे तिरकी. अजून एका गाडीची जागा वाया घालवलीत. तुम्हांला कसं कळत नाही हो इतकं साधं ? वाहतुकीचा बोऱ्या वाजलेलाच आहे. त्यातून तुमची ही बेशिस्त. त्यात भर म्हणून हे आहेच." काठी रस्त्यालगतच्या एका फलकाकडे गेली. त्यावर 'मस्ती ग्रुप - भव्य तोरण मिरवणूक' आणि दोन - तीन भवानीभक्तांचे भीषण फोटो, खाली ज्युनिअर भवानीभक्तांची नामावळ हे सगळं होतं.
"अहो आजोबा, मी त्या ग्रुपचा नाही. आमचा फक्त गणपती बसतो."
"पण आम्हांला त्रास आहेच ना. गणपती बसो की जगदंबा, तुम्ही बसवता हिमेश रेशमियाला..." आजोबांचे ज्ञान वाखाणण्याजोगे होते.
"बरं चला, मी जातो... सॉरी..." दुचाकीस्वार.

आजोबा काहीतरी बोलत होतेच... स्वत:शीच. मग ते चालू लागले. आम्हीही जरा थांबलो. आजोबांना पाठमोरं बघताना आम्ही जरा उद्विग्न झालो होतो. कदाचित हेच आजोबा एके काळी, म्हणजे ज्या काळी पुण्यात फिरणं हा सुखद अनुभव असेल त्या काळी, कसबा, मंडई, केसरीवाडा वगैरे गणपतींना आपुलकीने भेट देत असतील. त्यांचा आजच्या गणपती उत्सवाबद्दलचा उद्रेक त्या दुचाकीस्वाराला समजला असेल का ?

