Sunday, February 19, 2017

रचनाच कर्ता आहे

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' हे मौज प्रकाशनाचे एक लहानसे (११६ पाने) पुस्तक आहे. 'आजचा सुधारक'मध्ये जानेवारी ते मार्च २००४ दरम्यान प्रकाशित झालेल्या लेखांचे हे संकलन आहे. 'आजचा सुधारक'च्या डार्विन विशेषांकाचे पुस्तकरूप म्हणजे मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेले 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य'. मराठीत जे विज्ञानविषयक लेखन झाले आहे त्यात ही दोन पुस्तके महत्त्वाची ठरावीत. 

'आधुनिक विज्ञानाचे स्वरूप' या पुस्तकात 'आत्मा हवा का?' या शीर्षकाचा मिलिंद वाटवे यांचा एक लेख आहे. 'सजीवांच्या सगळ्या जीवन प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी भौतिकी आणि रसायनशास्त्राच्या नियमात न बसणाऱ्या एखाद्या वेगळ्याच शक्तीची गरज आहे का? दुसऱ्या शब्दात, पूर्णतः भौतिक आणि रासायनिक नियमांवर आधारित आणि त्यापेक्षा वेगळी कुठलीही गोष्ट न आणता एवढ्या गुंतागुंतीच्या प्रक्रिया चालू शकतात हे सिद्ध करता येईल का?' यावर प्रस्तुत लेखात मिलिंद वाटवे यांनी चर्चा केली आहे. त्यांची मुख्य मांडणी अशी आहे की सजीवांचे कार्य चालण्यासाठी आधिभौतिक शक्तीची गरज तर नाहीच, परंतु अशी काही शक्ती असणे आणि तिने सर्व क्रियांचे नियंत्रण करणे तत्त्वतःच अशक्य आहे. या मुद्याबाबत ते लिहितात, 'भौतिक नियमात बसू शकत नाही असा काही आत्मा किंवा जीवशक्ती असणे शक्यच नाही असे दाखवून देता येऊ शकते. यामागचे तर्कशास्त्र समजायला अवघड नाही. सजीव यंत्रणेत ज्या क्रिया चालतात त्या भौतिक आहेत याविषयी वाद नाहीत. वाद आहे तो या क्रिया नियंत्रण करणारी काही आधिभौतिक शक्ती आहे की नाही याविषयी, भौतिक क्रियेचे नियंत्रण करायचे म्हणजे काय करायचे, तर ती सुरू करायची, बंद करायची अथवा तिला दिशा द्यायची. या तीनही गोष्टी करण्यासाठी काही जोर लावावा लागेल. जोर लावणे ही क्रिया भौतिकच आहे. त्यामुळे नियंत्रण करणे ही क्रियाही भौतिकच असणे भाग आहे. जी चीज स्वतःच भौतिकत्व नसलेली आहे तिला भौतिक जोर कसा लावता येणार? आणि तसा लावता आला नाही तर ती नियंत्रण कसे करणार? डॅनियल डेनेट नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट एका गमतीशीर उदाहरणातून सांगितली आहे. तो म्हणतो की भुताच्या गोष्टीमध्ये अशासारखा एक प्रसंग हमखास असतो की एखादे भूत भिंतीतून आरपार येते आणि टेबलावरचा खंजीर उचलते. आता ही गोष्ट किती अतार्किक आहे ते पाहा. भिंतीतून आरपार जाण्याचा गुणधर्म जर त्या भुतात असेल तर त्याची बोटेही खंजिरामधून आरपार जातील. त्याला तो खंजीर उचलता कसा येईल? भिंतीतून आरपार जाणे आणि खंजीर उचलणे या दोन्ही गोष्टी एकाच 'एंटिटी'ला करणे शक्य नाही. आपली आत्म्याची कल्पना या भुताच्या गोष्टीइतकीच तर्कदुष्ट आहे. जर हा आत्मा भौतिक नसेल तर त्याला भौतिक गोष्टींचे नियंत्रण करता येणार नाही. आणि जर तो भौतिक गोष्टींचे नियंत्रण करत असेल तर त्याला भौतिक शक्ती वापरावीच लागेल. तसे असेल तर ती शक्ती भौतिक प्रयोगांनी दाखवणे आणि मोजणे शक्य होईल. आणि जी वस्तू भौतिक प्रयोगांनी दाखवता येते ती भौतिकच असली पाहिजे.' भौतिक क्रियांचे नियंत्रण करण्यासाठी आत्म्याची आवश्यकता नाही, किंबहुना असे नियंत्रण करणे मुळातच शक्य नाही हे सांगताना 'रचनाच रचनेतील क्रियांचे नियोजन-नियंत्रण करते' असा विचार ते मांडतात. 