आम्ही खरेच उद्विग्न झालो. दोन मिनिटं केसरीवाड्यात जावं असं उगाच वाटलं. म्हणून आत गेलो. टिळकांच्या पुतळ्यापुढे उभे राहिलो. जरा बरं वाटलं. आम्ही स्वत: देवळात जात नसलो तरी स्थानमहात्म्याबद्दल आम्हाला शंका नाही. आगाखान पॅलेसमध्ये आम्हांला असंच बरं वाटलं होतं. अजूनही वाटतं. अर्थात तिथून परत हे यायलाच लागतं. पण तरी अधूनमधून अशा ठिकाणी असं पाच मिनिटं शांत उभं राहावं. देवळात असं उभं राहणं आम्हांला जमलेलं नसलं तरी इतर अशा जागा आहेत. लोकमान्यांच्या पुतळ्यासमोरून परत निघालो तोच एक भारदस्त आवाज ऐकू आला, 
"कशासाठी आला होतात ?"
आम्ही गडबडलो. आवाज समोरूनच येत होता. आणि पुतळ्याखेरीज समोर कुणीच नव्हतं. 
म्हणजे हे टिळक बोलले? बळवंतराव टिळक ? गीतारहस्य वगैरे लिहिणारे ?
"हो. मीच बोलतोय."
यांना कसं कळलं ? आमची बोलती बंद व्हायची वेळ आली होती.
"आम्हांला सगळं दिसतंय... बोला ..."
"काय बोलू ?" आम्ही चाचरलो.
"प्रश्न आहेत ना ?" टिळक गरजले.
"नाही... म्हणजे हो..." आम्ही.
"मग विचारा ना... घाबरायला काय झालं ? रोज किती जोर-बैठका काढता ?"
इथे तर विकेटच उडाली. शब्द गोळा करू लागलो तोच आवाज आला -
"राहू दे. तुमच्याकडे बघूनच कळतंय तुम्ही काही करत नसणार ते. बाहेर जे झालं त्याचा विचार करताय ?"
"हो." आम्ही प्रथमच ठामपणे बोललो.
"हं. तो आपट्यांचा मुलगा. इथे त्यांचं बिऱ्हाड होतं. केसरीत कामाला होते आपटे."
"हो का ? तरीच. मुलगा तसा नीट वाटला. त्याने माफी मागितली."
"मूर्ख आहात. मी त्या आजोबांबद्दल बोलतोय." चपराक बसली.
"हां हां. आजोबा... बरं बरं..."
"केसरी वाचता का ?"
पुन्हा संकट. पुन्हा शब्दांची जुळवाजुळव.
"नसाल वाचत तर सांगा की तसं. सकाळ वाचता का ?"
लोकमान्य निव्वळ ज्ञानी नसून अंतर्ज्ञानीही होते याच्यावर आमचा विश्वास बसू लागला होता.
"हो. वाचतो."
"कसा वाटतो ?"
"चांगला आहे."
"गुळमुळीत उत्तर नको. मनापासून सांगा." पुन्हा चपराक.
"पुण्याच्या आणि आसपासच्या गावातल्या प्रश्नांबद्दल निष्पक्ष भूमिका घेणारं वृत्तपत्र आहे असं वाटतं. मांडणी चांगली वाटते. व्यावसायिकतेचा भाग म्हणून तडजोड होतच नाही असं नाही म्हणता यायचं, पण पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी अजून जपली गेली आहे असं वाटतं. आता जाहिरातींचा सुकाळ असतो हे खरं, पण आज वृत्तपत्र व्यवसाय त्यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे... त्याला सकाळ तरी अपवाद कसा असणार ?" आम्ही एका दमात हे सगळं बोललो.
"राजकारणात तुम्हांला भविष्य आहे असं दिसतंय. कुठल्या पक्षाशी बांधिलकी वगैरे ?"
"छे हो. अजिबात नाही."
"हं. पुण्याच्या प्रश्नांबद्दल तुम्हांला काय वाटतं ?"
लोकमान्य ओपिनियन पोल वगैरे घेतायत की काय असं वाटायला लागलं. त्यांचा रोख कळत नव्हता.
"प्रश्न ? बरेच आहेत. वाहतुकीचे नियोजन नाही, शहर भरमसाठ वाढतंय, तेव्हा मुलांच्या शाळाप्रवेशापासून ते सरकारी दवाखान्यात रिकामी खाट मिळेपर्यंतच्या भरपूर समस्या आहेत. वाहतूक ही अगदी रोज दिसणारी समस्या..."
"कधीपासून तयार झालीय ही समस्या ?"
"गेल्या चार वर्षात जास्त वाढलीय."
"हं. लोंढा वाढतोय का माणसांचा ? पुण्यात येणाऱ्या ?"
हे जरा अवघड होत चाललं होतं. आम्ही पुतळ्याच्या मागे वाघ आणि भगवा झेंडा दिसतो का हे तपासून घेतलं. लोकमान्य नाजूक प्रश्नांवर का बरं आम्हांला बोलतं करू पाहतायत ?
"हो. नोकरीनिमित्त बरेच लोक येतात. आयटी इंडस्ट्री जोरात आहे ना पुण्यात. आता पुणं मेट्रो सिटी व्हायच्या मार्गावर आहे. शिवाय कॉलेजेस खूप वाढली आहेत."
"शेतकी महाविद्यालये किती आहेत ?"
इथे आम्ही चमकलो. का प्रश्न का बरं विचारला असावा ? पण प्रश्न इंटरेस्टिंग होता. कॉलेजेस म्हणजे मॅनेजमेंट, इंजिनिअरिंग, मेडिकल एवढीच असतात. शेतकी महाविद्यालय वगैरे ? शेतीचं शिक्षण ? अहो पण जमीन कुठे आहे इथे ?
"मग राहता कशाला इथे ?" अंतर्ज्ञानाने पुन्हा एकदा फटकारले. "अशी बेसुमार वाढ होत राहिली तर शहरावरचा ताण किती वाढेल ? मध्यंतरी पुण्याजवळ कुठेतरी जमीन देण्यावरून शेतकऱ्यांनी हिंसक संघर्ष केला म्हणे ?"
"हो. तसं झालं खरं."
"कठीण आहे. बरं, तुम्हांला पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं ?"
हा तर गुगलीच होता. प्रत्यक्ष लोकमान्य टिळक सार्वजनिक गणेशोत्सवाबद्दल मत विचारतायत ?
"जे मनापासून वाटतंय ते बोला. मी विचारतोय म्हणून दडपून जायचं काही कारण नाही." गर्जना झाली.
"अं ? ... हो ... हो ... म्हणजे तशी कल्पना छानच होती..." जीभ चावली आणि 'आहे' म्हणालो... पण आता जरा अवघड होत चाललंय.
"हं. तुम्ही देवळात जाता का ?"
"नाही." आम्ही जरा घाबरत पण खरं उत्तर दिलं.
"का ? देऊळ लांब आहे वाटतं घरापासून?" आमच्या शरीरयष्टीवर लोकमान्यांचा हा दुसरा शेरा होता.
"नाही. तसं नाही. देवावर भार टाकणं पटत नाही. आणि प्रतीकांमधे अडकलं की विचार खुंटतात असं वाटतं..."
"चांगलं आहे. बरं, गणेशोत्सवाचं अवघड होत चाललंय असं म्हणालात ते काय ?"
"अवघड म्हणजे मंडळांची संख्या भरमसाठ वाढलीय, त्यातून वाहतुकीची कोंडी वाढतेच आहे, लाऊडस्पीकरचे असह्य आवाज, विसर्जन मिरवणुकीतली अचकट विचकट गाणी आणि नाच हे सगळं बघवत नाही. गणपती संपले की नवरात्रीचा गोंगाट. शिवाय गणपतीच्या आधी गोकुळाष्टमीचा एक दिवसाचा त्रास असतोच."
"किती मंडळं आहेत ?"
"दोन हजाराच्या घरात."
"किती असावीत ?"
"पेठांप्रमाणे एक एक. इतरत्र वॉर्डप्रमाणे करता येऊ शकेल."
"हं. सार्वजनिक गणेशोत्सव मुळात आज योग्य आहे का ?"