इथे त्यांनी संगणकाचे उदाहरण दिले आहे - 'एखादा संगणक असतो किंवा एखादे स्वयंचलित यंत्र असते. आपण बटण दाबल्याबरोबर ते आपले ठरलेले काम करू लागते. आपण बटण दाबतो म्हणजे त्यातून वीजप्रवाह सोडतो. ऊर्जा देतो. ऊर्जा कशी वापरायची यासंबंधीच्या सूचना देत नाही. जेव्हा वीजप्रवाह बंद असतो तेव्हा यंत्राची रचना तेवढी असते, कार्य नसते. ऊर्जा दिली की कार्य सुरू होते. दिलेली ऊर्जा, तो वीजप्रवाह वाटेल तसा धावत नाही. योग्य प्रकारेच धावतो आणि योग्य ते कामच करतो. इथे दिलेली ऊर्जा कशी वापरायची हे कोण ठरवते? वीजप्रवाहाने कुठून कसे वाहावे हे कोण ठरवते? त्या यंत्राची रचनाच ठरवते.' ज्याप्रमाणे संगणक बंद असताना संगणकाची रचना तशीच असते त्याचप्रमाणे नेहमी ३० अंश सेल्सियसला जगणाऱ्या मानवी पेशीचे तापमान आपण ३०० अंशांनी कमी म्हणजे -२७० अंश केले तर काय होईल यावर मिलिंद वाटवे लिहितात. उणे २७३ अंश हे सर्वात कमी तापमान असू शकते. यांच्या खाली तापमान नेणे तत्त्वतःच शक्य नाही. म्हणून याला शून्य अंश निव्वळ तापमान म्हणतात. प्रत्यक्षात हे तापमान मिळवता येत नाही. पण द्रवरूप हायड्रोजन अथवा द्रवरूप हेलिअमच्या साहाय्याने याच्या अगदी जवळ म्हणजे दोन अंश निव्वळ तापमानापर्यंत एखादी वस्तू गार करणे शक्य असते. आणि या तापमानाला पेशी गोठवण्याचे प्रयोग झालेले आहेत. आता या गोठवलेल्या पेशीत कोणत्याही प्रक्रिया चालू नाहीत. मग काय आहे? तर शुद्ध रचना. रचना आणि कार्य ही यंत्राची आणि सजीवांची दोन अविभाज्य अंगे असतात. गोठवलेल्या पेशीमध्ये कार्य नाही, पण रचना आहे अशी अवस्था मिळू शकते. (रचनेशिवाय कार्य मात्र असू शकत नाही.) ही पेशी आपण पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणली तर काय होईल? जे आढळले आहे ते असे की ती पेशी पुन्हा पूर्ववत जिवंत पेशीसारखी वागू लागली. आपण पेशीला ऊर्जा दिली पण ऊर्जा कशी वापरायची यासंबंधी काही सूचना दिल्या नाहीत. तरीसुद्धा पेशीच्या क्रिया सुरू झाल्या. म्हणजे रचनेतच क्रियांचे नियंत्रण करण्याची योजना आहे. 

या मांडणीवर असा प्रश्न येऊ शकतो की वरील उदाहरणात पेशीला ऊर्जा देणे किंवा संगणकात वीजप्रवाह सोडणे ही कामे माणसाने केली आहेत. सजीवात हा 'वीजप्रवाह; कोण सोडतो? पेशी निर्माण कोण करतो? यावर लेखात स्वतंत्रपणे चर्चा केलेली नसली तरी यासाठी 'इमर्जंट प्रॉपर्टीज' याविषयी वाचता येईल. प्राथमिक माहितीकरता विकिपीडियावरील पहिले दोन परिच्छेद देतो. 'Emergence' ने विकिपीडियावर सर्च करता येईल. -   
In philosophy, systems theory, science, and art, emergence occurs when an entity is observed to have properties its parts do not have on their own. These properties or behaviors emerge only when the parts interact in a wider whole. For example, smooth forward motion emerges when a bicycle and its rider interoperate, but neither part can produce the behavior on their own.

Emergence plays a central role in theories of integrative levels and of complex systems. For instance, the phenomenon of life as studied in biology is an emergent property of chemistry, and psychological phenomena emerge from the neurobiological phenomena of living things.

थोडक्यात अन्य गोष्टींप्रमाणेच अनेकविध घटकांच्या परस्पर संबंधांतून 'लाईफ' निर्माण झाले असे म्हणता येते. मिलिंद वाटवे यांच्या 'रचनाच कर्ता आहे' या मांडणीसारखीच मांडणी विद्यानंद नंजुंदय्या यांच्या 'डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य' या पुस्तकातील लेखात आढळते. 'जीव आणि जाणीव : उत्क्रांतीवादी दृष्टिकोन' या लेखाच्या समारोपात ते लिहितात, 

माणसे उत्क्रान्तीतून घडली आहेत. उत्क्रान्तीचे वर्णन केवळ इहवादी रूपात केले जाऊ शकते. प्रजोत्पादनातील यशाला पूरक जीनसंचांचा प्रसार त्यांच्या वाहकांना (शरीरांना) उत्क्रान्त करतो. प्रजोत्पादनातले यश शारीरिक व वागणुकीतील गुणधर्मांवर अवलंबून असते, म्हणजे वर्तणूकही उत्क्रान्त झालेली आहे. जाणिवेचा संबंध मनःस्थितीशी आहे आणि या मनःस्थिती मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत-व्यवहारातून घडतात. त्यामुळे जाणिवेचे इहवादी (जडवादी, मटेरियलिस्टिक) स्पष्टीकरण देता येते असा युक्तिवाद करू शकतो.

जाणिवेसकटच्या आपल्या अस्तित्वाचे स्पष्टीकरण आपल्याला देता येऊ शकते हा आश्वस्त करणारा विचार आहे. आपल्या मनातील राग-लोभ-मोह-मत्सर-अहंकार-द्वेष-आसक्ती इत्यादी (यात गॉसिपदेखील अ‍ॅड करता येईल) आणि इतर अनेक भावछटा (ज्या आपल्या आपणच अनुभवू शकतो), परस्परांमधील भावनिक-लैंगिक आकर्षण या सर्वांचा खुलासा 'आपली रचना' आणि आपल्या पर्यावरणाला प्रतिसाद द्यायची या रचनेची आपल्या अस्तित्वाच्या विशिष्ट टप्प्यावरील क्षमता यातच आहे. 

माझ्या आकलनानुसार आपली 'आजची अडचण'  ही आहे की तंत्रज्ञान, राहणी, अभिव्यक्ती यात अचाट बदल झाले असले तरी आपला मेंदू अजूनही बऱ्याच अंशी 'ह्यूमन इन्स्टिंक्ट' चा गुलाम असल्यासारखा आहे. आणि त्या त्या समाजाचे प्रस्थापित नीतीनियम हेदेखील त्याच्या इन्स्टिंक्टचा भागच बनले आहेत. (उदा. अत्याधुनिक यंत्राचं डिझाइन करणारा एखादा बुद्धिमान तंत्रज्ञ आपल्या बायकोला कुणी अन्य पुरूष आवडतो आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? किंवा एखादी आधुनिक आई आपला मुलगा समलिंगी आहे हे सत्य सहज स्वीकारू शकेल का? 'सहज' हा शब्द महत्त्वाचा आहे आणि सर्वसाधारण निरीक्षण अभिप्रेत आहे. अपवाद अर्थातच असतील.) 

तंत्राचा प्रदेश विस्तारला, पण जाणिवेचा प्रदेश तितकासा विस्तारला नाही. कदाचित माणसाने निर्माण केलेली सामाजिकता इतकी मजबूत आहे की स्व आणि सामाजिकता या द्वंद्वात तीच कायम वरचढ ठरते आणि नेमकं हेच जाणिवेचा प्रदेश विस्तारण्याच्या आड येत असावं. अर्थात जाणिवेचे जडवादी स्पष्टीकरण देता येत असेल तर जाणीव म्हणावी इतकी प्रवाही न होण्याचेही जडवादी स्पष्टीकरण देता येऊ शकेल. माणूस आधी होता त्यापेक्षा कमी हिंसक (शारीरिक हिंसेबाबत) झाला आहे. (तुलनात्मक दृष्ट्या बघावं. वर्तमानातही हिंसा आहे, पण माणसाचे माणसाविषयीचे क्रौर्य तरी काही अंशी कमी झाले आहे.) पण इतर बाबतीत तसे म्हणता येईल का याची शंका वाटते. द्वेष, मत्सर, असुरक्षितता, टोळी मानसिकता या प्रवृत्ती (मेंदूतील चेतापेशींच्या विद्युत व्यवहारातून) लाखभर वर्षांपूर्वी निर्माण होत होत्या त्याच आजही निर्माण होतात. याला कारण चिरेबंदी सामाजिक-आर्थिंक-लैंगिक बांधणी हेच असेल का? विचार करायला हवा. ज्या जाणिवांच्या मुळाशी निखळ लैंगिकता आहे त्यांचं स्पष्टीकरण लैंगिक पुनरुत्पादनाच्या 'उत्क्रान्तीजन्य जबाबदारी'च्या आधारे देता येऊ शकेल. पण इतर मानवी इच्छा-आकांक्षा, भावना-संवेदना यांचा जो मोठा पट आहे तो अजूनही का बदलत नाही यावर विचार व्हावा.

- फेसबुक पोस्ट 

No comments:

Post a Comment