हा प्रश्न भेदक होता. भारताने अणुकरारावर सही करावी का याचे उत्तर आम्ही एकवेळ देऊ शकलो असतो, पण हा प्रश्न खराखुरा स्फोटक होता. गणपती हा वास्तविक आवडता देव. आसमंतातील चिंता एका मोदकाबरोबर विसरायला लावणारा आणि अचपळ अंगाने सुंदर नर्तन करून आनंदाची प्रचिती देणारा हा दिलखुलास देव आम्हांला मनापासून आवडे. आम्ही भक्तिरसात कधीच डुंबू शकलो नसलो तरी. पण गणेशोत्सव ? गेली आठ दहा वर्षं आम्ही गणपती 'बघणं' सोडलं होतं. कुमारवयात पहाटे पाच पर्यंत घराबाहेर राहायची परवानगी मिळण्याचा एक दिवस म्हणून अनंत चतुर्दशीची आमच्या दप्तरी नोंद होती. शिवाय ‘गौरी’ बघण्याकडे जास्त कल. परंतु नंतर मात्र या उत्सवात अथर्वशीर्षाहूनही आयटेम साँगचे माहात्म्य जास्त आहे हे लक्षात येऊ लागले आणि आम्ही देवाची रजा घेतली.

आम्हांला गणपतीचे दिवस आठवले. नवरात्रीच्या रात्री आठवल्या. उत्सव या नावाखाली जे काही चालतं ते सगळं आठवलं आणि आम्ही ठामपणे म्हणालो "नाही. सार्वजनिक गणेशोत्सव योग्य 'होता' असं वाटतं. आजच्या गणेशोत्सवाचे स्वरूप योग्य नाही. इतरत्र खूप बदल झाले असताना उत्सवाच्या स्वरूपात बदल व्हायला हवा होता. तो झाला, पण चुकीचा. उत्सवातले भगवंताचे अधिष्ठान हरवले आणि तो विसर्जनापुरता उरला. उत्सव फक्त दहा दिवसांचाच असतो हे मान्य, पण त्यातून निपजणारी वृत्ती ही कायमची बनते. सार्वजनिक रस्ता कार्यक्रमांसाठी गृहीत धरला जाऊ लागला हे चूक. त्याविषयी कुणी काही बोललं तरी त्याला धर्मद्वेष्टा ठरवून टाकणं हे चूक. सार्वजनिक उत्सव ठीक आहे, पण सार्वजनिक जाणिवांचं काय ? आणि हे फक्त गणेशोत्सवालाच नाही तर सार्वजनिक त्रासांच्या सर्वच उत्सव-उपक्रमांना लागू होईल."
"इथपर्यंत कबूल केलंत याचा आनंद वाटला. तुम्ही चौथे आहात."
"म्हणजे?" नक्की ओपिनियन पोल.
"आत्तापर्यंत चाळीस एक जणांना थांबवून विचारलं. गणेशोत्सव योग्यच असा सरसकट निर्वाळा दिला सगळ्यांनी. तिघेजण फक्त विरुद्ध मत देऊ शकले. गप्प बसणारे नागरिक हा मोठा धोका वाटतो आम्हांला. तुम्ही गणेशोत्सवात जीव आणि ब्रेक मुठीत धरून गाड्या हाकता, नवरात्रीतही. वाहतूक नियंत्रक दिवे नसले, तरीही. आणि स्वयंशिस्तीबद्दल काय बोलायचं ? पुणे तिथे नागरिकशास्त्र उणे असं चित्र दिसतंय आम्हांला. शहरांची वाढ हा वेगळा प्रश्न आहेच. पण म्हणून बेशिस्त कशी खपेल ? तुम्ही सायकल तर विसरलेलेच दिसताय. पुण्यातल्या महाविद्यालयीन मुला-मुलींना सायकल वापरायची लाज कधीपासून वाटायला लागली ? आणि नोकरदारांना तरी काय हरकत आहे सायकल वापरायला ? बलसंवर्धन नाही, त्यामुळे दोन मैल सायकल चालवायची म्हटलं तरी त्या विचारानेच घाम फुटतो तुम्हांला. आणि मग आरोग्य मेळाव्यांना हजारोंनी हजेरी लावा! मध्यमवर्ग कायमच कोंडीत सापडलेला असतो, हे आम्हांला मान्य आहे. त्यामागे आर्थिक, सामाजिक पैलू आहेत. पण निरीक्षण नको ? बदलासाठी प्रयत्न नकोत ? कृत्रिमता कधीच चिरंतन नसते. वाहतूक असो की उत्सव, आटोपशीरपणा हवाच. आम्हांला तर असेही वाटून गेले की पाश्चिमात्यांचे क्लबात रात्रभर नाचणे बरे... किमान तिथे ढोंग तरी नाही. शिवाय बंद जागेमुळे इतरांना काहीच त्रास नाही. देवाच्या समोर आचरटासारखं नाचणाऱ्या मुलांचे काय भविष्य आहे ? जबाबदार नागरिक होता येईल असे कोणते गुण दिसतात त्यांच्यात ? आणि पुणे महानगरपालिका त्यांचं चौकाचौकात स्वागत करते ? आम्हांला एकदा जातीने महानगरपालिका आणि राजकीय पक्षांची चौकशी करायची आहे. आणि तुमच्या त्या दोन हजार मंडळांचीसुद्धा ! या सगळ्यांची डोकी ठिकाणावर आहेत ना हे तपासण्यासाठी..."

आम्ही भेदरून ऐकत होतो. लोकमान्य पुन्हा अवतरले तर ते स्वत:च्या हातांनी गणोशोत्सव बंद करायचं फर्मान काढतील याची आम्हांला खात्रीच पटली. तेवढ्यात पुन्हा त्यांचा आवाज ऐकू आला, "आम्ही निघतो आता. अभ्यासाची वेळ झालीय. तुम्हीही निघा. जमेल तेवढे प्रयत्न करीत रहा. आमचा गोपाळ म्हणायचा ते कधीकधी पटतं आम्हांला... लोकांत शहाणपणच नाही, तर ते स्वतंत्र होऊन काय दिवे लावणार ? असो..."

नमस्कार करून आम्ही निघालो. नारायण पेठेतून टिळक रस्त्यापर्यंत मेटाकुटीने आलो आणि टिळक स्मारक मंदिराच्या चौकातील वाहनांच्या कोंडीशी मुरारबाजीसारखे झुंजायाला लागलो. सिग्नल सुरू नव्हता. (याचे एक आम्हांला फार कौतुक आहे. ज्या पुण्यात आयटी तंत्रज्ञानाची डॉलरमय भरभराट झाली, त्या पुण्यात वाहतूक नियंत्रक दिव्यांचे 'प्रगत' तंत्रज्ञान अजूनही आलेले नाही. इंजिनिअरिंगच्या काही विद्यार्थ्यांनी हे 'प्रोजेक्ट' म्हणून करायला हरकत नाही - 'पुण्यातील कायम सुरू राहू शकणारे वाहतूक नियंत्रक दिवे !')

वाट काढत काढत घरच्या रस्त्याला लागताना आम्हांला लोकमान्यांशी झालेला संवाद आठवत होता. असं वाटून गेलं की 'प्रगत' माणसाचे प्रश्न कुठले असतील काही सांगता येत नाही. चालणं सोयीचं नाही म्हणून गाड्या आल्या. आता गाड्या आल्या तरी चालणं सोयीचं नाहीच. नैसर्गिक वाढीवर कदाचित आपला ताबा असू शकत नाही, पण माणसाने आरंभलेल्या वाढीवर माणसाचे नियंत्रण असू नये ?

त्या दिवशी संध्याकाळी आम्ही एक गोष्ट केली. गावात जाऊन एक नवी कोरी सायकल खरेदी केली. डोक्याचा त्रास वाचवायचा असेल तर हातापायांना थोडा त्रास दिला पाहिजे हे आमच्या लक्षात आलं होतं. गणेशोत्सव मंडळांशी कसं आणि काय़ बोलायचं याबाबत आम्ही लवकरच लोकमान्यांना पुन्हा भेटणार आहोत!  

(प्रस्तुत लेखावर पु. ल. देशपांडे यांच्या 'लोकमान्य आणि आम्ही' या लेखाची छाप सहज दिसेल. तसे वाटल्यास आम्ही कुठलाही खुलासा करू शकणार नाही कारण ही गोष्ट पूर्णपणे खरी आहे.)

(साप्ताहिक सकाळ, २८ जून २००८)  

Saturday, March 3, 2007

मी मराठी!

इये मराठीचिये पुण्यनगरीत मराठीची विद्यमान स्थिती काय हा प्रश्न आम्हाला बरेच दिवस भेडसावत होता. मराठीवर मनापासून प्रेम करणारा एक मराठी(च) माणूस या नात्याने आम्हाला हा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटतो. पुण्याच्ता ट्रॅफिक (म्हणजे? हां, रहदारी) मधून आपण रोज जातो आणि अजूनही जिवंत आहोत ही भावना तशी सुखकारक आहे. त्यामुळे आपल्या मायबोलीचा प्रश्न किती बिकट आहे याचा अभ्यास करण्याकरता त्याच ट्रॅफिकमधून मार्ग काढत आपण पुणं पालथं घालायचं असं आम्ही ठरवलं. 

पुण्याच्या चतुःसीमा आता अत्यंत विस्तारलेल्या आहेत हे आम्ही प्रथम लक्षात घेतलं. पूर्वी असं नव्हतं. (हं!). पण आपल्या सध्याच्या अभ्यासाचा तो विषय नाही, हे आम्ही स्वतःच्या मनाला बजावलं आणि पुढल्या आखणीला सुरुवात केली. पण सुरुवातीलाच अडलो. मराठीची सद्यस्थिती नक्की कशी, कुठे बघायची हे काही कळेना. भाषेची सुरुवात कशी झाली हा प्रश्न जितका गहन तितकाच भाषेची का टप्प्यावरची अवस्था काय हाही प्रश्न गहनच. पुण्याच्या मध्यवर्ती भागातून सुरुवात करावी म्हटलं तर सदाशिव, नारायण, टिळक, बाजीराव, लक्ष्मी, कुमठेकर, गुरूवार-शनिवार वगैरे ठसठशीत मराठी नावांतून मराठी सुखात नांदते आहे हे आम्ही जाणतोच. 'रूपाली धुलाई केंद्र', 'आवळा संशोधन केंद्र', 'जनसेवा दुग्ध मंदिर', 'चर्मशिल्प' इत्यादी दुकानांच्या पाट्यांमधूनच मराठीपण झळकते. (दुकानाच्या आत गेल्यावर का होते, यावर काही पूर्वग्रहदूषित मंडळींनी दिशाभूल करणारा मजकूर लिहून ठेवला आहे. आम्ही त्याचा आत्ताच निषेध करतो. मराठी दुकानदार तुसडा असतो वगैरे साफ खोटं आहे. आत्मभान जेव्हा उन्मनी अवस्थेस जाऊन पोचते तेव्हा त्याचे नानाविध आविष्कार क्षुद्र जनांना त्रासदायक वाटणारच!). त्यामुळे तिथे मराठी सुखात आहे. गावाच्या थोडं बाहेर जाऊन बघावं - म्हणजे ईस्ट स्ट्रीट, कँप वगैरे किंवा इकडे हडपसर, मुंढवा, कोंढवा वगैरे तर तिथेही स्पष्ट फरक नजरेस येईल असे आमचे मत झाले. कारण कँप भागात इंग्लिशचे प्राबल्य जास्त आहे हे तिथल्या पादचाऱ्याला पत्ता विचारला तरी लक्षात येते. फरक अगदी स्पष्ट, उघड आहे असं जाणवू लागलं. मग हा अभ्यासच रद्द करावा का असंही वाटून गेलं. ढोबळमानाने बोलायचं झालं तर मराठीची स्थिती काही ठिकाणी चांगली आणि काही ठिकाणी वाईट आहे असा निष्कर्ष आम्ही काढला. पण मग मराठीच्या दुरवस्थेविषयी मराठी आसमंतात इतकी चर्चा का बरं होते? की यात केवळ संशोधनाचा आव आणण्याचा हेतू आहे? दुरवस्था म्हणावी तर तीनशेहून अधिक दिवाळी अंक निघतात ते कसे? बायकोला विचारले असता ती म्हणाली,  तुला काय वाटतं? दिवाळी अंकवाले काय फुलटाईम (पूर्ण वेळ) हाच धंदा (धंदा? हर हर!) करतात? त्यांची मुलंबिलं तिकडे अमेरिकेत सेटल्ड असतात. (सेटल होणे हा मराठीच शब्द आहे). म्हणून त्यांना जमतं….बायकोबद्दलचं आमचं आदरयुक्त प्रेम उफाळून आलं!

दिवाळी अंकांचा खपही बऱ्यापैकी होतो असे आम्हाला आमच्या एका मित्राकडून कळले होते. आमचे हे मित्र पुस्तक विक्री व्यवसायात असून ते शेक्सपियरच्या नाटकांवरील तौलनिक समीक्षेपासून ते 'स्नेहबंध', 'थरार', 'अकल्पित' अशा शीर्षकाच्या मराठी कादंबऱ्या निष्काम मनाने विकतात. पुस्तक हे विकण्याचे 'साहित्य' आहे यावर त्यांचा विश्वास आहे. आमची बायको जशी आमच्या मदतीस धावून येते तसेच हेही गल्ल्यावर बसून, लक्ष्मीच्या साक्षीने आम्हाला सारस्वतिक कलहातून बाहेर काढतात. 
"तू लेका मर असाच!" अशा प्रेमळपणे आमच्या प्रश्नाचे स्वागत झाले. 
"अरे म्हणजे काय? तू मराठी पुस्तकं विकतोस ना? तुला माहीत नको मराठीची सद्यस्थिती काय आहे ती?"
"सद्यस्थिती? हां, हां…आलं लक्षात. ये, बस. चहा घेणार ना?"
"घेऊ की."
चहा आला. तोपर्यंत हे आपद्ग्रस्त चेहऱ्याने विचार करत होते. 
"अरे काय आहे, लोक पुस्तकं विकत घेतात अजूनही. नाही असं नाही."
"कुठल्या प्रकारची पुस्तकं?"
"सगळ्या प्रकारची. कथा-कादंबऱ्या, आत्मचरित्रं, सेल्फ-हेल्प..."
"म्हणजे?" 
"म्हणजे 'जीवनात यशस्वी कसे व्हावे', 'तुमचे भविष्य तुमच्या हाती' छापाची पुस्तकं."
"बरं."
"तर लोक पुस्तकं घेतात अधूनमधून. अनुवादित कादंबऱ्यांनाही मागणी असते बऱ्यापैकी. शिवाय लहान मुलांची पुस्तकंही घेतात लोक."
"म्हणजे पुस्तक विक्री हा निकष लावला तर मराठीची स्थिती चांगली आहे असं म्हणता येईल."
"हो. पण एक आहे. पुस्तक घेऊन लोक घरी गेले की त्या पुस्तकांचं काय करतात हे मात्र आपण सांगू शकणार नाही."

हे आम्हाला आवडलं. बोलणं संपता संपता डोक्याला चालना देऊन जाणारी माणसं आपल्याला आवडतात. 

दुकानातून बाहेर पडल्यावर आम्हाला वाटलं की आता काही लोकांना प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे. मराठीच अर्थात. म्हणून मग आम्ही हिच्या एका मैत्रीणीकडे गेलो. ती हिची कॉलेजातली (महाविद्यालयातली) मैत्रीण. तिला वाचायची आवड आहे असं हिने सांगितलं होतं. दार वाजवल्यावर आतून 'कमिंग, वन मिनिट!' असा स्त्रीस्वर ऐकू आला. म्हटलं झालं! ही तर आंग्लाळलेली दिसते. पण तरी धीर टिकवून धरला. (शिवाय स्त्रीस्वरातील 'आले हं' हे एक झिणझिण्या आणणारं प्रकरण आहे! असो.)

"या...लेखक!" अशी कुचकट मानवंदना स्वीकारत आम्ही आत आलो. प्रशस्त हॉल, (दिवाणखाना, बरोबर ना? हो दिवाणखानाच. आदिलशहा, औरंगजेब वगैरे लोकांना ते जाण्यापूर्वी काही शब्द परत करायचे राहून गेले. त्यातलाच एक असावा हा), उंची सोफा (मराठी प्रतिशब्द नाही...), बांबूच्या खुर्च्या, झोपाळा आणि कोपऱ्यात एक केवळ तिरस्कार या भावनेला लायक अशा चेहऱ्याचं कुत्रं. बांधलेलं होतं, म्हणून आम्ही निश्चिंत झालो. 

"काय घेणार? चहा, कॉफी की ड्रिंक? घेता ना?...."
"नको. मला खरं तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते."
"वा! अहो रायटर्स लाइक यू आर हिअर टू आन्सर अवर क्वेश्चन्स! आणि तुम्ही म्हणताय की..."
"तसं नाही. ही म्हणत होती की तुम्ही वाचता बरंच. तेव्हा मराठीच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल थोडं बोलायचं होतं. "
वास्तविक अशा जोरदार घरात राहणाऱ्या बाईला एकंदरीत सगळीच परिस्थिती चांगली वाटत असेल, तेव्हा मराठी तरी त्याला अपवाद कशी असणार असा विचार आमच्या मनात येऊन गेला.
"मराठीची परिस्थिती? ऑफ कोर्स! ऑफ कोर्स! मी खरं सांगू का, मला काही तुमच्याइतकं माहीत नाही. पण रागावू नका, सध्या चांगले लेखकच कुठे आहेत? आम्ही वाचायचं काय?"
"असं कसं म्हणता? एवढी नवीन पुस्तकं येत असतात. तुम्ही पाहता की नाही? नवीन लेखक लिहित आहेतच की..."
"हो, तशी वाचते मी. पण वेळही व्हायला हवा ना..."

इथून आता गाडी मुलांच्या शाळा, अभ्यास, नवऱ्याचं ऑफिस इथे जाणार हे आम्ही ताडलं. या वाचनप्रिय मैत्रिणीचं वाचिक कौशल्य दांडगं आणि वाचनाची अवस्था बिकट वाटत होती. मग आंम्ही एक डायरेक्ट (थेट) प्रश्न टाकला.

"तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात?" 
"दोघंही सेंट मीराजमध्ये होती. धाकटा आता कॉलेजला आहे. मोठी नुकतीच नोकरीला लागलीय."
"अच्छा, म्हणजे इंग्लिश माध्यम."
"हो. अहो त्याशिवाय निभाव कसा लागणार? आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती."
                        
'आपल्या वेळची गोष्ट वेगळी होती' हे वाक्य ऐकल्यावर जी ठेच लागते ती आत्ताही लागली. पण इंग्लिशचा मुद्दा विचारात पाडणारा होताच. 

"तुमचं बरोबर आहे. पण मग मुलांना भाषेची ओळख होणार कशी?"
"वा! घरात आम्ही स्ट्रिक्टली मराठीच बोलतो. त्यांच्यावर संस्कारसुद्धा मराठीच आहेत." पुन्हा ठेच. पण आम्ही धीराचे आहोत. 
"अरे वा! पण मग मुलांना वाचायची वगैरे आवड आहे की नाही?"  
"आहे. पण माध्यम इंग्लिश म्हटल्यावर त्यांना इंग्लिश जास्त कम्फर्टेबल वाटतं. आणि आमची मोठी आता जॅपनीज इंटरप्रिटर म्हणून नोकरी करतेय. गेल्याच वर्षी तिने कोर्स पूर्ण केला. चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये."

इथे आम्हाला एक उत्तर मिळालं. मार्केट डिमांड! मराठीला 'मार्केट'मध्ये डिमांड किती? जवळजवळ शून्य! जॅपनीजला आहे. त्यामुळे मार्केटच्या नियमांप्रमाणे मराठी मागे पडणार. म्हणजे मराठीची प्रतिष्ठा वाढायला मराठी व्यावसायिकांनी बाजारपेठ काबीज केली पाहिजे. पण जॅपनीज माणूस जपानीतून बाजारपेठ काबीज करतो. मराठीजनांना आभार मानायलाही इंग्लिश लागतं. जमायचं कसं? ज्ञानेश्वरांची ओवी अमर खरीच, पण ती शेवटी ओवी. तिला 'सेल्स पोटँशियल' कुठाय? आम्हाला अतीव दुःख झालं. ज्या भाषेनं साहित्यिक जन्माला घातले, त्या भाषेनं व्यावसायिक निर्माण करू नयेत? इथे उत्तरातलं अजून एक उत्तर सापडलं. भाषा बोलणारे लोक कसे आहेत, यावर भाषेचं भवितव्य आहे. मुंबईला गुजरात्यांची आणि इतर परप्रांतीयांची चलती आहे म्हणून मराठीजन कण्हत असतात. नरीमन पॉईंटला ब्रिटीश एम्बसीत इंग्लिश-हिंदीबरोबर गुजरातीतूनसुद्धा सूचना लावल्या आहेत. अंबानी, हिरानंदानी या मंडळींच्या साम्राज्याला शिवाजी मंदिरमध्ये 'नामदेव म्हणे'च्या प्रयोगांनी उत्तर देणे म्हणजे वाघाला पिपाणी वाजवून घाबरवण्याचा प्रयत्न करण्यापैकी आहे. गुजराती व्यापारी इंग्लिशचा यत्किंचितही न्यूनगंड न बाळगता आपला माल विकतो आणि मराठी जनता इंग्लिशशी झगडत इंग्लिशला चिकटून राहते. माल खपला नाही तरी बेहत्तर, गिऱ्हाईकाने इंग्लिशची चूक काढली की जी जखम होते ती अतुलनीय असते.

आम्ही पुन्हा प्रश्नांच्या चक्रात सापडलो. सगळं मान्य केलं तरी मग मराठी माणसाच्या प्रामाणिकपणाचं, कष्टाचं काहीच मोल नाही? सरळमार्गी मराठी माणूस नाटकात रमतो अन शेकडो खोट्यानाट्या उलाढाली जिथे करायला लागतात त्या मुंबईत त्याला स्वतःचं व्यावसायिक साम्राज्य उभं करता आलं नाही हा त्याचा दोष झाला? म्हणजे आता समजायचं काय? मराठीच्या दुरवस्थेला मराठी माणसाचं व्यावसायिक अपयश कारणीभूत आहे? की मुळातच ही चिंता निरर्थक आहे?  कुठल्याही प्रादेशिक भाषेला जे स्थान असतं ते मराठीला आहेच असं म्हणता येईल का? आणि तसं म्हणता येत असेल तर मग प्रश्न कुठे उरतो? 

आम्ही चिंतनात बुडलो असतानाच बहुधा 'मोठी' येउन बसली असावी. 'मोठी' साधारण चोवीस-पंचवीसची असावी. तिने 'हाय' फेकल्यावर आम्हीही 'हाय' फेकलं. 

"अगं आपली सुषमामावशी आहे ना तिचे हे मिस्टर." मराठीची अजून एक गोची! 'यजमान' वगैरे फार म्हणजे फारच कालबाह्य झाल्यावर नवऱ्याची ओळख करून देताना 'मिस्टर' वापरणं म्हणजे कमाल होती. मिस्टर हे वास्तविक संबोधन. 'मीट मिस्टर अँड मिसेस जोन्स' हे ठीक आहे पण आंग्ल मंडळी 'ही इज जोन्स आंटीज मिस्टर' अशी भयानक ओळख करून देत नाहीत.
"हो. आय नो. मी तुमचा एक लेख वाचला आहे."
मोठीनं आपला एक लेख वाचला आहे याचा आनंद होई-होईतो मावळला. तो अंक सुषमामावशीनेच दिला होता असं पुढे कळलं.
"काका, (कार्टी वयावर उठलीय) मला पण तशी मराठी लिटरेचरची आवड आहे. मी शाळेत असताना 'मृत्युंजय' वाचून संपवली होती." 'एकदाची' हा शब्द ती विसरली असावी असं तिच्या एकूण आविर्भावावरून वाटलं.
"हो का? वा! तुझे मित्र-मैत्रिणी वाचतात का मराठी?"
"नाही हो. मराठी मित्र-मैत्रिणी तसे कमी होते जॅपनीजला. कॉलेजला असताना होते. नंतर जॅपनीज घेतल्यावर फ्रेंड सर्कलच बदललं. आमच्याकडे म्हणजे एकदम नॅशनल इंटिग्रेशन आहे. सगळीकडून स्टुडंट्स येतात."

हे अजून एक उत्तर. आधी नसलेली किंवा कमी असलेली आणि आता असलेली किंवा खूप वाढलेली भाषांची सरमिसळ. एकीचा दुसरीवर परिणाम होणारच. अर्थात परिणाम कोण जास्त 'करून घेते'  हा मुद्दा चिंतनीयच. 

"शेवटी काय आहे, सगळं कंडीशनल असतं. नाही का?" मोठीची आई. 

यावर 'हो' म्हणून आम्ही निघालो. 

लक्षात आलं ते असं की सगळं काही आपल्या लक्षात येत नाही. भाषेचा प्रवाहही नाही आणि तिचं साठलेपणही नाही. मग भाषा उरते कुठे? 'कोसला'त, बटाट्याच्या चाळीत, आठवणींच्या पक्ष्यांत, तुकारामाच्या गाथेत आणि कोलटकरांच्या कवितेतही! आपण जपावं ते हे सगळं. बाकी मग भाषा विल टेक केअर ऑफ हरसेल्फ! तिची वळणं आणि त्या वळणांमागची कारणं आपल्या नियंत्रणात नाहीत!

(साप्ताहिक सकाळ, ३ मार्च २००७)